Skip to main content

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले. मित्रवर्य उद्गारलेच "गाढवाला गुळाची चव काय?" . "यात गुळ घातला होता?" मी अविश्वासाने विचारले. "हेच. हेच. दुनिया चंद्रावर जाउन आली आणि अजुन तुमचे पुणे - ३० चे गचाळ विनोद जात नाहित" वास्तविक तो विनोद नव्हता. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती प्रश्न विचारण्याची. बुद्धी गहाण न ठेवलेल्या कुठल्याही माणसाला कळाले असते की त्या लस्सीत गोडवा निर्माण करणारा कुठलाही पदार्थ नव्हता. गूळ नाही, साखर नाही. बॅगोन असावे अशी दाट शंका आली पण तसे बोलुन दाखवले असते तर मित्र वस्सकान अंगावर आला असता. घरी बायकोचा मार खातो त्यामुळे आधीच दुर्मुखलेला असतो त्यामुळे काही झाले की असा वस्सकन समोरच्याच्या अंगावर येतो. पुणेकर म्हटला की याला गेस्टापोंना ज्यु दिसल्यावर व्हायचा तसा आनंद होतो. त्यामुळे लस्सीला बॅगोनचा वास आला म्हटल्यावर मी बॅगोन पितो असा सोयिस्कर निष्कर्ष काढुन तो गावभर बोंबलायला मोकळा झाला असता. वर पुण्यात हॉटेलमध्ये बॅगोन मिळते म्हणुन पण ओकला असता. पुण्यातल्या गणेशची लस्सी चांगली असते या निष्पाप विधानाचा तो सूड होता. लस्सी म्हटल्यावर ती दह्याची हवी, त्यावर मलईचा गोळा हवा आणि ती गोड (किंवा खारट. खारट हा प्रकार एरवी मला मानवत नाही. खारट लस्सी प्यायच्या ऐवजी ताक प्याले तर काय वाईट?) हवी. तर मी परदेशात (पुणे सोडुन बाकी दुसरे कुठलेही गाव आमच्यासाठी परदेश असते. मुळात नदीपल्याडच्या वस्तीला आम्ही पुणे म्हणत नाही तर पुण्यापल्याडच्या वस्तीला तर आम्ही ओळखही द्यायला नको. पण असो. तो वेगळा विषय) जाउन प्यालेली ती लस्सी चक्क कडु होती आणि त्यात आईसक्रीम होते. आईस्क्रीम लस्सीत? अर्रे आमच्याक्डे ते मस्तानीत टाकतात (मस्तानी म्हणजे थिकशेक. मस्तानी मस्तानी काय करता? आमच्या हाज्जीअली ला याहुन भारी थिकशेक मिळते ही पण एक नेहमी मिळणारी प्रतिक्रिया. तर असो. ) . "लस्सीत आइस्क्रीम टाकता तर तुम्ही मटकीच्या उसळीत फरसाण टाकुन त्याला मिसळ म्हणाल रे" मी कळवळुन करवादलो. "मग मिसळ अजुन कशाला म्हणतात?" अर्रे मिसळ म्हटल्यावर त्यात पोहे येतात, बटाट्याची भाजी येते, मटकीचे दाणे येतात, फरसाण येते तशी थोडी शेवही वेगळी येते, त्यात आम्ही चिवडा घालतो, दुसर्‍या दिवशी मुक्काम ठोकायचा नसेल तर् म्ह्णुन एक गोडसर आणि लाल पाट वाहु द्यायची तयारी असेल तर एक तिखट झणझणीत रस्सा तयार ठेवतो. त्यावर मस्त कांदा भुरुभुरतो, कोथिंबिर टाकतो. मग आमची साग्रसंगीत मिसळ तयार होते. झालेच तर भजीचे तुकडे टाकुन आम्ही त्याला अजुन थोडी रंगत आणतो. मिसळ म्ह्णजे असा चटकन उरकुन टाकायचा पदार्थ नव्हे आमच्यासाठी. मिसळ आमच्यासाठी पूजा आहे. बेदी, बत्रा किंवा भटांची नाही. देवळात करतो तशी. अर्रे आमच्याकडे आरतीला पण फक्त साखर देउन बोळवण होत नाही. खायचे म्हटले की तिथे आमच्याकडे कलाकुसर आलीच. एवढे बोलुन झाल्यावर "गोड मिसळ खाणारे पुचाट लोकं तुम्ही.