सलाफी-वहाबी-दहशतवाद....१
लेखनप्रकार
इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ.
इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे आपणा सर्वांना माहित आहेच. एक शिया व दुसरा सुन्नी. यातील सुन्नीधर्मात अनेक अतिरेकी उप पंथाची उत्पत्ती झाली ज्याने हा पंथ सध्या जगात बदनाम झाला आहे त्यातीलच एक म्हणजे वहाबी पंथ. बऱ्याच जणांना असे वाटते की व हल्ली जगात जे इस्लामी अतिरेकाचे वारे वहात आहे ते या नवीन काळातील उत्पत्ती आहे पण वहाबींनी पहिली कत्तल केली ती सुन्नी पंथियांची आणि ती सुद्धा शेकडो वर्षापूर्वी. ही कत्तल झाली सौदी अरेबियामधे. सौदी अरेबियाच्या इतिहासाचा अभ्यास केला म्हणजे शिया व सुन्नी मुस्लिमांचे हत्याकांड वहाबींनी कसे घडवून आणले याचा उलगडा होईल व आत्ता जो वहाबी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे त्याचा उगम कुठे आहे हेही समजेल.
इस्लामच्या शिकवणीचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून व सौद घराण्याच्या आश्रयाखाली या पंथाने आत्तापर्यंत नुसता तगच धरला नाही तर जगभर आपले हातपाय पसरले. ते कसे तेही आपण पाहणार आहोत. वहाबी जे स्वत:ला सलाफी समजतात त्यांचे तत्वज्ञान सोपे व सुटसुटीत आहे. ज्यांची मते त्यांच्याशी जुळत नाही ते त्यांचे शत्रू होतात व त्यांचा नायनाट करणे हे त्यांचे आपोआप कर्तव्यच होते. इस्लाममधील इतर पंथियांचा या वहाबींना पाठिंबा आहे का ? सुन्नीचा हा उपपंथ असलातरी हे दोन्ही एकच आहेत का ? म्हणजे जे सुन्नी नाहीत ते तर वहाबी नाहीतच हे स्पष्ट आहे पण जे वहाबी नाहीत पण सुन्नी आहेत त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक आहे ? कोण आहेत हे लोक ?
वहाबी :
हे स्वत:ला खरे सुन्नी समजतात. एखाद्या वहाबीला ‘तू सुन्नी आहेस का?’ असे विचारल्यास तो अभिमानाने सांगेल की ‘होय मी सुन्नी आहे’’ पण एखाद्या सुन्नीला ‘तू वहाबी आहेस का ?’ असे विचारल्यास त्याचे उत्तर ठामपणे नकारार्थी येऊ शकते. ठामपणे म्हणण्याचे कारण आहे कारण ते तो स्वत:चा अपमान समजतात. वहाबींच्या तत्वज्ञानास त्यांची बिलकुल मान्यता नाही. वहाबी म्हणजे मुहम्मद इब्न अब्दुल वहाब यांची शिकवण पाळणारा. हे इस्लाम धर्माचे दोन प्रमुख स्त्रोत, कुरआन व सुन्नाह दुय्यम मानतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात असेही खऱ्या सुन्नींचे म्हणणे आहे. किंवा जरी या दोन गोष्टींना ते मानत असले तरी ते या वरील माणसाने, त्यांचा अर्थ जो लावला आहे त्यानुसार त्यांचे वागणे असते. हे जे अर्थ लावले गेले त्याचा काळ होता १७००. या माणसाच्या अनुयायांना ओळखण्यासाठी इतर सुन्नी त्यांना वहाबी या नावाने ओळखतात.
स्वत: वहाबी इतर सुन्नींपासून आपण वेगळे आहोत हे सांगण्यासाठी स्वत:ला सलाफी समजतात किंवा तसे सांगतात तरी. सलाफीमधील सलाफ हा शब्द हा तसा ऐतिहासिक आहे म्हणजे प्रेषितांच्या काळातील. सलाफ हे एका काळाचे नाव आहे. प्रेषिताने मक्केतून मदिनेला स्थलांतर (हिजरत) केले तो काळ होता ६२२. त्यानंतरच्या ३०० वर्षांच्या काळास सलाफ या नावाने संबोधले जाते. या हिजरतच्या वेळी प्रेषिताची ज्यांनी साथ दिली (साहबा) ते, या साथिदारांच्या मागे जे गेले (ताबिईन) ते, आणि यांच्या मागे जे गेले (ताबा अल् ताबिईन) हे सर्व लोक आदर्श मुसलमान किंवा इस्लामचे खरे पाईक समजले जातात कारण खुद्द प्रेषिताने यांच्याबद्दल कौतुकोद्गांर काढले आहेत. प्रत्येक सच्चा मुसलमानाचे प्रेषिताच्या या पाठिराख्यांच्या पावलावर पाऊल टाकून धर्माचे पालन करणे हे ध्येय असते. जेव्हा वहाबी आम्ही सलाफी आहोत असे म्हणतात तेव्हा ते हे सांगत असतात की ते त्या तिनशे वर्षातील प्रेषिताच्याबरोबर हिजरत करणाऱ्या त्याच्या साथीदारांइतकेच सच्चे मुसलमान आहेत. जे अर्थातच खोटे आहे...
