सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
12 Dec 2015 - 9:08 pm
गाभा: 

हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
" मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
" हो. कुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला.
" मग मंदिरात कसे आला ?"
" तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो."
" तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो."
" देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छा" मी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल."
" आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला.
"ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
" ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला.
" त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
" सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
" ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
" अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
" चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो.
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
" आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही."
" पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला.
" ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "
"गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले.
" ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा."
गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे.
.................................................................................

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

12 Dec 2015 - 11:26 pm | लालगरूड

छान लिहले आहे. _/\_

पगला गजोधर's picture

14 Dec 2015 - 12:35 pm | पगला गजोधर

atheism

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Dec 2015 - 1:17 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त!

rajkumarshetye's picture

13 Dec 2015 - 12:36 am | rajkumarshetye

आपले विचार पटतात

प्रभाकर पेठकर's picture

13 Dec 2015 - 1:38 am | प्रभाकर पेठकर

>>>>आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ?

ह्यावर भले भले सुशिक्षित(?) सुद्धा विचार करू इच्छित नाहीत. 'आमची श्रद्धा आहे' म्हणायचे आणि चर्चेकडे पाठ फिरवायची. हे खरं पाहता त्वचा बचाव धोरण असतं. सर्व श्रद्धेच्या पोटी कांही न कांही 'भिती' दडलेली असते. आणि वरील विचार पटले तरी त्यावर कृती करण्यास मन धजावत नाही. कारण पोथ्यापुराणातून, भक्तमंडळींकडून 'सर्वनाशाची' अशी भिती घातलेली असते की, 'जाऊ दे नं. थोडक्याकरता देवाला नाराज करून त्याचा रोष का पत्करावा?' असा विचार असतो आणि अंधश्रद्धा पुढे चालू राहते. ती तशी चालू राहण्यात सर्व देवालयांच्या विश्वस्तांचं 'हित' दडलेलं असतं.
पोथ्यापुराणं माणसांनीच लिहीलेली आहेत. ईश स्तुती करताना, लोकांना भक्ती मार्गावर 'खेचण्यासाठी' अशा पोथी लेखकांनी चमत्कारांचा आणि अद्भुताचा एव्हढा आधार घेतला की आपण वास्तवापासून दूर जातो आहोत हेच ते विसरून गेले. साईबाबांच्या पोथीतही 'जो जो मज भजे जैशा जैशा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी' असे वाक्य आहे. म्हणजे भक्ताचा भक्तीभाव पाहून त्याला त्याचे फळ देणे ही सौदेबाजी आहे. हे पोथी लेखक विसरतो. देवालाही मानवाच्या पातळीवर आणून मानवाचे सर्व राग, लोभ, सौदेबाजी हे दुर्गूण देवांना चिकटवून ह्या पोथी लेखकांनी देवालाच बदनाम केले आहे. मनोभावे दोन हात आणि मस्तक जोडून तुमची भक्ती व्यक्त होऊ शकते. पण आख्ख आयुष्य फकीरावस्थेत व्यतित केलेल्या साई बाबांना सोन्याचे सिंहासन आणि चांदीची आरास केली जाते. सिद्धीविनायकाचा कळस सोन्याचा केला जातो. दर्शनरांगेत उभे राहायचे नसेल तर ज्यादा चार्ज भरून पुढे थेट देवाच्या चरणाशी जाण्याची सोय होते. अशा वेळी इतर गरीब भाविकांचा हक्क, अग्रक्रम डावलून आपण पुण्य कमवत नाही तर 'पाप' करतो आहोत हे स्वार्थी भक्तांच्या ध्यानात येत नाही किंवा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जाते. वार्षिक ३५० करोड कमविण्यार्‍या साईस्थानाच्या बाहेर कचरा, सांडपाणी, खड्डे आणि व्यावसायिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ह्या सर्व वास्तवाकडे डोळेझाक करून भाविक(?) साईचरणी भरभरून दान अर्पण करून आपली मनोकामना पुरी करायची विनंती साई मुर्ती पुढे करत असतात. म्हणजे आपले काम व्हावे म्हणून एक प्रकारची लाच देवाला अर्पण केली जाते आणि त्यालाच भक्तीभाव म्हणून मिरवलं जातं. असो.
ह्या विषयावर लिहावं तेव्हढं कमीच आहे. आणि 'आमची श्रद्धा आहे' दर्जाच्या भक्तांवर सुतराम परीणाम होत नाही हे दुर्दैवं आहे.

जर मूर्ती शिल्प म्हणून पाहू शकता तर प्रसाद लाडू म्हणून का खाऊ शकत नाही? राहिला प्रश्न पावतीपुस्तकाचा. देणगी द्यायला नम्रपणे नकार देणं सहज शक्य होतं. (मुळात तशी त्यांची अपेक्षा होती का हा प्रश्नच आहे, कारण तेरा पावत्या आगोदरच फाडल्या गेल्या होत्या ना?)

मराठी_माणूस's picture

13 Dec 2015 - 5:09 pm | मराठी_माणूस

सहमत.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Dec 2015 - 2:56 pm | llपुण्याचे पेशवेll

येवढं सोपं जमलं असतं तर लेख लिहून तुणतुणं वाजवायची गरज पडली नसती. बाकी फादर फ्रान्सिस दिब्रिटोंनी लेख लिहीला होता की प्रधानमास्तर जे आयुष्यभर नास्तिक राहीले ते शेवटच्या भेटीत फादरना म्हटले 'फादर मला येशूकडे घेऊन चल'. शरद जोशी उत्तरायुष्यात अध्यात्माकडे वळलो अशी कबुली देतात. बाकी ज्यांचा विश्वास नाही त्यांना चालूदे म्हणावे.
चालुदे यनावालासर.

कपिलमुनी's picture

23 Dec 2015 - 3:09 pm | कपिलमुनी

प्रधानमास्तर म्हणजे ग.प्र. प्रधान का ?

प्रकाश घाटपांडे's picture

24 Dec 2015 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे

शरद जोशी उत्तरायुष्यात अध्यात्माकडे वळलो अशी कबुली देतात. बाकी ज्यांचा विश्वास नाही त्यांना चालूदे म्हणावे.

मंग उत्तरायुष्यात वळा आत्ताच वळू नका असे म्हणणारे भेटतीलच. :)
प्रधान मास्तरांनी आयुष्याच्या उत्तरार्धात साधना दिवाळी अंकात एक लेख लिहिला होता. त्यात त्यांच्या सश्रद्ध आस्तिक विचाराची छटा दिसत होती. त्यावर आमचा अंनिसतला कडवा नास्तिक मित्राने प्रधान मास्तर ही शेवटी कच्च मडकच निघाल अशा आशयाच खाजगीत वक्तव्य केल. प्रधान मास्तर हे काही अस्तिक व श्रद्धाळू लोकांचा उपहास करणारे कधीही नव्हते. ते सहृदयी विवेकवादी नास्तिक होते असे फार तर म्हणता येईल.
खर तर विवेकवादी चिकित्सक माणूस हा आपले विचार सातत्याने तपासत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यात काही बदल करावेसे वाटले तर करीत असतो. हा बद्ल म्हणजे काही पराभव वा गुन्हा नव्हे.पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुलनेने प्रगल्भता आलेली असते म्हणून त्याला विशेष मह्त्व आहे.
आयुष्याच्या पुर्वार्धात अस्तिक व सश्रद्ध असलेली माणसे उत्तरार्धात नास्तिक व अश्रद्ध झालेली दिसू शकतात. माझ्या मते अशा बाबी या मेंदुतील जैवरासायनिक बदल आहेत.

स्वप्नांची राणी's picture

13 Dec 2015 - 2:10 am | स्वप्नांची राणी

यनावाला..तुमचे सगळे लेख खूप आवडलेत! तुमची पुस्तकेही वाचलीत...

समाज प्रबोधनाचे कार्य म्हणजे thankless आणि neverending job. त्यातून तुम्ही लिहिता तो विषय म्हणजे प्राणाशीच् गाठ!! पण लिहित रहा pls....hats off Sir..!!!

नेहमीप्रमाणेच हाही लेख आवडला.
पहिले काही परिच्छेद वाचून माझ्या काही मंदिर भ्रमंतींची आठवण झाली.

सतिश गावडे's picture

13 Dec 2015 - 10:16 pm | सतिश गावडे

मी ही माझ्या दोन प्रचंड सश्रद्ध मित्रांसोबत पुन्याभोवतीच्या शंभर किमी परिघातील कितीतरी मंदिरे अशीच मुर्तीला नमस्कार न करता, प्रसाद न घेता पाहिली आहेत. अगदी व्यवस्थित दर्शनाच्या रांगेत उभे राहून.

पण मला खात्री आहे, मी त्यांच्यासोबत असताना चुकून कधी गाड़ी बंद पडली तर ते मला दोष देणार नाहीत. सश्रद्ध असले तरी ते अडाणभोट नाहीत. :)

पगला गजोधर's picture

14 Dec 2015 - 9:35 am | पगला गजोधर

अडाणभोट लोकं आता स्वतःला 'सश्रद्ध' ची कातडी पांघरून येतात …

नगरीनिरंजन's picture

13 Dec 2015 - 8:49 am | नगरीनिरंजन

लेख छानच!
मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) नंतरची सगळ्यात मोठी "इंडस्ट्री" आहे ही आणि आस्तिक लोक त्याचे निष्ठावान ग्राहक. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीशी पंगा घेणे धोकादायक आहे यनावालांना माहित असेलच.

पगला गजोधर's picture

14 Dec 2015 - 9:32 am | पगला गजोधर

मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) नंतरची सगळ्यात मोठी "इंडस्ट्री" आहे ही

इथे

मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) आधीची आदिम सगळ्यात मोठी मोनोपोलीस्टिक "इंडस्ट्री" आहे ही

यनावाला यांचा हा लेखं आवडला.

बोका-ए-आझम's picture

13 Dec 2015 - 4:32 pm | बोका-ए-आझम

आपल्या अशा विचारांना सुरूवात कशी झाली याचं कुतूहल आहे. त्याबद्दल काही सांगाल का?

अनुप ढेरे's picture

13 Dec 2015 - 5:06 pm | अनुप ढेरे

लेख आवडला!

मुक्त विहारि's picture

13 Dec 2015 - 5:39 pm | मुक्त विहारि

विचार पटले.

पैसा's picture

13 Dec 2015 - 6:09 pm | पैसा

लेख आवडला. पण एकूण कोणाशी वाद घालत बसण्यात काही पॉइंट नसतो. आपले डोके खराब करून घ्यायचे. त्यापेक्षा मी प्रसाद लाडू म्हणून खाऊन टाकते आणि वर्गणीसुद्धा देते ११ रुपये. काय फरक पडणार आहे? आपला वेळ आणि मनःशांती महत्त्वाची. तसेही दुसर्‍यांना कशाला दुखवायचे? त्यांची मते जन्मात बदलत नाहीत. राहू देत त्यांनाही सुखात.

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 7:23 pm | संदीप डांगे

प्रतिसाद एक नंबर... कोणीही आपली मतं अशीच बदलत नाही. प्रचिती आल्याशिवाय. म्हणजे देव असल्याची वा नसल्याचीही...

बोका-ए-आझम's picture

14 Dec 2015 - 1:34 am | बोका-ए-आझम

अशीही एक शक्यता आहे पैतै की त्यांनी आधी हुमण किंवा तत्सम गोंयच्या पाककृती जर रेमटवल्या असतील तर लाडवांनी ती तोंडाची चव खराब करण्याची त्यांची इच्छा नसेल. उद्या तांबडा-पांढरा ओरपल्यावर साक्षात महालक्ष्मीने जरी प्रसाद म्हणून लाडू दिला तर आपण खाऊ का? मी तरी नाही खाणार!

पैसा's picture

14 Dec 2015 - 11:20 am | पैसा

हेच कारण बरोबर वाटतंय!!

यशोधरा's picture

13 Dec 2015 - 6:29 pm | यशोधरा

नास्तिक असूनही तो लाडू तुम्हांला "प्रसादाचा" लाडू म्हणून नाकारावासा वाटतो, ह्याचेच खरे तर नवल वाटते आहे!

यनावाला's picture

13 Dec 2015 - 9:16 pm | यनावाला

@ आदूबाळ आणि यशोधरा
...
तो लाडू प्रसादाचा होता म्हणून नाकारला असे नव्हे. लाडूचे काही मूल्य (किंमत) असते. ते न देता लाडू खाणे योग्य नाही म्हणून खाल्ला नाही. तसेच लाडू विनामूल्य स्वीकारल्यावर मिंधेपणा आला असता. नंतर पुढे केलेले पावती पुस्तक नको नको म्हणणे शोभले नसते. समाजात वावरताना काही आचरणतत्त्वे,पथ्ये, सर्वांनी पाळावी. मात्र आपल्या विचारसरणीला मुरड घालू नये असे मला वाटते.

