Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मृत्युन्जय on Wed, 02/05/2014 - 14:59
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अतिदानात बलिर्बद्धो , अतिमानात सुयोधन:| विनष्टो रावणो लौल्यात , अति सर्वत्र वर्जयेत || अतिरेकी दानशूरते पायी बळीराजा पाताळात गेला, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये हेच खरे. एक अतिरेकी अहंकार सोडला तर दुर्योधनाने त्याचे आयुष्य अतिशय सूत्रबद्ध रीत्या जगले आणि उपभोगले. पण दुर्दैवाने श्लील - अश्लीलतेची एक पुसटशी रेखा आणि अभिमान - अहंकार यातील फरक ओळखु न शकल्याने किंवा ओळखुनही आचरणात न आणु शकल्याने धृतराष्ट्राच्या या पोराने कमावलेले सगळे गमावले. आंधळा बाप, डोळे असुन बघु न शकणारी आई, सतत द्वेष करणारा आणि फालतु कारणे पुढे करुन जन्मताक्षणी त्याला मारु पाहणारा सावत्र काका, नि:स्पृह चुलत आज्जा आणि महाकारस्थानी मामा या सगळ्यांमध्ये राहुनही स्वतःचे एक वेगळेच व्यक्तिमत्व तयार करणारा दुर्योधन "रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा" ठेवण्यात यशस्वी झाला मात्र गुंतुन गुंत्यात सार्या त्याचा पाय मोकळा नाही राहु शकला. रामायणातली सग्ळी पात्रे आदर्शतेचा पुतळा आहेत. महाभारत मात्र करड्या रंगात रंगले आहे. भीष्म आणि गांधारी वगळता प्रमुख पात्रांपैकी कुणीही आदर्शवत नाही. भीष्माचा आदर्श देखील अंबा, अंबिका, अंबालिका प्रकरणात कसाला लागतो तर गांधारीचे वस्त्रहरणातले मौन डोळ्यात खुपते. तरीही महाभारतातली बहुतेक सगळी पात्रे कुठल्या ना कुठली बाबतीत एकतर समोर आदर्श ठेवुन जातात किंवा अवगुणांची उदाहरणे बनुन राहतात. कर्णार्जुन तर सगळीकडेच भाव खातात. हजार पापं करुनही युधिष्ठीर धर्मराज म्हणुन मिरवतो तर सर्व प्रकारचे कपट करुनही कृष्ण देवपदाला पोचतो. दु:शासनादी इतर कौरव तात्पुरते वगळुयात. या सगळ्यात अखेरपर्यंत दुर्योधन एक माणुस म्हणुन जगला. He was more humane than any other character in Mahabharata. तो अखेरपर्यंत माणुसच राहिला. तिरस्कार, ईर्षा, द्वेष, राग, लोभ सगळे त्याने एक माणूस म्हणुन निभावले. कधी संतपदाचा आव आणला नाही की कसोटीच्या प्रसंगी आदर्शांमुळे त्याचे मन दोलायमान झाले नाही. धृतराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या मुलाची ही अशी शोकांतिका का झाली ते प्रथम समजुन घेणे महत्वाचे आहे. दुर्योधन म्हणजे दु: युधम अर्थात युध्दात जिंकता येण्यास दुर्धर / अवघड असणारा. त्याचा अर्थ न समजुन घेता इतिहासकारांनी नंतर दु: या शब्दाचा अर्थ वाईटाशी जोडला. महाभारतात दुर्योधन आणि सुयोधन ही दोन्ही नावे आलटुन पालटुन येतात. बहुतेक वेळेस पांडव आणी खासकरुन युधिष्ठीर त्याला सुयोधन म्हणतो. सुयोधन म्हणजे युद्धात सरस असा. दुर्योधनाचे नाते हे असे जन्मापासुन आणि नावापासुन युद्धाशी जोडले गेलेले. सलग २ वर्षे गर्भ धारण करुनही जेव्हा मूल झाले नाही तेव्हा गांधारीने स्वत:चे पोट फाडले त्यातुन केवळ एक मांसाचा गोळा बाहेर पडला. व्यासांनी स्वप्रतिभेने त्या गोळ्याचे १०१ तुकडे केले आणी माठांमध्ये भरुन ठेवले. त्या १०१ मधला सर्वात मोठा हा दुर्योधन. इतर सगळे एकेक महिन्याच्या अंतराने जन्मले. योगायोगाने भीम आणि दुर्योधन एकाच दिवसाचे. त्यातही दुर्योधन मोठा. लहानपणापासुन हा वाढला तेच मुळी राजा होण्यासाठी. राजाचा मोठा मुलगा तोच होणार राजा. चुलता तर राज्य त्यजुन हिमालयात गेलेला. मुले होण्याची शक्याता नसताना