14 जुन ला इराणच्या नवीन म्हणजे ११ व्या अध्यक्षांसाठी निवडणुका झाल्या. इराणी जनतेने भरभरून मतदान केले. पाच कोटी पाच लाख मतदारांपैकी घसघशीत ८०% मतदारांनी मतदान केले. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकी पेक्षा प्रचंड मतदान झाल्याने इराण मध्ये लोकशाही नाही असे म्हणणा-यांची तोंडे काही काळासाठी तरी बंद झाली होती. अमेरिकेच्या निवडणुकीत ५०% च मतदान झाले होते. निवडून आलेल्या हासन रोहानी यांना ५०% हून थोडे अधिक मतदान झाले. रोहानी अध्यक्ष होणार हे समजल्यावर इराणी जनतेने एका अर्थाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. कारण इराणी जनता आता एकूणच त्यांच्या सद्य परिस्थितीला पकली आहे. विशेषत: इराणी उद्योजक जमात निर्बंधांमुळे पार भंजाळलेली आहे. कधी एकदा अहमदेनिजाद घरी बसतील याची वाट सगळे बघत होते. अहमदेनिजाद यांच्या मुळे इराण दहशतवादी राष्ट्र आहे असा सगळ्या जगाचा समज झाला असे इराणी जनतेला वाटते. या नव्या परिचयाची इराणी जनतेला लाज वाटते. एका बाजूला निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर वावरताना प्रचंड अडचणींना सामोरे जाताना दुस-या बाजुला इराणी जनतेचे मनोबल त्यांना दहशतवादी ठरविल्यामुळे काहीसे खचले आहे. आणि या जंजाळातून इराण्यांना बाहेर पडण्याचा हासन रोहानी हा एकमेव मार्ग दिसत होता. इराणी जनतेलाच नव्हे तर विशेषत: पाश्चिमात्य राष्ट्रांनासुद्धा रोहानी इराणचे अध्यक्ष होण्याने कदाचित जगाचा इराणकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असे वाटत होते. पाश्चिमात्य देशांचे वागणे बोलणे थॅचर बाईंचे आठवण करून देणारे होते. मार्गारेट थॅचर बाईंनी १९८४ साली मिखाईल गोर्बोचेव्ह या सोव्हिएत युनियनमध्ये उदयाला येणा-या नवीन नेत्या विषयी "Can do Business together" असा जो अंदाज बांधला होता आणि तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांना त्यांची रशियाकडे बघण्याची दृष्टी आता रेगन यांनी बदलावी असा सज्जड संकेत दिला होता.बाईंच्या त्या विधानाने जगभर खळबळ उडवून दिली होती. याचीच आठवण व्हावी असा समस्त पाश्चिमात्य राष्ट्रांचा होरा होता. रोहानी यांनी त्यांना तसे भूलावावे याला कारणेही तशीच आहेत. रोहानी यांचा आण्विक इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे, पाश्चीमात्यांबरोबर बोलताना आवश्यक असणारी नरमाई त्यांच्या कडे आहे जी अहमदेनिजाद यांच्या कडे अजिबात नव्हती, यशस्वीपणे शिष्टाई करण्याचे अजब कसब त्यांच्या कडे आहे, कठीण प्रसंगी थोडे नमते घेण्याचे धाडस ते दाखवू शकतात. उदाहरणार्थ २००३ ते २००५ या तब्बल दोन वर्षात त्यांनी इराण मधले युरेनियमच्या समृद्धी करणाचे कारखाने बंद ठेवले होते इत्यादी. त्यामुळे पाश्चिमात्य जगाच्या दृष्टीने सुद्धा रोहानी यांच्या कडे इराणची सूत्रे जाणे सोयीचे होते.
पण निवडून आल्यावर हासन रोहानीं ४ ऑगस्ट रोजी इराणचा ११वा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याच्या आठ दिवस आधी पासून म्हणजे रविवार दि:२८ जुलै पासून अशा काही घटना वेगळ्या पातळ्यांवर घडत गेल्या की इराणी जनतेच्या आशेवर बॉम्ब पडतो की काय अशी शक्यता निर्माण झाली.
