परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in काथ्याकूट
15 Feb 2017 - 9:46 pm
गाभा: 

बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.

माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.

सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.

आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.

इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.

मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.

पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.

हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.

परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 10:05 pm | संदीप डांगे

मोठा विषय आहे, सवडीने उत्तर देतो. तूर्तास, मला दुबई आणि मलेशिया इथून चांगल्या संधी आल्या होत्या. त्या मी नाकारल्या. कम्फर्टझोन तोडण्याचा स्वभाव असणारा मी त्या संधी का नाकारल्या याचं उत्तर देतो, आणि आज त्याबद्दल, तुमच्या प्रश्नाबद्दल विचार करतांना काय वाटतं तेही सांगतो.

आपल्याकडच्या सीबीएससी शाळांचा वाढता कठीण अभ्यास पाहता अमेरीकेतला तुम्ही म्हणताय तसा हसता खेळता अभ्यासक्रम कधीही चांगला. स्पर्धेत मागे पडू नयेत म्हणून लहान वयात नको तेवढा कठीण अभ्यासक्रम मला वयक्तीक रीत्या नको वाटतो. मुलांचे लहानपण हीरावून घेणारा वाटतो.
सद्या भारतातील शाळा स्पर्धांसाठी विद्यार्थी तयार करत आहेत. वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे शिकवले जाते की नाही शंका आहे. सार्वजनिक ठीकाणी वर्तन कसे असावे, स्वच्छता कशी राखावी, दुसर्‍यांना मान कसा द्यावा, रांगे उभे रहाताना खेटून उभे राहू नये, नेहमी आपल्या आधी कोणाचा हक्क आहे का ते पहावे, प्रत्येक ठीकाणी घुसाघुस करु नये, लीफ्टमधून बाहेर येणार्‍यांना आधी प्राधान्य द्यावे, मागून येणार्‍यांसाठी दरवाजा धरून ठेवावा, अनोळखी असला तरी प्रत्येकास हसून अभिवादन करावे, अशा बर्‍याचशा गोष्टी अमेरीकेत शिकवल्या जातात कींवा मुले इतरांना बघून शीकतात.
बरीच वर्ष अमेरीकेत राहून आल्यावर वर नमुद केलेल्या गोष्टी भारतात अजीबात दीसत नाहीत.
थोडक्यात मुलांना जबाबदार नागरीक बनवले जाते, जे भारतात होताना दीसत नाही.

बाकी तुमचे सारे आयुष्य भारतात गेल्यामुळे तुम्हाला भारतातील गर्दी, इथले उत्सवी वातावरण, सगेसोयरे आणि सोशल लाइफ याची सुरवातीला आठवण होत राहील.
हे बर्‍याचदा आपल्या स्वभावावर अवलंबून असते. अबोल स्वभावाचे लोक, एकटे रहाण्याची आवड असणारे, कोलाहलापासून दूर रहाण्याची आवड असणारे यांना अमेरीका अवडते.
रोज नाक्यावर उभे राहीलेच पाहीजे, आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा खाणे/पीणे झालेच पाहीजे, गॉसीपींग ची सवय असणारे अशा लोकांना अमेरीका कंटाळवाणी वाटते... :)

दिगोचि's picture

16 Feb 2017 - 5:39 am | दिगोचि

माझ्या मताप्रमाणे मी मुलासाठी तेथे राहणार आहे हे कॉप आउट आहे असे मला वाटते. तेथे राहणार असाल तर तुम्हाला हवे म्हणून रहा नाही तर काही बिघडले तर त्याला दोष द्याल. आणि तिथे जर राहणार असाल तर पूर्णपणे त्या जीवनात मिसळा. म्हणजे भारतीय सम्स्क्रुति सोडा असे मी म्हणत नाही. अनेक जण परदेशी राहतात पण दरवर्शी भारतात पळतात त्यामुळे ज्या देशात ते राहतात तो देशही अनेक वर्षे तेथे राहून त्यानी पाहिलेला नसतो व त्या देशच्या सम्स्क्रुतीची त्याना कल्पनाहि नसते असा माझा अनुभव आहे. जरा स्पष्ट लिहिले आहे रग मानू नका. इतर प्रतिसादकाना माझ्यावर तोफ डागु नका ही विनन्ति. पूर्वी असे घडले आहे म्हणून सान्गत आहे.

मराठी कथालेखक's picture

16 Feb 2017 - 1:44 pm | मराठी कथालेखक

परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.

तसा 'कधीच परदेशात न गेलेल्या' लोकांचा सल्ला लेखिकेने मागितला नाहीये पण तरी देत आहे.
फार थोडक्यात, मुलाची शाळा चांगली आहे, अभ्यासक्रम चांगला आहे ई ई कारणांनी परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेण्यात अर्थ नाही, (त्यातही स्वतःचे मन मारुन तर नाहीच नाही).
तुम्हाला दोघांना तिथे रहायला मनापासून आवडणार असेल तर जरुर तसा निर्णय घ्या. पण सध्या तुम्ही तुमचा विचारच प्रथम करा इतकं मी म्हणेन. तुम्ही (तुम्हाला आवडत असल्याने) भारतात परत येवून राहिल्याने मुलाचं काही मोठं नुकसान आहे असा अपराधी भाव मनात आणण्याचं कारण नाही. मुलगा मोठेपणी त्याच्या व्यक्तीमत्व, गुण, आवड याप्रमाणे जगाच्या पाठीवर जिथे जायचं असेल तिथे जाईलंच जाईल (काही लोक याला नशीब असं ही म्हणतात).. जसे तुमचे पालक कधी अमेरिकेत गेले नाहीत तरी तुम्ही ती संधी मिळवलीतच.

कदाचित एखादा मुलगा भारतात शिकून गुगलचा CEO होवू शकतो तर अमेरिकेत शिकलेला मुलगाही McDonald मध्ये वेटर असू शकतो...

पण परदेशात राहून मुलगा भारतीय संस्कृती शिकेल , मोठेपणी भारतीय संस्कृतीला अनुसरुन वागेल अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुम्ही अमेरिकेत स्थायिक होत असाल तर तुमचा मुलगा 'अमेरिकन' होईल या वास्तवाचे भान असू द्या..किंवा त्याला तसे घडू देण्यातच त्याचे भले आहे , नाहीतर तो तिथल्या इतर समाजापासून उपराच राहील.

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 2:18 pm | संदीप डांगे

बराचसा सहमत. नमस्ते लंडन मध्ये हे चित्र काहीसं दिसतं...

आपला प्रतिसाद मनापासून आवडला.

मराठी कथालेखक's picture

17 Feb 2017 - 4:54 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

फेदरवेट साहेब's picture

15 Feb 2017 - 11:08 pm | फेदरवेट साहेब

आई म्हणून प्रश्न पडलाय तुम्हाला, त्यात गैर काही नाही. आमचे स्पष्टवक्तेपण थोडे जास्त आहे म्हणून म्हणतो नमनाला घडाभर नसले तरी चालले असते. :)

तुमचे प्रश्न रास्त आहेत. तुम्ही अशी दोलायमान स्थिती झाली की उपलब्ध सोयी विरुद्ध काही जे तुम्हाला तोटे वाटत असतील त्यांना पारड्यात ठेऊन बघा, जे पारडे जड वाटते आहे तिकडे कौल टाकायचा , सिम्पल.

"माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.

काहीच अवघड नाही, असे वातावरण कुठंही मिळेल, मला (भारतात शिक्षण होऊनही) मिळाले. फक्त त्याची एक हिडीस किंमत भारतात मोजावी पुढे आयुष्यभर भरावी लागते (मी भरतोय) :(. एक गोष्ट इथे उघड लिहून देतो ताई, 'मोहम्मद, मेसाया, चार्ली हवेत कश्याला आपल्या सोबत' असे प्रतिसाद तुम्हाला इथेच मिळायची शक्यता प्रचंड जास्त आहे.

बाकी भारतीय संस्कृती म्हणजे काय? अहो तुम्ही श्रीनिवास ठाणेदारांचे पुस्तक वाचले आहे का? ते यूएसला गेले तेव्हा एअरमेल सोडून पर्याय नव्हता, तिकिटे महागडी होती, अशात माणूस आपली भाषा लिहू शकत असे पण बोलणे चक्क विसरत असे (एकटे राहावे लागल्यास परदेशात) म्हणजे अडखळत असे बोलण्यात. आजकाल तितके कठीण नाही. ज्यूईश लोक आपल्या पोरांना सब्बाथ शिकवतातच ना? तसेच करायचे, आपल्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे थोरामोठ्यांचा माफक आदर अन एक्सटेंडेड फॅमिली आहे असे शिकवायचे. प्रश्न पडल्यास उलट उत्तर न देता आपले मुद्दे मांडणे शिकवा, फॅमिली डे वगैरे (असल्यास) मुलाला आपले हेरिटेज सांगायला लाज वाटली नाही म्हणजे मिळवले. तो पूर्णच विसरेल का अन विसरला तर कसं हा विचार आत्ताच करणे थोडे ताणल्यासारखे नाही वाटत का? अन वोर्स्ट केस , नाही शिकला 'भारतीय संस्कृती' तर काय फरक पडतोय ?? म्हणजे काय इशू काय आहे ? नाही शिकला तर आई बापाकडे जेवायला येताना अपॉइंटमेंट घेऊन येईल अशी भीती आहे का? का सोबत राहता येणार नाही ह्याची भीती आहे? भारतीय पेरेंटिंग मध्ये हे एक मोठे लफडे आहे, पोराना प्रेमापेक्षा इंश्युरन्स पॉलिसी जास्त समजले जाते (तुम्ही समजता असे म्हणत नाहीये) .

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 11:20 pm | पिलीयन रायडर

नमनाला घडाभर तेल ही माझी पद्धत आहे. आदतसे मजबुर...

तुमचा मुद्दा रास्त आहे, की नाही शिकला भारतीय संस्कॄती तर काय बिघडतं? मलाही नाही माहिती की काय बिघडतं. पण माझा मुलगा आत्ताच इथल्या मुलांसारखा बोलतो, इथल्या पद्धतींना पटकन उचलतो. मला सांस्कृतिक धक्का बसतोच अनेकदा. मला प्रामाणिकपणे सांगायचं तर ही सुद्धा भीती वाटते की एका टप्प्यानंतर त्याला माझी मुल्य कळणार नाहीत आणि मला त्याची. आणि मग आमच्यात एक निश्चित अंतर पडेल का? माझ्या आई-वडीलांविषयी मला ज्या तीव्रतेने वाटतं, ते नाही म्हणलं तरी माझ्या मुलाला माझ्याबद्दल वाटत रहावं असं माझ्या डीएनए मध्ये कोरलं गेलंय. ते मिटवणं अशक्य नाहीये.. पण अवघड असेल. कदाचित त्या भीतीतून मला असं वाटत असेल की "भारतीय संस्कॄतीत" राहिला तर आपल्या मनासारखा घडण्याची शक्यता जास्त. ह्याला काही अर्थ नाहीये आणि हे रीझनेबलही नाहीये हे मलाही कळतंय. पण ते वळायला अवघड आहे. मी शब्दात नाही नीटसं मांडु शकत.

फेदरवेट साहेब's picture

15 Feb 2017 - 11:27 pm | फेदरवेट साहेब

नाही म्हणलं तरी माझ्या मुलाला माझ्याबद्दल वाटत रहावं असं माझ्या डीएनए मध्ये कोरलं गेलंय.

आऊच! :/

तूर्तास नो कॉमेंट्स. पुढे अजून काही चार चांगले पर्याय येतील, काही प्रतिसादांवर बोलताना तुम्ही अजून सुस्पष्ट होऊ शकाल, तेव्हा फक्त ह्या वाक्याचा एकदा रिव्यु घ्या, असे सुचवेन.

अर्थात धागा काढल्याबद्दल तुमचे आभार, आमचं नुकतं 3 महिन्याचं झालंय. अजून काही वर्षांनी आम्ही जात्यात असणार, कामी येईल हा धागा थॉटलाईन ठरवायला

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 11:36 pm | पिलीयन रायडर

मी विचार करुनही समजलं नाही की ह्यात वावगं काय? मी एक बर्‍यापैकी भारतीय मानसिकता असलेली पालक आहे. मुलांना सोडुन देणे, स्वतंत्र राहु देणे हे करण्याचा प्रयत्न चालु असतो. पण इथल्या आयांशी तुलना करता भारतीय आया आपल्या मुलांना खूपच जपतात आणि अनुषंगाने त्यांच्या अपेक्षाही बर्‍याच असतात. मी त्यातलीच एक आहे. माझ्या आईला मी रोज एक फोन केलाच पाहिजे असं वाटतं, मलाही मी तो केलाच पाहिजे असं वाटतं. ह्यात चूक की बरोबर हा विषय नाहीये. ती ह्या क्षणी माझी मानसिकता आहे. २ वर्षांपुर्वी मी भारत सोडायलाच तयार नव्हते, आज मी ८ महिने झाले रहातेय इथे. तेव्हा कदाचित माझ्या मुलाबद्दलच्या माझ्या अपेक्षाही काही वर्षांनी इतक्या तीव्र असणार नाहीत. अजुन तो बराच माझ्यावर अवलंबुन आहे, तेव्हा तो अहंकार असतोच. उद्या तो जितका सुटा होत जाईल तितका हा अहंकारही गळुन पडेल. पण तरीही भारतीय आईच्या मानसिकतेते सध्या असताना तरी असंच वाटतं की ह्याला भेटायला किमान अपॉईंटमेंट घ्यायला लागु नये.

तुम्हाला असं वाटत असेल की उद्या जाऊन बायको आली तरी माझ्याच शब्दात असावा, तर तसा प्रकार नाहीये हा. इथे माझं ऐकण्या बिकण्याशी संबंध नाही. अगदीच दुरावु नये इतकंच वाटतं.

स्रुजा's picture

15 Feb 2017 - 11:30 pm | स्रुजा

आपल्या आणि त्यांच्या मुल्यांमध्ये फार काही फरक नाही आहे. चोरी कर, उद्धटपणे बोल, मोठ्यांना जुमानू नकोस, नीतीमुल्यं पाळू नकोस असं कोणतीही संस्कृती आणि कोणतेही सुजाण पालक आपल्या मुलांना शिकवत नाहीत. फरक आहे तो सोशल कंडीशनिंग मध्ये, कल्चरल कंडिशनिंग मध्ये, नीतीमुल्यांमध्ये नाही !

बाकी येऊन बोलतेच पण या विषयावर मला ही फार प्रश्न पडलेत अर्थात ते मुलांच्या संदर्भात नाहीयेत पण एकुणच ९० मध्ये जितकं सोपं होतं हे म्हणणं की इकडचं जीवनमान भारतापेक्षा चांगलं आहे तितकं आता नाहीये. शेवटी आपापल्या परिस्थितीत प्राधान्य बघून वागणे हेच करावे लागते असं आता ४ वर्षां नंतर वाटायला लागलंय.

शिवाय शाळांच्या बाबतीत म्हणशील तर माझा माझ्या भाचीच्या बाबतीत अत्युत्तम अनुभव आहे. मी काही रोज नसते तिच्याबरोबर त्यामुळे तिच्यात पडलेले फरक लगेच जाणवतात मला. "जबाबदार नागरीक" वाली सगळी लक्षणं तिचं डे केअर / नर्सरी तिच्यात हळु हळु कल्टिव्हेट करतंय. ३. ५ वर्षाच्या माझ्या भाचीला , रांगेच्या फायद्यापासून ते खेळ, सूर्यमालिका, बागेत जाऊन काही काम करणे, घरात मदत करणे, जेवण दिल्यावर आईला " तू किती छान शेफ आहेस !" असं म्हणणे, घरी कुणाचा वादी असला की बेक करणे ( लुटुपुटीचं पण हे तिला समर कँप मध्ये शिकवलंय तिच्या नर्सरीने) वगैरे भरपूर मोठी रेंज असलेल्या विषयातल्या गोष्टी अंगवळणी पडतायेत. अर्थातच तिच्या आईबाबांची आणि आजी आजोबांची पण मेहनत आहेच यात. पण आजुबाजुची मुलं आणि तिची नर्सरी हे महत्त्वाचं आहे. शिवाय भारतात राहिल्यामुळे घरी येणारा पै पाहुणा, आजुबाजुची मुलं, लग्न- मुंजींना भेटणारे नातेवाईक या सगळ्यांशी तिचं एक खास - कमी जास्त प्रमाणात बाँडिंग असलेलं - ईक्वेशन आहे. त्यामुळे भारतात हे होत नाही यावर माझा अजिबात विश्वास नाही.

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 11:44 pm | पिलीयन रायडर

शाळांमध्ये फरक पडत चाललाय हे खरंय. त्याच्या आधीच्या शाळेत सुद्धा हयच टाईपच्या काही चांगल्या गोष्टी सुद्धा होत्याच. पण आपली शिक्षणपद्धत ही अजूनही बर्‍यापैकी पुस्तकांवरच अवलंबुन आहे. रॅट रेसच्या मानसिकतेतून आपण बाहेर पडतोय पण त्या वेगाने आपला अभ्यासक्रम पडत असेल असं वाटत नाही. अमेरिकाही काही नंबर वन नाहीये शिक्षणक्षेत्रात, पण रेवाक्काने वर्णन केल्याप्रमाणे ८ वी नंतरच्या लेव्हलला अमेरिकेत जास्त प्रगल्भ विचार केलेला जाणवतो. शिवाय इथे खेळाला दिलं जाणारं महत्व हा एक मला आवडलेला मुद्द्दा आहे.

भारतातही अक्षरनंदन सारख्या शाळा आहेतच अर्थात. ज्या वेगळा विचार करुन मुलांना शिकवतात.

बाकी नातेवाईक - कार्य - येणंजाणं हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. ते हुकतंय हे खरंच...

'मला प्रामाणिकपणे सांगायचं तर ही सुद्धा भीती वाटते की एका टप्प्यानंतर त्याला माझी मुल्य कळणार नाहीत आणि मला त्याची. आणि मग आमच्यात एक निश्चित अंतर पडेल का? '
हे तर इथे राहूनही होतंच. पिढ्यांची दरी आताशा फारच भराभर वाढते आहे. 'आमच्या काळातली' मूल्यं धडाधड कोपर्‍यात फेकली जाताहेत. वागण्या बोलण्याच्या संवाद साधण्याच्या नव्या पद्धती रुजताहेत. इतकंच नव्हे तर आपण बोलत असलेल्या भाषेचं समोरच्याचं आकलन कमी पडल्यामुळे भरपूर गैरसमजही होताहेत.
अंतर तर तसंही पडतंच आहे.

काही तरी एकच निवडावं लागेल आणि निर्णय घेतांना सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन सोडावी लागेल तरच निर्णयाचं सुख लाभेल. जे तिकडे गेले त्यांची भारताशी नाळ तुटते त्यामुळे तुलनात्मक निर्णय होऊ शकत नाही. वन हॅज टू जस्ट फरगेट इंडीया. हेच दि अदर वे आहे, माझे जे मित्र परत आलेत ते कधीही अमेरिकेची आणि भारताची तुलना कोणत्याही लेवलवर करत नाहीत. दे हॅव अ‍ॅक्सेप्टेड इंडीया अ‍ॅज इट इज.

तुम्ही निर्णय आज घ्या की दहा वर्षानी, नो कंपॅरिजन हा एकमेव क्रायटेरीया कामी येईल.

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 11:14 pm | पिलीयन रायडर

सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन सोडावी लागेल तरच निर्णयाचं सुख लाभेल

अगदी योग्य वाक्य आहे! फक्त निर्णय घेताना तुलना होणारच ना. एकदा घेतला की मग विषय संपतो आणि जो पर्याय आहे तो १००% स्वीकारला तरच सुख मिळेल हे ही मान्य आहेच. पण निर्णय घेताना इकडचं काही.. तिकडचं काही खुणावतंय. आणि मी व्यवस्थित गोंधळलेले आहे की महत्वाचं काय असतं नक्की आयुष्यात.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 11:27 pm | संजय क्षीरसागर

जेव्हा कंपॅरिजन थांबते तेव्हाच निर्णय होतो.

तुम्हाला निर्णय घ्यायचा असला तर फक्त दोनच गोष्टी डोळ्यासमोर ठेवा : भारत / अमेरिका. इकडे काय मिळेल आणि तिकडे काय आहे असा विचार अनेक काऊंटरवेलींग उपविचारांना जन्म देतो. योग्य निर्णय हा नेहेमी लग्न करण्याच्या निर्णयासारखा असतो. जस्ट डिसाइड वन थींग अँड फर्गेट अबाऊट एवरी अदर थींग, दॅटस ऑल ! एकदा निर्णय झाला की पुन्हा फेरविचार नाही आणि मागे वळून बघणं नाही.

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 11:47 pm | पिलीयन रायडर

मला कधी नव्हे ते तुम्ही काय म्हणताय ते समजतंय.. आणि बहुदा तेच कामास येईल.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 11:53 pm | संजय क्षीरसागर

मी कायम असाच जगतो. कधीही पश्चात्तापाची वेळ आली नाही आणि येणं शक्य नाही.

वरुण मोहिते's picture

15 Feb 2017 - 11:59 pm | वरुण मोहिते

सर्वप्रथम तुमच्या प्रायॉरिटीज काय आहेत ते ठरवा . म्हणजे पैसा , संस्कृती , कुटुंब इत्यादी. मुलाला चांगलं शिक्षण मिळेल म्हणून निर्णय घेतला असं नको .कारण तुलनेने ऐपत असेल तर भारतातही उत्तम शिक्षण मिळू शकत . दुसरी गोष्ट कितीही चांगलं शिक्षण मिळालं म्हणजे हल्लीच्या इंटरनॅशनल शाळेत मिळालं तरी मुलाच्या फक्त जाणिवा लवकर प्रगल्भ होतात . दुसरा जे थोडं उशिरा शिकेल ते त्यांना लवकर शिकायला मिळत,आत्मसात करायला मिळत . पण शेवटी अकॅडेमिक ऍबिलिटी महत्वाची.उदाहरणादाखल सांगतो आज माझ्यासमोर एमबीए फ्रेशर असतो मुलाखतीला एकजण मेघालय चा एकजण दिल्ली चा एक इंटरनॅशनल स्कूल चा एक स्टेट बोर्ड चा पण मुलाखतीसाठी त्यांना मुंबईत समान पातळीवरच यावं लागत ना . ज्या काही जाणिवा प्रगल्भता येणारे ती वयानुसार ऑपॉप येते आणि योग्य मार्गदर्शनाने .त्यामुळे अमेरिकेत शिक्षण झालं किंवा भारतात उद्या जागतिकीकरणामुळे तुम्हाला आणखी समान पातळीवर यावं लागणारे .तुम्ही कोर्स कुठूनही करा पण एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी भारतातून शिकला किंवा अमेरिकेतून हे महत्वाचं नसत . ह्याला वेळ असेल खूप त्यामुळे शिक्षण हा मुद्दा महत्वाचा ठेऊ नका .बाकी आपल्यावर आहे माझा कलीग ४ वर्षांपूर्वीच ऑस्ट्रेलिया ला मी वर्षभरात परत आलो मला नव्हतं राहायच तेव्हा आणि आताही संधी २-३ ठिकाणी असून नाही जायचंय पण नंतर जाइनही प्रत्येकाचे गोल वेगळे असतात त्यामुळे ते व्यक्तिसापेक्ष आहे .भावनिक ,सुरक्षित वातावरण ,संस्कृती हे सगळं आपल्याला वाटत परदेशात कोण मोठं होत असेल तर त्यांच्या ते मनातही येत नाही .

धागा आणि प्रतिसाद वाचत आहे.

आदूबाळ's picture

16 Feb 2017 - 12:36 am | आदूबाळ

पिराताई एक सांगू का?

'मुलाला वेगळे/चांगले अनुभव मिळावेत' ही चिंता सोडा. प्रत्येकाचं भांडं वेगळं. ज्याला घ्यायचेत तो वेगवेगळे अनुभव भारतात बसून घेईल, किंवा मोठा होऊन जगप्रवास करेल आणि ते अनुभव घेईल. ज्याला आपल्या डबक्यातून बाहेर पडायचं नाही तो परदेशी युनिमध्ये शिकायला जाऊनही भारतीय मित्र सोडून इतर कुणाशी बोलणार नाही. आपण किती लोड घ्यायचं याचं?

तुमचं आयुष्य तुम्ही जगा, तुमचे/तुम्हाला वाटतील ते अनुभव घ्या. मुलाला त्याचे त्याचे अनुभव घ्यायला मोकळं सोडा.

रेवाक्कासारख्यांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो.

