पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 1:34 pm

पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका

1

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र

नव्या प्रमेयाप्रमाणे -

१. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली २२ जुलैलाच सोडली!
२. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून १५ दिवसाच्या प्रवासात २५० मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश १५ ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले. १६ ऑगस्टला निराजी रावजींनी तोवर शिवाजी महाराजांचा वेश उतरवला व हिरोजी फर्जंदास तो पोषाख व दागदागिने चढवले. निराजी रावजी आपल्या स्वतःच्या म्हणजे ब्राह्मण कारभाऱ्याच्या वेषात खोलीच्या बाहेर पडले. संभाजी राजे व प्रल्हाद निराजी (निराजींचा संभाजीराजेंच्या समवयस्क मुलगा) दोघेही १५ऑगस्ट रोजी रामसिंहाकडे त्याच्या हवेलीत राहण्यास गेले होते. संभाजीराजे तसे आधीपासून हवेली बाहेर पडून जात असत. कारण त्यांच्यावर कैद नव्हती. नजरेत असावेत असा संकेत होता.
३. त्यांच्याबरोबर रघुनाथपंत कोरडे, व्यंकटपंत डबीर, राघो मित्र मराठा, दत्ताजी त्र्यंबक असे तीर्थयात्रेसाठी चाललेले ब्राह्मण व त्यांची दोन मुले असे पुर्वी तयार करवून घेतलेले दस्तक होते. हिरोजी फर्जंदचे ‘राजांचे रूप’ किती काळ यशस्वीपणे पार करेल याची शंका होती म्हणून हिरोजी ‘राजांना’ मदत करायला रघुनाथपंत व त्र्यंबकपंत १७ ऑगस्टला मथुरेतून परत १८ ऑगस्टला आग्र्याला आले. नंतर संभाजी राजे वाराणसीकडे रवाना झाले. नंतर ते अलाहाबाद, गोंडवन, मंगलगढ, देवगढ मार्गे २० नोव्हेंबर १६६६ रोजी स्वराज्यात राजगडावर इतरांसह पोहोचले...
४. बातमी फुटली - इकडे हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आग्र्यातील हवेलीतून निघून गेल्याने ती रिकामी झाली. रिकाम्या हवेली भोवती फौलादखानाची व रामसिंहाची माणसे पहारा देत राहिली. १८ ऑगस्टला बातमी फुटली... त्या दिवशीच्या अखबारात मधील मजकूर सांगतो, ‘सीवा पळून गेला...’ फौलादखान, ज्याच्यावर सीवाच्या नजरकैदेची पूर्ण जबाबदारी होती तो, आपल्या अर्जात म्हणतो, ‘मलाही कळेल नाही. त्याच्या पलायनाचे रहस्य... एक बांधलेली पगडी, आरसा व जोडे पडलेले आहेत.’... ‘कुमार रामसिंह घुसलखान्यात बसलाय ...’ त्याला हुकूम आला. ‘तू सीवाचा जामीन आहेस. तू त्यास हजर केले पाहिजेस...’ शिवाजी महाराजांच्या डेऱ्यात अधूनमधून येणाऱ्या कवी कलश - कवीश्र्वर व सक्सेना कायस्थ यांना साखळदंडात अडकवण्यात आले. नंतर एक दोन दिवसांनी काही विचार केल्यावर मोगल सरदारांनी असा निष्कर्ष काढला की ‘शिवाजी पेटाऱ्यातून पळाला. हे पेटारे काठ्यांना लटकवून आतबाहेर येत जात असत. ..’१९ ऑगस्टला हसन अलीच्या हेरांनी बातमी दिली ... ‘शिवाजीराजांचे वकील राघो पंडित, त्र्यंबक पंडित व दोन नोकर सापडले. ते हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर असावेत...’ बळीराम पुरोहित, जीवा जोशी, श्री किशन, हरिकिशन असे चौघे रामसिंहाचे लोक पहाऱ्यावर होते. त्यांना चाबकांचे फटके व नाकात मीठ भरायची धमकी देऊन सत्य उगलायचा प्रयत्न झाला. ‘आम्ही त्याला एक घडीच्या आधी असताना पाहिले... सकाळी त्यांने सुका मेवा मागितला आणि खाल्ला. अशी जबानी त्यांनी दिली...’