अभ्या..'s picture

13 Dec 2015 - 9:35 pm | अभ्या..

तुमच्या विचारसरणीवर ठाम अस्ल्याबद्दल कौतुक आहे.
पण

लाडूचे काही मूल्य (किंमत) असते

हे वाचून देव या अकाऊंटचे ऑडिट लैच भयानक असणार यात शंका नाही.

यशोधरा's picture

13 Dec 2015 - 10:54 pm | यशोधरा

लाडूचे काही मूल्य (किंमत) असते. ते न देता लाडू खाणे योग्य नाही म्हणून खाल्ला नाही. तसेच लाडू विनामूल्य स्वीकारल्यावर मिंधेपणा आला असता. नंतर पुढे केलेले पावती पुस्तक नको नको म्हणणे शोभले नसते.

लाडूची किंम्मत म्हणून पावती फाडायची. देवाला देणगी म्हणून नव्हे.

बोका-ए-आझम's picture

14 Dec 2015 - 1:25 am | बोका-ए-आझम

त्यांना देव या संकल्पनेचं अस्तित्व मान्य नाही त्यामुळे आपले पैसे हे त्यासाठी वापरले जावेत अशी त्यांची इच्छा नाहीये. जरी त्यांनी लाडवाची किंमत म्हणून पावती फाडली तरी तो लाडू देऊन पावती फाडणारा देवाच्याच नावाने ती फाडणार. त्यापेक्षा त्या फंदातच पडायला नको म्हणून त्यांनी प्रसाद घेतलाच नाही. न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी!

आपण एखाद्या वस्तूचं मूल्य म्हणून पैसे मोजतो तेव्हा त्या पैशाचं अखेरीस काय होतं याची चिंता पैसे मोजणारा करायला लागला की संपलंच की हो.

समजा, मी रिक्षातून स्टेशनपासून घरापर्यंत आलो आणि शंभर रुपये दिले. त्यातल्या नफ्यातून रिक्षावाल्याने दारू प्यायली आणि बायकोला मारलं, तर ती माझी चूक कशी असू शकेल? यासाठी रिक्षाच टाळणं हा उपाय नाही.

बोका-ए-आझम's picture

14 Dec 2015 - 8:45 am | बोका-ए-आझम

रिक्शावाला काय करु शकेल याचं मी भाकित करु शकत नाही पण देवस्थानच्या नावाने जर पावती फाडली असेल तर ते पैसे देवस्थानाकडेच जाणार आहेत हे उघड आहे. तुमचं उदाहरण ग्राह्य झालं असतं, जर या माणसाने देवस्थानाच्या नावे देणगी घेतली असती पण पावती दिली नसती तर. पण लेखात पावताइ दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. In fact, तुमचं म्हणणं मान्य केलं तर taxpayer's money is wasted असं आपण कोणीही म्हणू शकणार नाही. त्या पैशाचं काय होतंय याची चिंता ही करावीच लागते. हवाला व्यवहार करणारेही हेच समर्थन देतील मग.

मराठी कथालेखक's picture

14 Dec 2015 - 6:02 pm | मराठी कथालेखक

जसे श्रध्दाळू लोक त्यांचि श्रध्दा जपतात त्याचप्रमाणे नास्तिक मनुष्य नास्तिकता जपण्यासाठी लाडू (प्रसाद) नाकारु शकतो.
राहिले मंदिरात जाण्याबद्दल, अनेकदा मंदिरे ही स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना त्यामुळे मंदिरात जाण्याची उत्सुकता नास्तिक माणसालापण असू शकते.
मी सुध्दा नास्तिक आहे, पण काही वेळा एखाद्या मंदिराबद्दल कुतुहल वाटल्यास आत जातो. मुर्तीला नमस्कार मात्र करत नाही.
तुम्ही लिहलेला किस्सा खूप जुना आहे, आता मला तरी माझ्याबरोबरचे लोक (मित्र, नातेवाईक) नमस्कार कर म्हणुन आग्रह करत नाहीत.
तरी मंदिरात जास्त गर्दी असताना जाणे टाळतो कारण इतर अनेक (अनोळखी) भाविक असतील आणि मी नमस्कार न केल्याने 'भावना दुखावल्याचा' कांगावा कुणी सुरु केला तर उगाच वातावरण बिघडेल.

बाकी मी माणसांनाही नमस्कार (पायांना स्पर्श करुन वगैरे) करीत नाही. कारण एक माणूस दुसर्‍यापेक्षा इतका उच्च असावा की दुसर्‍याने त्याच्या पायांना स्पर्श करावा ही कल्पना मला मान्य नाही.

बाकी मी माणसांनाही नमस्कार (पायांना स्पर्श करुन वगैरे) करीत नाही. कारण एक माणूस दुसर्‍यापेक्षा इतका उच्च असावा की दुसर्‍याने त्याच्या पायांना स्पर्श करावा ही कल्पना मला मान्य नाही.

"अहंकाराचा वारा | न लागो माझिया चित्ता|" म्हणून नमस्कार करायचा असतो. दुसरा मोठा आहे म्हणून नव्हे.

मराठी कथालेखक's picture

16 Dec 2015 - 1:08 pm | मराठी कथालेखक

"अहंकाराचा वारा | न लागो माझिया चित्ता|" म्हणून नमस्कार करायचा असतो. दुसरा मोठा आहे म्हणून नव्हे.

हे वचन मला माहित नव्हते. पण एक शंका आहे ज्याला वाकून नमस्कार करत राहतो त्याचा अहंकार वाढत नसेल का ? घरातील सगळ्यात वयस्कर व्यक्तीने स्वतःचा अहंकार कमी करायला काय करावे ?
तसेच "माझ्यात खूप अहंकार भरलेला आहे आणि तो मला कमी करायचाय आणि त्याकरिता मी समोरच्या व्यक्तीला (इथे सहसा ती वयाने मोठीच असावी लागते हं .. काही अपवाद असतील म्हणून 'सहसा' शब्द वापरला, असो.) मी वाकून नमस्कार करणार आहे" इतकी जाणिव असलेल्याच्या मनात खरंच अहंकार असेल का ? आणि स्वत:च्या अहंकाराची जाणिवच नसलेल्याने केवळ सवय वा सोपस्कार म्हणून दुसर्‍या व्यक्तीस नमस्कार केल्याने त्याचा/तिचा अहंकार कमी होईल का ?

गमतीखातर एक Prescription बनवावेसे वाटले

Dr xxxx xxxx , Consulting Psychiatrist
Diagnosis : नॉर्मल रेंज पेक्षा जास्त अहंकार

Rx
५ लोकांना खाली वाकून नमस्कार १ - १ x १५ दिवस

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Dec 2015 - 1:20 pm | हतोळकरांचा प्रसाद

दुसर्यांच्या अहंकाराची चिंता नसावी, आपल्या अहंकाराबद्दल आहे ती ओवी! बाकी चालुद्या!

मराठी कथालेखक's picture

16 Dec 2015 - 1:25 pm | मराठी कथालेखक

वा़कून नमस्कार केल्याने अहंकाराचा वारा लागत नाही असंही ओवीत म्हंटल आहे का ?(मला पुर्ण ओवी माहित नसल्याने विचारत आहे)
आणि तसं नसेल तर नमस्कार करण्याचा आणि ओवीचा काहीच संबंध नाही

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Dec 2015 - 4:46 pm | बिपिन कार्यकर्ते

आमच्या घरात कोणीही (अगदी २ वर्षाच्या बालकानेही) नमस्कार केला तरी वाकून प्रतीनमस्कार करायची पद्धत आहे. आणि यामागे आपल्या मनात अहंकार उत्पन्न होऊ नये हेच कारण आहे असे शिकविले गेले आहे. एका अत्यंत थोर आणि व्यासंगी प्रवचनकारांना खूप जवळून बघण्याचा योग अनेक वर्षे आलेला आहे. ते ही प्रत्येक पाया पडणार्‍याला उलटा नमस्कार करत.

मिलिट्रीतही एखाद्या ऑफ़िसरला एखाद्या साध्या सैनिकाने सलाम केला तर प्रतीसलाम करणे सक्तीचे आहे. प्रत्यक्ष व्यवहारात तसे होतेच होते, आणि न झाले तर कमीत कमी कोणत्या न कोणत्या कृतीने दखल घेऊन प्रतीसलाम केला जातोच. तसे न झाले तर बहुधा तो फ़ाउल धरतात. त्यावर कारवाईही होते बहुधा, किंवा होऊ शकते.

मूळात हा सगळाच विषय अगदी घट्ट, हार्ड ऍंड फ़ास्ट असा नाही. त्यामुळे, एका ज्ञानशास्त्रातले घट्ट (आणि समान परिस्थितीत सर्वकाळी समान परिणाम देणारे) नियम अगदी तस्सेच्या तस्से इथे लागू व्हावेत असे मानणे, हे ही गंमतीशीरच.

म्हणूनच ... चालू द्या.

कानडाऊ योगेशु's picture

16 Dec 2015 - 7:45 pm | कानडाऊ योगेशु

"एकमेका लागतील पायी रे" ही तर अगदी पूर्वापार चालत आलेली वारकरी परंपरा आहे. कुणी लहान नाही कुणी मोठे नाही.सगळे विठुमाऊलीची लेकरे.! (विठ्ठलाला माऊली म्हणुन संबोधणे हे कशाचे लक्षण म्हणावे. आस्तिकतेचे ना नास्तिकतेचे!)

मराठी कथालेखक's picture

16 Dec 2015 - 7:55 pm | मराठी कथालेखक

आमच्या घरात कोणीही (अगदी २ वर्षाच्या बालकानेही) नमस्कार केला तरी वाकून प्रतीनमस्कार करायची पद्धत आहे.

हे ठीक वाटते, निदान समानता आहे. बाकी पायाशी वाकावे की हस्तांदोलन करावे की गळाभेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न

सुबोध खरे's picture

16 Dec 2015 - 8:36 pm | सुबोध खरे

विनम्रता आणी अहंकार याची लाश्कारातील एक कहाणी.
पिथोरागढ च्या आसपास लष्कराची एक तुकडी गस्त कम ट्रेकिंग्साठी गेली असताना वाट चुकली फिरत असताना एका गुहेशेजारी एक साधू फक्त एक धोतर नेसून उघडा उन्हात तप करीत असलेला पहिला तेंव्हा त्यातील दोन अधीकार्यानी आपसात इंग्रजीत चर्चा केली एक म्हणाला या साधूला विचारावे का? दुसरा म्हणाला हा अनाडी आहे याला काय कळणार आहे? साधूने त्यांचा आवाज ऐकून डोळे उघडले आणी इंग्रजीत विचारले कि तुम्हाला काय पाहिजे. हे दोघे अधिकारी अवाक झाले आणी त्यांनी साधूला रस्ता विचारला. साधूने रस्ता सांगितला. त्यावर त्या दुसर्या अधिकार्याला स्वस्थ बसवेना. त्याने विचारले साधू "महाराज" तुम्ही शिकलेले आहात काय. त्यावर साधू महाराजांनी त्यांना शुद्ध हिंदीत सांगितले. हां थोडासा पढे है! किती ते विचारल्यावर म्हणाले बनारस हिंदू विश्वविद्यालयसे पी एच डी कि है फिजिक्स में. आता त्या दोनही अधिकार्यांनी तोंडात बोट घातले. दुसर्याने परत विचारले कि आप यहां क्या कर रहे हो? त्यावर ते साधू महाराज म्हणाले कि फिजिक्स मी कुछ प्रश्नोंके उत्तर नाही मिल राहे थे इसलिये निसर्ग के सान्निध्य बैठके चिंतन कर रहे थे.
आता दोन्ही अधिकारी साधू महाराजांच्या पाया पडले.
विद्या विनयेन शोभते. आणि माणसाचा अहंकार दुसर्याला ओळखण्यात कमी पडतो.

नमस्कार करणं (किंवा कोणतीही गोष्ट) जाणिवेच्या पातळीवरून नेणिवेच्या पातळीवर गेलं की ते स्वभावात आणि वर्तणुकीत हार्ड कोड होतं. त्यालाच संस्कार म्हणतात.

उदा. चुकून कोणाला पाय लागला तर आपण नमस्कार करतो. ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून होत असली तरी त्या कृतीतून आपण स्वतःलाच असं सांगत असतो की बाबा रे हे चुकून झालं, मुद्दाम लाथ मारायचा हेतू नव्हता. एखाद्या वेळी ही कृती करायची राहून गेली की चुटपुट लागते.

मोठ्या व्यक्तींना वाकून नमस्कार करण्यातही हेच लॉजिक आहे. ताठ कणा हे स्वप्रतिमा मोठी असल्याचं लक्षण मानलं जातं. ताठरपणा, मोडेन पण वाकणार नाही, ...मोडला नाही कणा, bending someone to his/her own will वगैरे सहज आठवलेली उदाहरणं. तर आपला कणाही कोणासमोर वाकतो, किंबहुना आपण राजीखुषीने वाकवतो हे आपल्या स्वप्रतिमेला काही नॉच खाली आणतं. आणि वैयक्तिकरीत्या मला ते मोलाचं वाटतं.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Dec 2015 - 10:26 am | प्रकाश घाटपांडे

हे आठवले
http://www.maayboli.com/node/17037

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Dec 2015 - 6:35 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त लिहिलेत! आवडेश.

