तिच्या डोळ्यातली व्यथा , कुणी नाही रे जाणली
तुका वैकुंठासि गेले, मागे राहिली आवली
सावधान म्हणताच, पाशातून सुटलात
तुम्ही झालात समर्थ, ती गजाआड खोळंबली
तिची प्रीती तिची भक्ती, काळापार कान्ह्यासाठी
एका हाकेवर भोज ,त्याला मीरा ना लाभली
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
त्याचे घर भोगी पण, निजसूर्याची काहली
प्रतिक्रिया
31 Jan 2015 - 1:00 pm | चाणक्य
अजून थोडी लिहायचीत ना
31 Jan 2015 - 1:09 pm | अत्रुप्त आत्मा
येकदम ऐसाइच बोल्ता है...! सुरवात झाली आणि...संपली पण! :-/
31 Jan 2015 - 4:35 pm | चुकलामाकला
धीट कस्तुरबा एक, बाकी यशोदा, कमला
होते तेजाची आरती, मूक थांबली सावली..
31 Jan 2015 - 1:44 pm | तुषार काळभोर
मी कवितेच्या वाटेला कधी जात नाही. पण शीर्षकावरून उत्सुकतेने धागा उघडला. 'मोठे' होऊन वैकुंठाला गेलेल्या तुकोबांच्या छायेतील 'आवली' अपेक्षित होती. पण एका एका कडव्यात एकएक कथा आणि व्यथा मांडलीत.
आवली तरी कुठेतरी माहिती असते, पण 'नारायणा'ची वधू... ती तर कुठेच नसते. ही कविता वाचेपर्यंत कधी विचारही आला नव्हता की, अरे! नारायण 'समर्थ' झाला, पण 'त्या' मुलीचं काय?
आपल्या निर्मल भक्तीने मीरा अजरामर झाली, पण तिच्या नवर्याचे काय?
.
.
.
.
.
अनादी कालापासून योद्धे धारातीर्थी पडत आलेत, त्यातले कित्येक इतिहासात अजरामर होऊन गेले.
पण अलेक्झांडरपासून ते अशोकपर्यंत आणि हिटलर पासून ओसामापर्यंत विविध व्यक्तिंसाठी किंवा तत्वांसाठी लढणार्या, जीव देणार्या अनामिक व्यक्तिंच्या कुटुंबांचे काय झाले असेल?
कवितेतील आवली, नारायणाची अनामिक वधू, भोज यांच्यासारखेच नीजसुर्याची काहिली भोगणारे अगणित परिवार असतील. ही कविता त्या सर्वांची आठवण करून देते.
2 Feb 2015 - 8:30 am | चुकलामाकला
धन्यवाद !
अगदी हेच मांडायचे होते .
31 Jan 2015 - 2:53 pm | पैसा
खूप छान कविता!
31 Jan 2015 - 4:25 pm | अजया
सुरेख कविता.उपेक्षितांचे अंतरंग म्हणावे काय?
31 Jan 2015 - 4:26 pm | काकाकाकू
आवडली.
31 Jan 2015 - 4:52 pm | विशाल कुलकर्णी
कविता खूप सुंदर आहे पण यात मांडलेल्या प्रश्नांशी पूर्णपणे सहमत नाही.
पहिला मुद्दा तुकोबांचा. ते सदेह वैकुंठगमन वगैरे मला मान्य नाही. राहता राहिला प्रश्न संसाराचा तर तुकोंबानी शेवटपर्यंत आवलीला अथवा मुलाबाळांना अंतर दिल्याचे ऐकिवात नाही. लग्नानंतर मुले बाळे झाली म्हणजे तिच्या कुठल्या ऐहिक इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणावे तर तसेही दिसत नाही.
समर्थांची कथा. जर लग्न झाल्यानंतर नारायण पत्नीला वा-यावर सोडून पळाला असता तर? उलट तसे न करता त्याने तिच्यासाठी नव्या आयुष्याची एक संधी ठेवली होती असेच म्हणावे लागेल.