सनातनी सुन्नी मुस्लिमांना असे वाटते की तेच सलाफींचे खरे पाईक आहेत कारण त्यावेळी जे काही झाले ते ज्ञानी लोकांनी पद्धतशीरपणे पुढच्या पिढीत पोहोचवले आहे, जे जगभरच्या मुस्लिमांमधे प्रसारित झाले आहे, प्रचारित झाले आहे. ही जी अखंड प्रक्रिया अनेक शतके चालली होती त्याचेच सध्याचे रुप म्हणजे तत्वमिमांसाचे चार मार्ग. हनाफी, शाफिई, मालिकी व हानाबली.
हे वहाबी स्वत:ला सलाफी म्हणवतात परंतु मोठ्या युक्तिने सामान्य मुसलमानांना प्रेषिताच्या वचनांचे वेडेवाकडे अर्थ लावून त्यांना मुर्ख बनवून वहाबी पंथात ओढतात. ते म्हणतात, ‘तुम्ही सलाफच्या काळातील मुसलमानांचे अनुकरण केले पाहिजे.’ पण ते एवढेच म्हणून थांबत नाहीत. ते पुढे काय म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, ‘म्हणून तुम्ही सलाफींचाच मार्ग अनुसरला पाहिजे. तुम्ही दुसरा कुठलाही मार्ग अनुसरला तर तो मार्ग सलाफच्या काळातील मुस्लिमांनी जो मार्ग अनुसरला, तो नसेल.’ असे शाब्दिक खेळ करीत ते या जनतेला गोंधळवून टाकतात. यामुळे सर्वसामान्य मुसलमान वहाबी हे सलाफींचे, म्हणजे सनातनी इस्लामचे खरे प्रतिनिधी समजू लागतात. ( सलाफ आणि सलाफी हे शब्द सारखेच असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो). अर्थात कोणी त्यांच्या शाब्दिक खेळापलिकडे जाऊन इस्लामचा अभ्यास केला तर त्यांना हे सहज समजेल की सलाफी-वहाबी यांची शिकवण व कर्तृत्व हे सलाफ काळातील मुसलमांनांच्या बरोबर विरुद्ध आहे. जे धार्मिक सुन्नी मुसलमान सलाफच्या काळात अस्तित्वात होते त्यांचा आणि वहाबींचा तसा कसलाही संबंध नाही.
वहाबींची अशी ठाम समजूत आहे की गेले १००० वर्षे सुन्नी हे चुकीच्या मार्गाने चालले आहेत आणि सलाफनंतर त्यांनी मुसलमानांचे अज्ञान (जाहिलिय्या) दूर करण्याचा कसलाही प्रयत्न केलेला नाही. जरी या पृथ्वीतलावर सुन्नी उम्मा बहुमतात आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला असला तरीही, किंवा कितीही शक्तिमान असला तरीही यांचा धर्म हा मुळ तत्वापासून फारकत घेतलेला आहे. अल्पसंख्यांक सलाफींच्या दृष्टिकोनातून हे जग प्रेषितनिंदकांनी भरलेले आहे व या जगावर सुधारणावादी लोकांचे राज्य चालते ज्यांना मुळ, खऱ्या सनातनी इस्लाम धर्मात सुधारणा करायच्या आहेत्, जे धर्माविरुद्ध आहे.
