साधारण ३ वर्षांपूर्वी घडलेली ऐक घटना.
मला त्या दिवशी कंपनीत काही कामानिमित्य लवकर सकाळी जायचे होते. त्यामुळे मी कंपनीच्या नेहमीच्या बससाठी न थांबता बाइकवरून जाण्याचे ठरविले. चिंचवड ते मरकळ असा रूट होता. आदल्या दिवशीच नवीन हेल्मेट आणले होते. ते परिधान करून मी निघालो. ऑटो क्लस्टर च्या चौकात आलो. आता तिथे बरेच बदल झाले आहेत. त्यावेळेस तिथे ट्रॅफिक सिग्नल पण नव्हते. परंतु त्यावेळी समोरून येणारा काटकोनातील रस्ता पूर्ण दिसतं नसे. बाईक चा वेग ७० ते ८० च्या घरात होता. चौकात आलो. समोरून काटकोनी रस्तातून त्याच वेळी एक वेगात मारुती कार चाललेली होती. ... एक क्षणात मनात विचार आला कि थांबावे .. पुढे जाणे धोक्याचे आहे.. पण त्याचवेळेस दुसरा (कु)विचार केला कि अजून आपला वेग वाढवावा नक्कीच त्या कारसमोरून आरामात निघून जाऊ. मी तसाच वेग वाढवून पुढे निघालो. तिकडे , कारचालकाला अचानक मी समोर आलेला पाहून नक्की काय करावे ते समजले नाही. .. तो वेग कमी करायचा विचार करेपर्यंत मी बरोबर समोर मध्यभागी आलो होतो. माझा, कारच्या वेगाचा अंदाज सपशेल चुकला होता. कार व माझ्या बाईकची धडक झाली होती. मी हवेत उडालो व जमिनीवर तीन ,चार गिरक्या घेऊन डोक्यावर खाली पडलो. जोराचा आवाज व अपघात बघून आसपासचे लोक धावत आले. मला पायाला लागले होते. हेल्मेटमुळेच डोक्याला काही पण लागले नव्हते. २ मिनीटं मला भोवळ आली. नंतर उलटी पण आली. पण नंतर पूर्णपणे मी भानावर आलो. बाकी लोक निघून गेले होते पण मारुती कारचा ड्राईव्हर थांबला होता. मला त्याने माझा इतरत्र पडलेला मोबाइलला दाखवला व त्याच्याकडे सुरक्षित आहे हे दर्शविले. मला कंपनीचा नंबर विचारला व त्यावर त्याने कंपनीतील माणसास बोलाविले. तोपर्यंत मला काहीहि हालचाल करू नये म्हणून सांगितले. १० मिनिटात कंपनीतील ऐका माणसाकडे माझी बाइक दिली. व त्या दोघातिघांनी मिळून मला हळूहळू उठवले व त्याच्याच कारमध्ये बसवून भोसरीतील एका हॉस्पिटल मध्ये सॊडवले. नंतर केवळ पायाला काहीशी दुखापत झाल्याचे निदान झाले. बाकी कुठे मुका मार लागला नव्हता.. ... हॉस्पिटल ने माझ्याकडून उपचारांचे काहीच पैसे (जरी फारसे झाले नसले तरी) घेतले नाहीत. ( नंतर मला कळाले कि ड्राइव्हर ने तसे सांगून ठेवले होते.).
१० दिवसानंतर मी पुन्हा नेहमीसारखा पूर्ववत झालो. पण त्या ड्राइव्हर ने दाखवलेली मदत, तत्परता कायम स्वरूपी लक्षात राहिली. अगोदर पासून मी हेल्मेट घालायचो , पण त्या दिवसापासून हेल्मेट चे महत्व समजले. तसेच वेगावर नियंत्रण नसणे म्हणजे काय हे पण मला समजले.
आलेला अनुभव खरच वेगळा होता.
प्रतिक्रिया
5 Sep 2017 - 5:30 pm | मोदक
नशीबवान आहात. नेहमी हेल्मेट वापरा. मी तर सुचवेन गॉगल आणि ग्लोव्हज पण वापरा.
माझ्या एका मित्राचा अनुभव. रात्री पुण्यात कुणीतरी त्याला गाडीसकट उडवले, हा भाऊ तसाच रस्त्यावर पडून. नंतर हॉस्पिटलमध्ये नेले तर बाकी अंगावर किरकोळ खरचटण्याच्या जखमा पण मेजर ब्रेन इंज्युरी. नंतर तीन महिने ICU मध्ये. २२-२५ लाख रूपये खर्च झाले. सध्या संपूर्णपणे दुसर्यावर अवलंबून.