सगळेच एवढे बुद्धीवादी नसतात हो. प्रत्येकाला कोणीतरी लागतो. कोणाला देव, कोणाला दैव ज्योतिषी, तर कुणाला तर्कवाद!

तेव्हा, आपल्याला शुभेच्छा! बाकी देवाबाबत म्हणाल, तर एवढेच सांगू शकेल, की प्रचिती कधीतरी येतेच!
तुमची कदाचित यायची असेल :)

चौकटराजा's picture

13 Dec 2015 - 7:23 pm | चौकटराजा

टवाळकी सहन करून अनेकानी चिकाटीने प्रबोधनाचे कार्य केल्याचे इतिहास सांगतो.आपल्याला देखील तो सनातन विकार (?) झाला आहे असे दिसते. असो आपल्या कार्यात आमची शुभेछ्छा आहे. पण आस्तिकता , अंधश्रद्धा ई त्रिकाळ रहाणार आहेत या निषकर्षाला मी आलोय. याचेच कारण या जगात जो पर्यन्त भीति व कृतज्ञता या दोन भावना आहेत तो पर्यन्त देवच बरेवाईट करू शकतो हा समज घट्ट्च रहाणार. १९९१ नंतर भारतात ऐहिक प्रगति झालेली मी पहातो त्यातील काहीचा भोगही घेतो साम्यवाद अनैसर्गिक आहे हे समजते तरीही मी साम्यवादी आहे. तसे या आस्तिकांचे असते. कळते ते सारे पण वळत काही नाही. खालील दोन मजेशीर वाक्य लिहून प्रतिसाद सम्पवितो.
१. देव आहे का जगात माझे उत्तर आहे १०० टक्के नाही पण देवाची लीला मात्र १००० टक्के आहेच !
२. ज्या देवाने मला त्याचे अस्तित्वच नाकारायला लावले त्याचा मी आभारी आहे.

नाखु's picture

14 Dec 2015 - 8:59 am | नाखु

आलात, कसे आहात???

आधीच्या प्रतिसादातील आमचं आवडीच अवतरण कुठेय...ते गल्लतवालं

१. देव आहे का जगात माझे उत्तर आहे १०० टक्के नाही पण देवाची लीला मात्र १००० टक्के आहेच !
२. ज्या देवाने देवाच्या ठेकेदारांनी/व्यावसायीकांनी मला त्याचे अस्तित्वच नाकारायला लावले त्यांचा मी आभारी आहे.(माझा दर्शनाच्या रांगेत उभे राहण्याचा आणि प्रवास खर्च वाचवला)

आजतगायत तिरूपती/मथुरा आणि गेल्या १० वर्षात शिर्डी येथे न गेलेला पण घरच्या देवाला नियमीत नमस्कार करणारा
नाखु

देव देवळात नाही हे या अतिश्रीमंत संस्थानांनी मला शिकविले,देव उत्स्वात नाही हे मला नवरात्र्/गणेश उत्सवाने शिकवले. परंतु देव आहे याबाबतचा संभ्रम होता. तो अगदी शालेय वयापासून वेळोवेळी मदत करणार्या ज्ञात अज्ञात हितचिंतकांकडून, शिक्षकांकडून मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने आणि सध्या बहुआयामी + बहुरंगी मित्रांच्या धीराने प्रोत्साहनाने अगदी दूर झाला आणि देव फक्त माणसातच आहे याबद्दल नि:शंक झालो

चौकटराजा's picture

14 Dec 2015 - 5:13 pm | चौकटराजा

खाली एकाने साम्यवादी व नास्तिक यान्ची गल्लत केली आहे . प्रत्यक्षता: साम्यवादी बहुदा नास्तिक असतात हे खरे पण ते एक बहुशः नैसर्गिक सत्य म्हणून स्वीकारता येणार नाही. रूढार्थाने काही व्याख्या अशा करता येतील.
देव - या विश्वाचा कारभार सहेतुकपणे चालविणारा कोणीतरी .
आस्तिक- असा सहेतुकपणे चालविणारा नियंता मानवाप्रमाणेच मंगल अमंगलाच्या कल्पना बाळगून आहे व त्याचीच कृपा आपल्यावर असावी असे वाटणारे लोक. ( सगुण परमतत्व)
अस्तिक नास्तिकाच्या मधले.- देव दिसला नाही तरी तो असू शकेल असे मानणारे सबब असलाच तर तो प्रसन्न व्हावा म्हणून धडपडणारे.
नास्तिक- असा सहेतुकपणे जग चालविणारा कोणीही नाही. जग्॑ हे एक परस्परावलंबी संरचना आहे. तिला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर तिने मांडलेले स्प्ष्ट नियम पाळले पाहिजेत असे मानणारे लोक.
हटवादी नास्तिक - यात देवळात काय जायचे? दगडाला काय नमस्कार करायचा ? पूजा कशाला करायची? असा पराकोटीचा
व्यवहारवाद पाळणारे लोक.
अध्यात्मवादी - नेहमीच्या अर्थाने - गुरू, अनुग्रह, जप, साधना, सप्ताह, पोथीवाचन, मंत्रजागर, संप्रदाय, पुनर्जन्म, ई त रमणारे
कर्मकांडवादी- पूजा,कुळाचार, व्रतवैकल्ये, उद्यापने, उपासतापास, भोजने, पितरशान्ती, ई गोष्टी आदराने भीतीने वा आवडीने करणारे.
वेगळा अध्यात्मवाद - बाह्य शक्ती उदा देव गुरू ई ई च्या कृपेच्या शोधात निघण्यापेक्षा आतल्या अवाजाच्या जवळ जाणे मी इथे कशासाठी आलो. त्यात कितपत गुंतायचे ? ममत्वाच्या लफड्यात कितपत पडायचे मी स्वतः ला कसे बघायचे व बोधायचे याचा अभ्यास .

मयुरMK's picture

15 Dec 2015 - 1:27 pm | मयुरMK

पट्वुनी सांगा आम्हाला
देव आम्ही म्हणावे कुणाला ?

या दगडाला, की त्या स्वर्णमूर्तीला
नेमका कसा तो, आहे का तुम्ही पाहिला
भेटला कधी आहे का तो तुम्हाला....?

देव दगडात असे की मुर्तीत वसे
आहे का माहित, रूप तयाचे कसे ?
उगीच का मग सजविता देव्हार्याला ?

देव म्हणजे आहेत कुणी ते ?
स्वप्न एक खुळचट मृत कल्पनेचे
प्रत्यक्ष दिसेना म्हणुनी पटेना मनाला ....

असेल जर तो या जगती
यावे तयाने या नजरेपुढती
साद असे ही आमची त्या दैवाला

असता मनी खरी भक्तिभावना
करावी माणूसकीची आराधना
जिंका माणूसकीला, देव माना मानवतेला.....

सतिश गावडे's picture

14 Dec 2015 - 11:10 am | सतिश गावडे

>> ज्या देवाने मला त्याचे अस्तित्वच नाकारायला लावले त्याचा मी आभारी आहे.

God abandoned me so I abandoned him. :)

एस's picture

13 Dec 2015 - 7:41 pm | एस

लेख नेहमीप्रमाणेच आवडला. आपली भूमिका परखडपणे मांडण्याच्या तुमच्या धैर्याला व चिकाटीला सलाम! मलाही असे काही अनुभव आले आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

13 Dec 2015 - 8:26 pm | गॅरी ट्रुमन

मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले.

हा प्रकार हजम झाला नाही. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही असे म्हणणे याचाच अर्थ---

१) देव अस्तित्वात आहे
२) आणि प्रसाद म्हणून जे काही तुमच्या समोर आले असेल (फळ, खडीसाखर, शिरा इत्यादी) ते ’देवाचे’ आहे

असे तुम्हाला वाटते असा त्याचा अर्थ झाला नाही का?

जो काही प्रसाद मिळाला असेल तो आवडत नसेल म्हणून खाल्ला नाही तर ते समजू शकतो. पण तो ’देवाचा प्रसाद’ म्हणून न खाणे हे काही हजम झाले नाही.

यनावाला's picture

13 Dec 2015 - 9:40 pm | यनावाला

@गॅरी ट्रुमन
देव अस्तित्वात आहे. अनेक देव अस्तित्वात आहेत . पण ते आस्तिकांच्या मनात. मागे डॉ.श्रीराम लागू म्हणाले होते की देवाला रिटायर करा. तेव्हा काही जणांनी वाचकपत्रे लिहिली की डॉक्टर देवाचे अस्तित्व मानतात. त्यावर डॉ.लागूंनी उत्तर दिले होते की ९०%+ लोकांच्या मनात काल्पनिक देव ठाण मांडून बसला आहे. त्याला रिटायर करायला हवे.... आता कमी झाली पण पूर्वी भुते-खेते होती. त्यांचे वसतिस्थानसुद्धा लोकांचे मनच.
2/प्रसादाच्या लाडवाविषयींचे स्पष्टीकरण यशोधरा यांच्या प्रतिसादाच्या संदर्भात लिहिले आहे.

तिमा's picture

13 Dec 2015 - 8:40 pm | तिमा

आस्तिक असो वा नास्तिक, मला लाडवाचा मोह कधी सुटणार नाही. तसाही अकरा रुपयाला एक लाडु, हा रास्तच भाव झाला. तिरुपतीचे लाडु कधीही मिळाले तर मी ते आवडीने खातोच.

कंजूस's picture

13 Dec 2015 - 8:56 pm | कंजूस

किती तो तर्कशास्त्र ,तत्त्वज्ञानाचा कीस पाडतात आस्तीक लोक! आणि पुढच्या बाकावरचे नास्तीक.मी यांना नेहमी सांगतो प्रसाद देणाय्रा देवावर माझी अढळ श्रद्धा आहे.सत्यनारायणाचे बोलावणे असेल तर अगोदरच सांगतो मला शिरा बशिभर लागतो आणि तो ते देतातही.प्रसाद खाण्यात थोडासुद्धा मागे हटत नाही त्यामुळे सर्वांचे आशिर्वाद मिळतात.पोथीतही लिहिलं आहे प्रसाद खातो त्याचं भ लं होतं.तो छप्पन भोग घेणारा ठाकुरजी फारच चांगला अगदी दही पोह्यापासून बासुंदी,खीर आणि गराडू चाटसुद्धा खातो.अगदी बॅटमॅनच्या शब्दात सांगायचं तर देव तुमचं भलं करो ही मनोमन इच्छा नास्तीकच व्यक्त करतात.आमच्या दिव्याखालीही उजेडच पडतो.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2015 - 9:10 pm | अत्रुप्त आत्मा

सत्यनारायणाचे बोलावणे असेल तर अगोदरच सांगतो मला शिरा बशिभर लागतो

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing012.gif __/\__ http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing012.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2015 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबर प्रतिसाद !

आस्तिक नास्तिक तावतावाने भांडत आहेत आणि कंजूस मात्र बशीभर शिरा किंवा छप्पन भोग खाऊन पोटावर हात फिरवित मजा बघत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आले ! ;) :)

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 11:41 pm | संदीप डांगे

+१ =))

=)))अगदी!असेच डोळ्यासमोर आले!

यनावाला's picture

13 Dec 2015 - 10:00 pm | यनावाला

सर्व प्रतिसाददात्या सदस्यांना मन:पूर्वक धन्यवाद ! श्री.प्रभाकर पेठकर यांच्या विस्तृत प्रदिसादात त्यांनी उत्कृष्ट विश्लेषण केले आहे. ते म्हणतात

,"अंधश्रद्धा पुढे चालू राहते. ती तशी चालू राहण्यात सर्व देवालयांच्या विश्वस्तांचं 'हित' दडलेलं असतं."

हे अगदी खरे आहे. अशा हितसंबंधी लबाडांमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक बिकट झाले आहे.श्री.पेठकर यांची लेखनशैली उत्तम आहे. त्यांनी प्रबोधनपर लेख लिहिल्यास वाचकांवर त्यांचा सुपरिणाम होईल. (कदाचित् ते लिहितही असतील. मला कल्पना नाही.)