वहाबी आणि सलाफींमधे ही विविध वैचारिक प्रवाह आहेत. काही जहाल आहेत तर काही अतिजहाल. यांच्यात जे काही फरक आहेत ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे जे मार्ग आहेत त्यातील फरकामुळे. इथेही तीच गंमत आहे. सर्व वहाबी सलाफी असतात पण सर्व सलाफी वहाबी नसतात. इजिप्तचा सय्यद कुत्ब हाही एक सलाफीच आहे ज्याला सलाफ काळातील इस्लाम जिवनपद्धतींचे पुनुर्जिवन करायचे आहे म्हणा किंवा त्याच्या भाषेत त्यांचे अज्ञान दूर करुन त्यांना खरा इस्लाम शिकवायचा आहे. इस्लाम परत मुळपदावर आणायचा आहे. पण सलाफी असो किंवा वहाबी असो या दोन्ही पंथातील लोकांचे पुढील एका बाबतीत एकमत आहे. मुहम्मद इब्न अब्दुल वहाब व अहमद इब्न तयमिह्य या दोन माणसांनी जो इस्लामचा जहाल अर्थ लावला आहे त्यामुळे इस्लाममधे क्रान्ती येऊ घातली आहे. जरी सलाफी व वहाबींचे मार्ग वेगळे असले तरी त्यांचे वर उल्लेख केलेले ध्येय, हिंसक किंवा अहिंसक मार्गाने गाठण्यासाठी ते एकमेकांचे सहाय्य घेतात. उदा. सलाफींचा प्रभाव असलेल्या देवबंदी व वहाबींची एकजूट किंवा मुस्लिम ब्रदरहुडला सौदीच्या वहाबींनी नासरविरुद्ध केलेली मदत. सौदीने ब्रदरहुडच्या जहालमतवादी व अतिरेक्यांना त्यांच्या देशात आसरा दिला होता. वहाबी व सलाफींमधील सहकार्य इराणच्या क्रांतीनंतर अजूनच वाढीस लागले ते आजपर्यंत. अफगाणिस्थान मधे सलाफी व वहाबी कम्युनिस्टांविरुद्ध एकत्रच लढत होते. आज जे जहाल अतिरेकी तयार होत आहेत ते या सलाफी-वहाबी यांनी लावलेल्या इस्लामच्या अर्थामुळे. बोस्निया, अल्बेनिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, उझबेकिस्तान, इंग्लंड, मलेशिया, साऊथ आफ्रिका, लबनॉन, अफगाणिस्थान, हिंदूस्थान अशा सर्व देशात त्यांची पाळेमुळे घट्ट झाली आहेत.
वहाबींनी खवारीज जमातीच्या चालिरितींचे पुनुरज्जिवन केले व त्यांचे विरोधक हे त्यांचे मोठे पाप समजतात. खवारिज, खलिफा ओस्मानच्या काळात हो़ऊन गेले व प्रेषित मोहम्मद यांच्या अगदी जवळचे साथीदार होते. हे इस्लाम धर्मातील सगळ्यात जुने अतिरेकी म्हटलेत तरी चालेल. त्या काळात मोहम्मदाचा जावई अलिने खलिफापदासाठी दमास्कसचा राज्यपाल मुआवियाची बाजू घेतली. (खरे म्हणजे फक्त मध्यस्ती करण्याची तयारी दाखविली) या त्याच्या विश्र्वासघाताने चिडून जाऊन त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केले. त्यांनी अलि आणि मुआविया या दोघांनाही धर्मद्रोही, इश्वरनिंदक ठरविले व त्यांच्या विरुद्ध तलवार उपसली. त्यांचे म्हणणे होते, ‘या बाबतीत कुराणालाच शेवटचा अधिकार आहे. दुसऱ्या कोणालाच नाही.’ १२०१ साली मृत्यु पावलेल्या एका इब्न-अल्-जावझी नावाच्या इस्लामच्या अभ्यासकाने यांच्या बद्दल लिहिले आहे, ‘धुल्-खुवेसिरा अल्-तामिमी हा इस्लामचा पहिली खवारिज होता आणि त्याने एकच मोठी चूक केली ती म्हणजे त्याने स्वत:चे समाधान स्वत:च्याच मतांनी करुन घेतले. तो थोडावेळ थांबला असता तर त्याला हे कळून चुकले असते की अल्लाबद्दल प्रेषिताची मते ही सर्वश्रेष्ठ आहेत.’ अजून एक सुन्नी व्यासंगी आहेत, त्यांनी खवारिजींनी केलेल्या दहा हजार मुस्लिमांच्या कत्तलिवर लिहिले आहे. खवारिजींची एक शाखा आझारिकांबद्दल ते म्हणतात, "या जमातीचा किंवा पंथाचा पुढारी होता नफि इब्न अल् अझ्राक. हा बानू हनिफा या जमातीचा होता. तीच जमात ज्यात मुसेलिमाने (प्रेषिताचा तोतया) जन्म घेतला होता. यानेच प्रेषित महोम्मदाबरोबर आपणही प्रेषित आहोत असा दावा केला होता. ज्याप्रमाणे खवारिज, अलि आणि मुआवियांवर धर्मनिंदकांचा आरोप करीत त्याच प्रमाणे वहाबी आता सुन्नी व शियांवर तसले आरोप करतात.
