काटेकोरांटीची फुलं.

जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी. वर्‍हाडात सावकाराला मालगुजार म्हणायचे.गिरीपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चौबळांच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा.पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात.
पाहुणे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा.
बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या.आईच्या मदतीला सैपाकघरात.दप्तरं गुंडाळून ठेवायची.शाळेला नाही गेलं तरी चालायचं.
जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. संत्र्याची टोपली एकाच्या हातात , दुसर्‍याच्या हातात आत्याची पिशवी. मग आत्याचा नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची.वडील आत्याच्या नवर्‍याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची.
आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. कापसाची बोंड, तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड माल बाहेर पडायचा.संत्र्याच्या टोपलीला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक संत्रं आमच्या हातावर ठेवायची.थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबट रसानी ओठ चुरचुरायचे.पण फोडी मोजण्यात आणि सालांचा रस एकमेकांच्या डोळ्यात उडवण्यात जास्त मजा यायची.
चहाचं ताट बाहेरच्या खोलीत गेलं की आंघोळीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर बसायची. हातात काळं मंजन घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी घंगाळात गरम पाणी काढायची.आंघोळीसाठी मोरी.बाथरूम असा काही प्रकार नसायचाच.दादासाहेब आंघोळीला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर व्हायच्या.
आत्या बहीणींच्या हातात धोतर देऊन म्हणायची निर्‍या काढा गं पोरींनो.असली कामं करायला मुली नाराज असायच्या.पण सांगणार कुणाला?
मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा
साबणासाठी पेटी उघडली की सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन पेटी बंद करायची.
आता त्या वेळी टॉयलेटरीज आणि कॉस्मेटीक्स मध्ये आमच्या घरात असणार काय .दरबार गंधाची बाटली, रेमी ची पावडर आणि फूल,जाईचं काजळ.संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची.
पावलोपावली माहेरच्या गरीबीचा उद्धार व्हायचा.रात्री झोपायची प्रचंड गैरसोय व्हायची.बाहेरच्या खोलीत पुरुष मंडळी.दादा शहाण्यासारखा मित्राकडे निघून जायचा.मधल्या खोलीत आजी, आई आणि आत्या.स्वच्छ चादरी बाहेर वापरायचे.बाकी सगळ्या चादरी वारंवार शिवलेल्या तरी असायच्या नाहीतर मुताचा वास तरी यायचा.आत्या आजी आणि आईच्या रात्री गप्पा रंगायच्या.मुलींना जाम उत्सुकता असायची गप्पा ऐकण्याची.आत्या कसली ऐकतेय.
" ए मुलींनो तुम्ही दूर झोपा बाई."
" का ग आत्या "माझी धाकटी बहीण विचारायची.
"बाई बाई केव्हढ्या उवा तुझ्या डोक्यात .उडून माझ्या डोक्यात येतील गं बाई . नको . तुम्ही दूरच बर्‍या."
आई मधे पडायची. "नाही उवा वन्सं.गेल्या रविवारीच रॉकेल घालून डोकी धुतलीत पोरींची."आणि हा वाद रोज व्हायचा .
मुली कंटाळून सैपाक घरात झोपायच्या.
माझी धाकटी बहीण त्यातल्या त्यात तिखट. एकदा फणकार्‍यानं म्हणाली "एव्हढेसे तर केस तुझे आत्या आणि गंगावनात कशा गं उवा होतील."
या डायलॉग नंतर इतकी शांतता पसरली की नखाखाली ऊ चेचली असती तरी टाळीसारखा आवाज वाटला असता.

