मागे राहिली आवली ......

चुकलामाकला जे न देखे रवी...
तिच्या डोळ्यातली व्यथा , कुणी नाही रे जाणली तुका वैकुंठासि गेले, मागे राहिली आवली सावधान म्हणताच, पाशातून सुटलात तुम्ही झालात समर्थ, ती गजाआड खोळंबली तिची प्रीती तिची भक्ती, काळापार कान्ह्यासाठी एका हाकेवर भोज ,त्याला मीरा ना लाभली जया अंगी मोठेपण तया यातना कठीण त्याचे घर भोगी पण, निजसूर्याची काहली
वर्गीकरण
लेखनविषय:

44 टिप्पण्या 7,605 दृश्ये

Comments

तुषार काळभोर नवीन

मी कवितेच्या वाटेला कधी जात नाही. पण शीर्षकावरून उत्सुकतेने धागा उघडला. 'मोठे' होऊन वैकुंठाला गेलेल्या तुकोबांच्या छायेतील 'आवली' अपेक्षित होती. पण एका एका कडव्यात एकएक कथा आणि व्यथा मांडलीत. आवली तरी कुठेतरी माहिती असते, पण 'नारायणा'ची वधू... ती तर कुठेच नसते. ही कविता वाचेपर्यंत कधी विचारही आला नव्हता की, अरे! नारायण 'समर्थ' झाला, पण 'त्या' मुलीचं काय? आपल्या निर्मल भक्तीने मीरा अजरामर झाली, पण तिच्या नवर्‍याचे काय? . . . . . अनादी कालापासून योद्धे धारातीर्थी पडत आलेत, त्यातले कित्येक इतिहासात अजरामर होऊन गेले. पण अलेक्झांडरपासून ते अशोकपर्यंत आणि हिटलर पासून ओसामापर्यंत विविध व्यक्तिंसाठी किंवा तत्वांसाठी लढणार्‍या, जीव देणार्‍या अनामिक व्यक्तिंच्या कुटुंबांचे काय झाले असेल? कवितेतील आवली, नारायणाची अनामिक वधू, भोज यांच्यासारखेच नीजसुर्याची काहिली भोगणारे अगणित परिवार असतील. ही कविता त्या सर्वांची आठवण करून देते.

चुकलामाकला नवीन

In reply to by तुषार काळभोर

धन्यवाद ! अगदी हेच मांडायचे होते .

विशाल कुलकर्णी नवीन

कविता खूप सुंदर आहे पण यात मांडलेल्या प्रश्नांशी पूर्णपणे सहमत नाही. पहिला मुद्दा तुकोबांचा. ते सदेह वैकुंठगमन वगैरे मला मान्य नाही. राहता राहिला प्रश्न संसाराचा तर तुकोंबानी शेवटपर्यंत आवलीला अथवा मुलाबाळांना अंतर दिल्याचे ऐकिवात नाही. लग्नानंतर मुले बाळे झाली म्हणजे तिच्या कुठल्या ऐहिक इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणावे तर तसेही दिसत नाही. समर्थांची कथा. जर लग्न झाल्यानंतर नारायण पत्नीला वा-यावर सोडून पळाला असता तर? उलट तसे न करता त्याने तिच्यासाठी नव्या आयुष्याची एक संधी ठेवली होती असेच म्हणावे लागेल. राहता राहिला मीरेचा प्रश्न. इथे भोजराजाबद्दल थोड़ी सहानुभूती नक्कीच आहे. पण जर मीरेचे आयुष्य पाहीले तर १५१६ मध्ये तीचा विवाह झाला आणि १५२३ मध्ये भोजराजाचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईकानी तिचा छळच केलेला दिसून येतो. अगदी विषप्रयोगही केला गेला तिच्यावर. त्यानंतरच तिने घर सोडले आणि तत्कालीन द्वारिकेकडे प्रस्थान केले. या तिन्ही प्रसंगातील दुर्दैवी व्यक्तीबद्दल सहानुभूती नक्कीच आहे. पण त्याचा दोष त्याच्या जोड़ीदाराला देणे हे मात्र मला पटत नाही.