मी एकदा घरी परतत होतो. रात्री ११ ची वेळ. ६० चा स्पीड असावा. रस्त्याशेजारी एक मोठी कचराकुंडी होती. तेथे एका कुत्र्याने दुसर्या कुत्र्याला हूल दिली... आणि दुसरा कुत्रा घाबरून रस्त्याच्या मधोमध.. अक्षरशः ब्रेक लावायलाही वेळ मिळाला नाही. पडलो. मी आणि गाडी ३० - ४० फूट रस्त्यावर फरपटत गेलो. हेल्मेट आणि ग्लोव्हज मुळे काहीच झाले नाही. जॅकेट आणि पँट फाटली आणि गुडघ्याला खरचटले.. मी गाडी उचलली किक मारली आणि घरी गेलो.
(इथे त्या कुत्र्याला धडक बसल्यावर ते विव्हळत रस्त्यावर लोळत होते.. गाडीवरून पडण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने प्रचंड राग आला होता आणि ते कुत्रे इथल्या इथे मरावे अशी इच्छा झाली.. हा विचार संपतो न संपतो तोच ते कुत्रे उठले आणि पळून गेले :D)
एकदा सायकल हेल्मेटमुळे ताम्हिणी घाट उतरताना वाचलो आहे. वेगात असताना तोल गेला.. सिमेंटचे कॉलम आणि बियरच्या फुटलेल्या बाटल्यांमध्ये मी सायकल सकट सूर मारला. हेल्मेटचे तुकडे झाले पण मला हाताला आणि चेहर्याला खरचटले - तेवढ्यावरच निभावले.
लोकं हेल्मेटचा आळस का करतात ते कळत नाही.
5 Sep 2017 - 5:47 pm | तुषार काळभोर
माज!
कायद्याविरुद्ध, नियमाविरुद्ध, पोलिसांविरुद्ध, सिस्टमविरुद्ध, नशिबाविरुद्धा उफाळून येणारा माज!!
-अठराव्या वाढदिवसापासून सविनय नियम पाळून हेल्मेट व गाडी वापरणारा पैलवान
5 Sep 2017 - 8:08 pm | अमरेंद्र बाहुबली
पण इतका वेग ठेवायचाच कशाला गाडीचा?? मी नेहमी 40 च्या खालीच गाडी चालवतो. सगळे माझी टिंगल करतात. पण काही वर्षांआधी मित्राचा सोलवलेला पाय पाहिल्यावर उलटी व्हायची बाकी होती.
माझा लहान भाऊ नी मी एकदा नाशिक हुन भगुर ला सावरकरांच घर पहायला जात होतो. माझ्या गाडी चालवण्यावरून त्याची आणी माझी जुंपली. मी त्याला रिक्षाने जा. पण मी गाडी तुलाही देणार नाही. आणी 40 च्या वर ही चालवणार नाही. असं सांगून चूप केलं. पण हाय देवा! 2 मिनीटांच्या अंतराने स्मारक बंद झालं!
5 Sep 2017 - 8:45 pm | सुबोध खरे
बाईक चा वेग ६० च्या वर नसावाच. विशेषतः शहरात जेंव्हा चौक खड्डे किंवा गतिरोधक असतात तेंव्हा. मी स्कुटर ४०-४५ आणि मोटारसायकल ६० च्या वर हायवे नसेल तर अगदी पहाटे ६ ला सुद्धा नेत नाही.
एक साधारण ठोकताळा म्हणजे तुमच्या गाडीच्या वजनाच्या ४० % हा जास्तीत जास्त वेग असावा.
म्हणजे १०० किलोची गाडी असेल तर ४० किमी ताशी किंवा १८० किलोची बुलेट असेल तर ७२ किमी.
या वेगाला ब्रेक मारला तर गाडी सहसा घसरणार नाही.
अर्थात वेळ कधी सांगून येत नाही.
आणि ५ किमी पेक्षा जास्त वेगाने चालवणार असाल तर हेल्मेट हवेच.
5 Sep 2017 - 9:51 pm | सोमनाथ खांदवे
10 वर्षा पूर्वी पुण्यातील कोंढवा रोड ने समुराई वर चाललो होतो . डाव्या बाजूने एक सायकल वाला जोरात चालला होता त्याला ओवरटेक करावे म्हणून एक्सलेटर फिरावला तर त्या वेड्या ने हात न दाखवता अचानक यू टर्न मारला . मला ब्रेक मारायला वेळ भेटला नाही , जोरात धड़क बसल्या मुळे त्याच्या वरून पलीकडे 10 फुटावर मी पडलो .