तिथे मुले झाली तीही स्वत:ची नव्हेत तर स्वतः जिवंत असताना नियोगातुन झालेली. ती मुलेही हिमालयातच वाढणारी. राज्याशी संबंध त्यांनी तोडलेलाच आणि अश्यातच चुलत्याची विधवा त्या पाच पोरांना घेउन येते आणी त्यांच्या दैवी संबंधांमुळे त्यांच्या भोवती असलेल्या वलयाने आणि हिमालयातल्या निकोप वातावरणात राहुन कमावलेल्या तेजाने ती मुले बघता बघता सर्वप्रिय होतात. त्यातला एक आडदांड सांड विनाकारण सगळ्या कौरवांचा छळ करतो, त्यांची डोकी फोडतो, हातपाय तोडतो, कौरवांना बळाने एकमेकांशी लढुन जखमी होण्यास भाग पाडतो. लहान वयातली ही अवहेलना हा अपमान दुर्योधन आयुष्यभर विसरला नाही. बळाला श्रेष्ठ मानुन त्याने आयुष्यभर त्याची उपासना केली ती लहानपणी बळाअभावी स्वसंरक्षण न करता आल्याने. हे सगळे चालु असताना राज्यकारभार खर्या अर्थाने हाती असलेला सावत्र चुलता सतत कौरवांचा द्वेष करणारा आणि पांडवांची बाजु घेणारा, सगळ्यांची सहानुभुती मिळवणारी काकु स्वतःच्या पोराचा जीव जायचा वेळ येइतो सर्वांकडे दुर्लक्ष करणारी, आंधळे आईबाप असहाय्य आणी विदुराच्या सल्ल्याने चालणारे. या सर्वातुन तो तरला ते केवळे मामाच्या सल्ल्याने आणि अंगभूत अहंकाराने. या दोन गोष्टी त्याने आयुष्यभर वागवल्या आणि त्यांनीच त्याचा घात घडवुन आणला. दुर्योधनाच्या र्‍हासाला, अधःपाताला आणि विनाशा ला कारणीभूत ठरल्याबद्दल बर्याचदा शकुनी आणि कर्णाला दोष दिला जातो. दुर्योधनाची भिस्त मुख्यत्वेकरुन या दोघांवरच होती हे खरेच परंतु हे ही मान्य केले पाहिजे की दुर्योधन त्यांच्या बोळ्याने दूध पिणार्यातला नव्हता. त्याला जे योग्य वाटेल तेच तो करायचा. द्युतप्रसंगी कर्णाने त्याला द्युततापासुन परावृत्त करण्याचा आणि सरळसरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला होता पण दुर्योधनाने द्युताचा सोपा मार्ग निवडला तर घोषयात्रेत चित्रसेनाकडुन हारल्यावर आणि अर्जुनाने त्याला लुटुपुटीच्या लढाईनंतर सोडवल्यानंतर शकुनीने त्याला पांडवांबरोबर तह करण्याचा सल्ला दिला होता त्याला दुर्योधनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पराकोटीचा द्वेष आणि पराकोटीचा अहंकार यातुन कधी दुर्योधन स्वतःची सुटका करुन घेउ शकला नाही. याबाबतीत तो भीमाचा भाऊ शोभतो. पण भीम स्वतःच्या द्वेषावर अर्जुन आणि युधिष्ठिरामुळे संयम ठेउ शकला तर आजुबाजुला सगळे तोंडपुजे भरलेले असल्याने (आणि तोंडपुजे नसलेले अप्रिय किंवा अविश्वासार्ह असल्याने) दुर्योधनाला हे कधीच जमले नाही. प्रजाहितपालक दुर्योधनाचा अधःपात सुरु झाला द्रौपदी वस्त्रहरण प्रकारात. त्याचेही मूळ आहे आत्यंतिक द्वेषात. अगदी द्रौपदीने त्याला "आंधळ्याचा पुत्र आंधळाच" म्हटले असे मान्य केले तरीही (मूळ समजले जाणार्या महाभारतात हा उल्लेख नाही. द्रौपदी आणि भीम कुत्स्तितपणे हसल्याचा उल्लेख केवळ येतो.) वस्त्रहरणाचे कृत्य त्याकाळीही अश्लाघ्यच मानले गेले होते. अश्लाघ्य असले तरीही त्याला तो अधिकारच नाही असे म्हणायला अगदी भीष्म द्रोणादी कुरुंचीही जीभ चाचरते ते बघता धर्म कर्माचा सूक्ष्म अभ्यास करता सगळ्या प्रकरणात ते दुर्योधनाचा द्रौपदीवरचा एक दासी म्हणुन हक्क मान्य करतात असे दिसते. पणात धाकट्या भावाने जिंकलेल्या स्त्रीची आशा बाळगणारा, एका स्रीला ५ जणांशी संग करण्यास प्रवृत्त करणारा आणि द्युतात पत्नीला उपभोग्य वस्तु म्हणुन डावाला लावणारा युधिष्ठीर आणि त्या स्त्रीला भोगवस्तु मानुन तिच्या वस्त्रहरणाचा आदेश देणारा