पैसा नवीन

In reply to by विशाल कुलकर्णी

मोठ्या माणसाच्या तेवढ्या मोठ्या नसलेल्या जोडीदाराचे दु:ख अशी काहीशी कविता आहे. कविता म्हणून खूप आवडली. म्हणूनच इथे लिहायचे टाळले होते. मात्र समर्थ खरेच बोहोल्यावरून पळाले का? ते लग्नाआधीच पळाले असे काहीसे हल्लीच वाचले होते. त्या मुलीचे दुसरा नवरा बघून लग्न झाले असेही वाचले होते. मीराबाईचा नवरा भोजराजा जिवंत असेपर्यंत ती काही वृंदावन किंवा द्वारकेला गेली नव्हती. तो गेल्यानंतर छाळ जास्त झाला तशी ती घरातून निघून गेली. तेव्हा ती आपल्या गृहिणीकर्तव्यात चुकली असेल असे काही निश्चित म्हणता येणार नाही.

चुकलामाकला नवीन

In reply to by विशाल कुलकर्णी

प्रथम धन्यवाद! या कवितेत कुठलाही प्रश्न केलेला नाही किंवा कुणाला दोष देखील दिलेला नाही . फक्त थोर लोकांच्या घरच्यांना विशेषत: जोडीदाराला (कदाचित) जाणवलेला एकटेपणा मांडलाय . तुकारामाचे सदेह वैकुंठास जाणे , अभंग नदीवर तरुन येणे ही फक्त प्रतिके आहेत , इथेही त्याचा उल्लेख प्रतीकात्मक आहे, आवली आणि संत तुकाराम हे फार गोड दाम्पत्य होते . तुकारामांनी कधी तिला अंतर व त्रास दिला नाही, पण त्यांच्या सर्वाना मदत करण्याच्या स्वभावामुळे, ऐहिक गोष्टीतील त्यांच्या उदासीनतेमुळे ती कधी कधी त्रागा करे . आवलीचा हा त्रागा निष्पाप आणि खरा होता . समर्थांच्या सर्वज्ञात कथेप्रमाणे ते बोहल्यावरून पळाले आणि त्यांच्या पत्नीचा सांभाळ समर्थांच्या आईने केला . समर्थांच्या पत्नीने दुसरे लग्न केले नाही, तो काळ तसा नव्हता . मीरेला राजा भोजच्या मृत्युनंतर सासरच्यांनी खूप त्रास दिला आणि म्हणून तिला घर सोडावे लागले असे म्हणतात . पण राजा भोजाचे तिच्यावर प्रेम होते, त्याने दुसरे लग्न करायला नकार दिला होता . पण पत्नी मनाने आपल्या बरोबर नाही याची खंत त्याला होती . पुढे तिची कृष्णभक्ती त्याने समजूनही घेतली. कवितेतील व्यथा ही त्यांच्या सहजीवनाबद्दल आहे, मीरेच्या घर सोडून जाण्याबद्दल नाही . समर्थ,तुकाराम , मीराबाई, गंदी, टिळक सावरकर ई सर्व थोर लोकांचे समाजावर अगणित उपकार आहेत. त्यांनी त्यावेळी जर घरादाराचा त्याग केला नसता तर हे महत्कार्य त्यांच्या हातून झालेही नसते कदाचित. पण त्यांच्या जोडीदारांनी सहन केलेली खंत व त्याग तितकाच खरा आहे , याचा उल्लेख केल्याने त्यांचे मोठेपण तसूभरही कमी होत नाही . विशाल राव वृक्ष कोण तोडतेय? आज इतक्या वर्षांनंतरही त्याची छाया आम्हा पामरास अनुभवता येते हे आमचे परमभाग्य! पण या उल्लेखाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी !

विशाल कुलकर्णी नवीन

In reply to by चुकलामाकला

नाही नाही चुकलामाकलासाहेब, रोष तुमच्यावर नाही, गैरसमज नसावा. माझ्या धाग्यावर हितेशभाऊंनी जी वक्तव्ये केली आहेत त्याबद्दल होते ते. तुमच्या भावना पूर्णपणे पोचल्या आणि त्या मीच काय कोणीच नाकारू शकत नाही.

पैसा नवीन

In reply to by चुकलामाकला

http://khattamitha.blogspot.in/2008/03/blog-post_17.html
रामदासांच्या स‌र्व चरित्रांमध्ये हनुमंतस्वामींची बखर जास्त प्रमाण मानली जाते. या कथेबद्दल हनुमंतस्वामी लिहितात - "पुढे कोणे एके दिवशी श्रेष्ठीस (म्हणजे स‌मर्थांचे थोरले बंधू) मातोश्री आज्ञा करिती जाहली की, नारोबाचे लग्न करावे. श्रेष्ठीने उत्तर केले की, नारोबाचे लग्न कराल, तर नारोबा हातातून जाईल आणि आपणास बहुत दुःख होईल. ही गोष्ट कामाची नाही. मातोश्री बोलली की, आपला वंश फार नाही. वंशवृद्धी जाहली पाहिजे. यास्तव अवश्यमेव लग्न कर्तव्य आहे. असे म्हणून वधूचा शोध करू लागली...." "... नंतर मातोश्रींनी विचार केला की लग्नाची गोष्ट काढली असता हा असे (म्हणजे रामदास पिसाळल्यासारखे वागत वगैरे) करतो. तरी यास काही बोध करावा असे मनात आणून त्यास एकांती बोलावून बोलली की, बापा मी सांगतो ती गोष्ट मान्य करशील काय? समर्थ बोलले की मी आपले आज्ञेबाहेर नाही. न मातुः परं दैवतम् असे शास्त्र आहे. म्हणून आज्ञा करावी. तेव्हा तुम्ही लग्न करीत नाही. लग्नाची गोष्ट काढली असता रागे भरता. तर असे करू नये. अंतःपट धरीन तोपर्यंत नाही असे म्हणू नये. तुम्हास माझी शपथ आहे. 'उत्तम आहे', असे म्हणून त्यादिवसापासून पूर्वीचे प्रकार सर्व सोडून दिले. नंतर मातोश्रीमी लग्नाचा उद्योग करून आपले बंधू भागजीपंत बादेनापूरकर ह्यांची कन्या योजून निश्चय केल्यानंतर स‌र्व आसनगावी लग्नास गेले. सीमंतपूजनापासून अंतःपट धरीपर्यंत स‌र्व यथासांग झाले. पुढे ब्राह्मणांनी अंतःपट धरून मंगलाष्टके म्हणावयाचे पूर्वी 'स‌ावधान' असे म्हणताच, याचा अर्थ काय, असे स‌मर्थांनी विचारिताच 'इतःपर संसाराची बेडी तुमचे पायात पडली' असे ब्राह्मणाचे वाक्य श्रवण करीन स‌मर्थांनी विचार केला की, पूर्वी मी सावध आहेच, हल्ली ब्राह्मणही म्हणतात आणि मातोश्रींची शपथ एथपर्यंतच होती. आता तिचे वचनातून पार पडलो. अतःपर येथे गुंतून राहणे ठीक नाही. असे म्हणून तेथून पलायन केले. ते जांबगावी अश्वत्थाचे वृक्षावर जाऊन बहुत निबिड व अवघड जागेत बसले. ते त्या वृक्षावर तीन दिवस तसेच राहिले. इकडे लग्नाचे स‌मारंभातून स‌मर्थ पळून गेले, हे ठीक नाही तर शोध करावा असा विचार करून स‌र्वत्रांनी व मातोश्रींनी बहुत शोध केला. परंतु कोठेच ठिकाण लागेना, म्हणून त्या मुलीस दुसरा वर पाहून लग्न केले." असाच मजकूर 'दासविश्रामधामा'तही येतो. परंतु याहून स‌र्वस्वी भिन्न अशीही एक हकीकत आहे. स‌मर्थ हे लग्नातून नव्हे, तर अन्य कारणामुळे पळाले असे रा. रा. वि. ल. भावे-तुळपुळे यांनी 'महाराष्ट्र सारस्वता'त (पाचवी आवृत्ती, पान 314) म्हटले आहे. त्यांनी सांगितलेली कहाणी अशी - "लहानपणी रामदासांच्या थोरल्या बंधूला त्यांच्या वडिलांनी मंत्रोपदेश व अनुग्रह दिला. तो आपल्यालाही द्यावा असा आग्रह रामदासांनी धरला. परंतु तुला अधिकार नाही म्हणून बापाने निवारले व मंत्रानुग्रह दिला नाही. या गोष्टीची चीड येऊन नारायण हा रागाने घरातून निघून गेला." या मजकुरावर सारस्वतकारांनी एक टीपही दिली असून, त्यात म्हटले आहे, की "नारायण ऊर्फ रामदास हा लहानपणी आपल्या लग्नाच्या वेळी अंतःपट धरला असताच, ब्राह्मण अष्टके म्हणत होते तोच नदाचा शेला दूर होण्यापूर्वीच तेथून एकदम पळाला, अशी हकीकत बखरकार सांगतात. ही गोष्ट महाराष्ट्रात स‌र्वभर मानली जाते. पण वर दिलेली हकीकत 'श्री सांप्रदायिक विवध विषय' या पुस्तकात दिली आहे. ती जास्त स्वाभाविक व खरी वाटते. स‌ावधान शब्द ऎकून पळून गेल्याच्या हकीकतीत काव्य आहे. ती सांगण्याला आणि ऎकण्याला गोड आहे. मोठ्या लोकांसंबंधी अशा गोड काव्यमय हकीकती चरित्रकार हौसेने सांगतात व पुष्कळ वेळा स्वतः चरित्रनायक अशा अद्भूत हकीकती पसरविण्यास कारण होतात. पण पुष्कळदा त्या स‌त्यशोधनाच्या आड येऊन चरित्रकारास फसविण्यास व वाचकास रंजविण्यास मात्र कारणीभूत होतात." 'रामदास जन्मकथा'कारानेही तसेच म्हटले आहे.

