फाटली भलत्या अवेळी जीर्ण झोळी
थेंब शब्दांचे तुझ्या झेलीत होते
राहिला साचून तेथे षड्ज वेडा
आर्त वेणूचे जिथे संगीत होते
थिरकते ही एकटी जेथे अबोली
त्या तिथे शून्यात होती रासलीला
हळहळे अजुनी घडा फुटका, रिकामा
खोड माझी काढण्या तू फोडलेला
नादती येथे वृथा का पैंजणे ही
छेडता दूरात तू मंजूळ पावा
रे मुकुंदा श्वास माझे जहर व्हावे
एवढा सलतो जिवाला हा दुरावा
मान्य हे कळले जरा मजला उशीरा
की तुझ्या असण्यातही नसणेच होते
भाळले ज्याच्यावरी गोकूळ सारे
सावळे ते हास्यही उसनेच होते
संपला सहवास सरल्या गोड भेटी
प्रश्न केवळ राहिला वेड्या मनाचा
मी तुझी, यमुना तुझी, अन् गोपिकाही!
सांग पण मधुसूदना रे तू कुणाचा....?
© अदिती जोशी
प्रतिक्रिया
24 Oct 2015 - 1:51 pm | टवाळ कार्टा
मस्तय.....चावट कच्चा मसालापण आहे ;)
24 Oct 2015 - 3:29 pm | दमामि
टक्या, होऊन जाऊदे:)
24 Oct 2015 - 3:50 pm | टवाळ कार्टा
पंख लाग्तील :)
24 Oct 2015 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा
@संपला सहवास सरल्या गोड भेटी
प्रश्न केवळ राहिला वेड्या मनाचा@
नेहमी प्रमाणेच..
24 Oct 2015 - 4:57 pm | एस
प्राची अश्विनी ह्यांच्या 'तो कृष्ण वेगळा नाही' या कवितेची आठवण करून देणारी ही कविता. सुंदर आहे. शुद्धलेखन आणि लयबद्धता, दोन्ही छान सांभाळले आहे.
27 Oct 2015 - 6:58 pm | शिव कन्या
हेच म्हणायचे होते.
24 Oct 2015 - 5:54 pm | दमामि
कविता छान आहे लिहायचे राहिले.
आवडली.