पाहुणे आले ,शाळा नाही.धाकटं भावंड आजारी पडलं शाळा नाही.पैसे कमी पडतातयंत कॉलेज बंद.कपातीची पहीली झळ मुलींना. शिस्तीची सगळी धार मुलींवर चालायची.ताईची पुस्तकं माई वापरायची.माईचे जुने युनीफॉर्मचे स्कर्ट आक्का वापरायची.निळ्या स्कर्टच्या प्लेटी उसवून दुसर्‍या टर्म पर्यंत वेळ काढायची. फिका पडलेला निळा स्कर्ट आणि डार्क निळ्या रंगाची किनार त्याला जाडीभरडी हातशिलाईची टिप. उंची वाढणं पण शापच.
मुली मोठ्या झाल्या. (बसायला लागल्या)ते दिवस व्हिस्पर किंवा तयार सॅनीटरी नॅपकीनचे नव्हते.जुन्या कपड्यांच्या घड्या धुवून वापरायच्या.अंगणातल्या ओट्यावर जेवण. त्या चार दिवसात शिवाशिव पाळावी लागायची.अंगणात एका पत्र्याच्या शॅडमध्ये एक वेगळी बाथरूम.
घराचा कोंडवाडा झाला.त्यांचं दुकानात जाणं बंद. गणेशोत्सवाचे कार्यक्रम बंद.गॅदरींगमध्ये स्टेजवर नाचायला जाणं बंद.भुलाबाई बंद.मैत्रीणीकडे जायचं ते भावाला बरोबर घेऊन.
याच वेळीनेमकी एखादी बहीण शाळेतून सुटली की समोरच्या दरवाजानं न येता अंगणाला वळसा घालून मागच्या ओट्यावर बसायची. आईनी बघीतलं की आई डोक्याला हात लावायची.
"आताच तुला पण गोंधळ घालायाचा होता का "असं म्हणत आंघोळीचं पाणी काढायची.
आत्याच्या कपाळाला आठ्या पडायच्या.
"असू द्या हो वन्सं . पोराबाळांचं घर आमचं."आईचं पालुपद सारखं चालू असायचं

आत्या आंघोळीला जाताना पेटी उघडून पैसे मोजायची. रात्री झोपताना मोजायची. खर्च तर काही करायची नाही पण मोजताना मी आसपास दिसलो की डोळे मोठ्ठे करून विचारायची
ए, गोम्या,(घरात मी एकटाच काळा म्हणून मला किलावरचा गोम्या म्हणायची) तू चोट्टा नाहीयेस ना . ?
मनात जाम राग आलेला असायचा पण काढायचा कुठे? पण पाहुण्याला खिंडीत गाठायची रग होतीच.(म्हणून रगेल दोडका हे दुसरं नाव पण होतं)

