माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in भटकंती
2 Aug 2014 - 5:22 pm

सकाळी २.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वजण प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली. आज जास्त घाट लागणार होते. डोंगर पार करुन जव्हारला पोहोचायचे होते. माझ्या बरोबरच्या लोकांनी सागितले कि ताई आज तुम्हाला हाताला धरुनच खेचावे लागेल कारण घाटावर तुम्ही खुप थकाल. नेहमी प्रमाणे पाय आणी अंग दुखत होतं घाट लागले मी गमछाला एका बाजुने पकडलं आणि एक एक जण थोडा थोडा वेळ बदलुन गमछयाच्या दुस-या बाजुला पकडुन ओढु लागला. मला वाटलं मला एकटीलाच ओढतायत पण ब-याच मुलींना ज्या अंगाने बारीक असुन सुद्धा त्यांचे त्यांचे नातेवाईक ओढत होते. त्याही थकल्या होत्या. माझ्या जोडीला बरेचजण नवीन पदयात्री पहिल्यांदाच पदयात्रेत सामील झाले होते. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं मुलाची खुप ईच्छा होती की जोड्यानं चालत जावं , मुलीची ईच्छा नसतानाही तो तिला जबरदस्ती चालत घेउन जात होता. ती अंगाने खुपच बारीक होती माझ्या सारखी थकली होती. पुढे ती माझ्याही मागे पडु लागली. एक घाट कसबसा पार केला. चालतानाच पायातल्या फोडात पुन्हा पाणी भरुन फोड फुटत होते पण स्लिपर्स , सॉक्स काढुन पहायला वेळ नव्हता. जीव थकला , कावला. मी खुप स्लो चालत होते पण कुठेही थांबत नव्हते. सकाळच्या चहाच्या थांब्याला पोहोचेपर्यंत बाकीची मंडळी नाश्ता करुन जायला निघाली होती. मंडळाच्या अध्यक्षांचा मुलगा सर्वांची पुरुषांच्या पायांची मालीश करत असे, मुख्यतः तो पायाच्या पंजाला हाताने जोरात पंच मारुन ठोकुन ठोकुन मालीश करायचा त्याने चालुन चालुन पायाच्या पंजामधे जे रक्त गोठतं ते रीलीज होतं असं म्हणायचा. मी हि त्याला सांगितलं पायाच्या पंजाचे तुकडे पडलेत तर पंजाला प्लीज हाताने कींवा काठीने पंच मार. तसं केल्यावर थोडं बरं वाटलं. बाकीचे पुढे गेले, मीही नाश्ता करुन पुढे निघाले, पुन्हा घाट आणी तो पण रस्ता एकदम उभा दिसत होता. पुन्हा मला गमछ्याने ओढायला सुरुवात झाली. हा जव्हारचा शेवटचा घाट होता हा संपला कि जव्हारला पोहोचणार होतो. पायाचे तुकडे तर आधीच पडले होते. उनही बरंच होतं. खुप वेळाने घाट पार केला तरीही जव्हारला पोहोचायला अवकाश होता. कसंबसं जव्हारला १२.३० वाजता पोहोचलो. जव्हारच्या शेवटी वॉटरपंपच्या ईथे जेवणाचा थांबा होता. आम्ही पोहोचलो तेव्हा जेवण चालु झाले होते. मी जेवण केले , आंघोळीला सुट्टी दिली आणि सरळ झोपुन गेले.

संध्याकाळी ५ की.मी. इतके कमीच चालायचे असल्याने उन्हाचा त्रास वाचवण्याकरता आरामात ४ वाजता निघायचे ठरले होते. ३ वाजता सर्वांनी आवरायला सुरुवात केली. बायका स्वछ तोंड धुवुन , पावडर वगैरे लावुन केस विंचरत होत्या. मी हातपाय आणि तोंड धुवुन घेतले. बाकी पुर्ण प्रवासात मी दुपारच्या आंघोळीच्या वेळेसच केस विंचरत असे. टोपी घातल्याने तसंही केस खराब होत आणी इतकं थकल्यावर माझी केस विंचरणे, पावडर लावणे असं करण्यासाठी ताकदच उरत नसे. सर्वजण अगदी तयारी करण्यात मश्गुल होते. ४ वाजता हळुहळु सुरुवात केली. अंतर कमी असल्याने लवकर पोहोचलो पण माझी अवस्था तर आणखी खराब होत चाललेली. थांब्यावर पोहोचलो. अध्यक्षांच्या बायकोने आणी मुलीने झोपण्यासाठी जागा पकडुन ठेवलेली. शौचाला गेले तर चालता येईना अध्यक्षांच्या मुलीनेच पाण्याची बादली पकडली आणि हाताला पकडुन नेले. आतापासुन मला जेवणासाठी रांग लावायची गरज नव्हती माझी हालत पाहुनच कुणी न कुणी मला बसल्या जागी नाश्ता , जेवण , पाणी आणुन देत असे. आरती, जेवण करुन झोपुन गेलो. ईथेही भरपुर थंडी. रोज राउत त्याच्या नातेवाईकाला फोन करुन माझी खुशाली कळवायचा. मला घरची अजिबात आठवण येत नव्हती. कधी थकल्याने तर कधी रेंज नसल्याने मी घरी जास्त फोन करत नसे.