या bounded rationalityशी अर्थातच सहमत आहे.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 12:50 am | पिलीयन रायडर

हे ही पटतंय की सतत पालकाच्या भुमिकेतून विचार का करत रहावा? जे मला वाटतंय ते करायला मी मुखत्यार आहेच. आणि शेवटी ज्याचं त्याचं नशीब. पण अगदी त्या केसमध्येही, रेवाक्काशी बोलल्यावर ज्या तृटी विचारांमध्ये जाणवतात, त्याने निर्णय घेताना आपण किमान well informed तरी आहोत का हाच प्रश्न पडतो.

मला स्रुजा, रेवाक्का ह्यांच्याशी बोलताना नेहमी जाणवतं की मी एक तर बाऊ करतेय काही मुद्द्यांचा किंवा माझ्या डोक्यातही काही गोष्टी आलेल्या नाहीत. किंवा अनेक बेसिक गोष्टी माहितीसुद्धा नाहीत.

एकंदर अमेरिकेतली सुबत्ता आणि पैसे यांचं आकर्षण मला नाही. पण भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर भारतात असणारं भविष्य आणि अमेरिकेत असणारं भविष्य यात प्रचंड तफावत आढळून येते.

भारतात राहिलं कि मुलांना खालील गोष्टींचा सामना करावा लागणार:
१) प्रचंड स्पर्धा
२) पुस्तकी ज्ञानावर नको तितका भर.
३) भ्रष्टाचार
४) आरक्षण
५) जाती धर्मावर आधारित मित्र मैत्रिणी
६) सुमार दर्जाचे शिक्षक (प्रत्येक मुलगा हुशारच असेल आणि त्याला सगळ्यात भारी ठिकाणी प्रवेश मिळेल असं मानणं चूक आहे. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या संस्थांमध्ये सगळेच शिक्षक उच्च दर्जाचे नसणं स्वाभाविक आहे. त्यात नोकरीतील आरक्षण पद्धतीमुळे दर्जा घसरतो ते वेगळंच) (हे अमेरिकेत सुद्धा असू शकत मला अनुभव नाही )

अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना सामना कराव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी :
१) नातेवाईकांचा अभाव
२) आजूबाजूला आपल्या भाषा बोलणारी आणि आणि आपल्या संस्कृतीची माणसं कमी दिसणं
३) कामापुरते मित्र आणि इतर लोक यांचं वाढलेलं प्रमाण
४) खर्चिक आणि महाग शिक्षण
५) दुःख आणि काठिण्याला प्रवेश नसलेली स्वकेंद्रित जीवनपद्धती
६) दूरदर्शन आणि मोबाईल चा अतिरेकी वापर (हे हल्ली भारतात पण मोठया प्रमाणावर चालू आहे).

यातून कुठला पर्याय निवडायचा तो वैयक्तिक प्रश्न आहे ..

काही काही गोष्टींशी असहमत. मुळात भारतात आणि अमेरिकेत मिळणारा पैसा यात नेट ईफेक्ट पाहिलात तर निदान आय टी मध्ये फार फरक नाहीये. आणि बाकी मुद्दे:

भारतात राहिलं कि मुलांना खालील गोष्टींचा सामना करावा लागणार:
१) प्रचंड स्पर्धा - ही वाईट गोष्ट नाहीये ! भारत सोडता इतर विक्सनशील देशातल्या इमिग्रंट्स ना सगळ्यात मोठी भेडसावणारी चिंता म्हणजे स्पर्धे अभावी कमी होणारा ड्रायव्हिंग फोर्स ! स्पर्धा कमी असण्याचे फायदे तसे तोटे ही आहेत आणि ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार एखादं पारडं जड होतं.

२) पुस्तकी ज्ञानावर नको तितका भर. - हे पण हल्ली खुप बदललंय. रिक्रुटमेंट करताना गेल्या २-३ वर्षातला अनुभव हा आहे की उमेदवार आणि इंडस्ट्री हे दोघं ही आपापल्या अपेक्षांबाबत हुशार ( अवेअर या अर्थाने) झाले आहेत आणि त्याचा जाणवण्याइतपत परीणाम मुलाखत घेण्याच्या पद्धतीमध्ये आणि उमेदवारांच्या तयारीत ( म्हणजे अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन केलेली तयारी, प्रोजेक्ट्स ई) दिसतोय.

४) आरक्षण - हा अमान्य. इकडे पण ईक्वल एम्प्लॉयमेम्ट ऑपॉर्चुनिटीज दिल्या जातातच. पण आपल्या इतक्या प्रमाणात नाही आणि आपल्याकडे ही खाजगी क्षेत्रात हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाहीये.

५) जाती धर्मावर आधारित मित्र मैत्रिणी - हा फार च अमान्य.

अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना सामना कराव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी :

३) कामापुरते मित्र आणि इतर लोक यांचं वाढलेलं प्रमाण - हे अगदीच अमान्य. उलट वेळ पडली तर अमेरिकन माणूस दिल्या शब्दाला जागेल. नेटवर्क असणं आणि काँटॅक्ट्स कामी येणं हे खर्‍या अर्थाने मी उत्तर अमेरिकेत होताना पाहिलं. आपल्याकडे पण होतंच पण आपल्याकडे गोड बोल्णारा माणूस पण तसा विचार करणारा असेलच असं नाही. इथे मी असं पाहिलंय की पटत असेल तर खरं खुरं पटतं नाही तर नाही, कुणाकडुन अपेक्षा करायची हे फार सोपं होतं आपल्यासाठी. अर्थात हा खुप सब्जेक्टीव विषय आहे, माझा वैयक्तिक अनुभव मला असा आलाय. यावर खुप चर्चा होऊ शकते.

४) खर्चिक आणि महाग शिक्षण - हल्ली हे दोन्ही ठिकाणी सारखंच महाग आहे.

५) दुःख आणि काठिण्याला प्रवेश नसलेली स्वकेंद्रित जीवनपद्धती - परत थोडीशी अमान्य. कुटुंब कुटुंब असतं शेवटी. इथली जीवनशैलीच अशी आहे की प्रत्येकाला खुप कामं असतात घरात त्यामुळे जितकं सहज पणे आपण येताजाता लोकांना भेटू शकतो तितकं इथे करणं शक्य नाहीये एवढंच काय ते.

उपाशी बोका's picture

23 Feb 2017 - 8:36 pm | उपाशी बोका

४) आरक्षण - हा अमान्य. इकडे पण ईक्वल एम्प्लॉयमेम्ट ऑपॉर्चुनिटीज दिल्या जातातच. पण आपल्या इतक्या प्रमाणात नाही आणि आपल्याकडे ही खाजगी क्षेत्रात हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाहीये.

आरक्षण या निव्वळ एका कारणासाठी भारताबाहेर वास्तव्य करावे असे माझे स्पष्ट मत आहे. भारतामधील जीवघेणी स्पर्धा, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार आणि आरक्षण यांच्या जाळ्यात तुमच्या मुलांना टाकावेसे वाटते का, याचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे. सर्वत्र टीका होत असली तरीही भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, असे माझे मत आहे. पण तरीही इतर बाबींचा विचार केला तर भारताबाहेर पडणे तितकेसे वाईट नाही.

तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात आणि हा विचार का करताय हे मला नक्कीच कळतंय कारण मी यातून गेलोय. प्रत्येकाच्या आवडीनिवडी व प्रायोरिटी असतेच पण तरीही हा एक सामान धागा आहे. सगळ्या गोष्टी लिहिणं अवघड आहे पण जमेल तेवढं लिहितो. सगळं स्वानुभवातून सांगणार आहे त्यामुळे थोडी पार्श्वभूमी आणि थोड्या वैयक्तिक गोष्टी ओघात येणार आहेत.

मी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेत आलो ते एकटाच आलो. बायको आणि २ मुली (त्यावेळेला मोठी ६ वीत आणि धाकटी केजीमध्ये) भारतातच राहिल्या. मी आणि बायकोने विचार केला की आधी मी जाऊन बघेन सगळं कसं आहे ते आणि मग विचार करू. मी आल्यावर साधारणतः एक वर्षाने कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीपुरते आले. पण ५ महिने ते राहिल्यावर आम्ही सगळ्यांनीच परत जायचे ठरवले. त्यावेळेला अमेरिकेत येऊन मला दीड वर्ष झालं होतं. भारतात परत गेल्यावर मला out of place असल्यासारखं वाटत होतं, पण तो वेगळा विषय आहे. तर जवळपास ८ महिने भारतात राहिल्यावर कंपनीकडून मला परत अमेरिकेत जा म्हणून प्रेशर आलं. त्यामुळे आम्ही परत अमेरिकेत आलो. छोटी मुलगी इथे प्रीके मध्ये जाऊ लागली. आम्हाला टेन्शन होतं की हिला इंग्लिश बोलणं तर दूरच पण समजत पण नाही तर कसं होणार. पण टीचरने आम्हाला आश्वस्त केलं आणि आमची बया एका महिन्यात मस्त इंग्लिश बोलायला लागली. मोठी मुलगी ८ वीत होती त्यामुळे तिचं पण टेन्शन होतं. पण इथे आधी एक परीक्षा घेतात आणि त्यावरून तुमची लेव्हल ठरवतात. म्हणजे ती ८ वीतच असणार पण एक क्लास वेगळा असतो ज्याला ESL म्हणतात. यात आशियाई टीचर असतात ज्या तुमचं इंग्लिश सुधारण्यावर भर देतात. म्हणता म्हणता मोठी पण मस्त रुळली.

मोठी मुलगी ७-८ पर्यंत भारतात शिकल्यामुळे आम्हाला तिथला पण अभ्यासक्रम माहित आहे आणि आता इथला पण माहित आहे. ती तुलना करून सांगतो की इथला अभ्यासक्रम तसेच शिकवण्याची पद्धत खूपच चांगली आहे. पाठांतरावर अजिबात भर नसतो व जिथे पाठांतर आवश्यक आहे तिथे ते अश्या पद्धतीने शिकवतात की मुलांना सहज लक्षात राहतं. एक उदा. देतो, परवाच माझी छोटी मुलगी (आता ३रीत) मला ११x१२ किती माहिती आहे का विचारत होती. म्हणलं मला माहित आहे पण तुला माहित आहे का? तर तिने क्षणात १३२ उत्तर दिलं. म्हणलं तुम्हाला तर पाढे असे शिकवत नाहीत मग तुला कसं माहित? तर त्यांना एका कवितेतून शिकवतात म्हणे. तसेच मोठ्या मुलीला प्रश्नांची उत्तरं साचेबंद लिहायची नाहीत, तुम्ही विषय वाचायचा आणि तुमच्या शब्दात उत्तरं लिहायची असा नियम आहे. ८-९ वी पासूनच त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करून ते सगळ्या वर्गासमोर प्रेझेंट करायला सांगतात. उपलब्ध विषयांची एक लिस्ट असते त्यातून तुमच्या आवडीचे ४+४ (पहिल्या सहामाहीचे ४ व दुसऱ्याचे ४) असे विषय निवडता येतात. पहिल्या सहामाहीचे ४ विषय एकदा मधली परीक्षा झाली की परत वार्षिक परीक्षेला नसतात. तुमचे एकूण मार्क (मार्क नसतातच, ग्रेड्स असतात) हे तुम्ही होमवर्क पूर्ण करणे + दर महिन्याच्या क्लास टेस्ट + सहामाही परीक्षा असे असतात.

बाकी वर खटपट्या म्हणालेत तसं मुलांना जबाबदार नागरीक बनवले जाते, जे भारतात होताना दिसत नाही. माझ्या लहान मुलीच्या २ रीच्या वर्गात एक मुलगी होती तिला काहीतरी आजार होता. शाळेतसुद्धा तिच्या बरोबर कायम एक ऑक्सिजन सिलिंडर (ट्रॉलीवर) व नाकात नळ्या असायच्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्गातल्या प्रत्येक मुलाला रोटेशनने एक एक आठवडा तिच्याबरोबर सतत राहून तिचा सिलिंडर ओढून न्यायचं काम असायचं. आमची कन्या तिच्याकडे जेव्हा हे काम असायचं तेव्हा घरी येऊन आनंदाने सांगायची. हेच भारतात मी कल्पनाच करू शकत नाही कारण रंगावरून, व्यंगावरून, उंची/ जाडी, सांपत्तिक स्थितीवरून वरून सतत चेष्टा होताना बघितलेली आहे (सहनही केली आहे). थोडक्यात तिचा व्यक्तिमत्व विकास होताना दिसतोय. कचरा का करू नये, वस्तू कश्या वापराव्या, आईवडिलांशी, मित्रांबरोबर व बाहेरच्या लोकांशी कसं वागावं हे शिकवलं जातं. शाळेतच antibullying, drug abuse यावर सतत सांगितलं जातं योग्य वयात sex education सुद्धा दिलं जातं. मुलामुलींची निखळ मैत्री पण असू शकते व एखादा मुलगा/ मुलगी आवडतो/ ते हे सहजपणे सांगता येण्यासारखी परिस्थिती असते. पण त्याचबरोबर नकारसुद्धा तेवढ्याच ग्रेसफुली स्वीकारला जातो. अपवाद असतातच पण सर्रास एकतर्फी प्रेमातून हल्ला वगैरे फालतूपणा नसतो.

अर्थात सगळंच आलबेल आहे असं नाही. ब्रोकन फॅमिलीज बऱ्याच असल्याने त्याचा मुलांवरही परिणाम होतो. पण अश्या मुलांपासून लांब राहण्याचा पर्याय उपलब्ध असतो व ती मुलं पण मुद्दामून इतरांना त्रास द्यायला येत नाहीत. अगदी टोकाच्या केसेस, म्हणजे शाळेत शस्त्र घेऊन येणे व हल्ला करणे हे पण घडत असतेच. पण शाळेचे नियमच असे बनवले आहेत की मुलांना वाकड्या मार्गाला जाताना त्रास होईल. अगदी मोठ्या मुलांनासुद्धा प्रत्येक क्लास मध्ये वेळेत येण्याचं बंधन असतं. उशिरा आलं तर एकदा समज व नंतर पालकांना कळवले जाते. सुट्टी घेतली तरी शाळेतून ई-मेल व फोन येतो. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर चांगलं असल्याने शिक्षकांचे प्रत्येक मुलावर बारीक लक्ष असते. मागच्याच महिन्यात माझी मोठी मुलगी सांगत होती की तिच्या वर्गात एक मुलगा कायम उशिरा येतो व त्याच्याकडे बघून वाटतं की तो ड्रग्स घेत असावा (असा संशय आहे). पण म्हणे टीचरने हे सगळं शाळेत वरच्यांना व त्याच्या घरी सांगितलं आहे. पण तो मुलगा त्याच्याच विश्वात असतो बाकी कोणाला त्रास द्यायला येत नाही.

बाकी संस्कृती म्हणाल तर इथे पण अगदी संक्रांतीपासून ते दिवाळीपर्यंत सगळे सणवार व्यवस्थित साजरे होतात. घरात आपण सांगतच असतो. यापलीकडे इतर धर्मांचे सणसुद्धा मुलांना कळतात. वेगवेगळ्या वंशाच्या (जात तर सोडूनच द्या) मुलामुलींबरोबर समानतेने कसं राहायचं हे शिकायला मिळतं. अर्थात आपली पुस्तकं, संगीत मात्र या मुलांना समजणार नाही याचं मला वाईट वाटतं.

नातेवाईकांबरोबर संपर्क सोशल मेडियामुळे सहज शक्य आहे. दोनेक वर्षातून एखादी भारतभेट होतेच त्यातून अजून मदत होते. व्यक्तिशः मला नातेवाईक जरा लांब असलेलेच बरे वाटतात.

अरे हो एक सांगायचं राहिलंच... माझी धाकटी मुलगी मराठी शाळेत जाते. प्रत्येक रविवारी सकाळी इथे एक मराठी शाळा भरते, तेवढंच जरा आपली मातृभाषा शिकेल. एखादं पुस्तक समोर आलं तर ही काय चित्र काढलीयेत असं म्हणणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2017 - 1:42 am | डॉ सुहास म्हात्रे

या लेखात मांडलेल्या काही प्रश्न साधारणपणे असे आहेत, असा माझा समज आहे...

१. मुलाने कोणत्या जागी (जगातल्या कोणत्या देशात; किंबहुना भारतासारख्या मोठ्या देशातील कोणत्या शहरात असा सुद्धा हा प्रश्न होऊ शकतो) राहिल्यास / शिकल्यास / मोठे झाल्यास चांगले ?

२. परदेशात वाढणारे मुल आपली संस्कृती आणि/किंवा भाषा विसरेल का ?

३. परदेशात (उदा, अमेरिकेत) राहण्याने / शिकण्याने / मोठे होण्याने मुलाला पालकांबद्दल (मला हवे तेवढे) ममत्व वाटेल की नाही ?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना इतकी (सर्वसाधारण आणि व्यक्तीगत) व्हेरिएबल्स जमेस धरावी लागतात की, अर्थातच, त्यांची १००% योग्य उत्तरे (वन साईझ फिट्स ऑल) शक्य नाहीत. पण तरीही, नेहमीच्या जीवनात हे प्रश्न नेहमीच पडतात आणि त्यांची उत्तरे शोधायलाच लागतात. ती उत्तरे शोधताना, माझ्या मते, सर्वसाधारण ठोकताळे असे असावेत...

१. मुलाने कोणत्या जागी (जगातल्या कोणत्या देशात; किंबहुना भारतासारख्या मोठ्या देशातील कोणत्या शहरात असा सुद्धा हा प्रश्न होऊ शकतो) राहिल्यास / शिकल्यास / मोठे झाल्यास चांगले ?

(अ) मुलाचे भवितव्य मध्यवर्ती ठेऊन विचार केल्यास पुढचे विचार जास्त स्पष्ट होतील व या प्रश्नांची उत्तरे शोधणे सोपे होईल. कारण, या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम मुलाने पुढचे जीवन आनंदाने व्यतीत करण्यात झाला नाही तर वरच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे, मूल किंवा पालक, कोणाच्याच दृष्टीने सुखदायक नसतील.

(आ) निर्णयप्रक्रियेत कोणाचे मत केव्हा जास्त महत्वाचे असावे ? : या बाबतीत, मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने काय जास्त फायद्याचे होईल मुद्दा केंद्रस्थानी असावा.

..... (आ).(१). मुल लहान असताना कोणत्या जागेवरचे कोणते शिक्षण त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने जास्त चांगले याचा विचार, अर्थातच, पालकांनी करणे अध्याहृत आहे.

..... (आ).(२). मुलाला समज येऊन त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दल आवडनिवड पुढे येऊ लागल्यावर पालकांनी माहिती पुरवून मुलाला निर्णय घेण्यात मदत करावी. आपली आवड त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये.

(इ) शिक्षणाचा प्रकार (विषय, डीग्री, इ), ते घेण्याची जागा, इत्यादी गोष्टी वर सांगीतलेल्या मध्यवर्ती मुद्दा "मुलाचे सुखी भवितव्य" या साध्यासाठी वापरली जाणारी साधने (टूल्स) आहेत. तेव्हा ते साध्य साधण्यासाठी उपयोगी ठरतील अशीच साधने निवडावी. केवळ एखादी गोष्ट 'इन थिंग' आहे किंवा 'बरेच जण असेच्/हेच करतात' या कारणांनी त्यांची निवड केली जाऊ नये.

२. परदेशात वाढणारे मुल आपली संस्कृती आणि/किंवा भाषा विसरेल का ?

मुलांना आपल्या संस्कृती व भाषा याबद्दल ममत्व वाटणे हे मूल कोणत्या देशात, कोणत्या वातावरणात आणि कोणत्या मुलांबरोबर वाढत आहे यापेक्षा जास्त आपल्या स्वतःच्या घरात कोणती संस्कृती व भाषा सतत वापरात आहे यावर अवलंबून आहे, हे व्यक्तीगत अनुभवावरून व अनेकांच्या निरिक्षणावरून खात्रीने मी सांगू शकतो.

३. परदेशात (उदा, अमेरिकेत) राहण्याने / शिकण्याने / मोठे होण्याने मुलाला पालकांबद्दल (आपल्याला हवे तेवढे) ममत्व वाटेल की नाही ?

(अ) मुल जर, (१) सुसंवादी घरात वाढले आणि (२) त्याला आपल्या आवडीचे भवितव्य मिळून सुखी झाले... किंबहुना 'आपल्या भविष्यासाठी, जरूर तेव्हा आपल्याला विश्वासात घेऊन, आपल्या पालकांनी मनापासून प्रयत्न केले आहेत' अशी मुलाची किमान खात्री असल्यास मुलाला पालकांबद्दल ममत्व वाटण्याची जास्त शक्यता आहे. केवळ एवढेच या बाबतीत पालकांच्या हाती असते.

(आ) कोणाबद्दल ममत्व वाटणे हे सुसंवाद (पक्षी : कौटुंबिक शिक्षण) आणि मानसिक समाधान यावर जास्त अवलंबून असते... या बाबतीत, देश किंवा शालेय शिक्षणाचा प्रकार हे मुद्दे गौण आहेत.

(इ) "मुलाचे भवितव्य उत्तम होणे" यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणत्याही सुजाण पालकासाठी असणार नाही. सुजाण पालकांसाठी, "रोजचे बोलणे" किंवा "पाय लागू माताजी/पिताजी" यापेक्षा हा आनंद मोठा असेल.

(ई) हा मुद्दा लेखात अभिप्रेत नाही, पण तरीही फार महत्वाचा असल्याने इथे माडत आहे : मुलांना आपल्या "म्हातारपणाची काठी" किंवा "पेन्शनची सोय" किंवा "इन्शूरन्स" समजणे हे, काही सन्माननिय अपवाद सोडता, पालक आपल्या जीवनाचे व्यवस्थापन करण्यात अयशस्वी झाल्याचे लक्षण असते. किंबहुना, आपल्या अपूर्ण इच्छा मुलांच्या जीवनातून पूर्ण करून घेण्याइतका मोठा जुलूम दुसरा नाही.

इतका सगळा विचार करून भागेल असेही नाही. कारण हा निर्णय वाढत्या मुलाच्या बाबतीत असतो आणि त्याची अंमलबजावणी अनेक वर्षांच्या कालावधीत करायची असते. वेळ जाते तशी तिच्याबरोबर इतर सर्व व्हेरिएबल्सही बदलत राहतात, आवडीनिवडी बदलतात. तेव्हा अगोदरचा निर्णय चुकीचा किंवा सर्वथा योग्य वाटला नाही तर, धीर दाखवून दिशाबदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे... कारण घ्येय (जीवन आनंदाने व्यतीत करणे) साधणे स्थायी व सर्वात महत्वाचे असते व बदलत्या परिस्थितीला योग्य त्या प्रकारे साधनांत बदल करणेच योग्य असते. पूर्वी केलेला साधनांचा निर्णय योग्य नव्हता असे कळल्यावरही साधनांत बदल न करता चुकीच्या (सुखकारक ध्येयाच्या विपरित) दिशेने जात राहणे शहाणपणाचे नाही.

जयंत कुलकर्णी's picture

16 Feb 2017 - 1:50 am | जयंत कुलकर्णी

Pira,

When you take decisions, you should always check your assumptions on which your decision is based. You will always find contradictions. Remove them and you will arrive at a satisfactory answer...

For example in your case, you assumed that you are going to take a decision for the benefit of your child..on the other hand you also have assumed that you want to live life for yourself.... now... these are two assumptions on which your decision is going to be based. But here you will have to think what is your Goal.... If first one is your Goal then knock out the other assumption and vice versa. Hope you understand... off course this is just an example... You will have to construct a tree of assumptions (honestly) and study them wrt to your goal, for yourself...

There is a structured way of taking such decisions where you are in duel minds. Dr. Goldrat has a book on it....I do not remember the name now... I read it long back when I was practicing TOC in our organization...

Jayant Kulkarni

म्हात्रेकाकांच्या प्रतिसादात असलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत च, पण मला एक अजुन प्रश्न पडलाय. मुलांचे शिक्षण वगैरे एकीकडे , आपल्याला कुठे ही जाऊन नोकरी करायची आहेच. इथे "मायक्रो मॅनेजमेंट" नावाचा प्रकार शुन्य आहे. लोकं बर्‍यापैकी व्यावसायिक मुल्यं पाळतात. चिंधीगिरी , फालतु गॉसिप, एखादे दिवस डबा नाही आणला तर नवर्‍याला कसं काय चालतं वगैरे नाक घालणे होत नाही. माझ्या बॉसचं प्रॉडक्ट संबंधी एखादं मत, एखादी स्ट्रॅटेजी मला पटली नाही तर मी त्याच्या तोंडावर " धिस डझ नॉट मेक एनि सेन्स" म्हणते आणि तो ते योग्य रीत्या स्विकारतो, नव्हे आपण चर्चाच करायला बसलोय आणि मत-मतांतरं व्हायला हवीत हे सगळ्यांना पटतं . यातलं बरंचसं भारतीय कार्यपद्धतीत नाहीये. करायला मिळणार्‍या कामाची प्रत ( हेडक्वार्टर्स ते ऑफशोअर) यात ही फरक आहेच. शिवाय माझ्या रजा माझ्या हातात असतात, माझं येणं जाणं माझ्या वेळेनुसार होतं, मी जास्त थांबले म्हणजेच मी जास्त काम केलं असं कुणाला वाटत नाही. भारतात बर्‍याच गोष्टी या क्लायंट साईड ला मिळणार्‍या व्हिजिबिलिटी वर अवलंबून असतात आणि ती तुम्हाला मिळू नये म्हणुन एखादा बिनडोक मॅनेजर सहज काड्या करू शकतो.

