साहित्य : पिकलेले आंबे, पातेलं, कणभर मीठ
१. हात स्वच्छ धुवा.
२. बनियन काढा..वातानुकुलित घरात रहात नसाल तर कृती करायच्या मोसमात शर्ट घातला नसेलच..शर्ट असेलच घातलेला तर शर्ट काढून मग बनियन काढा..स्त्री वर्गाने एखादा जुना अॅप्रन चढवावा.
३. प्रत्येक आंबा जरासा पिळून देठाजवळील चिक काढून टाका..आणि मग पिळून रस पातेल्यात जमा करा.
४. काही मंडळी रस मिक्सरमधून काढतात..शप्पथ आहे तुम्हाला असे कराल तर..हातानेच रस एकजीव करा.
५. कणभर मीठ घाला..आंबे निवडताना फसले गेला नसाल तर साखर घालायची गरज नाही..जरा ढवळून घ्या.
६. काही मंडळी कोयी आणि साली दुधात धुवून वगैरे ते रसात घालतात..पण मी म्हणतो कशाला उगाच..रस काढल्याचा मेहनताना म्हणून कोयी आणि साली स्वतःच चोखुन चोखुन पार पांढर्या फट करुन टाका.
ताटात पोळ्यांचा ढीग (कोणी आयत्या गरम गरम करुन वाढणार असेल तर चांगलंच आहे) आणि वाटीत रस घेऊन बसा जेवायला..रसाचं पातेलं जवळंच ठेवा..संपवून उठा आणि झोपायच्या खोलीकडे प्रस्थान करा :D
कृती लेखकाने स्वतः केली आहे यावर विश्वास ठेवावा..पातेलं, आंबे, रस वगैरेचे फोटो सवडीने.
गुडनाईट इंडिया !!
प्रतिक्रिया
9 May 2011 - 11:53 pm | Mrunalini
हा हा हा हा... पा़कृ ची पद्धत आणि पाकृ दोन्ही पण जाम आवडले...
10 May 2011 - 2:24 pm | सानिकास्वप्निल
मृणालिनी सारखेच म्हण्तेय मी पाकृ आणी पा़कृ ची पध्दत अगदी वेगळी आहे :)
9 May 2011 - 11:57 pm | आत्मशून्य
.
10 May 2011 - 12:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्टेप क्रमांक एक आणि दोन यांची अदलाबदल करणे.
महिला वर्गाने आत्ताच्या दोन क्रमांकाच्या "पायरी"तली पहिली दोन वाक्य वगळायची.
आमरसात मीठ (आणि साखरेची) भेसळ करण्याचा निषेध.
10 May 2011 - 12:17 am | रामदास
ताटात पोळ्यांचा ढीग आणि वाटीत रस हे काही जमलं नाही .
ताटात पोळ्यांचा ढीग आणि रसाचं पातेलं हे अगदी झक्कास होईल.
आंबे एप्रील फळवाल्या इज्याकडूनच घ्यावे.
10 May 2011 - 12:24 am | पिवळा डांबिस
रामदासांशी सहमत!
आमच्याकडे आमरस आणि पुरी अशी जोडी जमवली जाते.
आणि आमरसात थोडी मिरपूड टाकली जाते. म्हणजे पायरी आंबा बाधत नाही म्हणे!
बाकी एप्रिल फळवाल्या इज्याकडच्या आंब्याला तोड नाही हे बरीक खरं....
;)
10 May 2011 - 12:42 am | Nile
एकाच मोसमात स्त्री पुरुषांना वेगळा न्याय का म्हणून? हा स्त्री जातीवर अन्याय आहे!!!--निळुत्सु.
शिंगल दिसता? नोकरी साठी परगावी वाटतं? पगार कीती.....- निळोपंत (जोशी, देशपांडे किंवा कुळकर्णी, जे तुमचे नसेल ते लावावे. ;-) )
अरे पोरासोरांना पण देत चला कोयी अन साली चोखायला.. मजा असते यार!
आँ? शिंगल आहात याची शंका आहे आता? ढीग आला कुठुन ते द्याकी राव? इथं ब्रेडावर गुजराण आहे. ;-)
10 May 2011 - 7:09 am | गोगोल
पा़कृ अंड घालून पण करता येते का?
