"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.
मित्रवर्य उद्गारलेच "गाढवाला गुळाची चव काय?" .
"यात गुळ घातला होता?" मी अविश्वासाने विचारले.
"हेच. हेच. दुनिया चंद्रावर जाउन आली आणि अजुन तुमचे पुणे - ३० चे गचाळ विनोद जात नाहित"
वास्तविक तो विनोद नव्हता. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती प्रश्न विचारण्याची. बुद्धी गहाण न ठेवलेल्या कुठल्याही माणसाला कळाले असते की त्या लस्सीत गोडवा निर्माण करणारा कुठलाही पदार्थ नव्हता. गूळ नाही, साखर नाही. बॅगोन असावे अशी दाट शंका आली पण तसे बोलुन दाखवले असते तर मित्र वस्सकान अंगावर आला असता. घरी बायकोचा मार खातो त्यामुळे आधीच दुर्मुखलेला असतो त्यामुळे काही झाले की असा वस्सकन समोरच्याच्या अंगावर येतो. पुणेकर म्हटला की याला गेस्टापोंना ज्यु दिसल्यावर व्हायचा तसा आनंद होतो. त्यामुळे लस्सीला बॅगोनचा वास आला म्हटल्यावर मी बॅगोन पितो असा सोयिस्कर निष्कर्ष काढुन तो गावभर बोंबलायला मोकळा झाला असता. वर पुण्यात हॉटेलमध्ये बॅगोन मिळते म्हणुन पण ओकला असता.
पुण्यातल्या गणेशची लस्सी चांगली असते या निष्पाप विधानाचा तो सूड होता. लस्सी म्हटल्यावर ती दह्याची हवी, त्यावर मलईचा गोळा हवा आणि ती गोड (किंवा खारट. खारट हा प्रकार एरवी मला मानवत नाही. खारट लस्सी प्यायच्या ऐवजी ताक प्याले तर काय वाईट?) हवी. तर मी परदेशात (पुणे सोडुन बाकी दुसरे कुठलेही गाव आमच्यासाठी परदेश असते. मुळात नदीपल्याडच्या वस्तीला आम्ही पुणे म्हणत नाही तर पुण्यापल्याडच्या वस्तीला तर आम्ही ओळखही द्यायला नको. पण असो. तो वेगळा विषय) जाउन प्यालेली ती लस्सी चक्क कडु होती आणि त्यात आईसक्रीम होते. आईस्क्रीम लस्सीत? अर्रे आमच्याक्डे ते मस्तानीत टाकतात (मस्तानी म्हणजे थिकशेक. मस्तानी मस्तानी काय करता? आमच्या हाज्जीअली ला याहुन भारी थिकशेक मिळते ही पण एक नेहमी मिळणारी प्रतिक्रिया. तर असो. ) .
"लस्सीत आइस्क्रीम टाकता तर तुम्ही मटकीच्या उसळीत फरसाण टाकुन त्याला मिसळ म्हणाल रे" मी कळवळुन करवादलो.
"मग मिसळ अजुन कशाला म्हणतात?"
अर्रे मिसळ म्हटल्यावर त्यात पोहे येतात, बटाट्याची भाजी येते, मटकीचे दाणे येतात, फरसाण येते तशी थोडी शेवही वेगळी येते, त्यात आम्ही चिवडा घालतो, दुसर्या दिवशी मुक्काम ठोकायचा नसेल तर् म्ह्णुन एक गोडसर आणि लाल पाट वाहु द्यायची तयारी असेल तर एक तिखट झणझणीत रस्सा तयार ठेवतो. त्यावर मस्त कांदा भुरुभुरतो, कोथिंबिर टाकतो. मग आमची साग्रसंगीत मिसळ तयार होते. झालेच तर भजीचे तुकडे टाकुन आम्ही त्याला अजुन थोडी रंगत आणतो. मिसळ म्ह्णजे असा चटकन उरकुन टाकायचा पदार्थ नव्हे आमच्यासाठी. मिसळ आमच्यासाठी पूजा आहे. बेदी, बत्रा किंवा भटांची नाही. देवळात करतो तशी. अर्रे आमच्याकडे आरतीला पण फक्त साखर देउन बोळवण होत नाही. खायचे म्हटले की तिथे आमच्याकडे कलाकुसर आलीच.
