कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१)
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२)
तुरुंगाचा दरवाजा उघडला आणि मी बाहेर पडलो. बरोबर १३ वर्षे आत होतो. अजूनही आठवतोय मला तो दिवस. अगदी काल परवा घडलेल्या घटने सारखा.
पोलीसांनी अटक केली होती तेव्हाच मी माझा गुन्हा काबुल केला होता. त्यामुळे जास्त काही तपासणीची गरजच न्हवती. सक्त मजुरीची शिक्षा, कशासाठी? पत्नीच्या खुनासाठी , सदोष मनुष्यवधाच्या आरोप.खरं तर १४ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. पण चांगल्या वागणुकीमुळे १ वर्ष माफ केलं म्हणे.
हं म्हणे चांगली वागणूक. आत्ता कितीही चांगली वागणूक असली तरी त्याच्या काहीच उपयोग नव्हता. मी असा कसा वागलो.
शिक्षेच्या निर्णय देण्या आधी जज्ज साहेबांनी विचारलं, " तुम्हाला काही सांगायचे आहे?". काय सांगणार होतो मी. त्या खुनाच्या दिवसा पर्यंत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून जगणारा मी त्या दिवशी असा क्षणिक मोहाला का बळी पडलो हे कसे सांगणार?. माझ्या मनाची अवस्था कितीही जीवाचा आकांत करून सांगितली तरी त्याला या व्यावहारिक जगात काय स्थान होतं?.
.....त्या दिवशी सानिकाने मला हात हातात घेवून तनयाची शपथ घ्यायला लावली आणि अनामिकाला हाक मारली. ती आली तेव्हा माझा हात डाव्या हातात घेवून अनामिकाचा हात उजव्या हातात घेतला.
नंतर तो हात माझ्या हातात देवून म्हणाली, " तुम्ही दोघांनी होकार दिलाय आता मला कसलीच काळजी नाही".
आम्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं खूप अवघडल्या सारखं झालं होतं.
त्या दिवसा नंतर सगळं बदललं होतं. मी माझा राहिलो नव्हतो. अनामिका आणि मी आमच्या दोघांत एक वेगळी दरी निर्माण झाली होती. होता होईल तो ती माझ्या समोर येण्याचे टाळत होती. पुढचे कित्येक दिवस रोजच्या दैनंदिन व्यवहारात मग्न होतो. पण गेले ३/४ महिने सानिकाचे करण्यात जो आस्थेपणा होता तो जावून त्याला एक प्रकारचा यांत्रिकपणा आला होता.
हळूहळू मी स्वत:हावर चिडायला लागलो होतो. मनात नाही नाही ते विचार यायले लागले होते. गेले चार महिने मी माझ्या इच्छा , आकांक्षा यावर विजय मिळवला होता. पण आता घुसमटायला झालं होतं. मन कितीही रितं केलं तरी पुन्हा पुन्हा तेच. डोकं भंजाळुन गेलं होतं. मेंदूच्या ज्या भागात या तरल संवेदनांच्या लाटा उमटंत होत्या त्या भागाला ठेचून टाकावंस वाटत होतं.
कधी s s s s कधी येणार तो दिवस ? रोज सकाळी उठल्या नंतर मोठ्या अधीरतेनं तिच्या रूमकडे धावायचो. ती कधी आढ्याकडे शुन्य नजर लावून पडून असायची, तर कधी शांत झोपलेली असायची.
त्या रात्री सानिका थोडी लवकर झोपली. औषधामुळे कदाचित ती गुंगीत होती. बस्स!! आता दीर्घकाळ वाट बघण्याला अर्थ नव्हता. केलं तर आत्ताच नाहीतर कधीच नाही. मी बाजूला असलेली उशी घेतली आणि तिच्या तोंडावर दाबली. एक क्षीण जगण्याची धडपड मग सारं शांत. वातावरणात एक अस्फुट किंकाळी फुटली. मी मागे वळून पाहिलं दारात अनामिका उभी होती. ती तिथेच कोसळली.....
छ्या आता हे जीवन नकोसे वाटतंय . क्रोधाग्नी आणि कामाग्नी दोन्ही वाईटच. आणि विषयाचा किडा एकदा वळवळु लागला कि कसलंच भान नाहि रहात.सालं माणसाने कितीही माणुसकीची झूल पांघरली, मनुष्यत्वाची प्रौढी मिरवली तरीही तो रानटीच. बाकी नैतिकतेच्या सर्व कल्पनाच. या नैतिकतेच्या झग्यातुन नागडेपणा अलगद बाहेर झिरपला कि नाती दोनच ऊरतात नर आणि मादी. मग मनातंली भावाना मेदूंच्या विचारांवर वर्चस्व गाजवायाला लागते आणि परिस्थीती हाताबाहेर जाते.
