मी
मी घरी आलो तेव्हा सानिका पलंगावर शांतपणे झोपली होती. डोळे खोल गेलेले, डोळ्याखाली काळी वर्तुळे, निस्तेज कांती , शुष्क लांबसडक बोटे. मला लग्नापूर्वीची सानिका आठवली. निमगोरी , सतेज कांतीची , पाणीदार डोळ्याची सतत हसत, खेळकर असणारी सनिका आज विवशपणे पलंगावर झोपली होती.
माझी चाहूल लागताच तिने डोळे उघडले, क्षीण हसली हळु आवाजात मला म्हणाली
"अहो ऐकलंत का ?"
"हंम बोल "
"मी इतके दिवस जे तुम्हाला सांगतेय त्याच्या काही विचार केलाया का तुम्ही? "
"नाही"
"हे पहा मला नाही वाटत की आता मी फार दिवस काढे… "
मी तिच्या तोंडावर हात ठेवला, " अंह असे नाही म्हणायचे."
माझ्या हातावर स्वता:हाचा हात ठेवत ती मला म्हणाली,
"अहो जे घडायचे आहे ते घडणारच त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. मला सारे कळले आहे ."
"काय"
" की मी आता काही दिवसाची सोबतीण …"
" शु..त सानिका काय हे; डॉक्टरांनी तुला विश्रांती घ्यायला सांगितली आहे ना? मग तू फक्त पूर्ण विश्रांती घे आणि सकारात्मक विचार कर. हे भलते सलते विचार तू मनात का आणतेस? "
"तुम्ही रिपोर्ट दाखवलेत डॉक्टरांना "
"हो"
"मग काय म्हणाले डॉक्टर ."
" … "
"सांगाना"
" की तू पूर्ण खडखडीत बरी होणार आहेस."
" खोटं "
" तुला काय माहित तू काय डॉक्टर आहेस?"
" मग असे माझ्या कडे बघून सांगा"
मला धीर झाला नाही. मी उठुन खिडकीत गेलो. माझी नजर बाहेर दुरवर उडणार्या पक्षांना घरट्याकडे परतताना पहात होती. मनात मात्र तिने केलेल्या मागणीचा विचार चालला होता. गेले तीन महिने ती मला विनवीत होती की, तिच्या जाण्यानंतर मी तिच्या लहान बहिणीशी अनमिका बरोबर लग्न करावे.
अनामिका म्हणजे सानिकाची सावलीच जणू, ही निमगोरी तर ती गव्हाळ वर्णाची एवढं एक सोडलं तर दोघींमध्ये तसा काहीच फरक नव्हता. गेले तीन महिने अनामिका आमच्याकडे येवून राहिली होती. माझी नोकरी, सानिकाला दवाखान्यात नेणे आणणे, तिचे पथ्यपाणी, आणि त्यात तनयाची शाळा यातच माझा सगळा वेळ जावू लागला. तेव्हा सानिकाने अनामिकाला इकडे बोलावून घेतले होतं. तनयाचे सगळं आता तीच करत होती. त्यामुळे माझी होणारी धावपळ थोडी कमी झाली आणि मला तेवढा वेळ सानिकाला देता आला.
मला अनमिका आवडत नव्हाती असे काहिच नव्हते पण तिच्या बरोबर लग्नाला मी कसा बरे तयार होवु?
आणि "तनया" हे एकमेव कारण असले तरी लोकांसाठी तो एक चर्चेचा विषय झाला असता. दुसरे असे की तिचीही काही स्वप्ने असतीलच, तिला मी बीजवर कसा बरे चाललो असतो? तिच्या लग्नासाठी घरच्यांच्या खटपटी चालूच होत्या. हे सगळे काय सानिकाला माहित नसेल. मग का मला ती अनामिकेशी विवाह करायला भाग पाडत होती? काळ हे सर्व गोष्टींवर चांगले औषध आहे. हळूहळू तनयाला आईच्या नसण्याची सवय होईलच. या सगळ्या विचारात असताना माझी तंद्री लागली होती ती सानिकाच्या खोकल्यामुळे तुटली. मी चटकन तिच्या पलंगाजवळ गेलो.....
सानिका
हे डॉक्टारंकडून आले तेव्हा मी जागीच होते. पण डोळे मिटून पडले होते. खरे तर मी त्यांना सकाळीच सांगितले होते की तुम्ही डॉक्टारांकडे जावु नका मला माहिती आहे ते काय सांगणार आहेत ते. माझ्यासाठी होणारी यांची धावपळ बघुन माझा जीव कासावीस होत होता. हल्ली ते माझी नजर सुद्धा टाळत होते. मी समजुन चुकले होते माझे आता फार दिवस राहिले नाहियेत हे ह्यांना समजले होते पण मला ते कळु नये म्हणुन पराकाष्ठेचा प्रयत्न करत होते.