४ था दिवस उजाडला. आज सुद्धा घाट होते. रात्री १.३० वाजता उठुन नेहमीप्रमाणे सर्व आवरुन रस्त्याला लागलो. गमछा सोयीस्कर वाटु लागला होता. आता राउतचे मामा जे मंडळाचे सभासद देखिल होते ते सुद्धा माझ्याबरोबर चालु लागले. त्यांना रस्त्याची चांगली माहीती होती. अंधारात ही घाट चढताना ते बाकीच्यांना सुचना देत होते की आता खड्डा आलाय हिला ईथनं आणा वगैरे. त्यांना मंडळाकडुन फोन आला कि ताईला चालता येत नसेल तर गाडीत बसवा गाडी पाठवतो पण मामांनी सांगितले कि हि हळुहळु चालते पण कुठेही थांबायला , बसायला , आराम करायला सांगत नाहीये त्यामुळे ही चालेल आम्ही हीला घेउन येतो. थोड्यावेळाने उजाडले , स्लो चालत असल्याने मला थोडे बरे वाटत होते. मी एकटी आरामात चालत होते. उतरण होती तेव्हा तर मी माझ्या बरोबरच्यांना मागे टाकुन खुप पुढे आले होते. उतरण आणी उतरते वळण असल्याने लांब असुन सुद्धा मी त्यांना व ते मला पाहु शकत होते. खाली थोड्या अंतरावर पोशेरा या गावाच्या बसस्टॉप वर चहाचा आणी नाश्त्याचा थांबा होता. चहा नाश्ता झाला, अध्यक्षांनी येउन सांगितले की तुमच्या घरच्यांनी सांगितले होते कि तुम्ही २ की.मी ही चालु शकणार नाहीत पण तुमच्यावर साईबाबांची क्रुपा आहे, चांगल्या चालत आहात तर ४ माणसं जोडीला देतो आरामात चाला , काळजी करु नका. हे ऐकुन खुपच बरे वाटले. पुन्हा चालु लागलो. साधारण १० वाजता मोखाडा पार करुन निळमाती च्या आधी मंदीराच्या ईथे आंघोळीच्या थांब्याजवळ पोहोचलो. हा एकच थांबा असा आहे की जेवणाचा थांबा ईथुन ३ की.मी. पुढे आहे. आंघोळीची बॅग ईथे ठेवुन सर्व गाड्या पुढे जातात आणी आंघोळीनंतर हे ओझे पाठीवर घेउन ३ की.मी. उन्हात चालावे लागते. थोडा घाट लागतो. मला बायकांच्या आंघोळीची दिशा दाखवुन आणी नंतर पुन्हा मंदीराजवळ ये असे सांगुन जोडीची माणसं पुरुषांच्या आंघोळीच्या ठिकाणी निघुन गेली. ईथे नदी आहे. थोडंसं पुढे गेल्यावर एका टेकडीच्या खाली पायथ्याशी बायका आंघोळ करताना आढळल्या. खाली उतरायचा रस्ता म्हणजे एकावेळी एकच माणूस उतरेल इतका अरुंद होता. लागुनच खाली गोल कूंडासारखा पाण्याचा भाग तयार झाला होता. खाली तोल जाउन पाण्यात पडण्याच्या भीतीने मी बसुन बसुन साईबाबांचे नाव घेत खाली उतरले. थंडगार पाणी होते. १५ मिनिटे पाय बुडवुन ठेवल्यावर खुपच बरे वाटु लागले, सगळा शीण गेला. बर्याच दिवसांनी आंघोळीला पुरेसे पाणी मिळाले होते. छान आंघोळ केली, केस धुतले , १-२ कपडे धुतले आणी कसेबसे परत वर चढुन मंदीराजवळ आले. थोड्या वेळाने बाकीची मंडळी आली आणी आम्ही चालु लागलो. उन्हामुळे चालण्याचा वेग मंदावला. बर्याच वेळाने आम्ही जेवणाच्या थांब्याजवळ म्हणजेच निळ्माती गावाच्या बस स्टॉपजवळ पोहोचलो. ईथे सावली नाही की थांब्याजवळ मोठे ठीकाणही नाही. जेवण झाले आता मोरचोंडी हा सगळ्यात मोठा घाट लागणार होता जो जवळजवळ १० कीमी लांब आहे. ७-८ कीमी चढल्यावर चहाचा थांबा आहे. सर्व म्हणायला लागले की हा घाट चढायला खुप कठीण आहे हा घाट चढलीस तर शेवटपर्यंत चालत जाशील हे नक्की. जोडीदारांनी सांगितले कि घाबरु नकोस चालायला सुरुवात कर दमलीस की आम्ही आहोतच न्यायला. मी मनातल्या मनात साईबाबांचा धावा करु लागले की "बाबा आता भक्ताची लाज राखा हा घाट तरी मला कुणाच्याही मदतीशिवाय पार पाडु द्या". आतुन खुपच घाबरले होते.