असेच एकदा दिवाळीला जावई आले होते.जावई आले की त्यांना भेटायला बरीच माणसं यायची.त्यांच्या चहापाण्याला दूध पुरायचं नाही.घरी ब्रिज खेळायला चिमोटे सावकार , गंगशेट्टीवार, इंगोलीकर , मुंगळे वगैरे सावकार मंडळी यायची.
मग चार दिवस मुलांना दूध नाही.चहा प्यावा लागायचा.
मुली मोठ्या म्हणून त्यांना चहा पण नाही.
मी तसा सहासात वर्षाचा होतो. सकाळी दूध नाहीय्ये, संपलंय म्हटल्यावर जरा नाराजच होतो.आत्या मात्र दूध पित होती.
"तिच्या पोटात बाळ आहे ना म्हणून ...."
आमच्या ताईनी माझी समजूत काढली.जरासा फुगून मी घरासमोर मंगळूरकरांचा टालावर (जळाऊ लाकडाची वखार)गेलो. त्यांच्याकडे एक गाय पाळली होती.मंगळूरकर काकी गायीचा शेणगोठा साफ करत होत्या.
"काकी, तुमच्याकडे दूध असेल ना?" मी विचारलं.
"नाही रे बाळा. गाय गाभण आहे ना . पोटात बाळ आहे तिच्या."
"आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना....."
काकी ठो ठो हसायला लागल्या.
शब्दांचा सूक्ष्म अर्थ कळायचे दिवस नव्हते ते. पण दुपारपर्यंत हा विनोद घरापर्यंत पोहचला होता.
साडेचार वाजता घरी आलो तेव्हा आत्या फुरंगटून बसली होती.
वडील माझी येण्याची वाट बघत असावेत. हातात तूरकाठी होती.(तुरकाठी मुलांना मारायचं स्टँडर्ड इक्युपमेंट होतं).
त्या दिवशी मरेस्तो मार खाल्ला. का मारतायंत हे कळेना . रात्रीचं जेवण बंद.
बहीणी मुक्या मुक्या बघत होत्या. मग मोठीनी गळा काढला. मग धाकटीनी....
मार खाउन जो झोपलो तो अपरात्री जागा झालो परत भुकेनीच.
मार आठवला . अंगावरचे वळ भुकेनी आणखीनच जळायला लागले, परत मुसमुसायला सुरुवात.
ताई जागी झाली .
"काय झालं रे "म्हणाली .
माझं रडणं काही थांबेना..तिला कळलं मला भूक लागलीय पण जेवायला वाढायचं धैर्य तिच्यात पण नव्हतं.
थोड्या वेळानं मोरीवर जायच्या निमीत्तानी उठली.परत आली.
माझ्या अंगावर पांघरूण घातलं आणि हातात गुंडाळी केलेली पोळी दिली.एक संपली मग दुसरी दिली.पोळीला काय लावलं होतं ते आठवत नाही पण मिठाची काही कमी नव्हती.
आज चाळीसएक वर्षं झाली या गोष्टीला पण दूध प्यायची इच्छा मेली ती मेलीच.आता दारु प्यालो तरी दुसर्‍या पेगनंतर दूधाची आठवण येते आणि दारूची नशा उतरते.दारू पोटात फिरायला लागते.
लहान होतो तेव्हा दूध नाही, मोठेपणी दारु झेपत नाही.माणसानी दु:खाचे कोरडे घास गळ्याखाली ढकलावे तरी कसे?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उपेक्षा ,कुचंबणा, गैरसोय, अपमान,आवडती नावडती,हाल अपेष्टा, हेळसांड या सगळ्यांना तोंड देत या मुली शिकल्या. मुली जितक्या शिकल्या तेव्हढच मुलं पण शिकली.पण मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही नाही.
मला नक्की कुठलं वर्षं ते आठवत नाही पण मी तेव्हा बराच लहान असणार. घरी वडलांचे मुंबईचे काका आणि त्यांचा मुलगा आला होता.हौशी माणसं .ते आग्रह कर करून आई आणि बाबांना आरजू नावाच्या सिनेमाला घेऊन गेले. ताई -दादा कॉलेजात. मला आणि धाकट्या भावाला सांभाळायला दोन्ही बहीणी घरी थांबल्या होत्या.
त्यांना घरी राहण्यासाठी बाबांनी दोघींच्या हातावर पाच पाच पैसे ठेवले होते.
हातात पैसे असणं हा तसा दुर्मीळ प्रसंग. दुपारी मी झोपल्यावर दोघींनी एक धाडस केलं .दोघीजणी पानाच्या ठेल्यावर गेल्या. पाच पैशात तेव्हा मिठा पान यायचं .दोघीजणी पान खाऊन घरी आल्या. आता खाल्लं तर खाल्लं निदान फ्रॉकवर सांडायचं तर नाही .
बरं सांडलं तर सांडलं.धुवून पुरावा तरी नष्ट करायचा.
बराच वेळ आरशासमोर उभ्या राहून दोघी जीभा किती लाल झाल्या ते बघत बसल्या.
चार वाजता सिनेमाला गेलेली मंडळी घरी आली.
आल्या आल्या आईनी विचारलं "अगं बायांनो फ्रॉकवर काय सांडलयत.?"
खोटं बोलायला मुलगा व्हायला लागतं.या शेळीच्या शेपट्या.खोट्याची झाकपाक करायला एकदम नालायक.
आईला जीभ काढून दाखवली. आईनी डोक्याला हात लावला आणि बाबांनी कानाखाली.
दोन मिनीटात जीभेपेक्षा गाल जास्त रंगले.पण यांच्या डोळ्यात पाणी नाही.
बिचार्‍या इतक्या निष्पाप की नंतर सात दिवस झाले तरी त्यांना कळेना की नक्की काय चुकलं.