या खवारिजांची तत्वे तरी काय आहेत ते बघुया म्हणजे जिहादींमधे ही तत्वे कुठून आली हे आपल्याला सहजपणे कळेल.
१ जो घोर पाप करतो तो इस्लाम धर्मामधून बहिष्कृत होतो. त्याचा काफिर समजून त्याचा कायमच धिक्कार केला जाईल
२ अलि, ओस्मान्, तल्हा, अल्-झुबेर, अलिशा व इब्न अब्बास व त्यांच्या बरोबरचे इतर सर्व मुसलमान हे काफिर आहेत व त्यांचा धिक्कार असो.
३ काफिरांच्या संततीची पण तीच अवस्था होईल
४ अल्ला एखाद्या प्रेषिताला पाठवेल पण त्याच्या हातून एखादे घोर पाप घडेल व तो काफिर होईल
५ लहान मुले व स्त्रियांना ठार मारण्याची परवानगी दिली गेली आहे.
६ अझारिकांच्या बंडात सामिल न होणारे काफिर समजले जातील
७ इत्यादि...इत्यादि...
वहाबी पंथाचा स्ंस्थापक व सौद घराणे.
याचे पूर्ण नाव होते महोम्मद इब्न अब्दुल वहाब. जन्म १७०३ व मृत्यु १७९२, सौदी अरेबियामधे. अंदाज येण्यासाठी सांगतो पानिपत झाले १७६१ साली. म्हणजे पानिपतचे युद्ध झाले तेव्हा हा अठ्ठावन्न वर्षाचा होता. हा नसता तर सौद घराण्याची सत्ता ना पसरली असती ना अनेक देवता पुजणाऱ्यांविरुद्ध जिहादच्या लाटा उसळल्या असत्या. कसे होते यांचे नाते ?
महोम्मद वहाबीची गाठ पडण्याआधी सौद हे नज्द प्रांतातील अनेक सामान्य जमातीसारखे शेतकरी, व्यापारी होते. खजूर, व घोड्यांचा किरकोळ व्यापार यावर ते आपली गुजराण करीत. जेव्हा त्यांची ताकद वाढे तेव्हा ते मोहिमेवर निघत व जेव्हा ती कमी होई तेव्हा ते स्वत:ला शेती/व्यापारात गुंतवून घेत. साम्राज्य वैगरे उभे करायचे त्यांच्या स्वप्नातही नव्हते पण ते त्यांना हा गुरु भेटेपर्यंत.
अल् सौद पूर्वारेबियातील नज्दमधील अद् दरिया नावाच्या गावात रहात असत. हे गाव सध्याच्या सौदी अरेबियाच्या राजधानीजवळ आहे. सौद-इब्न-मुहम्मदचे पूर्वज या भागात केव्हातरी स्थायिक झाले. त्यांच्याबद्दलही विशेष माहिती उपलब्ध नाही. हे शेती करीत व हळु हळु त्यांची संख्या वाढून त्यांचे एका टोळीत रुपांतर झाले. ते हे सौदी घराणे.
मुहम्मद – इब्न – अब्दुल – वहाब दक्षिण नज्दमधे उयाईना नावाच्या मरुउद्यानात रहात असे. तो बानू तामीम जमातीचा होता. त्याचे घराणे धार्मिक वृत्तीचे असून त्याने त्याचे मुळ गाव इस्लामच्या अभ्यासासाठी सोडले व तो मक्केला आला. पुढे त्याने मदिना, इराक, इराण इत्यादी देशांना भेटी देऊन अनेक धर्मगुरुंच्या हाताखाली इस्लामचा खोल अभ्यास केला. जेव्हा तो परत आपल्या गावी आला व त्याने त्याच्या बुद्धीनुसार इस्लामवर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्यात तो त्याची सुन्नींविरुद्ध जहाल, प्रतिगामी मते मांडत असे.