डोक्यात हेल्मेट असल्या मुळे मी वाचलो पण तो बेशुद्ध पडला . त्याला रिक्षात घालून जवळ च्या हॉस्पिटल मध्ये जात असताना तो शुद्धिवर आला पण त्याला बरेच लागले होते . डॉक्टर ने सांगितले अंडर ऑब्जर्वेशन 24 तास ठेवावे लागेल , ठेवला मग . ऐडमिट करताना समजले तो up चा आहे व कोंढव्यात राहतो .
त्यानंतर त्याची सायकल घेवून जवळ च्या दुकानात गेलो असताना दुकानदार ने सांगितले की ही सायकल माझ्या कड़े दुरुस्त करून तो ट्रायल मारायला गेला होता . दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल चे बिल भरून त्याच्या घरी सोडायला गेलो असताना घर मालकाने प्रश्न विचारला ' क़ाय झाले ? ' . त्या सायकल वाल्या ने सगळी श्टोरि सांगितली असता घर मालकाने मला " नीट गाड़ी चालव " धमकी वजा सल्ला दिला .
तात्पर्य हेल्मेट घातली च पाहिजे .
5 Sep 2017 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
जिवावरच्या प्रसंगातून वाचला आहात. यापुढे काळजी घ्या.
दुचाकी, चारचाकी, सायकल... कोणतिही गाडी चालवतानाचे आणि रस्त्यावर अगदी धावता-चालतानाही वापरायचे जीवरक्षक नियम...
१. रस्त्यात अचानक समोर काही आले तर अपघात न होता थांबता येईल इतका वेग असावा.
२. रस्ता, चौक किंवा गाडी ओलांडताना जेव्हा, 'सुखरूपपणे ओलांडता येईल किंवा नाही' असा प्रश्न मनात आला, तर त्याचे उत्तर नेहमी "नाही" हेच असते... पूर्णविराम.
३. आपल्या रस्त्यांवर, "माझी गाडी मी मला पाहिजे तशी चालवणार... इतरांनी आपापले बघून घ्यावे", बहुदा हाच एकुलता एक नियम लोक अमलात आणतात. म्हणून, सावधगिरी बाळगून रस्त्यावरचे इतर सर्व... पादचारी, सायकलवाले, दुचाकीवाले, रिक्षावाले, चारचाकीवाले आणि जड वाहनवाले... काही ना काही गुण दाखवणारच अशी खात्री मनात बाळगून चालावे/गाडी चालवावी. तरीही रस्त्यावरच्या पांढर्या रेषेच्या आत उभ्या असलेल्या आपल्या गाडीला कट मारून कोणी खरचटणार नाही याची पूर्ण खात्री देता येत नाही, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. :)
6 Sep 2017 - 12:39 pm | विशुमित
तिन्ही ही मुद्दे रास्त आहेत.
किती ही गाडी पळवली तरी आपण वाचवून वाचवून किती वेळ वाचवतो. शॉर्ट डिस्टन्स असेल तर १० मिनिट आणि लॉन्ग डिस्टन्स ला २५-३० मिनिट.
उशिरा गेले म्हणून कोणी फासा वर तर देणार नाही ना.
5 Sep 2017 - 10:36 pm | मोदक
एक विचित्र थेअरी सांगू का..?
रशीयन रोड रेज, रशीयन कार अॅक्सीडेंट असे जगभरातले डॅश कॅम वाले व्हिडीओज बघा.. त्यामध्ये विचित्र प्रकारे अपघात झालेल्या सगळ्या क्लिप्स एकत्र केलेल्या असतात. आपण रस्त्यावरून जाताना अनेकदा त्यातल्या घटना लक्षात ठेऊन आणखी काळजीपूर्वक गाडी चालवतो असा स्वानुभव आहे.
एकदा ट्राय करा..!
(शक्यतो, फेटल अॅक्सीडेंट्स किंवा छिन्नविछिन्न मृतदेह नसलेले व्हिडीओ बघा)
6 Sep 2017 - 12:15 am | सौन्दर्य
१९९० मध्ये नवीन १०० सीसी हिरो होंडा मोटार सायकल घेतली होती. एकदा एका मित्राशी बंद होंडावर नुसता बसून बोलत होतो, अचानक पाय घसरला, उजव्या बाजूला पडलो, डोके जोरात रस्त्यावर आपटले आणि मोटर सायकल अंगावर पडली. उजव्या पायाला खूप मार लागला, घोटा आणि गुडघा सोलून निघाला, नशिबाने डोक्याला लागले नाही कारण हेल्मेट घातले होते. जर बंद असलेल्या आणि स्थिर मोटर सायकलवरून उभ्या उभ्या पडल्याने ही गत होत असेल तर वेगात असलेल्या वाहनाने किती इजा होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.
