योगायोग

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
14 Jun 2010 - 10:16 am

योगायोग म्हणजे 'कोइन्सिडन्स' या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या वाटणार्‍या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला 'योगायोग' असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सूर्य उगवला आणि सकाळ झाली याला योगायोग म्हणत नाहीत, कारण सूर्योदयाच्या वेळेलाच सकाळ असे नांव दिले आहे. मुंबईहून कोलकात्याकडे जाणारी आणि कोलकात्याहून मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार जबलपूर स्टेशनावर एकाच वेळी आल्या तर त्यात योगायोगाचा भाग नाही, तसे ठरलेले असते आणि रोजच त्या तशा येत असतात. ज्या गोष्टींसाठी नवससायास वगैरे करतात त्या गोष्टी घडण्याची अपेक्षा असतेच, खात्री नसते. मनासारखे झाले की प्रचीती आली असे म्हणायचे आणि नाही झाले तर श्रध्दा कमी पडली, पूर्वसंचित आडवे आले वगैरे स्पष्टीकरणे तयारच असतात. त्यामुळे यात अचानक घडणार्‍या योगायोगाचं प्रमाण कमी असतं.

रोजच्या जीवनात अपेक्षित असलेल्या घटना बहुतेक वेळा ठरल्यानुसार घडत असतात. त्यांना योगायोग म्हणायची गरज नाही. पण कधीकधी जीवनाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळते. एकाद्याचे नशीब अचानक फळफळलं किंवा दैवाने घात केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटला, निश्चित वाटणार्‍या विनाशातून एकादा भाग्यवंत थोडक्यात बचावला किंवा दुसर्‍या कोणावर अचानक आकाशातून कुर्‍हाड कोसळली वगैरे जे आपण म्हणतो तशा गोष्टींबद्दल बोलतांना कदाचित योगायोगाने तसे घडले असेल असे मी म्हणेन. सगळेच योगायोग परिणामकारक असतातच असे नाही. अनेक वेळा योगायोगाने घडणार्‍या घटनांचा आपल्या जीवनावर कांहीच प्रभाव पडत नाही. दूरदेशी राहणारा एकादा जुना मित्र ध्यानी मनी नसतांना आपल्याला प्रवासात कुठे तरी अचानकपणे भेटतो. अशा योगायोगातून चार घटका मजेत जातात आणि पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो एवढेच होते. त्यानंतर आपण दोघेही आपापल्या मार्गाने निघून जातो. असले योगायोग आपण कांही काळाने विसरूनही जातो. एकादी प्रसिध्द व्यक्ती अकस्मात भेटली तर ती आठवण आपण जपून ठेवतो पण त्यातून आपल्या जीवनात कांही बदल येत नाही. अशा एकाद्या आकस्मिक भेटीतून उत्कर्षाच्या नव्या संधी मिळाल्या किंवा फसगत झाली, नवी नाती जुळली, जीवनाची दिशा बदलली असे कांही झाले तर तो टर्निंग पॉइंट ठरतो आणि कायम लक्षात राहतो. अशा गांठीभेटींचे योग आपोआप येतात की परमेश्वराने ते जुळवून आणले तरच येतात हे ज्याने त्याने आपापल्या विचारानुसार ठरवायचे असते.

योगायोगाबद्दल बोलायचे झाले तर कधीकधी ज्याला आपण योगायोग समजतो त्याची योजना कोणीतरी ठरवून केलेली असते पण आपल्याला ती गोष्ट माहीत नसते. याचे उदाहरण पाहिजे असेल तर कोणतीही टीव्ही सीरीयल पहावी. कधीकधी आपल्या अज्ञानामुळे आपण एक समजूत करून घेतो आणि नंतर जास्त माहिती मिळाल्यावर ती बदलते असेही होते. याचे एक उदाहरण खाली दिले आहे.