ईथे अमेरिकेत आंबे कुठे मिळतात?
- विरझण
10 May 2011 - 1:04 am | योगप्रभू
शाहरुख,
शर्ट काढण्याची घाई करु नका. आधी बाजारातून आणलेले आंबे चाळणीत स्वच्छ धुऊन घ्या. फळांवर पावडरी मारलेल्या असतात म्हणून ही काळजी. नंतर हे धुतलेले आंबे थंड पाण्यात बुडवून ठेवा. (कलिंगड कापण्यापूर्वीही असेच थंड पाण्यात बुडवून ठेवतात.)
अंगावर डाग पडू न देता आंबे पिळायचे कौशल्य असणार्या व्यक्तीने बनियन, शर्ट अगर काहीही काढले नाही तरी चालते. लहान मुले आंबा चोखून खाणार असतील तर मात्र त्यांचे वरचे कपडे जरुर काढावे लागतात.
आंबा हापूस असो, अगर पायरी त्याचा देठ काढण्यापूर्वी तो सगळ्या बाजूंनी दाबून मऊ करुन घ्यावा लागतो. हापूस आंब्यात गर असतो. एकदम देठ काढून आंबा पिळल्यास साल फाटून गरासह कोय धप्पकन पातेल्यात पडते. यासाठी आंबा मऊ करावा लागतो म्हणजे घट्ट असलेल्या गराचा रस होतो. कोयीला चिकटलेला गर काढताना हात चिकट होतात त्यामुळे वाटीभर दूध गरजेचे असते. त्यात हात बुडवले, की रस त्यात उतरतो आणि हात स्वच्छ होतो. हे दूध नंतर रसात घालायचे असते.
रसातील गाठी हाताने मोडाव्यात, हे ठीक आहे, पण खाणार्यांची आवड कशी असेल हेही बघावे लागते. काहींना एकजीव आमरस आवडतो. अशावेळी रसात हँड मिक्सर फिरवावा लागतो.
सगळेच आंबे मधुर चवीचे नसतात. काही रसाला आंबटही राहिलेले असतात. त्यामुळे आंबरस झाल्यावरही त्यात पीठीसाखर घालावी लागते. मीठ आणि मीरपूड किंचित चवीपुरते घालतात. मीरपुडीने आंबरस बाधत नाही. इतके केल्यावरही खाताना वाटीत चमचाभर तूप घालतात. कारण आंबरस हा उष्ण असतो. नकळत तो आतड्यावर परिणाम करतो. म्हणून तुपासह खावा लागतो. येथे प्रत्येकाच्या आवडीला स्वातंत्र्य.
आंबरस खाल्ल्यावर लगेच त्यावर भरपूर पाणी पिऊ नका. ही काळजी अवश्य घ्या. मजा करा. :)
10 May 2011 - 1:17 am | माझीही शॅम्पेन
आंबे पिळण्याचा फोटो टाकला असतात तर धागा जरा आणखीन रोचक झाला असता , जाणकारांनी प्रकाश टाकावा :)
10 May 2011 - 4:45 pm | धमाल मुलगा
तो शारुख बिचारा उघडाबंब बसून आमरस करतानाचा फोटू काय मागता :D
10 May 2011 - 1:49 am | प्राजु
रेसिपी खूप छान. त्यातलं.
४. काही मंडळी रस मिक्सरमधून काढतात..शप्पथ आहे तुम्हाला असे कराल तर..हातानेच रस एकजीव करा.
ही स्टेप वाचली आणि खुदकन हसू आलं. :)
10 May 2011 - 7:11 am | गोगोल
या स्टेपला आणि प्राजुच्या प्रतिक्रियेला .. दोघांनाही प्लस वन.
10 May 2011 - 6:52 pm | निवेदिता-ताई
४. काही मंडळी रस मिक्सरमधून काढतात..शप्पथ आहे तुम्हाला असे कराल तर..हातानेच रस एकजीव करा.
+१
मलाही मिक्सरमधुन काढलेला रस आवडत नाही...
आणि आंब्याची गोडी मुळचिच असते..त्यात साखर अज्जिबात घालू नका!!!!
10 May 2011 - 6:59 am | रेवती
एक पातेलं कसं चालेल?
एक छोटं आणि मुख्य रसासाठी मोठं.
