काय? तुम्ही कधी कोणाचे नवीन डाएट प्रयोग नाही ऐकलेत? तुमच्या ओळखीत कोणीच जाड,
अति सडपातळ, मधुमेही किंवा हेल्थ कॉन्शियस नाहीत का? मला तर हमखास सगळे
त्यांच्या नवीन आहार प्रयोगांबद्दल सांगतात आणि प्रत्येकाला त्यांचा प्रयोग
किती वैज्ञानिक आहे हे मला पटवून द्यायचं असतं. हा माझ्या व्यवसाया मुळे
उत्पन्न झालेला धोका पण असू शकतो. असो. आज मी तुम्हाला अश्याच काही
प्रयोगांबद्दल सांगणार आहे, अर्थात ज्यांनी कोणी मला हे प्रयोग/स्वानुभव
सांगितले त्यांना मी त्यांचा तर्क कसा चुकीचा आहे हे सांगून पण पटलं असेल
ह्याची मला खात्री नाहीये, कारण अश्या व्यक्तींचा काही काळ (म्हणजे प्रयोग
निरर्थक आहे हे लक्षात येई पर्यंत) तरी त्यांच्या त्या नवीन उपक्रमावर अगाध
श्रद्धा असते.
- दुधी/कोरफड/कारलं ई. रस सकाळी निर्ष्या पोटी पिणे:
हे फॅड गेल्या बऱ्याच वर्षांपासून टिकून आहे. हल्ली तर औषधांच्या दुकानात पण
असे रस/ज्युस डबाबंद मिळतात. मागे मी समजावल्या प्रमाणे, कुठल्याही ज्युस मधून
साखर वगळता इतर काही पोषण मिळत नाही. आणि जे लोकं वरील ज्युस पिऊन आमचं १० किलो
वजन कमी झालं किंवा तत्सम दावा करतात त्यांचा रोजचा आहार पण निश्चित आधी पेक्षा
त्यांनी कमी केलेला असतो. कारण कॅलरी कमी केल्या शिवाय वजन कायम स्वरूपी कमी
होतंच नाही.
- झिरो फॅट मील :
हा तसा अलीकडेच प्रसिद्ध झालेला प्रयोग आहे. ह्यात दिवसातलं एकदाचं खाणं फॅट
फ्री असण्याचा आग्रह असतो. पण त्यात मग लोकं काही पण 'फॅट फ्री' म्हणून खपवतात.
उ.दा. उकडलेला दलिया व त्यात भाज्या, दही, चाट मसाला, जिरं मिरची असं करून
खाणं. किंवा फक्त दह्यातली कोशिंबीर करून खाणे. असं करणाऱ्यांचा हा समज असतो कि
फोडणी घातली नाही म्हणजे पदार्थ फॅट फ्री झालं. पण आहो, त्या दह्यातल्या आणि
दलियात (नगण्य) असलेल्या फॅट चे काय? शिवाय आपल्या शरीरातल्या पाचक रसात सर्व
प्रकार चे अन्न पचवण्याचे रसायन असतात, फॅट सुद्धा. त्यामुळे असं कुठलं पोषक
तत्व वगळून जेवणं हानिकारक ठरतं. उगीच जेवणाच्या वेळी असे भलतेच पदार्थ खायचे
आणि मग दुपारच्या चहा बरोबर खारी, नान खटाई आणि चकल्या/चिवडा चापायचा. हे कसलं
डाएट?
- तेल मालिश आणि स्टीम बाथ (सौना):
कोणाला नाही आवड्णार आरामात मालिश करून घेत पडून रहायला आणि असच आरामात काही कष्ट न घेता वजन कमी करायला? मला पण आवडेल, असं खरंच होत असतं तर! पण मालिश करून फ़क्त एकाच व्यक्तिला व्यायाम मिळतो - मालिश करून देणाऱ्याला!! आपल्याला मिळतो तो फक्त आराम - सोबत रक्त भिसरण वाढणे आणि शिथिल झालेली त्वचा थोडी टवटवीत होणे असे पण परिणाम दिसतात, पण वजन मात्र 'जैसे थे' राहते.