तुम्हाला लस्सी कडुच लागणार" असे फुत्कार टाकुन महोदय निघुन गेले. वास्तविक दोन गोष्टींचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तसा माणुस चंद्रावर जाउन आल्याचा आणि पुणॅरी विनोदाचा पण काही सम्बंध नाही म्हणा. माझ्या त्या मित्राचा आणि विनोदाचा पण नाही (आणि त्याचा आणि गुळाचापण नाही). पण दोष त्याचा नाही. काय आहे पुणॅ म्हटल्यावर उगाचच शिव्या घालायच्या आणि आपल्याला पण कुजकटपणा करता येतो असे दाखवायची एक फ्याशन आहे. पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते. अर्रे तुम्हाला नकोय ना गोड मिसळ? मग तर्री मागा. देतात ते. तेही नको असेल तर रामनाथला जा. पार्श्वभागातुन जाळ निघेपर्यंत तिखट नरड्यात ओता. तेही नको असेल तर टिंबर मार्केटला जा महेश भुवन मध्ये मिसळ ओरपा. अगदीच नाहितर कर्वे रोड वर आयकर गल्लीत जाउन उभे रहा. वाडगा घेउन नाही. प्लेट घेउन., हे बाहेरच्यांना समजावुन सांगायला लागते. सपच्य अमागे जा, सिष्टर षिटीत नेवाळे, दे धक्का ला जा. पण मरायला तुम्हाला मित्राच्या *गणाला ढुं** लावुन यत्ता नववीत तुमच्या शहरात खाल्लेलीच मिसळ हवी असेल तर तशीच कशी मिळेल? (इथे *गणाचा आणि मिसळीच्या चवीचा संबंध नाही. त्याचा संबंध वातावरणनिर्मितीशी आहे हे लक्षात घ्या). ढेकण्या तुझ्या आईच्या आणि तुझ्या आज्जीच्या हातच्या पदार्थांची चव तरी एकसारखी आहे का रे? चवी बदलतात ना? कसे असते प्रत्येक शहराची एक संस्कृती असते आणि ती तिथल्या खाद्यसंस्कृतीतुन परावर्तित होते. आता गोव्याला जाउन पाटवड्या आमच्या गावसारख्या नाही मिळत म्हणुन गळे काढण्यात काय अर्थ आहे? तिथे गेलात तर मासे खा, काजु करी खा, फेणी प्या, समुद्राचा वारा प्या. पाटवड्या तुला परसदारात मिळतात ना रे भावड्या? तुझ्या गावात मिसळीबरोबर लादीपाव देतात, ब्रेड स्लाइस देतात. पिझ्झा बेस देतात की ढेकळे देतात याच्याशी कोणाला घेणेदेणे आहे? पुणेरी मिसळीबरोबर ठिकानानुरुप यापैकी काहिही देउ शकतात (ढेकळे आणि पिझ्झा बेस सोडुन). मग? पुढे काय? पण लोकांचे हे असे असते त्यांची दुनिया स्वतःपाशी संपते. स्वतःला नाही आवडले आणि न आवडणारे आपण एकटे असलो तर हे लोक आख्ख्या समाजाच्या नावाने गळे काढणार. तुला नाही ना आवडले तु नको ना खाऊ. तिथे रांगा लावुन खाणारे मुर्ख म्हणुन कशाला केकाटतोस बाबा? बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे. अर्रे खाण्यात राज्ये बुडवली आम्ही (याला किमान २ आयडी अनुमोदन देतील याबाबत शंका नाही). इतिहासाची पुस्तके उघडुन