सनातनी सुन्नी पंथाचा व्यासंग करणारे जमील एफेंडी याच्याबद्दल लिहिताना म्हणतात, ‘‘वहाबचे दोन शिक्षक ज्यांनी त्याला इस्लाम शिकविला ते म्हणतात, तो वाममार्गाला लागणार ही अल्लाची इच्छा आहे पण सगळ्यात जास्त हाल त्याच्या मागे जाणाऱ्यांचे होणार आहेत’’ या मदिनेला रहाणाऱ्या शिक्षकांची नावे होती ‘शेखमुहम्मद इब्न सुलेमान अल् कुर्दी व शेख मुहम्मद हयात अल् सिंदी. एवढेच नाही तर मुहम्मद वहाबच्या खुद्द वडिलांनी त्याला ओळखले होते व सुन्नींना त्याच्याबद्दल इशारा दिला होता. त्याचा सख्खा भाऊ सुलेमान इब्न अब्दुल वहाब याने एका पुस्तकात मुहम्मद वहाबची निर्भत्सना केली होती. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘अल्ख़्वाइक् अल् इलाहिय्याफि अल्-रद्द अला अल्-वहाबिया.’ त्या काळात अनेक सुन्नी व्यासंगी धर्मगुरुंनी मुहम्मद वहाबची निर्भत्सना केली होती. विशेषत: त्याने जी मते त्याच्या ‘किताब अत्-ताविद या पुस्तकातून मांडली त्याबद्दल. हे पुस्तक वहाबींमधे बरेच लोकप्रिय आहे असे म्हणतात पण सुन्नी पंथाच्या तज्ञांमते त्यात कुठल्याच दृष्टिकोनातून काहीही दम नाही...
ज्या माणसाचा प्रभाव मुहम्मद वहाबवर पडला त्याबद्दलही लिहायलाच लागणार. याचे नाव होते अहमद-इब्न-तयमिय्ह. मुहम्मद वहाबच्या आधी दोनशे एक वर्षे हा होऊन गेला. (१२६३-१३२८). मुहम्मद वहाब यालाच आपला आदर्श मानायचा. त्याने सुन्नींवर केलेली निर्दय टिका तशीच्या वहाबने तशीच्या तशी स्वीकारली. बदल केलाच असेल तर ती अधिकच जहाल केली. त्याची पंथ (अकिदा) आणि पुजे (इबादत) संबंधित जी मते होती त्यामुळे हे व्यक्तिमत्व इस्लाममधे विवादास्पद ठरले असे म्हणायला हरकत नाही. या माणसाबद्दल चांगली व वाईट अशी दोन्ही प्रकारची मते ऐकू येतात. जे बंडखोर होते त्यांनी याचे कौतुक केले आहे तर सनातनी सुन्नी धर्मियांनी याला जवळजवळ काफिर म्हणून जाहीर केले. सुन्नी जगतात याला विरोध झाला याला मुख्य कारणे म्हणजे त्याची खालील मते ...
१ त्याने अल्लाला गुणविशेष चिकटविले त्यामुळे त्याने अल्लाला माणसासारखे मानले.
२ त्याने तलाकला व इस्लामच्या अभ्यासकांना केलेला विरोध
३ निर्माण झालेले विश्व अल्लाबरोबरच जन्माला आले आहे.
४ सनातनी सुन्नींच्या तवस्सूलला विरोध. तवस्सूल म्हणजे अल्लाकडे कशाची तरी मागणी त्याच्या प्रेषिताकडून करणे.
५ प्रार्थना सोडून प्रेषिताला भेटण्यास जाणे हे चूक आहे.
६ नरकातील यातना चिरंतर नसतात.
७ अल्लालाही काही हद्द आहे जी त्यालाच माहिती आहे.
८ अल्ला हा सिंहासनावर बसला आहे व त्याने त्याच्या शेजारी प्रेषितासाठी जागा रिकामी सोडली आहे.
९ प्रेषित मुहम्मदाच्या थडग्याला वंदनासाठी हत लावणे हे अनेकश्र्वरावाद आहे.
१० प्रेषिताच्या थडग्यासमोर अल्लाने आपले भले करावे अशी प्रार्थना करणे हे निंदनीय आहे.
११ व अशी इतर अनेक मते....
या बंडाखोर मतांपासून मुसलमान जगताला दूर ठेवण्यात सुन्नींचा यश मिळत होते पण त्याची मते गुप्तपणे अभ्यासली जात होती व ती वेगाने पसरतही होती.
एक सुन्नी अभ्यासक म्हणतो, ‘ इब्न तयमिय्हची जमात जेद्दावरुन आलेल्या एका धनाड्य व्यापाऱ्यामुळे लोप पावता पावता वाचली. या व्यापाऱ्याने इब्न तयमिय्हचे मिनहाज-अल्-सुन्ना-अल् नबाविया नावाचे एक पुस्तक इजिप्तमधे छापण्यासाठी पुष्कळ अर्थसहाय्य पुरविले. इजिप्तच्या मुफ्तिने, मुहम्मद बाखित अल् मुटिने या बाबतीत आपले मत व्यक्त केले, ‘हा विवाद (फितना) संपुष्टात येत असताना ज्याने तो परत पेटविला त्याला अल्लाचा शाप लागो.’
