नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच. इथे ह्या धाग्यावर म्हणा किंवा व्यक्तीगत निरोपाने म्हणा तुम्ही मदत मागू शकता.
नव्या मिपाकरांना सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांसमोर तुमचं साहित्य सादर करायला अजिबात घाबरू किंवा लाजू नका. तुम्ही नवे असाल तेव्हा तुमच्याकडून चुका ह्या होणारंच. ह्याचं चुकांमधून शिकून पुढे अत्यंत उत्तम साहित्य लिहिणारे बरेच मान्यवर आयडी इथे मिपावर किंवा एकूणच मराठी आंतरजालावर लेखन करत असतात. मिपाकर तुमच्या लेखनाचं स्वागत करतीलच. कदाचित तुमच्या सुरुवातीच्या काही लेखांवर टिका होईल, चुकांवर बोट ठेवलं जाईल. थोड्याफार प्रमाणामध्ये रॅगिंगही होईल. त्यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाही. लोकं तुम्हाला हळू हळू ओळखायला लागतील, तुमच्या लेखनाची पद्धत किंवा बाज त्यांच्या सवयीचा झाला की हेच लोकं तुमचे जवळचे मित्र बनतील (स्वानुभवाचे बोल. माझं मिपावर झालेलं अलौकिक स्वागत अजून विसरलेलो नाही. तेव्हा राग आलेला, प्रचंड वाईट वाटलेलं पण आता मात्र हे लोकं माझे मित्र बनलेत :) ). सो, लिहिते व्हा. तुमच्या कथा, कविता, प्रवासवर्णनं, पाककृती, अनुभव ह्या सगळ्यांचं मिसळपाववर स्वागतच असेल. काही नियम किंवा मर्यादा मात्र लागू असतील ते म्हणजे लेखन तुमचं स्वतःचं असावं, मोडकं-तोडकं असेल तरी चालेल काही हरकत नाही. अनुवाद करत असाल तर मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय इथे प्रकाशित करू नका. बुद्धी स्वामित्व ही कायदेशीर बाब असल्याने हा नियम कटाक्षाने पाळा. कुठल्याही जाती-धर्माला दुखावलं जाईल असं लेखन टाळा. समिंग अपः लिहिते व्हा. अधून मधून जागोजागी आपले मिसळपावकरांचे कट्टे होतं असतात त्यांनाही हजेरी लावा. नव्या लोकांशी त्यानिमित्ताने ओळखही होईल :).
ह्या लिंकवर तुम्हाला साहित्य संपादकांची नावं कळतीलः साहित्य संपादक
जुन्या संपादक मंडळामध्ये काही बदल झालेले होते त्याची यादी मी नीट माहिती घेऊन इथे लिहीनच.
इथले बरेच जुने आयडी हल्ली वाचनमात्र असतात असं हल्ली लक्षात आलेलं आहे. पूर्वी अत्यंत चांगलं लेखन करणारे हे लोक्स अचानक लेखनसंन्यासी का झालेत ह्यामागचं कारण जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुमचं साहित्य वाचूनच, तुमच्या मार्गदर्शनाखालीच हौशी नवमिपाकर आणि माझ्यासारखे लोकं शिकतील असं मनापासून वाटतं. त्यामुळे तुम्हीही लिहितं व्हा अशी आग्रहाची विनंती मी करतो. जुन्या लोकांना बहुतांश वेळा मदतीची गरज लागत नाही, पण तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणाला मदत लागल्यास संकोच नं बाळगता मी आणि माझं संपादक मित्रमंडळ हजर आहेच.
तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखामध्ये प्रतिसादांमधून मांडा. ही कल्पना प्रत्येक वेळी लेखनाशी संलग्न असायलाचं हवी असं नाही. एखादा सामाजिक उपक्रमही यामध्ये येऊ शकतो. नाखु'न'काकांशी मधे बोलताना त्यांनी एक संकल्पना मांडली होती. ती तेच इथे लिहितील अशी अपेक्षा. मिपावर तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील तर तेही इथे मांडा. काही नवे साहित्यप्रकार मिपावर जोडायच्या विचारामधे सध्या सा.सं. मंडळ आहे. त्यांमध्येही तुमचं योगदान अपेक्षित आहे :) .