या मुली भराभर मोठ्या होतं गेल्या. शिकल्या .आपल्या पायावर उभ्या राहील्या. आईबाबांनी सांगीतलेल्या मुलांशी लग्न करून संसार थाटले.
धाकट्या बहीणीच्या डोहाळजेवणाच्या वेळची गोष्ट. दुपारची जेवणं झाल्यावर बाबा खूषीत होते.पानपट्ट्या बाहेरून मागवल्या होत्या.
बाबांनी एक पान जावयाच्या हातात दिलं .जावई रसीक .त्यानी सगळ्यांच्या समोर अर्धं पान बहीणीला भरवलं.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.

वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे.
वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.

माझ्या मुलीच्या पहील्या वाढदिवसाला ताई आली होती.मला म्हणाली "काय रे दोडक्या, तुझा रगेल पणा जरा कमी झालेला दिसतोय. सारखं घरात काय आहे रे तुझं.?"
"हळवं व्हायला काय वय झालं का रे तुझं?"मी काहीच बोललो नाही.

म्हातारपण कुणी पाह्यलंय. हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही. या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?

सुरेख...

सुरेख...

मस्तच

किति सुरेख लिहिल आहे त्॑तोत्॑त चित्र उभ राह्यल

प्रतिक्रिया

मी मागे जे म्हण्टले तेच परत म्हणतो. रामदास हे मिपाचं एक फार मोठ्ठं फाईंड आहे. त्यांचे लिखाण , त्यातील व्यक्तिरेखा , चार शब्दांच्या वाक्यावाक्यातून एक कालखंड उभा करण्याची क्षमता , "बीटवीन द लाईन्स" असणारी अर्थसंपृक्तता... हे सगळे मला फार वरच्या दर्जाचे वाटते. त्यांच्या लिखाणातून पानवलकर, मोकाशी (आणि लहान मुलाच्या पस्पेक्टीवने लिहिण्याच्या बाबतीत जी ए ) यांच्यासारख्या दिग्गज कथा लेखकांची याद येते.

त्यांचे प्रस्तुत लिखाण हे त्यांच्या खास शैलीतले. एका गरीब , जुनाट विचारसरणीच्या कुटुंबातील स्त्रीवर्गाचे शोषण, त्यांच्या दडपल्या गेलेल्या भावना , कोवळेपणाची झालेली राखरांगोळी हे सारे अस्सलपणे उभे केले आहे. गरीबी आणि जुनाट विचारसरणी यांच्या दुहेरी कात्रीमधे माणसाची माणूस म्हणून जगण्याची डीग्निटी कशी समूळ नाश पावते याचे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दर्शन घडते. वयात आलेल्या मुलींची कुचंबणा, न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा , कसलेही कोवळेपण नि खासगीपण नसणे याचे एक संवेदनशील असे चित्र इथे लेखक रंगवतो.

+१

+१

पूर्ण सहमत...

वेगळा प्रतिसाद देत नाही. म्हणजे देऊच शकणार नाही. मुक्तसुनीतनी जे काही लिहिले आहे त्याच्याशी १०१% सहमत. कसं लिहावं याचा आदर्श वस्तुपाठ आहे.

काही काही वाक्यं आतून हलवून गेली.

बिपिन कार्यकर्ते

>काही काही

>काही काही वाक्यं आतून हलवून गेली.

अगदी...

सहमत

मुक्तसुनीत व बिपिनदांशी सहमत; अंतर्मुख करणारा लेख.

+++१

शब्दशः सहमत!!

चतुरंग

++++१

सहमत!!!!

सुरेख..

आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?

निशःद्ब झाले वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुन्न झाले वाचून.

फारच प्रभावी झालीये कथा.

रेवती

काय लिहू?

काय लिहू ? ते कळत नाही, जुना काळ कथेतून सशक्तपणे उभा केला आहेत. कदाचित आई,आजीच्या काळातले हे प्रातिनिधिक चित्र असावे.
कथा भावली एवढेच म्हणते.
स्वाती

मस्त

भन्नाट लिहिलंय रामदासकाका.

ती पण गाभण आहे ना.....

Big Grin

आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली.

सुंदर.

बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.
वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे.
वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.

मस्त.

केवळ अप्रतिम.