गंमत म्हणजे जरी वहाबींची व तयमिय्हची बरीच मते जुळत असली तरी काही बाबतीत त्यांचे मतभेद तीव्र आहेत. उदा तयमिय्ह सुफी पंथाला इस्लामची मन्यता आहे असे सुचवितात तर वहाबी सुफि पंथ हा इस्लामचे निंदनीय विकृतीकरण आहे असे मानतात.
इब्न तयमिय्ह, इस्लाम मधील बंडखोर जे क्रांतीला साद घालतात त्यांचा आदर्श असतो. उदा. १९८१ साली सादतची हत्या झाल्यावर तयमिय्हचीच वचने तोंडावर फेकण्यात येत होती व सौदी घराण्याची सत्ता उलथविण्यासाठीही बंडखोरांनी १९९० साली यांच्याच वचनांचा आधार घेतला होता. सादतच्या खुनामधे भाग घेतलेल्या चार बंडखोरांपैकी तिघांनी तयमिय्हची पुस्तके वाचली होती असे म्हणतात. (अब्द अल् सलाम फराज़ ) इब्न तयमिय्ह सलाफ़ी अतिरेक्यांचा (मुस्लिम ब्रदरहुड) लाडका आहे म्हणजे त्यांच्या सर्व कृत्यांना त्याच्या शिकवणीत त्यांना उत्तर सापडते.
इस्लाम धर्मियांविरुद्ध निघालेला पहिली जिहादचा फतवा...
१२५८ मधे जेव्हा मंगोल खान महम्मुद गझनने अबासैद साम्राज्यावर आक्रमण केले व लुटालुट चालू केली. १३०३ मधे मामुल्क सुलतानाने तयमिय्हला जिहादचा फतवा काढण्याचा हुकुम केला. एका मुसलमानाने दुसऱ्या मुसलमानाविरुद्ध जिहादचा फतवा मागायचा हे त्या काळात एवढे सोपे नव्हते. पण तो दिला गेला. खरे तर महम्मुद गझनने १२९५ साली इस्लाम धर्म स्वीकारला होता. हे मंगोल इस्लाम धर्मीय होते पण ते मंगोलियन 'यासा' कायदाही पाळायचे. म्हणजेच त्यांचे इस्लामीकरण अजून पूर्ण झाले नव्हते. या यासामुळेच ते जिहादचे शिकार झाले. या महमुद गझानला वहाबी आणि सलाफी अजुनही काफिरच मानतात. पण सुन्नी मात्र महमुद गझान एक सच्चा मुसलमान असल्याचे मानतात. शेख कबानी लिहितात, ‘गझन खान खरे तर एक कट्टर इस्लामधर्मिय होता. अल् दहाबीच्या मते त्याने सुफी पंथाच्या शेख साद्र अलादिन अबू अल् मजामी इब्राहीम अल् जुवायनी यांजकडून इस्लामची दिक्षा घेतली होती. त्याने त्याच्या वंशावळीत सगळ्यात पहिल्यांदा प्रेषिताचे नाव लिहिले होते व दरबारात इस्लामी वेषभुषा चालू केली.'
मुहम्मद इब्न अब्दुल वहाबने या तयमिय्हच्या पावलावर पाऊल टाकून अरेबियामधे लाखो मुसलमानांची कत्तल केली.
या तयमिय्हला चार सुन्नी न्यायाधिशांनी हि. ७२६ मधे तुरुंगात डांबले होते. यासाठी त्याने इस्लामचा जो नवीन अर्थ लावण्याचा कारभार केला होता त्याचे कारण दिले गेले. हे चारही न्यायाधीश इस्लामच्या चार तत्वज्ञाचे व्यासंगी होते. याचाच अर्थ तयमिय्हने हे चारीही मार्ग सोडून काहीतरी वेगळाच मार्ग पत्करला होता. त्याला या प्रकरणात गुंतवले गेले होते असे वहाबींचे म्हणणे आहे पण तसा काही पुरावा आढळत नाही. या चार न्यायाधिशांची नावे पाहिल्यावर तसे काही झाले असेल असे वाटत नाही.
१ क्वादी मुहम्मद इब्न इब्राहीम जामा अश्शफी
२ क्वादी मुहम्मद इब्न अल् हारिरी अल् अन्सारी अल् हनाफी
३ क्वादी मुहम्मद इब्न अबिबक्र अल् मलिकी
४ क्वादी अहमद इब्न ओमर अल् मक्दिसी अल् हानबली.