एखादा चुकून खराब आंबा असला तर चांगल्या रसात मिसळू नये म्हणून आधी छोट्या पातेल्यात पिळून मग मोठ्यात घालायचा.
10 May 2011 - 9:48 am | प्यारे१
या विकांताला नक्की....
10 May 2011 - 10:56 am | ५० फक्त
या पेक्षा पुण्याला या, दुर्वांकुरला जाउ, कॉलिंग गणेशा गणेशा
10 May 2011 - 11:49 am | योगप्रभू
मी पुण्यात राहातो, पण दुर्वांकुरबाबत चांगले बोलावेसे वाटत नाही. हॉटेल चांगले चालायला लागले आणि चार लोकांमध्ये प्रसिद्धी झाली, की वेटरसुद्धा माजल्यासारखे वागतात.
१५० रुपये मोजून थाळी खायला जाणार्या लोकांशी तिथला स्टाफ ज्या उर्मटपणाने बोलतो ते बघता मी तिथे जाणेच सोडले.
11 May 2011 - 5:33 pm | गणेशा
असो ... पुन्हा कालच जावुन आलो ..
पुन्हा मस्त अनुभव ..
आंबरस असताना इकडच्या चकरा होतात .. काही असा अरेरावीचा प्रकारकधी जानवला नाही.
जेवन मस्तच असते .. शिवाय २०-२५ वाट्या आंबरस ओढायचा म्हणजे बाकीच्या वस्तु कोण खातय ?
हर्षदराव .. पुढीलटाईमाला भेटु नक्की ...
बाकी पेट्या पण स्वस्त झाल्यात ... [:)]
--------
मुद्द्यावर :
आंबरस दुधात्/पाण्यात मला आजीबात आवडत नाही.
घरी मिक्सर मध्ये करतच नाही रस आम्ही ...
साली आणि कोया माझ्याकडेच असतात ...
बाकी साखर वगैरे नाही घालत आम्ही ...
फक्त कपडे न काढताच रस करतो [:)]
शुक्रवारीच देवगड घरी हाणला तेंव्हाच पाक्रु टाकायची होती.. [:)]
10 May 2011 - 11:08 am | विसोबा खेचर
मस्तच..! :)
10 May 2011 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार
हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता येईल ?
10 May 2011 - 12:26 pm | स्पा
हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता येईल ?
म्यान्गोला + पोळी खा ;)
10 May 2011 - 9:06 pm | शाहरुख
रस्त्यावर अगदी स्वस्तात मँगो मिल्कशेक विकणारे प्रत्यक्षात पपईचा गरात आंब्याची चव येणारे कुठले तरी केमिकल घालून त्याचा शेक विकतात असे पेपरात (बहूतेक सकाळ) वाचले होते..त्यांची मदत कदाचित होऊ शकेल. :)
10 May 2011 - 12:17 pm | सूड
आमरसात मीठ ??
10 May 2011 - 1:37 pm | मुलूखावेगळी
घालतात ना
इलायची घातलेला रस पन भारी लागतो. :)
त्राय इट
10 May 2011 - 3:38 pm | सूड
आमरसात मीठ हे तर माझ्यासाठी नवलच आहे आणि तुम्हाला बहुधा 'वेलची' म्हणायचं असावं. असो.
जर आमरसात मीठ घालतात तर मीठ घातलेली बासुंदी, शेवयांची खीर, गुलाबजाम एकेकदा करुन बघावे असं वाटतंय.
अवांतरः काही लोक नाव (पक्षी : आयडी) अगदी सार्थ करतात. ह घ्या हो. :D
10 May 2011 - 4:01 pm | प्यारे१
अहो मालक मीठ म्हणजे भाजीत घालतात तसे नाही. उगाच थोडेसे. लिंबू सरबतात घालतात त्याहून कमी. छान लागते.
आमरसावर पातळ तूप देखील मस्त लागते. मिरपूड देखील ब्येष्ट.
काही ठिकाणी पुरण पोळी आणि आमरस असा डब्बलबार असतो असे ऐकीवात आहे.
10 May 2011 - 4:20 pm | योगप्रभू
पुरणपोळी आणि आमरस हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन आहे.
कर्नाटकात हा बेत अगदी प्रिय असतो.