५. औरंगजेब रघुनाथ पंत व व्यंकटपंत हे मोगलांच्या दरबारी शिवाजी महाराजांचे वकील म्हणून दहावर्षापासून माहिती होते म्हणून त्यांच्या शब्दाला ग्राह्य मानून फौलादखान वाचला पण रामसिंहाची मनसब बडतर्फ केली गेली...
६. १९ ऑगस्टला बादशहाने नेताजीला पकडण्याचे आदेश जयसिंगाला दिले.
७. इकडे परतताना चांदवड (जि. नाशिक) ला शिवाजी महाराजांचा मनोहरगडावर मुक्काम होता. त्या आधी नरवरच्या घाटीत नाट्य रंगले. पुर्वी ठरवल्या प्रमाणे शिवाजीमहाराजांची माणसे छोट्या छोट्या तुकड्या करून चौकी किवा ठाणे संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी ओलांडत. काही तुकड्या शिवाजीरायांच्या मागे तर काही पुढे. नरवरची चौकी औलांडताना चौकीवरील पहारा देणाऱ्या शिपायांनी सर्वांचे दस्तक पाहिले. सर्वांनी आम्ही शिवाजीची माणसे आहोत असे सांगितले. शिपायांनी दस्तक पाहून परत केले व पुढे जाण्याची खूण केली. पुढे जाताना वेषांतर केलेल्या शिवाजीराजांनी खोचकपणे म्हटले, ‘आम्ही शिवाजीच आहोत.’ चौकीवरील शिपायांना राजांच्या या बोलण्याचा अर्थ नीट समजला नाही. पण नरवरच्या फौजदाराला पाठवायच्या बातमीपत्रात यासर्व घटनेची नोंद केली.
८. शिवाजी महाराज सिरोंज – हांडिया इथे नर्मदा ओलांडून – पुढे चारवा – छानेरा – असीरगढ करत बऱ्हाणपुरकडे निघाले. नंतर ते बहुधा जळगाव - एरंडोल - मालेगाव करत चांदवडला साधारण 5 सप्टेंबरला मराठी सरदाराच्या वेषात आले असावेत.
९. मनोहरगड उर्फ कौलदेहेर येथे हे गुप्त निवासस्थान निवडले. (मुंबई-आग्रा महामार्गावर राजदेहेर, इंद्राई तसेच चांदवड किल्ले जवळून दिसतात. परंतु, कौलदेहेर उर्फ मनोहरगड हा जरा लांब डोंगरात लपला आहे!)
१०. शिवाजी महाराज मनोहरगडावर पोहोचल्यानंतर १०-१५ दिवसांनी सुमारे २० सप्टेंबरला शिवाजीराजांचे सैन्य नाशिक-त्र्यंबक प्रांतात शक्यतो कोणास समजून न देता जमू लागले. सुमारे ५००० घोडदळ जमा झाले. सुरतेवर हल्ला करायची अफवा त्यामुळे निर्माण झाल्याची न्यूज डच पत्रातून पसरली होती.
११. निराजी रावजी ज्यांनी २२ जुलै ते १६ ऑगस्ट पर्यंत आग्र्याच्या हवेलीत शिवाजींचे रूप घेतले होते ते व अन्य मंडळी १७ ऑगस्टला मथुरेहून निघाली. सुमारे ९०० मैलाचा प्रवास करून २० ऑक्टोबरला चांदवडला व पुढे कौलदेहेर उर्फ मनोहरगडावर गुप्तपणे गेले. तेथे त्या सर्वांची शिवाजी महाराजांबरोबर भेट झाली.
१२. राजे १ नोव्हेंबर तर संभाजीराजे २० नोव्हेंबरच्या सुमारास राजगडावर पोहोचले. अशा रीतीने राजांची माणसे स्वराज्यात परतली. मात्र नेताजी पालकर व त्याचे नातेवाईक सुमारे दहा वर्षे मोगलांकडेच अडकले.

नवीन प्रमेया प्रमाणे शिवाजीमहाराज निसटले कसे ? ते पुढील भाग 3 मधे...

मांडणीप्रतिसादसमीक्षा

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

8 Dec 2020 - 7:00 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र

शशिकांत ओक's picture

19 Feb 2021 - 12:34 pm | शशिकांत ओक

धागावर आणला आहे.