विनिता००२ नवीन

In reply to by विशाल कुलकर्णी

समर्थांची कथा. जर लग्न झाल्यानंतर नारायण पत्नीला वा-यावर सोडून पळाला असता तर? उलट तसे न करता त्याने तिच्यासाठी नव्या आयुष्याची एक संधी ठेवली होती असेच म्हणावे लागेल.>> संधी कशी?? मांडवातून नवरदेव निघून गेला याचे खापर त्या निष्पाप नवरीवरच फुटणार ना? सामाजिक दृष्ट्या तिला तर काही भविष्यच उरले नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

थीम आवडली. -दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशाल वृक्षाखालच्या गवतावर नेहमीच कमी सूर्यप्रकाश पडतो.. मान्य. गंमत या गोष्टीची वाटते की त्यात ना वृक्षाचा दोष असतो ना गवताला त्याची खंत असते. पण जेव्हा काहीजण शेकडो वाटसरुना सावली देणाऱ्या वृक्षाला त्याने गवताला मिळणारा सूर्यप्रकाश अडवला म्हणून दोष देतात किंवा तोडायला निघतात तेव्हा मात्र त्या वेडेपणाचे नक्कीच हसु येते.

hitesh नवीन

In reply to by विशाल कुलकर्णी

ंमिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण झाड - गवत असे न ठरता झाड - बांडगूळ असे ठरते. हे लक्षात आले म्हणजे मग मिराबैला दोष देणे चुकीचे ठरत नाही. पण धर्म , देव ही झापड लावलेली असली की मग झाड - गवत हाच दृष्टांत आठवणार . असो.