बंगलोरचा बसवण्णा, चेन्नैचा चेंगप्पा आणि जयपूरचा जयसिंग हे तीन गृहस्थ १ जूनच्या सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांनी अंधेरीला एकाच ठिकाणी धांवतपळत जाऊन पोचले ......... योगायोग असेल.
ते तीघेही त्या ऑफीसात नोकरीला आहेत. ........... मग ते एकत्र येणारच, त्यात योगायोग नाही.
ते तीघेही वेगवेगळ्या भागात राहतात तरीही ते नेमके एका वेळी कसे पोंचले? ..... योगायोगाने?
त्या दिवशी त्यांच्या ऑफीसच्या तिजोरीमध्ये बरीच रोकड होती ..... कदाचित योगायोगाने?
तो पगाराचा दिवस होता. ..... मग असणारच, योगायोगाने नाही.
सकाळी १० वाजून १० मिनिटांनी तिथे सशस्त्र दरोडेखोरांचे एक लहानसे टोळके आले. ...... ते ठरवूनच आले असणार, , योगायोग नाही.
पण नेमके त्याच जागी कां आले? .... योगायोगाने?
आल्या आल्या त्यांनी बंदुकीतून एक गोळी झाडली ..... दहशत बसवण्यासाठी असेल, योगायोग नाही
तिने थेट चेंगप्पाचा वेध घेतला ..... योगायोग ?
ते आपसात तामिळ भाषेत बोलले ... कुठेतरी पाणी मुरतेय्.
कांही क्षणातच तिथे पोलीस येऊन पोचले ..... प्रचंड योगायोग .... त्यांना कसे समजले ???
ते पोलीस या दरोडेखोरांच्या मागावर होते ....... ???
ते दरोडेखोर तर बसवण्णाचा माग घेत तेथे पोचले होते. ........ कां?
त्याच्या ऑफीसात १ तारखेला बराच माल असतो असे त्याने बंगलोरला असतांना कोणाला तरी फुशारकी मारून सांगितले होते आणि त्याच्या संरक्षणासाठी कांही खास बंदोबस्त नसतो हेसुध्दा तो अनवधानाने बोलून गेला होता. ती माहिती तिकडच्या एका गँगला कळली होती .... योगायोग
आणि त्या पैशांवर डल्ला मारण्याचा बेत करून त्यांचे टोळके अंधेरीला आले होते. .... योगायोग नाही.
त्यांच्यातल्या एकाला कदाचित चेंगप्पाचा चेहेरा ओळखीचा वाटला ..... योगायोग
कदाचित त्या चोराला आपण ओळखले जाऊ अशी शंका आली म्हणून त्याने आधी त्यालाच गोळी घातली ...... योगायोग संपला
ते दरोडेखोर बसवण्णाला शोधत मुंबईत अंधेरीला आले असल्याची कुणकुण त्याच्या बंगलोरच्या मित्राला कुठून तरी लागली होती .... योगायोग
आणि त्याने सकाळीच फोन करून बसवण्णाला सावध केले. ..... योगायोग नाही
बसवण्णा जाम घाबरला, त्याने चेंगप्पा आणि जयसिंगला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यांनी धीर दिल्यावर त्यांच्यासोबतीने तो ऑफीसात आला. ...... योगायोग संपला
यात उशीर झाला असल्यामुळे ते टॅक्सीने लगबगीने ऑफीसात आले. ..... योगायोग संपला
जयसिंगचा एक मित्र अंधेरीला पोलिस इन्स्पेक्टर होता ...... योगायोग
जयसिंगने लगेच ही बातमी आपल्या मित्राला सांगितली. अशीच माहिती पोलिसांना त्यांच्या खबर्‍यांकडूनही मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या ऑफीसवर नजर ठेवलेलीच होती. ....... योगायोग संपला.
चोर तिथे आल्यानंतर त्यांच्या मागोमाग पोलीस तिथे आले आणि त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. .... योगायोग नव्हता
चेंगप्पाने ही नोकरी सोडायचे ठरवले होते. फक्त पगार घेण्यासाठी तो थांबला होता आणि त्याच दिवशी त्याला गोळी लागली .... योगायोग
त्या धक्क्याने तो खाली कोसळला असला तरी त्याची जखम गंभीर नव्हती. दोन आठवड्यात तो बरा होऊन हिंडू फिरू लागला. त्याच्या औषधोपचाराचा सगळा खर्च त्याच्या ऑफीसने केलाच, शिवाय अट्टल गुन्हेगारांना पकडून दिल्याबद्दल त्या तीघांना बक्षीसही मिळाले. ........ योगायोग म्हणावे की नाही?
आता चेंगप्पाने नोकरी सोडली नाही. मात्र तीघांनीही बदल्या करून घेतल्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे ते एकमेकांपासून दूर गेले.

या सगळ्या गोष्टी त्यांच्या नशीबात लिहिल्या होत्याच असे कांही लोकांना वाटते. चेंगप्पा आणि बसवण्णा यांच्या कुंडलीत अपमृत्यूचा योग होता किंवा त्यांच्या तळहातावरील लाइफलाईनला छेद गेलेले होते म्हणे. ते दोघे मिळून नुकतेच तिरुपतीला जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेऊन आले होते आणि सकाळी घरातून निघतांना आठवणीने तिथला अंगारा कपाळाला लावून आले होते. त्यानेच त्यांचे रक्षण झाले अशी त्यांना खात्री आहे.

मला हे सगळे योगायोग वाटतात, पण इतके योगायोग कसे जुळून आले असा प्रश्नही पडतो.

राहणीलेखमत

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jun 2010 - 10:20 am | बिपिन कार्यकर्ते

योगायोगाने मी आत्ताच हा लेख वाचला आणि योग असा की पहिला प्रतिसादकर्ता मीच. :)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

14 Jun 2010 - 12:50 pm | अवलिया

सामंतांच्या लेखांची आठवण झाली.

--अवलिया

आंबोळी's picture

14 Jun 2010 - 3:37 pm | आंबोळी

अगदी अगदी....
अत्तापावेतो लारा आणि कुंबळेचे विक्रम केंव्हाच मोडीत निघाले असते नै...

आंबोळी