दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, तिला पहिलंवहिलं कन्यारत्न झालं होतं. तिच्या सासरी माहेरी दोन्हीकडे मुलांच प्रमाण जास्त होतं, मुलगी ही एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! तिलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दिवसभर सासूबाई आणि रात्री आई दोघी चिमुरडीची काळजी घेत, त्यामुळे तिला निवांत आराम मिळत असे.