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2015 - 9:21 pm | प्रभाकर पेठकर

मिसळपाव वर १-२ लेख लिहीले आहेत. भक्तीमार्गातील अडथळे हा २०१४च्या गणेशलेखमालेतील लेख लेटेस्ट म्हणावा लागेल. इतरेजनांचे जाऊदे पण माझ्या स्वतःच्या पत्नीच्या परमश्रद्धाळू स्वभावाला मी बदलू शकलो नाही ह्याचे फार वैषम्य वाटते. पण तिच्या बरोबर मी देवळात जातो. गर्दी नसेल तर आतही जातो. पण नमस्काराला हात जुळत नाहीत. ती प्रसाद आणून कणभर मला देते. (मला मधुमेहामुळे गोड वर्ज्य आहे). मी खातो. तिथे एखादा देणगीचे पुस्तक घेऊन कोणी बसला असेल तर मी देणगीही देतो. हे सर्व मी तिला आवडतं म्हणून, तिचे मन राखण्यासाठी करतो. पण वेळोवेळी तर्किक वादही घालत असतो. असो. ह्या आस्तिकांचे विचार आपण बदलू शकत नाही. पण वरचेवर चर्चाकरून, उदाहरणे देऊन, एखाद्याच्या डोक्यात, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, विचारांचे बीज रुजले तर त्याचा त्यालाच फायदा होईल ह्या विचाराने माझे विचार मांडत असतो. असो.

सतिश गावडे's picture

13 Dec 2015 - 10:24 pm | सतिश गावडे

बाकी ते सत्यनारायनाच्या पुजेचं म्हणाल तर ते धर्मसुधारनेचं एक प्रभावी माध्यम आहे असं कुणीसं म्हटलं आहे. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2015 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा

आहो..चूक चूक...आपल्याला नेमकं उलट ऐकू आलेलं आहे. त्यांनी ते धर्मसुधारनेचं एक प्रभावी माध्यम आहे.. असं म्हणलेलं नसून त्या(मूळच्या शोषक) माध्यमातून (त्याला बदलवून..) प्रभावी(पणे) धर्मसुधारणा करता येते.. असं म्हटलेलं आहे..

सतिश गावडे's picture

14 Dec 2015 - 11:13 am | सतिश गावडे

म्हणजे परंपरागत पुरोहीत यजमानांचे "शोषण"करतात आणि "धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत असे आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2015 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

होय..होय..
"धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत
हे अगदी बरोब्बर . ..
परंपरागत पुरोहीत काय करतात? ते त्यांचे त्यांनाच जाऊन विचारा.

प्रचेतस's picture

14 Dec 2015 - 1:51 pm | प्रचेतस

तुम्ही सांगा ना प्लीज..

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2015 - 2:05 pm | अत्रुप्त आत्मा

मला म्हायती नाही... धन्यवाद.

सतिश गावडे's picture

14 Dec 2015 - 10:49 pm | सतिश गावडे

होय..होय..
"धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत
हे अगदी बरोब्बर . ..

हे परंपरागत पुरोहितांकडून होणारे शोषण कोणत्या प्रकारचे असते यावर काही प्रकाश टाकू शकाल का?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2015 - 12:53 am | अत्रुप्त आत्मा

अगदी भरपूर टाकीन. व्हॉट्सप वर या..तिकडे असल्या प्रकाश झोतांची उत्तम व्यवस्था केलेली आहे.

सतिश गावडे's picture

15 Dec 2015 - 8:19 am | सतिश गावडे

इथे सांगितलेत तर उत्तम होईल. :)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2015 - 11:08 am | अत्रुप्त आत्मा

इथे भरपूरवेळा सांगून झालेलं आहे..तिच तिच चर्चा वारंवार करण निरर्थक आहे..म्हणून मी इथे सांगणार नाही.

सतिश गावडे's picture

15 Dec 2015 - 4:14 pm | सतिश गावडे

ठीक आहे :)

काळा पहाड's picture

13 Dec 2015 - 10:56 pm | काळा पहाड

तुम्ही म्हणता ते शंभर टक्के सत्य आहे. पण जर सर्वच जण नास्तिक झाले तर समाजात जो अनाचार माजेल, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की डॉ. लागू घेणार आहेत? धर्म ही अफूची गोळी हे खरंच आहे. पण समाज त्यामुळेच एका तरी शक्तीच्या धाकात राहून दरोडे घालत नाही हे काय कमी आहे? इथे साधं हात धुवून जेवावं, रस्त्यात थुंकू नये, शिंकताना समोर रुमाल धरावा वगैरे गोष्टी समाज पाळत नाही. त्याला सारासार विवेक करण्याएवढी अक्कल आहे असा तुमचा समज असेल तर तुमच्यासारखे हुशार तुम्हीच.

हुप्प्या's picture

14 Dec 2015 - 3:11 am | हुप्प्या

लोक नास्तिक झाले तर अनाचार माजेल ही भीती अनाठायी आहे. थोडी विचारशक्ती, थोडे शिक्षण असेल तर तसे होत नाही.
समजा मी दरोडा घातला तर देव काही करणार नाही. पण माझ्या मुलाने तसेच केले आणि तो पकडला गेला तर काय? माझ्या घरी कुणी दरोडा घातला तर मला आवडेल का? मग मी दरोडा का घालायचा? सर्वच लोक चोरी करु लागले तर समाजात जी अंदाधुंदी माजेल ती मला चालेल का? शिवाय पोलिस पकडू शकतात, लोक पकडू शकतात, मारहाण करु शकतात. गुन्हेगार म्हणून पकडलो गेलो तर कुटुंबाचे काय होईल? हे विचार कुठलाही देव धर्म न आणता लोकांना अशा गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करत नाहीत काय? माझा मते करतात. अगदी स्वार्थी आत्मकेंद्रित व्यक्तीलाही हे कळू शकते की चोर्‍यामार्‍या करणे व्यवहार्य नाही त्याकरता धर्माची झापडेच हवीत असे नाही.

पूर्वी रोग आजार हे देवाच्या कोपाने होतात असे समजायचे. भूकंप, पूर, दुष्काळ हेही देवाच्या कोपाने होतात असे वाटायचे. त्याची कारणे आज कळली आहेत त्याचप्रमाणे समाजाचे स्वास्थ्य, कायदा, अनुशासन वगैरे देवाच्या कृपेने आहेत असे समजले जाते. पण हाही बागुलबुवा खोटा आहे हे थोडा विचार केला तर समजेल.

तस्मात समाजात जगण्याकरता जी नैतिक मूल्ये जपावी लागतात ती धर्मामुळेच मिळतात हे खरे नाही.
समाजात जे प्रसिद्ध नास्तिक लोक आहेत त्यापैकी किती लोकांनी बेकायदेशीर धंदे केल्याचे उघडकीस आले आहे?
उलट कुठल्यातरी देवाचे, धर्माचे वा बुवाचे परमभक्त हे विविध परीने समाजकंटक असल्याचे आपण बघत नाही काय?

राजेश घासकडवी's picture

14 Dec 2015 - 6:09 am | राजेश घासकडवी

+१.
तुरुंगात असलेल्या लोकांमध्ये नास्तिकांचं प्रमाण जास्त असतं का? नाही. अमेरिकेतल्या तुरुंगात नास्तिक म्हणवणारांचं प्रमाण ०.०७% आहे. म्हणजे नास्तिक लोक पन्नासेक पट कमी गुन्हे करतात. कारण सर्वसाधारण लोकसंख्येत नास्तिक म्हणवणारांचं प्रमाण ३ टक्के आहे.

नगरीनिरंजन's picture

14 Dec 2015 - 9:38 am | नगरीनिरंजन

शिवाय गुन्ह्यांचं स्वरुपही पाहायला पाहिजे. आमच्या देवाविरुद्ध बोलला म्हणून एखाद्याला कापून काढणे किंवा प्रो-लाईफ म्हणून ॲबॉर्शन क्लीनिकवर गोळ्या झाडणे असे उद्योग नास्तिक लोक करत नाहीत.

मार्मिक गोडसे's picture

14 Dec 2015 - 10:40 am | मार्मिक गोडसे

तस्मात समाजात जगण्याकरता जी नैतिक मूल्ये जपावी लागतात ती धर्मामुळेच मिळतात हे खरे नाही.
समाजात जे प्रसिद्ध नास्तिक लोक आहेत त्यापैकी किती लोकांनी बेकायदेशीर धंदे केल्याचे उघडकीस आले आहे?
उलट कुठल्यातरी देवाचे, धर्माचे वा बुवाचे परमभक्त हे विविध परीने समाजकंटक असल्याचे आपण बघत नाही काय?

नास्तिकांशी वाद घालण्यापूर्वी सर्व आस्तिकांनी ह्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

बोका-ए-आझम's picture

14 Dec 2015 - 11:47 am | बोका-ए-आझम

याच्याशी सहमत पण बहुसंख्य लोक अशा नैतिक मूल्यांचं पालन त्याच्याशी धार्मिक मुद्दे निगडित असले तरच करतील हेही खरं आहे.

यनावाला's picture

14 Dec 2015 - 9:03 pm | यनावाला

@काळा पहाद, बोका-ए-आझम,प्रसाद१९७१
...
" देवा-धर्मामुळे अनैतिकता वाढण्यास मदत होते. प्रत्येक माणसाला सदसद्विवेकबुद्धी असते. चांगले काय वाईट काय, नैतिक काय अनैतिक काय,पाप कोणते पुण्य कोणते हे समजते. वाईट गोष्ट करू नये असेच त्याला त्याची बुद्धी सांगते. पण काम,क्रोध,मद,मत्सर इ.मनोविकार असतात. त्यातील एखाद्याला बळी पडून माणूस दुष्कृत्य करतो. पण त्याची त्याला टोचणी लागते. ती सतत लागून राहिली असती तर त्याने पुन्हा दुष्कृत्य केले नसते. तो पापापासून दूर राहिला असता.पण सदसद्विवेक बुद्धीची ही टोचणी घालवण्याचे, पापक्षालनाचे उपाय धर्मग्रंथांत, साधुसंतांच्या अभंगात आस्तिकांसाठी दिले आहेत. ते नास्तिकांच्या उपयोगाचे नाहीत.
"हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे।
"नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची।"
"अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।"
"तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन्मुक्त हेळामात्रे।"
अशी आश्वासने ठायी ठायी आढळतात. त्यामुळे सत्यनारायणाची पूजा घातली,साईबाबांना सोन्याचा मुकुट अर्पण केला,तिरुपतीबालाजीच्या हुंडीत दहाहजार रुपये टाकले की पाप संपले. टोचणी बंद.मग पुन्हा फसवायला, लुबाडायला,भ्रष्टाचार करायला मोकळे.

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 12:17 pm | प्रसाद१९७१

जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली ह्या कम्युनिस्टांनी केल्या आहेत, मग तो लेनिन असो, स्टॅलिन असो, माओ असो का चँग असो. पॉल पॉट सुद्धा नास्तिक च होता म्हणे. अगदी भारतातले माओ-वादी घ्या ना.

त्यामुळे नास्तिक सज्जन वगैरे असले कन्क्लुजन पटण्यासारखे नाहीच. आणि एकुणात नास्तिकांची कमी असलेली टक्केवारी बघता वर लिहीलेल्या लोकांनी ( कम्युनिस्ट ) केलेली कत्तल आणि छळवणुक ही स्टॅतिस्टिकली नास्तिकां च्या विरुद्धचा विदा देइल.

कदाचित विदा असेही दाखवेल की कम्युनिस्ट, माओवाधी ( म्हणजेच नास्तिक ) ह्यांना कुठलीच बाऊंडरी नसते.

आस्तिक, नास्तिक आणि सज्जनता ह्याचा काडीचा संबंध नाही. उगाच काहीतरी तर्क्ट लढवू नका.

जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली ह्या कम्युनिस्टांनी केल्या आहेत,

तुमच्या प्रतिसादवर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाउ द्या..
हा हाहा. मोठे गमतीदार उदाहरण आहे भौ.
याचा अर्थ घ्यायचा झाला तर चंगेझ खान , अकबर , औरंगजेब हिटलर हे कट्टर कम्युनिस्ट होते असेच म्हणावे लागेल

बोका-ए-आझम's picture

14 Dec 2015 - 3:31 pm | बोका-ए-आझम

की ते नास्तिक असतात. प्रत्यक्षात त्यांचाही देव असतोच. फक्त त्याला ते मार्क्सवाद, दास कॅपिटल, डायलेक्टिकल मटेरियालिझम वगैरे नावं देतात. विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात जास्त कत्तली झाल्या आहेत. देव, धर्म, एखादा इझम - या सगळ्या विचारसरणीच आहेत.

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 3:33 pm | प्रसाद१९७१

विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात जास्त कत्तली झाल्या आहेत.

नाही हो बोका. कत्तली स्वार्था मुळे झाल्या आहेत, मग त्या जस्टीफाय करायला विचारसरणी वगैरेंची मदत घ्यायची.

बोका-ए-आझम's picture

18 Dec 2015 - 2:29 pm | बोका-ए-आझम

हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्या दिवशी बरीच दुकानं बंद होतील.

असहमत. बर्‍याच टोळ्या देवाची पूजा केल्याशिवाय याश दरोड्यास निघत नाही.
साईबाबांच्या पेटीत काळा पैश्याचा हिस्सा दान केला की आपले पाप धुतले गेले असे मानतात.