बघा. साले लग्नसमारंभात पानावर केवळ चटण्या ८ प्रकारच्या वाढायचो आम्ही. लोणच्याच्या जागी कोशिंबीर आणि कोशिंबीरिच्या जागी अळुचे फदफदे असले नतद्रष्ट प्रकार करत नाही आम्ही. प्रत्य्के चौथे दुकान इथे एक हॉटेल असेल आणि पाचही खंडातल्या व्यंजनांची चव चाखायला मिळेल या शहरात (पेंन्ग्विन आणी कांगारु कुठे मिळतात हे विचारु नये. अपमान करण्यात येइल). जाओ अपने गिरेबान मे जाकर ढुंढो तुमच्या शहरात जो खाद्यपदार्थ बरा मिळतो त्याचे नाव सांगा पुण्यात खायला घालतो तुम्हाला. (पैसे तुमचे. पुणेकराने वाद जिंकण्यासाठी सुद्धा स्वतःचा पैसा खर्च करावा ही अपेक्षाच फोल आहे). अर्रे आम्ही नाणे वाजवुन घेतो तिथे खायचे पदार्थ असेच कुठलेही उचलु होय? हॅट. हुडत. अर्रे केशराची कांडी आणि तिचा स्वाद आणि रंग दिसला नाही तर आम्ही चितळेच्या श्रीखंडालाही दहीसाखर म्हणुनच खाउ. पण चितळे देतो उत्कृष्ट श्रीखंड तर मग कसला आलाय दु:स्वास? पण पण. पुणेकराचे एक आहे. "अर्रे आमच्या नागपुरची संत्री बघा एक एक काय रसाळ असतात (पुलं). नाहितर तुमच्या पुण्याच्या संत्री ..... " असली वाक्ये आमच्या तोंडुन निघायची नाहित. आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत. तुमची रसरंग, मामलेदार, गोखले, फडतरे, खासबाग, बावडा जी काही चांगली असेल ती तुम्हाला लखलाभ. आम्हीही खाउन बघु. आवडली तर आम्हालाही लखलाभ. आम्ही उगा नसतीकडे वाकड्यात शिरत नाही. अर्रे अन्न ते पुर्णब्र्हम. त्यात कसली आलीय इर्ष्या, तिरस्कार, स्पर्धा, मानापमान आणि तुच्छता (आम्ही परगावचा आख्खा माणुसच तुच्छ लेखु ती गोष्ट वेगळी). आमच्या श्रद्धास्थानांवर गरळ ओकाल तर मात्र फणा काढुन उभे राहु ही गोष्ट वेगळी. सुदैवाने मी १० गावात राहिलो आहे. नंदुरबारचा पात्रा ज्या सुखाने चाखला त्याच आनंदाने सातारी कंदी पेढा खाल्ला, रंकाळ्यावर भेळ खाल्ली, इंदौरला कचोरी हाणली, ठाण्याला राजमाताचा वडापाव कोंबला, कुंजविहारचा वडापाव रिचवला, मामलेदारची झणझणीत ( अहाहा. आत्ताही लाळ सुटली) मिसळ, संगमनेरला सुदाम्याची पावभाजी आणि नढेची भेळ हे स्वर्गसुख अनुभवले. त्याच भक्तीभावाने मी आता कल्याणला जाउन भेळ, मनिषात पाणीपुरी, जेजे गार्डनला (आणि विट्ठल मंदिरा च्या बाहेर आणि शिवदीपमध्ये आणि भोलाकडे) वडापाव, सुप्रीमची पावभाजी, बेडेकरची मिसळ, गणेशची लस्सी आणि सुजाताची मस्तानी खाउ शकतो. देवाच्या दयेने मी खाण्याच्या बाबतीत भेदभाव करत नाही. त्याबाबतीत आकस ठेवत नाही. चांगले आहे हे कळत असुनही केवळ नावे ठेवण्याच्या लालसेपायी माझ्या जिव्हेवर अन्याय करत नाही. जे जे उत्तम उदात असेल ते ते खावे हा नियम भक्तिभावाने जोपासतो. जीभ (बोलुन आणि खाउन) संस्कृती घडवते हे माहिती असलेल्या गावात राहुन मी इतके तरी शिकु शकतोच ना?