मे २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने आपल्या एका पत्रकामध्ये इराणची एक जोरदार तक्रार केली होती की इराण ब-याचदा बजावून सुद्धा त्यांच्या नंताझ गावाजवळील युरेनियम समृद्ध करण्याच्या मुख्य कारखान्यात इराणने स्वत: बनविलेले IR -2m नावाचे घाणे ( Centrifuge Machines ) दामटून बसवतो आहे. २८ जुलै रोजी मावळते राष्ट्राध्यक्ष श्री अहमदेनिजाद यांनी इराण टीवी ला मुलाखत देऊन सांगितले की आम्ही पाच हजार घाणे बसविले आणि ताबडतोब कार्यान्वित करत आहोत. आणखी बारा हजार घाणे या आधीच कार्यान्वित केले आहेत.
बुधवारी ३१ जुलै रोजी अमेरिकन कॉंग्रेसने एक इराण विषयक बिल मंजूर केले. हे बिल एका अदभुत कायद्याचा पहिला टप्पा असेल. असा कायदा ज्यामुळे इराणची तेलाची निर्यात शुन्य टक्के होईल. ( Zero Export Of Oil ). या कायद्यान्वये भारत, चीन, कोरिया आणि जपान यांना इराणकडून तेल आयात बंद करण्यास भाग पाडता येईल असा डाव अमेरिकेचा आहे. भारताने या आधीच आपण आपली इराण कडून होणारी आयात कमी केल्याचे अमेरिकेला सांगितले आहे आणि ती आता ४६% इतकी खाली आणली आहे याची कबुली दिली आहे. अन्य राष्ट्रांनी सुद्धा तशी कार्यवाही केली आहे. इराणला अजिबात परकीय चलन मिळता कामा नये जेणे करून इराण आपल्या आण्विक कार्यक्रमाला अर्थ पुरवठा करू शकणार नाही अशी अमेरिकेची धारणा आहे.
१९७९ साली इस्लामी क्रांती इराण मध्ये झाल्यावर इराणचे सर्वोच्च नेते बनलेले आयातुल्ला खोमेनी यांनी पॅलेस्टाइनच्या लढ्याला पाठींबा देण्यासाठी आणि त्यांच्या आपण सदैव पाठीशी आहोत हे दाखविण्यासाठी जगभरच्या मुस्लिमांना पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी अल-क्वोद्स दिवस पाळायची हाक दिली. जगभरचे मुस्लिम या दिवशी इस्त्राइल सरकारच्या विरोधी निदर्शने करतात आणि झीऑनवाद्यांनी म्हणजे ज्यूंनी पॅलेस्टाइनच्याभूमीतून - मुख्यत: जेरुसलेम मधून निघून जावे असा आदेश देतात. अल-क्वोद्स हे जेरुसलेम चे अरबी नामाभिदान आहे. या चळवळीचे मूळ इराण असल्याने शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी तेहरानमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. वातावरण प्रचंड तापले होते. इराणचे सर्व राजकीय नेते रस्त्यावर होते आणि दोनच दिवसांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणा-या हासन रोहानीयांनी अमेरिका, इग्लंड आणि त्यांच्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांच्या शेपटीवर पाय देऊन त्यांची खोड काढली. हासन रोहानी यांनी इराणी जमावासमोर केलेल्या त्वेषपूर्ण भाषणात आश्चर्यकारकरित्या इराणी री ओढली. त्यांनी दणक्यात सांगितले की जेरुसलेमवर इस्त्राइलने केलेले अतिक्रमण हे जगभरातल्या समस्त मुस्लिम बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे आणि ते आम्ही खपवून घेणार नाही. याचा सरळ अर्थच असा आहे की इस्त्राइल हे इस्त्राइल च्या जागेत वसणे आम्हाला मान्य नाही. …इस्त्राइलला त्या जागेतून पुसून टाका.