दुर्योधन यांमध्ये अर्थाअर्थी फारसा फरक नाही. दोघांचेही वर्तन समान दर्जाचे अपरिपक्व किंवा नैतिक / अनैतिक आहे. त्यामुळेच युधिष्ठिराला धर्माचा पुतळा मानलेले असताना दुर्योधनाला खलनायक म्हणणे हे दुटप्पीपणाचे ठरते. महाभारत हे धर्मयुद्ध म्हटले जाते तेव्हाही ते धर्मयुद्ध द्रौपदीच्या विटंबनेचा न्याय करण्यासाठी झाले असे म्हणताच येत नाही. कारण एक भीम वगळता त्या कारणासाठी युद्ध करण्यासाठी कोणीच तयार नव्हते. होता होइता युद्ध टाळण्याकडेच् इतर पांडवांचा कल होता. स्वतः कृष्ण पाच गावांच्या बदल्यात सगळे विसरण्याची शिष्टाई करतो त्यालाही द्रौपदीच्या विटंबनेशी काही घेणेदेणे नाही. त्यामुळे झालेले युद्ध हे दुर्योधनाच्या त्या अधर्माचा नायनाट करण्यासाठी झालेच नाही. ते लढले गेले सत्तेसाठी आणि भूमीसाठीच. या सत्तासंघर्षात प्रथमपासून अंतापर्यंत ज्या खेळ्या झाल्या ते बघता हा ३ राजकारण्यांमधला एक अतिशय नाट्यपुर्ण राजकारणाचा खेळ होता असे लक्षात येइल. ते तिघे होते युधिष्ठिर, कृष्ण आणि दुर्योधन. शकुनीही होता पण त्याचे राजकारण हे वेगळ्याच कलाने चालले होते तर कृष्ण + युधिश्ठीर विरुद्ध दुर्योधन हे एक वेगळ्याच प्रतीचे राजकारण होते हे कळून येइल. यात दुर्योधन किंचित कमी पडला. मात्र माणसे जोडण्याची कला दुर्योधनाला उत्तम प्रकारे ज्ञात होती. भीष्म द्रोणांशी त्याचे फारसे सख्य नव्हते तरीही ते त्याला सोडु शकले नाहित. कर्ण हा तर दुर्योधनाच्या हातातला हुकुमी एक्काच होता. युद्धप्रसंगीही दुर्योधनाने कुरुवंशातल्या बहुतेक सगळ्या सदस्यांना आपल्या बाजुने ओढले. योग्य राजकीय खेळ्या खेळुन याद्वांची सेनाच काय तर कृष्णाची चतुरंग सेनाही स्वतःकडे जमा केली. शल्यासारख्या पांडवांच्या आप्तालाही आपल्या बाजुने ओढले. अर्थात हे सर्व करताना दुर्योधनाने केवळ संख्याबळावर जोर दिला. अखेर लढाईत एक अश्वत्थामा (आणी कृतवर्मा) सोडला तर त्याच्या बाजुने मनापासुन कोणीच लढले नाही. इथे युधिष्ठिर आणि कृष्णाची राजकारणी कला पणास लागली आणि त्यात ते दुर्योधनाला वरचढ ठरले. दुर्योधनाच्या बाजुने लढले ते सर्व युद्धात अमर होण्यासाठी आतुर झालेले दोलायमान मनाचे काही रथी / महारथी तर पांडवांकडचे सगळे जिंकण्याच्या इर्ष्येने. राजकारणाच्या या शेवटच्या खेळीत दुर्योधन हारला आणि जीत वीरांची मानखंडना त्याच्या नशिबी आली. सगळे वीर कामी आल्यावर तळ्यात लपुन बसुन दुर्योधनाने स्वतःची उरली सुरली प्रतिष्ठाही गमावली असेच म्हणायला लागेल. अर्थात विझण्यापुर्वी एकदा त्याच्यातल्या राजकारण्याने आणि वीराने एक शेवटचे तेज मात्र अपुर्व साधले. अखेर दुर्योधनालाही पांडवांना कपटानेच मारावे लागले. एका कसलेल्या राजकारण्याप्रमाणे दुर्योधन कपटी होता, निष्ठुर होता, चतुरही होता. पण त्याच्या अहंकाराने आणि द्वेषाने त्याचा घात केला. भावांच्या म्रूत्युवर तो हळहळला, संतापला पण कर्णाच्या मृत्युवर तो पहिल्यांदा उन्मळुन पडला, खचुन गेला, रडला. त्या अश्रुंमागे कर्णासाठीचे प्रेम होते की स्वतःचा समोर दिसणारा पराभव याचे उत्तर महाभारताने दिलेले नाही. पण इतके मात्र खरे की जितके प्रेम त्याने त्याच्या मित्रावर केले तितकाच पराकोटीचा द्वेष चुलत्यांच्या पोरांचा केला नसता तर कदाचित महाभारताची कथा वेगळी लिहिली गेली असती. कदाचित दुर्योधनाला एक माणूस म्हणुन मरता आले असते पण त्याच्या नशिबी खलनायकाचा मृत्युच लिहिला होता.
  • Log in or register to post comments
  • 16863 views