विशाल कुलकर्णी नवीन

In reply to by hitesh

मिराबैंच्या बाबतीत हे उदाहरण झाड - गवत असे न ठरता झाड - बांडगूळ असे ठरते. हे लक्षात आले म्हणजे मग मिराबैला दोष देणे चुकीचे ठरत नाही. पण धर्म , देव ही झापड लावलेली असली की मग झाड - गवत हाच दृष्टांत आठवणार . असो. हेच उलट म्हणायचे झाल्यास, जर सारासारविचार बुद्धीचा वापर केला तर देव, धर्म या गोष्टी फार मागे राहतात. पण तुमचे झालेय काय? की तुम्ही नाही नाही म्हणता म्हणता या गोष्टींमध्ये (विरुद्ध बाजुने का असेना) पण इतके अडकला आहात की एखाद्या गोष्टीतली सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा दोषच शोधायला लागता. शुभेच्छा !

hitesh नवीन

In reply to by विशाल कुलकर्णी

सौंदर्यस्थळाने स्वतःच्या जिवावर जगावे , दुसर्‍यावर बांडगूळ होऊन नव्हे. समर्थानी संसार मांडण्याआधीच पळ काढला . किती बरे झाले ! त्यामुळे त्या बिचार्‍या मुलेला दुसरा ऑप्शन मिळाला असे समर्थन करणारे लोक मिराबैच्या आडमुठेपणामुळे नवर्‍याला मात्र दुसरा ऑप्शन मिळु शकला नाही, हे मात्र मान्य करत नाहीत , याची गंमत वाटते.

विशाल कुलकर्णी नवीन

In reply to by hitesh

सौंदर्यस्थळाने स्वतःच्या जिवावर जगावे , दुसर्‍यावर बांडगूळ होऊन नव्हे. स्वतःचा मुर्खपणा सिद्ध करण्याची एवढी कसली हौस म्हणतो मी. 'सौंदर्यस्थळं' हा शब्द मी मीरेच्या साहित्याबद्दल वापरला होता. तुम्ही पुन्हा स्वतःला सोयिस्कर तो अर्थ घेतलात. म्हणूनच म्हटलं होतं मी "तुम्हाला सौंदर्यस्थळे शोधण्यापेक्षा त्यातले दोष शोधण्यातच जास्त स्वारस्य असते." बाकी मीरेने किंवा तिच्या नवर्‍याने किंवा कुणीही कसे जगावे , काय करावे हे सांगण्याचा मला काय किंवा तुम्हाला काय, कुणालाच कसलाही अधिकार नाही? आणि मीरेमुळे तिच्या नवर्‍याला पर्याय मिळू शकला नाही हे कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही? तीचं संसारात ल़क्षच नव्हतं हे अगदी तिची चुक म्हणून जरी कबूल केलं तरी मग तिच्या नवर्‍याने अजुन चार लग्ने केली असती तर तिला काहीच फरक पडण्यासारखा नव्हता. अहो स्त्रीयांना किंमत देणारे नवरे आजसुद्धा रेअरली सापडतात ( अगदी तुम्ही सुद्धा आपल्या पत्नीबाबत एक विक्षीप्त विधान करुन त्या मावलीची चारचौघात शोभा केलीत) ( .. बहिणीच्या नवर्‍याला संपुर्ण पगार देणार , त्याच्यावर सर्वस्व अर्पणार वगैरे बाता मारुन ,संसार सोडुन , मिरेची 'कृष्णभक्ती ' स्वीकारुन , नवरा सोडलेल्या व चार वर्षानी ' उंबरठा ' षिनेमाच्या निराश स्मिता पाटीलप्रमाणे पुन्हा संसारात परतलेल्या आधुनिक मिराबैचा दु:खी नवरा ..उर्फ.. हितेशभौ ! ). आणि तुम्ही त्या काळी स्त्रीयांना फार मान वगैरे असेल अशी अपेक्षा करताय? स्वतःवरुनच ठरवा की.... शुभेच्छा !