दूसरा प्रकार म्हणजे एका खोलीत बसून / झोपून भरपूर घामाघूम होण्याचा. त्या स्टीम बाथ (सौना) मधे घाम पुष्कळ गाळला जातो आणि त्या मुळे लगेच अर्धा ते दोन किलो वजन पण कमी झालेले काट्यावर दिसते; पण थोड्या वेळाने घरी जाऊन पाणी प्यायलात जेवलात कि वजन पूर्ववत होते. ह्या प्रकारात वरचेवर 'डीहायड्रेशन' होऊन काही काळानंतर त्या व्यक्तींना 'किडनी स्टोन' होण्याचा धोका असतो.
मी समजू शकते कि आहारावर नियंत्रण ठेवणं आणि व्यायाम करणं ह्या खूप धीर आणि मनोबल लागणाऱ्या गोष्टी आहेत; पण काय करणार? जेवढी मेह्नात वजन वाढायला लागलेली असते, तेवढेच परिश्रम ते कमी करायला पण घ्यावेच लागणार. आरोग्याला सांभाळण्याचा काही शॉर्ट कट नसतो!
प्रतिक्रिया
11 Jul 2011 - 6:31 pm | गवि
पण मालिश करून फ़क्त एकाच व्यक्तिला व्यायाम मिळतो - मालिश करून देणाऱ्याला!!
............
Hehehe.. :)
Hillarious.
Great article.
11 Jul 2011 - 6:40 pm | प्रियाली
लेख आवडला. या दुधीच्या रसाचे फ्याड हल्ली फार वाढल्याचे पाहिले आहे.
हेहेहे! मलाही हे वाक्य आवडले.
पण "एकादशी दुप्पट खाशी"प्रमाणे डाएट न करता इमाने इतबारे ते करणारे लोकही असतील ना! म्हणजे जेवणात कोशिंबीर आणि चहासोबत खारी चिवडा न खाता चहासोबतही डाएट करणारेही असतील. त्यांचा उहापोह लेखात न झाल्याने लेख एकतर्फी वाटला.
11 Jul 2011 - 8:00 pm | शाहिर
तुमचा मत किन्वा अनुभव ऐकायला आवडेल ..
12 Jul 2011 - 12:42 pm | खादाड अमिता
मला फोन करा. :)
11 Jul 2011 - 10:20 pm | प्राजु
>>>>पण मालिश करून फ़क्त एकाच व्यक्तिला व्यायाम मिळतो - मालिश करून देणाऱ्याला!! <<<
एकदम ठ्ठ्यॉ करून हसले!
अगदी खरंय हे.
अमिता.. तुझे लेख आले की आवर्जून वाचतेच मी.
मस्तच!
11 Jul 2011 - 10:45 pm | पंगा
वजन वाढायला मेहनत घ्यावी लागते?
(जबड्याचा व्यायाम??????)
तेवढेच परिश्रम पुरतात?
11 Jul 2011 - 11:03 pm | गवि
जेवढी मेह्नात वजन वाढायला लागलेली असते
वजन वाढायला मेहनत घ्यावी लागते?
+१ आक्षेपाशी सहमत..
12 Jul 2011 - 8:52 am | स्पा
वजन वाढायला मेहनत घ्यावी लागते?
+१ आक्षेपाशी असहमत
हो हो हो
त्रिवार हो
लागते मेहनत वजन वाढवायला :D
13 Jul 2011 - 2:32 pm | मनराव
मग तुझी मेहनत भलतीकडेच होते आहे.....तिकडे मेहनत कमी करून वजन वाढण्यासाठी मेहनत कर.......
15 Jul 2011 - 11:47 am | वपाडाव
ए मन्या...
४ क्विंटल गहु रिचवल्यागत काय बोलतोय ??....
अरे तुझं (सुद्धा) वजन किती अन बोलतोय किती?
@स्पा :: वजन वाढवायला बिल्कुल मेहनत घ्यावी लागत नाही....
फक्त चापाचापी करावी लागते... अन डोक्यातील विकार/विचार दुर ठेवावे लागतात....
