दसरा!
रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं.
पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.