या तीन ही एका आठवड्यात घडलेल्या घटनांनी इराणी जनता अस्वस्थ आहे आणि आता काही बदल घडेल या त्यांच्या स्वप्नाचा चुराडा होईल अशी भीती त्यांना वाटते आहे. त्यांची उमेद हरवते आहे असे त्यांना वाटते आहे. कारण समस्त जगाने त्यांना बहिष्कृत करणे हे " इस्त्राइलला जगाच्या नकाशातून पुसून टाका" या वल्गनेतून दिसणा-या त्याच्या मुळेच घडले आहे. इराणचा अणु उर्जा प्रकल्प दामटण्याचा प्रयत्न हा या वल्गनेच्या कार्यवाहीचा भाग आहे असे समस्त जग विशेषत: अमेरिका आणि त्यांची दोस्त राष्ट्रे मानतात. आणि म्हणून इराणच्या आण्विक कार्यक्रमाला त्यांचा विरोध आहे. पण अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता आपला आण्विक कार्यक्रम चालू ठेवण्याच्या इराणच्या निग्रहामुळे इराणला जगाने बहिष्कृत करायचे ठरविले आहे.
इराण आणि इस्त्राइल मधल्या परस्पर संबंधानीच इराणची आजवरची परिस्थिती ठरवली आहे . सद्य स्थिती आणि इराणचे भविष्य ठरविण्याची किमया फक्त आणि फक्त त्यांचे इस्त्राइलशी असणा-या संबंधाच्या दर्जावर ठरणार आहे. अगदी गळ्यात गळा नव्हे पण इस्त्राइलबरोबर सलोख्याचे सबंध ठेवल्याशिवाय इराणला शांतपणे जगणे अशक्य आहे. निर्बंधांच्या राजकारणात इराणचा आण्विक कार्यक्रम हे निमित्त आहे. इराणवरच्या वक्रदृष्टीचे कारण जसे इराणच्या इस्त्राइल बरोबर असणा-या गुंतागुंतीच्या सबंधांमध्ये दडलेले आहे तसेच ते इराणच्या अंतर्गत राजकीय व्यवस्थेमध्ये ही आहे.
जे आगीत तेल ओतण्याचे काम इंग्रजांनी इथे भारतात स्वातंत्र्यापूर्वी केलं तेच पॅलेस्टाइनच्या बाबतीतही १९४७ मध्ये केलं. पॅलेस्टाइनची फाळणी सुचवली. एक भाग ज्यूंचा ज्यामध्ये मुख्य म्हणजे जेरुसलेम होते आणि दुसरा भाग तिथल्या मुस्लिमांना. या सुचनेवर चर्चा करण्यासाठी अकरा देशांची समिती बनवली. त्यात भारत,इराण आणि युगोस्लावियायांनी फाळणीच्या विरोधी मते मांडली. उर्वरीत आठ देशांनी फाळणीची तरफदारी केली. १९४८ साली इस्राइल हे ज्यूंचे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं. तत्कालीन इराणचे राजे शहा मोहंमद रझा पहलवी यांनी इस्राइल हे राष्ट्र म्हणून अमान्य केलं. अधिकृत पणे इराणचा इस्राइलला विरोध असला तरी वैयक्तिक पातळीवर दोनही देशांचे सबंध सलोख्याचे होते. इस्राइल च्या लष्कराने इराणला अफाट मदत केली. प्रोजेक्ट पुष्प सारख्या प्रकल्पातून समुद्रातून समुद्रात डागता येणारी क्षेपणास्त्रे इस्राइलची इराणला मोठी देणगी होती. पण इराणची जगप्रसिद्ध इस्लामिक क्रांती १९७९ साली झाली आणि शहा मोहंमद रझा पहलवी यांची सत्ता आयतुल्ला खोमेयनी स्थानिक लोकांच्या मदतीने भिरकावून दिली. आयतुल्ला