शब्दबम्बाळ's picture

14 Dec 2015 - 4:40 am | शब्दबम्बाळ

छान लेख!
काही वर्षांपूर्वी असाच मंदिराचा अनुभव माझ्या नजरेतून लिहिला होता आणि काही मित्रांना वाचायला दिला पण ते थोडेफार दुखावले गेले. अर्थात, मित्र असल्यामुळे आम्ही निवांतपणे चर्चा करू शकलो.
पण अनोळखी लोकांपुढे आपले हे विचार मांडणे मी तरी धाडसाचे समजतो आणि तसे केल्याबद्दल तुमचे अभिनंदन!

तुम्हाला देव ही संकल्पनाच मान्य नाही का तुमचा विरोध कर्मकांडाला आहे?

प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची. असं म्हणून की या प्रसादाची किंमत मी X रुपये ठरवली आहे आणि तेवढी रक्कम मी या गरजूला देत आहे.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का कोणाची देवावर श्रद्धा असेल तर अडचण काय आहे? कर्मकांडाला आणि अंधश्रद्धांना विरोध असणं समजू शकतो आणि माझा पण आहेच.

उत्तर द्याल की नाही माहित नाही कारण या आधीच्या धाग्यांवरसुद्धा तुम्ही फक्त तुमच्यासाठी सोयीस्कर प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची. असं म्हणून की या प्रसादाची किंमत मी X रुपये ठरवली आहे आणि तेवढी रक्कम मी या गरजूला देत आहे.

हे लई आवडले.

प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची.

अशाने भीक मागण्यासारख्या अनिष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना समर्थन मिळेल असं नाही वाटत?

पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची

ती पावती न फाडतापण करता येतेच की. उलट अनेक देवस्थानं आपण असं करत असल्याचं सांगतात.

अर्धवटराव's picture

14 Dec 2015 - 10:08 am | अर्धवटराव

प्रबोधनाचे प्रयत्न छान आहेत.

दोन कानांच्यामधे असलेला अवयवय, ज्याला मेंदु म्हणतात, त्याचा योग्य वापर माणसाने केला तर जगातल्या बर्‍याच समस्या सुटतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2015 - 10:23 am | डॉ सुहास म्हात्रे

मानवी मनाची जडणघडण अशी आहे की जोपर्यंत माणुस आहे तोपर्यंत आस्तिक व नास्तिक दोन्हीही असतील... आणि त्यातले काही आपल्या मतावर ठाम राहतील. जसे आपण इतर बाबतीत म्हणतो तसेच, "दुमत आहे यावर एकमत (अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री)" या तत्वावर एकमत करून, आपली मते निष्कारण दुसर्‍यावर न लादता, दोन्ही गटांचे एकमेकाशी खेळीमेळीचे संबंध असायला हरकत नसावी. कारण, जेव्हा एक गट दुसर्‍यावर आपली मते लादू लागतो तेव्हाच संघर्ष निर्माण होतो.

स्वतः बदलण्याची इच्छा असल्याशिवाय / झाल्याशिवाय दुसरा कोणीही मानवी मनात बदल घडवून आणू शकत नाही.

विविधता हा जगाचा स्थायीभाव आहे... मग भौतिक असो, अधिभौतिक असो की पार्मार्थिक असो. कुठल्याही संबंधातल्या एकेरी तत्वज्ञानावर आधारीत जग फारच रुक्ष आणि बेचव बनेल, नाही का ?

मार्मिक गोडसे's picture

14 Dec 2015 - 10:23 am | मार्मिक गोडसे

दोन कानांच्यामधे असलेला अवयवय, ज्याला मेंदु म्हणतात, त्याचा योग्य वापर माणसाने केला तर जगातल्या बर्‍याच समस्या सुटतील.

अगदी बरोबर. नास्तिक त्याचा योग्य वापर करतात. आस्तिक अशा अवयवात गोळ्या झाडतात.

अर्धवटराव's picture

14 Dec 2015 - 1:35 pm | अर्धवटराव

नास्तिक त्याचा योग्य वापर करतात. आस्तिक अशा अवयवात गोळ्या झाडतात.

मेंदुचा योग्य वापर आणि आस्तिक/नास्तिक असणं यांचा संबंध काहि कळला नाहि. फार लांब कशाला.. मिपावरच अनेक उदाहरणं मिळतील दोन्हि बाजुने :)

अवांतरः
मला प्रथमतः आस्तिक/नास्तिक म्हणजे काय हेच कळत नाहि... सिरीयसली.

स्पा's picture

14 Dec 2015 - 11:09 am | स्पा

ज्या रेट ने हल्ली या विषयावर मिपावर चर्चा {?} होते
मिपा चे नाव बदलून "आस्तिक-नास्तिकपाव.कॉम" ठेवायची विनंती मी नीलकांत ला करतो

हेही बरोबर वाटतंय.

नाखु's picture

14 Dec 2015 - 11:42 am | नाखु

सश्रद्द लोकांना एका रांगेत(आस्तीक-धर्मवादी-कर्मकांडी-उपासक-मंत्रजागर्वाले-उपासक-नरबळी-जारण मारण ई) उभे करून "झोडपायचा" पदसिद्द अधिकार मिपावर असताना हे तथाकथीत नास्तीक वेगळी साईट काढण्याचा अपशकून करणार नाहीत.

बाकी लोक संपादक पदासाठी नावे सुचवतात थेट संस्थळासाठीच नावे सुचविणारे स्पांडोबा हे खरे सुधारक !!!!!

खाल मुंडी नाखुस

मयुरMK's picture

14 Dec 2015 - 11:23 am | मयुरMK

देव मंदिरात असता तर मंदिराबाहेर बसून भीक मागन्याची वेळ कोणावर आली नसती. आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून जर मी देवाला पूजत बसलो असतो तर माझ्या समाजाला भीक मागायची वेळ आली आसती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मार्मिक गोडसे's picture

14 Dec 2015 - 11:35 am | मार्मिक गोडसे

खरे भिकारी मंदिरात असतात.

तुमचा विश्वास नसेल तर इतरांनी तुम्हाला फैलावर घेण्याचे काही कारण नाही. पण जेव्हा तुम्ही आस्तिक लोकांच्या मनातील देवाच्या भितीवर घाला घालायला सुरू करता तेव्हा ते सैरभैर होतात आणि काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत राहत नाहीत. त्यांना तुम्ही त्यांच्या माता-पित्यावर गंभीर आरोप केल्यासारखे वाटू लागते. जे समजा खरेही असेल तरी पटकन मान्य होत नाही.

'देव मानत नाही मग देवाचा लाडू कसा प्रसाद म्हणून घेता' असे ऐकावे लागू नये म्हणून कदाचित तुम्ही तो प्रसाद नाकारला असे वाटत आहे.

देवाची भिती हा भयंकर प्रकार आहे. आपल्याकडे मनाच्या शांती साठी किती जण आराधना करतात आणि किती जण भितीपोटी करतात हे पाहणे रोचक ठरेल. टी.व्ही. पाहत माळ ओढणे, भराभर स्त्रोत्र उरकून घेणे, वाघ मागे लागल्या सारख्या प्रदक्षिणा काढणे, प्रसाद मिळावा म्हणून मारामारी करणे/ भांडणे, रस्त्यावरून जाताना बारकेसे देऊळ दिसले तरी हात जोडत जाणे ही काही उदाहरणे. 'देवबाप्पा शिक्षा देईल' आणी 'बुवा आहे तिकडं' इथूनच हे सगळे सुरू होते त्याला कोण काय करणार.

आणखी एक गोष्ट, काही स्वतःला नास्तिक म्हणवतात पण देवापुरतेच. ज्याप्रमाणे उत्तर ध्रुव असेल तर दक्षिण असलाच पाहिजे तसेच नसले तर नसलाही पाहिजे. त्याचप्रमाणे जर देव नसेल तर इतर अमानवीय शक्तींचे अस्तित्व पण कायमचे अमान्य करता आले पाहिजे. पण सर्वांनाच हे शक्य होत नाही, गर्भगळीत झाल्यावर देवच आठवतो.

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 12:28 pm | प्रसाद१९७१

@ यनावाला - तुम्ही जर स्वताचे निरीक्षण केलेत तर तुमच्यात आणि तो जो सर्वात पहील्यांदी तुम्हाला हटकणारा प्रवासी होता त्याच्यात थोडातरी फरक आहे असे वाटते का? "आपण बरोबर आणि बाकीचे येडे" हे महतवाचे साम्य दिसले नाही का?

प्रसाद न घेणे वगैरे तर फाजिलपणा आहे. तुमच्या सारख्या नास्तिकांमुळे आमच्या सारख्या नास्तिकांना बट्टा लागतोय. . दुसर्‍यांच्या भावना काही कारण नसताना दुखवणे ही सर्वात साधी गोष्ट आहे तीच तुम्हाला समजत नाहीये.

मी जिथे जाईन तिथे प्रसाद खातो आणि नमस्कार करतो किंवा करत नाही. ज्यांना मी नास्तिक आहे हे माहीती आहे त्यांच्यासमोर मला नमस्कार करुन दाखवायची गरज वाटत नाही आणि ज्यांना मी नास्तिक आहे हे माहीती नाही त्यांच्या भावना मी उगाचच दुखवत नाही.

गणपतीत आरत्या वगैरे मस्त पैकी म्हणतो ( जर मी तिथे असलो तर, मुद्दामहुन आरतीला जात नाही ). वाचन चांगले असल्याने लोकांना देवादिकांचे दाखले वगैरे देतो, गोष्टी सांगतो. आपण चारलोकात असु तर त्या चार लोकांप्रमाणे वागावे हेच तुम्हाला कळत नाहीये.
बिचारे आस्तिक ( हिंदु ) मी नास्तिक आहे माहीती असुन माझ्या बाबत अजिबात दुजाभाव करत नाहीत.

सप्तरंगी's picture

16 Dec 2015 - 9:00 pm | सप्तरंगी

यनावाला काही तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणार नाहीत ते मोजक्या लोकांनाच उत्तर देत आहेत :)

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 12:47 pm | पिलीयन रायडर

यनावाला,

मला पटला तुमचा लेख. इथे अनेकांनी मुद्दा मांडला आहे की प्रसाद म्हणुन कशाला, लाडु म्हणुन खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या... वगैरे वगैरे.

वरकरणी हे मुद्दे योग्य वाटतातही.. मी स्वतः सुद्धा अशीच वागते. माझा देव आणि कर्मकांड ह्यावर अजिबात विश्वास नसताना सुद्धा मी उगाच चर्चा आणि वाद नकोत म्हणुन पटकन पाया पडते.. प्रसाद खाऊन टाकते. पण ते तिथेच संपतं का?

तर नाही...

वाद नकोत म्हणुन मी घरात गणपती.. महालक्ष्म्या.. नवरात्र करते. मी भले पायाही पडत नाही. पण वाद नकोत म्हणुन सवाष्ण ब्राह्मण बोलावते. मग उगाच कुणाला कशाला दुखवायचं म्हणुन १६ भाज्या, ७ कोशिंबिरीचा नैवेद्य, आरत्या, वस्त्रमाळा-आरास जे जे म्हणुन असेल ते सगळंच करते.

आता ह्यात काय कुणाचं वाईट होतंय का? तर छे.. अजिबात नाही.. म्हणुन मी वर्षानुवर्ष ते करतेच आहे. सवाष्ण म्हणुन खात्यापित्या घरातली बाई येते.. तिला मी गरज नसताना ओटी भरुन, कुंकु लावुन्च पाठवते. उगाच कुणाला कशाला दुखवायचं?

मग आता इतकं करतेच आहे तर हळदी कुंकु करण्यात काय प्रॉब्लेम आहे? झालंच तर वाण लुटणे इ होऊ देत की. उगाच वाद नकोत..

आणि इतकं सगळं करुन वर्षातुन एकदा तुळजापुरला जायला आणि पावती फाडायला काय हरकत? गेलोच आहोत म्हणजे दही+केळं वगैरे कुस्करुन जो अभिषेक करतात तो ही करुन टाकु.. आता मला नाही पटत इतक्या सुंदर मुर्तीवर असा अभिषेक करुन तिचे नुकसान करणे. पण बाकीच्यांना पटतं. त्यांच्या श्रद्धेचा मान राखायला हवा, उगाच दुसर्‍याला का दुखवायंच? म्हणुन मी केवळ वाद टाळायला साडी नेसुन तिथे जाउन उभी रहाते.

हे असंच चालुच रहातं...

ह्या सगळ्यात मी एकदाही देवाच्या पाया पडत नाही.. पडलेच तर माझ्या मनात अगदी काही म्हणजे काहीच भाव नसतात. उगाच आपलं हात जोडायचे. आणि हे सगळं होऊनही मी म्हणे नास्तिक आहे..

आस्तिकांच्या भावनांचा विचार कर करुन आज माझ्या सारख्या नास्तिक व्यक्तिची ही अवस्था आहे.. म्हणुन मला खुप आवडतं जेव्हा कुणी ठामपणे "करणार नाही" म्हणुन उभं रहातं. विचार चुक की बरोबर.. तार्किकदॄष्ट्या योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे.. पण ह्या न त्या कारणाने आपल्या मताप्रमाणे वागायला न मिळणे हा एक मोठाच त्रास असतो.

