एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ.
मनस्विनी लता रवींद्र म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या लेखीका आणि नुकत्याच गाजलेल्या "ती सध्या काय करते" च्या पटकथा लेखिका. त्यांनी एक गुंतागुंतीची कथा नाटकाचा कोणतेही रिटेक नसलेल्या अन लोकेशन बदलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या वातावरणात अगदी कौतुकास्पद रित्या उभी केलेली आहे.
अमेय वाघ, सखी गोखले सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर या सगळ्यांचाच अप्रतिम अभिनय हे अमर फोटो स्टुडिओ चे मुख्य यश. अमेय वाघ ने अक्षरश: तीन ते चार वेगवेगळ्या भूमिका सराईतपणे वठवल्यात. आणि आजोबा - वडील - मुलगा या तीनही पिढ्यांच्या अभिनयात सुव्रत जोशी कोठेही कमी पडत नाही. उलट दुसऱ्या अंकात एक असा प्रसंग येतो कि त्याला एकाच सीनमध्ये दोन भूमिका कराव्या लागतात. त्या प्रसंगात फक्त वेशभूषेच्या फरकाने दोन भूमिका वठवून सुव्रत जोशी अगदी अप्रतिम रित्या दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरून उरतो. सखी गोखले हिने पण तिच्या भूमिकेत जीव ओतलेला आहे. स्टेजवरून खाली प्रेक्षकांत कहाणीच्या प्रसंगान्वये शिरून प्रेक्षकांना कहाणीत समरस होण्यास भाग पाडण्याचा तिचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता.
एक अप्रतिम नाटक जे मनोरंजनाचा हेतू पूर्ण करते. वास्तविक एका नाटकाला रेटिंग मी काय देणार पण तरीही या नाटकाला ५* देण्याचा मोह मी चुकवणार नाही.
-समीर
प्रतिक्रिया
11 Sep 2017 - 6:51 pm | पैसा
या नाटकाचे परीक्षण मिपावर वाचल्यासारखे वाटतंय. तुम्हीही थोडक्यात चांगलं लिहिलंय.
13 Sep 2017 - 3:38 pm | श्रीगुरुजी
http://www.misalpav.com/node/38654
16 Sep 2017 - 11:28 am | समीर_happy go lucky
नाटकात कधीही कथा सांगायची नसते असा परीक्षणाचा पहिला नियम असतो, कारण नाटकाची कथा हि दृश्य मेहनत असते, अनेकांची, तुम्ही तर पूर्ण कथाच कागदावर उतरवलीत. नाटकाला फक्त प्रेक्षकांना बघण्यासाठी "प्रोत्साहन देणे" इतकीच परीक्षण लेखकाची भूमिका असावी. ती निभावलीत तुम्ही पण कथा कधीही सांगू नये.
तुमचे मत काय ?
16 Sep 2017 - 11:49 am | अभ्या..
एकतर नाटक आल्यानंतर 10 महिन्यांनी तुम्ही परीक्षण लिहिणार, नंतर दुसऱ्याने आधीच वेळेवर लिहिलेल्या परिक्षणाची मापे काढणार. कसली प्रोत्साहने आणि कसले काय.
यापुढे जरा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहात जा आणी तुमच्या पद्धतीने परीक्षण पटाकंदिशी लिव्हत जावा.
आणि ते परिक्षणाचे रुल्स वगैरे पण टाका डिटेलात एकदिवस. समजायला बरे.
16 Sep 2017 - 1:34 pm | समीर_happy go lucky
मित्रा नाटक आणि सिनेमा या मनोरंजनाच्या दोन परिघात तू गल्लत करतो आहेस. सिनेमा हा शूट झालेला असतो, त्यात बदल शक्य नसतो आणि नाटक हे लाईव्ह असते. उपस्थित प्रेक्षकांसमोर दर वेळेस नवीन घडते. त्यामुळे "फर्स्ट डे फर्स्ट शो" हि कल्पनाच नाटकांत नसते. नाटकाच्या कथेला जितकं महत्व द्यायला हवे तितके सिनेमाच्या नाही कारण नाटकाची कथा हि दर वेळेस नवीन घडते प्रेक्षकांपर्यंत. भरत जाधव सारखा एकाच नाटकांत चार-चार भूमिका करूनही त्या भूमिकांत दर वेळेस जीव ओतणारा अभिनेता सिनेमात बनणेच शक्य नाही.
16 Sep 2017 - 1:52 pm | समीर_happy go lucky
http://www.misalpav.com/node/37052
इथे तुम्हाला चित्रपट परीक्षणासंबंधी डिटेल रुल्स बघायला मिळतील, वाटल्यास
13 Sep 2017 - 4:44 pm | आशु जोग
हे नाटक खूप भावले. दिल दोस्ती मधे अगदीच हलके फुलके काम करणारी पूजा ठोंबरे हिचे काम तर अतिशयच लक्षात राहते.