खोमेयनी १९७९ सालानंतर इराणचे सर्वोच्च नेते झाले. त्यांनी त्यांच्या खाली धर्म मंडळ आणि त्या खाली अध्यक्षीय म्हणजे लोकशाही अशी एक विचित्र राजकीय व्यवस्था अंमलात आणली. सर्वोच्च नेता बनल्यावर त्यांनी पहिले काम केले असेल तर इस्राइल हा आमचा नंबर एक चा शत्रू आहे अशी जगभर दवंडी पिटवली. इस्राइल हा छोटा राक्षस असून अमेरिका हा मोठा राक्षस आहे अशी चित्तथरारक विधानेकरून इराणच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली. आजवर इराणचे आंतरराष्ट्रीय राजकारण या एकाच मुद्द्यावर गोल गोल फिरते आहे आणि त्याचा त्यांच्या अतर्गत व्यवस्थेवरही त्यामुळे भयंकर परिणाम झाला आहे. इस्त्राइल आपल्या मातब्बर दोस्त मंडळींच्या मदतीने जशास तसे उत्तर देण्याच्या नादात इराण मध्ये आणि आजूबाजूच्या मुस्लिम आणि अरब राष्ट्रांमध्ये हिंसक धुमाकूळ घालतो आहे. इराण आजूबाजूच्या राष्ट्रांना क्षेपणास्त्रे आणि अन्य हत्यारे देऊन इस्त्राईलला संपविण्याच्या बेतात आहे असे इस्त्राइल सरकारचे जगाला सांगणे आहे. त्यामुळे मिळेल तेथे इराणची कोंडी करण्याचे इस्राइल चे प्रयत्न आहेत. इराणचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाचा रोख फक्त इस्राइल असून इराणने कोणतेही आण्विक प्रकल्प घेता कामा नयेत असे विशेषत: आपल्या पाश्चात्य मित्राने इस्राइलने पक्के बिंबवले आहे. मध्यंतरी जून २०१० मध्ये इस्राइलने अमेरिकेच्या मदतीने एक विशिष्ट जातीचा संगणक जीवाणू तयार करून इराणचे सुमारे एक हजार यांत्रिक घाणे ( Centrifuge ) खिळखिळे करून टाकले. त्यांच्याच नाकावर टिच्चून गेल्या आठवड्यात वर लिहिल्याप्रमाणे मावळते अध्यक्ष अहमदेनिजाद यांनी नंताझ गावाजवळील युरेनियम समृद्ध करण्याच्या मुख्य कारखान्यात इराणने स्वत: बनविलेले IR -2m नावाचे घाणे ( Centrifuge Machines ) दामटून बसविले.
दुहेरी अर्थशास्त्राचे आणि जगातल्या इस्लामी व्यवस्थेचे गाढे अभ्यासक रॉडनी शेक्सपियर यांनी रोहानिंच्या शपथविधीच्या दिवशी तेहरान टाईम्स मध्ये लिहिलेल्या "स्तंभलेखात रोहानीच काय तिथे अन्य कुणीही बसला तरी इस्राइलला पुसून टाकायची भाषा करेल कारण इस्राइलच त्यांच्या तोंडी हे शब्द पेरतो आहे" असे लिहून रोहानींची बाजू मांडण्याचा आणि त्यांना दोषमुक्त ठरविण्याचा प्रयत्न केलाय. रोहानीयांना काही वेळ द्यायला हरकत नाही कारण दहा वर्षात इराण संपेल असे हेन्री किसिंजर ही म्हणाले होते. पण "Can do business" या अपेक्षेने रोहानिंकडे पाहणारे पश्चिमेकडील देश आणि दस्तूर खुद्द इराणी जनता यांच्या मध्ये रोहानी यांनी केलेल्या खळबळजनक हालचालींमुळे आणि विधानांमुळे उमेद संपल्यात जमा आहे.