मला वाटतं नास्तिकांनी जे करायचं ते करावं.. आणि आस्तिकांनी स्वतःच्या आणि नास्तिकांच्या.. कुणाच्याच भावना दुखवु नयेत... ज्याला जे वाटतं तो ते करण्यास मोकळा पाहिजे..

राही's picture

14 Dec 2015 - 2:12 pm | राही

स्वतःच्या तत्त्वांविरुद्ध, केवळ दुसर्‍याच्या भावना जपणे यासाठी किंवा भिडेपायी काही करावे लागणे यासारखी दुसरी कुचंबणा नाही.
स्पष्ट आणि ठाम प्रतिसाद खूप आवडला.

विजुभाऊ's picture

14 Dec 2015 - 2:26 pm | विजुभाऊ

प्रसाद म्हणुन कशाला, लाडु म्हणुन खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या... वगैरे वगैरे.

अगदी योग्य बोललात पिरा.
तो प्रसाद जर मांसाहारी असेल आणि एखाद्या कट्टर शाकाहारी आस्तिकाने तो नाकारला तर ?
त्यावेळे " माम्साहार म्हणून कशाला, प्रसाद म्हणून खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या...." हा युक्तीवाद लागू केला तर चालेल का?

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 2:30 pm | प्रसाद१९७१

अहो हे यनावाला स्वता चालत देवळात गेले आणि मग लाडु नको म्हणाले.

आधी मुद्दाम जायचे आणि मग लोकांना त्रास द्यायचा, ही कुठली रीत?
वेगळी नास्तिकांची टुर करुन जायचे ना.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 2:37 pm | पिलीयन रायडर

लोकांना त्रास दिला की लोकांनी तो करुन घेतला?
लोकांना उपद्रव होईल असं वागणं तर नव्हतंच त्यांचं.

ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन नास्तिकाला त्रास देत आहेत. तुम्हाला खायचा तर खा ना, प्रसादच काय, अमृत समजुन खा. ज्याला नाही खायचा त्याला तो काहितरी समजुन का होईना खा.. असा आग्रह कशाला?

नास्तिकांची टुर कशी असते बुवा..? तसं डिक्लेअर केलं असतं की नास्तिक लोक क्षमस्व तर नसतेच गेले ना यनावाला.

हा प्रतिसाद उपरोधाने लिहीलेला असावा अशी फार इच्छा आहे.. अन्यथा फारच मजेशीर प्रतिसाद आहे तुमचा...

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 3:05 pm | प्रसाद१९७१

ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन नास्तिकाला त्रास देत आहेत.

हा लेख च लिहीला नसता तर कोण कशाला बोलायला आले असते?

नास्तिकांची टुर कशी असते बुवा..?

आता नसते तर मी काय करणार? यनावालांनी पुढाकार घेउन काढावी टुर.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 3:35 pm | पिलीयन रायडर

अहो लेखाबद्दल नाही बोलत आहे हो मी. टुर बद्दल बोलतेय. तिथे अस्तिक लोकांनी मिळुन यनावालांना लाडु का नाही खाल्ला? नमस्कार का नाही केला? अशा विचारणा केल्या. शिवाय "ह्यांना घ्यायलाच नको होतं" इथं पर्यंत बोलले.

अणि कुठलीही टुर अस्तिक नास्तिक निष्कर्षावर कशामुळे असावी बरं? यनावालांनी कुठे तक्रार केली आहे की देवळात का नेली म्हणुन टुर? लोकांना प्रॉब्लेम आहे ना इथे त्यांच्या नास्तिकतेशी.. मग त्यांनी काढावी ओन्ली आस्तिक टुर..

हा काय मुद्दाय का? नास्तिकांची टुर... =))

इरसाल's picture

14 Dec 2015 - 4:10 pm | इरसाल

काय टुर टुर लावलीय ?

सतिश गावडे's picture

14 Dec 2015 - 11:16 pm | सतिश गावडे

जर हा प्रतिसाद गांभिर्याने दिला असेल तर या धाग्यावरील सर्वात विनोदी प्रतिसाद ठरावा. आपण कसे "वेगळे नास्तिक" आहोत हे दाखवण्याच्या नादात खुपच भरकटला आहात तुम्ही असे दिसते. :)

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 3:14 pm | प्रसाद१९७१

पिरा - तुम्ही जी वर उदाहरणे दिली आहेत ती -आस्तिक नास्तिक वादातुन आली नसुन. टीपीकल भारतीय संस्कृती ची उदाहरणे आहेत ज्या स्त्रीयांना मोकळीक द्यायची नाही, सासूचे किंवा घरातल्या मोठ्यांचे ऐकलेच पाहीजे किंवा सासरी आलीय ना मग आमच्या मताप्रमाणे वागायचे असल्या वृत्तीतुन आली आहे.

त्याचा संबंध आस्तिक - नास्तिक शी नसावा, कदाचित सासर नास्तिक असेल आणि सुन आस्तिक असेल तर ह्याच्या उलट अनुभव येतील ( आमच्यात नसते सवाष्ण , हळदीकुंकु वगैरे )

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 3:37 pm | पिलीयन रायडर

बरोबर आहे. हा ही मुद्दा आहेच.

पण मी म्हणतेय तसा कुणाच्या भावना दुखावायला नको म्हणुन नास्तिक लोकांनाही अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. तेव्हा त्याच्यांही भावना दुखावल्या जातात पण त्या धार्मिक भावनां एवढ्या धारदार नसल्याने लक्षात येत नाहीत.

ज्याला जे जे योग्य वाटेल ते ते करु द्यावे. जिथे आपणामुळे लोकांना उपद्रव नसेल तिथे इतरांनाही हरकत घेण्याचे काय कारण?

असा तो सोप्पा मुद्दा होता.

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 4:04 pm | प्रसाद१९७१

पुरुष जर नास्तिक असेल आणि त्यात सुद्धा उच्च विद्याविभुषित, तर त्याला आस्तिक सासराकडुन असा काही उपद्रव होत नाही. अगदी स्वताच्या घरातही काही उपद्रव होत नाही. उलट झालेच तर त्याच्या नास्तिकतेचे कौतुक होते.

बाई च्या बाबतीत ह्याच्या बरोबर उलटे होते. त्यामुळे सरसकट नास्तिक लोकांना मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागत नाहीत, पण नास्तिक "बाई" ला कराव्या लागतात असे मला म्हणायचे होते.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 4:10 pm | पिलीयन रायडर

हो.. आणि मला पटलय ते.. खरंच आहे तसं..

पण आता ते मी माझे उदाहरण म्हणुन दिले आहे.

तरीही.. नास्तिकांवर अशी वेळ ह्या न त्या कारणाने येतच असते. नास्तिक स्त्री असणे हे थोडं जास्त कठीण आहे भारतीय समाजात.. पण पुरुषांनाही अनेकदा असं बळंबळं नमस्कार कर आणि लाडु खा प्रकार करावे लागत असतीलच ना.

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 4:29 pm | प्रसाद१९७१

नमस्कार कर आणि लाडु खा

पिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो. इथे ऑफिस मधे कीती मनाविरुद्ध करावे लागते, ते गपगुमान करतोच ना.

मधुमेही माणसाला सुद्धा छोटासा बर्फीचा/पेढ्याचा तुकडा घे कधी निमीत्तानी म्हणुन आग्रह करतोच ना. तोही घेतो.

त्रास करुन घेण्यापेक्षा आनंदा नी घ्यावे ते आणि सीमारेखा आखावीच, त्या पलीकडे काही करु नये. पण अगदी मने दुखावतील इतकी छोटी सीमारेखा पण नसावी.

रसेल चे हे कोट लक्षात ठेवावे.

"I would never die for my beliefs because I might be wrong."

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 4:41 pm | पिलीयन रायडर

अहो तोच माझा मुद्दा आहे.. नमस्कार कर आणि लाडु खा पर्यंत रहात असतं तर ठिके. ते तसं होत नाही ना पण. सगळ्यात ओढले जातातच शेवटी.

शिवाय जसं खाल्ल्याने काही फरक पडत नाही तसा न खाल्ल्यानेही पडत नाहीच ना. एकेकाला वाटतं आपल्या मतांवरच ठाम रहावं म्हणुन. त्यांनी जर कुणाला अपशब्द वापरले नाहीत किंवा लोक लाडु खाताना "किती हा मुर्खपणा" अशी काही भाषणं ठोकली नाहीत. मग कुणाला का इतका फरक पडावा?

इन जनरलच, "कुणाचं नुकसान होत नाही ना? मग काय हरकत करायला?" पासुन ते "उगाच कशाला विषाची परीक्षा पहायची? करुन टाकायचं" इथंवर सगळ्या कारणांनी माणुस लहान सहान कर्मकांडाला शरणच जात असतो. मुद्दा हा केवळ एका नमस्कारापुरता नाहीये. मुद्दा एक विचारधारा सार्वजनिकरित्या मांडण्याचा आहे. ह्या लेखाचे शेवटचे वाक्य तेच आहे ना, की कुणी तरी बुद्धिवादाची कास धरेल.

केल्याने काय फरक पडतो ह्याच कॅटेगिरीमध्ये मग मी जी वर सगळी उदाहरणे दिली आहेत ती बसतातच. गौरी- गणपती / नवरात्र, केल्याने काय वाईट होतं? तुळजापुरला गेल्याने काय वाईट होतं? काय फरक पडतो? ट्रिप म्हणुन जा की हवंतर..

मुद्दा हा ह्या सगळ्यालाच "नाही" म्हणण्याचा आहे.

आणि मुद्दा "नाही" म्हणु देण्याचाही आहे.

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 4:45 pm | प्रसाद१९७१

कुणी तरी बुद्धिवादाची कास धरेल

पिरा - इथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. सर्व लेख आणि क्षमा करा पण तुमचा पण रोख नास्तिक पणा म्हणजेच बुद्धीवाद असा थेट आहे. ह्याचाच कॉन्व्हर्स आस्तिकता म्हणजे बुद्धी नसणे असा होतो.

तुम्ही किंवा मी, आपल्या विचारांनी नास्तिक असु पण म्हणुन आपल्याला कोणाला निर्बुद्ध ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. यनावाला आपल्या लेखातुन सातत्यानी आस्तिक लोकांना निर्बुद्ध ठरवत असतात हे आक्षेपार्ह आहे. ते अगदी थेट निर्बुद्ध म्हणत नाहीत पण असली वाक्य टाकतात.

ट्रेड मार्क's picture

14 Dec 2015 - 8:26 pm | ट्रेड मार्क

बुद्धिवाद म्हणजेच नास्तिक असणं असं आहे का? मग या प्रतिसादाप्रमाणे जगात फक्त ३% लोक बुद्धी असणारे आहेत!!!

पिरा - तुम्ही पण देव आणि कर्मकांड यात गल्लत करता आहात. मी देव मानतो पण म्हणून मी चतुर्थीला गणपतीचा देवळात किंवा त्या त्या वाराप्रमाणे त्या देवळात जात नाही. इतकेच कशाला मी अजून एकदाही शिर्डी, तिरुपती ई ई मोठ्या देवस्थानात गेलो नाहीये. मी एखाद्या देवाचा उपास करत नाही. फक्त घरात देव आहेत त्यांच्या समोर हात जोडतो, सर्व अडचणींमधून मार्ग काढायला मदत, मग ती मानसिक असो किंवा एखादा योग्य माणूस भेटणे, अचानक एखाद्या घटनेने सगळं बदलून जाणे असो, केल्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्याकडे सत्यनारायण वगैरे करत नाहीत, गणपती बसवत नाहीत. आम्ही गणपतीच्या दिवसात उगाच बाहेर देखावे बघायला आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत धक्के खायला जात नाही.

कुठे थांबायचं हे आपण ठरवू शकतो. उगाच आधीच श्रीमंत असलेल्या देवस्थानांच्या दान पेट्या अजून भरण्यात काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा मी अनाथाश्रमात मदत देतो. एखादा खरंच अडचणीत असेल तर जमेल तेवढी मदत करतो. कोणाचं माझ्याकडून काही वाईट होणार नाही याची काळजी घेतो. उगाच येता जाता कोणाला मूर्ख आणि निर्बुद्ध म्हणत नाही. गरज नाहीये कि तुम्ही कर्मकांड केली पाहिजेत. नशिबानी आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि आपल्या मर्जीप्रमाणे देव मानणे न मानणे, पूजा कर्मकांडे करणे न करणे या वर फार कठोर नियम नाहीयेत आणि शिक्षा पण नाहीये.

यनावाला तर या धाग्यात आईच्या संस्कारांवर पण भाष्य करतात. नेहमीच असं दिसतं की नास्तिक लोक स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजतात. मी तर देवाला मानत नाही मग माझ काय कोण वाकडं करणार आहे ही भावना दिसते. जसे तुम्ही नास्तिक किंवा टोकाचे नास्तिक आहात आहात तसे बाकीचे आस्तिक आणि काही टोकाचे आस्तिक असू शकतात हे मान्य करत नाहीत. मग ते समस्त आस्तिक लोकांना मूर्ख आणि बुद्धी नसलेले समजतात आणि तसं उघडपणे सांगतात सुद्धा.

