इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ.
इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे आपणा सर्वांना माहित आहेच. एक शिया व दुसरा सुन्नी. यातील सुन्नीधर्मात अनेक अतिरेकी उप पंथाची उत्पत्ती झाली ज्याने हा पंथ सध्या जगात बदनाम झाला आहे त्यातीलच एक म्हणजे वहाबी पंथ. बऱ्याच जणांना असे वाटते की व हल्ली जगात जे इस्लामी अतिरेकाचे वारे वहात आहे ते या नवीन काळातील उत्पत्ती आहे पण वहाबींनी पहिली कत्तल केली ती सुन्नी पंथियांची आणि ती सुद्धा शेकडो वर्षापूर्वी. ही कत्तल झाली सौदी अरेबियामधे. सौदी अरेबियाच्या इतिहासाचा अभ्यास केला म्हणजे शिया व सुन्नी मुस्लिमांचे हत्याकांड वहाबींनी कसे घडवून आणले याचा उलगडा होईल व आत्ता जो वहाबी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे त्याचा उगम कुठे आहे हेही समजेल.
इस्लामच्या शिकवणीचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून व सौद घराण्याच्या आश्रयाखाली या पंथाने आत्तापर्यंत नुसता तगच धरला नाही तर जगभर आपले हातपाय पसरले. ते कसे तेही आपण पाहणार आहोत. वहाबी जे स्वत:ला सलाफी समजतात त्यांचे तत्वज्ञान सोपे व सुटसुटीत आहे. ज्यांची मते त्यांच्याशी जुळत नाही ते त्यांचे शत्रू होतात व त्यांचा नायनाट करणे हे त्यांचे आपोआप कर्तव्यच होते. इस्लाममधील इतर पंथियांचा या वहाबींना पाठिंबा आहे का ? सुन्नीचा हा उपपंथ असलातरी हे दोन्ही एकच आहेत का ? म्हणजे जे सुन्नी नाहीत ते तर वहाबी नाहीतच हे स्पष्ट आहे पण जे वहाबी नाहीत पण सुन्नी आहेत त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक आहे ? कोण आहेत हे लोक ?
वहाबी :
हे स्वत:ला खरे सुन्नी समजतात. एखाद्या वहाबीला ‘तू सुन्नी आहेस का?’ असे विचारल्यास तो अभिमानाने सांगेल की ‘होय मी सुन्नी आहे’’ पण एखाद्या सुन्नीला ‘तू वहाबी आहेस का ?’ असे विचारल्यास त्याचे उत्तर ठामपणे नकारार्थी येऊ शकते. ठामपणे म्हणण्याचे कारण आहे कारण ते तो स्वत:चा अपमान समजतात. वहाबींच्या तत्वज्ञानास त्यांची बिलकुल मान्यता नाही. वहाबी म्हणजे मुहम्मद इब्न अब्दुल वहाब यांची शिकवण पाळणारा. हे इस्लाम धर्माचे दोन प्रमुख स्त्रोत, कुरआन व सुन्नाह दुय्यम मानतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात असेही खऱ्या सुन्नींचे म्हणणे आहे. किंवा जरी या दोन गोष्टींना ते मानत असले तरी ते या वरील माणसाने, त्यांचा अर्थ जो लावला आहे त्यानुसार त्यांचे वागणे असते. हे जे अर्थ लावले गेले त्याचा काळ होता १७००. या माणसाच्या अनुयायांना ओळखण्यासाठी इतर सुन्नी त्यांना वहाबी या नावाने ओळखतात.
स्वत: वहाबी इतर सुन्नींपासून आपण वेगळे आहोत हे सांगण्यासाठी स्वत:ला सलाफी समजतात किंवा तसे सांगतात तरी. सलाफीमधील सलाफ हा शब्द हा तसा ऐतिहासिक आहे म्हणजे प्रेषितांच्या काळातील. सलाफ हे एका काळाचे नाव आहे. प्रेषिताने मक्केतून मदिनेला स्थलांतर (हिजरत) केले तो काळ होता ६२२. त्यानंतरच्या ३०० वर्षांच्या काळास सलाफ या नावाने संबोधले जाते. या हिजरतच्या वेळी प्रेषिताची ज्यांनी साथ दिली (साहबा) ते, या साथिदारांच्या मागे जे गेले (ताबिईन) ते, आणि यांच्या मागे जे गेले (ताबा अल् ताबिईन) हे सर्व लोक आदर्श मुसलमान किंवा इस्लामचे खरे पाईक समजले जातात कारण खुद्द प्रेषिताने यांच्याबद्दल कौतुकोद्गांर काढले आहेत. प्रत्येक सच्चा मुसलमानाचे प्रेषिताच्या या पाठिराख्यांच्या पावलावर पाऊल टाकून धर्माचे पालन करणे हे ध्येय असते. जेव्हा वहाबी आम्ही सलाफी आहोत असे म्हणतात तेव्हा ते हे सांगत असतात की ते त्या तिनशे वर्षातील प्रेषिताच्याबरोबर हिजरत करणाऱ्या त्याच्या साथीदारांइतकेच सच्चे मुसलमान आहेत. जे अर्थातच खोटे आहे...
सनातनी सुन्नी मुस्लिमांना असे वाटते की तेच सलाफींचे खरे पाईक आहेत कारण त्यावेळी जे काही झाले ते ज्ञानी लोकांनी पद्धतशीरपणे पुढच्या पिढीत पोहोचवले आहे, जे जगभरच्या मुस्लिमांमधे प्रसारित झाले आहे, प्रचारित झाले आहे. ही जी अखंड प्रक्रिया अनेक शतके चालली होती त्याचेच सध्याचे रुप म्हणजे तत्वमिमांसाचे चार मार्ग. हनाफी, शाफिई, मालिकी व हानाबली.
हे वहाबी स्वत:ला सलाफी म्हणवतात परंतु मोठ्या युक्तिने सामान्य मुसलमानांना प्रेषिताच्या वचनांचे वेडेवाकडे अर्थ लावून त्यांना मुर्ख बनवून वहाबी पंथात ओढतात. ते म्हणतात, ‘तुम्ही सलाफच्या काळातील मुसलमानांचे अनुकरण केले पाहिजे.’ पण ते एवढेच म्हणून थांबत नाहीत. ते पुढे काय म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, ‘म्हणून तुम्ही सलाफींचाच मार्ग अनुसरला पाहिजे. तुम्ही दुसरा कुठलाही मार्ग अनुसरला तर तो मार्ग सलाफच्या काळातील मुस्लिमांनी जो मार्ग अनुसरला, तो नसेल.’ असे शाब्दिक खेळ करीत ते या जनतेला गोंधळवून टाकतात. यामुळे सर्वसामान्य मुसलमान वहाबी हे सलाफींचे, म्हणजे सनातनी इस्लामचे खरे प्रतिनिधी समजू लागतात. ( सलाफ आणि सलाफी हे शब्द सारखेच असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो). अर्थात कोणी त्यांच्या शाब्दिक खेळापलिकडे जाऊन इस्लामचा अभ्यास केला तर त्यांना हे सहज समजेल की सलाफी-वहाबी यांची शिकवण व कर्तृत्व हे सलाफ काळातील मुसलमांनांच्या बरोबर विरुद्ध आहे. जे धार्मिक सुन्नी मुसलमान सलाफच्या काळात अस्तित्वात होते त्यांचा आणि वहाबींचा तसा कसलाही संबंध नाही.
वहाबींची अशी ठाम समजूत आहे की गेले १००० वर्षे सुन्नी हे चुकीच्या मार्गाने चालले आहेत आणि सलाफनंतर त्यांनी मुसलमानांचे अज्ञान (जाहिलिय्या) दूर करण्याचा कसलाही प्रयत्न केलेला नाही. जरी या पृथ्वीतलावर सुन्नी उम्मा बहुमतात आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला असला तरीही, किंवा कितीही शक्तिमान असला तरीही यांचा धर्म हा मुळ तत्वापासून फारकत घेतलेला आहे. अल्पसंख्यांक सलाफींच्या दृष्टिकोनातून हे जग प्रेषितनिंदकांनी भरलेले आहे व या जगावर सुधारणावादी लोकांचे राज्य चालते ज्यांना मुळ, खऱ्या सनातनी इस्लाम धर्मात सुधारणा करायच्या आहेत्, जे धर्माविरुद्ध आहे.