राहता राहिला मीरेचा प्रश्न. इथे भोजराजाबद्दल थोड़ी सहानुभूती नक्कीच आहे. पण जर मीरेचे आयुष्य पाहीले तर १५१६ मध्ये तीचा विवाह झाला आणि १५२३ मध्ये भोजराजाचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईकानी तिचा छळच केलेला दिसून येतो. अगदी विषप्रयोगही केला गेला तिच्यावर. त्यानंतरच तिने घर सोडले आणि तत्कालीन द्वारिकेकडे प्रस्थान केले.
या तिन्ही प्रसंगातील दुर्दैवी व्यक्तीबद्दल सहानुभूती नक्कीच आहे. पण त्याचा दोष त्याच्या जोड़ीदाराला देणे हे मात्र मला पटत नाही.
31 Jan 2015 - 9:44 pm | पैसा
मोठ्या माणसाच्या तेवढ्या मोठ्या नसलेल्या जोडीदाराचे दु:ख अशी काहीशी कविता आहे. कविता म्हणून खूप आवडली. म्हणूनच इथे लिहायचे टाळले होते.
मात्र समर्थ खरेच बोहोल्यावरून पळाले का? ते लग्नाआधीच पळाले असे काहीसे हल्लीच वाचले होते. त्या मुलीचे दुसरा नवरा बघून लग्न झाले असेही वाचले होते.
मीराबाईचा नवरा भोजराजा जिवंत असेपर्यंत ती काही वृंदावन किंवा द्वारकेला गेली नव्हती. तो गेल्यानंतर छाळ जास्त झाला तशी ती घरातून निघून गेली. तेव्हा ती आपल्या गृहिणीकर्तव्यात चुकली असेल असे काही निश्चित म्हणता येणार नाही.
31 Jan 2015 - 10:43 pm | प्रचेतस
विशालशी सहमत.
2 Feb 2015 - 8:25 am | चुकलामाकला
प्रथम धन्यवाद!
या कवितेत कुठलाही प्रश्न केलेला नाही किंवा कुणाला दोष देखील दिलेला नाही . फक्त थोर लोकांच्या घरच्यांना विशेषत: जोडीदाराला (कदाचित) जाणवलेला एकटेपणा मांडलाय .
तुकारामाचे सदेह वैकुंठास जाणे , अभंग नदीवर तरुन येणे ही फक्त प्रतिके आहेत , इथेही त्याचा उल्लेख प्रतीकात्मक आहे,
आवली आणि संत तुकाराम हे फार गोड दाम्पत्य होते . तुकारामांनी कधी तिला अंतर व त्रास दिला नाही, पण त्यांच्या सर्वाना मदत करण्याच्या स्वभावामुळे, ऐहिक गोष्टीतील त्यांच्या उदासीनतेमुळे ती कधी कधी त्रागा करे . आवलीचा हा त्रागा निष्पाप आणि खरा होता .
समर्थांच्या सर्वज्ञात कथेप्रमाणे ते बोहल्यावरून पळाले आणि त्यांच्या पत्नीचा सांभाळ समर्थांच्या आईने केला . समर्थांच्या पत्नीने दुसरे लग्न केले नाही, तो काळ तसा नव्हता .
मीरेला राजा भोजच्या मृत्युनंतर सासरच्यांनी खूप त्रास दिला आणि म्हणून तिला घर सोडावे लागले असे म्हणतात . पण राजा भोजाचे तिच्यावर प्रेम होते, त्याने दुसरे लग्न करायला नकार दिला होता . पण पत्नी मनाने आपल्या बरोबर नाही याची खंत त्याला होती . पुढे तिची कृष्णभक्ती त्याने समजूनही घेतली. कवितेतील व्यथा ही त्यांच्या सहजीवनाबद्दल आहे, मीरेच्या घर सोडून जाण्याबद्दल नाही .
समर्थ,तुकाराम , मीराबाई, गंदी, टिळक सावरकर ई सर्व थोर लोकांचे समाजावर अगणित उपकार आहेत. त्यांनी त्यावेळी जर घरादाराचा त्याग केला नसता तर हे महत्कार्य त्यांच्या हातून झालेही नसते कदाचित. पण त्यांच्या जोडीदारांनी सहन केलेली खंत व त्याग तितकाच खरा आहे , याचा उल्लेख केल्याने त्यांचे मोठेपण तसूभरही कमी होत नाही .