प्रतिक्रिया
1 Sep 2013 - 5:56 pm | सुधीर मुतालीक
4 Sep 2013 - 10:45 am | यशोधरा
वाचते आहे. अजूनही लिहाल ना पुढे?
4 Sep 2013 - 12:53 pm | जे.पी.मॉर्गन
रोचक माहिती. सत्तेवर आल्यानंतर फिरणारे लोक सगळीकडेच आहेत - इराण तरी अपवाद कसा ठरणार ना? एरवी शांतिप्रिय, कष्टाळू आणि आपल्यासारख्याच साध्या सुध्या सामान्य माणसांचे अश्या यादवीत काय हाल होत असतील नाही? इराण काय, पाकिस्तान काय, इजिप्त, सीरिया काय....बहुतेक लोकं प्रामाणिकपणे नोकरी धंदा करून पैसे मिळवू पहाणारीच असणार. काय वाताहत होत असेल सामान्य आयुष्यांची !
अजून वाचायला आवडेल. कारण तुम्ही अश्या गोष्टी लिहू शकाल ज्या मीडियाकडून कधीच कळणार नाहीत.
जे.पी.
4 Sep 2013 - 1:47 pm | मन१
हा विचार अगदि साधेपणातून्,सरळ मनाने आलेला दिसतो.
सामान्य माणसाला थेट युद्ध नको असले तरी बक्कळ साधन संपत्त्ती हवी असते कमीतकमी कष्टात चैनीने जगण्यासाठी. ह्यासाठी सरकारांवर मग साधनसंपत्ती वगैरेंसाठी दबाव येतो. दुसर्याच्या मुलखातून ते ती आणू पाहतात. एकमेकांच्या हितसंबंधाना उडवून लावत गळे कापू पाह्तात. जो बलिष्ठ (निदान काही बाबतींत) तो तरतो. जो दुर्बल व कमनशिबी त्याचा घात ठरलेला.
शिवाय "एकदा ह्या साल्यांना समोरासमोरच्या युद्धात अद्दल घडवलीच पाहिजे" असे मह्णणारे अरेच सामन्य जन आसपास दिसतात. फेसबुकवर तर फारच दिसतात.असो.
4 Sep 2013 - 1:01 pm | विटेकर
नेहमी प्रमाणे तुमचा आणखी एक सुरेख लेख ! आवडला. रोचक !
4 Sep 2013 - 1:11 pm | मदनबाण
सुरेख लेखन ! और भी आने दो ! :)
4 Sep 2013 - 1:33 pm | मन१
इस्राइल - इराण ह्यांच्यात गुंत बरीच आहे.
चमत्कारिक गोष्ट अशी की १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इस्राइलशी उघड वैर वगैरे खोमेनींनी/इराणने पत्करले तरी इराण-इराक युद्ध१९८०-१९८९ मध्ये सुरु असताना इस्राइलकडूनच भरपूर शस्त्रखरेदी केली!
म्हणजे एकीकदे "हा देश बेचिराख केला पाहिजे", "नज्काशावरून पुसून टाकला पाहिजे" वगैरे वगैरे जाहिर भाशणात बोलत असले तरी त्या "पुसून टाकण्याच्या लायकीच्या" देशाकडूनच ते शस्त्रेसुद्ध खरेदी करत होते.
अजब आहे. कुणाचा अभ्यास असेल ह्या विषयावर तर त्यांनी अजून लिहावं.
--मनोबा
4 Sep 2013 - 1:42 pm | मन१
दस्तूर खुद्द इराणी जनता यांच्या मध्ये रोहानी यांनी केलेल्या खळबळजनक हालचालींमुळे आणि विधानांमुळे उमेद संपल्यात जमा आहे.
हा असा टोन लेखात वारंवार दिसला."इराणी जनतेला इस्राइलबद्दल काही फार द्वेष नाही" असे ही वाक्ये सुचवतात.