वाचने 41438
प्रतिक्रिया 186

प्रतिक्रिया

वा.खू.सा.आ!!

वरती एका प्रतिसादात खिचडीवाले आप्पा गेल्याचं वाचलं. ही बातमी कधीची आहे? कारण मी दीड महिन्यापूर्वी गेलो होतो तेव्हा तो होता. छान होता. वयोमानाप्रमाणे उत्साह कमी झाला आहे. आवाजसुद्धा कमी आहे. पण आहे. अजून गेलेला नाही.

In reply to by शोधा म्हन्जे सापडेल

वयाचा उल्लेख करता आणि "तो" म्हणता? निदान त्यांनी पोटभर ताजं, सकस खायला घातल म्हणुन तरी आदर असावा. :(

मी सिस्टर सिटीत राहतो … कोनात दम असेल तर "नेवाळे" मिसळ फक्त २ पावामध्ये खावून दाखवा …. शरीरात जितकी भोके आहेत ना सगळीकडून धूर निघेल

In reply to by देवांग

कोनात दम असेल तर "नेवाळे" मिसळ फक्त २ पावामध्ये खावून दाखवा …. शरीरात जितकी भोके आहेत ना सगळीकडून धूर निघेल
प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला असला तरी उद्देशून मात्र अन्य अनेक तिखटमिसळवर्णनांना आहे. मी काय म्हणतो, म्हणजे आपण शांतपणे विचार करुन पाहू.. एकदम डोक्यात राख किंवा अन्य शरीरछिद्रांत धूर असं नको.. कोणताही पदार्थ (बी इट मिसळ ऑर अदरवाईज) ही एक आनंदाने आस्वाद घेण्याची गोष्ट असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. अधिकाधिक तिखट किंवा मामलेदारपेक्षा तिखट वगैरे म्हणजे टेस्टीच असं नव्हे. आपल्याला काही मरणोत्तर आपल्या आतड्यांची बॅडमिंटनला लागणारी नेट्स बनवायची नाहीयेत. तेव्हा खाऊन दाखवा.. नाही धूर / जाळ / राख / आग / रॉकेट / ज्वालामुखी वगैरे झाला तर...हां...हाही टेसदारपणा वर्णिण्याचा एक अतिशयोक्ती अलंकार आहे हे मान्य.. पण खरंच काही मिसळी इतक्या जास्त तिखट बनवल्या जातात की त्यात चटकदारपणापेक्षा जिभेचा अ‍ॅब्युस जास्त होतो. पहिले दोन घास झाले की घासाघासाला अधिकाधिक आग आग करणार्‍या या तिखटाची जात वेगळी असते आणि ते मजा वाटेल असं नक्कीच नसतं. अशा मिसळीला मी तरी उत्कृष्ट म्हणत नाही. अशा आव्हानात्मक प्रकारे दर्शविण्यासारख्या पदार्थापेक्षा चवींचा एकूण मेळ कोणीही यावे आणि खाऊन पहावे, निश्चित आवडेल अशा स्वरुपाचा असलेला पदार्थ अधिक उत्तम असं मला वाटतं.. याचा अर्थ तुम्ही वर्णिलेली मिसळ वाईटच असेलच असंच नाहीच.. त्या निमित्ताने जे लक्षात आलं ते लिहिलं.. कारण धाग्यात यापूर्वीही गोड मिसळ / तिखट मिसळ असे (टायगर कडक पत्ती चहा- वाघासारख्या मर्दांसाठी) उल्लेख आलेले दिसले.. :)

In reply to by गवि

खरे सांगायचे तर मी ती वर्षातून दोनवेळा खातो …. आणि कोणी फुकट दिली तर :P पण खाताना मज मात्र येते हे मान्य करायला पाहिजे :)

In reply to by गवि

करेक्ट! खाण्यासारख्या जीवलग गोष्टींवर लोक अस्मितेच्या चर्चा कशा छेडतात याचं नवल आहे. आणि त्याही पुढे जाऊन मग वाचू नयेत अशी वर्णनं येतात, ते तर फार दुर्दैवी आहे.

In reply to by गवि

नेमके अन मार्मिक!!! धुराची एखादी शिट्टी आली तर हरकत नाही पण स्टीम इंजिन काही बनवायचे नाहीये हे एकदम पटलं.