पण यात एक काळजी घ्यावी लागते. दोन्ही पक्वान्ने अतिगोड होऊन चालत नाहीत.
त्यामुळे आमरस गोड केल्यास पुरणपोळी फिकी ठेवावी लागते आणि पुरणपोळी गोड केल्यास आमरसात साखर घालायची नाही. कर्नाटकातील आंबा चवीला फिका असतो. आपल्या हापूसचा गोडवा त्याला नाही त्यामुळे तिकडे रसात साखर घालतात आणि पोळी कमी गोड करतात. म्हणजे साखरेचा बॅलन्स जुळला.
मी गोडघाशा नाही, पण मलाही अशी कॉम्बीनेशन्स आवडतात. एकदा खव्याची पोळी अंगूर रसमलाईत कालवून खाल्ली होती आणि एकदा मालपुवा साखरविरहित बासुंदीत घालून खाल्ला होता. सुख.. निव्वळ सुख :)
10 May 2011 - 6:03 pm | धमाल मुलगा
खरंच योगप्रभू आहेस. :D
बाकी, आमचे एक बंधू आमरस+भात खातात. पाहतानाच अशक्य विचित्र वाटतं. म्हणजे, खात असतील लोक तसंही, पण आपण आजवरच्या उण्या-पुर्या आयुक्षात कधी असं पाहिलं नाही (ह्या भावाचं उदाहरण सोडल्यास..) त्यामुळं जरा गंडायलाच होतं असं आमरस-भात खाताना पाहून. :)
असो,
आमरसावरुन अधिक चर्चा नकोत आता. हापिसातला कळफळक आलरेडी लाळेनं लडबडलाय. :D
10 May 2011 - 11:37 pm | सूड
पुरणपोळ्या करायलाच हव्यात मग आता आमरस करायचा असेल त्या दिवशी. बाकी खव्याची पोळी आणि अंगूर रसमलाई......भूक वाढत्येय. महत्प्रयासानं वाढतं पोट आटोक्यात घ्यायला बघतोय असं प्रलोभनांना बळी पडायची वेळ आली तर कसं व्हायचं ?? :D
10 May 2011 - 6:48 pm | इरसाल
खरय साहेब डबल बारचे
खानदेशात पण हा प्रकार आहे जावई आला म्हणजे त्याला आमरस आणि पुरणपोळीचा रतीबच घालतात पण ह्याबरोबर भात-रसोई, भजी, पापड-कुरडाया, भरलेले गिलके (घोसाळे) किंवा भरलेली सुकी वांगी असा भरगच्च बेत असतो एका वेळेस वाढलेले खाल्ले जात नाही.
सगळी दुपार घोरण्यात जाते राव.
10 May 2011 - 4:12 pm | मुलूखावेगळी
आमरसात मीठ हे कोयी धुताना त्याचा गर साफ निघवा मह्नुनन घालतात, अगदी माफक.
आनि शेवया बनवतानाच त्यात मीठ असतेच.
सगळ्यात हाइट मह्न्जे मी शिर्यात अगदी थोडे मीठ घालताना पाहिलेय (पन झेपला नाही चवीला)
बाकि श्रीखंडात पन घालतात हो चवीला.
आमरसात तुप्,मीरेपुड हे आंबा उष्ण असतो म्ह्ननुन घालतात.
इलायची शब्द चुक आहे का?
10 May 2011 - 5:47 pm | सखी
गोड पदार्थात चिमुटभर मीठ घातल्याने त्याची गोडी अजुन वाढते असे कुठेतरी वाचले होते. मी काही विदेशी गोड पदार्थातही मीठ/मीरपूड घातल्याचे पाहीले आहे.
इलायची हा शब्द मला वाटतं हिंदी भाषेतला असावा, मराठीत आपण वेलची, किंवा वेलदोडा पुड म्हणतो ना.
बाकी पाकृ आणि ती सादर करण्याची पद्धत आवडली पण वेलची+जायफळ आणि थोडतरी दुध पाहीजे हो त्यात असं वाटतं.
10 May 2011 - 9:14 pm | राही
आमरसात कणभर मीठ घालतातच पण शिरा,रव्याचे लाडू,बेसन लाडू या पदार्थांनाही थोडं मीठ लागतंच.फार काय, जिलबीतही मीठ असतं. दुसर्याने केलेले हे पदार्थ खाण्याची वेळ आली, तर इर्रिस्पेक्टिव ऑफ टेस्ट, 'वा वा,छान छान' म्हणावंच लागतं खाल्ल्या मिठाला जागून.