एक सल्ला - आपण दुचाकी जर एखाद्या चार चाकीच्या (बस, कार, ट्रक) वगैरेंच्या मागून चालवत असाल तर आपली गाडी नेहेमी, पुढे असणाऱ्या गाडीच्या चाकांच्या लायनीत, मागे चालवावी, पुढील गाडीच्या दोन चाकांच्या मधल्या जागेत चालवू नये. पुढे गाडी असल्यामुळे त्या गाडीच्या पुढे काय असेल ते (उदा: खड्डा, दगड, वीट, एखादी वस्तू इत्यादी) आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे अचानक खड्डा, दगड, वीट समोर आली तर वेगात असलेली दुचाकी अश्या एखाद्या गोष्टीवर आदळली तर अपघात हमखास होणार. तेच आपण पुढील गाडीच्या चाकांच्या लायनीत दुचाकी चालवली आणि पुढील गाडीच्या चाकाखाली एखादा दगड वगैरे आला तर त्या गाडीला बसणाऱ्या धक्क्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो व आपण आवश्यक ती काळजी घेऊ शकतो.
8 Sep 2017 - 1:17 pm | स्वधर्म
मानलं, धन्यवाद!
8 Sep 2017 - 2:17 pm | माझीही शॅम्पेन
माफ करा पण हा अतिशय धोकादायक सल्ला देत आहात , जेव्हा तुम्ही पुढील वाहनाच्या चाकाच्या लाईनीत चालवता तेंव्हा तुम्ही आपोआप ब्लाइंड स्पॉट मध्ये येता , ज्याने पुढील ड्राइव्हर साठी तुम्ही जवळपास अदृश्य होता , अश्या परिस्थितीत तुम्ही त्याला दिसला नाहीत तर तो कदाचित सिग्नल न देता टर्न करू शकतो किंवा लेन बदलू शकतो , इंटरनेट वर बरीच माहिती मिळेल , प्रत्येक चार चाकीला ब्लाइंड स्पॉट असतात आणि त्याची माहिती दुचाकी चालवणाऱयावने ठेवली पाहिजे जेणे करून कमी अपघात होतील
6 Sep 2017 - 2:10 am | अनन्त अवधुत
6 Sep 2017 - 2:22 am | अनन्त अवधुत
केला होता, पण ते संपादकांच्या मदतीशिवाय दिसू शकले नाही.
हे चित्र जर तुम्हाला दिसत असेल (मला दिसतंय) तर
१. मी ते माझ्या ब्लॉग वर अपलोड केले.
२. ब्लॉगवरून चित्राची लिंक कॉपी केली आणि इथे डकवली.
३. ब्लॉग पब्लिक फोरम असल्याने ऍक्सेस राइटचा काही त्रास नाही.
(जाता जाता: माझ्या ब्लॉगची ही जाहिरात नाही, केवळ तिकडे उपलोड करणे सोपे असल्याने, तसे केले. संपादकांच्या कायदेकानून मध्ये बसत नसल्यास कृपया चित्र योग्य तिथे टाकावे आणि प्रतिसादात दिसेल असे करावे )
6 Sep 2017 - 9:45 am | ओरायन
मोदक, पैलवान, अमरेंद्र बाहुबली , सुबोध खरे, सोमनाथ खांदवे, डॉ सुहास म्हात्रे , सौन्दर्य , अनन्त अवधुत आपणं , सर्वानी , ह्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच सदिछ्येपोटी केलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद !
त्या दिवसानंतर मी कानाला खडा लावला. व हेल्मेट वापर , नियंत्रित वेग हे मी कटाक्षाने पाळू लागलो / पाळत आहे.
6 Sep 2017 - 4:40 pm | भंकस बाबा
ऑटोरिक्षा या भयंकर प्राण्यापासून सावध रहा. हा अवसान घातकी प्राणी कुठल्या दिशेने तुमच्यावर चाल करेल याची खात्री नाही . एकावेळी तीन चार माणसांशी लढण्याची रग असेल तर औटो सारथीला आव्हान द्या , नाहीतर त्याचे व्यवसाय बांधवांनी मिळून तुमची पाठ शेकली म्हणून समजा . मी तर कावळ्याच्या नजरेने रस्त्याने ऑटोरिक्षा बघत जातो, एखादा दिसलाच तर चार हात लांब राहून गाडी हाकतो, मग 10/15 मिनिटे उशीर झाला तरी चालेल. त्यामुळे नेहमी अर्धा तास लवकर निघतो
6 Sep 2017 - 11:57 am | मराठी_माणूस
वाहन(कुठलेही) चालवत असतांना ,चौक आला की , वेग अतिशय कमी करुन सर्व दिशांना बघुन जाण्याची सवय लाउन घ्यायला हवी. आपण पटकन निघुन जाउ हा विचार वेग वाढवण्यास आणि संभाव्य अपघातास कारण होतो.
