तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-३६

खुशि's picture
खुशि in भटकंती
3 Sep 2012 - 3:42 pm

पहाटे ५ वाजता मुलेही आमच्या बरोबरच उठली,जाऊ नका जाऊ नका अशी भुणभुण सुरु होती.सुटीत नक्की येऊ असे आश्वासन दिले तेव्हा कुठे समाधान झाले त्यान्चे.सहाची बस साडेसहाला आली,सर्वान्चा भरल्यागळ्याने निरोप घेउन बसमध्ये बसलो.
सात वाजता बस सुटली दाट जन्गलातुन जाणारा वळवळणान्चा रस्ता काळ्या नागिणीसारखा दिसत होता. थन्डी खुप होती,दाट धुक्याची दुलई पान्घरुन सारी स्रुष्टी पहुडली होती, पाखरान्चा गोड किलबिलाट भुपाळी गाऊन सुर्यदेवाला जागवत होता.आणि ,एका डोन्गरा आडून तो हळूच डोकावला.पिचकारीने त्याने क्षणात सार्‍या आसमन्तात केशरीरन्गाची उधळण केली.सारी धरती खुशीने खुदकन हसली. पाना पानान्वरचे दवबिन्दुन्चे मोती चमकू लागले.पाखरान्चा चिवचिवाट वाढला,रानगवतावरची छोटी छोटी रन्गीबिरन्गी फुले मन्द वार्‍याच्या झुळूके बरोबर हसत डोलू लागली.देवाची ही पुण्यभूमि सुखी झाली.
साडेआठ वाजता चापडागाव आले.याठिकाणी आम्हाला बस बदलायची होती,उतरलो. एका हॉटेलच्या बाकावर पिशव्या ठेवल्या. नेमावरची बस नऊ वाजता होती.म्हणुन पोहे,चहा असा नास्ता केला,गोळी घेतली.चापडागाव बर्‍यापैकी मोठे असावे कारण बसेसची बरीच येजा दिसत होती,वर्दळ मोठी होती. बाजाराचा दिवस दिसत होता. येणारा जाणारा आमची मोठ्या आपुलकीने चौकशी करत होता.चहापाणी विचारत होता,परिक्रमावासी म्हणून नमस्कार करत होता. हॉटेलवाल्यानेही पैसे घेतले नाहीत. परिक्रमेने पुण्य मिळते म्हणतात आम्हालामात्र माणूसकीचे,बन्धुभावाचे सतत घडत असलेले हे दर्शनच खुप काही अगदी भरभरुन देत होते,परिक्रमा उचलल्याचे सार्थक वाटत होते.
बरोबर नऊ वाजता बस आली. बसला गर्दी होती पण आम्हाला बसायला जागा मिळाली.मध्यप्रदेशात खाजगी बसेस असतात पण त्यान्ची अवस्था मात्र त्या प्रमाणात बरी नसते,किती माणसे भरायची याला काही मर्यादाच नसते,प्रत्येक स्टॉपवर बस थाम्बते;एकदोनजण उतरतात आणि साताआठ चढतात. चापडागावाबाहेर पडेपर्यन्त बस साताआठ ठिकाणी थाम्बली. हा जबलपुर हायवे आहे पण रस्ता रुन्दीकरण चालू आहे त्यामुळे प्रचन्ड खड्डे-खुड्डे धुळ यातुन खडखडत बस साडेबारा वाजता एकदाची नेमावरला पोहोचली.
बसस्टॉप जवळच ग्वाल टेकडीवर ब्रम्हचारी आश्रमात पोहोचलो,मैयाचे विस्तीर्ण पात्र दिसले आणि बसमध्ये ठेचाळून निघालेल्या शरीराला वार्‍याच्या सुखद झुळूकीने आराम वाटला.आम्ही पोहोचलो त्यावेळी सर्वजण भोजनाला बसले होते,गाडगीळ महाराजानी हात-पाय धुवुन आधी भोजन करुन घ्या असे सान्गितले म्हणून पिशव्या तिथेच ओट्यावर ठेउन हात-पाय धुतले आणि पन्गतीत येउन बसलो.वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,सहज हवन होते नाम घेता फुकाचे,जीवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रम्ह, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म! ह्या आपल्या अस्सल मराठी श्लोकाने भोजनाला सुरवात झाली आणि पिम्परीहुन आपल्याच एका नातलगाकडुन नेमावरला दुसर्‍या नातलगाकडे आलो असे वाटले.
भोजन झाल्यावर एका खोलीत आसन लावले.पहाटे स्नान झालेले होते तरीही पुन्हा स्नान करुन कपडे धुतले.सर्व आश्रम परिसर अगदी स्वच्छ आहे. आम्ही उतरलो तिथे चार खोल्या आहेत्,समोरच आणखी काही खोल्या आहेत. दोन शेडही आहेत,नन्तर चार पायर्‍या उतरुन भोजनशाळा आहे. तिच्यापुढे छान सारवलेले अन्गण आहे. अन्गणात मोठे आवळ्याचे दोन व्रुक्ष आहेत,काही फुलझाडे आहेत. चार पायर्‍या चढुन उजव्या हाताला गाडगीळ महाराजान्चे निवासस्थान असुन त्या समोर सिमेन्टने बान्धलेला मोठा ओटावजा अन्गण आहे,तुळशीचे सुन्दर व्रुन्दावन आहे. डेरेदार तुळस खुप सुन्दर दिसते, त्या ओट्यालगत खालच्या बाजुला सुन्दर व्रुक्षमन्दिर आणि गुलाब कुन्दा वगैरे सुवासिक फुलानी बहरलेला बगिचा आहे. समोरच मैय्याचे दर्शन होते,मैय्याच्या पात्राच्या मध्यभागी नाभिकुन्ड आहे. येथुन पुर्वेकडे अमरकन्टक मैय्याचे उगमस्थान आणि पश्चिमेला रत्नसागर सन्गमस्थळ दोन्ही सारख्याच अन्तरावर आहेत. म्हणुन या स्थानाला मैय्याचे नाभिस्थान {मध्य} म्हणतात.
चार वाजता चहा झाल्यावर गावात फेरफटका मारुन गरजेच्या वस्तू खरेदी करुन आलो.माझे घड्याळ बन्द पडले होते पण येथे त्याचा सेल मिळाला नाही. सन्ध्याकाळी तुळशीच्या कट्ट्यावर बसलो. गाडगीळ महाराजही बसले होते.ते अगदी भालोदच्या प्रतापे महाराजान्सारखेच साधे आहेत. त्यान्ची दाढी-केस वाढलेली मुर्ती अगदी समर्थ रामदासस्वामीन्प्रमाणे दिसते. ते त्यान्च्या सारखीच भगवी कफनी घालतात.अगदी साधे कसलाही डामडौल नाही.आमच्याशी छान गप्पा मारत होते. सरदारसरोवराची ऊन्ची वाढवणे,त्यामुळे बुडणारे क्षेत्र,होणारे विस्थापित यावरही गप्पा झाल्या, आधुनीक धरणे वगैरे प्रगती हवी असेल तर अ‍ॅतिहासिक धरोहर वगैरे विसरायला हवे असे म्हणाले.
आश्रमाच्या मागे बगिच्यात मोगर्‍याच्या मान्डवाखाली श्रीवासुदेवानन्दसरस्वती यान्ची पदचिन्हे आहेत त्यान्चे दर्शन घेतले.तिन्हिसान्जेच्यावेळी महाराज स्वतः कन्दिलाच्या काचा पुसुन तेलवात करत होते,इकडे नेहेमीच लाइट जात असतात त्यामुळे तयारीत रहावे लागते असे म्हणाले.तुळशीपुढे सान्जवात लावल्यावर महाराजान्च्या खोलीत आरतीसाठी सर्वजण जमले.तिथे महाराजान्च्या गुरुन्ची बालब्रम्हचारी महाराजान्ची तसबीर एका चौरन्गावर ठेवलेली आहे. आतमध्ये देव्हारा आहे. आधी सर्व आरत्या झाल्या समर्थ रामदासस्वामीन्चीही आरती म्हटली. नन्तर गीतेचा पन्धरावा अध्याय,मनाचे श्लोक,भिमरुपीमहारुद्रा आणि हनुमानचालिसा यान्चे पठण झाले,नन्तर महाराजानी मनाच्या श्लोकान्वर थोडे भाष्य केले. नन्तर प्रसाद वाटप झाले. आजुबाजुची बरीच मुले आली होती.
रात्री भोजनाला खिचडीचा बेत होता. जेवण झाल्यावर आश्रमाचे व्यवस्थापक श्री.विक्रम तुळापुरकर यान्च्या बरोबर खोलीबाहेरच्या व्हरान्ड्यात गप्पा मारत बसलो. तुळापुरकर हे मागे आम्ही कैलास यात्रेला गेलो असताना आमच्या ग्रुपमधिल तुळापुरकर यान्चा पुतण्याच आहे असे कळले. उद्या एकादशी आहे म्हणून येथेच राहणार आहोत.
पहाटे उठलो,प्रातर्विधी आटोपले,स्नानाला मैय्याच्या घाटावर जाणार होतो पण अन्धार होता त्यामुळे झुन्जुमुन्जु होईपर्यन्त थाम्बावे लागले. मैय्याचा घाट प्रशस्त दगडी बान्धीव आहे. जवळच पडझड झालेला किल्ला किन्वा राजवाडा आहे. सिद्धनाथाचे पान्डवकालीन मन्दीर आहे. ते सुस्थितीत आहे. सुन्दर अगदी बारीक कोरीव काम आहे. गाभार्‍यासमोर सुबक नन्दी एका दगडी कोरीव मन्डपात विराजमान आहे. गाभार्‍यात श्रीसिद्धनाथान्ची पिन्डी आहे. ह्याची स्थापना पान्डवानी केली अशी आख्यायिका आहे. हा सर्व परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे पण येथे कुठलीही माहिती लिहिलेली नाही. त्यामुळे या स्थानाचा इतिहास समजत नाही.
आज एकादशी असल्याने खुप गर्दी आहे. बरेचसे परिक्रमावासी घाटावरच मुक्कामाला आहेत. आपल्या आश्रमात बहुदा फक्त मराठी परिक्रमावासीच उतरत असावेत्.आश्रमात नर्मदाजयन्तीची तयारी सुरु आहे.दुपारी गोन्दवल्याच्या कुलकर्णीबाई नर्मदाजयन्तीसाठी आल्या,पुण्याहुन पुणे-जम्मु झेलमएक्स्प्रेसने खान्डव्याला उतरुन बसने नेमावर असा प्रवास त्यानी केला. सन्ध्याकाळी पुण्याचेच शिन्दे हे सेवानिव्रुत्त शिक्षक वय ७५वर्ष हे पायी परिक्रमेत असलेले आले. त्यान्ची जिद्द बघुन नवल वाटले,एकटेच निघाले आहेत. सन्ध्याकाळी हन्डीयाला जोडणारा पुल पाहून आलो. मैय्याच्या या उत्तर तीरावर सिद्धनाथ तर पलीकडे दक्षिणतीरावर रिद्धनाथ आहेत.
रात्री बोलता बोलता तुळापुरकर म्हणाले,मला गुरुचरित्र सप्तशतीचे पुस्तक हवे आहे,मोठ्या गुरुचरित्राचे पारायण करण्यास बराच वेळ लागतो,सप्तशती बरे पडते.मी गरुडेश्वरला ते पुस्तक घेतले होते सत्पात्री ब्राम्हणाची इच्छा होती म्हणून ते पुस्तक मी त्याना दिले. उद्या बुधनीसाठी प्रयाण.क्रमशः