अप्रतिम लिहिले आहे.
Smile

भुतकाळ

आजही आंबा खावासा वाट्त नाही. शेटाणी असलेल्या आत्याने सुटीत आणलेले १ पेटी आंबे नागासारखे डसतात अजुनही. खायला बसलेले असताना "खा, हो बरोबर पोट भरुन, नाहीतरी दादाला थोडेच परवडणार आहे हे"
तेच आतेभावाच्या जुन्या कपड्या बाबतीत.

मस्त!

रामदासजी मस्त लिहिलंय!
खरे सांगायचे तर रामदास आणि मस्त लिहीणं हे एकमेकांना पर्यायी शब्द आहेत!

काका,

काका, तुमची स्वाक्षरी घ्यायची आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर भेटाल... न भेटाल... Wink

रामदासा, नको रे रडवत जाऊस!!

त्याच छोट्या वाक्यांचे तीर, तसेच भावनांचे संधान, तेच कथेचं उलगडत जाणं, तीच पात्रांची फेर धरुन नाचायची पद्धत, तोच काळ उभा करण्याची क्षमता, तीच अंगावर लोंढ्यासारखी येणारी कथा आणि तेच कथेच्या शेवटी वाचकाला नि:शब्द करुन टाकणं!
नुसतंच अर्थगर्भ नाही तर आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनाला आडवा-उभा छेद देऊन जाणारं असं लिहिणं म्हणजे देवाचंच देणं!
रामदास हा मिपाच्या खाणीत निघालेला हिरा आहे! इतका संपन्न कथालेखक मिपाला लाभला हे आमचं भाग्य!! Smile
(काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!)

(नतमस्तक)
चतुरंग

सहमत

रामदास - अप्रतिम लिहिले आहे तुम्ही...खरच अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी. लिहित रहा......आम्हाला मेजवानी आहे!

- मनिष
(खुद के साथ बातां - पुढच्या ठाणे भेटीत रामदासजींना भेटलेच पाहिजे!!!)

सहमत!

अप्रतिम कथा!
खरंतर कथेतील वातावरण मी अनुभवलेलं नाही.. किंवा तो काळ- तेव्हाचे विचार यापासूनहि दुर आहे.. तरीही कथा वाचून एक अनामिक हुरहुर लागली.. डोळे कधी पाणावले कळलंच नाहि.. का कोण जाणे अचानक अक्षरं धुसर दिसायला लागली Sad

केवळ अप्रतिम!

-(धुसर) ऋषिकेश

+१

अप्रतिम कथा. चतुरंग आणि मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियांशी सहमत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अप्रतिम!

खुप आवडल. वेगळि प्रतिक्रिया काय लिहिणार चतुरंग आणि मुक्तसुनित यांच्याशि १००% सहमत.

वरच्या

वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत! किती सुंदर आणि सहज लिहीलंय!! मिपाचं रत्न आहात तुम्ही!

रामदास काका...

रामदास काका...

जबरदस्त लिहिलय....अगदी आमच्या लहानपणीची आठवण झाली...चतुरंग म्हणतात तसं
(काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!)

अंतर्मुख केलत तुम्ही....

धन्यवाद...
मुकुल

सुरेख...!

सुरेख...!

मुक्तरव आणि रंगाशी सहमत...

रामदासजी, आपण चांगलं लिहिता, नेहमी असंच लिहीत र्‍हावा..

तात्या.

बोलता येत नाही

निशब्द झालोय...

अवांतर -

"कोणत्याही दिवाळी अंकात अगदी सहज शोभावेत असले लेख मिपावर नेहमीच येत असतात, सबब मिपाला दिवाळी अंकाचे विशेष कवतिक नाही!" असे आम्ही नेहमीच म्हणत असतो हे यासारख्या लेखावरून सिद्ध होते..! Smile

तात्या.

+१

अप्रतिम.

अभिज्ञ.

अप्रतीम

केवळ अप्रतीम...
वाचता वाचता केव्हा शब्द धुसर दिसायला लागले कळलच नाही.
बर्‍याच दिवसांनी खुप छान वाचण्यालायक मिळाल.