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on Wed, 02/05/2014 - 15:08

Permalink

मस्त लिहिले आहेस!

मस्त लिहिले आहेस!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 02/05/2014 - 22:34

In reply to मस्त लिहिले आहेस! by यशोधरा

Permalink

+१

दुर्योधनाचे परखड चित्रण.
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Wed, 02/05/2014 - 15:19

Permalink

लेखन आवडले

लेखन आवडले :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 02/05/2014 - 15:25

Permalink

आवडल .

आवडल .
  • Log in or register to post comments

Submitted by सुज्ञ माणुस on Wed, 02/05/2014 - 15:28

Permalink

मस्त !

मस्त ! कर्णाने मनात घर केलेलं असल्याने बाकीच्यांचा कधीच विचार केला नव्हता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 02/05/2014 - 15:31

Permalink

छानच.

छानच. किती दिवस वाट पाहायला लावलीस रे या लेखासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 02/05/2014 - 15:31

Permalink

लेख म्हणून अभ्यासू. बरीचशी

लेख म्हणून अभ्यासू. बरीचशी मतं पटली नाहीत पण म्हणून मतं पटावीत असं थोडंच्च आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Wed, 02/05/2014 - 19:44

In reply to लेख म्हणून अभ्यासू. बरीचशी by प्यारे१

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by भुमन्यु on Wed, 02/05/2014 - 15:31

Permalink

झकास

झकासच मस्त लिहिले आहे.
लहानपणापासुन हा वाढला तेच मुळी .....
कायम हेच वाटत आले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 02/05/2014 - 15:39

Permalink

क्लास...

फार्च छान लिहिले आहे. सगळेच पटले असे नाही पण महाभारत असेच आहे , त्यात काळा- पांढरा असे दोन रंग नसून करड्या रंगाच्या अनेक विविध छ्टा आहेत. अहंकार आणि द्वेष तर पांडवांच्याकडेही होताच की , पण मला वाटते अधर्मामुळे दुर्योधनाचा पराभव झाला. आणि कदाचित व्यासांनाही हेच दाखवायचे होते , नीती - अनीती सापेक्ष असून प्रत्येक कर्म हे धर्माच्याच कक्षेत केले पाहिजे आणि मगच पाप-पुण्याचा निवाडा केला पाहीजे.गीतेत तर क्षत्रियाने युद्धात दुसर्‍याचा जीव घेणे हाच धर्म आहे हे सांगितले आहे... मति गुंग होते विचार करु लागलो तर ! व्यासाच्या प्रतिभेला सलाम !
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Wed, 02/05/2014 - 15:44

Permalink

फारच छान

आवडले. महाभारतातल्या इतर पात्रांवर सुद्धा लिहाच.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Wed, 02/05/2014 - 16:07

Permalink

आवडले

क्रमशः टाकायचे राहिले का?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Wed, 02/05/2014 - 16:45

Permalink

अत्यंत मूलग्राही...

अभ्यासू विवेचन... जेत्यांचे अवगुण आणि पराजीतांचे गुण ...आपल्याकडे साकल्याने चर्चील्याचे फार होत नही.. कृष्ण नसता तर महायुद्धाचा शेवट काय झाला असत हे सांगावयास नको... थोडे अवांतर...: देवदत्त पटनायक ह्यांचे ह्यावरचे विवेचन अत्यंत उद्बोधक आहे....तू नळी वर पहिले होते...सापडल्यास इथे टाकतो...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 02/05/2014 - 18:02

Permalink

छान

खुपचं सुंदर लिहिलं आहे ! इरावती कर्वेंच्या युगांतची आठवण झाली !!
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 02/05/2014 - 19:33

Permalink

मस्त

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 02/05/2014 - 19:36

Permalink

क्लास.

दुर्योधन व्यवस्थीत उभा केलात. अवांतरः विदुराने दुर्योधनाचा द्वेष केला याचं कारण आज जरी पटत नसलं तरी तत्कालीन परिस्थितीत ते सहाजीक होतं. दुर्योधनाची जन्मकुंडली सांगत होती कि हा कुलक्षय घडवुन आणणार. पण कितीही द्वेष केला तरी विदुराने दुर्योधनाचे अहित करण्याचा प्रयत्न केला नाहि. पांडवांपैकी सर्वात जास्त टिकेचा धनी ठरला तो युधिष्ठीर. पण थोडं निरखुन पाहिलं तर ते सर्वात सशक्त पात्र आहे. कुठेतरी एक कथा वाचली होती. द्रोणाचार्यांकडे कौरव पांडवांचे शिक्षण सुरु होते. सर्वजण प्रामुख्याने शस्त्रविद्या व राजकारणाचे धडे गिरवत होते. अर्जुन तर नेहमी धनुर्विद्येत स्वाध्यायात मग्न असायचा. एकदा गुरुंनी सत्याचरणावर लेक्चर दिलं. नेहमी खरं बोलावं वगैरे फंडे पाजले. क्लास संपला. सर्वजण आपापल्या उद्योगाला लागले. पण युधिष्ठीर तिथेच विचारात पडला...सत्य म्हणजे काय. त्याची फिलॉसॉफीवर चिकित्सा तिथेच सुरु झाली...काहिशा कोवळ्या वयात. पुढे देखील ऋषीमुनींसोबत तात्वीक चर्चा करण्याचा त्याला छंदच होता. क्षत्रीयांची बलोपासना, किलींग इन्स्टींक्ट, आईचं स्वप्न, आपली गमावलेली पत पुन्हा प्राप्त करण्याची जबाबदारी, मोठा मुलगा असल्यामुळे सर्वांच्या अपेक्षांचं शहाण्या मुलासारखं वागण्याचं ओझं, कटकारस्थानं, विदुरासंगे विवेकविचार व धर्माचा काथ्याकुट, व हे सगळं क्षणभंगुर असल्याची आंतरीक जाणिव. या सर्व घटकांमुळे युधिष्ठीर काहिसा धरसोड वृत्तीचा झाला असावा, किंवा सामान्य माणसाला तसा तो वाटत असावा. पण त्याच्या क्षमतेवर कुंतीने कधी डाऊट केला नाहि. द्रौपदीबद्दल त्याला आकर्षण वाटलेच असावे कारण ति होतीच तशी. युधिष्ठीराने तत्वज्ञानाचा कितीही उहापोह केला असला तरी योग्यांची विरक्त वृत्ती बाणवायला त्याला तपःचर्येला वेळच मिळाला नाहि. जर द्रौपदीने पाच विवाह केले नसते तरी युधिष्ठीराने संयम मात्र गमावला नसता व अर्जुनाकडुन द्रौपदीला हिसकावुन घेण्याचा प्रयत्न देखील केला नसता. युधिष्ठीराची कसोटी लागली ति यक्षप्रश्न प्रसंगात ( ते प्रक्षीप्त आहे काय माहित नाहि). आणि त्या कसोटीत तो उत्तम उत्तीर्ण झाला. आपली तपःचर्येची हौस म्हणा, गरज म्हणा, त्याने वनवासाच्या १२ वर्षात भागवली. त्याच्याकरता तोच वेळेचा सदुपयोग होता. सज्जन आणि दुर्जनांमधला मुख्य फरक काय? सज्जन व्यक्ती देखील दुर्जनाइतक्याच चुका करु शकतो. पण तो झालेल्या चुका स्विकारतो. धडे गिरवतो. व परत तशी चुक होणार नाहि याची काळजी घेतो. शक्य असल्यास प्रायश्चित्त घेतो. युधिष्ठीराला धर्मराज हि पदवी लावताना हिच कसोटी वापरावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 02/05/2014 - 22:57