मला असा यक्ष प्रश्न पडलाय की इथुन तिथे गेल्यावर या कार्यपद्धतीशी कसं जुळवुन घ्यायचं !! इथुन भारतात गेलेल्यांचे या संदर्भातील अनुभव ऐकायला आवडतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2017 - 2:07 am | डॉ सुहास म्हात्रे

या प्रतिसादात असे दिसून येत नाही का?...

इतके समाधानकारक मुद्दे सद्या पालकाच्या जीवनात असल्यावर, असे जीवन मुलालाही मिळू नये, असे कसे वाटेल ?! :)

ट्रेड मार्क's picture

16 Feb 2017 - 2:48 am | ट्रेड मार्क

मी सुद्धा फक्त दीड वर्षातच बास झाली अमेरिका आपला भारतच बरा या विचाराने परत गेलो होतो. पण एवढ्या कमी कालावधीत सुद्धा मला एकदम out of place असल्यासारखं वाटलं... तेसुद्धा माझ्या मातृभूमीत. थोडी कारणमीमांसा करायची झाली तर -

१. ऑफिसमधलं राजकारण - हे सगळ्यात मोठ्ठ कारण
२. प्रोजेक्टबद्दल मला काय वाटतंय हे मी उघड बोलू शकत नाही.
३. स्वतःचं काम सोडून दुसऱ्याचे पाय खेचायची लोकांची वाईट सवय
४. ऑफिस सोडून मला माझं कुटुंब आहे, बाकी जग आहे हे बॉस मान्य करत नाहीत - माझ्याकडे व्हिसा असूनही मी कौटुंबिक कारणाने अमेरिकेत परत जायला नकार दिला म्हणून माझ्या बॉसने इगो इश्यू केला व तिच्यामुळे अगदी मला अकाउंट मधून बाहेर पडावं लागलं.
५. येण्याजाण्याच्या अनिश्चित वेळा - सकाळी ८ ला येऊन रात्री १० ला गेलं तरी बॉस म्हणणार - इतनी जल्दी जा रहे हो?
६. दुसऱ्याला फसवण्याची किंवा एखाद्याच्या आगतिकतेचा फायदा करून घेण्याची वृत्ती

मग बाकी प्रदूषण, ट्रॅफिक, अस्वच्छता ई गोष्टी आहेतच.

बादवे, अमेरिकेतही तुम्हाला भारतीय म्यानेजर आला तर तो काही आपला खास भारतीय टच सोडत नाही. माझ्या एका प्रोजेक्टमधला म्यानेजर टीममधल्या एका अमेरिकन मुलीला रात्री ९ ला वगैरे फोन करून स्टेटस वगैरे विचारायचा. ती फ्रेशर होती म्हणून तिने फारसं काही केलं नाही. मला वाटलं हा बाब्या फक्त मलाच रात्री फोन करतो, पण मग त्या मुलीने बोलता बोलता मला सांगितलं. मग आमच्या म्यानेजरलाच समजावून सांगायची वेळ आली.

पिरा, माझे नाव तेवढे लेखातून काढून टाकलेस तर बरे होईल.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 3:23 am | पिलीयन रायडर

वोक्के!

पिरा अतिशय चर्चेचा मुद्दा आहे. पण जितकी चर्चा तितके confusion असा माझा अनुभव आहे. २ वर्षांपूर्वी मी असाच मनस्थिती मध्ये होते. हा एकाच मुद्दा
होता आमच्या वादाचा भारत कि अमेरिका.
माझे मुद्दे बरेच सारखेच : मुलाला कशी कळणार भारतीय संस्कृती ,संस्कार ,नातेवाईक,देशप्रेम आणि हो आपले आई वडील.
नवऱ्याचे मुद्दे : कंपनी मधील पॉलीटिकस , ऑफिसची वेळ त्यातून मिळणारा फॅमिली time , मुलाचे शिक्षण आणि नंतर नोकरी(जातीभेद आणि आरक्षण )वर ट्रेड मार्क नि दिलेलेच मुद्दे
अर्थातंच सगळं विचार करून मी माघार घेतली.पण आता एकदाचा निर्णय झाल्याने डोके शांत आहे. आणि वाटले तर निर्णय बदलू शकतो म्हणून समाधानही आहे.
त्यांच्या मुद्यावर अर्थातच माझ्याकडे उत्तरे नव्हती पण माझ्या सगळ्या मुद्याची उत्तरे मी मिळावली. अर्थात तडजोडच.

आपली संस्कृती कळावी या साठी मी सगळे सण करते म्हणजे गुढी पाडव्याला गुढी उभी करते, गणपती ,मोदक ,दिवाळीत पण फराळ, लक्ष्मी पूजन ,नवरात्र संक्रात ला हळदी कुंकू. बाकी मी पूर्णपणे भारतीय सोसायटी मध्ये राहत असल्याने सोसायटी मध्ये रंगपंचमी,५ दिवसाचा सार्वजनिक गणपती असे बरेच सण साजरे होतात. तसे HSS , मराठी विश्व ,आणि अनेक मंदिरातही सण साजरे होतात.
इथे नातेवाईक म्हणजे मित्र मैत्रिणी हेच. atleast मावशी, काका, दादा,ताई हि नाती तरी मिळतात. आणि दर वर्षी आमचे आई बाबा इकडे किंवा आम्ही तिकडे असे भेटतोच.
फक्त देशप्रेम हा मुद्दा नाही सुटत कारण त्यांच्या साठी हा त्यांचा देश आहे. आपल्यासारखे देश भक्तीपर गाणे -चित्रपट पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल हे अशक्य आहे.
आई वडील आता तरी ६ हिने साठी येऊ शकतात आणि आपण सेट झालो कि त्यांनाही इकडे बोलावून घेऊ शकतो कायमचे

बाकी इथले शिक्षण वर सांगितल्याप्रमाणे नक्कीच उत्तम . प्रॅक्टिकल जास्त असते त्यामुळे लक्षात राहते माझा मुलगा २ री मध्ये आहे त्या आत्ता पर्यन्त अळीचे फुलपाखरू कसे होते? ,अंड्यातून कोंबडीचे पिल्लू कसे बाहेर येते ? बी पेरली कि त्याचे झाड कसे येते . या वरून तुम्ही आईच्या पोटातून कसे जन्माला आलात हेही शिकवले.
निवडणुकीच्या काळात तर १ महिना निवडणूक कशी असते ,उमेदवार कोण आहेत, निवडून आल्यावर ते काय करणार ,कोठे राहणार पासून पहिले प्रेसिडेंट कोण होते होते हि सगळी माहिती दिली गेली.

आपण जसे वाढलो तसे आपली मुले भारतात वाढतील असे आपल्याला वाटते पण ते शक्य नाहीये कारण आता तसे राहिले नाही. आपले मावशी ,काका ,आजी जसे हक्काने रागवायचे किंवा लाड करायचे तसे आता राहिले आहे का? तिकडेही मुले बाहेर खेळताना फार दिसत नाहीत. मराठी बोलताना फार दिसत नाहीत .मोबाइल गेम आणि टीव्हीवर कार्टूनच नाही तर सिरीयल वेडी असताना दिसतात हे माझे मागच्या वर्षी ३ महिने राहून केलेले निरीक्षण. असो

मला वाटते आजचा दिवस इथे आहेत तर जगून घ्या उद्याचा विचार करून आजचा दिवस पण वाया नको घालवायला .

तु मुलाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हे प्रश्न मांडले आहेस. पण मी असं म्हणेन कि कुटुंब म्हणुन तुम्हाला सगळ्यांनाच काय हवय याचा सुद्धा विचार पुढचा निर्णय घेताना करावा.
माझ्या मुलाचं ज्यात भलं आहे त्यातच मला आनंद आहे असं कितीहि म्हटलं तरी आपण स्वतः सुखी समाधानी असु तरच आपण ते सुख पुढे मुलांपर्यंत पोचवु शकतो.

वर कोणी तरी म्हंटल्याप्रमाणे तुमच्या प्रॉयरीटीज काय आहेत त्यानुसार निर्णय घेणं सोप्प जाईल. मागे सांगितलं होतं तसा प्यु मेट्रिक्स करा, निर्णय घेताना उपयोगी पडेल. (तुला एक एक्सेल शीट पाठवलीय ती पण बघ. )

कानडाऊ योगेशु's picture

16 Feb 2017 - 9:04 am | कानडाऊ योगेशु

कॉलिंग मुक्तविहारी काका!

जोक्स अपार्ट.
लेखात मांडलेल्या प्रश्नाकडे बघण्याचे अनेक दृष्टीकोन असू शकतात.

१. जर मुलाचे बालपण व प्राथमिक शिक्षण अमेरिकेतच जाणार असेल तर नंतर तुमचा भारतात परतण्याचा निर्णय त्याच्यासाठी अवघड होऊन जाऊ शकतो. एव्हाना त्याची मुळे अमेरिकेत रुजायला सुरवात झालेली असेल व त्याच्या दृष्टीने अमेरिका हीच त्याची कंट्री झालेली असेल. अशी समस्या बर्याच बॉलिवुड मूवीमध्येही दर्शवलेली आहे.
२. जर मुलाची कंडिशनिंगच इथे कायमचे राहायचेच नाही आहे आपल्याला व भारतात परत जायचे आहे तर त्याची मानसिकता कायम निर्वासितासारखी होऊ शकते.

माझी एक मावस बहीण काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाहून भारतात आली चाचपणी करायला कि मुले इथे रूळतील का नाही त्याची. पण मुलांची मानसिकता पूर्णपणे ऑस्ट्रीलियन झाली होती त्यामुळे दोघा पती पत्नींनी भारतात परतण्याचा निर्णय बदलला.
बाकी मुलाच्या अडनिड्या वयात जर भारतात परत आलाच तर मार्गदर्शन करायला सौ. माधुरी दिक्षित नेने आहेतच कि!

अत्रन्गि पाउस's picture

16 Feb 2017 - 9:39 am | अत्रन्गि पाउस

हे अपर्णा वेलंकारांचे पुस्तक जरूर वाचाच (अजून पर्यंत वाचले नसल्यास ) असे सुचवतो
बाकी सविस्तर लिहीन किंवा व्यनि करिन ...

अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी रहाणार्‍या नवरा बायकोचे एकमेकांशी पटत नसेल तर त्यांनी मुलांच्या भविष्यातव्यासाठी कुठे रहावे?

दोघांनी मुलांच्या = राहावे ! हळूहळू पटू लागेल.

वेल्लाभट's picture

16 Feb 2017 - 1:08 pm | वेल्लाभट

तुमच्या संभ्रमाचे शिक्षण व शिक्षणेतर अशा दोन पातळीवर उत्तर देतो.

शिक्षण - भारतातली शिक्षण पद्धती भिक्कार आहे; असं सरसकट विधान करत नाही. पण अनेकोनेक वर्ष त्यात काहीही बदल झालेला नाही आणि त्यामुळे ती जुनाट आहे हे नक्की. आपल्या पुस्तकी शिक्षणपद्धतीत सगळ्या मुलांना एकाच पारड्यात तोललं जातं. आणि मग त्यांच्यात मार्क या निकषावर डावं उजवं केलं जातं. या प्रक्रियेत स्वतःचं वेगळेपण घेऊन शाळेत गेलेली मुलं, शाळेतून एकसारखी होऊन बाहेर पडतात. फरक उरतो तो फक्त मार्कांचा आणि टक्क्यांचा. उलटपक्षी शिक्षण या गोष्टीकडे बाहेरच्या देशात वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. वैचारिक विकासाकडे जास्त कल असतो, स्पून फीडिंग कमी असतं. उदाहरणार्थ सांगू तर माझी बहीण जेंव्हा भारतातल्या शाळेत सहावीपर्यंत शिकून पुढे लंडनच्या शाळेत गेली तेंव्हा इतिहासाच्या तासाला तिला विचारण्यात आलं, की शिवाजी महाराजांच्या कुठल्या गोष्टी तुला चुकीच्या वाटतात? आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या चुका काढणं म्हणजे शिक्षकांनी एक तर वर्गाबाहेर काढलं असतं किंवा 'हा बघा, मोठा शहाणा आला' असं करून हिणवलं असतं. पण निपक्षपातीपणे गोष्टींकडे बघताना तुमचा विचार व्यापक होत जातो, प्रगल्भ होत जातो याची प्रचीती पुढे तिला अनेकदा आली. सांगायचा मुद्दा हा की आपली शिक्षणपद्धती मुलांच्या वैचारिक विकासाला मारक आहे. त्यामुळेच आजकाल ऑल्टर्नेटिव्ह एज्युकेशन चं महत्वं अनेक पालकांना वाटतंय.

आता बाहेर शिकण्यात तुम्ही काय गमवाल? सकाळची प्रार्थना, शिक्षकांना नमस्कार करणं, मूल्य शिक्षण, आपल्या अभ्यासक्रमात एक्स्लूजिवली असलेले विषय म्हणजे भाषा, (आपला) इतिहास, नागरीकशास्त्र, इत्यादी. शिक्षणाच्या माध्यमाचा मुद्दा आहे पण तो भारतात राहून इंग्रजी माध्यम असेल तर वैध आहे, भारताबाहेर तो मुद्दा येतच नाही. पण हा तोटा होणा-या इतर फायद्यापुढे कमीच आहे असं म्हणेन. तिकडे तुमचा मुलगा एखाद्या खेळात प्रवीण होऊ पहात असेल तर शाळा सर्व सोयी देईल, इथे मधल्या सुट्टीत दहा मिनिटं जास्त खाली खेळलं म्हणूनही पट्ट्या खाल्लेल्या मला आठवतायत. त्यामुळे शिक्षण भारताबाहेरच सरस आहे हे तुमच्या प्रश्नावर माझं मत. पुन्हा नमूद करेन की भारतात की भारताबाहेर यातली ही निवड आहे, आणि भारतातल्या भारतात असेल तर प्राधान्यक्रम वेगळा आहे, निदान माझा. नाही, उगाच मागच्या कुठल्यातरी प्रतिसादात तुम्ही असं म्हणालात मग आता हे कसं वगैरे प्रश्न करू बघणार्‍यांसाठी पुन्हा सांगितलं.

शिक्षणेतरः हा प्रश्न सोपा आहे. भारतात तुमची जवळची मंडळी सोडली तर मोहात पाडणारं काहीही उरलेलं नाही. शहरात गटारगर्दी आहे, गावात ती नसली तरी सोयीही कमी आहेत. ही गोष्टही बाहेरच्या देशात उत्तम आहे. उदा. मला तिथल्या कंट्रीसाईडला बेड अँड ब्रेकफास्ट मधे मिळालेलं इंटरनेट कनेक्शन माझ्या ऑफिसच्या कॉर्पोरेट कनेक्शनपेक्षाही जास्त बँडविड्थ चं होतं. हां आता तुम्हाला कोकणातल्या एखाद्या गावात वर्क फ्रॉम होम मिळालं, सुसाट नेट कनेक्शन मिळालं, घर बांधलंत, प्रयोगशील झेडपी शाळेत प्रवेश घेतलात, तर तुम्ही भारतात राहूनही बर्‍याच अंशी समाधानी होऊ शकता. अन्यथा तुम्ही अमेरिकेत आहात हे उत्तम आहे. काही जणं म्हणतात की आपल्याइथे मी बारा वाजताही एकटी येऊ शकते घरी तसं तिथे नाही, एकाट वाटतं इत्यादी. ते जरी खरं असलं तरी ज्या प्रमाणात भारतात गुन्हेगारी वाढते आहे, आणि ज्या प्रकारची वाढते आहे, ती बघता हाही मुद्दा परदेशांच्या बाजूनेच जातो. सातच्या आत घरी येणं, अनोळखी रस्ते टाळणं, अशा काही गोष्टी पाळल्या की तिथल्यासारखी सुरक्षितता भारतात नाही हे जाणवेल.

बाकी तुम्ही ठरवालच, तेंव्हा इथे थांबतो. पण जाता जाता, भारतातल्या लोकांच्या शिकूनही अशिक्षित, असंस्कृत असल्यासारख्या वागण्याची चीड आहे हे नमूद करतो.

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 7:42 am | पिलीयन रायडर

प्रतिसाद आवडला.

शिवाजी महाराजांचे काय चुकले हा विचार जन्मात माझ्या मनाला शिवला नसता. मला विचार करूनही उत्तर समजत नाहीये. पण ह्यात मला वावगेही काही वाटले नाही. अशाही चर्चा आवश्यक आहेतच. ज्या आपल्याकडे होत नाहीत. मी ज्या धन्य पद्धतीने इतिहास शिकलेय त्यात तर नाहीच नाही.

खरं सांगायचं तर भारतातले शिक्षण घेऊनच आपण अमेरिकेत गेलोय हे खरं असलं तरी जर माझा नवरा अमेरिकेत शिकला असता तर कदाचित आयटी मध्ये नसताच. तो कदाचित एखादा खेळाडु असता किंवा इतिहासतज्ञ वगैरे.. भारतात ह्या दोन्ही क्षेत्रात आपण पोटापाण्यासाठी काही करु शकतो असं आम जनतेला वाटत नाही. मला अजुनही वाटत नाही. ह्यावरुन आठवलं, माझी बहीण परदेशात शिकताना एका सहलीला गेली होती. आणि तिथे तिच्या वयाची सर्व मुलं इतक्या वेगवेगळ्या विषयात काही तरी करत होती, ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो. हे २ भारतीयच होते जे इंजीनियरींग करत होते. बाकी मुलांना ते लय भारी वाटत होतं पण हे आपले दोन पंटर मात्र हेव्याने इतरांकडे बघत होते. तिला वाटतं की काय लोक एक एक भारी गोष्टी करतात आयुष्यात आणि इथे मी तिची पोस्ट ग्रॅडमध्ये शिकवण्याची आणि शिकण्याची एकंदरित पद्धत पाहुन माझी डीग्री कोणत्या चुलीत घालावी ह्याचा विचार करतेय.

उदाहरणार्थ सांगू तर माझी बहीण जेंव्हा भारतातल्या शाळेत सहावीपर्यंत शिकून पुढे लंडनच्या शाळेत गेली तेंव्हा इतिहासाच्या तासाला तिला विचारण्यात आलं, की शिवाजी महाराजांच्या कुठल्या गोष्टी तुला चुकीच्या वाटतात?

असे विचारणार्‍या शिक्षकाला माझा साष्टांग प्रणिपात ! १२-१३ वर्षाच्या बालकांना शिवाजी महाराज कळणे आणि त्यात चुका काढणे म्हणजे अतिच सुधारलेपणाचे लक्षण मानावे लागेल. असो ! यावर इथे चर्चा नको.

वेल्लाभट's picture

16 Feb 2017 - 1:37 pm | वेल्लाभट

इयत्ता चौथी
९ वर्षाच्या मुलाला अफजलखानाचा वध, कोथळा काढणे इत्यादी शिकवण्यावर काय मत आपलं?

सहज विचारलं. स्वतंत्र विचार करायला शिकवण्याचं उदाहरण सांगितलं, त्याव तुम्ही तुमचा स्वतंत्र विचार मांडलात म्हणून फक्त.

धर्मराजमुटके's picture

16 Feb 2017 - 1:44 pm | धर्मराजमुटके

वेगळा धागा काढावा. पिराताईंची चिंता वेगळी आहे. त्यामुळे या धाग्याचा काश्मिर होऊ नये अशी इच्छा !

वेल्लाभट's picture

16 Feb 2017 - 2:23 pm | वेल्लाभट

तुमच्याकडे भक्कम मुद्दे असतील तर नक्की काढा नवीन धागा.

मराठी_माणूस's picture

16 Feb 2017 - 2:24 pm | मराठी_माणूस

पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.

असेच २/३ महीन्यासाठी , भारतात बंगळुर, चेन्नाई , दिल्ली , कलकत्ता कींवा इतर ठीकाणी कामासाठी जावे लागले असते आणि मुक्काम वाढला असता, तर परत पुण्यात यायचे का नाही हा प्रश्न पडला असता का ?

पद्मावति's picture

16 Feb 2017 - 2:31 pm | पद्मावति

पिरा, भारत किंवा परदेश कुठे राहायचे याविषयी नाही पण मुलांच्या बाबतीत मी थोडे सांगू शकीन. सुरुवातीला आपल्याला वाटतं की इथे राहून आपली मुले आपल्या देशाला, संस्कृतीला विसरतील का, त्यांना नातेवाईकांची ओढ राहील का. पण अनेक वर्षांच्या अनुभवावरून मी सांगू शकते की असे नाही होत. मी माझ्या नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणीच्या आणि माझ्या मुलांवरून सांगते की या मुलांना भारताची, आजी आजोबांची मनापासून ओढ असते. आपल्या रूट्स विषयी, संस्कृतीविषयी आत्मियता असते. माझ्या पाहण्यात आलेली ही मुले ही वय वर्षे पन्नास पासून दोन वर्षे या रेंज मधली आहेत. सर्व जण आपापल्या आई वडिलांशी, नातेवाईकांशी अगदी प्रेमाने राहणारी, त्यांची काळजी घेणारी आहेत.
परदेशात राहून अगदी फरक पडत नाही का? तर पडतो. येस. म्हणजे जन मन गण ऐकतांना आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं ते माझ्या मुलींच्या डोळ्यात नाही येणार. पु. ल देशपांड्यांची पुस्तके ही मुले नाही वाचणार कदाचीत, अमेरिकन आक्सेंट मधे मराठी बोलतील पण मुळं घट्ट असतात त्यांची. आपल्याला भलेही बोलून नाही दाखवीणार पण स्वत:च्या परदेशी मित्र मंडळींसमोर आपल्या नातेवाईकांविषयी, भारताविषयी भरभरून बोलतील.
यासाठी मात्र आई वडील म्हणून आपल्याला जरा एक्सट्रा माईल जावं लागतं. भारतात राहून जितकं आपण करणार नाही तितके सणवार इथे साजरे करायचे, भारतात जितके जमेल तितके जाणे आणि मुलांच्या आजी आजोबांना इथे आपल्याकडे आणणे. शक्य तितके भारतीय, मराठी मंडळात आक्टिव असणे इत्यादी.
आपल्याला आणि मुलांना थोडं बोर झाले तरी चालेल पण निदान महिन्यातुन एकदा तरी जवळ पासच्या मंदिरांमधे जाणे, तिथल्या आक्टिविटीस मधे मुलांना भाग घ्यायला लावणे आणि हिंदी मराठी मालीका मुलान्सोबत पाहणे. हे जरा फनी वाटेल पण मुलांना टीवी बघायला फोर्स करणारी मी एकमेव आई असेन कदाचित :) जोक्स अपार्ट पण उंच माझा झोका, महाभारत, तारक मेहता, आता बाजीराव पेशवा या मालीका बघून सुद्धा मुलांना आपल्या देशाशी रीलेट करायला मदत होते. इट वर्क्स.
बेसिकली मला हे सांगायचे आहे की भारतात जायचे का परदेशात राहायचे हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे असतात प्रत्येकाची. पण मुलाविषयी काळजी करू नकोस. ही विल बी फाइन. भारतात काय आणि परदेशात काय मुलं शेवटी आपल्या सारखीच होतात. ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी ( का अळवा वरचे पाणी?) वळणावरच जाणार, तसंच.

ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी ( का अळवा वरचे पाणी?) वळणावरच जाणार, तसंच.

\
हाच फरक पडतो. ;) सगळे वरवरचे होते. अर्थात चूक देशाची अथवा वास्तव्याची नाही. काळ न फॅशनच तशी आहे.
.
येनीवे, टेक लाईट पद्माक्का. अळवावरचे अन वळचणीचे पाणी वेगवेगळे असते. अर्थही खूप वेगळावेगळा आहे. ;)

पद्मावति's picture

16 Feb 2017 - 3:45 pm | पद्मावति

येनीवे, टेक लाईट पद्माक्का. अळवावरचे अन वळचणीचे पाणी वेगवेगळे असते. अर्थही खूप वेगळावेगळा आहे. ;) ऊप्स..=)) म्हणींमधे मी नेहमी कन्फ्यूज़्ड असते :)
आक्च्युयली मला हे म्हणायचे आहे की आपण जसं वागतो, विचार करतो ते मुलं त्यांच्या आणि आपल्या कळत नकळत स्प्न्ज सारखी अब्ज़ॉर्ब करत असतात. आपले संस्कार, विचार सरणी त्यांच्यामधेही येतेच खूप प्रमाणात. आई वडिलांची भारताशी असलेली ओढ मुलं सुद्धा बर्‍याच प्रमाणात उचलतात.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 7:44 pm | पिलीयन रायडर

वळणाचे पाणी वळणावरच जाते किंवा apple doesn't fall far from the tree... आलं माझ्या लक्षात तुला काय म्हणायचंय ते!