साधारण ३ वाजता २ बायकांबरोबर हळुहळु चालायला सुरुवात केली. मोठा घाट असल्याने आणी वाहनांची थोडी वर्दळ असल्याने सर्व सावकाश चालत होते. माझ्या जोडीचे अगदी माझ्या मागेच चालत होते. जवळ २ तासांनी अर्धा घाट पार केला. एका ठीकाणी खुपच उकडायला लागले म्हणुन डोक्यावरची टोपी काढली तोच मागुन राउतचा भाउ अमोल म्हणाला "चढलीस घाट कुणाच्या मदतीशिवाय" , ऐकुन खुपच आनंद झाला, एक पदयात्री (उमेश दादा) म्हणाले "बाय तु आरामात घाट पार केलायस आता तु शेवटपर्यंत चालत जाशील, मला माहीत होतं तु हा घाट चढशील". आताही हा प्रसंग आठवुन माझ्या डोळ्यात पाणी आले आहे. ह्यावारीला निलेशने सांगितले की उमेश दादांच्या पहिल्या वारीला त्यांची अवस्था माझ्याहुन बिकट होती. त्यांनाही कसेबसे चालत नेले होते एके ठीकाणी तर ते रडायला लागले होते , मी आता मरुन जाईन, पुढे जाउ शकणार नाही, मला घरी घेउन चला असे विनवणी करत होते पण माझ्यासारखीच समजुत घालुन त्यांनी कसेबसे उमेशदादाला शेवटपर्यंत नेले. माझ्या बाबतीत ईतकाच फरक होता की माझी ईच्छाशक्ती प्रबळ होती. मला ३-४ वेळा गाडीत बसायचंय का असे विचारण्यात आले पण कूठल्याही वेळी मी दुर्बल होउन गाडीत बसायला तयार झाले नाही. अर्ध्या तासाने चहाचा थांबा आला. चहा झाला अजुन एका तासाने रात्रीच्या जेवणाच्या ठीकाणी पोहोचलो.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 5:55 pm | कवितानागेश

वाचतेय..
'घरच्यांनी सांगितले होते कि तुम्ही २ की.मी ही चालु शकणार नाहीत' या परिस्थितीपासून इतकं चालणं हे फारच छान आहे. :)

शैलेन्द्र's picture

2 Aug 2014 - 6:03 pm | शैलेन्द्र

लिखाणात अजुन सफाईदारपणा आलाय, लिहीत रहा.

खटपट्या's picture

3 Aug 2014 - 2:12 am | खटपट्या

खूप छान वर्णन करताय !!! मीच पदयात्रा करतोय असे वाटतेय !!

किसन शिंदे's picture

3 Aug 2014 - 9:12 am | किसन शिंदे

तीनही भाग आता एकत्रच वाचून काढले. पहिल्या दोन भागांपेक्षा हा भाग उजवा वाटला. दुसर्‍या भागात काही वाचकांनी तुमच्या लिखानाला 'खोडा' घालण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्याला दाद न देता तुम्ही तिसरा भाग टाकलाच आणि तोही आणखी चांगल्या स्वरूपात टाकल्याचं नमुद करावेसे वाटते.

लिहित राहा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Aug 2014 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार

साधे सोपे आणि प्रामाणीकपणे केलेले वर्णन वाचताना मजा येते आहे.
जीवनात येणारा प्रत्येक अनुभव मनुष्याला समृध्द करत असतो.आपण तर एकुण सहा पदयात्रा केल्या आहेत.
पहिल्या वेळचा तुमचा या यात्रेकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणि आताचा दृष्टीकोन यात किती फरक झाला आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल.

पैजारबुवा,

सविता००१'s picture

4 Aug 2014 - 12:16 pm | सविता००१

सुरेख आणि साध लिखाण. खूप आवडलं. वरती ज्ञानोबाचे पैजार यांनी म्हटल्याप्रमाणे पहिल्या वेळचा तुमचा या यात्रेकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणि आताचा दृष्टीकोन यात किती फरक झाला आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल हे मलाही वाटते.

यशोधरा's picture

4 Aug 2014 - 4:27 pm | यशोधरा

मलाही.