In reply to क्लास. by अर्धवटराव

Permalink

एकदा गुरुंनी सत्याचरणावर

एकदा गुरुंनी सत्याचरणावर लेक्चर दिलं.
ही कथा महाभारतात नाही. बाकी वनपर्वातील द्रौपदीचे युधिष्ठिराला सतत घालूनपाडून बोलणे आणि युधिष्ठिराचे तिच्याबरोबर धर्मविषयक संवाद हे मूळातून वाचणे हा जबरी अनुभव आहे.
युधिष्ठीराची कसोटी लागली ति यक्षप्रश्न प्रसंगात ( ते प्रक्षीप्त आहे काय माहित नाहि).
यक्षकथा बहुधा प्रक्षिप्तच असावी. वैदिक काळी यक्षांची संकल्पना बहुधा नव्हती. बहुधा ग्रीकांकडून ही कल्पना आली असावी तरी नक्की माहित नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 02/05/2014 - 23:13

In reply to एकदा गुरुंनी सत्याचरणावर by प्रचेतस

Permalink

आमचे लय जबरी खंग्री तुम्हीच

बाकी वनपर्वातील द्रौपदीचे युधिष्ठिराला सतत घालूनपाडून बोलणे आणि युधिष्ठिराचे तिच्याबरोबर धर्मविषयक संवाद हे मूळातून वाचणे हा जबरी अनुभव आहे.
यावर तुम्ही धागा काढला तर आम्हाला कशाला गरज पडतेय काहि मूळातुन वाचायची? घ्या मनावर. आणि होउन जाऊ दे एक फर्मास लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 02/06/2014 - 01:20

In reply to आमचे लय जबरी खंग्री तुम्हीच by अर्धवटराव

Permalink

+११११ अगदी अगदी.

+११११ अगदी अगदी. -वल्ल्यानं महाभारताची पीडीएफ देऊनही न वाचलेला :( प्यारे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 02/06/2014 - 10:17

In reply to +११११ अगदी अगदी. by प्यारे१

Permalink

मला हवीये ती पीडीएफ. देशील?

मला हवीये ती पीडीएफ. देशील?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 02/06/2014 - 12:31

In reply to मला हवीये ती पीडीएफ. देशील? by प्रीत-मोहर

Permalink

मलाही

मलाही द्या पीडीएफ . अवांतर : ह्यावरुन एक आयडीया सुचली .... हे पुस्तक कॉपीराईट फ्री आहे का ? तसे असल्यास लिन्क शेयर करा येईल ... आपल्यातले कित्येक जणांकडे अशी पुस्तके असतील ...एखादा अशा लिन्क शेयर करण्या साठी धागा काढता येईल .
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 02/06/2014 - 13:21

In reply to मला हवीये ती पीडीएफ. देशील? by प्रीत-मोहर

Permalink

आम्ही

काय घोडं मारलय आम्हाला पण हवी ती पीडीएफ. दियर वल्स सेन्द इत तो मि अल्सो.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 02/10/2014 - 03:34

In reply to मला हवीये ती पीडीएफ. देशील? by प्रीत-मोहर

Permalink

मलापण पायजेलाय

मलापण पायजेलाय
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 02/06/2014 - 10:33

In reply to आमचे लय जबरी खंग्री तुम्हीच by अर्धवटराव

Permalink

येस. एक लेख होउनच जाउ द्यात

येस. एक लेख होउनच जाउ द्यात वल्ली शेठ आणि एक लेख सुवर्ण मुंगुसावर सुद्धा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/06/2014 - 11:22

In reply to येस. एक लेख होउनच जाउ द्यात by मृत्युन्जय

Permalink

ललित लिहिता आले असते तर काय

ललित लिहिता आले असते तर काय रे. :( तूच यांवर एक चांगला लेख लिहू शकशील. मी प्रतिसादांद्वारे भर घालेनच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/06/2014 - 11:29

In reply to ललित लिहिता आले असते तर काय by प्रचेतस

Permalink

अतिअवांतरः दुर्योधन, दु:शासन

अतिअवांतरः दुर्योधन, दु:शासन, इ. लोकांच्या पोरांची नावे कधीच ऐकली नाहीत. धृतराष्ट्राच्या कोणकोणत्या नातवांची नावे महाभारतात आलेली आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 02/06/2014 - 11:34

In reply to अतिअवांतरः दुर्योधन, दु:शासन by बॅटमॅन

Permalink

एक बहुतेक लक्ष्मण.