कळावे. लोभ असावा.
P.S. लेखक/ कवी मंडळींना एक आवाहनः तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल तुम्ही साहित्य संपादकांना कळवत असताना शक्यतो एकापेक्षा जास्तं संपादकांना कळवणं टाळा. म्हणजे तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल अत्यंत योग्य पद्धतीने केले जातील. काही वेळेला एकापेक्षा जास्तं संपादक एका धाग्यावर दुरुस्तीचं काम करत असतील तर जो शेवटी धागा प्रकाशित करेल त्याने केलेले बदल फक्त धाग्यामधे दिसतील. पहिल्या संपादकाने बदल करुनही ते धाग्यामधे दिसणार नाहीत. (Too many cooks spoils the dish) असा प्रकार टाळण्यासाठी वरची सुचना करतो आहे. एंजॉय पावसाळा एंजॉय मिपा. :)
प्रतिक्रिया
19 Jul 2015 - 3:58 pm | जयन्त बा शिम्पि
तुमच्या खुलाशाने उत्साह वाढला आणि लिहावेसे वाटले म्हणून सुरवात केली आहे.धन्यवाद
19 Jul 2015 - 8:18 pm | माझीही शॅम्पेन
हा लेख छान उपक्रम सुध्धा छान पण काही भाबड्या शंका
१ जे जे गेले त्यामुळे मिपा चे नुकसान झाले आहे हे तत्वत: मान्य आहे का (मी कोणीही आंडू पांडू नाही तर चांगले चांगले लेखक गेले किंवा काही कारणाने कमी केले गेले)
२ कुठल्याही लेखावर संपादन / प्रतिक्रियेवर संपादन केल्यावर कारण मीमांसा , मिळू शकेल का ?
बदल हा शेवटी स्वत: पासून करावा लागतो :)
19 Jul 2015 - 9:09 pm | टवाळ कार्टा
खिक्क....बघु उत्तर मिळते का ते :)
21 Jul 2015 - 7:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
शँपेन. रास्तं शंका आहेत.
मला आता फक्त एक गोष्ट सांग. जर मी आज एका दिवसामधे २०-२५ धागे संपादित केले तर मला सगळ्यांना पोचपावती देणं शक्य आहे का? राहिली गोष्ट प्रतिक्रिया संपादित किंवा हेवनवासी होण्याची ते अधिकार कुठल्याही सा.सं. ला नाही. हिच गोष्ट संपादकांनाही लागु होते. प्रत्येक उडवलेल्या प्रतिक्रिया/ लेखाला पाच ओळी कारण लिहायचं म्हणलं तरी ते व्यवहार्य असेल का? ह्यावर तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग.
21 Jul 2015 - 3:37 pm | स्पा
हेल्थ फ्रीकर्स फोर्मात आहेत
21 Jul 2015 - 3:59 pm | अस्वस्थामा
माझे प्रतिसाद जेव्हा जेव्हा संपादित झालेत तेव्हा तेव्हा नीट दोन-चार ओळी का होईना पण कारण दिले गेले होते. आणि तेवढी कर्टसी दाखवली जात असेल तर तक्रारीचे कारण नसावे. (इतरांचा अनुभव माहीत नाही.)
22 Jul 2015 - 1:19 pm | मृत्युन्जय
कॅप्टननी हा लेख लेखन संपादक म्हणुन टाकला आहे. काही चांगला मदतीचा हात पुढे केला आहे. असे असता संपादक मंडळाबद्दलच्या कुरबुरी इथे लिहुन लोक या धाग्याची आणि एका चांगल्या उपक्रमाची वाट लावत आहे असे वाटते. हे म्हणजे एखाद्या भाजपा नगरसेवकाने शनिवारवाड्याच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला की "आधी बाबरी मशिदीचे काय झाले ते सांगा" म्हणुन बोंबाबोंब करण्यासारखे आहे.