तुमचा प्रतिसाद वाचून खात्री झाली की मी योग्य दिशेने जात आहे.
धन्यवाद!!!

अभिजीत अवलिया's picture

16 Feb 2017 - 3:14 pm | अभिजीत अवलिया

मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं.
--- असे असेल तर भारतात परत येणे उत्तम. तुम्ही स्वतः आणी तुमच्या नवऱ्याला काय वाटते म्हणजे अमेरिकेत राहावे का भारतात परत जावे हे महत्वाचे. तुमच्या मुलाला अमेरिकेत जसे शिकवले जाते तसे तुम्ही स्वतः देखील घरी शिकवू शकता.

अर्थात जर तुम्हाला अमेरिकेतील प्रगत जीवनाची ओढ वाटत असेल तर तिथेच राहणे योग्य आहे. कारण कुणीही कितीही विकासाच्या गमजा मारल्या तरी माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे व मताप्रमाणे अमेरिका हा भारताच्या तुलनेत फारच प्रगत देश आहे आणी अमेरिकेची बरोबरी करणे आपल्याला शक्य होईल असे मला वाटत नाही. प्रगत म्हणजे फक्त रस्ते किंवा अन्य पायाभूत सोईसुविधा ह्या अनुषंगाने मी बोलत नाहीये तर तिथल्या लोकांचे एकूणच वागणे, बोलणे, शिस्त (जे वर खटपट्या ह्यांनी नमूद केलेले आहे) ही आपल्याकडे कधी येईल असे वाटत नाही.

बाकी संस्कृतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतीय संस्कृती म्हणजे खुप काहीतरी भारी, जगात सर्वश्रेष्ठ असे काही मला वाटत नाही. ज्याला कुणाला वाटत असेल त्याला वाटू दे. काहीही वाईट नाही तिथल्या संस्कृतीत. सर्वसामान्य माणसाला शक्यतो कुठलाही त्रास किंवा भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत नाही तिथे हे तुम्ही अनुभवले असेलच. लोक किती प्रेमळपणे बोलतात, शिस्तीत वागतात हे देखील अनुभवले असेल. प्रत्येक देशाच्या संस्कृतीत काही तरी चांगल्या गोष्टी असतातच. भारतीय संस्कृती म्हणजे खूप काहीतरी भारी अशी असती तर आपला देश आज निश्चितपणे जगातली एक महासत्ता असता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भारतात राहून कितीही आपली संस्कृती मुलावर बिंबवण्याचा प्रयत्न केला तरी एका टप्प्यानंतर मुले त्यांना हवी तशीच वागण्याची शक्यता जास्त आहे.

वेल्लाभट's picture

16 Feb 2017 - 3:40 pm | वेल्लाभट

पूर्ण सहमत

श्रीगुरुजी's picture

16 Feb 2017 - 3:57 pm | श्रीगुरुजी

मी १९९१ ते १९९८ या काळात जवळपास ६ वर्षे परदेशात होतो. त्यातील ५ वर्षे अमेरिकेत होतो. तिथे माझे उत्तम चालले होते. स्थिर आयुष्य होते. कंपनी हरितपत्र स्पॉन्सर करायला तयार होती. परत येण्यासाठी काही सबळ कारण नव्हते. तसेच कायम राहण्यासाठीही सबळ कारण नव्हते. तरीसुद्धा परत आलो. मागे वळून बघितले तर नक्की का परत आलो ते सांगता येणार नाही. जेव्हा गेलो तेव्हापासूनच आपल्याला इथे कायम रहायचे नाही ही भावना मनात होती. परदेशात कोणीही सोम्यागोम्या कायमस्वरूपी राहू शकत नाही. परदेशात राहण्यासाठी सुद्धा कॉम्पॅटिबिलिटी असावी लागते. नाहीतर न घरका ना घाटका अशी परिस्थिती होऊ शकते.

परत येऊन जवळपास १८ वर्षे होऊन गेली. कधीकधी असे वाटते की तिथेच रहायला हवे होते. उगाचच परत आलो. परंतु तिथे आपण कायमस्वरूपी राहू शकलो असतो का हा प्रश्नसुद्धा पडतो.

तिथे कायम रहायचे का भारतात परत यायचे हे तुमच्या प्राथमिकतेवर अवलंबून आहे. दोन्हीकडे काही गोष्टी चांगल्या आहेत तर काही वाईट आहेत. तुमच्या प्राथमिकतेनुसार कोणत्या गोष्टी जास्त प्रमाणात कोठे साध्य होऊ शकतील तिथे तुम्ही रहायचा निर्णय घ्यावा. पैसे दोन्हीकडे भरपूर मिळू शकतात, शिक्षणाचा दर्जा अमेरिकेत भारताच्या तुलनेत जास्त चांगला आहे परंतु तेथील शिक्षण भारताच्या तुलनेत खूप महाग आहे. भारतात पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर तिथे शिकायला जाता येतेच. भारतातील वैद्यकीय सेवा अमेरिकेच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षा ही आपण आर्थिक प्लॅनिंग कसे करतो त्यावर अवलंबून आहे. भारतात राहूनही भरपूर आर्थिक सुरक्षा मिळविता येते किंवा वाटही लागू शकते. अमेरिकेतही तसेच आहे. माझ्या ओळखीचा एक जण ६ वर्षे अमेरिकेत राहून आला. परंतु कोणतेही आर्थिक नियोजन न केल्याने व काही वाईट सवयी लागल्याने त्याची भारतातील आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे व त्याच्या पत्नीला दुसर्‍यांकडे पोळ्या करून संसाराला हातभार लावावा लागतो.

भारताच्या तुलनेत अमेरिकेतील दैनिक जीवन सुसह्य व शांत आहे हे निश्चित. तिथे वीज, पाणी, वाहतूक इ. समस्या जवळपास नाहीतच आणि असल्यातरी त्यांचा लगेच निपटा होतो. भारतात मात्र दैनंदिन जीवन त्रासाचे आहे.

एकंदरीत आपल्या व आपल्या कुटंबाच्या प्राथमिकतेवरच कोठे रहायचे हे ठरवायला हवे. जिथे रहायचे असेल तिथल्या सामाजिक जीवनाशी, संस्कृतीशी जितक्या लवकर जुळवून घेता येईल तितक्या लवकर द्विधा मनस्थिती संपुष्टात येईल. एका सामाजिक अभ्यासानुसार, साधारणपणे परदेशातील पहिली पिढी ६०% संस्कृती टिकवून ठेवते. परंतु दुसरी पिढी फक्त १०% संस्कृतीच टिकवू शकते. तिसर्‍या पिढीचा व मूळ संस्कृतीचा संबंधच राहत नाही. हे लक्षात घेऊन आपली मूल्ये, संस्कृती इ. आपली मुले टिकवून धरतील का याविषयी फार विचार करू नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते होणे अवघड आहे. मुले नवीन मूल्ये, नवीन संस्कृती आत्मसात करणारच. ते थांबविणे कोणालाही शक्य होणार नाही.

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 4:29 pm | संदीप डांगे

साधारण असेच माझेही मत आहे.

आजानुकर्ण's picture

16 Feb 2017 - 7:59 pm | आजानुकर्ण

गुरुजींशी सहमत. देशप्रेम वगैरे भानगडींचा मी विचार करत नाही. कुठे राहायचं हे तुमच्या प्राथमिकतेवर अवलंबून आहे. कुठलाही निर्णय घेताना काही प्रॅक्टिकल अडचणी नक्की लक्षात घ्या.
१. तुम्ही (किंवा तुमचा नवरा) एच-१ विसावर गेला आहात. ९० टक्के लोकांना ज्या प्रोसेमधून जावे लागते त्या प्रोसेसमधून गेलात तर ग्रीनकार्ड यायला १०-१२ वर्ष लागतील. सध्याचे एच-१ किंवा ग्रीनकार्डचे नियम तेच राहतील असा अंदाज बांधला आणि या १०-१२ वर्षात इमिग्रेशन - विसा रिलेटेड कुठलीही रिस्क घ्यायची नसेल तर आहे कदाचित त्याच एम्प्लॉयरच्या दावणीला बांधून राहावे लागेल आणि तुमच्या (किंवा नवऱ्याच्या) करियरची उमेदीची वर्षे निघून जातील. ग्रीनकार्ड येईपर्यंत चाळीशी आली असेल आणि तोपर्यंत आयटी डेवलपरच्याच रोलवर (ग्रीनकार्डसाठी) राहावे लागले असेल तर करियर पूर्णपणे संपून गेली असेल. ही फॅक्ट आहे.
२. अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडत चाललंय हे स्पष्ट दिसतंय. ट्रंपसारख्याचं निवडून येणं हे स्थलांतरितांसाठी चांगलं लक्षण नाही. अमेरिकन नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ट्रंप किंवा पुढच्या कुठल्याही प्रेसिडेंटवर प्रचंड दबाव असणार हे उघड आहे. तुम्ही किंवा तुमचा मुलगा अमेरिकन नागरिक नाही. (जर मुलगा अमेरिकन नागरिक असता तर त्याला या निर्णयांचा फायदा होऊ शकला असता). स्थलांतरितांना उपलब्ध असलेल्या संधींचा संकोच होण्याची मोठी शक्यता आहे.
३. आज तुम्हाला मुलाची काळजी वाटते. उद्या तुमचे किंवा नवऱ्याचे आईवडील वृद्ध झाल्यावर त्यांची काळजी वाटेल. त्या परिस्थितीत काय निर्णय घेणार याचा आजच विचार करुन ठेवा.
४. भारताची परिस्थिती कितीही वाईट वाटत असली तरी गेल्या चार पाच वर्षात (हो. अगदी यूपीएच्या काळातही) जीडीपी ग्रोथ चांगली होत आहे, परदेशी गुंतवणूक वाढत आहे, संधींची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वृद्ध होत असलेल्या (आणि तरुण स्थलांतरितांना विरोध करणाऱ्या अमेरिकेपेक्षा) भविष्यात भारतात संधी चांगल्या असण्याची शक्यता खूपच जास्त आहे

५. दिवसेंदिवस श्रीमंत होत असलेल्या प्रगतीपथावरील भारतात तुमच्या मुलाने राहावे अशी इच्छा आहे की संधींचा संकोच होत असलेल्या वयस्कर अमेरिकेत राहावं वाटतंय या दृष्टिकोणातून विचार करा.

----
अमेरिकेतील शिक्षण, कामाचे अनुभव खूपच चांगले आहेत पण ते घेण्यासाठी तिथं कायमचं राहायची गरज आहे असं वाटत नाही.

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 8:11 pm | संदीप डांगे

हे पण मुद्दे पटले. सहमत आहे.

सही रे सई's picture

16 Feb 2017 - 10:34 pm | सही रे सई

मुद्दा क्र १ बद्दल शंका : ग्रीन कार्ड साठी अॅप्लाय करताना जो हुद्दा (पोझिशन ) असतो त्यावरच रहाव लागत का ग्रीन कार्ड येई पर्यंत?

आजानुकर्ण's picture

17 Feb 2017 - 1:27 am | आजानुकर्ण

मुद्दा क्र १ बद्दल शंका : ग्रीन कार्ड साठी अॅप्लाय करताना जो हुद्दा (पोझिशन ) असतो त्यावरच रहाव लागत का ग्रीन कार्ड येई पर्यंत?

नाही. ग्रीनकार्ड ज्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय केलेलं असतं ती फ्युचर पोझिशन असते.

सध्याच्या पोझिशनवर काम चालतं त्याचं वर्क परमिट एच-१ विसामुळे मिळतं.

मात्र मुख्य मुद्दा एच-१ विसाची सहा वर्षाची मर्यादा संपल्यावर ग्रीनकार्डच्या विलंबित अर्जाचा आधार घेऊन आणखी वास्तव्य वाढवता येते. हल्ली भारतीयांना ग्रीनकार्ड मिळण्यास १० ते १२ वर्षे (कदाचित १५) लागतात. मग सहा वर्षाची मर्यादा संपल्यावर पुढच्या एक्स्टेंशनसाठी ग्रीनकार्डचा अर्जाचा उपयोग होतो. या दरम्यान नोकरी बदलली तर ज्या कंपनीने आधी हा अर्ज दिला होता ते तो काढून घेऊ शकतात आणि पुढच्या कंपनीला शून्यापासून सुरुवात करावी लागते. (त्यातही थोडे लूपहोल्स आहेत) पण एकंदरीत किचकट प्रकार आहे.

नोकरी बदलतानाही एच-१ स्पॉन्सर करण्याची तयारी असणारा, सर्व कायदेशीर प्रोसेस (४-६ आठवड्यापर्यंत) पूर्ण होईपर्यंत वाट पाहणारा आखूडशिंगी बहुदुधी नवा एम्प्लॉयर मिळत नाही. विशेषतः नोटीस पीरियडची भानगड नसणारे अॅट विल एम्प्लॉयमेंटचे कल्चर असल्यावर हे सगळे सोपस्कार पूर्ण व्हायची वाट बघणे गैरसोयीचे असते.

एच-१ वाल्यांना नोकरी बदलाच्या कालावधीत अमेरिकेत राहणे स्ट्रेसफुल असते. पगार न मिळणारा प्रत्येक दिवस हे बेकायदेशीर वास्तव्य मानले जाते. त्यामुळे आहे तीच नोकरी टिकवून ठेवण्याची मानसिकता तयार होते आणि चांगल्या संधींचा लाभ मिळण्याची शक्यता कमी होते.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2017 - 1:47 am | पिलीयन रायडर

आता तर नवीन एच-१ घेणे पण मंदावले आहे ना? आमच्या कंपनीत २-३ जण येणार होते त्यांच सगळं होल्डवर गेलंय. इतरही कारणं असू शकतील. पण ट्रंपच्या राज्यात इमिग्रंट्सना बरे दिवस आहेत असं वाटत नाही. ग्रीनकार्डाला लागणारा वेळही कमी होईल असं वाटत नाही. इथे तर वेगवेगळ्या राज्यात रेड्स पडत आहे पासून ते पटेल ब्रदर्सच्या बाहेर्च पोलीस उभे आहेत स्टेटस चेक करायला इथवर बातम्या रोज फिरत असतात. उगाच अस्थिरतेचे वारे वहायला लागल्या सारखे वाटतेय..

बादवे.. तुम्हाला स्रुजाने मांडलेल्या कामाच्या क्वालीटीच्या मुद्द्याबद्दल काय वाटते? भारतात अजुन ते नाही आणि भारतीय मॅनेजर्सची मानसिकता हा अमेरिकतही त्रासाचा विषय आहे. भारतात तो अजुनच तीव्र आहे. हा मुद्दा कसा टॅकल करणार?

nanaba's picture

16 Feb 2017 - 4:29 pm | nanaba

Are available in India as well.
There are good schools which are very out of the box, have similar or better education strategy.
Eg. Gram mangal learning home, swadha, Anandkshan, schools like aksharnandan which are more structured.
On maayboli there is a group called "pasarun pahe". With many articles and practical experiences.
We were on USa from 2008 to 2013 Dec.
We returned because we realized we can't live with the thought of "what if"..
So wanted to give it a try.
We couldn't be happier.. returning was the best thing we did.

फारच समर्पक सल्ले ! मिपावर कसल्याही समस्यांचा किती सांगोपांग आणि आत्मीयतेने उहापोह केला जातो याचं उत्तम दर्शन धाग्याच्या प्रतिसादातून झाले.
मी जरी कधी परदेशी गेले नाही, तरी दोनच गोष्टी सांगू इच्छिते ,
१. तुम्हाला निर्णय-स्वातंत्र्य आहे, ही फार मोलाची आणि भाग्याची गोष्ट आहे, याची जाणीव असूदे .फार कमी लोकांना अशी संधी मिळते.
२. कोणताही निर्णय घेतला तरी पुढे घडणाऱ्या गोष्टींसाठी स्वत:ला किंवा सल्ला देणाऱ्यांना जबाबदार धरू नये, तर हे होणारच आहे, अशा तयारीने त्यांचा समान करा. कारण कोणताही निर्णय शंभर टक्के बरोबर नसतो आणि शंभर टक्के चूकही नसतो. आपल्या मनाचा कल बघ आणि निर्णय घे.
...अखेर ऐकावे जनाचे...!
शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2017 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. तुम्हाला निर्णय-स्वातंत्र्य आहे, ही फार मोलाची आणि भाग्याची गोष्ट आहे, याची जाणीव असूदे .फार कमी लोकांना अशी संधी मिळते.

+ १०००

हा निर्णय कायम करण्यासाठीचा पहिला मुद्दा होऊ शकत नाही, पण निर्णयप्रक्रियेत त्याला विसरण्याची चूक करू नये इतका महत्वाचा मुद्दा नक्कीच आहे.

रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. शिक्षणपद्धती वगैरे जस्टिफिकेशन शोधू नका. कोणी मागितलंय?

भारतात खरंच यावंसं वाटणारे (फारच थोडे असतात) पण परत येऊन टाकतात. पण X=X+1 सिंड्रोममधे अडकणार्यांना मात्र कारणं भरपूर सापडतात.

खरंच कोणी वर म्हटल्याप्रमाणे फॉर हियर ऑर टु गो मधला x=x+1 सिंड्रोम वाचा.

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2017 - 9:11 pm | संजय क्षीरसागर

.

आजानुकर्ण's picture

17 Feb 2017 - 1:33 am | आजानुकर्ण

x=x+1 सिंड्रोम काय आहे ?
अहो पुण्यात म्हणतात ना, पुढच्या वेळी आल्यावर जेवायलाच या. त्याचीच आवृत्ती आहे ही. पुढच्या वर्षी भारतात कायमचं परत जाऊ असं दरवर्षी म्हणायचं.

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 1:08 pm | संजय क्षीरसागर

निर्णय घ्यायचा नसला की मन तुम्हाला पुढच्या तारखेचा वायदा देतं, याला प्रोक्रास्टीनेशन म्हणतात. खरं तर मनाला निर्णय घेण्यात इंटरेस्टच नसतो, त्याला फक्त चर्चा हवी असते कारण निर्णय घेतला की मनाला कामच उरणार नसतं! पुढची तारीख आली की मन नवं आणि एकदम वॅलीड कारण पुढे करतं. अशा तारीखपे तारीख पडत जातात आणि निर्णय काही होत नाही.

मराठी_माणूस's picture

17 Feb 2017 - 2:19 pm | मराठी_माणूस

बरोबर. तसेच बर्‍याचदा मनात निर्णय झालेला असतो पण त्या निर्णयाला कीती पाठींबा आहे हे चाचपडले जाते.

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 3:32 pm | संजय क्षीरसागर

पण आपल्या निर्णयाला इतरांचा असलेला पाठींबा चाचपडण्यात पुन्हा नवा किंवा विरोधी मुद्दा आला की परत मेरी- गो- राऊंड सुरु !

पुष्करिणी's picture

17 Feb 2017 - 6:02 pm | पुष्करिणी

if ‘X’ is the current year, then the objective is to return in the ‘X + 1’ year. Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached.
chained to his cultural moorings and haunted by an abject fear of giving up an accustomed standard of living, the Non-Resident Indian vacillates and oscillates between two worlds

--- आंजावरून साभार

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 6:46 pm | संजय क्षीरसागर

Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached.

पण कोणताही निर्णय घेणं अवघड होण्याचं कारण फार मजेशीर आहे . मनाला निर्णय घेता येत नाही , त्याचं काम फक्त वेगवेगळे विकल्प मांडणं आहे . निर्णय कायम व्यक्तीलाच घ्यावा लागतो पण व्यक्ती मनाकडे कौल मागते . मग मन पुन्हा नवनवे विकल्प देतं त्यानं व्यक्ती आणखी कन्फ्युज होते . खरं तर मेंटल अॅक्टिविटी पूर्ण थांबल्याशिवाय निर्णय असंभव असतो . पण व्यक्ती मनाला कायम टरकून असते, न जाणो एखादा निर्णय चुकला तर मन पुन्हा म्हणणार ' मी त्याच वेळी सांगितलं होतं ! घातला ना घोळ ? आता निस्तरा ! ' त्यामुळे व्यक्तिला वाटतं निर्णयाचं काम बेटर मनावरच सोपवा. मग व्यक्ति मनाकडे पाहाते आणि मन व्यक्तिला पुन्हा स्वतःच्या मेरी गो राऊंड मधे बसवतं ! हा खरा X <-> Y सिंड्रोम आहे !

Where X is mind & Y is you . The dilema is tossing the Ball to each other & the result is an unending game which makes any outcome impossible.

पुष्करिणी's picture

17 Feb 2017 - 7:51 pm | पुष्करिणी

हो, होतं असं. खरं तर प्रत्येक निर्णय घेताना होतं. पण जेंव्हा एखदा निर्णय चुकण्याची किंमत बरीच मोठी असायची शक्यता असते /बॅकट्रॅक करणं सोपं नसतं किंवा सगळेच पॅरमिटर्स 'लॉजिकल' नसतात, काही 'भावनिक' सुद्धा असतात तेंव्हा मनाकडे कंट्रोल जातो. प्रत्येकाच्या सद्य परिस्थितीवर ते अवलंबून असेल.

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 8:52 pm | संजय क्षीरसागर

भावना म्हणजे विचारामुळे हृदयात निर्माण झालेला हलकासा ट्रेमर . सुरुवातीला विचार फक्त मेंदूत असतो पण मनाला फुल थ्रॉटल जायचं असेल तेव्हा मन एखादा हृदयस्पर्शी विचार निर्माण करतं . इथे व्यक्ति फुल गर्तेत जाते आणि भावनेला शरण जाऊन निर्णय घेते . निर्णय विचारांनी घेतला काय की भावनेनी, शेवटी तो मनानंच घेतलेला असतो . निर्णय यशस्वी झाला तर क्रेडीट मनाकडे जातं पण फसला तर खापर तुमच्यावर येतं ! सो मेंटल अॅक्टिविटीकडे एकदाच बघायचं, काय वॅलीड आहे ते ठरवायचं आणि मग मनानं कितीही बोंबाबोंब केली तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून स्वतः निर्णय घेणं ही सगळयात सोपी, जलद आणि निर्णायक प्रकिया आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2017 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. शिक्षणपद्धती वगैरे जस्टिफिकेशन शोधू नका. कोणी मागितलंय?

प्लस. १०००. आणि हजारवेळा सहमत. माझ्यादृष्टीने चर्चा इथेच संपली आहे. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

त्यामुळे पुन्हा तेच मुद्दे मांडण्यात हशील नाही.

मुलांच्या बाबतीत काय करायचे याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा मला सावरकर आजोबांचा संदेश आठवतो -

माझं लोकांना एकच सांगणं आहे की मुलांवर असे प्रेम करा की ती आपण होऊन तुमच्याजवळ येतील. अपेक्षा ठेवू नका. त्यांना आयुष्याचा आनंद घेऊ देत.

प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांना असे प्रेम द्यायला हवे की मुलाला बापाबद्दल द्वेष वाटता कामा नये.

आणि सरतेशेवटी मी तरी खलील जिब्रानची ही कविता डोळ्यांसमोर ठेवायचा शक्य तेवढा प्रयत्न करतो.
तुम्हाला निर्णय घेता येण्यासाठी शुभेच्छा! :)

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 8:13 pm | पिलीयन रायडर

शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे सगळ्यांनीच मान्य केलाय. अमेरिकेत ते अधिक चांगल्या दर्जाचे आहे. पण त्यानिमित्ताने पुण्यातल्या चांगल्या शाळांची नावं मिळाली. परतल्यास भारतातही उत्तम पर्याय आहेत हा एक दिलासा आहे.

प्रतिसाद वाचुन किमान एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. ती म्हणजे माझी मूळ भीती ही आपला मुलगा आपल्यापेक्षा काही तरी भलत्याच वेगळ्या संस्कॄतीची पताका पुढे नेणारे. आणि ही गोष्ट चांगली अथवा वाईट असण्यापेक्षाही माझ्यासाठी नवीन आहे. तेव्हा पालक म्हणुन मी ते हाताळु शकेन का अशी एक भीती मला वाटतेय. भारतातही हे होईलच पण अमेरिकेत मला ते तीव्रतेने जाणवतं इतकंच. शिवाय भारतासाठी डोळ्यात पाणी न येणे एकवेळ मी समजु शकते. पण त्याने अमेरिकेच्या झेंड्याशी जास्त इमान राखलं तर मला धक्का बसेल हे नक्की आहे. पद्मावती आणि वैषाली म्हणाल्या तसं ते पुन्हा एकदा आमच्याच हातातही आहे. आम्ही आमची संस्कॄती किती जोपासतोय ह्यावर मुलापर्यंत काय पोहचेल हे अवलंबुन आहे. खरं तर मी भारतातही निवडक सण सोडुन फार काही करत नाही, इथे तर आनंदच आहे. मला त्या अर्थाने त्याला भारतीय बनवायचे नाही. मला माझ्या मुलाच्या निष्ठा दुसर्‍या देशासाठी समर्पित असु शकतील हे पचायला अवघड जातंय. त्याने कोणतेही सणवार नाही केले तरी मला तसा काहीच फरक पडत नाही. पण भारताच्या झेंड्याचा अभिमान त्याला असावा असं मला वाटतं.