दुर्योधनाचा मुलगा. अभिमन्युला मारण्यात याचाही हात होता.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/06/2014 - 11:38

In reply to एक बहुतेक लक्ष्मण. by अर्धवटराव

Permalink

ओह अच्छा, धन्यवाद!

ओह अच्छा, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/06/2014 - 11:43

In reply to एक बहुतेक लक्ष्मण. by अर्धवटराव

Permalink

दुर्योधनपुत्र लक्ष्मणाचा वध

दुर्योधनपुत्र लक्ष्मणाचा वध अभिमन्यूनेच केला. मात्र अभिमन्यूचा वध आहे दौश्शा:सनी (दु:शासनपुत्र) ह्याच्या हातून गदेच्या प्रहाराने झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/06/2014 - 11:48

In reply to दुर्योधनपुत्र लक्ष्मणाचा वध by प्रचेतस

Permalink

अर्रे हो!!!! आत्ता आठवलं.

अर्रे हो!!!! आत्ता आठवलं. 'कथा-महाभारत' नामक लहानपणी वाचलेल्या पुस्तकातलं चित्रच डोळ्यासमोर उभं राहिलं. :) अभिमन्यू जमिनीवर पडलाय आणि मिशाळ दौ:शासनी त्याच्या छातीवर गदेचे आघात करण्याच्या बेतात आहे. साला काय मस्त शब्दयोजना होती राव त्यातली, घरी कुठं पडलंय पुस्तक काय माहिती. मिरजेला गेलो की पाहतोच आता. पण हे दोघे सोडून अजून कुणाचाच उल्लेख कसा काय नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/06/2014 - 12:00

In reply to अर्रे हो!!!! आत्ता आठवलं. by बॅटमॅन

Permalink

रच्याकने गदाप्रहार मस्तकी

=)) रच्याकने गदाप्रहार मस्तकी करतो. बाकी आधीच १०० कौरव. त्यात सर्वांच्या पुत्राची नावे म्हणजे......प्रत्यक्ष व्यास जरी झाले तरी अशक्यच ना :) तसा महाभारतात कही कौरवांच्या पुत्रांचा उल्लेख आहे म्हणजे विकर्ण पुत्र, दुर्मुख पुत्र वैग्रे. पण नावांनिशी नाही. अवांतरः दुर्योधन, दु:शासन, विकर्ण, दु:सह, दुर्मुख, आदी ७/८ कौरवच धृतराष्ट्राचे गांधारीपासून झालेले अस्सल पुत्र असावेत बाकीचे सर्व दासीपासून झालेले असावेत. पण महाभारतात मात्र १०० कौरवांचा उल्लेख गांधारीपुत्र असाच येतो. एकमात्र दासीपुत्र युयुत्सु, जो युद्ध सुरु व्हायच्या आधी पांडवांना मिळतो. आणि १०० कौरवांबरोबर एक पुत्री जी दु:शला. हिचा विवाह जयद्रथाशी होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 02/06/2014 - 12:11

In reply to रच्याकने गदाप्रहार मस्तकी by प्रचेतस

Permalink

७/८ कौरवच धृतराष्ट्राचे

७/८ कौरवच धृतराष्ट्राचे गांधारीपासून झालेले अस्सल पुत्र बहुधा १४. तेच १४ ज्यांची नावे दु पासुन सुरु होतात: १. दुर्योधन २. दु:शासन ३. दु:सहा ४. दु:शाल ५. दुर्मुख ६. दुर्धर्षा ७. दुश्प्रधर्शना ८. दुर्मषण ९. दु:ष्कर्ण १०. दुर्मद ११. दुश्प्रधर्शा १२. दुर्विरोचन १३. दुराधर आणि चौदावी मुलगी दु:शला. अर्थात ही फक्त एक थियरी आहे. महाभारताप्रमाणे सगळेच १०१ धृतराष्ट्र आणि गांधारीचेच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/06/2014 - 12:19

In reply to रच्याकने गदाप्रहार मस्तकी by प्रचेतस

Permalink

अरे हो बरोबर.

अरे हो बरोबर. :) सर्वांच्या पुत्रांची नावे येणे अशक्य हे पटते पण लक्ष्मण आणि दौ:शासनी वगळता कुणाचा उल्लेख न दिसल्याने म्हटले इतकेच. अन दु:शलेचा पती जयद्रथ हीही माहिती नवीनच. साला आता तर वाटू लागलंय महाभारताचा फक्त युद्धवाला पार्ट १८ बुकांत विभागून एखादी 'kouridomachia' किंवा 'Mega-Bharataid' लिहायला कसली मजा येईल ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 02/06/2014 - 12:33