२-३ महिन्यात गविंची बरोबरी नाही ना केलिस तर बघ.....
15 Jul 2011 - 12:09 pm | स्पा
२-३ महिन्यात गविंची बरोबरी नाही ना केलिस तर बघ.....
खिक
=)) =)) =)) =))
15 Jul 2011 - 12:28 pm | गवि
नको नको.. स्पाला वाचवा..
असली बरोबरी नको. स्वतःखालीच चिरडले जाण्याची घटना अजून घडली नाहीये आणि न घडो..
12 Jul 2011 - 12:45 pm | खादाड अमिता
आपल्या नकळत वजन वाढवायला पण आपलं शरीर खूप मेहनत घेत असतं. एका रात्रीत ५० किलो चं ६० किलो कोणीच होत नाही. तसंच वजन कमी करायला पण शरीराला परिश्रम घ्यावे लागतात.
पटत नसेल तर स्पा ला बघा विचारून. :)
11 Jul 2011 - 10:49 pm | विजुभाऊ
हम्म.. बरेच दिवस विचारेन म्हणतोय.नुसतेच कच्चे पदार्थ ( फक्त भाज्या आणि फळे वगैरे ) आहारात घेतले तर वजनात फरक पडेल का?
11 Jul 2011 - 11:19 pm | मी-सौरभ
फरक तो पडेंगाच :)
वजन वाढेल की घटेल ते मात्र माणसा माणसावर अवलंबून आहे.
12 Jul 2011 - 12:49 pm | खादाड अमिता
जेवताना कच्च्या भाज्या किंवा फळं खाल्ली आणि मग टी टाईम ला भजी खाऊन पोट भरलं तर वजनात काही फरक नाही पडणार. पण, बाकी आहार पण संतुलित असेल तर भाज्या आणि फळं खाऊन चांगलं फायबर मिळेल आणि पोट पण भरल्या सारखे वाटेल. इतर जीवनसत्व आणि खनिज मिळतील ती वेगळी.
12 Jul 2011 - 3:43 am | धनंजय
मालिश करणार्याला एकट्याला व्यायाम -- हाहा!
12 Jul 2011 - 6:22 am | निवेदिता-ताई
वजन वाढेल की घटेल ते मात्र माणसा माणसावर अवलंबून आहे
बरोबर आहे.......कच्चे पदार्थ ( फक्त भाज्या आणि फळे वगैरे ) आहारात किती घेताय यावर अवलंबून आहे...;)
12 Jul 2011 - 7:08 am | सहज
तुमच्याकडे एखादा तक्ता आहे का?
की माणसाचे वजन, वय, स्त्री/ पुरुष, एका दिवसाला लागणार्या/ गरजेच्या कॅलरीज (बैठे काम करणार्या व्यक्तीला), दिवसभरात त्या कॅलरी मिळवण्याकरताचा आहार (आता इथे सर्वसाधारण आहार उगा फॅट फ्री, कमी तेल, बदली तेल प्रकार नको, समजा खानावळीतले अन्न असेल उदा दोन पोळ्या , एक वाटी/ अमुक ग्रॅम भाजी / उसळ / आमटी इ.)
इथे तुम्ही दिलेल्या आहारापेक्षा थोडासा कमी आहार दिवसात ग्रहण केला व किंचीतसा व्यायाम वाढवला. तर वजन जरी कमी झाले नाही तरी ते किमान वाढू नये ना?
हेही चुकीचेच वाटतेय का?
12 Jul 2011 - 9:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे वाक्य समजलं नाही. जे शरीरातच असतं त्यावर काय खाल्लं, न खाल्लं याचा काय आणि कसा फरक पडणार? स्निग्ध पदार्थ पचवल्यामुळे आपण जाडे होत नसून, ते शरीरात चरबीरूपात साठवले गेल्यामुळे जाडे होतो. (असं आम्हाला शाळेत शिकवलं आहे.)