देशाभिमान हा फक्त भारतात राहिल्याने व्यक्त होतो असं काही माझं आत्यंतिक मत नाही. आयुष्यात परसेशात रहाण्याचा अनुभव फार मोठे बदल करतो, तुमच्या जाणीवांना प्रलग्भ करतो हे मला दिसतंचे. पण माझं घर हे अखेर भारतात आहे, इथे मी पाहुणी... ही भावना मला अजुन तरी काढुन टाकता येत नाही. इथुन कुणीही मला निघुन जा म्हणुन शकतं, ह्या देशाच्या नियमांवर माझे आयुष्य फार जास्त अवलंबुन आहे ह्या ही जरा बोचणार्‍या गोष्टी आहेत. पण मी ह्या गोष्टींवर चिडचिड करत असताना, अनेक लोक ही भावना दूर करुन इथे रहातात, मुलांना उत्तम शिक्षण देतात. तेव्हा मला वाटतं की मी जास्त हळवी होतेय का? ह्या सगळ्या भावना मी नुकतीच इथे आल्याने आणि अजुन इथे कमवत नसल्याने* अत्यंत तीव्र आहेत. देशभक्तीच्या ह्या कल्पना बोथट होतील का? किंवा चक्क उद्या मुर्खपणाच्याच वाटतील का?

*(हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, स्रुजा म्हणते तसं माझ्या नवर्‍याचंही मत आहे. अमेरिकेत काम केल्यावर अमेरिका जास्त आवडायला लागते. मी भारतात एका अमेरिकन बेस्ड कंपनीसाठीच काम केलेले आहे. आणि सगळी सुत्र अमेरिकेतुन हलतात ह्याचा अनुभव आहे. तेव्हा खरंच दर्जा काम करायचं असेल तर ते इथे करायला मिळेल असं मलाही वाटतं.)

प्रतिसाद आणि व्यनि मधुन इतकी चांगली चर्चा चालु आहे.

अवांतर :- मला फक्त अमेरिकेचा अनुभव आहे. पण इतर देशांमध्ये शिक्षण आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे अनुभव कसे आहेत?

आजानुकर्ण's picture

16 Feb 2017 - 8:35 pm | आजानुकर्ण

देशाभिमान आणि झेंड्याशी निष्ठा वगैरे समजले नाही. नक्की काय म्हणायचंय?

अमेरिकेत कायमचं राहण्याचा निर्णय घेणारे भारताचा देशाभिमान वगैरे तर लोलियतच वाटतं. (तुम्हाला उद्देशून नाही. इन जनरल इथल्या पॉटलक मित्रांशी बोलतो तेव्हा जे वाटतं ते)

एक जुनं कार्टून आठवलं.

कार्टून

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 8:49 pm | पिलीयन रायडर

हे बघा.. त्याचं असंय की देशात राहिलं की च आपण देशप्रेमी असतो असं मला वाटत नाही. समजा मी माझ्या देशासाठी वेळ नाही देऊ शकत, पण पैसे देऊ शकते. तर मी ते कुठेही राहिले तरी देऊच शकते. आपण कुठेही राहुन देशासाठी योगदान देऊ शकतो असं मला वाटतं. बाकी झेंडा आणि राष्ट्रगीत ह्यांच्यासाठी मी जरा सेंटी आहे. म्हणून मुलाला जेव्हा शाळेत अमेरिकेच्या झेंड्यासमोर प्रतिज्ञा म्हणताना पाहिलं तेव्हा फार त्रास झाला. आज तो पोपटपंची करतोय, उद्या मनापासुन अमेरिकेला त्याचा देश मानेल. ज्याचा एक सेंटी माणुस म्हणुन मला त्रास होईल.

बाकी तुम्ही म्हणताय तसे लोक मला नाही भेटले अजुन. सुदैवाने सगळे भारताच्या प्रेमातलेच आजुबाजुला आहेत. ते लोक भारत वाईट आहे म्हणुन इथे नसून, इथे जास्त चांगल्या संधी आहेत म्हणुन आहेत. ह्यात भारतासाठी द्वेष वगैरे नसून, प्रॅक्टिकली जे आवश्यक आहे तो पर्याय निवडला असं असण्याची शक्यता जास्त आहे. मग असं असताना त्यांनी इथे राहुन भारताविषयी प्रेम व्यक्त केलं तर हरकत नसावी. मागे एकदा इंडीया डे परेडच्या फोटोंवर कुणी तरी भारतातल्या मित्राने असाच ह्या लोकांच्या राष्ट्रभक्तिवर सवाल केला होता. ते ही चूकच वाटले होते. भारतात बसलाय म्हणुन हा फार मोठा देशभक्त आहे आणि इंडीया डे परेडमध्ये सगळे एकजात दांभिक आहेत हा अ‍ॅप्रोच चुकीचा आहे.

बादवे.. तुमचा वरचा प्रतिसाद खूप आवडलाय. मुद्द्यांमध्ये दम आहे. ट्रंप आल्यानंतर विचार झपाट्याने बदलले हे नक्की. ह्या माणसाच्या आमदनीत रहावं का असं दिवसातुन चारदा तरी वाटायला लावतोय तो आजकाल.

तु म्हणालीस की तुझे वडील मराठवाड्यातून पुण्यात आले. तुझे प्रेम मराठवाड्यावर जास्त आहे की पुण्यावर? जिथे आपण रुजतो तिथलेच प्रेम वाटणार . त्यामुळे आपल्या मुलांना भारत आवडेल पण ते God bless America!! म्हणणारच.
१५ आॅगस्ट ऐवजी ४ जुलै जास्त प्रिय असणार . याचा आपल्याला त्रास होतो पण इथे राहून या देशावर प्रेम न करता भारतावर कर हे जरा अवघडच?

सप्तरंगी's picture

17 Feb 2017 - 6:35 pm | सप्तरंगी

जसे तू भारतात जास्त राहिलीस आणि तुला भारताबद्दल जास्त प्रेम वाटते तसे त्याला त्याचे बालपण usa मध्ये गेले म्हणून usa च्या झेंडयाबद्द्ल जास्त प्रेम वाटलं तर चूक काय?. आपण ज्या शहरात / राज्यात राहतो त्याबाबतीत पण तर आपण असेच वागतो ना?
एका ठिकाणी तू लिहिलेस कि '' पण आम्ही त्याला क्षणभरही विसरु देत नाही की भारत आपला देश आहे '' . हे त्याला सांगता सांगत तु तुला स्वतःलाही सतत सांगते आहेस का?
इथे मी उलट विचार करून बघतेय, असे बिंबवण्यापेक्षा आणि मग नंतर confuse होण्यापेक्षा आपण दोन्ही देशांवर डोळसपणे प्रेम करावे असे मला वाटते.

अभिजीत अवलिया's picture

16 Feb 2017 - 8:49 pm | अभिजीत अवलिया

मी अमेरिका सोडून इंग्लंड मध्ये राहिलो आहे. शिक्षणाचे काही माहीत नाही पण अमेरिके इतकेच किंवा काकणभर सरस वाटले इंग्लंड मधील इन्फ्रास्ट्रक्चर. तसेच भारतातून आलोय म्हणून कधी कुठेही हीन वागणूक मिळाली नाही. उलट लोक ज्या प्रेमळपणे बोलत, आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते माझ्यासाठी नवीन होते. इंग्लंड मला अमेरिकेपेक्षाही आवडला होता.

प्रसन्न३००१'s picture

17 Feb 2017 - 11:15 am | प्रसन्न३००१

माझा हि असाच अनुभव आहे इंग्लंड मधला

Jack_Bauer's picture

21 Feb 2017 - 2:46 am | Jack_Bauer

आपण खालील मुद्दे देखील विचारात घ्यावेत :

१. खाण्या पिण्याच्या सवयी : जर अमेरिकेत अधिक काळ राहणार असाल तर पुढे मागे तुमचीही नोकरी सुरु होईल. आणि जेव्हा दोघेही काम करत तेंव्हा २-३ दिवसांचे जेवण एकदम करून ठेवले जाते. बऱ्याचदा फ्रोझन फूडचा पर्याय देखील वापरला जातो. रोज फ्रिज मधून अन्न काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे ती खूप कॉमन गोष्ट आहे. सांगण्यासाठीचे कारण असते कि वेळ आणि पैसा वाचतो परंतु ताजे बनवलेले अन्न आणि फ्रोझन फूड यातील फरक नव्याने सांगायला नको. असे फ्रोझन अन्न खाल्यान्ने अनेक विकारांना आमंत्रण मिळते. अमेरिकेतील सर्वच भारतीय असे करतात असे नाही परंतु बरेचसे करतात त्यामुळे आपल्या बाबतीत देखील हि शक्यता ध्यानात घ्या.

२. पैसा आणि पैसा : आपण दोघेही जरी नोकरी करत असाल तरी देखील भारतातल्यासारखे घरकामासाठी माणूस ठेवणे परवडत नाही. त्यामुळे नवरा बायकोला नोकरी करून वर घरातीलदेखील कामे करावी लागतात. वीकएंड हे ग्रोसरी आणणे , घर vacuum करणे , मुलांना वेगवेगळ्या क्लासना सोडणे , आणणे , कपडे धुणे, इस्त्री करणे, भांडी घासणे, मोठे घर असल्यास गवत कापणे, बागेची निगा राखणे इ. अनेक कामे करण्यात जातात. बरेचसे लोक त्यामुळे आयुष्य किती busy आहे हे भारतातल्या लोकांना सांगतात असतात. हे सर्व करून मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी (छंद इ.) किती वेळ आणि energy शिल्लक राहील ह्याचाही विचार करावा.

३. मुले : मुले थोडी मोठी (टिन एज ) झाल्यावर आपल्या मुलाकडून अगर मुलीकडून समजा पुढील प्रश्न विचारले गेले तर कसे उत्तर द्यायचे ह्याची तयारी ठेवा:
- That’s my life, that is none of your business
- मुलीकडून : Joe is black guy, so what ? Look at his body, he looks like your “Salman Khan”, I would love to go out with him.
- You are asking too many personal questions.
- “I don’t get any clue what they are saying in that Pooja Ceremony and still you want me to seat 2 hours there. This is a torture.
- You asked me to come with you at the temple, when I asked significance of the murti , clothing on Murti etc.. even you were at loss of words. I am not convinced, sorry I would stay at home, you guys go to the temple , Satnarayan Puja whatever..

आर्थिक स्वास्थ्य आहे पण मानसिक नाही अशी अवस्था अनेकांची होते. अशी अनेक उदाहरण बघितली आहेत जिथे पैसा आहे पण आपली वाटावीत , ज्यांच्या बरोबर आपले यश , प्रगती शेअर करावी अशी आपली माणसे जवळ नाहीत. ज्या मुलांसाठी आपण इतके कष्ट केले ती मुले मोठी (टिन एज ) झाल्यावर बऱ्याचदा पैसा किंवा तत्सम आर्थिक आधार हवा तेंव्हाच जवळ येतात , इतर वेळी आपल्या स्वतःच्या जगात अशी परिस्थिती. काही बोलताही येत नाही कारण आपणच आपल्या भारतातल्या मित्र , नातेवाईक ह्यांच्या समोर इथे आपण किती भारी आयुष्य जगतोय ह्याचे सुंदर चित्र रंगवलेले असते.
प्रत्येक भारतीयाला असाच अनुभव येईलच असे नाही पण बरयाचदा वर सांगितलेले देखील होणारच नाही ह्याची खात्री कोण देईल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2017 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

21 Feb 2017 - 2:47 pm | पद्मावति

'रोज फ्रोज़न फुड खाणे'या अर्बन मीथ्स वाटतात मला तरी. अगदी साठीच्या दशकात, सत्तरिच्या दशकात जे लोक अमेरिकेत आले त्यांना भारतीय ग्रोसरी मिळायची नाही सहजासहजी. तेव्हा असे तुम्ही म्हणताय तसे व्हायचे हे खरंय. पण जे नव्वदीचे दशक आणि पुढे अमेरिकेत आले त्यांच्या घरात अस फ्रोज़न फुड (फ्रोज़न मटार, फ्रोज़न बीन्स किंवा फ्रोज़न कॉर्न ठीक आहे) खाणे नाही दिसणार.

मी स्वत: त्या देशात पंधरा वर्षे राहीले आहे. अगदी ओहायो मधल्या खेडेगावापासून महानगरापर्यंत. फ्रोज़न फुड खाणे हा प्रकार मी तरी कधी माझ्या घरात किंवा आमच्या नातेवाईक, मित्र परिवारामधे ( भारतीय) बघितला नाहीये. सगळ्या घरांमधून व्यवस्थीत भाजी पोळी, वरण भात, चटणी, कोशिंबिरीचा स्वयंपाक असतो. जॉब करणार्‍या स्त्रिया सुद्धा रोज छान साधा का होईना स्वयंपाक करतात. जास्तीत जास्तं पोळ्या बाहेरून आणतात.

घर कामासाठी माणुस बळ नसते हे मात्र खरंय. पण थोडं फार.. उदा. गवत कापण्यासाठी, घराच्या क्लीनिंग साठी लोकांना हायर करता येतं ते केलं की आपला वेळ वाचतो.

बाकी मुलांचं म्हणाल तर ' नन ऑफ युवर बिज़्नेस' , ' यू आर आस्किंग टू मेनी क्वेस्चन्स' असे टीनएज टॅंट्रम्स जर कधी त्यांनी केलेच तर देसी आई वडिलांना मुलांना योग्य वळणावर कसे आणायचे ते बरोबर कळते.

पूजेला, मंदिरात ही मुलं त्यांच्या आई वडिलांबरोबर नक्की येतात. आधी मे बी बोर होत असतीलही. पण म्हणतात नं '' अच्छी आदतें हमेही तो लगानी हैं' हे आई वडीलांनी पक्कं ध्यानात ठेवलं की सोपं होतं सगळं मग. मुलांच्याही ते अन्ग्वळणी पडतं. मग एकदा त्या टीनएज ' ओह नो' फेज़ मधून बाहेर आले आणि संसाराला लागले की तेही आपले संस्कार, चालीरीती त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचाव्या याची निश्चित पणे काळजी घेतात यात काहीही शंकाच नको. फक्त आई वडीलांनी गोडी गुलाबीने आणि प्रसंगी स्ट्रिक्ट्ली या सवयी मुलांना लावायला हव्यात आणि ते करतातही.

फ्रोज़न फुड म्हणजे फक्त पटेल ब्रदर्समध्ये मिळणारे असे नसून आपण बनवलेले आणि फ्रिजमध्ये ठेवून ३ दिवसांनी खाल्लेले हे देखील येते. घरातील स्त्री हि जर रोज ८ तास नोकरी , साधारण १ ते दीड तासाचा रोजचा घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा प्रवास , किमान रोजची ७ तास झोप हे करून आपल्या म्हणण्यानुसार जर रोज व्यवस्थीत भाजी पोळी, वरण भात, चटणी, कोशिंबिरीचा स्वयंपाक करून, भांडी घासून (कारण इथे भांडी घासायला बाई नसते ) , किचन आवरून वर कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देत असेल तर खरंच कौतुकास्पद आहे. कदाचित आपल्याला अशी उदाहरणे दिसली असतील पण माझ्या पाहण्यात तरी जितके परिवार आले त्यांच्या फ्रिजमध्ये फ्रोझन फूड हे असतेच असते.

काही कामाकरिता लोकांना हायर करता येतं हे आपला म्हणणं खरं आहे. परंतु गवत कापायला जेव्हा सरासरी $१२० आणि घराच्या साफ सफाईला जेव्हा सरासरी $११५ म्हणजे एका वेळेसाठी साधारण $३०० (+टीप पकडून ) द्यायची वेळ येते तेव्हा किती जण हा मार्ग निवडतील आणि किती वेळा निवडतील हा प्रश्नच आहे.

मुलांच्या बाबतीत म्हणाल तर पालकांनी काय करावे काय करू नये हे न सांगता मी एवढाच म्हटलं आहे :

आपल्या मुलाकडून अगर मुलीकडून समजा पुढील प्रश्न विचारले गेले तर कसे उत्तर द्यायचे ह्याची तयारी ठेवा:

ह्या उपर आपले मूल कसे हाताळायचे हा प्रत्येक पालकाने घ्यायचा निर्यय आहे.

फेरफटका's picture

21 Feb 2017 - 9:00 pm | फेरफटका

तुमच्या निरिक्षणाशी सहमत आहे. अमेरिकेत रहायचं तर अमेरिकेतली लाईफ स्टाईल अंगिकारावी लागते. आणी ती जर अंगिकारली, तर असा काही त्रास वगैरे होत नाही. उगाच बाऊ करावी ईतकी परिस्थिती वाईट अजिबात नाहीये.

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 8:39 pm | संदीप डांगे

पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मुलाने भारताच्य झंड्याशी इमान राखावं, अमेरिकेच्या जास्त नको हे विचार जरा विचित्र आहेत बघा...

वरिल सर्वांच्या प्रतिसादात कुणी आयडेन्टीटी क्रायसिसचा उल्लेख किंवा त्यानुषंगाने चर्चा केली आहे काय? पिरातैच्या वरच्या प्रतिसादात व्यक्त झालेल्या मतांमध्ये मला त्यांच्या मुलाला टीनेजपासूनपुढे आयडेन्टीटी क्रायसिस ला सामोरे जावे लागू शकते असे पोटेन्शियल दिसत आहे. उद्या त्याने एफबीआयमध्ये, सीआयए मध्ये नोकरी केली आणि भारताविरुद्ध गुप्त कट रचण्याची त्याच्यावर जबाबदारी आली तर हे आयडेन्टीटी क्रायसिस त्याला त्रास देऊ शकतं असं वाटतं.... अर्थात ही एकदम फारफेच्ड सिचुएशन मांडली आहे. तरीही...

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 8:54 pm | पिलीयन रायडर

फार फेच्ड नाही बोलताय तुम्ही. अगदी रास्त मुद्दा आहे. मी स्वतः इतका ताणुन विचार केलाय एकदा. उद्या अमेरिका आणि भारताचे युद्ध झाले तर? पार इथवर...

माझा मुलगा किती प्रॅक्टीकल निघेल ह्यावरही बरेच अवलंबुन आहे. पण आम्ही त्याला क्षणभरही विसरु देत नाही की भारत आपला देश आहे. समजा मी हा अतिरेकीपणा थांबवला तरी त्याची नाळ जुळलेली रहाणारच आहे भारताशी. उद्या हा मुलगा अमेरिकेचा नागरिक झाला तरी अमेरिकेसाठी आणि खास करुन भारताविरुद्ध काम करु शकेल का? त्याला हे प्रश्न पडतील असं वाटतंय..

(मुळात असे संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का?)

ट्रेड मार्क's picture

18 Feb 2017 - 11:50 pm | ट्रेड मार्क

असे युद्ध ही गोष्ट फार लांबची आहे पण आपल्या इतिहासात पण भारतात राहून इंग्रजांच्या बाजूने आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध लढलेल्या भारतीयांची संख्या काही कमी नाहीये. अजूनही भारतात राहून भ्रष्टाचार करणारे, नियम व कायदे न पाळणारे, अतिरेक्यांना व भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना वैचारिक का होईना पण पाठबळ देणारे हे पण भारताविरोधात अप्रत्यक्षपणे लढतच आहेत.

संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का?

घेत असावेत. पण अगदी खूप वरच्या हुद्द्यावर जाण्यासाठी वेगळे निकष असतील.

आनंदयात्री's picture

16 Feb 2017 - 9:34 pm | आनंदयात्री

शेवटी आयुष्य तुमचे आहे आहे आणि मुलाबाळांचे आयुष्य तुमच्या आयुष्याशी बांधलेले आहे. जसे तुमचे माझे आणि सगळ्यांचे त्यांच्या त्यांच्या पालकांशी होते. त्यांनी त्याकाळात केलेले भारतातल्या भारतात केलेले स्थलांतर, खेड्यातून शहरात किंवा लहान शहरातून मोठ्या शहरात, त्यांच्या आयुष्यात प्रगतीच्या संधी, कंपॅरिटिव्हली सुखकर आयुष्य घेऊन आले. तसेच वाईट हवा, ताजा भाजीपाला, एकत्र कुटुंब, शेतीविषयक जीवनशैलीशी ताटातूट, सणवार प्रथांमध्ये काटछाट, कुटुंबाला एकत्र कमी वेळ असे काही दुष्परिणामही घेऊन आले असेलच. त्यांचे पाल्य म्हणून ते आपल्या वाटेलही आलेच. सध्याचे आयुष्य तुमचे आहे, मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला जसे जगायला आवडेल तसे त्याला जगता आले पाहिजे याला सक्षम बनवणे एवढेच आपले कर्तव्य, असे वाटते. त्यासाठी तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या संधींशी किंवा आवडीनिवडींशी 'त्यागाच्या' लेव्हलवर तडजोड करावी लागू नये असेही वाटते.

भारतातली आणि इथली टोकाची यशस्वी आणि टोकाची अयशस्वी उदाहरणे ना घेता पहिले तर, इथे शिकणाऱ्या मुलांना बेटर ह्युमन बनवायचा शाळांचा प्रयत्न असतो असे वाटते. कचरा ना करणे वैगेरे क्लिशे उदाहरणांपुढे जाऊन एक उदाहरण घ्यायचे झाले तर collaboration over competition सारखे मूल्य मुलांमध्ये अधिक रुजलेले दिसते.

अजानुकर्णाच्या प्रतिसादतल्या मुद्दा १ आणि ३ शी सहमत आहे.

सही रे सई's picture

16 Feb 2017 - 11:57 pm | सही रे सई

फार छान विषय आणि त्यावरची चर्चा आहे सुरु. मी पण याच दोलायमान स्थिती मध्ये असते कधी कधी. म्हणजे मला माहिती आहे कि कायमस्वरूपी मी इथेच नाही राहू शकणार. पण मग किती वर्ष राहायचं हा एक प्रश्न असतो माझ्या साठी.
तुझ्या प्रश्नाबद्दल माझे काही विचार :
बऱ्याच जणांनी म्हणल आहे त्या प्रमाणेच मी म्हणेन कि फक्त मुलाच शिक्षण किंवा नवर्याच्या ऑफिस मधल वातावरण या गोष्टींचा विचार करून इथेच राहायचा निर्णय घेऊ नये. तुला आणि नवर्याला इथे कायम राहायला आवडेल का हा विचार महत्वाचा आहे. प्रत्येकाची प्रकृती आणि मानसिकता वेगळी असते. त्यामुळे एखाद्याला भारतात जास्त आवडेल कारण तिथे आपली माणसं, आपले सणवार, खाण पिण यात मन जास्त गुंतलं असेल. तर दुसर्याला या गोष्टींपेक्षा जास्त चांगल्या सोयी सुविधा, स्वतः साठी मिळणारा वेळ , मुलांसाठी आणि स्वतः साठी चांगल्या संधी यात जास्त रस असेल.
जस इथे राहून तू मुलाला भारतीय संस्कृती बद्दल शिकवू शकतेस त्याचप्रकारे भारतात राहून मुलाला वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे, सार्वजनिक ठीकाणी वर्तन कसे असावे हे सगळ घरातल्या घरात पण शिकवू शकतेस च. भारतात राहून तो एक उत्तम नागरिक बनवायची जबाबदारी तू आणि तुझा नवरा मिळून पार पडू शकता.
माझ्या मते (हे फक्त माझ्या पुरत मर्यादित आहे) मला ३-४ वर्ष इथे राहून परत भारतात जावस वाटतंय. याला माझी वैयक्तिक कारण पण आहेत. जस कि इथे मी माझी नोकरी बदलू नाही शकत (एल १ मुळे). त्या उलट पुण्यासारख्या ठिकाणी मी हव तिथे काम करू शकते (काही वर्षांनी ग्रीन कार्ड च्या इ.ए.डी. वर बदलू शकेन. पण तो पर्यंत बंधन आहेच) पण त्या व्यतिरिक्त कारण म्हणजे मी माझ्या नातेवाईकांशी जास्त अॅटॅच आहे. मला लग्न, मुंज, बारशी, डी जे या साऱ्यामध्ये खूप मजा येते. नातेवाईकांच घरी येण जाण, कधीही कोणालाही गरज पडली कि पटकन धावून जाणं आणि तेव्हढ्याच हक्काने त्यांना पण माझ्या मदतीला बोलावण. शेजारणी बरोबरचे माझे संबंध, कार्यक्रम, त्यांना पण हक्काने मदत मागण आणि मदत करण (लोक म्हणतील अमेरिकेत पण हेच करा सगळ. पण इथे शेजारणी कडे जायचं झाल तरी फोन करून मग जाते. आणि तेव्हढा हक्क जवळीक नाही जाणवत इथे. तुझ्या इथे जर्सी सिटी मधलं वातावरण बरच वेगळ असेल. पण जिथे भारतीय लोक खूप नाहीत तिथे राहाण थोड वेगळ आहे)
माझे पालक जरी आज धडधाकट असले तरी उद्या कधी तरी वृद्धापकाळी जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी त्यांच्याजवळ असण माझ्या साठी गरजेच आहे. ते तिकडे बिछान्याला टेकलेत आणि मी माझ्या नोकरी मुळे त्यांच्याजवळ महिनाभराच्या वर जाऊन राहू शकणार नाहीये ही परिस्थिती मला फारच क्लेशदायक असेल. माझे वडील काही वर्षापूर्वी गेले तेव्हा नेमकी मी अमेरिकेला होते (दोन महिन्याच्या बिझिनेस टूर वर) आणि अगदी तातडीने विमान पकडून भारतात जाऊनही मी त्याचं शेवटच दर्शन नाही घेऊ शकले. या गोष्टीच शल्य आयुष्यभर वेळोवेळी मला त्रास देणार आहे.