एवढे बोलुन झाल्यावर "गोड मिसळ खाणारे पुचाट लोकं तुम्ही.तुम्हाला लस्सी कडुच लागणार" असे फुत्कार टाकुन महोदय निघुन गेले. वास्तविक दोन गोष्टींचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तसा माणुस चंद्रावर जाउन आल्याचा आणि पुणॅरी विनोदाचा पण काही सम्बंध नाही म्हणा. माझ्या त्या मित्राचा आणि विनोदाचा पण नाही (आणि त्याचा आणि गुळाचापण नाही).
पण दोष त्याचा नाही. काय आहे पुणॅ म्हटल्यावर उगाचच शिव्या घालायच्या आणि आपल्याला पण कुजकटपणा करता येतो असे दाखवायची एक फ्याशन आहे. पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते.
अर्रे तुम्हाला नकोय ना गोड मिसळ? मग तर्री मागा. देतात ते. तेही नको असेल तर रामनाथला जा. पार्श्वभागातुन जाळ निघेपर्यंत तिखट नरड्यात ओता. तेही नको असेल तर टिंबर मार्केटला जा महेश भुवन मध्ये मिसळ ओरपा. अगदीच नाहितर कर्वे रोड वर आयकर गल्लीत जाउन उभे रहा. वाडगा घेउन नाही. प्लेट घेउन., हे बाहेरच्यांना समजावुन सांगायला लागते. सपच्य अमागे जा, सिष्टर षिटीत नेवाळे, दे धक्का ला जा. पण मरायला तुम्हाला मित्राच्या *गणाला ढुं** लावुन यत्ता नववीत तुमच्या शहरात खाल्लेलीच मिसळ हवी असेल तर तशीच कशी मिळेल? (इथे *गणाचा आणि मिसळीच्या चवीचा संबंध नाही. त्याचा संबंध वातावरणनिर्मितीशी आहे हे लक्षात घ्या). ढेकण्या तुझ्या आईच्या आणि तुझ्या आज्जीच्या हातच्या पदार्थांची चव तरी एकसारखी आहे का रे? चवी बदलतात ना?
कसे असते प्रत्येक शहराची एक संस्कृती असते आणि ती तिथल्या खाद्यसंस्कृतीतुन परावर्तित होते. आता गोव्याला जाउन पाटवड्या आमच्या गावसारख्या नाही मिळत म्हणुन गळे काढण्यात काय अर्थ आहे? तिथे गेलात तर मासे खा, काजु करी खा, फेणी प्या, समुद्राचा वारा प्या. पाटवड्या तुला परसदारात मिळतात ना रे भावड्या? तुझ्या गावात मिसळीबरोबर लादीपाव देतात, ब्रेड स्लाइस देतात. पिझ्झा बेस देतात की ढेकळे देतात याच्याशी कोणाला घेणेदेणे आहे? पुणेरी मिसळीबरोबर ठिकानानुरुप यापैकी काहिही देउ शकतात (ढेकळे आणि पिझ्झा बेस सोडुन). मग? पुढे काय? पण लोकांचे हे असे असते त्यांची दुनिया स्वतःपाशी संपते. स्वतःला नाही आवडले आणि न आवडणारे आपण एकटे असलो तर हे लोक आख्ख्या समाजाच्या नावाने गळे काढणार. तुला नाही ना आवडले तु नको ना खाऊ. तिथे रांगा लावुन खाणारे मुर्ख म्हणुन कशाला केकाटतोस बाबा?
बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे. अर्रे खाण्यात राज्ये बुडवली आम्ही (याला किमान २ आयडी अनुमोदन देतील याबाबत शंका नाही). इतिहासाची पुस्तके उघडुन बघा. साले लग्नसमारंभात पानावर केवळ चटण्या ८ प्रकारच्या वाढायचो आम्ही. लोणच्याच्या जागी कोशिंबीर आणि कोशिंबीरिच्या जागी अळुचे फदफदे असले नतद्रष्ट प्रकार करत नाही आम्ही. प्रत्य्के चौथे दुकान इथे एक हॉटेल असेल आणि पाचही खंडातल्या व्यंजनांची चव चाखायला मिळेल या शहरात (पेंन्ग्विन आणी कांगारु कुठे मिळतात हे विचारु नये. अपमान करण्यात येइल). जाओ अपने गिरेबान मे जाकर ढुंढो तुमच्या शहरात जो खाद्यपदार्थ बरा मिळतो त्याचे नाव सांगा पुण्यात खायला घालतो तुम्हाला. (पैसे तुमचे. पुणेकराने वाद जिंकण्यासाठी सुद्धा स्वतःचा पैसा खर्च करावा ही अपेक्षाच फोल आहे). अर्रे आम्ही नाणे वाजवुन घेतो तिथे खायचे पदार्थ असेच कुठलेही उचलु होय? हॅट. हुडत. अर्रे केशराची कांडी आणि तिचा स्वाद आणि रंग दिसला नाही तर आम्ही चितळेच्या श्रीखंडालाही दहीसाखर म्हणुनच खाउ. पण चितळे देतो उत्कृष्ट श्रीखंड तर मग कसला आलाय दु:स्वास?