इराणी जनतेचा पाठिंबा हवा असेल तर पुरेसे इस्राइलविरोधक रहायला(निदान दिसायला) हवे हे रोहानींना सत्तप्राप्तीनंतर का असेना जाणवले असावे; म्हणून त्यांनी तसे विधान केले असण्याची शक्यता वाटते.
( पाकिस्तान मध्ये कुठलेही सरकार एका विशिष्ट मर्यादेपलिकडे भारतीयांशी किंवा गैर्-तालिबानी अफगाणी सत्त्तांशी सौहार्दपूर्ण वागू शकत नाही. कारण "दोन्ही देशातील जनतेला मैत्री हवी आहे.सरकारे मात्र भांडण करीत आहेत" हे बाळबोध विधान आहे. )
.
इराणमध्येही असेच पॉलिटिकल कम्पलशन असावे. ( "दुष्ट झायोनिस्ट" राक्षसाबद्दल तुम्ही टोकाची भूमिका घेतली नाहित तर तुन्ही त्यांचे हस्तक आहत असे मानले जाइल.)
6 Sep 2013 - 4:36 pm | सुधीर मुतालीक
हे सत्य आहे की इराणी जनता उघड उघड म्हणते आम्हाला इस्त्राइलशी असणाऱ्या राजकीय वैराशी काही घेणंदेणं नाही. किंबहुना इस्त्राइलशी आमचे काही भांडण नाही असे बहुतांश जनतेचे म्हणणे आहे. रोहानी यांनी असेच असावे असे त्यांचे मत आहे. अहमदेनिजाद यांच्या पाठीराख्याला अव्हेरून रोहानी यांना निवडून देण्यामध्ये इराणी जनतेची ही भावना स्पष्ट दिसते आहे.
4 Sep 2013 - 1:47 pm | ऋषिकेश
क्षमस्व, परंतू बर्यापैकी घाऊक व एकांगी लेखन वाटले.
इराणी जनतेची खरी मते आलेली नाहीत (पाश्चात्य मिडीयात जी मते येतात ती तेथील जनतेची मते असतीलच असे नव्हे - किंबहुना नसण्याची शक्यता जास्त).
गेल्याच काही दिवसांत भारताने रुपयाचे अवमुल्यन घटवण्यासाठी उलट इराणशी तेल व्यापार पुन्हा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे तोही डॉलरमध्ये न करता रुपयांमध्ये. त्यासंबंधी कालचा लोकसत्तातील अग्रलेख वाचनीय आहे.
बाकी लिहिण्यासारखे बरेच आहे पण तुर्तास लेखाचा सूर पटला नाही इतकेच म्हणतो.
4 Sep 2013 - 1:59 pm | मन१
हेच मी वरती लिहिलं आहे.पण इतकं नेमकं नव्हतं लिहिलं.
6 Sep 2013 - 4:44 pm | सुधीर मुतालीक
मिडीया मध्ये ऐकून वा बघून माझी मते मी मांडली नाहीत. रोहानिंच्या शपथ विधीच्या दिवशी आणि आधी पंधरा दिवस मी स्वत:तेहरान मध्ये होतो. इराणचा व्यावसाईक कामानिमित्ताने प्रवास होतो - ज्याचा उल्लेख माझ्या गेल्या एकदीड वर्षांच्या लेखात ही येतो आहे. इराण मध्ये बरेच मित्र आहेत, परिचित व्यावसाईक आहेत, विचारवंत आहेत. तेहरान मधल्या पाकिस्तानच्या उच्चाआयुक्तांशी माझा संवाद आहे. माझी मते मी स्वतः बनविलेली वा बनलेली मांडली आहेत. एकांगी या विषयातील माझे मत मी वर मन १यांच्या प्रतिक्रियेत दिले आहे.