In reply to by गवि

डोळ्यासमोर आलेलं चित्र. गविशेठ असे टपरीवर बसलेत. आता ते बसलेत म्हणजे एकटेच. काळ्या कडप्पाच्या टेबल टॉपवर अशा मस्त पाच सात प्लेट्स आहेत. त्यातल्या दोन-तीन मिसळ प्लेट्स संपलेल्या असल्यानं उगा तिथंच वाकड्ञा तिकड्या पसरल्यात. मिसळी च्या रश्श्यासाठी मोठ्या चमच्याबरोबर आलेला रश्श्याचा मग.... पाच सात पाव संपलेत. चार समोर आहेत. एका हातात पाव, दुसर्‍या हातात चमचा, मांडीवर मोठ्ठा नॅपकीन नि थोडा घाम आलेल्या चेहरा अशा पोझिशनमध्ये गवि शेठ म्हणतात... >>>मी काय म्हणतो, म्हणजे आपण शांतपणे विचार करुन पाहू..

In reply to by गवि

गविंशी सहमत. नेवाळे मिसळ घरापासून तशी जवळच आहे. पण कधीच खात नाही. कारण एकच. महाप्रचंड तिखटपणा. काही वेळा तर मला वाटते आपली मिसळ जास्तीत जास्त तिखटच हवी अशी ओसीडी आहे की काय त्याला. बाकी चिवडा, फरसाण घरी असलं की मात्र मटकीची उसळ घरी बनवायची आणि त्याच्याकडून मस्तपैकी रस्सा-तर्री पार्सल आणायची आणि मिसळीवर थोडीशी टाकायची मग अफलातून चव येते आणि आग आग पण होत नाही. बाकी पुण्यातल्या श्री मिसळ, बेडेकर मिसळीकडून भ्रमनिरासच झालाय. पौडातली हॉटेल दिपक मधली मिसळ सर्वोत्तम असे वैयक्तिक मत.

In reply to by प्रचेतस

वल्ली तुम्ही नेवालेच्या समोर असलेली शशीची मिसळ खाल्ली का ? ती पण मस्त असते …मल तीच आवडते

In reply to by प्रचेतस

बुवांची आवडती करंट मिसळ पण जोरदार आहे बरं का आणी पिं.चिं. मधली 'दे धक्का' मिसळ पण भारी आहे... बेडेकर रामनाथ मला पण नाही आवड्त

In reply to by मी-सौरभ

दे धक्का तर आमच्या बिल्डींगच्या खालीच. पण त्याच्याकडे नुसता कांदा लसूण मसाल्याचा रस्सा असतो. मटकी वैग्रे बिलकुल नै. पण चव आहे.

In reply to by गवि

"मिपा" वर मिसळीबद्दल एकदम जोशात चर्चा चालू आहे. मिसळ साधी / तिखटजाळ / फिकी कशी का असेना मिसळ ती मिसळ ! या चर्चेमुळे कुठे काय खायला मिळते याची योग्य माहिती मिळ्त आहे. वेगवेगळ्या शहरात कोणता पदार्थ कुठे मिळतो याची छान माहिती मिळते. असो. अजून माहिती येउ द्या, मी जरा मिसळ चापून येतो.

In reply to by गवि

पण खरंच काही मिसळी इतक्या जास्त तिखट बनवल्या जातात की त्यात चटकदारपणापेक्षा जिभेचा अ‍ॅब्युस जास्त होतो. पहिले दोन घास झाले की घासाघासाला अधिकाधिक आग आग करणार्‍या या तिखटाची जात वेगळी असते आणि ते मजा वाटेल असं नक्कीच नसतं. अशा मिसळीला मी तरी उत्कृष्ट म्हणत नाही>> अगदी नेमकं. :)

In reply to by गवि

आपल्याला काही मरणोत्तर आपल्या आतड्यांची बॅडमिंटनला लागणारी नेट्स बनवायची नाहीयेत. खो खो हसलो .. खरे आहे तुमचे म्हणणे आणि म्हणूनच ठाण्याच्या मामलेदार वर आमची फुली ! गड्या आपली बेडेकर बरी , अधिक चवीसाठी ते तिखट नाही तर तिखट जीभ वापरतात.. आणि तुम्हाला घाम फोडतात!