अभ्या..'s picture

14 Dec 2015 - 9:13 pm | अभ्या..

प्रतिसाद पटला.

देव आहेत त्यांच्या समोर हात जोडतो, सर्व अडचणींमधून मार्ग काढायला मदत, मग ती मानसिक असो किंवा एखादा योग्य माणूस भेटणे, अचानक एखाद्या घटनेने सगळं बदलून जाणे असो, केल्याबद्दल धन्यवाद देतो.

हे करतोच.

स्पा's picture

14 Dec 2015 - 9:57 pm | स्पा

ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध आस्तिक असतात तसेच यनां सारखे अतिनिर्बुद्ध नास्तिक असतातच , त्यामुळेच असली वादावादी होते .
पण सुदैवाने माझ्या आसपास फक्त अशा दोन टोकाचीच माणसे नाहीत .

देवाला न मानता माणुसकी हा एकच धर्म मानणारे मित्र आहेत
तसेच माणुसकी जपत, आपली सर्व कर्तव्य पार पाडत,मनात देवाला जपणारे सुद्धा आहेत,, आम्ही सर्व एकत्र आनंदात असतो, आणि असली वांझोटी चर्चा करण्यात आमचा वेळ वाया घालवत नाही

बाकी चालू द्या
शुभेच्छा आहेतच

मांत्रिक's picture

14 Dec 2015 - 10:02 pm | मांत्रिक

ज्जे बात!!!! क्लासच!!!
आमची आस्तिकता हीच आहे. माणुसकीचे नियम पाळून इतर कुणाला त्रास होऊ न देता मी माझी श्रद्धा पालन करतो. मी स्वतः कधीच देवळात जाऊन नमस्कार करत नाही. पण नामजप कायम करतो.
नेमकं हेच यनावालांना समजेना.
उगंच तेच तेच बेचव दळण चालू आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2015 - 1:17 am | अत्रुप्त आत्मा

@ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध आस्तिक असतात तसेच यनां सारखे अतिनिर्बुद्ध नास्तिक असतातच :- http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif
सात्त्विक संतापाने चिडलेला पांडू× शांत याssना..,वाला!
http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent010.gif

पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला.
एक पुरोहित ह्या नात्याने तुम्ही आस्तिक आहात का एक धर्मसुधारक ह्या नात्याने तुम्ही नास्तिक आहात का ही नुसतीच अगलतगल आहे?

नाखु's picture

15 Dec 2015 - 9:06 am | नाखु

काय आहेत याचा बहुअंगाने आणि बहुढंगाने शोध चालू आहे (त्यांचा स्वतःचाही) !!!! सध्या स्पां+धन्या धाग्यावर आल्याचा ते आनंद घेत आहेत.तो घेऊ द्या !!!

अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व या चिमण्यांनो परत फिरा रे (त्यांना आणा रे) मित्र परिवार संघाच्या पत्रकातून साभार

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2015 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

@पांडूचं जाऊ द्या. :- ते माझं मी बघीन.. :-/ तू त्यात सोंड नको टाकू ... हत्ती! Llllllluuuu

@तुमचं बोला :- हे घ्या!

ह्या नंतरही तुम्ही स्वमनोरंजकनिरर्थकआत्मकुंथन करणार आहातच..! ;)
हे मला आधीच माहीत असल्यामुळे तुमच्या त्या आगामी कुंथनास शुभेच्छा देऊन ..मी थांबतो.

विजुभाऊ's picture

15 Dec 2015 - 2:04 pm | विजुभाऊ

पिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो.

कोणाचे मन राखण्यासाठी तुम्ही गोमांसाचा अगदी छोटास्सा तुकडा खाल का?

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 4:37 pm | प्रसाद१९७१

पण पुरुषांनाही अनेकदा असं बळंबळं नमस्कार कर आणि लाडु खा प्रकार करावे लागत असतीलच ना.

हेच तत्वनिष्ठ पुरुष, रस्त्यावर कोणी गावगुंडानी ह्यांची गाडी ठोकली तरी त्या गावगुंडाच्याच शिव्या आणि मार खातात. तिथे सर्व तत्व वगैरे गुंडाळुन ठेवतात, पण आपल्या माणसांसमोर मोठा आव येतो तत्व्निष्ठेचा.

हलके घ्या, पण खरे आहे ना

अभ्या..'s picture

14 Dec 2015 - 4:41 pm | अभ्या..

एकूण काय प्रसादराव. चिमीत्काराशिवाय नमस्कार नाही. हेच ना?
देवाला गरज असेल तर दाखवेल चमत्कार नाहीतर आहेतच फुकट लाडू.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 4:45 pm | पिलीयन रायडर

मुद्दा भरकटतोय किनई...?!!

तुमच्यात गावगुंडाना उलट परत शिव्या घालण्याचा किंवा बदडण्याचा दम नाही म्हणुन तुम्ही तुमची सगळीच तत्व गुंडाळुन लोकांची मन राखत फिरा.. असं काहीसं वाटतय का ते!!!

असोच.. :)

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 4:47 pm | प्रसाद१९७१

तुमच्यात गावगुंडाना उलट परत शिव्या घालण्याचा किंवा बदडण्याचा दम नाही म्हणुन तुम्ही तुमची सगळीच तत्व गुंडाळुन लोकांची मन राखत फिरा.. असं काहीसं वाटतय का ते!!!

असली कसली हो तत्वनिष्ठा :-) जिथे मऊ लागेल तिथे खणायचे असे च झाले ना हे.

ऑफिसात बॉस धु म्हणला की धुतिल पण घरी बायको म्हणली देवाला नमस्कार कर तर लगेच तत्वनिष्ठ होतील.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 5:00 pm | पिलीयन रायडर

परत तेच.. जौ द्या. हा मुद्दाच मला मान्य नाही तर काय चर्चा कारायची ह्यावर..

तुम्ही नास्तिक असुन हाण्ताय ना लाडु.. हाणा मग!!

स्मिता.'s picture

15 Dec 2015 - 9:57 am | स्मिता.

पिरा, तुझा हा प्रतिसाद खूप आवडला. अगदी शब्दन् शब्द माझ्या मनातला लिहिला आहेस.

मला वाटतं या 'भावना जपणार्‍या' नास्तिकांत स्त्रियांचं प्रमाण जास्त असावं. कारणाचा उल्लेख करत बसले तर आस्तिक-नास्तिक वादाला स्त्री-पुरुष वादाचा फाटा फुटेल.

यनावाला's picture

14 Dec 2015 - 1:59 pm | यनावाला

....@ जातवेद
श्री.जातवेद म्हणतात,"

'देव मानत नाही मग देवाचा लाडू कसा प्रसाद म्हणून घेता' असे ऐकावे लागू नये म्हणून कदाचित तुम्ही तो प्रसाद नाकारला असे वाटत आहे."

...या प्रसादाच्या लाडवाविषयी अनेक वाचकांचा चुकीचा समज झाला आहे असे दिसते. दर्शनाला आलेल्या प्रत्येकासाठी हा प्रसाद नव्हता. देवस्थानाला देणगी देणार्‍यांसाठी होता. (देणगीची किमान रक्कम मला ठाऊक नाही.) मी देणगी दिली नव्हती तरी माझ्यासाठी लाडू आणला होता. यावरू हेतू समजतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Dec 2015 - 3:19 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो कदाचित, खाऊदे फुकटचा लाडू. प्रसाद खाल्यावर काहीतरी फरक पडेल बुद्धीत म्हणूनही दिला असेल लाडू पाठवून पैसे न देताही.

पिरे,प्रतिसादातल्या विचारांशी सहमत !

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Dec 2015 - 2:08 pm | बिपिन कार्यकर्ते

यनावालांच्या मतांबद्दल मी काही बोलू इच्छीत नाही, पण त्यांच्या आधीच्या काही लेखांच्या तुलनेत या धाग्यावर मात्र अत्यंत संयत आणि कित्येक तर पाठिंबा दर्शवणार्‍या प्रतिक्रिया आल्या आहेत, हे अत्यंत स्वागतार्ह आहे. धागा उघडताना, मला तर काय रणधुमाळी वाचायला मिळेल अशीच भीती वाटत होती. ती फोल ठरली. :)

राही's picture

14 Dec 2015 - 2:14 pm | राही

मलाही अगदी अस्सेच वाटले. पिरांच्या उपप्रतिसादात तर 'साय्लेंट मेजॉरिटी का काय ती जागी झालेली दिसतेय' असे वाक्य घातलेही होते. नंतर खोडून टाकले.

नास्तीक आपली नास्तीकता दुसर्‍यांवर लादत नाहीत. मात्र आस्तिक त्यांची आस्तिकता नेहमीच सर्वांवर लादायचा आग्रह धरतात.
यनावालांने बस मधील कोणालाही तुम्ही देवदर्शन करू नका हा आग्रह धरला नव्हता. मात्र बसमधील आस्तिकानी यनावालानी प्रसाद घ्यावा असा असा आग्रह धरला/ सुचवले/ भय घातले
ज्यावेळेस आस्तिक हा आग्रह सोडतील त्यावेळेस त्यांची आस्तिकतही सम्पलेली असेल.

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 2:34 pm | प्रसाद१९७१

नास्तीक आपली नास्तीकता दुसर्‍यांवर लादत नाहीत. मात्र आस्तिक त्यांची आस्तिकता नेहमीच सर्वांवर लादायचा आग्रह धरतात.

ह्याच्या बरोबर उलटा अनुभव आहे. मिपावरच बघा. यनावाला आस्तिकता म्हणजे कसे बुद्धी नसल्याचे लक्षण आहे हे सारखे सांगत असतात. यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात.

मिपावर कधी कोणी आस्तिकाने नास्तिकांच्या मूर्खपणा बद्दल लेख लिहीलेला दाखवुन द्या.

एकीकडे धर्म ही वैयक्तीक बाब आहे असे म्हणायचे, हे जर खरे असेल तर नि-धर्म ही सुद्धा वैयक्तीक बाब आहे. ती घरातच ठेऊन यावी.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 2:50 pm | पिलीयन रायडर

यनावाला बाकीच्या लेखांमध्ये काय म्हणतात ते ठाऊक नाही, मी वाचलेले नाहीत त्यांचे लेख.

पण मुळात

यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात.

ह्या वाक्यातुन जनरली लोक नास्तिकाकडे कसे पहात असतील हे समजते. एखाद्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे कसे काय होते? म्हणजे एकाअर्थी नास्तिक लोक केवळ गर्दीमध्ये उठुन दिसण्यासाठीच (पब्लिसिटी स्टंट?) हा विरोध करण्याचा प्रकार करतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? कारण मग तुम्ही चक्क तुमच्या विरोधातल्या विचाराला मान्यच करायला नकार देत आहात. आणि त्या विरोधाला एक वैचारिक अधिष्ठानही असु शकते हे विसरत आहात.

नास्तिक लोकांवर आस्तिक लोक लेख लिहीत नाहीत त्याला आम्ही काय करणार? लिहावेत लेख.. अजुन काय बोलणार.

निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2015 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

@

निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..

:--- +++१११ ज्जे ब्बात!

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 3:21 pm | प्रसाद१९७१

पिराताई - मी नास्तिक च आहे. पण मला कोणाच्याच धार्मिकते बद्दल काही कॉमेंट कराविशी वाटत नाही.
मला मी जास्त अक्कल असलेला वाटत नाही. त्यामुळे मला कोणी मुढतेच्या अंधारात आडकले आहे असे पण वाटत नाही.

मला जॅझ, रॉक वगैरे संगीत कळत नाही त्यामुळे आवडत नाही, पण आपली सिनेमातली गाणी , शास्त्रीय संगीत आवडते. कोणाला ह्याच्या बरोबर उलटे वाटत असेल.
पण मी रॉक च्या मैफिलीत जाऊन चेहरा वेडावाकडा करणार नाही आणि आमचे शास्त्रीयसंगीत कसे तुमच्या रॉक पेक्षा भारी आहे असले तत्वज्ञान पण तिथल्या रॉक च्या चाहत्यांना ऐकवणार नाही.

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 3:43 pm | पिलीयन रायडर

मला नाही कुठे कुणी धार्मिक कमेंट केलेली दिसली हो.. मी परत वाचला लेख तेवढ्या करता..
कुणाची अक्कल काढली आहे असेही वाटले नाही. तुमचे यनावालांशी काही आधीचे देणे घेणे असेल तर मला माहित नाही. पण हा पहिलाच लेख वाचला असल्याने माझ्या मनात तरी काही पुर्वग्रह नाहीत.
तेव्हा तुम्ही फक्त ह्या लेखापुरते बोलाल का?