दुसरी भीती ही पण आहे कि माझी मुलगी अमेरिकन संस्कारात वाढायला लागली कि छोट्या छोट्या गोष्टींचे मला नक्कीच त्रास होतील. माझ्या शेजारची ७-८ वर्षाची मराठी मुलगी जेव्हा मी बघते तेव्हा ते जास्त जाणवत. तिला दसरा दिवाळी पेक्षा हेलोवीन आणि ख्रिसमस च महत्व, अपूर्वाई जास्त वाटते. एखाद्या वेळी पंजाबी ड्रेस घाल अस तिची आई म्हणाली कि ती फार चटकन तयार होत नाही. कोणी मोठ्ठ घरी आल कि आपण जसे चटकन त्यांच्या पाया पडायचो तसे या मुलीला तिच्या आईने वेळोवेळी सांगूनही वाटत नाही किंवा करायला सांगितला नमस्कार तर ती थोडे आढेवेढेच घेत कसतरी मान्य करते.
कायमस्वरूपी इथे राहायचं ठरवल्यावर जर उद्या माझ्या मुलीने एखादा गोरा किंवा निग्रो कोणाशीही लग्न करायचं म्हणल किंवा तसच राहायचं म्हणल तरी ते मी मान्य करेनही पण त्यात काही तरी मनासारख झाल नसल्याची भावना असेलच.
तू म्हणतेस तस देशप्रेम वगैरे तर फार दूरचीच गोष्ट आहे.
पण जर इथे राहून खरच तुमच मन रमलं असेल आणि वरच्या सगळ्या गोष्टी फारश्या महत्वाच्या नसतील तर नक्कीच इथेच राहण्याचा निर्णय योग्य राहील.

अनरँडम's picture

17 Feb 2017 - 12:37 am | अनरँडम

निग्रो

हा शब्द अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या भावना दुखावणारा आहे. कृपया अमेरिकेत पब्लिकमध्ये हा शब्द वापरू नका.

सही रे सई's picture

17 Feb 2017 - 12:58 am | सही रे सई

अर्थात.. पब्लिक मध्ये नाहीच वापरत.
पण भारतात आपण हाच शब्द वापरतो म्हणून इथे वापरला आहे. तरी हरकत असेल तर सा. सं., तो शब्द काढून टाका किंवा बदला अशी विनंती. कोणालाही दुखावयाच्च्या हेतूने तो लिहिला नाही . सहज ओघात लिहिताना वापरला गेला आहे.

लीना कनाटा's picture

26 Feb 2017 - 2:18 am | लीना कनाटा

विठोबा आणि रखुमाई

कृष्णवर्णीयांना विठोबा आणि रखुमाई म्हणा, कोणाला काही कळत तर नाहीच परंतु ईश्वर नामाचे पुण्य देखील गाठीस लागते.

जुइ's picture

17 Feb 2017 - 12:30 am | जुइ

इमिग्रेशनचा मुद्दा आता अगदी ठळक झाला आहे. कारण की अमेरिकेत भारतातून येणार लोकांचा प्रचंड रेटा. त्यामुळे ग्रीन कार्ड मिळण्यासाठी लागलेली भली मोठी रांग या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. सध्या देशागणिक प्रति वर्षी फक्त ७% टक्के लोकांना ग्रीन कार्ड मिळत आहेत. ही परिस्थिती इमिग्रेशन रिफॉर्म झाल्याशिवाय बदलणार नाही. इमिग्रेशनसाठी इतर देशांमध्ये कदाचित इतकी अवघड परिस्थिती नसावी.

मी अमेरिकेत आयटीत सुमारे ५ वर्ष काम केले आहे. शिवाय मध्यंतरी परत भारतात जाऊन १ वर्ष काम केले आहे.भारतात परत गेल्यावर आयटीत काम करणे खूप त्रासदायक वाटते. इथेही शक्यतो भारतीय मूळ असलेले वरिष्ठ टाळावेत असे वाटत राहते.जे अवघड आहे कारण आयटी मध्ये काम करणार्‍या अमेरिकेतील भारतीय लोकांची संख्या जास्त आहे.

शिवाय खूप जास्त विचार केला की प्रश्न जास्त जटिल होतात.

nanaba's picture

17 Feb 2017 - 1:03 am | nanaba

http://www.maayboli.com/node/55237

I am not sure what misalpav policy is on sharing external links and hope it's fine.
If not, admins please feel free to remove my post.

स्रुजा's picture

17 Feb 2017 - 1:13 am | स्रुजा

सई शी बर्‍याच अंशी सहमत ( मुलांचं लग्न हा विषय सोडून) माझ्या मामेभावाने , जो आमच्यासारखाच इथेच वाढला, एका स्कॉटीश - अमेरिकन मुलीशी लग्न केलंय. माझ्या एक दोन कलिग्ज्स पण भारतात वाढल्या, नोकरी केली आणि ब्रिटीश लोकांशी लग्न केलं म्हणुन नंतर लंडन ला स्थायिक झाल्या आहेत. या तिघांनी ज्यांच्याशी लग्नं केली म्हणजे स्कॉटीश मुलगी आणि ब्रिटीश मुलं, ती आपापल्या संस्कृतीत आपापल्या आईवडीलांबरोबर वाढली तरी परदेशी नवरा/ बायको निवडला. आता त्यांच्या आईबाबांच्या अँगल ने पण पाहा. त्यामुळे या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत. त्यात आतापासून डोकं शिणवण्यात काही अर्थ नाही. आणि मी आधीच म्हणलं त्याप्रमाणे कुठल्याही फॅमिलीमध्ये लोकांशी वाईट वागा, जोडीदाराशी प्रामाणिक राहू नका वगैरे सांगत नाहीत. कॅनडामध्ये अमेरिकेपेक्षा कौटुंबिक व्यवस्था जास्त मजबूत आहे म्हणुन असेल पण मला आजुबाजुची कुटुंबं, नवरा बायको , लिव्ह इन पार्टनर्स आमच्यासारखेच दिसतात. उन्नीस बीस चा फरक. एक बाप मुलीच्या जुनिअर प्रॉमला निघाला होता, सुपरव्हाईज्ड प्रॉम होता, पालकांना निमंत्रण होतं पण त्याच्या मुलीचा बॉ फे येणार म्हणुन जरा धास्तावला होता. आपल्याकडच्या सर्वसामान्य वडीलांसारखाच ! फक्त इथल्या समाजात हे सकारात्मक स्विकारण्याइतका प्रगल्भपणा आहे, तो आपल्याकडे अजुन हळु हळु विकसित होतोय. अशा बर्‍याच गोष्टी आपल्याकडे परस्पर निभतात कारण सोशल स्टिगमा खुप आहे. त्यामुळे त्या गोष्टींना सामोरं जाण्याची वेळच येत नाही आपल्यावर. पण, इथे ती वेळ आली तर होणारा त्रास, वाटणारी काळजी सगळं सारखंच असतं फक्त सोशल स्टिग्मा नसतो. व्हायचा त्रास कुणालाच चुकत नाही. माणसासारखी माणसं सगळीकडे असतात. आपली संस्कृती किती चांगली आहे किंवा आहे की नाही पेक्षा ही मला हा मुद्दा महत्त्चाचा वाटतो. हे एकदा डोक्यात बसवलं की मग अनोळखी किंवा परकीय संस्कृतीची निदान भीती तरी वाटत नाही. इथे माझ्या ओळखीत, अगदी वर म्हणलं तस जवळच्या नात्यात मिक्स्ड रेस लग्नं आहेत आणि खुश आहेत सगळे. मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती म्हणा, रिती रिवाज म्हणा अगदी जेवण म्हणा मुळातच रंगीबेरंगी, व्हायब्रंट आहे, सगळ्या गोष्टी साजर्‍या करायचा आपला मुळ स्वभाव आहे - इथे ते चटकन उठुन दिसतं आणि अशा लग्नांमध्ये भारतीय पद्धती अगदी कौतुकाने स्विकारतात, नव्हे त्यांना त्या जास्त आवडतात.

एक मुद्दा वर जो मांडलाय आजानुकर्ण यांनी - तरुण भारताचा, तो मला अगदी मनापासून पटतो. खरं तर २ महिन्यांपूर्वी मी भारतात जाऊन आल्यापासून मला जाणवतोय, त्यांनी तो अगदी नेमका पकडलाय. सध्या भारतात खुप मजा मजा चालू आहेत. गोष्टी फटाफट बदलतायेत, नव-नवीन गोष्टींचा सतत ओघ चालू आहे, सुधारणा होण्यास भरपूर वाव असल्याने आणि सध्या कमावता वर्ग तरुण असल्याने नवलाईच्या गोष्टी येत राहतात आणि लवकर प्रचलित पण होतात. विकसित देशांमध्ये हे अगदी उलट चित्र आहे. इथे गरजेच्या म्हणजे "मस्ट हॅव" वर्गातल्या सगळ्या गोष्टी आधीपासून्च आहेत. त्यामुळे इथुन पुढच्या प्रत्येक गोष्टीला " नाईस टु हॅव" ला जो प्राधान्यक्रम मिळतो तोच मिळणार. शिवाय कमावता वर्ग हा आता ४०शी च्या पुढचा आहे, याच वर्गाला नवीन गोष्टी परवडतील अशा असतात पण तो वयाने मोठा असल्याने त्या गोष्टी लगेच उचलण्याइतकी गरज किंवा ओपननेस दोन्ही कमी असतं. भारतात मात्र जीवन वाहतं राहतं - अगदी दैनंदीन जीवन पण काही तरी नवीन गोष्टी ऑफर करू शकतं.

आणि कुणी सांगावं , आज आपण म्हणतोय मुलांसाठी परदेश बरा, २५ वर्षांनंतर तेच इथे नोकर्‍या - व्यवसाय करायला आले, संधी जास्त आहेत म्हणुन, तर काय घ्या. टाईड कॅन चेन्ज ईदर वे !

प्रत्येकाचे आपापले प्राधान्यक्रम हा एक मुद्दा आहेच. कौटुंबिक स्थिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यात आता असलेली सांपत्तिक स्थिती पासून ते आईवडिलांच्या तब्येती सगळं येतं. पण इथे समजा सगळं जुळून आलं आणि राहायचं ठरलं तर इथली जीवनशैली जुळवून घेणं किंवा ती मनापासून आवडणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात एखाद्या पार्क मध्ये जाऊन कुटुंबाने बार्बेक्यु करण्यापासून ते दैनंदिन जीवनात प्रचंड अ‍ॅक्टीव राहणं, हे सगळं इथे राहताना मनापासून आवडयला हवं. जायचं की राहायचं पेक्षा ही राहयचं ठरवल्यावर काय आणि जायचं झालं तर वर नोकरी मधल्या वातावरणासारख्या टाळता न येणार्‍या गोष्टींचं काय हे समजायला हवं.

पैकी नोकरीच्या जागी कामाचं सुख मिळणे ही एक च गोष्ट माझ्यासाठी सध्या अन-नोन व्हेरीएबल आहे. त्याचं काय होतंय ते ऐन वेळीच कळेल.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2017 - 1:59 am | पिलीयन रायडर

लग्नाचय बाबतीत सहमत. ते काही आपल्या हातातच नाही. काय होईल ते होवो. पण परकीय संस्कॄतीची भीती वाटते हे खरंय. माझ्या मैत्रिणीने अमेरिकन मुलाशी लग्न केलं तर मला तब्बल १ वर्षभर वाटायचं की त्यांच्यात लवकर डिव्होर्स होतात, हीच कसं होईल!?! पण काही नाही, उत्तम चाललं आहे.

राहता राहिलं नोकरीच्या जागी सुख!

हा मुद्दा मात्र फिरुन फिरुन अमेरिकेच्याच बाजुने येतो. बाकी सगळ्यात भारतात उत्तम पर्याय आहेत. पण नोकरीत डोक्याला असणारी शांतता आणि घरच्यांना देता येणारा वेळ हे दोन ठसठशीत मुद्दे इथे दिसतात. इथेच माझ्या विचारांचं घोडंही अडलंय.

आजानुकर्ण's picture

18 Feb 2017 - 12:48 am | आजानुकर्ण

अमेरिकेत नोकरीच्या जागी सुख हे इतकं सरसकटीकरण करता येणार नाही. २००८-२००९ च्या मंदीनंतर अमेरिकेतली परिस्थिती बरीच बदलली आहे. कामाचे प्रेशर अनेकदा भारतात असते तितकेच असते. बे-एरियातले माझे दोन मित्र रोज रात्री आठ-साडेआठपर्यंत ऑफिसात असतात. मागच्याच वर्षी अॅमेझॉनच्या वर्ककल्चरची धुणी पब्लिकमध्ये धुतली होती
https://www.nytimes.com/2015/08/16/technology/inside-amazon-wrestling-bi...

भारतात निदान सकाळी चहानाष्ट्याचा तासभर ब्रेक, लंचचा तासभर ब्रेक, दुपारी गप्पाटप्पा आणि स्नॅक्स, अधूनमधून सुट्टा ब्रेक असं निवांत चालतं. इथं तसं करता येत नाही. नवराबायको दोघेही काम करणारे असतील तर घरातील कामासकट सगळंच अंगावर पडतं. भारतात निदान मोलकरीण वगैरे पर्याय उपलब्ध आहेत.

शब्दबम्बाळ's picture

17 Feb 2017 - 9:25 am | शब्दबम्बाळ

बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली आहेत.. काहींनी चांगला विचार करून मुद्दे दिलेत पण काहींच्या मुद्द्यात भारतात सगळे खराबच आहे जणू असा रोख वाटला... ज्याचे त्याचे मत शेवटी!
भारतात शिक्षण पद्धत खूप खराब आहे म्हणावं तर याच पद्धतीत शिकलेले लोकच आत्ता चांगल्या हुद्द्यांवर आणि उत्तम आर्थिक परिस्थितीत देखील आहेत. राहिला विषय खेळांचा तर मला वाटत भारतात लोकांना पहिल्यांदा आर्थिक दृष्ट्या स्थैर्य असणे महत्वाचे वाटते (त्यामुळेच आपल्याकडे सेविंग करण्याचे प्रमाणही पुष्कळ आहे मध्यमवर्गीयात) त्यामुळे अभ्यास करून मुले स्थिरस्थावर व्हावीत हा सगळ्यांचा खटाटोप असतो.
जर कुटुंब उत्तम आर्थिक परिस्थितीत असेल तर बहुधा मुलांना खेळ वगैरे वर लक्ष देण्याचं स्वातंत्र्य मिळते... पण हा तरीही एक जनरल मुद्दा झाला! अनेक प्रकारच्या शाळा अनेक शहरात मिळतील भारतात, पण मग मुलांच्या शिक्षणासाठी शहरे बदलणार तरी किती ना..

कुठे राहावे, हा प्रश्न जितका जास्त विचार करू तितका कठीण होत जातो असं मला वाटत..
मी जर्मनीमध्ये असताना तिथे सेटल होण्याचा ऑप्शन होता अजूनही आहे. तसा चांगला देश आहे खूप गर्दी नाही शिस्त वगैरे सगळं नीटनेटकं! पण मला तिथे स्वतंत्र वाटत नाही. सतत हे जाणवत राहत कि आपण इथले नाही. न्यूनगंड वगैरे नाही हा! तिकडचे काही लोक चांगले ओळखीचे झाले, बराच फिरलो पण... तरीही मनातून ती भावना जात नाही. मग उगाच चांगली लाईफ स्टाईल असावी म्हणून तिकडे राहावे वाटत नाही.

इथे भ्रष्टाचार आहे, धूळ आहे, गर्दी आहे पण म्हणून मला तरी देश सोडून बाहेर जावे आणि मग माझ्या देशाची आठवण काढत बसावी हे पटत नाही.
बहुतांश लोक देश सोडत नाहीत तर शहर सोडतात असे मला वाटत... आपल्यापैकी किती लोक "भारत" फिरून इकडे तिकडे नोकरीसाठी राहतात?

मी स्वतः आत्ता बंगलोर मध्ये राहतोय ३-४ वर्ष झाली. भाषा, खाणे पिणे याची संस्कृती इथेही वेगळी आहे. फक्त हे भारतात आहे.
तरीही कधी कधी वाटत सेटल कुठं व्हायचं? पण जोपर्यंत इथून निघायची इच्छा होत नाही तोपर्यंत राहावं म्हणतोय इकडेच... :)
तुम्ही पण बघा तुम्हाला नक्की 'वाटतंय' काय ते...

बाकी फेसबुक वगैरे वर देशाचा झेंडा ठेऊन आय लव्ह माय इंडिया लिहून US मध्ये ३-३ वर्ष राहणारे आणि भांडून भांडून स्टे वाढवून घेणारे लोक पण पाहिले आहेतच. जर खरंच देशप्रेम वगैरे असेल तर मग इथे राहून आपल्याला शक्य असणाऱ्या गोष्टी कराव्यात माणसाने! भारतात अगदीच राहणे शक्य नाही इतकीही काही खराब परिस्थिती नाहीये... चांगल्या राहणीमानासाठी बाहेर राहून आम्ही परकीय गंगाजळी भारतात पाठवतो म्हणून भारताचा फायदा आहे असे सांगून समाधान करून घेण्यापेक्षा जर खरंच "देशप्रेम" असेल तर इथेच राहून छोट्या छोट्या गोष्टी तरी कराव्यात असे मला वाटते.

हि माझी वैयक्तिक मते आहेत पटली पाहिजेत असे काही नाही! :)
मुद्देसूद लिहायला जमले नाही जसे सुचले तसे लिहलंय... यावर्षी ऊसगावाला जायची ऑफर आहे बघूया कसे आहे...

संदीप डांगे's picture

17 Feb 2017 - 11:41 am | संदीप डांगे

माझ्या मनातले मांडले अगदी! दुबई मलेशियाच्या ऑफर सोडण्यामागे असाच विचार होता. मला नवीन ठिकाणी जाऊन नवीन लोकांशी जुळवून घेण्यात काही दिव्य वाटत नाही, मी जिथे जिथे राहिलोय, अकोला, मुंबई, ठाणे, वाशी, नाशिक, ग्रामीण पुणे अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं कल्चर आहे पण आपण वेगळे आहोत ही जाणीव नसते. अगदी कोलकाता, गुजरात, राजस्थान, भारताच्या कोणत्याही भागात फिरलं तरी माणसं आपली आहेत हे जाणवतं.

संधींची उपलब्धता हे एक रडके कारण आहे असं वाटतं, अनेक आयआयटीयन्स लोकांनी इथेच साम्राज्ये उभी केलीत, अजून खूप स्कोप आहे. येत्या पंचवीस वर्षात खूप सकारात्मक बदल होणार आहेत भारतात, लायक व्यक्तींसाठी इथे संधींची कोणतीच कमतरता नाही.

दोन चार वर्षे परदेशी जाऊन राहणे ठीकच, पण तीकडे राहून येऊन इकडच्या समस्यांचा पाढा वाचणे नै पटत.

कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता
कभी जमी तो कभी आसमाँ नही मिलता

आजानुकर्ण's picture

18 Feb 2017 - 12:49 am | आजानुकर्ण

पटलं.

अभिदेश's picture

18 Feb 2017 - 12:52 am | अभिदेश

अगदी हेच लिहायला आलो होतो. पीरबाई , तुम्हाला अमेरिकेत राहायचे असेल तर उगाच त्याला मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे कशाला बोलताय. तुम्ही मान्य करा ना मला इकडे आवडलाय म्हणून मी राहतिये, उगाच लंगडी कारण देऊ नका. ज्या शिक्षण पद्धतीवर तुम्ही टीका करताय त्याच पद्धतीतून लाखो लोक परदेशी गेलेत , मोठ्या पदावर पोचलेत, अगदी तुम्ही आणि तुमचे यजमानसुद्धा.

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 7:20 am | पिलीयन रायडर

थोडं जास्त नाही का झालं हे? माझ्याविषयी धाग्यातल्या पन्नास ओळींपेक्षा जास्त माहिती नसताना ही अशी विधानं केलेली मला तरी आवडत नाहीत. तेव्हा वैयक्तिक न होता चर्चा करावी.

बाकी तुमच्या शिक्षणाविषयीच्या विधानाला व्यवस्थित उत्तर आहे माझ्याकडे. पण मी ह्या टोन मध्ये दिलेल्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देत नसते.

अभिदेश's picture

21 Feb 2017 - 9:32 pm | अभिदेश

कसं काय झालं ? आता तुम्ही मांडलेला विचार हा वैयक्तिकच आहे ना ? मग त्याला आलेलं उत्तर हे वैयक्तिक नको हे कसं काय?

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 9:49 pm | पिलीयन रायडर

तुम्ही कोण मला सांगणारे की माझी कारणं लंगडी आहेत? किंवा मला हे ऐकवणारे की मला इथे रहायचंय पण मी उगाच कारणं शोधत फिरतेय? मला कुणाची फिकीर आहे इथे की मी लंगडी कारणं शोधत फिरु? मी इथे मला अजिबात माहिती नसलेल्या लोकांचं अप्रुव्हल घ्यायला धागा काढलाय असं तुम्हाला वाटतंय का?

मी माझ्या आयुष्यातला एक विचार मांडलाय. शिक्षण पद्धतीविषयी आणि भारतीय संस्कॄतीविषयी.. बास.. तुम्हाला इतकंच माहिती आहे ह्या प्रश्नाबद्दल. आणि मी सुद्धा तेवढीच चर्चा करतेय. ह्यावरुन मला हे ऐकवण्याचा संबंध काय की मी कारणं शोधत फिरतेय? आणि मी एक माझा प्रश्न मांडला तर मी हे ऐकुन घ्यावं?

मी सुद्धा भारतातच शिकलेय आणि त्यात काय तृटी आहेत हे मला १००% माहिती आहे. तुम्ही ते सांगण्याची गरज मला वाटत नाही. हाच मुद्दा तुम्हाला सभ्य भाषेत मांडता आला असता. तर मी सुद्धा सभ्यपणे त्याचा प्रतिवाद केला असता. पण ज्या माणसाचे मत हे मुळात मी हे जे लिहीतेय ते खरं नाही, दिखावा आहे असं असेल, त्याला कोणतंही उत्तर देणं मी लागत नाही.

तुम्ही विचारलं ना कसं झालं? तर हे असं झालं.

(संपादित)

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 11:49 pm | पिलीयन रायडर

प्रतिसादातला काही भाग संपादित करुन दिल्याबद्दल म्हात्रे काकांचे आभार!

अभिदेश's picture

22 Feb 2017 - 12:59 am | अभिदेश

मला जे म्हणायचे आहे , ते मांडणारे अनेक प्रतिसादांत आलेले असल्यामुळे पुन्हा तेच लिहीत नाही. मुद्दा हाच आहे कि अमेरिकेत राहायचे असेल तर राहा पण जस्टिफिकेशन नका देऊ. तूर्तास एवढेच.

चित्रगुप्त's picture

17 Feb 2017 - 10:40 am | चित्रगुप्त

अत्यंत उद्बोधक धागा आणि चर्चा.
'हे विश्वचि माझे घर' असे मानून कुठेही आनंदाने, बिनधास्त रहावे. आपल्या स्वतःच्या निर्णयाप्रमाणे आयुष्यातील सर्व घटना घडून येतात वा येणार आहेत, असे वाटत राहण्याचे वय वा स्थिती उलटून गेली, नियतीच्या योजनेप्रमाणे सर्व घडत असते याची स्वानुभवाने खात्री पटली, की मग तुम्ही कुठेही असलात तरी 'आनंदाचे डोही आनंद तरंग' .