In reply to by शैलेन्द्र

हो. सामोसा काही ख़ास नाही. सोडा लैच मारलेला असतो. दाल पकवान मात्र बरेच वेळा खात असतो. भन्नाट प्रकार आहे.

In reply to by प्रचेतस

पिंपरीतलं पॅटीसही अफलातून असतं. पूर्वी बजाज ऑटो समोर जयश्री ची मिसळ मिळायची. कवि, नेवाळे पेक्षा ती मला आवडायची. रोड वाईडनिंग मधे गेलं ते. आतल्या बाजूला ब्रम्हा रिजेन्सी च्या बाजूला आहे आता बहुतेक ते. टेल्को भोसरी रोड वर हॉटेल मयूर च्या मिसळीबद्दल ऐकलंय. कुठे आहे माहिती आहे का? बाकी बाबा रामदेव ची दाल बाटी, चुरमा, मसाला खिंचीयां मस्त.

In reply to by चाणक्य

हो. टिपिकल सिंधी पद्धतीचे पॅटीस. जयश्रीची मिसळ खाल्ली होती. फारशी आवडली नाही. ब्रह्मा शेजारीच आहे ती. मयूर मिसळ अजून खायचा योग आला नाही. एच ए कॉलनीमधल्या नाशिककरचा वडा अफलातून असतो.

In reply to by चाणक्य

हाहा. याबाबत आपला पास. अंडीसुद्धा खात नसल्याने कधी भुर्जीच्या गाडीवर जायची वेळच आली नाही. :)

In reply to by प्रचेतस

अंडीसुद्धा खात नसल्याने कधी भुर्जीच्या गाडीवर जायची वेळच आली नाही.
मग, पनीर भुर्जी करून खा. मस्तं लागते.

In reply to by प्रभाकर पेठकर

अगदी. कधीमधी हाटेलात पनीर भुर्जी खाल्ली जाते. घरी करायचा कधी प्रयत्न केला नाही.

In reply to by प्रचेतस

पनीर भुर्जी सारखा भिकार पदार्थ अजिबात आवडत नाही ,इतका छान तो पनीर त्याचा भुसा करायचा पटत नाही विशेता: पनीरचे इतर चांगले उपयोग असताना , हे माझ मत आहे कोणीही उगाच उचकू नका !!! :)

In reply to by माझीही शॅम्पेन

नका ओ नका. आमच्यासारख्या शाकाहारी 'बनलेल्यां'ना तोच एक सहारा आहे. उगाच बुर्जी खाल्ल्याची मौज करुन घेता येते.

In reply to by प्यारे१

तुम्हाला आवडते नं? मग मजेत खात जा. तसेही, आंबे, पेढे, सुकामेवा न आवडणारी माणसेही असतात, भुर्जी क्या चिझ है?

In reply to by प्रभाकर पेठकर

अगदी अगदी. बरेच लहान असताना आंब्याऐवजी पेरू अधिक प्रिय होता ते दिवस आठवून अं.ह. झालो. अर्थात त्यामागे गोडाचा अंमळ तिटकारा आणि आंबे खाताना हात बरबटून घेण्याचा तिटकारा हे फॅक्टर जास्त होते.

ही बातमी तशी अवांतर आहे पण खाण्याशी संबंध आहे म्हणून.. राजेश कुमारचे वजन सध्या १५२ किलोग्रॅम इतके आहे. राजेशला त्याच्या रोजच्या आहाराबद्दल विचारले असता मिळालेली माहिती नक्कीच डोळे विस्फारणारी आहे. राजेश कुमार दररोज तब्बल ४० अंडी खातो, सोबत ५-६ किलो चिकन, सात लिटर दूध, ६-७ किलो फळे आणि ३० पेक्षा जास्त चपात्या. याबद्दल राजेश स्मितहास्यात प्रतिक्रीया देतो की, हा सगळा माझा आहार मोठा असल्याने मी दिवसातून ७ ते ८ वेळा जेवतो. लवकरच भारताकडून 'डब्यूडब्यूई'मध्ये दिसणार 'नवा खली'!