दलिया, मोड आलेलं कडधान्य, आणि कोणतीतरी भाजी अशी बिनाफोडणीची, मीठ, हळद-हिंग घातलेली खिचडी पोटभर खाल्ल्यानंतर पोट किती तुडुंब भरतं हे सांगणारे तुम्हाला कोणी भेटले नसावेत. साधारण दोन वर्ष, आठवड्यातले चारेक दिवस असं जेवण मी रात्री जेवले आहे. अर्थात हे खाण्यात सोय महत्त्वाची होती, वजन कमी करणे हे ध्येय नव्हतं.
बरं उकडलेला दलिया, भाजी, दही यातून सर्व प्रकारचं पोषण तर मिळालंच की! दलिया आणि भाजीतून चोथा आणि पिष्टमय पदार्थ, भाजीतून व्हीटामिन्स आणि दह्यातून प्रथिनं आणि कॅल्सियम, थोडेफार स्निग्ध पदार्थ हे झालंच. सुप्रसिद्ध आणि पोषक 'मराठी जेवणात' यापेक्षा वेगळं काय असतं? मिरची (ज्यातून काही पोषण मिळत नाही) आणि थोड्या अधिक प्रमाणात तेल, तूप!
अमकं खाऊ नका यापेक्षा काय खा असा काही पॉझिटीव्ह लेख का नाही कधी वाचायला मिळत? धर्माच्या शिकवणीसारखं झालं हे, अमकं केलं की नरकात जाल आणि तमकं केलं की सात जन्म किडा व्हाल असलं काहीसं.
अवांतर:
मला विचारला गेलेला एक प्रश्नः तू रोज व्यायाम का करतेस?
माझं उत्तरः सोप्पंय, वाट्टेल ते खाल्लं, प्यायलं तरी आकार वाढून पुन्हा कपडे खरेदी करायला लागू नये म्हणून!
12 Jul 2011 - 1:03 pm | खादाड अमिता
३_१४ विक्षिप्त अदिती ,
<स्निग्ध पदार्थ पचवल्यामुळे आपण जाडे होत नसून, ते शरीरात चरबीरूपात साठवले गेल्यामुळे जाडे होतो. (असं आम्हाला शाळेत शिकवलं आहे.)> मला सांगा, कुठला हि पदार्थ शरीरात न पचताच साठवला जातो का? चरबी साठून जाडी वाढते हे बरोबर, पण लेखात मांडलेला मुद्दा असा आहे कि एक वेळ च्या जेवणात उगीच फॅट वगळण्याचा प्रयत्न करून इतर वेळी तळलेले पदार्थ खाल्ले तर त्या फॅट फ्री पदार्थ खाण्याला काही अर्थ रहात नाही.
<जे शरीरातच असतं त्यावर काय खाल्लं, न खाल्लं याचा काय आणि कसा फरक पडणार? > जाड माणसांच्या शरीरात साधारण सर्व पोषक तत्व साठलेले असतात. त्याचा अर्थ हा होत नाही कि त्यांना काहीच खायची गरज नसते.
<अमकं खाऊ नका यापेक्षा काय खा असा काही पॉझिटीव्ह लेख का नाही कधी वाचायला मिळत? धर्माच्या शिकवणीसारखं झालं हे, अमकं केलं की नरकात जाल आणि तमकं केलं की सात जन्म किडा व्हाल असलं काहीसं.> तुम्ही माझे आधीचे लेख वाचले नाहीत बहुतेक. बरेच लेख लिहिलेत एव्हाना 'काय खा' हे सांगणारे. हे घ्या.. तुमच्या साठी लिंक इथे देतीये.
http://wp.me/p1eb9S-3H
http://wp.me/p1eb9S-2Y
http://wp.me/p1eb9S-2E
http://wp.me/p1eb9S-2B
http://wp.me/p1eb9S-2q
12 Jul 2011 - 1:08 pm | खादाड अमिता
गवि, प्राजू, प्रियाली, धनंजय - अनेक आभार. :)
12 Jul 2011 - 9:26 pm | पंगा
माझे आभार मानले नाहीत.
लक्षात ठेवीन.
13 Jul 2011 - 2:13 pm | चिमी
मस्त :-)
मिपावरच्या लेखापेक्शा प्रतिक्रिया वाचायला छान वाटते
स्पेशली स्पावड्या , अमिता , गगनविहारि