पण पण. पुणेकराचे एक आहे. "अर्रे आमच्या नागपुरची संत्री बघा एक एक काय रसाळ असतात (पुलं). नाहितर तुमच्या पुण्याच्या संत्री ..... " असली वाक्ये आमच्या तोंडुन निघायची नाहित. आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत. तुमची रसरंग, मामलेदार, गोखले, फडतरे, खासबाग, बावडा जी काही चांगली असेल ती तुम्हाला लखलाभ. आम्हीही खाउन बघु. आवडली तर आम्हालाही लखलाभ. आम्ही उगा नसतीकडे वाकड्यात शिरत नाही. अर्रे अन्न ते पुर्णब्र्हम. त्यात कसली आलीय इर्ष्या, तिरस्कार, स्पर्धा, मानापमान आणि तुच्छता (आम्ही परगावचा आख्खा माणुसच तुच्छ लेखु ती गोष्ट वेगळी). आमच्या श्रद्धास्थानांवर गरळ ओकाल तर मात्र फणा काढुन उभे राहु ही गोष्ट वेगळी.
सुदैवाने मी १० गावात राहिलो आहे. नंदुरबारचा पात्रा ज्या सुखाने चाखला त्याच आनंदाने सातारी कंदी पेढा खाल्ला, रंकाळ्यावर भेळ खाल्ली, इंदौरला कचोरी हाणली, ठाण्याला राजमाताचा वडापाव कोंबला, कुंजविहारचा वडापाव रिचवला, मामलेदारची झणझणीत ( अहाहा. आत्ताही लाळ सुटली) मिसळ, संगमनेरला सुदाम्याची पावभाजी आणि नढेची भेळ हे स्वर्गसुख अनुभवले. त्याच भक्तीभावाने मी आता कल्याणला जाउन भेळ, मनिषात पाणीपुरी, जेजे गार्डनला (आणि विट्ठल मंदिरा च्या बाहेर आणि शिवदीपमध्ये आणि भोलाकडे) वडापाव, सुप्रीमची पावभाजी, बेडेकरची मिसळ, गणेशची लस्सी आणि सुजाताची मस्तानी खाउ शकतो. देवाच्या दयेने मी खाण्याच्या बाबतीत भेदभाव करत नाही. त्याबाबतीत आकस ठेवत नाही. चांगले आहे हे कळत असुनही केवळ नावे ठेवण्याच्या लालसेपायी माझ्या जिव्हेवर अन्याय करत नाही. जे जे उत्तम उदात असेल ते ते खावे हा नियम भक्तिभावाने जोपासतो. जीभ (बोलुन आणि खाउन) संस्कृती घडवते हे माहिती असलेल्या गावात राहुन मी इतके तरी शिकु शकतोच ना?
प्रतिक्रिया
21 Nov 2013 - 5:07 pm | मृत्युन्जय
बात अगर बटाटावडा की निकली ही हय तो "प्रभा विश्रांती गृह" पेक्षा सुंदर बटाटावडा अजुन माझ्या तरी खाण्यात नाही. राजमाता, ठाणे आणि शिवदीप पुणे आर क्लोज सेकंड
21 Nov 2013 - 6:35 pm | रेवती
चांगला ब. वडा खाऊन अनेक वर्षे लोटलीत असे जाणवले. मला वाटते चार ते पाच वर्षात चांगला ब. वडा खाल्लेला नाही. खरेतर बटाटेवडाच वर्षातून एकदा खाल्ला जातो.
22 Nov 2013 - 12:27 am | अत्रुप्त आत्मा
आपल्या शिंव्हगड रोडचा अन्नपूर्णा आणी हाऊस ऑफ वडापाव... र्हायला कि वो!
22 Nov 2013 - 4:02 pm | मैत्र
+१११११११११११११११११११११११११११११
चांगले उत्तम वडे अनेक ठिकाणी मिळतात पण प्रभा म्हणजे सर्वोत्कृष्ट!
23 Nov 2013 - 5:05 pm | वेल्लाभट
तोंडाला पाणी आणणारा लेख
24 Nov 2013 - 1:36 pm | तुमचा अभिषेक
एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो.
जायच्या आधीच निगेटीव सोच... मग असेच होणार .. :)