hitesh नवीन

In reply to by विशाल कुलकर्णी

मीही तो शब्द मिरेच्या साहित्याबाबतच वापरलाय. नवरा चार बायका करु शकतो , मग एका बैचे संसारात लक्ष नसले तर बिघडले कुठे ? ..... तुमच्या या युक्तिवादाला सलाम !

विशाल कुलकर्णी नवीन

In reply to by hitesh

नवरा चार बायका करु शकतो , मग एका बैचे संसारात लक्ष नसले तर बिघडले कुठे ? काय गैर आहे त्यात? एक स्त्री म्हणून तिलासुद्धा तेचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहेच की.

इन्दुसुता नवीन

कविता आवडली
सर्व थोर लोकांचे समाजावर अगणित उपकार आहेत. त्यांनी त्यावेळी जर घरादाराचा त्याग केला नसता तर हे महत्कार्य त्यांच्या हातून झालेही नसते कदाचित. पण त्यांच्या जोडीदारांनी सहन केलेली खंत व त्याग तितकाच खरा आहे , याचा उल्लेख केल्याने त्यांचे मोठेपण तसूभरही कमी होत नाही .
याच्याशी पूर्ण सहमत.

स्वाती दिनेश नवीन

कविता आवडली, प्रतिसादही माहितीपूर्ण. स्वाती

रुपी नवीन

छान कविता.. आवडली.. (व.पुं.ची, की दुसर्‍या कोणाची?) 'उर्मिला' या कथेची आठवण करुन देणारी. त्यातही वनवासात गेलेल्या 'राम-सीता-लक्ष्मण' यांच्याबद्दल एवढं लिहिलं गेलंय, पण मागे राहिलेल्या उर्मिलेबद्दल फार कुठे काही नाही, असा काहीसा आशय होता.

एस नवीन

प्रख्यात हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांची 'यशोधरा' ही कविता आठवली. सखि, वे मुझसे कहकर जाते, कह, तो क्या मुझको वे अपनी पथ-बाधा ही पाते? मुझको बहुत उन्होंने माना फिर भी क्या पूरा पहचाना? मैंने मुख्य उसी को जाना जो वे मन में लाते। सखि, वे मुझसे कहकर जाते। स्वयं सुसज्जित करके क्षण में, प्रियतम को, प्राणों के पण में, हमीं भेज देती हैं रण में - क्षात्र-धर्म के नाते। सखि, वे मुझसे कहकर जाते। हुआ न यह भी भाग्य अभागा, किसपर विफल गर्व अब जागा? जिसने अपनाया था, त्यागा; रहे स्मरण ही आते! सखि, वे मुझसे कहकर जाते। नयन उन्हें हैं निष्ठुर कहते, पर इनसे जो आँसू बहते, सदय हृदय वे कैसे सहते? गये तरस ही खाते! सखि, वे मुझसे कहकर जाते। जायें, सिद्धि पावें वे सुख से, दुखी न हों इस जन के दुख से, उपालम्भ दूँ मैं किस मुख से? आज अधिक वे भाते! सखि, वे मुझसे कहकर जाते। गये, लौट भी वे आवेंगे, कुछ अपूर्व-अनुपम लावेंगे, रोते प्राण उन्हें पावेंगे, पर क्या गाते-गाते? सखि, वे मुझसे कहकर जाते। - मैथिलीशरण गुप्त