-गणपा.

सुंदर..

>>आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली.
किती छान लिहिलं आहे तुम्ही. मुक्तसुनित यांच्याशी सहमत.

अप्रतीम

असच जबरदस्त लिहीत रहा! काही वाक्य पुन्हा पुन्हा वाचावीत इतकी सुदंर आहेत!

चकली
http://chakali.blogspot.com

अप्रतिम........

अप्रतिम...........शब्दच सुचत नाहिएत काहि लिहायला...

उत्तम

लेख आवडला. आठवणींच्या लडी उलगडाव्यात तसा सहज आणि तलम झाला आहे.

प्रत्ययकारी

प्रत्ययकारी लेखन.
- मिसळ

भावपूर्ण

भावपूर्ण लेखन. खूप आवडले.

काटेकोरांटीची फुले या नावावरून आधी काही कळले नाही, पण शीर्षक समर्पक.

अजोड लेखन

उत्तम! दुसरे शब्द नाहीत. खरोखर सुरेख लिहीले आहे.

सुंदर लेखन

रामदास ब्रँडचा जवाब नाही.

मुक्तसुनीत, नंदन, मेघनातै यांना विनंती. वरील लेखाच्या तोडीचे किंवा वरचढ लेखन कुठे पाहीले असेल तर तो लेख /दिवाळी अंक कृपया सांगा. अन्यथा इतर जालीय दिवाळी अंकाबद्दल काही इंटरेस्ट नाही. Wink

+१

शब्द नाहीत व्यक्त करायला....
वाचता-वाचता अक्षर कधी धुसर झाली समजलच नाही....

(काळा गोम्या)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मित-शब्दांत संवेदना

वातावरण, हळवेपणा समर्थपणे रेखाटला आहे.

लघुकथा म्हणून कथानकाचा आराखडा नीट समजला नाही मला, पण त्याचे सोडा - कदाचित लघुकथा म्हणून वाचायचा प्रयत्न मी करूच नये.

पुन्हा येऊन वाचण्यासारखे लेखन आहे. वाचनखूण साठवली आहे.

थोडसं

तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू जागीच बसतात.तसं थोडसं झालं आहे.
धन्यवाद.

जोरदार

अतिशय ताकदवान लेखन. मुक्तसुनितयांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.
कवितेचा प्रवास, शिंपिणीचे घरटे आणि हा लेख. एकापेक्षा एक सरस ललित लेखन.

>तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू जागीच बसतात.तसं थोडसं झालं आहे.<
कमालच आहे. नमस्कार !
-- लिखाळ.

अप्रतीम कथा

काय लिहु. Hypnotized

रामदास

रामदास काकांच लिखाण म्हणजे क्लासच काय बोलु अजुन. Smile
चतुरंग आणि मुक्तसुनीत यानी वर लिहिलेल्या प्रतिसादाशी सहमत.
हे रामदास काकांसाठी..................


................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? Smile
http://picasaweb.google.co.in/zakasrao

केवळ सुंदर !!!

साठोत्तरी च्या दशकात ग्रामीण साहित्याने ज्या काही कथा फुलवल्या त्याची आठवण झाली.
अतिशय सुंदर कथा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास

रामदासांच्या कथा नेहमीच एक अपेक्षा ठेवून वाचल्या जातात. ती अपेक्षा पूर्ण करणारे लेखन. असेच आणखी वाचायला आवडेल.

>>> आता घरात

>>> आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?

वा !
एकदम मस्त लेखन !
मनाला भिडणारं !

जिओ ! रामदास बाबू !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

अप्रतिम

बस् वाचता वाचता कधी कालकुपीत गेलो ते समजलच नाही. बाहेर आलो आन कळफलक बडवला.
प्रकाश घाटपांडे

अप्रतिम

बस् वाचता वाचता कधी कालकुपीत गेलो ते समजलच नाही. बाहेर आलो आन कळफलक बडवला.
प्रकाश घाटपांडे

अप्रतिम........

अप्रतिम.................................................................................................

मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

अप्रतिम........

अप्रतिम.................................................................................................

मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर