
'सूरज का सातवाँ घोडा' ही धर्मवीर भारती यांची कादंबरी. संकल्पना अशी की, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. सहा घोडे चाकोरीबद्ध मार्गाने धावतात. पण सातवा घोडा सर्वात लहान आहे आणि त्यामुळे इतरांच्या गतीने धावू शकत नाही. कदाचित लहान असल्याने अवखळपणे आखलेला मार्ग सोडून धावायची त्याला मुभा आहे. त्यामुळे रथाच्या धावण्याची गती-मार्ग-ध्येय त्याच्यावर अवलंबून आहे. आपापली आयुष्य जगताना कदाचित आपणही असेच सूर्याच्या रथाचे घोडे असू. पण तो सातवा घोडा बनण्याची इच्छा आणि धमक किती जणांत असते?
'सूरज का सातवाँ घोडा' सात कथांभोवती गुंफला आहे. पहिल्या व दुसर्या कथेला नांव आहे. ’नमक की अदायगी’ व ’घोडे की नाल’. नंतरच्या कथा बिनानावाच्याच आहेत. या सार्या मात्र स्वतंत्र कथा नसून एकमेकांत गुंतल्या आहेत. या कथा गावातल्या लोकांच्या, त्यांच्या जीवनाच्या आणि एकमेकांची आयुष्ये घडवणार्या आणि बिघडवणार्या. खरंतर या कथांचा केंद्रबिंदू आहे माणिक मुल्ला (रजत कपूर) याच्या आयुष्यात आलेल्या तीन स्त्रिया. एक सुशिक्षित, एक मध्यमवर्गीय तर तिसरी कनिष्ठवर्गीय. या तिघींच्या कथा लघुकथेच्या रूपात येतात. आणि कळतं, खरंतर या सगळ्या लघुकथांचा संच म्हणजे एकच सलग दीर्घकथा आहे. माणिक मुल्ला आपल्या वडिलोपार्जित घरी एकटा राहात मित्रमंडळींचं टोळकं जमवून या कथा सांगतो आणि ते सगळे तींवर चर्चा करत राहतात. या कथांमध्ये देवदास आहे, कार्ल मार्क्स आहे आणि चेकॉव्ह सुद्धा आहे. कथा सांगण्याचं तंत्र, तंत्राशिवायची गोष्ट असं सगळंच काही आहे.
साधारण एकाच छोट्या गावात राहणारी माणसे. जमुना आणि तिचे आई-बाबा हे एक कुटुंब, शेजारीच राहणारा जमुनाचा प्रियकर तन्ना आणि त्याच्या दोन बहिणी-बाबा-बाबांची ठेवलेली बाई हे दुसरं, लिली आणि तिची आई हे तिसरं, माणिक आणि त्याचे दादा-वहिनी हे एक आणि लढाईत हात गमावलेला एक फौजी-चमन ठाकूर आणि त्याने सांभाळलेली अनाथ मुलगी-सत्ती हे शेवटचं कुटुंब. साधारण हीच पात्रे सगळ्या कथांमधून येत राहतात. नाही म्हणायला दुसर्या गावातला जमीनदार अन त्याचा नोकर रामधन हीच काय ती बाहेरची माणसे. जमुना-मध्यमवर्गीय, लिली-उच्चशिक्षित, सत्ती-कनिष्ठवर्गीय असे समाजाचे सरळसरळ तीन स्तर इथे दिसतात. एक तन्नाचे बाबा सोडले तर मुख्य व्यक्तिरेखांमधलं कुणीच थेट खलप्रवृत्तीचं नाही.
.
जमुना माणिकला शाळेत असताना भेटते तर लिली आणि सत्ती या इंटरला असतानाच्या काळात. जमुनावरचं त्याचं प्रेम हे पौगंडावस्थेतलं आकर्षण असतं आणि ते तेवढंच टिकतं. सत्तीच्या बाबतीत त्याला ती आवडत असते आणि तिला त्याच्याबद्दल प्रचंड आदर असतो. इथं प्रेमापेक्षाही जिव्हाळा आणि आपुलकीचं नातं जास्त आहे. लिलीवरती मात्र माणिकचं प्रेम असल्याचं दिसतं पण इथेही तो काढता पाय का घेतो हे कळत नाही.
त्याच्या कथानायिकांपैकी पहिली आहे जमुना. मध्यमवर्गीय घरातील एकुलती मुलगी. कादंबर्या वाचणारी, त्यांच्या स्वप्नील जगात रमणारी एक हट्टी मुलगी. शेजारच्या घरातल्या तन्नावर तिचं प्रेम आहे. तशी ती बेधडक आहे आणि आपल्या प्रेमासाठी आपल्या आणि त्याच्याही घरातल्यांशी टक्कर घेण्यास तयार आहे. तिच्या दुर्दैवानं तन्ना मात्र कचखाऊ आहे. तिचं लग्न मात्र शेवटी तिच्या बाबाच्या वयाच्या दोनदा विधुर झालेल्या जमीनदाराशी होतं. लेखकाच्या मते प्रेमकथांचं तात्पर्य खरंतर आर्थिक आणि वर्णव्यवस्थेवर अवलंबून असतं. इथं जमुना उच्चवर्गीय परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि तन्ना खालच्या गोत्राचा. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी यशस्वी न होता अर्थ आणि वर्ण या दोन्ही पातळींवर वरचढ ठरलेल्या जमीनदाराशी तिचा विवाह होतो.
दुसरी लिली, ललिता. शिकलेली, सुंदर, श्रीमंत, एकुलती आणि त्यामुळे आपसूक असणारा गर्विष्ठ भाव असणारी. तिला मनातून हे लग्न करायचंच नसतं पण पुन्हा एकदा नियतीपुढे तिचं काही चालत नाही. तिचे बाबा वारले आहेत आणि आई ही टिपिकल ’मी बाईमाणूस’ अशा वृत्तीची आहे. तन्नाशी लग्न झाल्यावर ती काही त्याच्याशी जुळवून घेत असताना दिसत नाही. कदाचित तो बापाच्या तालावर नाचतो याचा राग तिला अधिक आहे.
सत्ती ही खरंतर अनाथ मुलगी. तिला चमन ठाकूर या फौजीनं सांभाळलं. ही कामाला वाघ आहे. तशी फटकळ पण मायेचा ओलावाही पुष्कळ आहे. माणिकला शिक्षणासाठी गरज आहे म्हटल्यावर लगेच आयुष्याची पुंजी हवाली करणारी अशी साध्या सरळ मनाची आहे. मात्र ज्याने वडिलकीच्या नात्याने सांभाळलं त्यानेच पैशांपायी विकलं म्हटल्यावर ती जाम चिडते, वैतागते आणि माणिककडे मदतीसाठी येते.
जमुना प्रथमता दिसते ती अवखळ, हट्टी, स्वप्नांत रमणारी व एकदम बेधडक. तन्नाच्या घाबरटपणामुळे चिडून ती माणिकवर प्रेम करू लागते. लग्न झाल्यावर मात्र तिचा आवेश बदलतो. एक शांत, पोक्तपणा हालचालींमधून जाणवतो. इतकंच नव्हे तर आईबाबांपेक्षा तिला आता तिच्या अजून न झालेल्या मुलाच्या भवितव्याची काळ्जी वाटते. आईचा विरोध डावलून तिचा तन्नासोबत विवाह करण्यास परवानगी देणार्या बाबांसोबतही ती अत्यंत स्वार्थीपणे वागते. एकूणातच, तिचं पुढचं आयुष्यही सोपं होत नाही. कदाचित इतक्या वृद्ध नवर्याकडून संसारसुख मिळत नसल्याने ती पुन्हा तन्नाकडे आकर्षित होते. लेखक पुन्हा एकदा अर्थ-जातिव्यवस्थेला नांवे ठेवतो की ज्यांच्यामुळे अशा अनेक जमुना आपल्या समाजात तयार होतात. .
लिली शारिरीक दृष्ट्या नसली तरी मानसिक रित्या खंबीर आहे. तन्नाशी लग्न ठरल्यानंतर ’नवर्यापेक्षा बायको जास्त शिकलेली नको’ किंवा’ बाईच्या जातीला इतकं शिकून काय करायचंय” असं म्हणून तिचं शिक्षण थांबवलं जातं. परिस्थितीपुढे हार पत्करलेली लिली एकंदर प्रकरण लक्षात येताच ’हमें किसी मर्द की जरूरत नहीं’ असं सासर्याला ठणकावून सांगून सरळ आईकडेच राहाते. खरंतर तन्ना थोडा खंबीर असतात तर या जमुना आणि लिलीची इतकी परवड झाली नसती. तीच गोष्ट माणिकची. जमुनाच्या वेळी तो शाळेत जाणारा-बहुधा तिच्याहून लहान असावा, परंतु लिलीच्या वेळी त्याने काढता पाय का घेतला हे कळत नाही.
सत्ती ही तिघींमधली फटकळ, सतत चाकू घेऊन फिरणारी, कुणाला न घाबरणारी अशिक्षित मुलगी. इतकी खंबीर असूनही सर्वात जास्त अन्याय मात्र तिच्यावरच होतो. तिच्याशी माणिकची हिशोब लिहिण्याच्या निमित्ताने ओळख होते. दोघे अगदी प्रेमात नसले तरी तिचा त्याच्यावर खूप जीव असतो. साठवलेले सगळे पैसे ती एकदा त्याच्या उच्चशिक्षणासाठी आणून देते. पण जेव्हा खरी मदतीची अपेक्षा असते तेव्हा माणिक डरपोक निघतो आणि आयुष्यभर त्याला याचा सल राहतो.
या सर्वांत तन्ना हा दुष्ट जगातला बिचारा प्राणी वाटतो. तो आयुष्यभर दबलेलाच राहातो. शेवटी मृत्यूपूर्वी त्याचे पाय कापले जाणं त्याच्या असहाय्यतेची परिसीमा आहे. तर त्याचा बाबा हा दुष्टतेचा अर्क आहे. दिसेल त्या बाईवर नजर मारणं आणि नंतर मुलाच्या सासरी भ्याडासारखं लपून बसणं, प्रसंगी विहिणीवरतीही लाईन मारणं म्हणजे कळसच!
इथं तन्ना, माणिक, सत्ती, जमुना, लिली सगळ्यांना सूरज का सातवॉं घोडा बनायची संधी असते, ती फक्त लिलीच घेते असं दिसून येतं. किमान तिच्यापुरतं तरी ती सासरी खितपत पडण्यापेक्षा तिचं जगणं बदलते. शेवटाकडे धुक्यात दिसणार्या सत्तीकडे धावत जाताना माणिकही प्राप्त परिस्थितीला शरण न जाता जगणं बदलू पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तो यामध्ये यशस्वी होतो की नाही हे मात्र इथं गुलदस्त्यात आहे.
मूळ कादंबरी सात कथांत विभागली आहे आणि कथा ज्या क्रमाने घडतात त्याच क्रमाने येतात असंही नाही. चित्रपटाचा फॉर्मही तोच आहे. काही प्रसंग दुसर्या कथेत दुसर्या पात्राच्या दृष्टीमधूनही दिसतात आणि एकाच प्रसंगासाठीचं प्रत्येकाचं वेगवेगळा दृष्टीकोन (परिप्रेक्ष्य) दिसतं.
उदा. तन्ना आणि जमुनाच्या घराची गच्ची जवळजवळ आहे, इतकी की एकीवरून दुसरीवर जाता येतं. एका संध्याकाळी तन्नाला आईची आठवण येत असते आणि तो उदास असतो. तो जमुनाला भेटतो, पण तिला त्याच्या मनःस्थितीची कल्पना येत नाही. ती त्यातून तिला सोयीस्कर वाटलेला अर्थ काढते आणि त्याच्यासाठी खायला आणायला जाते. पुढच्या कथेत कधीतरी सगळं रामायण कळतं. त्याचे बाबा आणि त्यांची बाई शयनगृहात असताना हा तिथे हुक्का ठेवायला जातो. ते दोघे चिडतात. आधीच बाबा रागीट त्यात ती बया आगीत तेल ओतत राहाते. बहिणीही आसुरी आनंद बाळगणार्या. त्यामुळे त्यांच्याकडूनही आधारापेक्षा कुत्सित टोमणेच मिळतात. दुखावलेला तन्ना जमुनाला भेटायला जातो तर ती अल्लडपणे त्याच्यासाठी मालपुए आणायला जाते. दुसर्या एका प्रसंगात जमुना पहिल्यांदा सासरहून येते तो प्रसंग इतरांच्या किंबहुना आईच्या नजरेतून मुलीच्या सुखश्रीमंतीचं कौतुक करणारा दिसतो तर नंतर तो कधीतरी लग्न होऊन आलेली प्रेयसी आणि आपल्या दारात उभा राहून पाहात असलेला प्रियकर यांच्यातला अवघडलेला पण ते अवघडलेलपण दाखवू न देण्याचा प्रयत्न करणारा असा येतो.
मी मूळ कादंबरी अर्धीअधिक वाचली. कादंबरी असल्यानं प्रसंग खुलवण्यासाठी शब्दमर्यादा नाही, परंतु त्याच सगळ्या गोष्टी अनावश्यक प्रसंग-व्यक्ती टाळून तोच इफेक्ट कसा आणावा यासाठी बेनेगलांना खरंच मानलं. आतापर्यंतची उदाहरणं-दा विंची कोड, शाळा, गोळाबेरीज, पिंजर पाहता पुस्तकाला चित्रपटाने न्याय दिला नाहीय असं माझं मत होतं. इथं मात्र पुस्तकाहून मला चित्रपट अधिक चांगला वाटला.
उत्कृष्ट हिंदी आणि सहजसुंदर अभिनय ही चित्रपटाची बलस्थानं म्हणायला हवीत. रजत कपूरचा(माणिक) हा पहिला चित्रपट असेल असं वाटत सुद्धा नाही. जमुना(राजेश्वरी)चा हा आयत्या घरात घरोबानंतरचा दुसराच चित्रपट. लग्न झाल्यानंतर सतत भरजरी शालूचा पदर सावरणारी आणि नंतर एकदा दरवाजात आत आल्यावर तो उडवून लावणारी जमुना तिच्या देहबोलीतून छान दिसून येते. लिली(पल्लवी जोशी) या एकाच प्रसंगात शिक्षणामुळं आणि श्रीमंतीमुळंही आलेला गर्व, आत्मविश्वास, थोडीशी बेफिकिरी, लग्नामधून आलेली कटुता आणि घेतलेला निर्णयावर ठाम असणं हे कसं दाखवून देते पहा.
मूळ कादंबरी इथं वाचायला मिळेल.
कादंबरीच्या शेवटी दिलेली काही वाक्यं इथं देण्याचा मोह आवरत नाहीयः
"हुआ यह है कि हमारे वर्ग-विगलित, अनैतिक, भ्रष्ट और अँधेरे जीवन की गलियों में चलने से सूर्य का रथ काफी टूट-फूट गया है और बेचारे घोड़ों की तो यह हालत है कि किसी की दुम कट गई है तो किसी का पैर उखड़ गया है, तो कोई सूख कर ठठरी हो गया है, तो किसी के खुर घायल हो गए हैं। अब बचा है सिर्फ एक घोड़ा जिसके पंख अब भी साबित हैं, जो सीना ताने, गरदन उठाये आगे चल रहा है। वह घोड़ा है भविष्य का घोड़ा, तन्ना, जमुना और सत्ती के नन्हें निष्पाप बच्चों का घोड़ा; जिनकी जिंदगी हमारी जिंदगी से ज्यादा अमन-चैन की होगी, ज्यादा पवित्रता की होगी, उसमें ज्यादा प्रकाश होगा, ज्यादा अमृत होगा। वही सातवाँ घोड़ा हमारी पलकों में भविष्य के सपने और वर्तमान के नवीन आकलन भेजता है ताकि हम वह रास्ता बना सकें जिन पर हो कर भविष्य का घोड़ा आएगा; इतिहास के वे नए पन्ने लिख सकें जिन पर अश्वमेध का दिग्विजयी घोड़ा दौड़ेगा। माणिक मुल्ला ने यह भी बताया कि यद्यपि बाकी छह घोड़े दुर्बल, रक्तहीन और विकलांग हैं पर सातवाँ घोड़ा तेजस्वी और शौर्यवान है और हमें अपना ध्यान और अपनी आस्था उसी पर रखनी चाहिए।"
--धर्मवीर भारती
प्रतिक्रिया
1 May 2013 - 1:26 am | बिपिन कार्यकर्ते
वा!
1 May 2013 - 1:39 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त ओळख.
वाचायला पाहीजे कादंबरी.
तुमच्या लेखनशैलीला __/\__
1 May 2013 - 4:14 am | रेवती
सुरेख लेखन!
1 May 2013 - 5:59 am | स्पंदना
मलाही बहुतेकवेळा असच वाटत. बर्याच पुस्तकांच्या बाबतीत अस घडताना पाह्यलय मी. खरच शब्दांच सामर्थ्य विलक्षण आहे.
मकु लेखन आवडल.
1 May 2013 - 6:35 am | जयंत कुलकर्णी
सुंदर चित्रपट ! व सुंदर लिखाण......
1 May 2013 - 7:45 am | मनोज श्रीनिवास जोशी
कादंबरी आणि चित्रपट अतिशय उच्च ! परिचय आवडला.
1 May 2013 - 8:50 am | किसन शिंदे
फार पुर्वी डिडिवर हा सिनेमा पाहिला होता. पुस्तकाबद्दल माहिती नव्हतं. सिनेमाची ओळख सुंदर शब्दात केली आहे.
1 May 2013 - 9:11 am | आतिवास
चित्रपट परिचय आवडला. ब-याच वर्षांपूर्वी चित्रपट पाहिला होता आणि तो आवडलाही होता.
कादंबरी मात्र या ना त्या कारणाने वाचायची राहून गेली होती. तिचा दुवा दिल्याबद्दल विशेष आभार.
1 May 2013 - 12:21 pm | तिमा
चित्रपट पाहिला पण कादंबरी वाचली नाही. आता सर्व संबंध जास्त कळले. लेख उत्तम झाला आहे.
1 May 2013 - 9:21 am | नीलकांत
अतिशय उत्तम लेख आणि सहज सुंदर ओळख करू दिली आहे.
धन्यवाद.
- नीलकांत
1 May 2013 - 9:30 am | सहज
चित्रपट ओळख आवडली. बघायला हवा.
1 May 2013 - 9:42 am | रमताराम
कादंबरी वाचली नव्हती पण चित्रपट आवडला होता. एकदम आटोपशीर नि बांधीव लेखाने तो पुन्हा एकवार पाहण्याची इच्छा झाली आहे. सुदैवाने तू नळीवर संपूर्ण चित्रपट आहे इथे.
2 May 2013 - 7:09 pm | ढालगज भवानी
दुव्याबद्दल धन्यवाद.
1 May 2013 - 10:06 am | नंदन
तौलनिक परीक्षण उत्तम झाले आहे. कादंबरीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. वाचायच्या यादीत भर टाकली आहे.
1 May 2013 - 10:18 am | सुहास झेले
सुंदर परीक्षण.... खूपवेळा डीडीवर लागायचा, पण मी बघितला नाही. पण नक्की बघेन. आधी कादंबरी वाचायचा मोह होतोय आणि मग सिनेमा. धन्यवाद इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल :) :)
1 May 2013 - 11:38 am | विसोबा खेचर
क्लास अपार्ट..!
1 May 2013 - 11:52 am | तुमचा अभिषेक
सुरेख
अजून पाहिला नाही चित्रपट.. पण आता बघायला हवा..
1 May 2013 - 12:13 pm | मनिष
हा बघायचा राहून गेलाय, आता बघितलाच पाहिजे!
1 May 2013 - 12:23 pm | आदूबाळ
मस्त परीक्षण. आधी शिणुमा बघितला होता पण कळला नव्हता. आता या परीक्षणाला हातात धरून परत पहातो.
@रमताराम - तूनळी दुव्याबद्दल आभार!
1 May 2013 - 6:27 pm | प्यारे१
असेच म्हणतो....
1 May 2013 - 1:21 pm | इनिगोय
मस्त ओळख. हा सिनेमा डीडीवर पाहिला होता. पण कादंबरीबद्दल माहीत नव्हतं.
रजत कपूरचा सहज अभिनय आणि पल्लवी जोशी लक्षात राहण्याजोगेच.
या सिनेमात एक फार सुंदर गाणं होतं. 'ये शामें सब की सब शामें.. क्या इनका कोई अंत नहीं?'
शेवटच्या परिच्छेदात जो आशावाद मांडला आहे, त्याचं आजचं सत्य स्वरूप पाहता यापुढच्या काळाबद्दल कोणता लेखक असं म्हणू शकेल?
1 May 2013 - 2:20 pm | मस्त कलंदर
हे गाणं तर आहेच.. आणखी एक गाणं नीना गुप्ता (सत्ती) पडद्यावर म्हणते.
'निमिया का पेड ना तोडो बाबा, निमिया बसेरा चिरैय्या।
बिटियाही जिनको दुख देई बाबा, बिटिया तो जैसन चिरेय्या॥'
लोकसंगीताच्या बाजाचे हे गाणंही मस्त आहे. विशेष म्हणजे चिमणी आणि मुलगी यांच्या दूर देशी जाण्याबद्दलचं, आसरा हरवल्याबद्दलचं गाणं ऐकताना चमन ठाकूर डोळे पुसतानाही दाखवलाय. पण नंतर तोच बाबा तिच्यावरती स्वखुशीनं बलात्कार होऊ देतो.
1 May 2013 - 2:33 pm | अग्निकोल्हा
पण कंटाळवाणं इतकिच वैयक्तिक प्रतिक्रिया व्यक्त करतो. हा लेख वाचुन आता तो चित्रपट वा कादंबरी समोरही येउ नये असं वाटतयं. असो.
1 May 2013 - 2:47 pm | दशानन
सुंदर लेखन.
चित्रपट पाहिला होता, पण पुस्तक आहे हे माहीती नव्हते.
पुस्तक कोठे उपलब्ध आहे याची माहीती मिळेल का? फ्लिपकार्टवर नाही मिळाले मला.
1 May 2013 - 3:24 pm | मस्त कलंदर
हिंदीसमय.कॉम वरती हिंदी साहित्याचा फुकट खजिना आहे. प्रिंट्मध्ये उपलब्ध असल्यास माहित नाही..
1 May 2013 - 8:40 pm | दशानन
अरे वा!
छानच, या साईटचा चांगला उपयोग होईल मला असे दिसत आहे.
धन्यु!
1 May 2013 - 6:16 pm | पैसा
सिनेमा आणि कादंबरी दोन्हीचे एकत्रित परीक्षण खूप आवडले! रजत कपूर हा अतिशय गुणी अभिनेता. केवळ त्याच्यासाठी एखादा सिनेमा पहायलाही हरकत नसावी!
1 May 2013 - 9:17 pm | मुक्त विहारि
फारच रटाळ वाटत आहे..
1 May 2013 - 11:52 pm | सानिकास्वप्निल
चित्रपट पाहिला नाही आता बघेन पण आधी कांदबरी वाचेन.
दुवा दिल्याबद्दल आभार :)
2 May 2013 - 12:10 pm | तुषार काळभोर
९४-९५ च्या आसपास कधी तरी दूरदर्शन वर लागला होता. पण त्यापूर्वी एकदा "सुर्याचा सातवा घोडा" अशा नावाचे एक पुस्तक घरात असल्याचे आठवते.
3 May 2013 - 9:46 pm | श्रावण मोडक
परिचयाचं लेखन आवडलं. चित्रपटाचा परिचय की चित्रपटातील कथेचा परिचय हा प्रश्न आहे. त्यामुळं, काय आहे यापेक्षा कसं हे पहात, लेखनाला पूर्ण दाद. :-)
4 May 2013 - 9:30 am | इन्दुसुता
कादंबरी ( किंवा कथा संग्रह ) आणि चित्रपटाची ओळख अतिशय आवडली.
हिंदीसमय.कॉमच्या दुव्याबद्दल अनेक आभार.