विशाल राव वृक्ष कोण तोडतेय? आज इतक्या वर्षांनंतरही त्याची छाया आम्हा पामरास अनुभवता येते हे आमचे परमभाग्य! पण या उल्लेखाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी !
2 Feb 2015 - 8:27 am | चुकलामाकला
माफ करा गंदी नाही गांधी
2 Feb 2015 - 10:18 am | विशाल कुलकर्णी
नाही नाही चुकलामाकलासाहेब, रोष तुमच्यावर नाही, गैरसमज नसावा. माझ्या धाग्यावर हितेशभाऊंनी जी वक्तव्ये केली आहेत त्याबद्दल होते ते. तुमच्या भावना पूर्णपणे पोचल्या आणि त्या मीच काय कोणीच नाकारू शकत नाही.
5 Feb 2015 - 4:03 pm | पैसा
http://khattamitha.blogspot.in/2008/03/blog-post_17.html
6 Feb 2015 - 8:31 am | चुकलामाकला
हे महित नव्हते.!
7 Nov 2017 - 9:40 am | विनिता००२
समर्थांची कथा. जर लग्न झाल्यानंतर नारायण पत्नीला वा-यावर सोडून पळाला असता तर? उलट तसे न करता त्याने तिच्यासाठी नव्या आयुष्याची एक संधी ठेवली होती असेच म्हणावे लागेल.>> संधी कशी?? मांडवातून नवरदेव निघून गेला याचे खापर त्या निष्पाप नवरीवरच फुटणार ना? सामाजिक दृष्ट्या तिला तर काही भविष्यच उरले नाही.
31 Jan 2015 - 8:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थीम आवडली.
-दिलीप बिरुटे
31 Jan 2015 - 10:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
विशाल वृक्षाखालच्या गवतावर नेहमीच कमी सूर्यप्रकाश पडतो... जग असंच असतं हो :(
31 Jan 2015 - 11:26 pm | मुक्त विहारि
+ १
1 Feb 2015 - 9:59 am | विशाल कुलकर्णी
विशाल वृक्षाखालच्या गवतावर नेहमीच कमी सूर्यप्रकाश पडतो..
मान्य. गंमत या गोष्टीची वाटते की त्यात ना वृक्षाचा दोष असतो ना गवताला त्याची खंत असते. पण जेव्हा काहीजण शेकडो वाटसरुना सावली देणाऱ्या वृक्षाला त्याने गवताला मिळणारा सूर्यप्रकाश अडवला म्हणून दोष देतात किंवा तोडायला निघतात तेव्हा मात्र त्या वेडेपणाचे नक्कीच हसु येते.
3 Feb 2015 - 11:11 am | hitesh
ंमिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण झाड - गवत असे न ठरता झाड - बांडगूळ असे ठरते. हे लक्षात आले म्हणजे मग मिराबैला दोष देणे चुकीचे ठरत नाही.
पण धर्म , देव ही झापड लावलेली असली की मग झाड - गवत हाच दृष्टांत आठवणार . असो.
3 Feb 2015 - 11:35 am | विशाल कुलकर्णी
मिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण झाड - गवत असे न ठरता झाड - बांडगूळ असे ठरते. हे लक्षात आले म्हणजे मग मिराबैला दोष देणे चुकीचे ठरत नाही.
पण धर्म , देव ही झापड लावलेली असली की मग झाड - गवत हाच दृष्टांत आठवणार . असो.
हेच उलट म्हणायचे झाल्यास, जर सारासारविचार बुद्धीचा वापर केला तर देव, धर्म या गोष्टी फार मागे राहतात. पण तुमचे झालेय काय? की तुम्ही नाही नाही म्हणता म्हणता या गोष्टींमध्ये (विरुद्ध बाजुने का असेना) पण इतके अडकला आहात की एखाद्या गोष्टीतली सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा दोषच शोधायला लागता. शुभेच्छा !