सांगलीला रामविश्वासचे श्रीखंड/आम्रखंड केवळ अप्रतीम....... ( पुण्याच्या चितळ्यांना /दारच्या पणशीकरांना यांच्याकडे काही वर्ष म्हशी धुवायला / पाणी भरायला पाठावायला पाहीजे) महाराष्ट्र बँकेचा-वडा, सांभाची पाणी-पुरी व गणेशचे पोहे खाल्यावर आत्मा तृप्त होतो, हे सांगली-पुणे-बेंगलोर-मुंबई इथे प्रत्येकी ३ते४ वर्ष खव्वयेगीरी केल्यावरचे माझे ठाम मत आहे. (वर्षातुन एखाद्या वेळीच जरी सांगलीला गेलो तरी हे चुकवत नाही) वि.सु. वडा बँकेत मिळत नसुन, लागुन असलेल्या बोळात मिळतो पण नाव महाराष्ट्र बँकेचा-वडा असेच रुढ झाले आहे. सांगलीत कुणालही पत्ता विचारावा

In reply to by आर्य

यांच्याकडे काही वर्ष म्हशी धुवायला / पाणी भरायला पाठावायला पाहीजे का बुवा? त्यामुळे काय फरक पडणारे? जर ती चव चांगली असेल तर आणि चवीचं शिक्रेट ते शेअर करणार असतील तर (जी शक्यता कमीच) उपयोग आहे. म्हशी धुवून जर श्रीखंडाला ती चव येणार असेल तर आम्हाला तसे नकोच! आणि तुम्ही म्हणताय तिथले श्रीखंड चांगले असेल तरी ठीकच आहे. शेवटी घराच्या जवळ जे उपलब्ध असेल ती चव आपली बनत जाते. तसेही घरी श्रीखंड केल्यावर प्रत्येकाच्या घरच्या पदार्थाची चव निराळी आणि चांगलीच असते.

In reply to by आर्य

अप्रतिम वगैरे नाही पण चांगले असते . चितळे हेच अस्सल ! बाकी चालू द्या . रच्याकने मिरजेच्या 'विटा डेअरी" च्या चक्क्याचे श्रीखंड खाल्ले आहे का ? मी त्यांचे तयार श्रीखंड ही खाल्ले आहे पण जायफळाची मात्रा थोडी अधिक उगाळतात, च्यायला पाटावर आडवे ! तसे आमच्या विट्याच्या राजहंस डेअरीचे श्रीखंड ही तोडीस तोड असते ! आणि तो सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानाजवळील कढी-वडा? हल्ली पुण्यात ही मिळतो म्हणे . आणि भड्ंग विसरलात काय ?

शनिपाराच्या जवळच्या "श्री" मिसळ चे नाव कोणी घेतले नाही ह्याचे आश्चर्य वाटले. मला तरी फार आवडायची ती. तिथले बटाटेवडे पण. बादशाही चे ( न्यू पुना रेफ्रेशमेंट ) चे बटाटेवडे पण मस्त असतात.

In reply to by प्रसाद१९७१

बात अगर बटाटावडा की निकली ही हय तो "प्रभा विश्रांती गृह" पेक्षा सुंदर बटाटावडा अजुन माझ्या तरी खाण्यात नाही. राजमाता, ठाणे आणि शिवदीप पुणे आर क्लोज सेकंड

In reply to by मृत्युन्जय

चांगला ब. वडा खाऊन अनेक वर्षे लोटलीत असे जाणवले. मला वाटते चार ते पाच वर्षात चांगला ब. वडा खाल्लेला नाही. खरेतर बटाटेवडाच वर्षातून एकदा खाल्ला जातो.

In reply to by मृत्युन्जय

बात अगर बटाटावडा की निकली ही हय तो "प्रभा विश्रांती गृह" पेक्षा सुंदर बटाटावडा अजुन माझ्या तरी खाण्यात नाही
+१११११११११११११११११११११११११११११ चांगले उत्तम वडे अनेक ठिकाणी मिळतात पण प्रभा म्हणजे सर्वोत्कृष्ट!

एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. जायच्या आधीच निगेटीव सोच... मग असेच होणार .. :)