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

3 Sep 2012 - 5:45 pm | कवितानागेश

वाचतेय.....

सातबारा's picture

3 Sep 2012 - 10:43 pm | सातबारा

सर्वच भाग मनापासून वाचतो आहे.

अक्षया's picture

4 Sep 2012 - 10:14 am | अक्षया

+१

सत्पात्री ब्राम्हणाची - हे कशावरुन, कशावरुन हो तेच सत्पात्री, हां, त्यांनी तुमच्या बॅगेत हे पुस्तक पाहुन विषय काढला नसेल याबद्दल.

बरं सत्पात्री हे एका भेटीत कसे कळाले, हल्ली ब-यापैकी डॉक्टरांना चार -पाच टेस्ट केल्याशिवाय नक्की मलेरिया आहे का टायफॉईड आहे का ड्येंग्यु आहे का चिकन गुनिया आहे का आपला तापमापी बिघडलाय हे कळत नाही, असं ऐकलंय. म्हणुन विचारलं, एक माहित असावं.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2012 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा

@ कशावरुन हो तेच सत्पात्री>>>ते पात्र सत्य सत्य...असं म्हणत असेल.... ;)

नमस्कार.
श्री.विक्रम तुळापुरकर हे लहानपणापासुन या आश्रमात राहतात. दोन दिवसान्च्या आमच्या येथिल वासत्व्यात त्यान्चे आचरण मला शुद्ध दिसले,त्याना सुपारीच्या खान्डाचेही व्यसन नाही,सुर्यनमस्कार सन्ध्यावन्दनादी ब्राम्हकर्मे ते करतात त्याशिवाय सेवाव्रती आहेत म्हणुन मला ते सत्पात्री आहेत असे वाटते.त्याना माझ्या पिशवीत पुस्तक आहे हे माहीत असण्याचे काही कारण नाही,आमची खोली ,त्यान्ची खोली वेगवेगळ्या होत्या.आणि त्यानी पुस्तक मागितले नव्हते,पारायणाचा विषय निघाला तेव्हा मीच ते त्याना दिले.
प्रिक्वालिफिकेशन पाहण्याइतकी मी अध्यात्म जाणत नाही. माझ्या लेखी आपल्याला चान्गला वाटलेला माणुस सत्पात्री.दुसरे काही क्वालिफिकेशन असेल तर आपण मला सान्गावे ही विनन्ती.
आपण उदाहरणार्थ दिलेल्या सर्व आजारान्ची प्राथमिक लक्षणे सारखीच असतात म्हणुन निरनिराळ्या तपासण्या कराव्या लागतात. यात डॉक्टरान्चे अज्ञान अगर दुसरा काही हेतू नसतो.असे माझे वैयक्तिक मत आहे.

अन्या दातार's picture

3 Sep 2012 - 11:23 pm | अन्या दातार

पात्र म्हणजे नक्की काय? फुलपात्र का नाटकात असतं तसं पात्र?

खुशीताई,

लेखमालिका छान चालली आहे. पुलेशु.

प्रिया

नमस्कार प्रिया.
धन्यवाद.लेख आवडले.

राजो's picture

4 Sep 2012 - 9:51 am | राजो

पुलेशु

खुदकुशि

किसन शिंदे's picture

4 Sep 2012 - 12:06 pm | किसन शिंदे

शेवटचा भाग कधी टाकताय? तो टाकला कि मग एकत्रित पणे सगळे भाग वाचतो.

नमस्कार,
कामाच्या व्यापातुन जसा वेळ मिळेल तसे लहान मोठे भाग लिहिते. त्यामुळे शेवटचा भाग कधी लिहिन हे सान्गता येणार नाही.परिक्रमा सम्पन्न झाली असे लिहिनच.मग त्यानन्तर आपण वाचावी.वाचण्याची इच्छा आहे हेच माझ्यासाठी खुप आहे. धन्यवाद.

नमस्कार,
कामाच्या व्यापातुन जसा वेळ मिळेल तसे लहान मोठे भाग लिहिते. त्यामुळे शेवटचा भाग कधी लिहिन हे सान्गता येणार नाही.परिक्रमा सम्पन्न झाली असे लिहिनच.मग त्यानन्तर आपण वाचावी.वाचण्याची इच्छा आहे हेच माझ्यासाठी खुप आहे. धन्यवाद.

संपादक मंडळ's picture

4 Sep 2012 - 1:00 pm | संपादक मंडळ

ज्यांना ही लेखमाला आवडत नाही त्यांनी इथे प्रतिक्रिया नाही दिल्या तरी चालतील.
आणि जर काही प्रतिसाद द्यायचेच असतील तर ते धाग्याच्या कंटेंटशी संबंधित असावेत.
कृपया आवांतर करु नये. तुम्हाला आवडत नसली तरी इतरांना ही लेखमाला आवडते आहे.

- संपादक मंडळ

नमस्कार आणि धन्यवाद.
आम्ही परिक्रमा केली ती परिभ्रमण परिक्रमा झाली म्हणजे पुर्णपणे पायी करु शकलो नाही म्हणुन परिभ्रमण. मला लेखनाचा अनुभव नाही पण एक प्रयत्न करते आहे. आपण सकारात्मक प्रतिसाद दिलात म्हणुन खुप छान वाटले.पुन्हा एकदा धन्यवाद.

टिवटिव's picture

4 Sep 2012 - 3:14 pm | टिवटिव

धन्यवाद संमं..