बाकी पायरी आंब्याशिवाय आमरस ही कल्पनाच सहन होत नाही. हापूसचा तो मिक्सीमधून काढलेला जाड जाड रस.त्याची स्पेसिफिक ग्रॅविटी इतकी की पुरीचा तुकडा त्यात बुडता बुडत नाही.बोटं रसात पार बुचकळावी लागतात...
लेख मात्र छानच.उघडेबंब बसण्याच्या क्रियेमध्ये आंबे पिळण्याच्या श्रमांच्या घामट्यामुळे आमरसाचं आकारमान वाढण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही..
10 May 2011 - 9:15 pm | शाहरुख
आम्हाला शिर्यात अगदी थोडे मीठ आवडते..अगदी थोडे म्हणजे वाटीभर शिर्यात ४-५ मिठाचे कण वगैरे..खाताना यात मीठ घातलंय काय अशी शंका येण्याइतपत.
11 May 2011 - 7:57 pm | गणेशा
इलायची हा शब्द ग्रामिन मराठी ( पश्चिम महाराष्ट्रात) वापरला जातो..
आमच्या घरात पण हाच शब्द वापरतात.
10 May 2011 - 1:28 pm | पिंगू
>>> रस काढल्याचा मेहनताना म्हणून कोयी आणि साली स्वतःच चोखुन चोखुन पार पांढर्या फट करुन टाका.
आम्ही ह्या कृतीचं तंतोतंत पालन करतो...
- पिंगू
10 May 2011 - 6:04 pm | सन्जयखान्डेकर
सालींमध्ये बरेच जीवन सत्व असते असे वाचले आहे मग साली चोखुन शिल्लक ठेवायच्या?
10 May 2011 - 6:49 pm | पिंगू
>>> सालींमध्ये बरेच जीवन सत्व असते असे वाचले आहे मग साली चोखुन शिल्लक ठेवायच्या?
मीठ लावून खात जा... जीवनसत्वे वाया जाणार नाहीत..... :)
- पिंगू
10 May 2011 - 7:23 pm | रमताराम
हल्ली काय एकाहुन एक अवघड पाकृ येताहेत. आता 'नळाच्या पाण्या' (Tap Water)ची पाकृ कोण देणार आहे?
10 May 2011 - 7:24 pm | महेश हतोळकर
बाळकरामच्या पाकृची आठवण झाली
10 May 2011 - 9:51 pm | जयंत कुलकर्णी
आमच्याकडे आमरसाबरोबर गवसणीच्या पोळ्या करतात.
10 May 2011 - 11:45 pm | सूड
गवसणीच्या पोळ्या म्हणजे काय ?? जाणकार पाकृ टाकू शकतील काय ??
11 May 2011 - 12:29 am | पाषाणभेद
"रसाचं पातेलं जवळंच ठेवा..संपवून उठा आणि झोपायच्या खोलीकडे प्रस्थान करा"
हे मात्र एकदम खरं आहे.
12 May 2011 - 9:34 pm | पंगा
प्रतिक्रियेचा मजकूर आणि स्वाक्षरी यांची जोडी नामी आहे!
12 May 2011 - 9:38 pm | पंगा
दोआकाटा
11 May 2011 - 11:05 am | नरेशकुमार
काय अट्टल पाक्रु आहे. आपल्याला तर बुवा जाम आवडला आमरस.
झाडावर आंबे आहेत तोवर याचा पुरेपुर आनंद घेनार.
स्टेप नं वन :
यानंतर डायरेक्ट जेवन झाल्यावरच हात धुवायचे.
11 May 2011 - 9:58 pm | आचारी
असा भरपुर सुगन्धी हापुस आमरस घ्यावा !! जेवढ रस तेव्ढेच गावराण तुप.......तेवढिच साखर.................
आणि.........
अरे नुस्ते बघताय काय? ओरपा ना.......................................आणि द्या ताणुन...........
12 May 2011 - 6:19 am | नरेशकुमार
नंतर....
मग
कुठे, होस्पिटल मध्ये ?