ते तेवढं नास्तिक लोक वेगळेपणा दाखवयचा प्रयत्न करत असतात आणि ते धर्म-निधर्म ही वैयक्तिक बाब आहे वरती जे मी लिहीलय.. त्यावरही बोलाल का?

स्वप्नांची राणी's picture

14 Dec 2015 - 4:56 pm | स्वप्नांची राणी

पिरा...अतिशय छान प्रतिसाद!! ईतकं तंतोतंत लिहायला जमलच नसतं!!

मलही यनावाला आस्तिकांची अक्कल काढतायेत असे कधी त्यांच्या लेखांवरुन वाटले नाही. अर्थात प्रतिसादात त्यांची वाक्ये सोयिस्कररीत्या उचलून असा कांगावा मात्र केलेला पाहीलाय. मिपावर खरं तर नास्तिक विचारसरणीचे मोजकेच लेख येतात. तंत्रशक्ती, मंत्रशक्ती, श्लोक ई.ई. विषयांवरचे बरेच लेख येत असतात त्यामानाने.

नाखु's picture

14 Dec 2015 - 2:39 pm | नाखु

एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस,

यात वरील प्रतिसादातील कुळधर्म कुळाचार्,चालीरीती+प्रथा हे शब्द घालंण्याची चौराकाकांनी परवानगी द्यावी..

डांगे सर या धाग्यावर दिसेनात ते. प्रगोही दिसत नाही.

मार्मिक गोडसे's picture

14 Dec 2015 - 2:55 pm | मार्मिक गोडसे

'मला भीती वाटते' हे सांगण्याची अतिशय जटील व अतार्किक पद्धत म्हणजे धर्म.

बहुधा इथे कोणीच येणार नाही. कारण मागच्या धाग्यांवर सगळे दमलेत.
बाकी मी मागच्या धाग्यात माझ्या काही अनुभवांचे स्पष्टीकरण मागितले होतहास्याखिल्ली उडवण्याखेरीज माझ्या हाताला काही लागले नाही, त्यामुळे मी देखील इथे चर्चा करून काही साध्य होणारे नाही या निष्कर्षापर्यंत आलेला आहे. आणि म्हणूनच माझी भूमिका मी इथे स्पष्ट केली आहे.
तस्मात आपला पास.

नगरीनिरंजन's picture

14 Dec 2015 - 5:44 pm | नगरीनिरंजन

तुमचे अनुभव वाचले. त्यातून तुमचा नक्की कोणावर विश्वास बसला ते तुम्ही सांगितलेच नाही. मंत्र म्हटल्यावर म्हशीचे किडे गेले हे मान्य केलं तरी मंत्रावर विश्वास बसला म्हणजे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला व का बसला ते तुम्हाला सांगता येईल का?
१. मंत्र म्हणजे किड्यांना समजणारी भाषा. ती भाषा त्या माणसाला येत होती आणि त्यातून त्याने किड्यांना निघून जायची विनंती/आज्ञा केली.
२. सगळ्या प्राण्यांना नियंत्रित करणारी शक्ती आहे व मंत्र म्हणजे सगळ्या प्राणिमात्रांना नियंत्रित करणार्‍या शक्तीला समजणारी भाषा. त्या भाषेत त्याने किड्यांना निघून जायला सांगायची त्या शक्तीला विनंती/आज्ञा केली.
३. मंत्र म्हणजे फक्त किड्यांना त्रास होईल अशा फ्रिक्वेन्सीच्या आवाजात केलेली बडबड. त्या त्रासाने किडे निघून जातात.
४. ते किडे त्या माणसाचे पाळीव किडे होते. म्हशींना त्रास देऊन त्यांच्या मालकांकडून पैसे उकळण्याचा त्यांचा भागीदारीत धंदा होता.
५. तो प्राणघातक आजार नव्हता आणि म्हशीच्या प्रतिकारक शक्तीने तोवर आधीच्या औषधांच्या मदतीने युद्ध जिंकत आणले होते व त्याने मंत्र म्हणायला व किडे निघून जायला बोलाफुलाची गाठ पडली.
यातल्या एका किंवा इतर कुठल्या शक्यतेवर का विश्वास बसला ते सांगितले की मग बाकीच्या अनुभवांबद्दल बोलू. नुसताच माझा विश्वास आहे असं गोलम्गोल नको. नक्की कशावर विश्वास आहे हे तरी माहित असले पाहिजे स्वतःला.

तो प्राणघातक आजार नव्हता आणि म्हशीच्या प्रतिकारक शक्तीने तोवर आधीच्या औषधांच्या मदतीने युद्ध जिंकत आणले होते व त्याने मंत्र म्हणायला व किडे निघून जायला बोलाफुलाची गाठ पडली.

यातली हीच एक शक्यता त्यातल्ता त्यात संयुक्तिक आहे, पण तीदेखील प्रॅक्टिकल नाही, कारण गावाकडे कोणालाही जाऊन विचारल्यास तुम्हाला हा आजार किती प्राणघातक आहे हे समजेल. आम्ही नाईलाज म्हणून, आणि प्रत्येक वेळी मांत्रिकाचे पाय धरायलानकोत म्हणून शेवटी अश्या जखमांमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात केली. त्या म्हशींना खूप त्रास होतो, पण नाईलाज आहे. तरीही शेवटी त्या बैलासाठी मांत्रिक बोलवावाच लागला. कारण त्याला वृषणावर हा आजार झाला होता आणि तिथे हात देखील लावणे अशक्य होते.
त्याने नेमके काय केले हे मला माहीत नाही. पण एक मंत्र म्हणणे, कोणत्यातरी पाळाचा एक तुकडा बैलाच्या डोक्यावर ठेवणे या गोष्टींनी जखमेतील किडे जातील यावर माझा अजूनदेखील विश्वास बसत नाही. त्यामुळे मी संयुक्तिक उत्तराच्या शोधात आहे.

तीच गोष्ट नागाची. नागाच्या तोंडातला मणी वगैरे समजा काही काळासाठी विसरून जाऊया, पण मंत्राने सर्प जातीतील दोन प्राणी बोलावणे, आणि त्यांनी तिथे येणे, याचा नेमका अर्थ काय हे देखील मला पडलेले कोडे आहे.

याव्यतिरिक्त देखील काही अनुभव आहेत,पण ते व्यक्तिगत पातळीवर असल्यामुळे त्यांची चिकित्सा होऊ शकत नाही. त्यामुळे इथे मांडत नाही. त्यामुळे मी सध्या दोलायमान अवस्थेत आहे. एका बाजूला उत्क्रांतीची शास्त्रशुद्ध स्पष्टीकरणे मिळत आहेत, तर दुसर्‍या बाजूला असे पॅरानॉर्मल अनुभव, ज्यांची सत्यता वादातीत आहे. या दोन गोष्टी एकत्र कश्या आणायच्या याचा विचार करतोय.

आनन्दा's picture

14 Dec 2015 - 6:43 pm | आनन्दा

बाकी माझे असे मत आहे की आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या जगाच्या पलिकडेदेखील काहीतरी आहे, ज्यातला काहीतरी भाग अपघाताने किंवा अन्य काही कारणाने मानवाला ज्ञात झाला आहे. ज्याला आस्तिक देव म्हणतात, आणि नास्तिक अंधश्रद्धा म्हणतात. त्याचे अस्तित्व असणे कोणालाच सिद्ध करता येत नाही, पण अस्तित्व नसणे हे देखील सिद्ध करता येत नाही.
हे नेमके काय आहे याचे उत्तर पुढच्या काही शतकांमध्ये मिळेलच, पण तोवर आपण साप साप म्हणून भुई धोपटू नये.

ट्रेड मार्क's picture

15 Dec 2015 - 3:12 am | ट्रेड मार्क

बाकी माझे असे मत आहे की आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या जगाच्या पलिकडेदेखील काहीतरी आहे, ज्यातला काहीतरी भाग अपघाताने किंवा अन्य काही कारणाने मानवाला ज्ञात झाला आहे.

पूर्णपणे सहमत.

या तथाकथित बुद्धिवाद्यांचा हाच तर प्रॉब्लेम असतो. त्यांच्या दृष्टीने विज्ञानाने सिद्ध होतं तेच फक्त खरं. पण म्हणजे नक्की काय? जे आपल्याला आत्ता ज्ञात आहे, ज्याचे स्पष्टीकरण आपण देवू शकतो ते. बरं ते पण आत्ताच्या आपल्या ज्ञानाप्रमाणे आहे ना? मग आत्ता आहे तेच ज्ञान सर्वसंपन्न आहे असा दावा आहे का? या पुढे काही नवीन शोध लागणार नाहीत? समजा उद्या शोध लागला कि देव म्हणजे नक्की कोण? आधीच्या धाग्यांमध्ये यानावालांनी लिहिलेली निरुपयोगी मंत्रशक्ती कशी उपयोगी ठरू शकते हे सिद्ध झालं तर हे लोक मान्य करणार का नाही?

जर का करणार असतील तर मग कशाला एवढा त्रास करून घ्यायचा? विश्वाच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यात मानवजात म्हणजे किती छोटी आणि त्यात आपण एक मानव म्हणजे तर एका बिंदू एवढे पण नाही. मग कसला आणि कशाला माज करायचा?

आत्ताच्या जगात सुद्धा स्पर्श करता येतील अश्या कितीतरी गोष्टी आपल्या समोर आहेत उदा इजिप्तचे पिरामिड, माचू पिचू, देरीन्कुयू, इस्टर आयलंड, स्टोनहेंग ई ई अनेक आश्चर्ये कोणी आणि कशी बांधली याचे स्पष्टीकरण देत येत नाहीये. मग त्याबद्दल आपण काय म्हणाल?

वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे सर्व अनुभवांवर आधारीत असतं . कदाचित यानावालांना अजून अनुभव यायचा असेल.

नगरीनिरंजन's picture

15 Dec 2015 - 5:52 am | नगरीनिरंजन

ते सगळं ठीके हो. एक वैश्विक शक्ती असेल यावर विश्वास असणे वेगळे आणि ती शक्ती माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे मानणे वेगळे. विश्व केवढे आपण केवढे हा विचार तेव्हा शिवत नाही मनाला. त्याही पुढे जाऊन शंकर, विष्णु, गणपती वगैरे शक्तींचे नामकरण करणे, मग शंकराला अमुकच हवे तमुक चालत नाही; गणपतीला अमुकच रंगाची फुले आवडतात वगैरे यांना कोण येऊन सांगतं?
त्याहीपुढे जाऊन मग माणसांचे वर्गीकरण करुन भेदभाव वगैरे सुरु होतो. आक्षेप घेण्यासारखे खूप आहे.

ट्रेड मार्क's picture

15 Dec 2015 - 9:35 pm | ट्रेड मार्क

मी परत परत विचारतोय धागालेखकांना की त्यांना देव/ वैश्विक शक्ती या संकल्पनेत अडचण आहे का कर्मकांडांना विरोध आहे. पण ते उत्तर न देता फक्त आस्तिक निर्बुद्ध असतात हेच सांगत बसतात.

माझा देव/ वैश्विक शक्ती या वर विश्वास आहे पण कर्मकांडांना विरोध आहे. ही कर्मकांडे मधल्या काळात भटजी वगैरे लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. मी काही रोज देवळात जात नाही, रोज पूजा करत नाही, पण घरात देवाला नमस्कार मात्र जरूर करतो. एखादा देवाचा फोटो अथवा मूर्ती हे फक्त त्या निराकार शक्तीला आपण आपल्या अल्पमतीप्रमाणे दिलेलं रूप आहे. पण म्हणून मला असं वाटत नाही मी रोज एखाद्या मूर्तीसमोर मंत्र म्हणले तर ती मूर्ती जिवंत होऊन माझ्या समस्यांचं निराकरण करेल.

माणसाचे वर्गीकरण, भेदभाव ई ई गोष्टी मानव निर्मित आहेत, त्याला आक्षेप असावाच. पण त्या देवाच्या नावाखाली होतात म्हणून देव बदनाम पण करणारी माणसे नाही? बरं आता एखादा करत असेल त्याच्या घरात रोज पूजा अर्चा, तर त्यात कोणाला आक्षेप असायचा काय कारण आहे? सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली जो धिंगाणा चालतो त्याला विरोध करा पण म्हणून श्रद्धाच नको हा अट्टाहास का आणि कशासाठी?

जी ठिकठीकाणी मंदिरे उगवली आहेत त्याला अर्थ नाही. पण जी खरच पुरातन मंदिरे आहेत ती मात्र वेगळी आहेत. कदाचित स्थान महात्म्य असावे जसे की असे म्हणतात शंकराचे मंदिर ज्या ठिकाणी असते तिथे जास्त प्रमाणात चुंबकीय आकर्षण असते. ते अर्थात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आहे पण ही पुरातन मंदिरे अश्या ठिकाणी बांधली आहेत आणि काही काळ अश्या ठिकाणी गेल्यावर मानवाला काही मानसिक फायदा होत असावा. पण अश्या ठिकाणांचे पण जे बाजारीकरण झाले आहे ते चुकीचे आहे.