In reply to अरे हो बरोबर. by बॅटमॅन

Permalink

होमर किंवा इलियाड मध्ये जी

होमर किंवा इलियाड मध्ये जी युध्दाची वर्णने आहेत ती कशी आहेत? म्हणजे तपशीलवार आहेत की सरळ सरळ मारामारी आहे? म्हणजे घेतला भाला की खुपसला, मग तलवार टाळक्यात अशी की महाभारतात वर्णने येतात की बाण कसा होता, यौद्धे काय म्हणाले, मग कुठल्या क्रमाने यौद्ध्याला नामोहरम केले. म्हणजे पहिल्यांदा घोडे मारले मग सारथी मग ध्वज उडवला मग मुकुट, मग शे दीडशे बाण वेगवेगळ्या यौद्ध्यांनी एकमेकांना मारले मग अखेर वातावरणात घडुन आलेले बदल आणि मग अखेरचा वर्मी लागलेला बाण. इतके तपशीलवार वर्णन इलियाड मध्ये येते काय? शिवाय तुझे ट्रॉय वरचे लेख वाचताना जाणवले की त्यातले वर्णन खुप ग्राफिक आहे. त्यामानाने महाभारतातले वर्णन बरेच सोबर वाटते. एक १८ व्या रात्रीची अश्वत्थामाची कापाकापी सोडली तर इतके बिभ्त्स वर्णन महाभारतात सर्रास सापडत नाही. काही वेळेसच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/06/2014 - 12:44

In reply to होमर किंवा इलियाड मध्ये जी by मृत्युन्जय

Permalink

तपशीलवार आहेत. म्हणजे योद्धे

तपशीलवार आहेत. म्हणजे योद्धे चिलखत घालून तयार होतात, त्यातही आगामेम्नॉन, अकिलीस, हेक्टर, इ. मेन लोकांच्या शस्त्रास्त्रांचे जरा तपशीलवार वर्णन असते. मग युद्धभूमीवर जाताना एकगठ्ठा समुदाय कसा दिसतो त्याचे विविध उपमा देऊन वर्णन. मग सैन्य एकमेकांना भिडते त्याचे वर्णन-उपमांसहित. त्यात आधी दोन्ही बाजूंचे लीडर आपापल्या बाजूला चेतवतात भाषणे देऊन. अन एकदा सैन्याला सैन्य भिडले, की मग कापाकापीचे जेनेरिक वर्णन, दाणे तुडवल्यागत मृतदेह तुडवू लागणे इ.इ. अन मेन मेन योद्धे एकमेकांना भिडले की त्यांचे जाबसाल अन मग मारामारी. अधूनमधून देवही आहेत काड्या करायला बरेच. मी वर्णने लिहिताना अ‍ॅडिशनल भाग बराच काटछाट करून लिहिलाय. अन वर्णन खूप ग्राफिक आहे इतके मात्र खरे. याचे कारण मला वाटते कल्चरल फरकामध्ये आहे. दोन्ही युद्धे तितक्याच चिरडीने झालेली असणार, पण ग्रीसमध्ये 'संस्कृतायझेशन' हा प्रकार तितका दिसत नाही. आपल्याकडेही पहिल्यांदाचे मौखिक महाभारत असेच असावे. नंतर त्याचे संस्करण करता करता ब्राह्मणीकरण जास्त झाले असावे. किंवा हेही असेल की मुळातूनच इतके ग्राफिक वर्णन नसावे. याचे अजून एक कारण सांगता येईल की ट्रोजन युद्ध सगळेच्या सगळे एकदम जवळून घडलेले आहे. महाभारतातले मुख्य पराक्रमी वीर भीमादि काही अपवाद वगळता सगळे धनुर्धारी होते त्यामुळे लढाई तशी 'gory' वाटत नाही हाही एक मुद्दा आहेच. भीमासारखे राउंडात उतरून हाणाहाणी करणारे कौरव वीर क्वचितच दिसतात, त्यामुळे हातघाई त्या प्रकारची दिसत नाही. याउलट आपल्याकडे शस्त्रे, युद्धपद्धती, इ. चे जितके सोफिस्टिकेशन दिसते तितके होमरमध्ये दिसत नाही. अंमळ जास्त प्रिमिटिव्ह आणि रासवट प्रकार आहे तो.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 02/06/2014 - 12:03

In reply to अर्रे हो!!!! आत्ता आठवलं. by बॅटमॅन

Permalink

बॅट्ञा शेवटी महाभारत म्हणजे

बॅट्ञा शेवटी महाभारत म्हणजे काय तर वैशंपायन ऋषींनी जन्मेन्जयाला सांगितलेल्या कथेचे दुसर्‍या कोणीतरी केलेले लेखन. मुळात वैशपायनांनी जन्मेन्जयाला तेवढेच सांगितले जे त्याच्या आज्याच्या, पणज्याच्या आणि पणज्याच्या भावांच्या अनुषंगाने येते. इथे लक्ष्मण आणि दौशासनीचा उल्लेख येतो कारण एकाला अभिमन्युने मारले (लक्ष्मण) तर त्याच युद्धात दुसर्‍याने (दौशासनी) अभिमन्युला मारले. जर तसे नसते तर त्यांचाही उल्लेख कदाचित आला नसता. बाकी शंभर कौरवांपैकी ८९ लोकांचा उल्लेख केवळ मरण्यापुरता (आणि इतर १-२ परिच्छेदापुरता) येतो. तिथे बाकीच्यांचा काय पाड?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/06/2014 - 12:20

In reply to बॅट्ञा शेवटी महाभारत म्हणजे by मृत्युन्जय

Permalink

हो, तेही आहेच म्हणा. बहुतेक

हो, तेही आहेच म्हणा. बहुतेक कौरव तसे मायनर क्यारेक्टरच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 02/06/2014 - 11:58

In reply to दुर्योधनपुत्र लक्ष्मणाचा वध by प्रचेतस

Permalink

च्यामारी...