वहाबी आणि सलाफींमधे ही विविध वैचारिक प्रवाह आहेत. काही जहाल आहेत तर काही अतिजहाल. यांच्यात जे काही फरक आहेत ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे जे मार्ग आहेत त्यातील फरकामुळे. इथेही तीच गंमत आहे. सर्व वहाबी सलाफी असतात पण सर्व सलाफी वहाबी नसतात. इजिप्तचा सय्यद कुत्ब हाही एक सलाफीच आहे ज्याला सलाफ काळातील इस्लाम जिवनपद्धतींचे पुनुर्जिवन करायचे आहे म्हणा किंवा त्याच्या भाषेत त्यांचे अज्ञान दूर करुन त्यांना खरा इस्लाम शिकवायचा आहे. इस्लाम परत मुळपदावर आणायचा आहे. पण सलाफी असो किंवा वहाबी असो या दोन्ही पंथातील लोकांचे पुढील एका बाबतीत एकमत आहे. मुहम्मद इब्न अब्दुल वहाब व अहमद इब्न तयमिह्य या दोन माणसांनी जो इस्लामचा जहाल अर्थ लावला आहे त्यामुळे इस्लाममधे क्रान्ती येऊ घातली आहे. जरी सलाफी व वहाबींचे मार्ग वेगळे असले तरी त्यांचे वर उल्लेख केलेले ध्येय, हिंसक किंवा अहिंसक मार्गाने गाठण्यासाठी ते एकमेकांचे सहाय्य घेतात. उदा. सलाफींचा प्रभाव असलेल्या देवबंदी व वहाबींची एकजूट किंवा मुस्लिम ब्रदरहुडला सौदीच्या वहाबींनी नासरविरुद्ध केलेली मदत. सौदीने ब्रदरहुडच्या जहालमतवादी व अतिरेक्यांना त्यांच्या देशात आसरा दिला होता. वहाबी व सलाफींमधील सहकार्य इराणच्या क्रांतीनंतर अजूनच वाढीस लागले ते आजपर्यंत. अफगाणिस्थान मधे सलाफी व वहाबी कम्युनिस्टांविरुद्ध एकत्रच लढत होते. आज जे जहाल अतिरेकी तयार होत आहेत ते या सलाफी-वहाबी यांनी लावलेल्या इस्लामच्या अर्थामुळे. बोस्निया, अल्बेनिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, उझबेकिस्तान, इंग्लंड, मलेशिया, साऊथ आफ्रिका, लबनॉन, अफगाणिस्थान, हिंदूस्थान अशा सर्व देशात त्यांची पाळेमुळे घट्ट झाली आहेत.
वहाबींनी खवारीज जमातीच्या चालिरितींचे पुनुरज्जिवन केले व त्यांचे विरोधक हे त्यांचे मोठे पाप समजतात. खवारिज, खलिफा ओस्मानच्या काळात हो़ऊन गेले व प्रेषित मोहम्मद यांच्या अगदी जवळचे साथीदार होते. हे इस्लाम धर्मातील सगळ्यात जुने अतिरेकी म्हटलेत तरी चालेल. त्या काळात मोहम्मदाचा जावई अलिने खलिफापदासाठी दमास्कसचा राज्यपाल मुआवियाची बाजू घेतली. (खरे म्हणजे फक्त मध्यस्ती करण्याची तयारी दाखविली) या त्याच्या विश्र्वासघाताने चिडून जाऊन त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केले. त्यांनी अलि आणि मुआविया या दोघांनाही धर्मद्रोही, इश्वरनिंदक ठरविले व त्यांच्या विरुद्ध तलवार उपसली. त्यांचे म्हणणे होते, ‘या बाबतीत कुराणालाच शेवटचा अधिकार आहे. दुसऱ्या कोणालाच नाही.’ १२०१ साली मृत्यु पावलेल्या एका इब्न-अल्-जावझी नावाच्या इस्लामच्या अभ्यासकाने यांच्या बद्दल लिहिले आहे, ‘धुल्-खुवेसिरा अल्-तामिमी हा इस्लामचा पहिली खवारिज होता आणि त्याने एकच मोठी चूक केली ती म्हणजे त्याने स्वत:चे समाधान स्वत:च्याच मतांनी करुन घेतले. तो थोडावेळ थांबला असता तर त्याला हे कळून चुकले असते की अल्लाबद्दल प्रेषिताची मते ही सर्वश्रेष्ठ आहेत.’ अजून एक सुन्नी व्यासंगी आहेत, त्यांनी खवारिजींनी केलेल्या दहा हजार मुस्लिमांच्या कत्तलिवर लिहिले आहे. खवारिजींची एक शाखा आझारिकांबद्दल ते म्हणतात, "या जमातीचा किंवा पंथाचा पुढारी होता नफि इब्न अल् अझ्राक. हा बानू हनिफा या जमातीचा होता. तीच जमात ज्यात मुसेलिमाने (प्रेषिताचा तोतया) जन्म घेतला होता. यानेच प्रेषित महोम्मदाबरोबर आपणही प्रेषित आहोत असा दावा केला होता. ज्याप्रमाणे खवारिज, अलि आणि मुआवियांवर धर्मनिंदकांचा आरोप करीत त्याच प्रमाणे वहाबी आता सुन्नी व शियांवर तसले आरोप करतात.
या खवारिजांची तत्वे तरी काय आहेत ते बघुया म्हणजे जिहादींमधे ही तत्वे कुठून आली हे आपल्याला सहजपणे कळेल.
१ जो घोर पाप करतो तो इस्लाम धर्मामधून बहिष्कृत होतो. त्याचा काफिर समजून त्याचा कायमच धिक्कार केला जाईल
२ अलि, ओस्मान्, तल्हा, अल्-झुबेर, अलिशा व इब्न अब्बास व त्यांच्या बरोबरचे इतर सर्व मुसलमान हे काफिर आहेत व त्यांचा धिक्कार असो.
३ काफिरांच्या संततीची पण तीच अवस्था होईल
४ अल्ला एखाद्या प्रेषिताला पाठवेल पण त्याच्या हातून एखादे घोर पाप घडेल व तो काफिर होईल
५ लहान मुले व स्त्रियांना ठार मारण्याची परवानगी दिली गेली आहे.
६ अझारिकांच्या बंडात सामिल न होणारे काफिर समजले जातील
७ इत्यादि...इत्यादि...
वहाबी पंथाचा स्ंस्थापक व सौद घराणे.
याचे पूर्ण नाव होते महोम्मद इब्न अब्दुल वहाब. जन्म १७०३ व मृत्यु १७९२, सौदी अरेबियामधे. अंदाज येण्यासाठी सांगतो पानिपत झाले १७६१ साली. म्हणजे पानिपतचे युद्ध झाले तेव्हा हा अठ्ठावन्न वर्षाचा होता. हा नसता तर सौद घराण्याची सत्ता ना पसरली असती ना अनेक देवता पुजणाऱ्यांविरुद्ध जिहादच्या लाटा उसळल्या असत्या. कसे होते यांचे नाते ?
महोम्मद वहाबीची गाठ पडण्याआधी सौद हे नज्द प्रांतातील अनेक सामान्य जमातीसारखे शेतकरी, व्यापारी होते. खजूर, व घोड्यांचा किरकोळ व्यापार यावर ते आपली गुजराण करीत. जेव्हा त्यांची ताकद वाढे तेव्हा ते मोहिमेवर निघत व जेव्हा ती कमी होई तेव्हा ते स्वत:ला शेती/व्यापारात गुंतवून घेत. साम्राज्य वैगरे उभे करायचे त्यांच्या स्वप्नातही नव्हते पण ते त्यांना हा गुरु भेटेपर्यंत.
अल् सौद पूर्वारेबियातील नज्दमधील अद् दरिया नावाच्या गावात रहात असत. हे गाव सध्याच्या सौदी अरेबियाच्या राजधानीजवळ आहे. सौद-इब्न-मुहम्मदचे पूर्वज या भागात केव्हातरी स्थायिक झाले. त्यांच्याबद्दलही विशेष माहिती उपलब्ध नाही. हे शेती करीत व हळु हळु त्यांची संख्या वाढून त्यांचे एका टोळीत रुपांतर झाले. ते हे सौदी घराणे.
मुहम्मद – इब्न – अब्दुल – वहाब दक्षिण नज्दमधे उयाईना नावाच्या मरुउद्यानात रहात असे. तो बानू तामीम जमातीचा होता. त्याचे घराणे धार्मिक वृत्तीचे असून त्याने त्याचे मुळ गाव इस्लामच्या अभ्यासासाठी सोडले व तो मक्केला आला. पुढे त्याने मदिना, इराक, इराण इत्यादी देशांना भेटी देऊन अनेक धर्मगुरुंच्या हाताखाली इस्लामचा खोल अभ्यास केला. जेव्हा तो परत आपल्या गावी आला व त्याने त्याच्या बुद्धीनुसार इस्लामवर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्यात तो त्याची सुन्नींविरुद्ध जहाल, प्रतिगामी मते मांडत असे.
सनातनी सुन्नी पंथाचा व्यासंग करणारे जमील एफेंडी याच्याबद्दल लिहिताना म्हणतात, ‘‘वहाबचे दोन शिक्षक ज्यांनी त्याला इस्लाम शिकविला ते म्हणतात, तो वाममार्गाला लागणार ही अल्लाची इच्छा आहे पण सगळ्यात जास्त हाल त्याच्या मागे जाणाऱ्यांचे होणार आहेत’’ या मदिनेला रहाणाऱ्या शिक्षकांची नावे होती ‘शेखमुहम्मद इब्न सुलेमान अल् कुर्दी व शेख मुहम्मद हयात अल् सिंदी. एवढेच नाही तर मुहम्मद वहाबच्या खुद्द वडिलांनी त्याला ओळखले होते व सुन्नींना त्याच्याबद्दल इशारा दिला होता. त्याचा सख्खा भाऊ सुलेमान इब्न अब्दुल वहाब याने एका पुस्तकात मुहम्मद वहाबची निर्भत्सना केली होती. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘अल्ख़्वाइक् अल् इलाहिय्याफि अल्-रद्द अला अल्-वहाबिया.’ त्या काळात अनेक सुन्नी व्यासंगी धर्मगुरुंनी मुहम्मद वहाबची निर्भत्सना केली होती. विशेषत: त्याने जी मते त्याच्या ‘किताब अत्-ताविद या पुस्तकातून मांडली त्याबद्दल. हे पुस्तक वहाबींमधे बरेच लोकप्रिय आहे असे म्हणतात पण सुन्नी पंथाच्या तज्ञांमते त्यात कुठल्याच दृष्टिकोनातून काहीही दम नाही...
ज्या माणसाचा प्रभाव मुहम्मद वहाबवर पडला त्याबद्दलही लिहायलाच लागणार. याचे नाव होते अहमद-इब्न-तयमिय्ह. मुहम्मद वहाबच्या आधी दोनशे एक वर्षे हा होऊन गेला. (१२६३-१३२८). मुहम्मद वहाब यालाच आपला आदर्श मानायचा. त्याने सुन्नींवर केलेली निर्दय टिका तशीच्या वहाबने तशीच्या तशी स्वीकारली. बदल केलाच असेल तर ती अधिकच जहाल केली. त्याची पंथ (अकिदा) आणि पुजे (इबादत) संबंधित जी मते होती त्यामुळे हे व्यक्तिमत्व इस्लाममधे विवादास्पद ठरले असे म्हणायला हरकत नाही. या माणसाबद्दल चांगली व वाईट अशी दोन्ही प्रकारची मते ऐकू येतात. जे बंडखोर होते त्यांनी याचे कौतुक केले आहे तर सनातनी सुन्नी धर्मियांनी याला जवळजवळ काफिर म्हणून जाहीर केले. सुन्नी जगतात याला विरोध झाला याला मुख्य कारणे म्हणजे त्याची खालील मते ...
१ त्याने अल्लाला गुणविशेष चिकटविले त्यामुळे त्याने अल्लाला माणसासारखे मानले.
२ त्याने तलाकला व इस्लामच्या अभ्यासकांना केलेला विरोध
३ निर्माण झालेले विश्व अल्लाबरोबरच जन्माला आले आहे.
४ सनातनी सुन्नींच्या तवस्सूलला विरोध. तवस्सूल म्हणजे अल्लाकडे कशाची तरी मागणी त्याच्या प्रेषिताकडून करणे.
५ प्रार्थना सोडून प्रेषिताला भेटण्यास जाणे हे चूक आहे.
६ नरकातील यातना चिरंतर नसतात.
७ अल्लालाही काही हद्द आहे जी त्यालाच माहिती आहे.
८ अल्ला हा सिंहासनावर बसला आहे व त्याने त्याच्या शेजारी प्रेषितासाठी जागा रिकामी सोडली आहे.
९ प्रेषित मुहम्मदाच्या थडग्याला वंदनासाठी हत लावणे हे अनेकश्र्वरावाद आहे.
१० प्रेषिताच्या थडग्यासमोर अल्लाने आपले भले करावे अशी प्रार्थना करणे हे निंदनीय आहे.
११ व अशी इतर अनेक मते....
या बंडाखोर मतांपासून मुसलमान जगताला दूर ठेवण्यात सुन्नींचा यश मिळत होते पण त्याची मते गुप्तपणे अभ्यासली जात होती व ती वेगाने पसरतही होती.
एक सुन्नी अभ्यासक म्हणतो, ‘ इब्न तयमिय्हची जमात जेद्दावरुन आलेल्या एका धनाड्य व्यापाऱ्यामुळे लोप पावता पावता वाचली. या व्यापाऱ्याने इब्न तयमिय्हचे मिनहाज-अल्-सुन्ना-अल् नबाविया नावाचे एक पुस्तक इजिप्तमधे छापण्यासाठी पुष्कळ अर्थसहाय्य पुरविले. इजिप्तच्या मुफ्तिने, मुहम्मद बाखित अल् मुटिने या बाबतीत आपले मत व्यक्त केले, ‘हा विवाद (फितना) संपुष्टात येत असताना ज्याने तो परत पेटविला त्याला अल्लाचा शाप लागो.’
गंमत म्हणजे जरी वहाबींची व तयमिय्हची बरीच मते जुळत असली तरी काही बाबतीत त्यांचे मतभेद तीव्र आहेत. उदा तयमिय्ह सुफी पंथाला इस्लामची मन्यता आहे असे सुचवितात तर वहाबी सुफि पंथ हा इस्लामचे निंदनीय विकृतीकरण आहे असे मानतात.
इब्न तयमिय्ह, इस्लाम मधील बंडखोर जे क्रांतीला साद घालतात त्यांचा आदर्श असतो. उदा. १९८१ साली सादतची हत्या झाल्यावर तयमिय्हचीच वचने तोंडावर फेकण्यात येत होती व सौदी घराण्याची सत्ता उलथविण्यासाठीही बंडखोरांनी १९९० साली यांच्याच वचनांचा आधार घेतला होता. सादतच्या खुनामधे भाग घेतलेल्या चार बंडखोरांपैकी तिघांनी तयमिय्हची पुस्तके वाचली होती असे म्हणतात. (अब्द अल् सलाम फराज़ ) इब्न तयमिय्ह सलाफ़ी अतिरेक्यांचा (मुस्लिम ब्रदरहुड) लाडका आहे म्हणजे त्यांच्या सर्व कृत्यांना त्याच्या शिकवणीत त्यांना उत्तर सापडते.
इस्लाम धर्मियांविरुद्ध निघालेला पहिली जिहादचा फतवा...
१२५८ मधे जेव्हा मंगोल खान महम्मुद गझनने अबासैद साम्राज्यावर आक्रमण केले व लुटालुट चालू केली. १३०३ मधे मामुल्क सुलतानाने तयमिय्हला जिहादचा फतवा काढण्याचा हुकुम केला. एका मुसलमानाने दुसऱ्या मुसलमानाविरुद्ध जिहादचा फतवा मागायचा हे त्या काळात एवढे सोपे नव्हते. पण तो दिला गेला. खरे तर महम्मुद गझनने १२९५ साली इस्लाम धर्म स्वीकारला होता. हे मंगोल इस्लाम धर्मीय होते पण ते मंगोलियन 'यासा' कायदाही पाळायचे. म्हणजेच त्यांचे इस्लामीकरण अजून पूर्ण झाले नव्हते. या यासामुळेच ते जिहादचे शिकार झाले. या महमुद गझानला वहाबी आणि सलाफी अजुनही काफिरच मानतात. पण सुन्नी मात्र महमुद गझान एक सच्चा मुसलमान असल्याचे मानतात. शेख कबानी लिहितात, ‘गझन खान खरे तर एक कट्टर इस्लामधर्मिय होता. अल् दहाबीच्या मते त्याने सुफी पंथाच्या शेख साद्र अलादिन अबू अल् मजामी इब्राहीम अल् जुवायनी यांजकडून इस्लामची दिक्षा घेतली होती. त्याने त्याच्या वंशावळीत सगळ्यात पहिल्यांदा प्रेषिताचे नाव लिहिले होते व दरबारात इस्लामी वेषभुषा चालू केली.'
मुहम्मद इब्न अब्दुल वहाबने या तयमिय्हच्या पावलावर पाऊल टाकून अरेबियामधे लाखो मुसलमानांची कत्तल केली.
या तयमिय्हला चार सुन्नी न्यायाधिशांनी हि. ७२६ मधे तुरुंगात डांबले होते. यासाठी त्याने इस्लामचा जो नवीन अर्थ लावण्याचा कारभार केला होता त्याचे कारण दिले गेले. हे चारही न्यायाधीश इस्लामच्या चार तत्वज्ञाचे व्यासंगी होते. याचाच अर्थ तयमिय्हने हे चारीही मार्ग सोडून काहीतरी वेगळाच मार्ग पत्करला होता. त्याला या प्रकरणात गुंतवले गेले होते असे वहाबींचे म्हणणे आहे पण तसा काही पुरावा आढळत नाही. या चार न्यायाधिशांची नावे पाहिल्यावर तसे काही झाले असेल असे वाटत नाही.
१ क्वादी मुहम्मद इब्न इब्राहीम जामा अश्शफी
२ क्वादी मुहम्मद इब्न अल् हारिरी अल् अन्सारी अल् हनाफी
३ क्वादी मुहम्मद इब्न अबिबक्र अल् मलिकी
४ क्वादी अहमद इब्न ओमर अल् मक्दिसी अल् हानबली.
ज्या इतर सुन्नी धर्मगुरुंनी/ अभ्यासकांनी तयमिय्य्हवर मुळ धर्माशी फारकत घेतल्याबद्दल टिका केली आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे –
ताकि उद् दिन अस् सब्की, फकि मुहम्म्द इब्न ओमर इब्न मक्की, हाफिज सलाहुद्दीन अल् अलाई, क्वादी मुफासिर बद्रुद्दीन इब्न जामा, शेख अहमद इब्न याह्या अल् किलाबी अल् हलाबी, हाफिज इब्न दाकी अल् इद, क्वादी कमालुद्दीन अझ् झमालकानी, क्ख़्दी सैफिउद्दीन अल् हिंदी, इत्यादि...इ..
आता सलाफी वहाबी यांच्या वैचारिक धारणेचा उगम कुठे आहे ते आपण पाहिले. पुढच्या भागात त्याचा प्रसार सौद घराण्याने कसा केला व त्याने दोघांचाही फायदा कसा झाला हे आपण पाहणार आहोत.. या असल्या वैचारिक बंडखोरीचा इतर धर्मामधे जनतेला फायदा झाला पण येथे मात्र तोटा. असे का झाले हे समजण्यासाठी पुढे आपल्याला कुराण, जात्यांध मुसलमान, मुस्लिम ब्रदरहुड, अल् कायदा व इसिस..... यांचा इतिहास तपासावा लागेल...... पण त्याही अगोदर करबला येथे प्रेषित महंमदानंतर जे हत्याकांड घडले, का घडले, शिया सुन्नी हे दोन पंथ कसे तयार झाले हे पहावे लागेल..
येथपर्यंत झुबेर क्वामार यांच्या लेखावर व इतर माहितीवर आधारित....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
13 Dec 2015 - 6:00 pm | पैसा
हा सगळा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. पण वाचल्याशिवाय सुटका नाही. सर्वांनीच नीट अभ्यास करावा. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
13 Dec 2015 - 6:20 pm | यशोधरा
उत्तम लेख. पुढील लेखाची वाट बघते.
बाकीचे बोहरा, सूफी ह्याबद्दलही लिहिणार का? हे पंथच आहेत का?
13 Dec 2015 - 8:23 pm | मारवा
बाकीचे बोहरा, सूफी ह्याबद्दलही लिहिणार का? हे पंथच आहेत का?
बोहरा या पंथाविषयी थोडी माहीती आहे. दाउदी बोहरा हे साधारण शांतताप्रीय व्यापारी प्रवृत्तीचा समाज आहे. हे मुख्यतः हार्डवेअर व पेंट च्या व्यवसायात प्रामुख्याने आढळुन येतात. हा समाज अत्यंत सधन असा आहे. संख्येने फारच छोटा इतर पंथाच्या तुलनेत असा आहे. यांच्या वेगळ्या मशिदी असतात. यांचे धर्मगुरु हा एक रोचक प्रकार आहे. यांच्या दुकानात एका शुभ्र दाढीधारी वृद्ध गुरुचा फोटो आढळतो. तो म्हणजे सय्यदना. या गुरुचा संपुर्ण दाउदी बोहरा समाजावर एकछत्री अंमल चालत असतो. वंशपरंपरेने हा हक्क दिलेला आहे. यात धार्मिक गुलामगिरीचे उच्चांक आहेत. सय्यदना याने स्वत:ला या पृथ्वीवरील मी ईश्वर आहे मला सर्व शक्ती प्राप्त आहेत मी कुणालाही आन्सरेबल नाही.इ.इ. आणी एक नियम बनवला ज्या अंतर्गत प्रत्येक बोहराने (स्त्रीपुरुषबालक) स्वतःला अब्द-ए-सय्यदना सय्यदना चा मी गुलाम आहे असे म्हणवुन घ्यावे आणि त्याच्या समोर सज्दा ए उबुदियात परफॉर्म केलीच पाहीजे इ. एक शपथ विधी कंपलसरी केला गेलेला आहे प्रत्येक बोहरासाठी त्यात अनेकोनेक बंधने आहेत जी एखाद्या गुलामीपेक्षा कमी नाहीत. त्यात सय्दनाच्या पायाचे चुंबन घेणे इ.इ. अनेक भयंकर प्रकार आहेत. यात स्त्रीयांवरील बंधनेही भीषण स्वरुपाची आहेत.
मात्र या सर्वांविरोधात एक याच समाजाचे थोर सुधारक डॉ. असगर अली इंजीनीयर यांनी एक मोठा लढा एक दिर्घ संघर्ष या सय्यदना कुटुंबाविरोधात चालवला. त्याचा परीणाम चांगलाच झाला.
सय्यदना कुटुंब असगर अली इंजीनीयर आणि दाउदी बोहरा समाज एक मोठा विषय आहे तसा.
त्यांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले.
मात्र तरीही मी या संपुर्ण समाजाविषयी सरसकटीकरण टाळतो. ते चुकीचे होइल कारण त्यातच इंजीनीयर सारखी लोक आहेत.
13 Dec 2015 - 7:03 pm | आरोह
तुम्ही इस्लाम चा अभ्यास केलाय का? कसल्याही प्रकारचा चुकीचा अर्थ लावला जात नाही.जे तेथे आहे ते घडत आहे,घडवले जात आहे. "चुकीचा अर्थ लावला जात आहे..." असे म्हणून आपण मनाची समजूत घालून घेतो बस
14 Dec 2015 - 1:25 am | अत्रुप्त आत्मा
@
>> +++१११
===============================================
जयंतकाका,
तुम्हाला इस्लाम माहिती आहे की नाही? असा प्रश्न न विचारता..मी मला दिसलेल्या काही चुका (आपल्याला इस्लाम कदाचीत माहित नाही..असे नम्रपणे गृहीत धरून) प्रथम इथे मांडतो..ज्या मांडण,अश्या लेखनाच्या संदर्भात अत्यावश्यक आहे..
@इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ. >> हे असं शीर्षक तुम्ही सदर लेखाची गरज म्हणून दिलेलं आहे की काय? असा प्रश्न मला पडला. कारण इस्लामच्या आभ्यासात ज्यानी प्रे.मुहम्मदाचं चरित्र वाचलं अथवा अभ्यासलं असेल..,त्याच्या दृष्टीनी ही मुदलातलीच महत् चूक होते. यामुळे प्रथम दर्शनी असं ध्वनीत होत आहे,की हा सदर पंथ तोच काय तो या दहशतवादाचे मुळ आहे..बाकि इस्लाम तसा नाही. मुळात गंमत अशी आहे की दहशतवादाचे मुळ...मुळ असे जे आपण म्हणतो,तेच कुराणच्या मूलभूत तत्वांमधे आहे. कुराणाचं (म्हणजेच अल्लाहाचं) बेसिक म्हणणं एकच आहे. या जगाच्या सुरवातीपासून एकच देव आणि धर्म होता..तो म्हणजे अल्लाहानी दिलेला इस्लाम. प्रेषित मुहंम्मदांना अल्लाने पाठवायच्या आधी जे जे धर्म होते ते एक प्रकारचा अशुद्ध इस्लाम होते..म्हणजे अल्लाहनी तो जगाच्या प्रथम दिवसापासून निरनिराळ्या प्रेषितांमार्फत पाठविला,पण पुढे पुढे त्यांच्या त्यांच्या अनुयायांनी तो स्वतःच्या मनानी भर घालून किंवा कमी करून अशुद्ध केला/भ्रष्ट केला. त्यामुळे याची फेड म्हणून आता तो परिपूर्ण शुद्ध स्वरूपात अल्लाहनी प्र.मुह्म्मदांकडे जिब्राइल या देवदूतां मार्फत कुराणाच्या स्वरूपात पाठवलेला आहे. तोच खराखुरा आणी मूलभूत इस्लाम आहे. याची अजून एक परिणिती म्हणजे हाच इस्लाम मूळचा विशुद्ध असल्यामुळे...हा प्रेषितंही अखेरचा आहे..कुराण/इस्लाम सारं काही अखेरचं आहे.. यापुढे जे जे धर्म/प्रेषित येतील त्या इस्लामच्या भ्रष्ट नकला असतील. म्हणजे प्रेषिता आधीचेही सर्व धर्म खोटे ..नंतरचेही खोटे.. प्रेषित मुहंम्मद आणि कुराण व त्यातील इस्लाम हाच काय तो एकमेव सत्यधर्म. बाकी सब झूट और मक्कारी धोखा..! (सदर सर्व तत्वज्ञान कुराणात निरनिराळ्या काळात आयातींमधे(श्लोकांमधे) आलेलं आहे. माझ्या मनच नव्हे हां. __/\__ ) आता इस्लाम हाच एकमेव सत्यधर्म असल्यामुळे अल्लाहानी तो धर्म सर्व मानवजातीकरता पाठवलेला आहे,ज्याच्या प्रसाराची जबाबदारी प्रथम प्रेषितावर होती(जी त्याने चोखपणे बजावली) व नंतर त्याच्या अनुयायांवर(म्हणजेच सर्व मुस्लिमांवर ) आहे. कसा करायचा धर्म प्रसार..तर अल्लाहनी प्रेषिताकडून करवून घेतला तसा. गैरैस्लामिक प्रदेशात आपल्या समाजाची ताकद कमी असताना(जशी प्रथम प्रे.मुहंमदांची मक्केत असताना होती..) इतर धर्मांवर टीका टीप्पाणी करायची . ते खोटे आहेत..(आणि इस्लाम खरा आहे..)हे युक्तिवादांच्या माध्यमातून भाषणा/लेखनातून सांगायचे..हा लेखणी व वाणीने करावयाचा जिहाद झाला. पुढे या प्रचारानी बिगरमुस्लिम सत्यधर्मात(इस्लामधे) येऊन संख्याबळ आणि राजकीयबळा नुसार ताकद वाढली,की इतर बिगरमुस्लिम जनता..जी इस्लामपासून (कोणत्याही कारणानी..)लांब आहे..हा जो तिच्यावर असलेला मूलभूत अन्याय आहे..तो दूर करण्यासाठी तलवार(शस्त्र) वापरायची. (जिहाद-बा-सैफ) ( ही स्टॅटेजी प्रे.मुहंमद जेंव्हा हिजरत करून मदिनेत गेले,त्यानंतर तिथे आवश्यक बळ निर्माण झाल्यावर अल्लाहाच्या मार्गदर्शनानीच त्यांच्याहातून सुरु झालेली होती..)
तर वाणी/लेखणीने ते शस्त्र वापरून बिगरमुस्लिमांना इस्लाममधे आणायचं...हा जो प्रवास आहे.. हे आहे खर्या इस्लामचं बीज. याच्यासभोवती किंवा याच्या जिवावर बाकिचं इस्लामी धर्मशास्त्र उभं आहे. आता तुम्ही आम्ही असं म्हणू, "की बाकिचे सर्व धर्म खोटे आहेत असं कशावरून???" तर अल्लाहचं आणि पर्यायानी इस्लामचं उत्तर असं आहे,की "तसं कुराणात अल्लाहनी सांगितलेलं आहे म्हणून!" आपण म्हणू की "काय ही बळजबरी?(दहशतवाद?) तुमचा अल्लाह काही माणसांच्या बाबतीत न्याय/अन्याय असा विचार करतो की नाही?" इस्लामचं उत्तर असं आहे की "न्याय/अन्याय नावाची अशी कोणती स्वतंत्र गोष्ट जगात अस्तित्वात आहे बरे? अल्लाहानी जो कुराणात इस्लाम धर्म सांगून ..,केलेला आहे तोच न्याय आहे." ("तुम्ही तुमच्या,म्हणजे मानवांच्या स्वतःच्या बुद्धिनी विचार करून असं ठरवता कसं? की हा न्याय आणि तो अन्याय..म्हणून!? अल्लाह करतो तोच न्याय असतो,आणि तो विनाअट विनातक्रार मान्य करायचा असतो..म्हणजेच तुम्ही मुसलमान व्हायचे असते.)
(पुन्हा सांगतो की ही माझ्या मनची मांडणी नाही हां.. __/\__ हवं तर कोणत्याही मौलवी किंवा इस्लामी पंडीताला ही मांडणी दाखवा..तो आनंदानी मान डोलावल्या शिवाय रहाणार नाही.मी स्वतः देखिल याचा अनुभव घेतलेला आहे. )
ही इस्लामची जी मध्यवर्ती भूमिका आहे...ती उघडपणे बाकिच्या सर्व मानव जातीला "काफिर" असं म्हणून,, "तुम्ही मुस्लिम झाला नाहीत तर जगण्यास अपात्र आहात!" असं समजून त्यांना जिवे मारायला उठणारी, भूमिका आहे. तीच पुढे इस्लाममधल्या अनुयायांनी ..पंथांनी गटांनी हुषारीनी एकमेकाविरुद्ध वापरून घेतलेली आहे. म्हणून लेखाचे शीर्षक इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ. असे न करता इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- मुळचा दहशतवाद (किंवा मूल-भूत दहशतवाद.) असे केले..तरच ते अन्वर्थक होइल. एव्हढ्या अभ्यासू आणि उत्तम लेखनात ही मूलभूत त्रुटी राहू नये..असं मला नम्रपणे वाटतं. _/\_
==========================================================
आता पुढे तुम्ही जे (खारीजींच्या संदर्भातलं..) एक वाक्य दिलेलं आहेत..ते पारिभाषिक आहे...त्याचा वाचकांना जो सामान्य अर्थ लागतो.. त्यानी त्या धर्माचा चुकिचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोच होत असतो. अश्या पद्धतीच्या लेखनात हे टाळले गेले पाहिजे..असे मला वाटते.
@१ जो घोर पाप करतो तो इस्लाम धर्मामधून बहिष्कृत होतो. त्याचा काफिर समजून त्याचा कायमच धिक्कार केला जाईल>>> आता हे घोर पाप म्हणजे काय? हे स्पष्ट होत नाही..आपण सामान्य मनुष्य बुद्धिनी जे ठरवतो..ते घोर पाप इथे अपेक्षित नाहीये. तर इस्लामनुसार या घोर पापांच्या यादीत जी जी कर्म येतात ती अश्या वाक्यांच्या संदर्भात घोर पापे असतात. आपण म्हणू "शत्रूशी लढाई केल्यानंतर तिथलं धन लुटणं,स्त्रीयांची अब्रू लुटणं ही घोरं पाप आहेत"..पण इस्लाम(धर्मशास्त्रा)नुसार "हे पुण्य आहे,आणि हा सैनिकांचा लढाई मोबदला आहे." (मध्यंतरी इसीसवाले की कोणतातरी एक इस्लामीगट अश्याच प्रकारे शत्रूप्रदेशातील स्त्रिया उपभोग्य मानत आणि तसे वागत होता..)
माझ्या एकंदरीत म्हणण्याचा आशय असा...की आधी मूळधर्म काय काय म्हणतो? तो कसा आहे? हे पाहिलं पाहिजे..नाहितर फार मोठी गल्लत होऊन बसेल..
आता लहान तोंडी बराच मोठ्ठा घास घेतलेला आहे.. त्यामुळे त्याबद्दल एकदा क्षमस्व म्हणतो,आणि थांबतो. :)
14 Dec 2015 - 7:10 am | जयंत कुलकर्णी
///असे का झाले हे समजण्यासाठी पुढे आपल्याला कुराण, जात्यांध मुसलमान, मुस्लिम ब्रदरहुड, अल् कायदा व इसिस..... यांचा इतिहास तपासावा लागेल...... ///
तुम्ही म्हणता तसा अर्थ ध्वनित होतोय खरा..... म्हणूनच शेवटी हे वाक्य लिहिले होते.
उरला प्रश्न माझ्या कुराणाच्या अभ्यासाबद्दल. त्याबद्दल माझी मते त्या काळाच्या अनुषंगाने बनली आहेत हे अधिच कबुल करतो. म्हणजे आपण स्वतः त्या काळात आहोत असे समजून ती बनविली आहेत...
14 Dec 2015 - 7:43 am | अत्रुप्त आत्मा
ओक्के .,
पुभाप्र.
14 Dec 2015 - 1:22 pm | आरोह
आत्मबन्ध यांच्याशी सहमत
14 Dec 2015 - 5:12 pm | वेल्लाभट
याबद्दल मी जे थोडंफार वाचलंय ऐकलंय ते हेच.
14 Dec 2015 - 7:20 pm | पैसा
बुवा, मी काय म्हणते जरा वाट बघूया ना! जयंत कुलकर्णी नक्की या सगळ्याचा उहापोह करतीलच. सध्या आपल्याला त्यांच्या अभ्यासामुळे ही एवढी माहिती तयार मिळते आहे, खरं ना!
आता वहाबी सौदी मधे आहेत, तिथला तेलाचा पैसा, आंतरराष्ट्रीय राजकारण असे बरेच पैलू हळूहळू समोर येतील. ज्यांचा अभ्यास आहे तेही त्याबद्दल बोलतील.
ही मालिका मिपाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल हे नक्की!
14 Dec 2015 - 7:42 pm | अत्रुप्त आत्मा
@बुवा, मी काय म्हणते जरा वाट बघूया ना! >> वाट बघायला मी पण तयारच बसलेलो आहे.फक्त काही मुद्दे हे वर्तमान पाहता आणि अश्या अभ्यासाची गरज पाहता जिथल्या तिथे स्पष्ट असणं,अत्यंतिक गरजेचं आहे. एव्हढच माझं आवाहन..आणि म्हणणं.
15 Dec 2015 - 4:15 am | पुष्करिणी
़जिहाद, करार आणि हिजरत (बहुतेक हा बरोबर शब्द आहे) हे ३ पर्याय आहेत.असलेल्या पॉवर नुसार
हे पर्याय वापरायचे.
मक्का आणि मदिना या दोन ठिकाणी वापरलेली कंसेप्ट्स , प्रिंसिपल्स एक्मेकांपासून फार वेगळी आहेत.
15 Dec 2015 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा
@प्रिंसिपल्स एक्मेकांपासून फार वेगळी आहेत. >> चूक. ती अनुक्रमे एकमेकामागची आहेत...वेगवेगळी नाहीत..किंबहुना प्रेषित जीवनाची क्रमवारीच या टप्प्यांनी संपन्न झाली आहे..म्हणूनच तो नंतर लिखित झालेल्या इस्लामी धर्मशास्त्राचा भाग आहे. (जो तुम्ही उधृत करत आहात.) जिहादाचे तीन टप्पे..कराराच्या दोन पातळ्या..आणि हिजरत परिस्थिती सापेक्ष. हअसे त्याचे वेगवेगळे वर्गीकरण करता येइल,हवे तर!
15 Dec 2015 - 1:09 pm | पुष्करिणी
मला म्हणायचं होतं की जेव्हा लढाई ़ जिंकली तेंव्हा संगितलेली तत्वे आणि जेंव्हा तह करायची वेळ आली
तेंव्हा चे दाखले तात्विक दृष्ट्या वेगळे आहेत.
तुम्ही म्हण्ता तशी ती पूरक तत्वच आहेत ... नॉट एस्क्लुझिव्ह ऑफ इच अदर
म्ह्ण्जे 'पीस' हे तत्व तहाच्या / मायनॉरिटी वेळ्च तत्व थोडक्यात. ..जेते / ं मेजॉरिटी असतानाचं नाही.
अत्यंत लढाउ आणि क्रूर शिंटो जपानची ओळ्ख शांतताप्रिय बौद्ध जपान म्हणून जपानी पिढीला करून देउन
त्यांच्या अंगवळ्णी पाडण्यात येते तर इस्लाम म्हण्जे शांतता आणि फक्त शांतता हेही होउ शकतं नजिकच्या भविष्यात
15 Dec 2015 - 6:05 pm | भंकस बाबा
फारच सुंदर मांडले आहे तुम्ही. संग्रही ठेवण्याजोगा धागा.
13 Dec 2015 - 7:07 pm | पैठणकर
अत्युतम लेख,
आज वर इतक्या सखोल माहीतीपुर्ण लेख वाचनात आला नाही.
मातृभाषेत असल्या मुळे समजायलाही सोप्पी आहे.
शुभेच्छा
13 Dec 2015 - 7:13 pm | आरोह
इस्लामचा अभ्यास च्या ऐवजी कुराण चा अभ्यास वाचावे
13 Dec 2015 - 7:28 pm | संदीप डांगे
छान लेख. मिपावर षड्डू ठोकून वाद घालणार्यांनी नक्की संग्रही ठेवावा असा...
13 Dec 2015 - 8:59 pm | तिमा
सामान्य माणूस सहसा इतक्या खोलवर विचार करत नाही. साप दिसला की तो विषारी की बिनविषारी याचा विचार करायला वेळ नसतो. इथे साप हा शब्द अतिरेक्यांना उद्देशून लिहिला आहे. उगाच गैरसमज नको.
13 Dec 2015 - 11:59 pm | विशाखा पाटील
लेख अतिशय उत्तम आहे.
फक्त आधी शिया पंथाच्या उगमाबद्दल लिहायला हवे होते, असे वाटले. कारण वहाबी पंथाचा उगम हा शिया पंथीयांच्या विरोधातूनही झाला आहे. सुफी आणि शिया या दोन पंथांमुळे इस्लामचे मूळ रूप हरवलेय, असा प्रचार महम्मद बिन अब्दल वहाबनी केला. त्या काळात या भागात प्रबळ असणाऱ्या अल रशीद टोळीला शह देण्यासाठी अल सौद टोळीने हा पंथ स्विकारला. अल सौद टोळीने सत्ता मिळवण्यासाठी धर्माचा केलेला हा उपयोग...
- इथे थोडा गोंधळ वाटतोये. मुअविय्या आणि अली यांच्यात शत्रुत्व होतं. म्हणूनच कराबलाची लढाई झाली आणि त्यातून शिया पंथाचा उगम झाला.
14 Dec 2015 - 1:26 am | अत्रुप्त आत्मा
@मुअविय्या आणि अली यांच्यात शत्रुत्व होतं. म्हणूनच कराबलाची लढाई झाली आणि त्यातून शिया पंथाचा उगम झाला. >>> +++१११
14 Dec 2015 - 7:11 am | जयंत कुलकर्णी
// - इथे थोडा गोंधळ वाटतोये. मुअविय्या आणि अली यांच्यात शत्रुत्व होतं. म्हणूनच कराबलाची लढाई झाली आणि त्यातून शिया पंथाचा उगम झाला. ////
ते नंतर.
14 Dec 2015 - 7:20 am | श्रीरंग_जोशी
एका महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
14 Dec 2015 - 7:49 am | अजया
माहितीपूर्ण लेख.पुभाप्र
14 Dec 2015 - 8:30 am | प्रचेतस
लेखन आवडले.
मूळात ह्या विषयावर मराठीत उपलब्ध असलेले साहित्य खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्ही हा इतिहास मराठीतून आणत आहात हे प्रशंसनीय आहे.
काही ठिकाणी तारखांच्या ढोबळ चुका झालेल्या आहेत त्या टाळता आल्या असत्या उदा.
तयमिय्ह मुहम्मद वहाबच्या आधी दोनशे एक वर्षे हा होऊन गेला. (१२६३-१३२८). पण वहाब हा १८ व्या शतकातला असे वरच आले आहे.
14 Dec 2015 - 10:31 am | प्रसाद१९७१
जयंत साहेब - तुमचा लेख उतम च आहे आणी अभ्यास पण दिसतोच आहे. पण..
एकुणच लेखाची मांडणी अशी झाली आहे की वहाबी लोकांमुळे इस्लाम बदनाम आणी दहशत्वादी झाला आहे. हे वहाबी नसते तर इस्लाम म्हणजे थोरच ( असे तुम्ही स्पष्ट लिहीले नाहीये पण तसे वाटते ).
हीच टीपीकल प्रपोगंडा स्टाईल नेहमीच वापरात आली आहे. कोणी बाँम्ब फोडुन निरपराध लोकांना मारले की लगेच पेपर ला कॉमेंट येतात की "हे दहशत्वादी खरे मुसलमान नाहीतच"
ही नुस्ती वेगवेगळी रुपे आहेत भुलवणारी कधी कट्टरपंथीयांना, कधी नेमस्तांना, कधी दुसर्या धर्मातल्या सेक्युलरांना.
14 Dec 2015 - 11:07 am | अत्रुप्त आत्मा
@
:- +++१११
आत्ता अमीर खान सुद्धा त्याच्या पत्नीकथना"मुळे घडणाय्रा चर्चानमध्ये अशीच वक्तव्य करतो आहे, कि मूळ इस्लाम तसा नाहीये वगैरे..
मग त्याच्या सारख्यानां आपण विचारलं कि "तुम्ही खय्रा इस्लामिक लोकांनी या दहशतवाद्यां विरोधात फतवा का नाही काढला, कि हे सगळे गैरैस्लामीक झाले आहेत म्हणून!?" तर याला हे लोक काहीच उत्तर देत नाहीत. असगर अली इंजिनियरना एका परिसंवादात आम्ही हाच प्रश्न विचारल्यावर त्यांची भयंकर चिडचीड झालेली होती.
गेल्या काही वर्षामधील भारतातला एक बदल असाही आहे..कि बाकीचेही धर्मावले हीच भाषा बोलायला लागले आहेत.. "मूळ धर्म चान चान आहे,अनुयायी तो घाण करतात" सगळ्याच धर्मांच्या मूळ ग्रंथात अन्याय शोषण विषमता आहेत.(कारण धर्म हे प्रथम पासूनच सामाजिक घटीत असतात.) आणी पुरावे देऊन पकडल ,की हातघाइवर येतात.. किंवा टवाळी उडवून भ्याडपणे पळून जातात.
14 Dec 2015 - 11:20 am | प्रसाद१९७१
हे मान्य, पण कमीतकमी बाकीच्या धर्मात जे काही शोषण होते ते त्याच धर्मातल्या लोकांचे ( लोकांना धर्म सोडुन जायचा चॉइस तरी आहे ), पण इथे मात्र ते दुसर्या धर्मा च्या लोकांबद्दल जास्त बोलतात्/करतात.
14 Dec 2015 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा
रैट्ट!
क्रमवारीच लावायची झाली,तर इस्लामला पहिला क्रमांक द्यावा लागेल.
15 Dec 2015 - 2:50 pm | गुलाम
बर्याच लोकांना प्रामाणिकपणे असं वाटत असतं की हे दहशतवादी म्हणजे खरे मुसलमान नव्हे. राहिली गोष्ट फतवा काढायची तर हे बघा-
Over 1000 Indian imams issue joint fatwa against IS, call it un-Islamic
15 Dec 2015 - 2:56 pm | संदीप डांगे
हा हा हा.
"ते त्यांचे मगरीचे अश्रू आहेत, वरून फतवा काढतात आतून सपोर्ट देतात. आयसिसविरुद्ध फतवा काढणे हा आयसिसचा प्रचार करण्याचा छुपा मार्ग आहे. आयसिस हे वहाबींचे असल्याने इतर मुस्लिम त्यांचा विरोध करत आहेत."
15 Dec 2015 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
हि अंतरप्रवाहांवरची राजकारण नीट माहीत आहेत आंम्हाला.. सर्वच्या सर्व मुस्लिम अतिरेकी सँघटना काफिर आहेत..असा फतवा दाखवा..
शिवाय वरती डांगे म्हणतात त्याही गोष्टी आहेतच.
15 Dec 2015 - 5:10 pm | गुलाम
अहो राजकारण कुठे नाहिये?? आपल्या भारतीयांचा तर तो जन्मसिध्द अधिकार आहे.
रच्याकने, हा घ्या सर्व अतिरेकींविरुध्द फतवा-
Deoband first: A fatwa against terror
कुठल्याही प्रकारच्या सरसकटीकरणाला आणि शिक्केमारु विचारांना माझा विरोध असतो. त्यात तुमच्या सारख्या पुरोगामी विचाराच्या माणसाकडून असे प्रतिसाद आले म्हणून या लिंका दिल्या. बाकी तुम्ही सुज्ञ आहा!!!
15 Dec 2015 - 6:16 pm | मारवा
गुलाम
बाय द वे तुमचा प्रतिसाद दिसला की मी अलर्ट होतो
काहीतरी वेगळा व मार्मिक असतो
मिपावरील टॉप टेन गुढ आय डी मध्ये तुमचा समावेश होतो
गुढ मिस्टेरीयस चांगला अर्थाने माझ्यापुरता म्हणतोय
कृपया गैरसमज नसावा असते एकेकाची लीस्ट.
15 Dec 2015 - 7:22 pm | गुलाम
मी एकंदर प्रतिसाद द्यायचा टंकाळा करतो त्यामुळे कदाचित तुम्हाला गुढ वगैरे वाटत असेल. Anyways, I'll take this as a compliment. :)
14 Dec 2015 - 3:32 pm | सत्य धर्म
खूप मोठे मोठे लोक बोलून गेले कि सर्व धर्म समान आहेत त्यांचे अर्थ एकच आहेत परंतु
कुराण , बायबल आणि भगवतगीता वाचल्यानंतर माझ मत बदलेल आहे.
15 Dec 2015 - 12:46 am | उगा काहितरीच
अभ्यासपूर्ण लेख! म्हणजे थोडक्यात त्यांच्या त्यांच्या मधेही बरेच वाद आहेत तर!
जगाला वाचव रे विश्वनाथा !
15 Dec 2015 - 2:13 pm | कपिलमुनी
जगातल्या सद्य परीस्थितीला साजेसा !
15 Dec 2015 - 6:54 pm | होकाका
हा माहितीपट काही वर्षांपूर्वी पहाण्यात आला. त्यामुळे लेखातील गृहितके फारशी पटली नाहीत. परंतु, खूप नवी माहिती मिळाली. धन्यवाद.
16 Dec 2015 - 1:32 pm | तुडतुडी
इस्लाम मध्ये ७३ पंथ आहेत . गुगल वर नावे मिळतील .
खिक . मुस्लिम आणि ज्ञानी ? मोठ्ठा जोक. एक सुफी पंथ सोडला तर बाकीचे सगळे अज्ञानाच्याच पायावर उभे आहेत
@आत्मबंध . तुम्ही लिहिलेलं अगदी खरं आहे . पण वरच्या वाक्यात अल्लाचा जो उल्लेख केलात तो अत्यंत चुकीचा आहे . अल्लाह ने इस्लाम निर्माण केला नाहीये . तो महामदाने केला . कुरण हे अल्लाह ने लिहिलेलं किवा सांगितलेलं नाही . प्रेषित (?) महम्मदने सांगितलेली तत्व आणि प्रवचनं त्याच्या अनुयायांनी एकत्र करून ते लिहिलं आहे . मुळात अल्लाह हि इस्लामपूर्व काळातील आर्य देवता आहे .त्यांना श्रीक्रीश्नांचा अंशावतार म्हटलं जातं. मुहाम्मादाच चरित्र माहित असणारा गैरमुस्लिम त्याला कधीही प्रेषित म्हणणार नाही . अश्या माणसाने (?) सांगितलेल्या कुराणाचा आणि अल्लाचा संबंध लावू नये.
अरबस्तानमध्ये नंतर नंतर भ्रष्टाचार , अधर्मिपणा फोफावला होता . पापकर्मांना उधान आलं होतं. अश्या तामसी आणि विवेकबुद्धी गमावलेल्या लोकांच्या मनाचा ठाव घेवून आर्य धर्माला शह देण्यासाठी आणि असत्य ,अधर्म फैलावण्यासाठी इस्लाम ची निर्मिती झाली . इस्लाम मध्ये तामसी पुरुषांच्या भौतिक फायद्याच्या गोष्टी सांगितल्यामुळे काही लोकांनी तो पटकन स्वीकारला . पण चांगल्या लोकांनी तो स्वीकारायला नकार दिला तेव्हा अश्या लोकांना जबरदस्तीने लुटमार करून , हत्या घडवून इस्लाम स्वीकारायला लावला गेला .
पैसाताई अत्म्बंधंच म्हणणं अगदी बरोबर आहे . तिथल्यातिथे एखादी गोष्ट स्पष्ट करायला हवी .
नक्कीच . पुढचा भाग लवकर येवू द्या . आपला विन्त्रेष्टिंग विषय आहे .
16 Dec 2015 - 3:34 pm | जयंत कुलकर्णी
१ ७७ पंथ असतीलही. आता आपण म्हणताय तर मिळतीलच. मी आपला सामान्य माणसांप्रमाणे जे मुख्य पंथ आहेत त्याबद्दल लिहिले. हे दोन पंथ पडण्याआधीही काही पंथ तयार झाले होते का ? हे मला माहिती नाही म्हणून विचारले.
२ //खिक . मुस्लिम आणि ज्ञानी ? मोठ्ठा जोक. एक सुफी पंथ सोडला तर बाकीचे सगळे अज्ञानाच्याच पायावर उभे आहे////
याच्यातील "खिक" हे कुत्सित हास्यासाठी लिहिले जाते का ? हेही मला माहीत नाही म्हणून विचारले. ज्ञानी म्हणजे काय याची व्याख्या सांगितलीत तर याबाबत पुढे चर्चा करण्यास हरकत नाही. आणि तुमच्या व्याख्येनुसार सुफींनाही ज्ञानी का म्हणावे हे कळले तर बरे होईल. आणि यात मोठ्ठा विनोद काय झाला हेही आम्हा पामरांस समजावून सांगितले बरे होईल.
16 Dec 2015 - 6:17 pm | कपिलमुनी
जकुकाका , चिखलात दगड मारू नका !
लेखमालेची मजा निघून जाईल !
अल्लाह आणि कॄष्णावताराचा संबंध लावणार्यांचा ज्ञानस्त्रोत ओळखणे अवघड नाही , तस्मात दुर्लक्ष करून पुढील भाग लौकर टाकावा विनंती :)
16 Dec 2015 - 6:28 pm | प्रचेतस
सहमत.
16 Dec 2015 - 10:26 pm | संदीप डांगे
हज्जार टक्के सहमत...
18 Dec 2015 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा
@
>> सहमत.. सदर आय.डी.चे सगळेच प्रतिसाद सगळ्यांनीच संपूर्ण दुर्लक्षित करावेत.. म्हणजे लेखमाला स्वच्छ राहिल.
16 Dec 2015 - 3:26 pm | भुमी
पुभाप्र!
18 Dec 2015 - 12:41 pm | अभ्या..
माहीतीपूर्ण लेखन जयंतराव.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
18 Dec 2015 - 6:00 pm | नाखु
चहु अंगाने धांडोळा आवडेल कारण याबाबत फरसे वाचनात नाही..
इतक्या चांगल्या (संदर्भा सहीत बखर) मालिकेच्या वेळी, बॅट्या सहभागी नसणे म्हणजे .......
खंतावलेला नाखु.
बॅट्या मिपावर परत यावा असे नक्की वाटणार्यांपैकी एक
18 Dec 2015 - 1:26 pm | नीलकांत
इस्लामच्या अतिशय महत्वाच्या आणी सद्यस्थितीत जागतीक राजकारणावर बर्यापैकी प्रभाव असलेल्या पंथाबाबत तुम्ही लिहीताय. या विषयी मराठी विशेष माहिती उपलब्ध नाही. या भागात यापंथाचा उगम सोबतच समकालीन घडमोडींचा उहापोह पहायला मिळाला. यापुढे काय अशी उत्सुकता लागली आहे.
वहाबी पंथाने आपला एक इझम करून इस्लाम म्हणजे वहाबीच असे ठाम ठासवल्याचे जाणवते. त्यामुळे त्या पंथाचा प्रसार प्रचार सौदीच्या बाहेर कसा आणि कधी झाला. या वहाबीझमच्या सोबत भारतातील तबलीग, देवबंदी व बरेलवी कसे जुळवून घेतात? विशेषतः मलबार किनार्यावर याचा कितपत प्रभाव आहे? असे एक ना दोन अनेक प्रश्न आता डोक्यात फिरताहेत. पुढील भाग लवकर येऊ द्यात.
एक विनंती आहे की हा विषय जरी इस्लामशी संबंधीत असला तरी तुम्ही एका पंथाविषयी लिहीता आहात आणि त्या पंथाविषयीचे तुमचे मत मांडता आहात. अश्यावेळी आम्ही वाचक तुमचे मत समजून घेण्यास उत्सुक आहोत. आमच्या पैकी काही लोकांची सरसकटीकरणाची इच्छा झाली तरी तुम्ही मात्र आपला फोकस कायम ठेवा.
- नीलकांत
18 Dec 2015 - 5:41 pm | बोका-ए-आझम
या पंथाचा (की विचारसरणीचा - चूभूद्याघ्या) पाकिस्तानात प्रसार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सईद अन्वर हा त्याच्या मुलीच्या मृत्यूनंतर मनःशांतीसाठी या पंथात सामील झाला आणि नंतर बरेच पाकिस्तानी क्रिकेटपटू - इंझमाम उल हक आणि सकलेन मुश्ताक हे पटकन आठवतात - त्यात सामील झाले. हा पंथ preach and teach या तत्वावर विश्वास ठेवतो. अर्थात हे वाचनात जे आलं त्याच्यावर आधारित आहे. बाकी जयंतकाकांचा लेख म्हणजे उत्कृष्ट असणारच!
18 Dec 2015 - 6:10 pm | नीलकांत
तबलीग जमात हा पंथ भारतात खुप प्रभावशाली होत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याच्या शाखा आहेत. यांचे मोठे इस्तेमा होत राहतात. यांचा आक्रमकपणा खुप आहे. सुन्नी जमातशी यांचे तसे पटत नाही. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात नेमके कोणते पंथ आहेत. त्यांचा स्वभाव काय? विचारसरणी आणि विस्तार काय या विषयी कुणी जाणकार माहिती देईल का?
तसेच मुस्लीम संतांचे दर्गा किंवा मजार विषयी सुध्दा उत्सुकता आहे. या दर्गा किंवा मजार विषयी सुन्नी जमात व तबलीग जमात यांचे मत परस्पर विरोधी आहे असे ऐकून आहे.
18 Dec 2015 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुन्नी परंपरेप्रमाणे दर्गा, मजार किंवा इतर कोणतेही मानवाकृती / मानवी अवशेष असलेले शिल्प, इमारत, चित्र, इत्यादी निषिद्ध आहे व तेथे उपासना करणे निषिद्ध आहे.
सौदी अरेबियातल्या मदिना शहरातील अल् मस्जिद अल् नवाबी मध्ये प्रेषित महमंदांचे थडगे आहे असे समजले जाते. हज/उमराला जाणारे भाविक तेथे भेट देतात व प्रार्थना करतात. हे सुन्नी परंपरेत बसत नाही. म्हणून, त्या थडग्यातले अवशेष थडग्यासह हलवले जावे व ते अल् बादी येथिल स्मशानभूमीत ओळखले जाता येऊ नयेत अश्या प्रकारे दफन केले जावेत अशी योजना बनवणे गेल्या वर्षी चालू होते अशी बातमी होती. त्याला काही लोकांचा विरोध होता आणि सोशल मिडियात त्याबाबत जोरात चर्चा चालू झाली होती. अधिक माहिती इथे मिळेल :
http://www.middleeasteye.net/news/alarm-over-saudi-plan-remove-remains-p...
http://www.belfasttelegraph.co.uk/news/world-news/saudi-arabias-proposal...
प्रेषित महंमदांचे जन्मस्थान समजले जाणारे मक्का शहरातील ठिकाण व इतर अनेक पुरातन स्थळांनाही हाच मानदंड लावला गेला आहे व जात आहे :
https://en.wikipedia.org/wiki/Destruction_of_early_Islamic_heritage_site...
http://time.com/3584585/saudi-arabia-bulldozes-over-its-heritage/
19 Dec 2015 - 1:00 pm | हुप्प्या
सौदी अरेबियात जेद्दा नावाचे शहर आहे. त्या शब्दाचा अर्थ आजी असा आहे. पूर्वी तिथे आद्य स्त्री इव्ह वा अरबीत हव्वा हिची समाधी होती. जिथे समाधी होती तिथे मोठी इमारत होती. १९२८ साली वहाबी प्रभावाखाली असणार्या सौदी घराण्यातील कुणी अधिकार्याने ती समाधी नष्ट केली. एक ऐतिहासिक ठेवा काँक्रिटने सीलबंद केला. कारण लोक त्या स्थळाला तीर्थक्षेत्र मानू लागले होते. एक प्रकारची मूर्तीपूजा सुरू झाल्याने वहाबी लोकांची माथी भडकली.
आयसिस ह्या वहाबीला शिरोधार्य मानणार्या संघटनेनेही सिरियातील अनेक वस्तुसंग्रहालये, अनमोल प्राचीन पुतळे हे बाँब लावून उद्ध्वस्त केलेत. वहाबी विचार हा आधुनिक जगात आचारायला पूर्णपणे नालायक आणि कालबाह्य आहे हे ह्यातून सिद्ध होते.
18 Dec 2015 - 5:25 pm | सस्नेह
उत्तम अभ्यास आणि माहितीपूर्ण लेख.
शक्यतो संदर्भ दिले तर जास्त चांगले.
19 Dec 2015 - 10:22 am | गणपा
रोचक...
वाचतोय.
23 Dec 2015 - 2:10 pm | तुडतुडी
उपहासात्मक लिहिलं आहे .
अवश्य . तुम्ही ज्ञानी हा शब्द कशासाठी वापरलाय हे कळलं तर बरं होईल . कुठलाही धर्म म्हटला कि त्यात धार्मिक , अध्यात्मिक , देव वगेरे ह्या गोष्टी प्रामुख्याने येतातच . मला ह्याच ज्ञानाकडे निर्देश करायचा होता . सुफी पंथ , त्यांची तत्व , परंपरा , ईश्वरप्राप्तीचे मार्ग , सुफी संत ह्यां बद्दल लिहायच झालं तर त्यासाठी वेगळी लेखमाला लिहावी लागेल . पण मुळातच 'अध्यात्म ' विषयाचं वावडं असणाऱ्या (त्यातही हिंदू देव -देवतांचं ) टवाळखोर मि पा करांचा तो विषय नसल्यामुळे टाळलेल बरं
@कपिलमुनी , आत्मबंध
मग तो ज्ञानस्त्रोत उघड करायला वाट कसली बघताय ?
अल्लाहचा आणि कुराणाचा संबंध लावणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या अगाध ज्ञानवंतांचा ज्ञानस्त्रोत कुठला हे हि समजू दे . काही माहित नसताना चुकीची विधानं करून दिशाभूल करणाऱ्या प्रतिसादांकडेच सर्वांनी दुर्लक्ष केलेलं चांगलं आहे . इतरांना काही कळत नाही . आपल्यालाच सगळं कळतं असा तुमचा समाज असेल तर अल्ला हि देवता कधी निर्माण झाली . त्याला हेच नाव का पडलं ह्याचंही ज्ञान तुमच्याकडे असेलच . आम्हालाही कळूदे कि जरा .