राही's picture

17 Feb 2017 - 11:26 am | राही

1)वर बहुतेकांनी भारतातही अमेरिकेच्या तोडीचे किंवा चांगले शिक्षण मिळते असे लिहिले आहे. पण हे खरे नाही. 'चांगले शिक्षण' देणाऱ्या शाळा फार तुरळक आहेत. राहत्या घरापासूनच्या अंतराच्या दृष्टीने अशा शाळा सोयीस्कर नसतात. फारच थोड्या भाग्यवंतांना अशा 'चांगल्या' शाळा मिळू शकतात.

2) काही परदेशस्थांनी भारतातली परिस्थिती सुधारेल असा आशावाद व्यक्त केला आहे. एका स्तराची (आय टी वगैरे)आर्थिक परिस्थिती सुधारेलही कदाचित. पण सध्या विषमता इतकी टोकाची आहे की समृद्धीचे फायदे सार्वत्रिक दिसू लागायला अथवा तळागाळात झिरपायला कमीतकमी तीन पिढ्या जाव्या लागतील. तोपर्यंत दारिद्र्य, बकालपण आणि भणंग-गणंगांचा सुळसुळाट इथे ठायी ठायी दिसतच राहणार.

३)इथल्या सामाजिक जाणीवा प्रचंड मागासलेल्या आहेत. वर्कमनशिप अगदी तळाच्या पातळीवर आहे. स्वत: लक्ष्य दिले नाही तर कुठलेही मामुली कामसुद्धा सुघडपणे होणे कठीण.

४)भारतात याविषयी चिडचिड, संताप, असहायतेची भावना जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात खदखदत असते. इथे राहाण्यातल्या असंतुष्टतेचे कारण प्रामुख्याने हेच असते. आणि इतर कोणतेही 'कलरफुल' सोहळे, नातेवाईकांचा गोतावळा, लग्न-मुंजी, ढोल, ताशे, उत्सव, आवाज ही ठसठस दूर करू शकत नाहीत.

अर्थात 'आपुलकी' ही भावना या सर्वांहून वेगळी आणि वरचढ असते. निर्णयावर या भावनेचा अधिक पगडा असणे साहजिक आहे.

वाचतोय. उगाचच मनाला लावून न घेता प्राप्त परिस्थितीचा उत्तम उपयोग करावा अशा मताचा मी आहे.
जीवन जगताना आणि इतिहास शिकताना अस्मिता बाजूला ठेवावी लागते.

सुमीत भातखंडे's picture

17 Feb 2017 - 12:31 pm | सुमीत भातखंडे

तुम्हाला जर मनातून वाटत असेल की तिथेच रहावं (शिर्षक वाचून तसं वाटलं) तर निर्णय घेऊन टाका.
ह्या बाबतीत गविंच्या मताशी सहमत - बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. इतर कुठलंही जस्टिफिकेशन शोधायची गरज नाही.

पद्माक्षी's picture

17 Feb 2017 - 1:37 pm | पद्माक्षी

जर मुलासाठीच निर्णय घ्यायचा असेल तर त्यालाच विचारा कि त्याला काय आवडतंय , इथे राहणे कि भारतात जाऊन राहणे. :)

अमेरिकेतली शिक्षणपद्धती ही भारतातल्यापेक्षा कैक पटींनी चांगली आहे हा मुद्दाच आपल्याला पटत नसल्याने त्या मुद्द्यावर पास.

परदेशात कधीही न गेलेला असलो ( आणि जाण्याची शक्यता हि दिसत नाही ) तरीही लिहितोय .

तुम्हाला वागण्या बोलण्यातील फरक जाणवतो असं म्हणताय .
पण तो फक्त पुणे आणि अमेरिकेत आहे का ?

तुम्ही आणि तुमचे आई वडिल तुमच्या वयात असताना किंवा लहानपणी च्या वागण्यात फरक नाहीये का ?

आज मी बिनधास्त माझ्या आई वडिलांना त्यांच्या पूर्ण आदर राखून हे म्हणू शकतो . कि बाबा तुम्ही बोलताय ते चूक आहे, हे असं नसतं.
ते त्यांच्या लहानपणी त्यांनी आपल्या पालकांना म्हणणं अशक्य होतं . किती मोठी चूक असली . तरी फक्त ते "मोठे आहेत" या कारणा साठी गप्प बसावं लागत होतं माझ्या आधीच्या पिढीला .

हा फरक नाहीये का ?

बाकी . पुस्तकी घोकंपट्टी पेक्षा , दगड आणि फुलं बघायचं शिकतोय हि माझ्यासाठी तरी खूप चांगली गोष्ट आहे.

आणि "आपले संस्कार " म्हणालात . तर मग त्याच्यासाठी घरी आहातच तुम्ही पालक म्हणून .
बाहेर तिथल्या गोष्टी शिकेल , घरी आल्यावर तुम्हा दोघांकडून भारतातल्या सारख्या गोष्टी शिकेल . त्या कश्या सांगायच्या ते तुम्हीच ठरवाल . जेणेकरून त्याला त्याचा भार वाटणार नाही.. उलट दोन्ही कडे चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतो हा फायदा मिळेल

धर्मराजमुटके's picture

17 Feb 2017 - 9:06 pm | धर्मराजमुटके

अमेरीकेतली नोकरी भारतातल्या नोकरीपेक्षा चांगली असते. (बॉसींग वगैरे वगैरे ). तिकडचा कोणी मराठी उद्योजक वगैरे नाही का मिपावर ? धंदा करण्यासाठी भारतापेक्षा चांगली परिस्थिती आहे काय ? इझ ऑफ डुईंग बिजनेस ? भारतापेक्षा जास्त नफा कमविण्याच्या संधी ? बहुतेक अमेरीका रिटर्न गुजराती / पंजाबी यांच्याकडूनच माहिती घ्यावी लागणार. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी नोकरीच्याच दृष्टीकोनातून आयुष्याकडे बघतो काय ?

संदीप डांगे's picture

17 Feb 2017 - 9:47 pm | संदीप डांगे

और ये लगा सिक्सर....!!! =))

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 7:25 am | पिलीयन रायडर

मराठी माणसाचं इन जनरल माहिती नाही, पण मला स्वतःला कैकदा वाटलंय की कुठेही स्वतःचा काही व्यवसाय करावा. पण माझ्यात ती धडाडी नाही. जो व्यवसाय करायचा आहे निव्वळ तेवढेच स्किल्स असून फायदा नाही तर अर्थशास्त्रही समजायला हवं. मला एकंदरितच फायदा-तोटा, पैसा खेळवणे, वाढवणे, फिरवणे इ कोणत्याही गोष्टीत गतिच नाहीये. म्हणून माझे विचार नोकरी पर्यंतच.

पण तुमचा मुद्दा रास्त आहे. मला स्वतःला तरी कल्पना नाही इथेल्या मराठी उद्योजकांबद्दल. खरंच शोधायला हवं.

स्वतःचा स्टार्टअप असणार्‍यांना उद्योजक म्हणू शकतो का? मिपाकर नाटक्या यांनी रंगमंचबद्दलच्या मुलाखतीत सांगितलंय ना ते.
बे एरियामध्ये माझे कित्येक जण ओळखीतले आहेत - मराठी लोक आहेत - स्वतःची कंपनी सुरु करणारे- अगदीच एकटे नाही केली तर २-३ जणांत मिळून करतात. त्या सर्वांना मिपावर यायला वेळ मिळत नसावा कदाचित.

बाकी चर्चा खूप उपयुक्त आहे. मला काही नवीन मुद्दे मिळाले तर लिहीन.

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 9:00 am | पिलीयन रायडर

प्रतिसाद लिहीताना माझ्या डोक्यात अगदी तेच आले होते. पण मला नक्की कल्पना नाहीये त्यांच्या स्टार्टप बद्दल म्हणून लिहीलं नाही. २-३ जणांचा मिळून आहे इतकंच माहिती आहे.

मी मिपाची नवीन सदस्य... ही चर्चा वाचली आणि खूप आवडली...तुमच्यासारखंच भारतात परत जायचं की अमेरिकेत राहायचं, ही चर्चा आमच्या घरातही नित्यनेमाने घडते, पण फरक इतकाच की अजून मुले, शिक्षण या दिशेने विचार करायची गरज पडत नाहीये.
एच १ विसा आणि इमिग्रेशन रीफोर्म यावर सतत चालणाऱ्या चर्चा ऐकून आम्ही दोघेही आता विसा संपला की परत जायचं या विचारापर्यंत आलो आहोत. प्रत्यक्ष कृतीत आणायला अजून वेळ आहे. पण काहीही झालं तरी हा परका देश आहे आणि अगदी कायम रहिवासी स्टेटस मिळालं तरी आपल्या देशात राहिल्याचं फिलिंग येईल असं वाटत नाही आणि तोपर्यंत एक अनिश्चितता सतत वाटत राहील.
आपली मुळे एका मातीतून काढून दुसऱ्यात रुजवणं इतकं सोपं नसतं. इथे सगळ्या सोयी-सुविधा असल्या तरी आपलं असं काही वाटत नाही. आम्ही दोघेही माणसांमध्ये रमणारे आहोत त्यामुळे एकटेपणा जाणवतोच. इथेही मित्रपरिवार आहे, पण भारतात संबंधांमध्ये जी सहजता आणि मोकळीक असते, ती इथे जाणवत नाही. घरी आणि मराठी मंडळात सगळे सण साजरे होतात पण आपली नाती इथे नसल्यामुळे काहीतरी उणीव भासतच असते. मराठी मंडळात मी बरीच मुले बघते ज्यांचे आईवडील आपल्या संस्कृतीबद्दल मुलांना आपलेपणा वाटावा म्हणून प्रयत्नशील आणि आग्रही आहेत; प्रत्यक्षात मात्र मुलांना त्यात फारसा रस नसतो. ते तेवढ्यापुरतं काहीतरी करतात, पण ज्या गावाला जायचंच नाही, त्याचा पत्ता कशाला विचारा, असा गोंधळ त्यांचाही कधीतरी होतच असणार...
अशी पण काही घरं आहेत, जिथे मुले कॉलेजमध्ये आहेत, इतके वर्षं इथे राहिल्याने त्यांच्यावर इथल्या विचारसरणीचा प्रभाव जास्त आहे, खूप प्रक्टिकल आहेत. त्यांच्याशी जुळवून घेताना भारतीय मनाच्या आईबापांना थोडा त्रास होतोय. पण परत जावं म्हटलं तर आता मुले भारतात जुळवून घेऊ शकणार नाहीत. स्वत: जायचं तर आईवडीलाना गरज असताना वेळ देऊ शकलो नाही आणि आता मुलांच्या गरजेच्या वेळेस त्यांना कसं सोडून जावं, अशा मन:स्थितीत आहेत. थोडक्यात, प्रत्येक टप्प्यावरच्या भारतात वाढलेल्या पती-पत्नींना प्रश्न थोड्याफार प्रमाणात सारखेच पडले आहेत.
शिक्षणाचं म्हणलं तर इथलं निश्चित थोडं सरस आहे, पण भारतातली मुलंही प्रगती करतातच...कोणाशी कसं वागायचं, बोलायचं ते आपल्या अनुकरणातून शिकतच असतात. भारतातली परिस्थितीही बदलतेय. तुलना दोन्ही देशांची होऊच शकत नाही कारण त्यासाठी काहीतरी कॉमन ग्राउंड पाहिजे, दोन्ही देश सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या फारच वेगळे आहेत.
सतत इमिग्रेशन रिलेटेड प्रश्न, अनिश्चितता, भिन्न संस्कृतींचा गोंधळ आणि आपली माणसं सोबत नसणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता तरी २ वर्षांनी परत जायचं, हे ठरलंय...सध्या इथलं लाईफ एन्जॉय करतेय...पुढे काय होईल ते पुढचं पुढे बघूया...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2017 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणताही अ‍ॅटीट्यूड न ठेवता अगदी मनापासून लिहिलेला प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 7:16 am | पिलीयन रायडर

वाचतेय..

पिलियन रायडरजींना व्यनितून लिहिली होती पण त्यांनी सांगितले म्हणून चर्चेत जोडत आहे...

जिथे कुठे असाल तिथे आपली मूल्ये टिकविण्याचा व संक्रमित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चित करावा. "आपली संस्कृती" याचा अगदी सखोल विचार होऊ दे. पूजा पद्धती, उपास-तापास, सण-उत्सव हे सगळे त्याचा भाग आहेत पण अगदीच वरवर, ते सतत बदलतच आले आहेत आणि राहणार आहेत. त्या पलीकडे भारतीयत्व कशात आहे असा शोध घेतला तर ते जिथे असाल तिथे ते जपण्यास भक्कम हिम्मत येईल.

भारतात ते शोधणे नाही साधले तरी जपणे सहज होते कारण समाजाचे-नात्यांचे जाड आवरण नेहमी भोवती असते. इथे ती उब आपल्याला एक एक माणूस जोडून तयार करून घ्यावी लागते. खऱ्या नात्याची भरपाई करू शकेल अशी नाती इथे निर्माण करून मुलांना तो जिव्हाळा उपलब्ध करून देणे हे आपल्या पिढीचं दायित्व आहे. त्यानुसार आपल्या विचारात व वर्तनात खूप बदल करावा लागेल हे लक्षात येईल. शुद्ध आणि सात्विक प्रेम निर्माण होणे व त्यानुसार वर्तन घडणे झाले कि बऱ्याच गोष्टी परदेशात असूनही सोप्या होतात व तेव्हा "वसुधैव कुटुंबकम् जगणारी संस्कृती" काय आहे हे समजण्याचा प्रवास कदाचित सुरु होतो... भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ वगैरे तुलनाच का व्हावी हा प्रश्न पडतो. आई चे स्थान हे अढळ असते. ती दुसऱ्याच्या आईपेक्षा सुंदर आहे का श्रीमंत आहे हे सर्व अर्थहीन आहे असे मला वाटते.

असो... चर्चेचा परीघ थोडा रुंदावला तर अजून काही गोष्टींकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहू शकतो. थोड्या पलीकडल्या काळात स्थलांतरित झालेल्या भारतीयांची आजची पिढी कशी आहे हे पहिले तर ४-५ पिढयांपूर्वी स्थलांतरित झालेले भारतीय (फिजी, त्रिनिदाद, सुरिनाम - त्यातले काही आपल्याप्रमाणे तिथून अमेरिकेत आले त्यामुळे अधिक माहिती मिळू शकते आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये उत्तरेकडे त्यांची संख्या बरीच आहे) २-३ पिढ्यांपूर्वी संधीच्या शोधात स्थलांतरित झालेले भारतीय (इथे यातले भरपूर आहेत, तसेच इंग्लंड दुबई सिंगापुरातही बरेच असतील) आणि पहिल्या पिढीचे स्थलांतरित झालेले आपल्यासारखे , यात काय काय फरक आहेत हे संधी मिळाली तर जरूर पहा. त्यांचे आजचे वंशज कसे आहेत हे हि पहा. फार काही शिकावयास मिळू शकेल... तुमच्या तिथे भरपूर आहे अशांची लोकसंख्या. त्यांची भारत हि ना जन्मभूमी ना कर्मभूमी, पण धर्मभूमी जरूर आहे... हि नाळ जागरूक राहून जपली पाहिजे (अर्थात त्याचे महत्व असेल तर)

आणि हि जागरूकता नसेल तर माझ्या एका अमेरिकन मित्राचे वाक्य जसेच्या तसे भाषांतरित : "अरे असाल तुम्ही पी. आय. ओ. आज, आणि बाळगता भारतीयत्वाच्या खुणा, पण लिहून घे, आज पासून जास्तीत जास्त तिसरी पिढी... त्याच्या आधीच हे सर्व स्वतःच्या हाताने पुसून टाकाल... कारण तो ताण सहन होणार नाही. हा मेल्टिंग पॉट आहे आणि येथे आज ना उद्या सर्व इंटिग्रेट होणारच..."
पण त्याविरुद्ध भारतीय म्हणून आपल्याला "मेल्टिंग पॉट" पेक्षा "टॅको-सॅलड" प्रकारची संस्कृती हवी आहे, म्हणजेच, सर्व जण एकत्र राहू पण आपापले रंग, चव, गंध याचे वेगळेपण जपून राहू.

मार्गदर्शनाचा अधिकारी मी नाही, कदाचित मी लहानच असेन आपल्यापेक्षा. पण येथील काही द्रष्ट्या संस्था-व्यक्तींच्या कार्याने प्रभावित होऊन काही सांगावेसे वाटले ते हे... कुठे राहतो याला आजच्या युगात खरेच काही महत्व नाही... अमेरिकेला आणि भारतालाही ढीगभर नावं ठेवायला काही कष्ट लागणार नाहीयेत.. त्यानी कोरडे समर्थन होईलही कदाचित, पण खरा प्रश्न अमेरिकेत आत्ता आहोत, व पुढे राहिलो तर आपले एक भारतीय म्हणून सामाजिक दायित्व काय आहे हे ओळखून तसे होण्याचा प्रयत्न ठेवणे व आपल्या परीने मुले तशी घडविणे हा नक्की आहे. आणि तो भारतात व बाहेर दोन्हीकडे सारखाच चॅलेंजिंग आहे. (आणि त्यासाठी "एक भारतीय म्हणून..." असे जेव्हा उल्लेखतो तेव्हा "पासपोर्ट सरेंडर केल्यानंतरही जे जात नाही ते" - 'भारतीयत्व' नेमके काय आहे याचा शोध घेत राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे व तो प्रवास आपल्याला सतत नवे शिकवत राहणार आहे...)

श्रीरंग_जोशी's picture

18 Feb 2017 - 10:59 am | श्रीरंग_जोशी

वाह, काय विचार आहेत या विषयावर. खूप भावले.

या धाग्यासाठी धागाकर्तीचे अन एकाहून एक प्रतिसादांसाठी सर्व प्रतिसादकांचे आभार.

मी अमेरिकेत येऊन अनेक वर्षे लोटली. माझ्यासाठी शांतता, (बर्‍यापैकी) शुद्ध हवा, ट्रॅफिकमध्ये रोजचा अमुल्य वेळ न जाऊ देणे असे घटक जगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या कारणांमुळे इथे राहू लागल्यावर मी माझ्यातर्फे येथे स्थायिक होण्याचा निर्णय नैसर्गिक होते. आता अमेरिकन प्रशासनाने धोरण बदलल्यास अथवा माझ्या बाबतीत नकार दिल्यास माझ्या स्वतःच्या निर्णयाला काहीच अर्थ राहणार नाही ही गोष्ट वेगळी :-).

एकंदरित फार जास्त विचार करुन निर्णय घेण्याचे धोरण राबवू नये असे मला वाटते कारण फार कमी वेळा आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते. बहुतांश वेळी आपण परिस्थितीशी जुळवून घेत असतो. जुजबी विचार करुन निर्णय घ्यावा व भविष्यात जे घडेल त्याचा सामना करण्याची तयारी ठेवावी हेच उत्तम.

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2017 - 8:05 pm | पिलीयन रायडर

हा एक नितांत सुंदर व्यनि प्रतिसाद म्हणुन इथे दिल्याबद्दल आभारी आहे!

ट्रेड मार्क's picture

18 Feb 2017 - 11:55 pm | ट्रेड मार्क

सुंदर प्रतिसाद

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2017 - 8:59 pm | श्रीगुरुजी

आणि हि जागरूकता नसेल तर माझ्या एका अमेरिकन मित्राचे वाक्य जसेच्या तसे भाषांतरित : "अरे असाल तुम्ही पी. आय. ओ. आज, आणि बाळगता भारतीयत्वाच्या खुणा, पण लिहून घे, आज पासून जास्तीत जास्त तिसरी पिढी... त्याच्या आधीच हे सर्व स्वतःच्या हाताने पुसून टाकाल... कारण तो ताण सहन होणार नाही. हा मेल्टिंग पॉट आहे आणि येथे आज ना उद्या सर्व इंटिग्रेट होणारच..."

एका समाजशास्त्रज्ञाने लिहिलेल्या लेखात मी हेच वाचले होते. स्थलांतरितांची पहिली पिढी आपली मूळ संस्कृती जास्तीत जास्त ६०% टिकवून धरू शकते. दुसरी पिढी जेमतेम १०% मूळ संस्कृती टिकवू शकते. तिसर्‍या पिढीपासून हे प्रमाण जवळपास शून्य होते म्हणजेच तिसरी पिढी ही सर्वार्थाने नवीन देशाच्या संस्कृतीशी एकरूप झालेली असते.

अमेरिकेत माझ्या ओळखीचा एक ज्यू होता. त्याचे मूळ रशिया होते. सर्वात पहिल्यांदा त्याचा पणजोबा अमेरिकेत आला होता. हा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी. तो आयुष्यात कधीही रशियाला गेलेला नाही व कधी जाण्याची इच्छा देखील नाही. आपले मूळ काय होते हे शोधण्याची, समजून घेण्याची त्याला कणभरही उत्सुकता नव्हती. तो सिनेगॉगमध्ये सुद्धा कधी जात नव्हता.

असाच दुसरा एक रूमेनियन होता. तो देखील तिसर्‍या किंवा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी होता. तू कधी रूमेनियाला गेला होतास का असे विचारल्यावर तो कुत्सित हसून म्हणाला कशाकरता मी जाऊ तिथे? माझा रूमेनियाचा काय संबंध?

कोणी कितीही प्रयत्न केले तरी पुढच्या पिढीत आपली मूळ संस्कृती रुजवून टिकवून ठेवणे जवळपास अशक्य आहे.

अप्रतिम प्रतिसाद आहे ! हॅट्स ऑफ .. !!!

"एक भारतीय म्हणून..." असे जेव्हा उल्लेखतो तेव्हा "पासपोर्ट सरेंडर केल्यानंतरही जे जात नाही ते" - 'भारतीयत्व' नेमके काय आहे याचा शोध घेत राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे व तो प्रवास आपल्याला सतत नवे शिकवत राहणार आहे.

याचा विचार खरंच करायला हवा. प्रयत्न करुन ही अजुन हे पकडीत सापडलेलं नाही. सापडलं म्हणता म्हणता निसटुन जातं. कुठे एका ठिकाणी राहणं किंवा एकिकडे च राहणं हे आजच्या काळात शक्य नाही - निदान विकसनशील देशांत आणि त्या ही तुम्ही भारतीय असाल तर मुळीच नाही. अशा वेळी हे " भारतीयत्व" काय हे मनाशी पक्कं बिंबवून घेऊन जगभर फिरणं सोपं होईल पण ते काय हे मात्र सुस्पष्ट व्हायला हवं.

तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर अजुन एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट - जी वर स्नेहा ताईने पण अधोरेखित केली - ती म्हणजे हा निर्णय घेण्याचा चॉईस आहे आज आपल्याकडे ! भारतीय म्हणुन आपल्याला या बाबतीत कृतज्ञता वाटायला हवी. आज सिरियन्स कडे बघा, इराकी लोकांकडे बघा - बिचार्‍यांनी त्यांचं घरदार , देश, मुळं सोडली की हयातीत परत तिकडे जाण्याचा पर्याय त्यांना नाहीये. निदान कायमचं जाण्याचा तर नाहीच नाही. काही जणांची माणसं पण तिकडे आहेत. माझा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर एक गणिताचा प्राध्यापक होता इराक मध्ये. सगळं सोडून इकडे आला, पिझा प्लेस मध्ये काम केलं अजुन काही केलं आणि फायनली ड्रायव्हिंग शिकवायला लागला. तो ही एकदा जुन्या आठवणींनी हळवा झाला होता, तुम्ही लोकं लकी आहात म्हणे आधीच ईंग्रजी शिकुन येता, चांगल्या पगाराचे जॉब्ज मिळवता, हवं तर परत जाता. आम्हाला तो पर्याय च नाहीये म्हणे.

परत एकदा, नितांत सुंदर आणि " समर्पक" प्रतिसाद :)

चित्रगुप्त's picture

18 Feb 2017 - 12:54 pm | चित्रगुप्त

एकंदरित फार जास्त विचार करुन निर्णय घेण्याचे धोरण राबवू नये असे मला वाटते कारण फार कमी वेळा आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते.

असेच म्हणतो.

