राजकारणावर बोलू काही!

अँड. हरिदास उंबरकर's picture
अँड. हरिदास उंबरकर in जनातलं, मनातलं
18 Dec 2017 - 2:03 pm

(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..)

निकाल लागला !!
मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्याच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला तर काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली होती. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले. भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी मागील दिवसात गुजरातेत डेरा टाकला होता. आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी पासून ते एकेमकांचं उखळ पांढर करण्याइतपत प्रचार गुजरात मध्ये करण्यात आला. देशातील नेते आणि पक्ष आरोप करण्यासाठी कमी पडले म्हणून कि काय, शेजारच्या राष्ट्रालाही या निवडणुकीत सामील करण्यात आले. साम, दाम, दंड, भेद ही आयुधे निवडणुकीत वापरली गेलीच, तद्वातच नेत्यांचे खासगी जीवनही प्रचाराचा मुद्दा बनला. सेक्स सीडी, 'धर्म' वाद इत्यादींनी राजकारणाची पातळी दाखवून दिली. गुजरातच्या निवडणुकीसाठी संविधानाचे संकेत बासनात गुंढाळून ठेवून अक्षरशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही पुढे ढकलण्यात आले. अखेर आज या महासंग्रामाचे निकाल समोर आले असून बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट झालं आहे. सुरवातीचा कौल सत्ताधारी भाजपाच्या बाजूने असला तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनेही मोठी मुसंडी मारली आहे. ज्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस चित्रातही दिसत नव्हते, ते काँग्रेस आज पंतप्रधांनांना त्यांच्याच होम ग्राउंड मध्ये काट्याची टक्कर देत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कौल आज हाती येतोय. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निकालातून भविष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट झाला आहे. अपेक्षेप्रमाणे १०४ जागा घेत सत्ताधारी भाजपाने गुजरातचा गड राखला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवाला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाला, मोदी विरोधाचे कितीही मोठे पहाड रचले तरी भाजपाला साथ देणाऱ्या गुजराती जनतेला आणि गुजरात मध्ये काम करणाऱ्या भाजपा नेता- कार्यकर्त्यांना याचे श्रेय द्यावे लागेल. पाटीदार समाजाचे आंदोलन, हार्दिक पटेल सारखा नेता, विकासाच्या मॉडेल ची उडवली गेलेली खिल्ली, राहुल गांधी यांची टोकदार भाषणे, मोदीविरोधाचा सूर आदी विविध कारणांमुळे खरं तर सुरवातीला भाजपाची स्थती थोडीसी चिंताजनक राहील असा अनेकांनाचा दावा होता. एक्झिट पोल वर ही काही जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज अखेर 'दूध का दूध,पाणी का पाणी' झाले आहे. गुजराती जनतेने भाजपाला बहुमत देत आजही गुजरात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सहाजिकच "विकास" वेडा वैगेरे झाला नसून योग्य मार्गावरचं आहे. याचा निकाल लागला! असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षात मोदी सरकाराने जी धोरणे राबविली, निर्णय घेतले, विकास केला, त्यावरून कितीही राजकारण केल्या जात असले तरी जनता अजूनही मोदी यांच्या सोबत आहे, याचा 'निकाल' गुजरात आणि हिमाचलच्या निकालाने लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली, असे म्हणावे लागेल. एकीकडे गुजरात निवडणुकीने पंतप्रधानांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तर दुसरीकडे याच निवडणुकीने काँग्रेसलाही नेतृत्व दिले. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही गुजरात निवडणुकीचाच मुहूर्त ठरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल पर्व सुरु होण्यासही गुजरातच कारणीभूत ठरला असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी दाखवेलला आत्मविश्वास लक्षणीयचं म्हणावा लागेल.

गुजरात निकालाने तिसरा निकाल लावला तो हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांचा.. आंदोलनातील गर्दी निवडणुकीत मतात परिवर्तित होईलच ! याची शास्वती नसते. किंबहुना बहुतांशवेळा आंदोलक नेत्याला निवडणुकीच्या राजकारणात डावलल्या जाते, असा इतिहास आहे. त्याची पुनरावरुत्ती गुजरातेत बघायला मिळाली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तिघांनाही गुजरात जनतेने फारसा कौल दिला नाही. समाजाच्या मागण्या एका जागी आणि राजकारणातील पसंती दुसऱ्या जागी असा काहीसा प्रकार गुजरातमध्ये बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यवरून हार्दिक पटेल यांचं नेतृत्व समोर आलं. हार्दिकने आंदोलनात जशी गर्दी खेचली तशींचं निवडणुकीच्या जाहीरसभांमध्येही खेचली. परंतु ही गर्दी मतात परिवर्तित होताना दिसली नाही. कदाचित हार्दिक पटेल यांची तथाकथित सेक्स सीडी, काँग्रेसला पाठिंबा आदी कारणे याठिकाणी कारणीभूत ठरली असावी. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर या सर्वांचा 'निकाल लागला!' हे वास्तव आहे.

देशाच्या राजकारणाची दिशा बदलावणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अर्थातच पुढील अनेक दिवस कवित्व सुरु राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि हार्दिक पटेल याणी इव्हिम मध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थति केला होता. त्यावरूनही आता भविष्यात चर्चांचे फड रंगतील. ईव्हीएम मतदान पद्दती किती सुरक्षित? हा तसा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल ! आपल्यापेक्षा तंत्रद्याने प्रगत असलेल्या देशांमध्ये आजरोजी ईव्हीएम प्रणाली बंद झाली आहे.. त्यांनी पुन्हा बॅलेट पद्दत अवलंबविली आहे. त्यामुळे याबाबतीतील संशय दूर करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले पाहिजे.ही अपेक्षा रास्त असली तरी " जो जिता वही सिकंदर " या नियमाप्रमाणे आज भाजपा सिकंदर झाली आहे . त्यांच्या विजयांवर शंका उपस्थति करण्यास काहीही अर्थ नाही. गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती आहे.

राजकारणलेख

प्रतिक्रिया

राष्ट्रीय पातळीवर कुणाला आणायचे हे समजण्याइतका मतदार हुशार आहे.

राष्ट्रीय पातळीवर कुणाला आणायचे हे समजण्याइतका मतदार हुशार आहे.

अँड. हरिदास उंबरकर's picture

18 Dec 2017 - 8:08 pm | अँड. हरिदास उंबरकर

राष्ट्रीय पातळीवर कुणाला आणायचे हे समजण्याइतका मतदार हुशार आहे.<<
>>नक्कीच मतदार हुशार आहेच..