ज्या इतर सुन्नी धर्मगुरुंनी/ अभ्यासकांनी तयमिय्य्हवर मुळ धर्माशी फारकत घेतल्याबद्दल टिका केली आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे –
ताकि उद् दिन अस् सब्की, फकि मुहम्म्द इब्न ओमर इब्न मक्की, हाफिज सलाहुद्दीन अल् अलाई, क्वादी मुफासिर बद्रुद्दीन इब्न जामा, शेख अहमद इब्न याह्या अल् किलाबी अल् हलाबी, हाफिज इब्न दाकी अल् इद, क्वादी कमालुद्दीन अझ् झमालकानी, क्ख़्दी सैफिउद्दीन अल् हिंदी, इत्यादि...इ..
आता सलाफी वहाबी यांच्या वैचारिक धारणेचा उगम कुठे आहे ते आपण पाहिले. पुढच्या भागात त्याचा प्रसार सौद घराण्याने कसा केला व त्याने दोघांचाही फायदा कसा झाला हे आपण पाहणार आहोत.. या असल्या वैचारिक बंडखोरीचा इतर धर्मामधे जनतेला फायदा झाला पण येथे मात्र तोटा. असे का झाले हे समजण्यासाठी पुढे आपल्याला कुराण, जात्यांध मुसलमान, मुस्लिम ब्रदरहुड, अल् कायदा व इसिस..... यांचा इतिहास तपासावा लागेल...... पण त्याही अगोदर करबला येथे प्रेषित महंमदानंतर जे हत्याकांड घडले, का घडले, शिया सुन्नी हे दोन पंथ कसे तयार झाले हे पहावे लागेल..
येथपर्यंत झुबेर क्वामार यांच्या लेखावर व इतर माहितीवर आधारित....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
वाचने
14539
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
अभ्यासपूर्ण उत्तम लेख
चक्रावून टाकणारे आहे हे!
In reply to चक्रावून टाकणारे आहे हे! by यशोधरा
यशोधरा जी
बाकीचे बोहरा, सूफी ह्याबद्दलही लिहिणार का? हे पंथच आहेत का?बोहरा या पंथाविषयी थोडी माहीती आहे. दाउदी बोहरा हे साधारण शांतताप्रीय व्यापारी प्रवृत्तीचा समाज आहे. हे मुख्यतः हार्डवेअर व पेंट च्या व्यवसायात प्रामुख्याने आढळुन येतात. हा समाज अत्यंत सधन असा आहे. संख्येने फारच छोटा इतर पंथाच्या तुलनेत असा आहे. यांच्या वेगळ्या मशिदी असतात. यांचे धर्मगुरु हा एक रोचक प्रकार आहे. यांच्या दुकानात एका शुभ्र दाढीधारी वृद्ध गुरुचा फोटो आढळतो. तो म्हणजे सय्यदना. या गुरुचा संपुर्ण दाउदी बोहरा समाजावर एकछत्री अंमल चालत असतो. वंशपरंपरेने हा हक्क दिलेला आहे. यात धार्मिक गुलामगिरीचे उच्चांक आहेत. सय्यदना याने स्वत:ला या पृथ्वीवरील मी ईश्वर आहे मला सर्व शक्ती प्राप्त आहेत मी कुणालाही आन्सरेबल नाही.इ.इ. आणी एक नियम बनवला ज्या अंतर्गत प्रत्येक बोहराने (स्त्रीपुरुषबालक) स्वतःला अब्द-ए-सय्यदना सय्यदना चा मी गुलाम आहे असे म्हणवुन घ्यावे आणि त्याच्या समोर सज्दा ए उबुदियात परफॉर्म केलीच पाहीजे इ. एक शपथ विधी कंपलसरी केला गेलेला आहे प्रत्येक बोहरासाठी त्यात अनेकोनेक बंधने आहेत जी एखाद्या गुलामीपेक्षा कमी नाहीत. त्यात सय्दनाच्या पायाचे चुंबन घेणे इ.इ. अनेक भयंकर प्रकार आहेत. यात स्त्रीयांवरील बंधनेही भीषण स्वरुपाची आहेत. मात्र या सर्वांविरोधात एक याच समाजाचे थोर सुधारक डॉ. असगर अली इंजीनीयर यांनी एक मोठा लढा एक दिर्घ संघर्ष या सय्यदना कुटुंबाविरोधात चालवला. त्याचा परीणाम चांगलाच झाला. सय्यदना कुटुंब असगर अली इंजीनीयर आणि दाउदी बोहरा समाज एक मोठा विषय आहे तसा. त्यांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले. मात्र तरीही मी या संपुर्ण समाजाविषयी सरसकटीकरण टाळतो. ते चुकीचे होइल कारण त्यातच इंजीनीयर सारखी लोक आहेत.इस्लामच्या शिकवणीचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून ..