पहायला आले होते तेव्हा त्यांची काय ऐट होती. रुबाबदार चालणे, मंद हसणे, प्रत्येकचा आदर राखणे, आत्मविश्वासाने बोलणे.
बघायला ते मला आले होते पण मीच त्यांना पहिल्या भेटित मनोमन पसंद केले होते. अनामिका मला चिमटा काढात म्हाणाली होती " बघ ताई तुला पसंद नसेल तर तसे सांग; मी हा चहाचा ट्रे घेवुन बाहेर जाते".
वेडी एवढ्या उमद्या तरुणाला मी नाकारु कशाला? मी बाबांना मुलागा पसंद आहे हे लगेच सांगुन टाकले.
लग्नानंतरची पहिली दोन वर्षे कशी निघुन गेली ते कळलेच नाही. नंतर तनयाच्या येण्याने तर ह्यांना अस्मान ठेंगणे झाले. गोड गोड बाहुलीच्या बोबड्या बोलीने घर कसे आनंदाने भरुन गेले. सुखाच्या अती उंच झोपळ्यावर झुलत असताना एक दिवस अचानक दुःख चोर पावलाने आत शिरले.मला चक्कर आली आणि मी कोसळले. ह्यांच्या आग्रहाखातर मी सर्व चाचण्या केल्या आणि एका असाध्य रोगाने माझे शरीर पोखरले आहे असे समजले.
शहरातील असतील तेवढे सगळे डॉक्टर , वैदू, हकीम यांच्या उपचाराचा माझ्यावर सपाटाच लावला. बँकेतला पैसा संपला तेव्हा गावातली जमीन विकून पैसा उभा केला. पराक्रमाची शर्थ केली पण कशाचाच उपयोग झाला नाही. हा रोगच मेला असा काही चिवट होता की मला त्याने अंथरूण धरायला लवले.
मग मीही मनाची तयारी केली. यांची होणारी तगमग मला पाहवत नव्हती. मी निर्णायक होण्याचे ठरवले. आधी अनामिकाला बोलावून घेतले. तिच्याशी बोलले, तिचे मत जाणून घेतले विचार करून सांगते म्हणाली , दोन दिवसांनंतर लग्नाला तयार आहे असे म्हटली . मग आईबाबांना फोनवरून तसे कळवले सुरवातीला तेही नकोच म्हणत होते पण अनामिका तयार आहे म्हटल्यावर त्यांचाही विरोध मावळला. आता मला ह्यांना तयार करायचे होते. खिडकीत उभे राहून ते कुठे तरी हरवून गेले होते. कदाचित माझे जाणे त्यांच्या पचनी पडत नसावे आणि त्यातून मी गेल्यानंतर माझ्या बहिणीशी लग्न करा हा माझा हट्ट.
स्वतः साठी नको पण तनया साठी तरी त्यांनी लग्न करावे असे मला वाटत होते. मला त्यांच्याकडुन तशी संमती फक्त एकाच गोष्टीने मिळणार होती. मी पलंगावर उठून बसण्याच्या तयारीला लागले पण तेवढ्या प्रयत्नाने सुद्धा मला धाप लागली. मला खोकल्याची उबळ आली तेव्हा ह्यांची तंद्नी भंगली, आणि हे माझ्या दिशेने धावले...
क्रमांश....
प्रतिक्रिया
10 Dec 2013 - 2:06 pm | इरसाल
सानिकाच्या जागी अनामिका झालेय.
11 Dec 2013 - 8:22 am | प्रमोद देर्देकर
धन्स , आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत.
10 Dec 2013 - 2:08 pm | आनंदराव
खरच! नियती पन असा काही पेच निर्मान कर्तते की मेन्दु कामच करतनाही. अशा वेलेला नियती वर सोदुन द्यावे अनी जे जे होईल ते ते पहावे.
18 Dec 2013 - 4:09 pm | आंबट चिंच
खुप छान! पुढील भाग येवु दे लवकर.
18 Dec 2013 - 4:32 pm | आनन्दा
बहुध मला शेवट कळला आहे..वाट पाहतो.
18 Dec 2013 - 4:51 pm | प्रमोद देर्देकर
माग मला व्य.नि. कराल काय कारण जर कुणाला आधीच माहित असेल तर शेवट बदलतो.
18 Dec 2013 - 10:49 pm | शैलेन्द्र
हे आवडलं बघा आपल्याला..
18 Dec 2013 - 5:14 pm | मुक्त विहारि
पु.भा.प्र.
19 Dec 2013 - 11:25 am | खटपट्या
मस्त पम्या