3 Feb 2015 - 11:47 am | hitesh
सौंदर्यस्थळाने स्वतःच्या जिवावर जगावे , दुसर्यावर बांडगूळ होऊन नव्हे.
समर्थानी संसार मांडण्याआधीच पळ काढला . किती बरे झाले ! त्यामुळे त्या बिचार्या मुलेला दुसरा ऑप्शन मिळाला असे समर्थन करणारे लोक मिराबैच्या आडमुठेपणामुळे नवर्याला मात्र दुसरा ऑप्शन मिळु शकला नाही, हे मात्र मान्य करत नाहीत , याची गंमत वाटते.
3 Feb 2015 - 1:27 pm | विशाल कुलकर्णी
सौंदर्यस्थळाने स्वतःच्या जिवावर जगावे , दुसर्यावर बांडगूळ होऊन नव्हे.
स्वतःचा मुर्खपणा सिद्ध करण्याची एवढी कसली हौस म्हणतो मी. 'सौंदर्यस्थळं' हा शब्द मी मीरेच्या साहित्याबद्दल वापरला होता. तुम्ही पुन्हा स्वतःला सोयिस्कर तो अर्थ घेतलात. म्हणूनच म्हटलं होतं मी "तुम्हाला सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा त्यातले दोष शोधण्यातच जास्त स्वारस्य असते."
बाकी मीरेने किंवा तिच्या नवर्याने किंवा कुणीही कसे जगावे , काय करावे हे सांगण्याचा मला काय किंवा तुम्हाला काय, कुणालाच कसलाही अधिकार नाही? आणि मीरेमुळे तिच्या नवर्याला पर्याय मिळू शकला नाही हे कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही? तीचं संसारात ल़क्षच नव्हतं हे अगदी तिची चुक म्हणून जरी कबूल केलं तरी मग तिच्या नवर्याने अजुन चार लग्ने केली असती तर तिला काहीच फरक पडण्यासारखा नव्हता.
अहो स्त्रीयांना किंमत देणारे नवरे आजसुद्धा रेअरली सापडतात ( अगदी तुम्ही सुद्धा आपल्या पत्नीबाबत एक विक्षीप्त विधान करुन त्या मावलीची चारचौघात शोभा केलीत)
( .. बहिणीच्या नवर्याला संपुर्ण पगार देणार , त्याच्यावर सर्वस्व अर्पणार वगैरे बाता मारुन ,संसार सोडुन , मिरेची 'कृष्णभक्ती ' स्वीकारुन , नवरा सोडलेल्या व चार वर्षानी ' उंबरठा ' षिनेमाच्या निराश स्मिता पाटीलप्रमाणे पुन्हा संसारात परतलेल्या आधुनिक मिराबैचा दु:खी नवरा ..उर्फ.. हितेशभौ ! ).
आणि तुम्ही त्या काळी स्त्रीयांना फार मान वगैरे असेल अशी अपेक्षा करताय? स्वतःवरुनच ठरवा की....
शुभेच्छा !
3 Feb 2015 - 1:39 pm | hitesh
मीही तो शब्द मिरेच्या साहित्याबाबतच वापरलाय.
नवरा चार बायका करु शकतो , मग एका बैचे संसारात लक्ष नसले तर बिघडले कुठे ? ..... तुमच्या या युक्तिवादाला सलाम !
3 Feb 2015 - 2:15 pm | विशाल कुलकर्णी
नवरा चार बायका करु शकतो , मग एका बैचे संसारात लक्ष नसले तर बिघडले कुठे ?
काय गैर आहे त्यात? एक स्त्री म्हणून तिलासुद्धा तेचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहेच की.
1 Feb 2015 - 6:15 pm | विवेकपटाईत
एका स्त्रीला सम्राज्ञी पद भोगायला मिळाले नाही.....
3 Feb 2015 - 11:52 am | पिशी अबोली
सुंदर.. खूप आवडली..