उलटच झालं म्हणा कि... =)) आपल्या मुलीचा विवाह लक्ष्मणाशी करावा अशी बलरामाची इच्छा होती, पण अभिमन्युने तिला पळवलं. त्याचा बदला लक्ष्मणाने घेतला अशी ष्टोरी ऐकली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/06/2014 - 12:13

In reply to च्यामारी... by अर्धवटराव

Permalink

नाय नाय.

=)) नाय नाय. सुभद्रेचा विवाह हा दुर्योधनाशी व्हावा अशी बलरामाची इच्छा होती असा सर्वसाधारण समज आहे पण प्रत्यक्ष महाभारतात असे नाही. बाकी अभिमन्यूने कुणालाही पळवले नाही. त्याचा विवाह विराटकन्या उत्तरेशी होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 02/06/2014 - 12:15

In reply to नाय नाय. by प्रचेतस

Permalink

महाभारतात नाही. पण हा उल्लेख

महाभारतात नाही. पण हा उल्लेख की बलरामाला त्याच्या मुलीचे लग्न लक्ष्मणाबरोबर करायचे होते आणि तिला अभिमन्यु पळवुन नेतो हा उल्लेख हरिवंशात आहे बहुधा. ही कथा नक्की वाचली आहे. कुठे ते अगदी नक्की नाही आठवत ब्वॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/06/2014 - 12:19

In reply to महाभारतात नाही. पण हा उल्लेख by मृत्युन्जय

Permalink

हरिवंश बघायला लागेल पण निदान

हरिवंश बघायला लागेल पण निदान अभिमन्यूला तरी एकच पत्नी होती आणि ती म्हणजे विराटकन्या उत्तरा हे अगदी नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल मेंढे on गुरुवार, 02/06/2014 - 14:17

In reply to अतिअवांतरः दुर्योधन, दु:शासन by बॅटमॅन

Permalink

ऐकलीत...

दुर्योधन नाव आहे आणि आड्नाव सुद्धा..
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 02/05/2014 - 20:03

Permalink

अतिशय आवडलंय. तू लिही रे अजून

अतिशय आवडलंय. तू लिही रे अजून, तुझे महाभारतावरचे लेख वाचताना गुंग होवून जायला होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 02/05/2014 - 22:24

Permalink

विनंती

किसनरावांप्रमाणेच म्हणतो की महाभारतावर आणखी लिहा. वाचायला खूप आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 02/05/2014 - 22:38

Permalink

सुरेख!

मस्त लिहिलंय!!! दुर्योधनाचं व्यक्तिचित्रण आवडलं!! कौरव आयुष्यभर अनीतीने जगले तेंव्हा जिंकले; पण नीतीने लढले तेंव्हा हरले... पांडव आयुष्यभर नीतीने जगले तेंव्हा हरले; पण अनीतीने लढले तेंव्हा जिंकले... सारांश काय, नीती सर्वत्र वर्ज्ययेत!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 02/05/2014 - 22:48

In reply to सुरेख! by पिवळा डांबिस

Permalink

कौरव आयुष्यभर अनीतीने जगले

कौरव आयुष्यभर अनीतीने जगले तेंव्हा जिंकले; पण नीतीने लढले तेंव्हा हरले...
भीष्ममृत्युपर्यंत युद्ध नियमांना धरून चालू होते पण नंतर नीती सर्वांनीच सोडून दिली.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/05/2014 - 22:45

Permalink

दुर्योधनाचीही बाजू!!!

दुर्योधनाचीही बाजू!!! मस्त आवडली. त्याच्या संदर्भात हा श्लोक फेमस आहे तो आठवला. "जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति: जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति: केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि || "
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Wed, 02/05/2014 - 22:51

Permalink

test tube baby

सलग २ वर्षे गर्भ धारण करुनही जेव्हा मूल झाले नाही तेव्हा गांधारीने स्वत:चे पोट फाडले त्यातुन केवळ एक मांसाचा गोळा बाहेर पडला. व्यासांनी स्वप्रतिभेने त्या गोळ्याचे १०१ तुकडे केले आणी माठांमध्ये भरुन ठेवले. त्या १०१ मधला सर्वात मोठा हा दुर्योधन. इतर सगळे एकेक महिन्याच्या अंतराने जन्मले.
हे test tube baby चे उदाहरण आहे की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 02/05/2014 - 23:01

In reply to test tube baby by आयुर्हित

Permalink

अर्थातच!

हे टेस्टट्यूब-बेबी वगैरे हे सगळं आपल्याकडे पुराणकाळापासून होतंच! फक्त त्या काळी टेस्ट्-ट्यूब्ज नसल्यामुळे हे मांसाचे तुकडे चिनीमातीच्या बरणीत भरून ठेवत असत. आणि त्या मुलाना "बरणी-बेबीज" म्हणत असत!!!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/05/2014 - 23:23

In reply to अर्थातच! by पिवळा डांबिस

Permalink

चिनीमाती वैग्रे महाभारतकाळी

चिनीमाती वैग्रे महाभारतकाळी नव्हतं हो. तेव्हा चीनवालेच आपल्याकडून भारतमाती घ्यायचे ;) अन बरणीबेबीज असल्यानेच स'त्पात्र' असे म्हटले जायचे ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com