6 Sep 2017 - 3:59 pm | संजय पाटिल
कारवाल्याने पण असाच विचार केला असावा...
7 Sep 2017 - 1:22 am | अतूल २०१५
मला परवा आलेला अनुभव , मी परवा सरळ चाललो होतो माझ्या डाव्या बाजूच्या गल्लीमधून एक मुलगा त्याची बाईक भरदाव वेगात घेऊन मला धडक दिली , डाव्या पायाला थोड लागल पण आता ठिक आहे.दवाखान्यातुन प्रतिसाद देत आहो
7 Sep 2017 - 1:54 pm | इरसाल
अमदावादमां (मधे) रिक्शावाल्याने उजव्या पायाचा पंजा बाहेर काढला यावरुन तो उजवी कडे वळणार हे समजुन घ्यायचे असते.(डावाउजवा लागु)
9 Sep 2017 - 11:55 am | नाखु
तिकडे ✋ पंजा दाखवायला शिल्लक नाही का?
सर्वांनी हलकं घेणे, लगेच मोर्चा काढुनी नये.
खुलाश्यातला खुशाल नाखु
13 Sep 2017 - 6:23 pm | चौथा कोनाडा
:-) :-) :-)
:-)))))
नाखुज पेशल स्ट्रोक !
13 Sep 2017 - 7:05 pm | जेम्स वांड
स्मायली कश्या पोस्ट कराव्या सांगा की हो आम्हाला पण.
9 Sep 2017 - 7:18 pm | ओरायन
रिक्शा बाबतीत ऐक गोष्ट मला जाणवली..ती म्हणजे , पब्लिक ट्रान्सपोर्टचे साधन असूनदेखील संध्याकाळी वा राञी अंधारात काही रिक्शा बिना हेडलाईटस बेधडक वेगात जात असतात व मामालोक तिकडे बघत पण नाहीत.
12 Sep 2017 - 3:49 pm | इरसाल कार्टं
सकाळी मस्त तयार करून ऑफिसात जायला निघालो, नवीयुनिकोर्न घेऊन सहा महिणेही झाले नव्हते. पण हेल्मेट वापरण्याची सवय आधीपासूनच लावून घेतली होती(खरंतर बाईक कुठली घ्यायची याआधी हेल्मेट कसं घ्यायचं हे ठरलं होत). वाटेत कुडूस म्हणून गाव लागतं त्याच्या बस स्टॅन्ड जवळच्या कचरापेटीजवळ उभं असलेलं कुत्रं अचानक पुढच्या टायरखाली आलं आणि दुसऱ्या क्षणाला मी रोडवर आदळलो. बराच पुढे घसरत होतो, तेही डोक्यावर. हेल्मेटच्या घासण्याचा आवाज स्पष्ट जाणवत होता. योगायोगाने रोडच्या पलीकडे फॅमिली डॉक्टर थांबलेले होते. बाजूलाच त्यांच्या मित्राचं घर होतं लोकांनी उचलून ठेवलेली गाडी त्यांनीच मित्राकडे लावली. माझा मी उठून उभं राहिलो होतो. दोन्ही गुढघे दुखावले होते, दोन्ही मनगटांवरही लागलं होतं. मान मुरगळल्यागत वाटत होतं पण डोकं शाबूत राहिलं त्याचं कारण फक्त हेल्मेट. गाडीच्या अवस्थेवरून कोणीही सांगितलं असत कि चालकाला जबर दुखापत झाली असेल कारण गाडीचा पुढचा भाग पूर्ण खराब झाला होता. गाडी मी शेवटपर्यंत घरच्यांना दाखवली नव्हती, दुरुस्त करूनच घरी आणली.
13 Sep 2017 - 7:08 pm | जेम्स वांड
काही लोक हेल्मेटला विरोध का करतात देव जाणे, देव करो अन तुम्हाला परत अश्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागू नये. हेल्मेट प्राणरक्षक आहे. त्याची सरकारला सक्ती करावी लागावी ह्याहून जास्त काही हास्यास्पद नसावं.