4 Sep 2013 - 2:23 pm | मालोजीराव
भारताचे या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत असे ऐकले होते
4 Sep 2013 - 7:23 pm | तिमा
मीना प्रभू यांच्या ईराण वरच्या पुस्तकात लिहिले आहे की सर्वसामान्य इराणी जनता अतिशय प्रेमळ आणि भारतीयांविषयी आदर बाळगून आहे.खौमेनी व अहमदेनिजाद यांनी इराणला भलत्या वाटेवर नेले असले तरी त्यांची अतिरेकी मते सामान्य जनतेला पसंत नाहीत. पण तसे ते उघडपणे बोलू शकत नाहीत. आपण भारतीयांनी या बाबतीत स्वतःला सुदैवी समजले पाहिजे.
लेख आवडला. इराणवर अजूनही वाचायला आवडेल.
6 Sep 2013 - 6:51 pm | पैसा
सत्तेवर आल्यानंतर रोहानी यांना इस्लामी मूलतत्त्ववाद्यांची बाजू घेणे काही प्रमाणात आवश्यक ठरले असावे. थोडा जम बसेपर्यंत त्यांना गप्प करण्यासाठीची ही खेळी असू शकेल. पण तरीही नक्की सांगू शकणार नाही.
थोडे अवांतरः आजच्या पेपरमधे सुस्मिता बॅनर्जींच्या तालिबान्यांनी केलेल्या हत्येबद्दल वाचले. http://news.sky.com/story/1137919/escape-from-taliban-author-shot-dead
जवळपास १८ वर्षांनी अफगाणिस्तानात परत गेलेल्या सुस्मितांना तालिबान्यांनी सोडले नाही. पण या हत्येची दखल टीव्हीवाल्यांनी फारशी गंभीरपणे घेतलेली दिसत नाही. सगळीकडे आसाराम आणि क्रिकेट टीमबद्दल बोलणे चालू आहे. की एका भारतीय लेखिकेची तालिबान्यांनी केलेली हत्या अदखलपात्र आहे?
7 Sep 2013 - 11:22 am | बॅटमॅन
हिंदू दहशतवादाशी कनेक्शन असल्याशिवाय अलीकडे अशा गोष्टींना कव्हरेज द्यायचा नाही अशी फ्याशनच आहे.
23 Apr 2017 - 7:36 pm | गामा पैलवान
सुधीर मुतालिक
लेख रोचक आहे. कसा हुकला माझ्याकडून असं वाटून राहिलंय. लेखातलं एक विधान दुरुस्त करावंसं वाटतंय :
उपरोक्त वाक्यात तुम्हाला इस्रायल म्हणायचं होतं का? कारण की माझ्या माहितीप्रमाणे हेनरी किसिंजर यांनी २०१२ साली येत्या १० वर्षांत इस्रायल नसेल असं वक्तव्य केलं होतं.
आ.न.,
-गा.पै.
24 Apr 2017 - 8:32 am | झपाटलेला फिलॉसॉफर
अमेरिका स्वतःला दादा राष्ट्र समजते आणि जग आपल्या मर्जीने चालावे अशा हेतूने सगळ्या चाली करत असते . इराक सीरिया आणि इतर देशाना अमेरिकेने याच कारणासाठी सम्पवलेले आहे. तेलाचे सगळे व्यवहार डॉलर मध्येच व्हावेत असे म्हणणे हाच मुळात फार मोठा दहशतवाद आहे. अमेरिकेची वेपन्स लॉबी हे सगळे खेळ करत असते . महामूर्ख इस्लामी दहशतवाद्यांच्या तावडीतून सम्पूर्ण मध्यपूर्व मुक्त व्हावा आणि त्या देशाना विविध देशांशी आपल्या मर्जीनुसार ,आपल्या मर्जीच्या चलनात तेलाचे व्यवहार करण्याचे स्वातन्त्र्य मिळेल अशी व्यवस्था तातडीने राबवण्याची गरज आहे.
27 Jun 2017 - 4:06 pm | धर्मराजमुटके
आजची ही बातमी