5 Feb 2015 - 7:03 am | इन्दुसुता
कविता आवडली
सर्व थोर लोकांचे समाजावर अगणित उपकार आहेत. त्यांनी त्यावेळी जर घरादाराचा त्याग केला नसता तर हे महत्कार्य त्यांच्या हातून झालेही नसते कदाचित. पण त्यांच्या जोडीदारांनी सहन केलेली खंत व त्याग तितकाच खरा आहे , याचा उल्लेख केल्याने त्यांचे मोठेपण तसूभरही कमी होत नाही .
याच्याशी पूर्ण सहमत.
5 Feb 2015 - 7:09 am | यशोधरा
कविता अतिशय आवडली. सुरेख!
5 Feb 2015 - 3:54 pm | गणेशा
अप्रतिम कविता आहे.. कवितेमागिल आशय .. व्यथा पण एकदम सहज जाणवणारे
6 Feb 2015 - 12:37 am | ज्योति अळवणी
योग्य शब्दात अचूक वर्णन
6 Feb 2015 - 8:54 am | पाषाणभेद
कविता खुप खुप आवडली.
6 Feb 2015 - 10:37 am | चुकलामाकला
धन्यवाद!
5 Nov 2017 - 7:50 pm | रेवती
सुरेख लिहिलिये.
5 Nov 2017 - 8:29 pm | बाजीप्रभू
त्यानिमित्ताने आलेल्या प्रतिसांदानी माहितीतहि भर पडली..
6 Nov 2017 - 11:00 am | प्राची अश्विनी
एवढी जुनी कविता कशी काय वर आली ?
6 Nov 2017 - 11:38 am | पुंबा
फार फार आवडली. बेस्ट २० मध्ये असेल ही मिपाकवितांमध्ये.(माझ्यासाठी तरी)
6 Nov 2017 - 12:07 pm | बंट्या
खूप सुंदर
6 Nov 2017 - 1:29 pm | स्वाती दिनेश
कविता आवडली, प्रतिसादही माहितीपूर्ण.
स्वाती
7 Nov 2017 - 2:27 am | रुपी
छान कविता.. आवडली..
(व.पुं.ची, की दुसर्या कोणाची?) 'उर्मिला' या कथेची आठवण करुन देणारी. त्यातही वनवासात गेलेल्या 'राम-सीता-लक्ष्मण' यांच्याबद्दल एवढं लिहिलं गेलंय, पण मागे राहिलेल्या उर्मिलेबद्दल फार कुठे काही नाही, असा काहीसा आशय होता.
7 Nov 2017 - 6:17 am | एस
प्रख्यात हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांची 'यशोधरा' ही कविता आठवली.
सखि, वे मुझसे कहकर जाते,
कह, तो क्या मुझको वे अपनी पथ-बाधा ही पाते?
मुझको बहुत उन्होंने माना
फिर भी क्या पूरा पहचाना?
मैंने मुख्य उसी को जाना
जो वे मन में लाते।
सखि, वे मुझसे कहकर जाते।
स्वयं सुसज्जित करके क्षण में,
प्रियतम को, प्राणों के पण में,
हमीं भेज देती हैं रण में -
क्षात्र-धर्म के नाते।
सखि, वे मुझसे कहकर जाते।
हुआ न यह भी भाग्य अभागा,
किसपर विफल गर्व अब जागा?
जिसने अपनाया था, त्यागा;
रहे स्मरण ही आते!
सखि, वे मुझसे कहकर जाते।
नयन उन्हें हैं निष्ठुर कहते,
पर इनसे जो आँसू बहते,
सदय हृदय वे कैसे सहते?
गये तरस ही खाते!
सखि, वे मुझसे कहकर जाते।
जायें, सिद्धि पावें वे सुख से,
दुखी न हों इस जन के दुख से,
उपालम्भ दूँ मैं किस मुख से?
आज अधिक वे भाते!
सखि, वे मुझसे कहकर जाते।
गये, लौट भी वे आवेंगे,
कुछ अपूर्व-अनुपम लावेंगे,
रोते प्राण उन्हें पावेंगे,
पर क्या गाते-गाते?
सखि, वे मुझसे कहकर जाते।
- मैथिलीशरण गुप्त
7 Nov 2017 - 10:07 am | प्राची अश्विनी
सुंदर.