राघवेंद्र's picture

19 Feb 2017 - 6:36 am | राघवेंद्र

मस्त चालू आहे चर्चा. ( पिरातै चे कौतुक नवनवीन विषयावर चर्चात्मक धागे काढत आहे.)
माझ्या मते सध्या अमेरिकेत किंवा पुण्यात घर घेतले कि पुढील ५ वर्षे कुठे राहायचे हा प्रश्न निकाली निघतो ( EMI ) त्यामुळे ५ वर्षांनी बघू ....
आजचे समीकरण x = x +५

आमचा निर्णय २४ वर्षांपूर्वी असा ठरला की अमेरिकेत रहायचे. लग्न नुकतेच झाले होते. आम्ही दोघेही नागपूरचे. नोकरी पुण्यात लागली होती. घराची चणचण तेव्हाही होतीच. एका मित्राकडून कळले की अमेरिकेत बे-एरियाला जाण्याची संधी आहे. ओळखीचे कोणीच नव्हते. आम्ही तेव्हा विचार केला की जाऊन तर पाहू.
भारतीय लोक हळूहळू येत होते. सुरुवातीलाच समानवयी मित्र मिळाले आणि आम्ही एकमेकांना मदत करत राहीलो. एकदा भारतात - नागपूर आणि पुणे जाऊन आल्यावर इथे राहण्याचा बेत पक्काच केला. त्यानंतर ज्या अडचणी आल्या - घर, नोकरी, संस्कृती-मेळ त्या सगळ्यातून मार्ग काढला. आमच्या दोघांच्या घरून या निर्णयाचं स्वागतच झालं. आमच्या दोघांचेही आई-वडील आमच्याकडे बरेच वेळा राहून गेलेत. पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्हाला आमच्या आयुष्याचा मार्ग शोधण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं आणि आहे. आम्हा दोघांचंही एकमत होतं की परत जायचं झालं तर नागपुरातच जायचं अन्यथा नाही. पुणं छान आहे - पण त्याच्या जागी.

बर्याच लोकांनी या चर्चेत नोकरी / धंद्याबद्दल सांगितले आहेच. त्यात नवीन काही सांगण्यासारखे नाही मला.
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते मला की आम्ही कुटुंब म्हणून बर्याच गोष्टींचा बरोबर मिळून आनंद घेतला - ते मला असं वाटतं की भारतात कदाचित जमलं नसतं. पण भारतात राहणारे माझे मित्र, नातेवाईक हे त्यांच्या तऱ्हेने एंजॉय करतातच की. इथे आम्हाला आमच्या आई-वडिलांबरोबर छानच वेळ घालवता आला - त्यांना बऱ्याच ठिकाणी नेता आलं - त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस साजरे करता आले. अर्थात हे सगळेही भारतात होतेच.. मला वाटतं आम्ही त्यांना वेगळं काही दिलं.

शाळांबद्दल म्हणाल तर आम्ही शिक्षकांबरोबर नेहमीच संपर्क ठेवला. जिथे मुली कमी पडतात असे वाटले तिथे त्यांना मदत केली - माझे इतर मित्रही करतातच.

आता मुख्य विषय - संस्कृती - आपण आपल्या आई-वडिलाच्या वेळची संस्कृती पाळतो ? माझ्या आजोळी औदुंबराचं, वडाचं झाड होतं. तेव्हा आजोळी वेगळे उत्सव व्हायचे. माझ्या लहानपणी, आई-वडिलांकडे वेगळे उत्सव व्हायचे. त्यांनी आपल्या सोयीनुसार आमच्यावर संस्कार केले. काही संस्कार संघात जाऊन, गणपतीउत्सवात, वेगवेगळ्या देवळात जाऊन आम्ही उचलले. काही वाचनातून, टीव्ही, सिनेमे बघून झाले.
मला आश्चर्य वाटतंय की आजकालच्या काळात - जेव्हा इतक्या सोयी आहेत - तेव्हा नातेवाईक / संस्कृती हे मुलांपासून दूर जातील असं वाटावं ? माझी मोठी मुलगी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकते. ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात मराठी गाणी गाते तेव्हा ऐकून कुणी म्हणणार नाही की ही मुलगी मराठी नाही किंवा जन्मापासून परदेशात राहिलेली आहे. संस्कार ही पालकांची जबाबदारी आहे. याच गोष्टी आम्ही इतर भारतीय कुटुंबातूनही पाहतो. शिख समुदायाकडून आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यांनी त्यांची संस्कृती जपलेली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या पिढीपर्यंतही जपलेली आहे.

उलट मलातर म्हणायचे आहे की भारतात राहून मराठी संस्कृती जपली जातेय ? टीव्ही वरचे कार्यक्रम पहा .. किती इंग्रजी शब्द वापरले जातात .. तेव्हा संस्कृतीचा काही प्रश्न नसतो का ? मराठी शाळांत मुले जातात ? मराठी वाचतात ?
भारतीय संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. महाराष्ट्रीय .. काही शे वर्षे - ती आपल्या गतीने पुढे सरकेलच.
माझं असं मत आहे की आम्ही भारतीय, मराठी - अमेरिकन संस्कृतीत काही योगदान देतो आहोत - जे पुढच्या काही पिढीनंतर मान्यता पावेल. इथला इतिहास जेव्हा भविष्यात लिहिला जाईल तेव्हा या योगदानाला मान्यता द्यावीच लागेल.

विटेकर's picture

19 Feb 2017 - 2:51 pm | विटेकर

अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत !
तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे !
उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील?

सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही !

सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा.

बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या.
थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.

विटेकर's picture

19 Feb 2017 - 2:51 pm | विटेकर

अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत !
तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे !
उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील?

सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही !

सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा.

बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या.
थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.

विटेकर's picture

19 Feb 2017 - 2:51 pm | विटेकर

अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत !
तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे !
उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील?

सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही !

सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा.

बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या.
थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.

गवि's picture

19 Feb 2017 - 9:08 pm | गवि

कुडन्ट अॅग्री मोअर.

माहीत असलेले सर्व अमेरिकावासी अशीच कारणं शोधताना दिसतात. स्वतःचीच समजूत काढायला. ते परत येण्याची काडीची शक्यता नसते. फक्त एकीकडे परत न येण्याचं काहीतरी कारण शोधत राहतात.

आत्ता तर आलोय. क्ष इतके डॉलर शिलकीस टाकून परत जाऊ.

उफ्.. मुलांची शाळा स्थिरस्थावर, शिक्षणपद्धती चांगली.. त्यांचं शिक्षण होईस्तो राहू.

भारतात करप्शन, धूळ इ.इ आहे हे अॅडिशनल एव्हरग्रीन कारण.

ते कधीच परत येत नाहीत. फक्त दिल के बहेलाने के लिए गालिब, ये खयाल अच्छा है, म्हणत अक्षरशः उगीच जस्टिफिकेशन शोधतात.

मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग.

३०-४० उदाहरणं पाहिलीत. टिपिकल गिल्ट आणि कन्फ्युजन. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2017 - 9:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१००% सहमत.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 1:28 am | संदीप डांगे

+10000

गवि, अगदी अचूक निरीक्षण आणि थेट शब्दात मांडल्याचे आवडले.

आनंदयात्री's picture

20 Feb 2017 - 4:51 am | आनंदयात्री

>>मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग.

मुलगा अपत्य असेल तर काळ का म्हणे नाही बडगा दाखवत? किंवा पालक 'गेट अवे विथ एव्हरीथिंग' करू शकतात?

पिलीयन रायडर's picture

20 Feb 2017 - 5:48 am | पिलीयन रायडर

मला एक कळत नाही की ह्यातलं कोणतंही कारण महत्वाचं नाहीये का? पैसा मिळवणं ही लोकांची गरज किंवा चक्क स्वप्नं असू शकतं. अनेकांना देशाची कितीही ओढ असली तरी घरची परिस्थिती अशी असू शकते की पैसा मिळवणं क्रमप्राप्त आहे. त्यांना अमेरिकेची संधी मिळाली तर का बुवा त्यांनी म्हणू नये की अमुक एक रक्कम जमवुन जाऊ? किंवा इथल्या शाळेत आपल्या मुलांना जास्त चांगल्या पद्धतीने शिकायला मिळत असेल, तर भारतीय मानसिकतेचे पालक अगदी सहज मुलांसाठी हा निर्णय घेऊ शकतात.

अगदी प्रदुषण आणि धूळ हे ही तितके लहान कारण नाहीये. मी एक निव्वळ उदाहरण म्हणून सांगते, माझ्या नवर्‍याला कफाचा बराच त्रास होतो. पुण्यात ४५ मिनिटं बाईक चालवत जाणे ह्याने त्याची पाठदुखी आणि कफ दोन्ही वाढलाय. पण इथे येऊन तो त्रास खूपच कमी आहे. समजा एखाद्याला हा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्याच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहेच.

भारतात स्वच्छ हवा, प्रशस्त बंगला, आजुबाजुला झाडं, नितळ नद्या वगैरे मिळणं आता अशक्य आहे. ज्याला हे महत्वाचं वाटतं त्याने सगळ्या गोंधळातून अखेर ह्या मुद्द्यांखातर इथे रहायचं ठरवलं तर त्यात चूक काय? हे सगळे त्रास असूनही मला भारतात परत जायचंय, म्हणून मी ते मुद्दे मांडलेही नाहीते धाग्यात. पण म्हणून ज्या लोकांनी "स्वच्छ वातावरण" ह्या कारणासाठी अमेरिका निवडली त्यांना मी हिणवणार नाही.

ज्या देशात आपण २५-३० वर्ष राहिलो, जिथे आपले लोक आहे- परिवार आहे, ते सगळं कायमचं सोडून, नव्या देशात जम बसवण्याचा निर्णय घेणं सोपं काम नाही. दुसर्‍या देशातली सुबत्ता आणि त्याचा पुढच्या पिढीला होऊ शकणारा फायदा खुणावत असतो, तिकडे मन तर भारतातही गुंतलेलं असतं. अशावेळी ही घालमेल, अशी जस्टीफिकेशन्स मी समजु शकते. तुम्हाला हा सावळा गोंधळ वाटत असेल, नव्हे तो असतोच. पण लोक तो हेतुपुर्वक करत नसतात. प्रॅक्टीकल निर्णय घेणार्‍या माणसांना भावनाच नसतात असं नाही. आणि भारतात परत येणं हाच सर्वात मॉरली करेक्ट निर्णय असेल असंही नाही.

म्हणुनच माझी ओढ जरी भारताकडे असली तरी परत न येणार्‍यांना मी हिणवत नाही हे नक्की. तुमच्या प्रतिसादातून मात्र तसं होताना जाणवतंय. कारण काही कळालं नाही.

बाकी अपत्याबद्दलच्या मताबद्दलही असहमती आहेच. बडगा दिसतो वगैरे शब्दांनी सरसकट पुढच्या पिढीची वाटच लागते आणि पालकांना पश्चातापच होतो असा सूर लागलाय. जो फारच चुकीचा आहे. पद्धती आणि मुल्य बदलत असतील नव्या पिढीची.. पण अनेकांनी वर ह्याबद्दल अत्यंत सकारात्मक मतं मांडली आहेत. शेखर काळे ह्यांनी आपल्या मुलीचे उदाहरण दिले आहे. आमच्या घरात जुलै मध्ये लग्न होऊन येणारी मुलगी भारतीय वशांची पण अमेरिकन आहे. चांगल्या मुली आहेत ह्या. अनेक असतील अशा. असं असताना मुलगी अपत्य असेल तर... वगैरे विधानं तर अगदीच गैरलागु आहे.

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 10:34 am | संदीप डांगे

धूळ, पोलुशन, ट्राफिक, दगदग बद्दल सतत येणारे प्रतिसाद बघता फक्त मुंबई पुणे म्हणजे भारत असा काहीसा दृष्टिकोन दिसतोय...

वरील मुद्दे मला मुंबई च्या वास्तव्यात जाणवले तेव्हा मी नाशिकला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. सॉफ्टवेर इंडस्त्रीतल्या लोकांसाठी इथेही संधी आहेत, इथल्या कंपन्यांना चांगले टॅलेंट मिळत नाही कारण ते सर्व इथून निघून मुंबई पुण्यात जायला प्राधान्य देतात, कारणं देतात, पैसा, प्रतिष्ठा. इ इ.

स्वच्छ हवा, आजूबाजूला झाडे नितळ नद्या आहेत भारतात, फक्त पुण्यात-मुंबईत नाही मिळणार.

भारतात गर्दी आहेच, तो नाकारण्याचा मुद्दा नाही. पण जेव्हा देश म्हणतो आपण तेव्हा तो फक्त मोठ्या रस्त्यांवर, चौकातल्या ट्राफिक मध्येच दिसतो असं काही प्रतिसाद बघून जाणवलं .

रस्ते, धूळ, ट्राफिक, मुंबई, पुणे च्या बाहेर खूप मोठा देश आहे आपला. काही शहरं वाईट, काही खूप चांगली आहेत, कुठे संधी आहेत, कुठे शांतता सुख आहे.

दोन देशांची तुलना करायची तेव्हा दोन पाच सॅम्पल वरून बनवणे गैर तर आहेच तसेच अशी तुलनाच गैर आहे असे आता वाटायला लागलंय.

पिलीयन रायडर's picture

20 Feb 2017 - 10:47 am | पिलीयन रायडर

गैरच आहे. पण पर्यायच तेच आहेत.

दुसरं असं की "प्रामुख्याने" जे लोक अमेरिकेत जात आहेत ते आयटी क्षेत्रातले आहेत. ह्या क्षेत्राशी निगडीत नोकर्‍या भारतात "प्रामुख्याने" मेट्रो सिटी मध्ये आहेत. जिथे वर नमुद केलेले प्रश्न भेडसावतात. नाशिक बद्दल मला कल्पना नाही. पण ते ही एक मोठे शहरच आहे, लहान शांत गाव वगैरे नाही. आणि तसं तर आमच्या औरंगाबादमध्येही स्वतःची आयटी कंपनी असलेला (आणि ती इबेला विकणारा) एक मराठी माणुस आहेच. पण % किती अशा लोकांचा?

अमेरिकेतून परत येणारा माणुस परत येऊन शांत प्रदुषणविरहीत गावखेड्यात रहाण्याचं प्रमाण किती असेल? सध्या असलेल्या स्किलसेटसोबत ही अमेरिकेतल्या कंपन्यांमधुन परतलेली माणसं नक्की तिथे काय करणार? बहुतांश लोकांचं जे होतं त्यावरच चर्चा होणार ना डांगेअण्णा! ह्यात मुद्दाम पुणे मुंबईपुरतीच चर्चा व्हावी असा हेतू नाही.

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 11:14 am | संदीप डांगे

वैयक्तिक निर्णयामागे वैयक्तिक कारणे असतात व ती मान्यच. त्यातही कोणता वाद नाही. पण बहुतेक गिल्ट लपवण्यासाठी जी जस्टीफिकेशन दिली जात आहेत काही प्रतिसादांतून त्यामुळे भारताचे वैट्ट देश असे काहीसे सरसकट चित्र उभे करण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय, तो होऊ नये म्हणून वरील प्रतिसाद दिलाय. वैयक्तिक लोभापायी देशाला नावे ठेवणं अजिबात पटत नाही.

"इथे कशाला परत यायचं, काय आहे इथे" असली विचारसरणी वाल्याना (तुम्ही नाही) सांगू इच्छितो की इतर कोणत्याही देशांत कुठेही तुमच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहिला की हाच देश तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे कायम. एवढी जाणीव असली तरी पुरे. मला इथे काही जिंगोईजम मिरवायचा नाहीये बस एक सत्य समोर ठेवायचे आहे. अशी लोकं तिथले प्रॉब्लेम्स अजिबात उघड करत नाहीत पण इथले मात्र चढाओढीने चर्वत असतात असे निरीक्षण आहे, वरून देशभक्तीचा फुरकाही येताजाता मारत असतात... अशांसाठी माझा प्रतिसाद होता. असो. विषय अजून भटकू नये म्हणून थांबतो.

मला एक कळत नाही की ह्यातलं कोणतंही कारण महत्वाचं नाहीये का? पैसा मिळवणं ही लोकांची गरज किंवा चक्क स्वप्नं असू शकतं. अनेकांना देशाची कितीही ओढ असली तरी घरची परिस्थिती अशी असू शकते की पैसा मिळवणं क्रमप्राप्त आहे. त्यांना अमेरिकेची संधी मिळाली तर का बुवा त्यांनी म्हणू नये की अमुक एक रक्कम जमवुन जाऊ?

अवश्य म्हणावं. आपण आपल्या आयुष्याचे मालक. आपण कोणत्याही अपेक्षा, टार्गेट्स ठेवावीत.

इथे मुद्दा इतकाच की या परत येण्याची जोरदार इच्छा असलेल्या लोकांतले ९९% लोक टार्गेट्स/ रक्कम/ कर्जफेड/ शिक्षण / ठरलेली वर्षे इ.इ. पूर्ण झाली तरी परत येतच नाहीत. नवनवी कारणरुपी ध्येयं निर्माण करुन उद्यावर ढकलतात परत येणं.

तिथे कायम राहण्यामागे खरी कारणं उदा. तिथलं स्वातंत्र्य, सासरच्या कटकटींतून सुटका, समाजाच्या भोचक टेहेळणीपासून दूर मुक्त मनाने राहता येणं, व्यावसायिक आणि अभ्रष्ट कार्यपद्धती, मुख्य म्हणजे समृद्ध राहणीमान(पैसा आलाच त्यात) वगैरे अशी अनेक असतात. पण प्रामाणिकपणे ते मान्य करुन पक्का निर्णय करण्याऐवजी भारताकडे वळून एक पाय परतीकडे ठेवायचा अन कुचमत राहायचं असं चित्र मेजॉरिटीमधे दिसतं.
बोलताना सतत भारतात जायचंय, जाणार, आय मिस इंडिया अशा आशयाचं केवळ उल्लेखत मात्र राहायचं पण वीसतीस वर्षं परत यायचं नाही हे हरकत घेण्याजोगं नसलं तरी ती आत्मवंचना वाटते इतकंच.

मराठी_माणूस's picture

20 Feb 2017 - 12:27 pm | मराठी_माणूस

नेमके.

अभिदेश's picture

21 Feb 2017 - 9:37 pm | अभिदेश

हेच मी आधीच्या प्रतिसादात मांडले तर पीरबाईना ते वैयक्तिक वाटले...

मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग.
अमान्य आहे. हे असं बोलणंही बरोबर नाही. जे पालक मुलांना व मुलींनाही एक चांगला नागरिक बनवण्यासाठी झटत असतात त्यांचा विचार करता हे बोलणे टाळलेले बरे. इथे आजूबाजूला शेकड्याने भारतीय लोक आहेत ज्यांची मुले, ज्यात मुलीही आल्याच व्यवस्थितपणे वाढतायत. बडगा कसाला हो? भारतात मुलगे आणि मुली काय कमी बडगे दाखवतात का? एकदा डॉ. खरे यांचे लेख वाचलेत किंवा त्यांना विचारलेत तरी समजेल. माझा मुलगा इथे वाढवताना त्याने कसेही वागलेले मी चालवून घेईन का? तर नाही. तुम्ही असे बोलताना पुन्हा विचार केलेला बरा. तुम्ही भारतात राहता, आता तुमच्या अपत्याने कसेही वागले तर चालेल का?? लोकांच्या मुलांच्याबाबतीत बोलताना विचार करा. उलट परिस्थिती आहे. भारतात मुलगे हवं ते करून पळून जाऊ शकतात पण इथे डि एन ए टेस्ट करून ज्याच्या जबाबदार्‍या त्याच्या गळ्यात घातल्याशिवाय कोणी गप्प बसत नाही. भारतात मुलींवर झालेले अन्याय, अत्याचार लपवण्याकडे कल अजूनही आहे तितकासा इथे माझ्या पाहण्यात नाही. मुलींना भारतापेक्षा जास्त कायद्याचा आधार आहे. तुमचे विचार योग्य शब्दात मांडू शकता तसेच अनुभव लिहू शकता पण अश्याप्रकारे आमच्या मुलामुलींबाबत सरसकटपणे लिहिलेले मान्य नाही. तुमच्याकडे आमच्याबाबत पुरावा असल्यास द्या!

१. स्वतःच्या बारातेरा वर्षांच्या मुलीने पियर प्रेशरने कॅज्युअल फ्री सेक्स करणं.. हे शुद्ध तुपातल्या देसी आईवडिलांना चालणं.
किंवा
२. आजूबाजूला सर्वजण ते करत असताना तिला भारतीय संस्कृतीचा वास्ता देऊन संस्कारीपणे दूर ठेवणं आणि तथाकथित पण तिच्या बाबतीततरी सत्य असा न्यूनगंड / एलियन असल्याची जाणीव निर्माण होऊ देणं..

असे दोन ऑप्शन्सच उपलब्ध असल्याचं याविषयीच्या स्टडीजमधून वाचलं आहे.

यापैकी कोणताही ऑप्शन मुलीसाठी योग्य वाटत असल्यास समस्त अमेरिकावासीय पालकांची हात जोडून माफी. डिफेन्स आणि स्वतःला समजावणं अमेरिकन पालकांकडून शिकावं.

असो. यापुढे नाही बोलणार.

या ज्या स्टडीज असतात ना ते " हे प्रमाण वाढलं आहे" हे दाखवतात, सरसकट सगळे तसेच वागतात असं सांगत नाहीत. मी पहिल्या प्रतिसादापासून तेच सांगायचा प्रयत्न करते आहे की नीतीमुल्यं कुणाची ही वेगवेगळी नसतात. कुणी ही १२-१३ वर्षाच्या मुलीला सेफ असो वा आदरवाईज, सेक्स साठी परवानगी देणार नाही अगदी अमेरिकन पालक पण नाहीत , भारतीय वंशाचे तर नाहीच नाही. आणि असं काही पीअर प्रेशर नसतं, ते तुमच्या संगतीवर अवलंबुन असतं आणि शाळेत दिलं जाणारं सेक्स एजुकेशन बघता त्या वयाच्या मुलांना आपण काही तरी चूकीचं म्हणा किंवा नंतर अवदसा ओढवून घेणारं करतोय याची जाणीव नक्कीच असते. आणि ती तीव्रतेने होतेच. त्यांचं घरचं वातावरण, मित्र मैत्रिणी असे नाना घटक त्यात असतात - आणि हेच सगळं आपल्याकडे ही असतं. जगाच्या पाठीवर कुठे ही गेला तरी माणूस सारखाच. अशा स्टडीज भारताच्या बाबतीत पण असतात - उद्या कुणी निर्भया केस वरुन इथे स्त्रियांचं आयुष्य धोक्यात आहे अशी स्टडी केली तर?

तुमच्या प्रतिसादाला उद्देशुन हे बोलायची वेळ आली असती असं वाटलं नव्हतं पण हा धागा निघाल्यापासून जे बोलायचं टाळते आहे ते हे की " भारतीय संस्कृती महान, त्यांच्याकडे फक्त पैसा आणि साधन संपत्ती " हा भारतीयांनी करुन घेतलेला गोंडस गैरसमज आहे - अहंकार कुरवळायला बरं पडतं मग ! त्या देशांनी जे करुन दाखवलंय त्यासाठी प्रचंड प्रमाणात सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती लागते. आपला देश साफ राहिला पाहिजे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे हे तिथल्या प्रत्येकाला मनापासून वाटलं आणि आज ४ पिढ्या झाल्या तरी ते लोकं ती मुल्यं मनापासून जपतात. गेल्या काही वर्षात आपली निम्मी सामाजिक इच्छाशक्ती कामाला लागलीये तर घडणारे बदल ठसठशीत पणे दिसायला लाग्ले आहेत. शेवटी मुल्यं - व्हॅल्युज म्हणजे वेगळं काय असतं? राजकीय नेते पण त्याच जनतेमधुन येतात त्यामुळे आपल्याकडच्या भ्रष्टाचाराचं उत्तरदायित्व, मुलं जर खोटं बोलून बाहेर बॉफे / गफे ला नुसतं भेटायला जात असतील, आम्ही आमच्या बॉफे. गफे ला भेटायला जातोय हे मोकळेपणाने ते घरी सांगू शकत नसतील तर पालक म्हणुन उत्तरदायित्व आपल्याकडेच येतं. यात तमाम भारतीय पब्लिक आलं - बाहेर राहणारं, देशात राहणारं. आपण हे कधी समजून घेणार की नीतीमुल्यं ही तुमच्या दैनंदीन जीवनात सचोटीने जगणे यापेक्षा फार काही मोठी किंवा वेगळी नसतात. रेवाक्का म्हणते तसं काही वेडं वाकडं झालं तर त्या मुलीला देणार आहे का आपला देश/ समाज थारा? आपल्याकडचा सोशल स्टिग्मा तिला जिणं नकोसं करेल आणि त्याचा परिणाम त्या अर्भकावर होणार - समाज म्हणुन आपली जबाबदारी नाही? समाजातल्या प्रत्येक घटकाला - अगदी बाहेरून आलेल्याला पण - एका ठराविक सन्मानाने जगता येईल अशा प्रकारची जीवनशैली ऑफर करण्याची ताकद त्या देशांमध्ये आहे - आपण आपल्या महान संस्कृतीमध्ये आपल्याच लोकांना तो सन्मान जेंव्हा देऊ तेंव्हाच यातुन बाहेर येऊ.