In reply to इस्लामच्या शिकवणीचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून .. by आरोह
@कसल्याही प्रकारचा चुकीचा
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
///असे का झाले हे समजण्यासाठी
In reply to ///असे का झाले हे समजण्यासाठी by जयंत कुलकर्णी
ओक्के ., पुभाप्र.
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
सहमत आहे
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
बुवा,
In reply to बुवा, by पैसा
@बुवा, मी काय म्हणते जरा वाट
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
़जिहाद, करार आणि हिजरत
In reply to ़जिहाद, करार आणि हिजरत by पुष्करिणी
@प्रिंसिपल्स एक्मेकांपासून
In reply to @प्रिंसिपल्स एक्मेकांपासून by अत्रुप्त आत्मा
मला म्हणायचं होतं की जेव्हा
In reply to @कसल्याही प्रकारचा चुकीचा by अत्रुप्त आत्मा
जबरी अभ्यास,
अभ्यास करण्याजोगा लेख
इस्लामचा अभ्यास च्या ऐवजी कुराण चा अभ्यास वाचावे
छान लेख. मिपावर षड्डू ठोकून
सामान्य
लेख अतिशय उत्तम आहे.
In reply to लेख अतिशय उत्तम आहे. by विशाखा पाटील
@मुअविय्या आणि अली यांच्यात
In reply to लेख अतिशय उत्तम आहे. by विशाखा पाटील
// - इथे थोडा गोंधळ वाटतोये.
अभ्यासपूर्ण
माहितीपूर्ण लेख.पुभाप्र
लेखन आवडले.
जयंत साहेब - तुमचा लेख उतम च
In reply to जयंत साहेब - तुमचा लेख उतम च by प्रसाद१९७१
@कोणी बाँम्ब फोडुन निरपराध
In reply to @कोणी बाँम्ब फोडुन निरपराध by अत्रुप्त आत्मा
सगळ्याच धर्मांच्या मूळ
In reply to सगळ्याच धर्मांच्या मूळ by प्रसाद१९७१
रैट्ट!
In reply to @कोणी बाँम्ब फोडुन निरपराध by अत्रुप्त आत्मा
"तुम्ही खय्रा इस्लामिक
In reply to "तुम्ही खय्रा इस्लामिक by गुलाम
हा हा हा.
In reply to "तुम्ही खय्रा इस्लामिक by गुलाम
हि अंतरप्रवाहांवरची राजकारण
In reply to हि अंतरप्रवाहांवरची राजकारण by अत्रुप्त आत्मा
अहो राजकारण कुठे नाहिये??
In reply to अहो राजकारण कुठे नाहिये?? by गुलाम
गुलाम तुमच्याशी सहमत आहे
In reply to गुलाम तुमच्याशी सहमत आहे by मारवा
मी एकंदर प्रतिसाद द्यायचा
खूप मोठे मोठे लोक बोलून गेले
अभ्यासपूर्ण लेख! म्हणजे
अप्रतिम लेख
हा माहितीपट काही वर्षांपूर्वी
इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे
In reply to इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे by तुडतुडी
१ ७७ पंथ असतीलही. आता आपण
In reply to १ ७७ पंथ असतीलही. आता आपण by जयंत कुलकर्णी
दगड
In reply to दगड by कपिलमुनी
सहमत.
In reply to दगड by कपिलमुनी
हज्जार टक्के सहमत...
In reply to दगड by कपिलमुनी
@अल्लाह आणि कॄष्णावताराचा
माहितीपूर्ण लेख
माहीतीपूर्ण लेखन जयंतराव.
In reply to माहीतीपूर्ण लेखन जयंतराव. by अभ्या..
+१
अतिशय उत्तम लेख
In reply to अतिशय उत्तम लेख by नीलकांत
तबलीगी जमात
In reply to तबलीगी जमात by बोका-ए-आझम
तबलीग जमात हा
In reply to तबलीग जमात हा by नीलकांत
सुन्नी परंपरेप्रमाणे दर्गा,
In reply to तबलीग जमात हा by नीलकांत
जेद्दा
उत्तम अभ्यास आणि माहितीपूर्ण
रोचक... वाचतोय.
याच्यातील "खिक" हे कुत्सित