तनया आत्ता मोठी झाली असेल. तिच्या आणि अनामिकाच्या मनात मला जागा असेल काय? अनामिकाने तिला सर्व काही खरं सांगितलं असेल काय? आणि जर सांगितले असेल ती मला माफ करेल कि पराकोटीचा तिरस्कार असेल तिच्या मनात ?
"काही तरी कमवण्यासाठी काही तरी गमवावे लागते" असे म्हणतात. मग मी तर सारंच गमावून बसलो होतो काहीच न कमावता.
आणि तिने भलेही माफ केले असलं तरी मी स्वतःला कधी माफ करु शकेन का?. तुरुंगात असताना कित्येक रात्री मी आतल्या आत ढसाढसा रडलो होतो हे कोणाला सांगितलं तरी विश्वास कसा बसणार होता कोणाचा?.
अंह आता घरी परतण्यात काहिच अर्थ न्हवता. मी टॅक्सीला हात केला. आत बसताच त्याने कार टेप चालू केला. सुधीर मोघेंच्या दर्दभरी बंदिशातले बोल मला माझे भवितव्य सांगू लागले....
"अरे, जन्म बंदिवास
सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास आता
बंदी तुझा मी"
मी कायमचा बंदी झालो होतो परिस्तिथीचा, विचारांचा की ......
मी हरलो होतो. त्यांच्या जीवनातील वर्तुळ परिघालाही मला स्पर्श करायाचा नव्हाता. त्यांच्या पासुन मी दूर दूर जात होतो. कुठे? ते मला तरी कुठे माहित होतं....
समाप्त.
.
प्रतिक्रिया
27 Dec 2013 - 10:45 am | जेपी
भन्नाट कलाटणी .वाटल नव्हत असा शेवट होईल .
27 Dec 2013 - 10:53 am | खटपट्या
शेवट वेगळा पण चटका लावून जाणारा आहे. छान लिहिले आहे.
दुसरा भाग कधी आला कळलाच नाही. असो दुसरा आणि तिसरा भाग एकदम वाचले.
कळव्याला आलो कि भेटेन एकदा तुम्हाला
27 Dec 2013 - 11:08 am | प्रमोद देर्देकर
जरुर जरुर अगदी अवश्य या. आपण कोठे असता नाही म्हणजे ५/६ जाने. ला मु.वि. साहेब आणि डॉ.खरे साहेब ठाणे कट्ट्याची तयारी करत आहेत. तेव्हा तेथे भेटूया.
27 Dec 2013 - 11:18 am | खटपट्या
काय सांगता ?? … माझी संधी हुकणार.
दुर्दैवाने मी भारतात नाही आहे.
खरे साहेबांचा तर मी फ़ैन आहे. मुविंची सुद्धा ओळख झाली असती…
27 Dec 2013 - 2:08 pm | दिपक.कुवेत
शेवटची कलाटणी एकदम अनपेक्षीत. बाय द वे तुमच्या ट्रिपचं फायनल झालं का?
27 Dec 2013 - 3:25 pm | प्रमोद देर्देकर
म्हणजे माझी काश्मीर ट्रिप म्हणताय काय? ती मी मे महिन्यात आखली आहे. कारण माझे वयस्कर सदस्य म्हाणातात की बर्फात त्यांना झेपणार नाही.
27 Dec 2013 - 3:27 pm | बॅटमॅन
आयला ट्विस्ट का काय तो. जबराटच!!!
28 Dec 2013 - 3:22 am | मुक्त विहारि
मस्तच
28 Dec 2013 - 5:01 pm | आतिवास
कथेचे आधीचे दोन भाग नजरेतून सुटले होते. तिन्ही भाग सलग वाचले. कथा आवडली. साध्या सोप्या आणि ओघवत्या भाषेत लिहिले आहे हे विशेष आवडले.
30 Dec 2013 - 10:44 am | प्रमोद देर्देकर
तथास्तु, मुक्त विहारि ,आतिवास, बॅटमॅन , दिपक.कुवेत, खटपट्या तुम्हा सर्वांना धन्स.
आता नविन वर्षात अजुन एक नविन कथा घेवुन येत आहे.
12 Feb 2014 - 3:27 pm | आनन्दा
मी हरलो, हे कळलं.. पण मी जिंकलो कसं ते मात्र कळले नाही..