"ए राजा, ऊठ"
"झोपू दे गं आई अजून थोडं..."
"अरे, शाळेत जायला उशीर होईल."
"होऊ दे.
दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो."
"एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला.
मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे..... पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय, लागतो आपण त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमानेइतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं, तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलंच पाहिजे ह्या विचाराचं मनावर इतकं पक्कं गारूड असतं की नोकरी कायमस्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार 'निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल' असं म्हणत हळूहळू बाजूला पडतात.
खरं तर आपण निवृत्तीपर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं की आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या निवृत्तीचा दिवस येईपर्यंत काम केलंच पाहिजे. अशा वेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं की "तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण काम करण्याचं जे सर्वमान्य वय ठरवलं आहे, त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत, ते पूर्ण करू शकता", तर तुम्ही अशा वक्तव्यावर काय म्हणाल? "कसं शक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल?" , "हम्म्म... असेल, पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी, की "खरंच, काय बरं करावं लागेल यासाठी? बघू या तरी आपल्याला जमतंय का?" असं काही? चला तर मग बघूच या हा प्रकार काय आहे.
आपण नोकरी करतो ते दर महिना ठरावीक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग नोकरी न करता असं ठरावीक उत्पन्न आपल्याला मिळालं, तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी ही केवळ अर्थार्जनासाठी करत असू, तर ती करण्याची काही गरज अशा वेळी राहत नाही. 'आर्थिक स्वावलंबन' हे आपलं अंतिम ध्येय नसून आपल्याला गोष्टी हव्या तेव्हा करता येणं हे आहे. अर्थातच आर्थिक स्वावलंबन हा अंतिम ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता आहे. मात्र आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्पे आहेत. सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर कोणकोणत्या गोष्टींना प्राध्यान्य आहे हे ठरवणं. प्राधान्य असणाऱ्या या गोष्टींपैकी पैसा किती गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल? अशा प्रकारे साधारण रूपरेषा ठरली की त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.
आमच्या बाबतीत सांगायचं झालं, तर आम्ही तसं उशिराच - म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. मी मुलीच्या जन्माच्या वेळी भारतात गेले असताना आम्ही - म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केटमध्ये आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती, पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायला हवा, ही जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अशा गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरू झाला होता.
आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमच्या बचतीची आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही, तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैशाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरू झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला, तेव्हा खरं तर 'एवढं शिकलो ते यासाठीच ना? नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड?' हा पहिला विचार होता. पण योगायोग असा की दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत, त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्युत्तर क्षेत्रात काम करतो. माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचं होत असेल असं आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल, अशा चार-पाच गोष्टी तरी मनात नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचं काम आवडतं, पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत, ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्यासोबत भरपूर भटकायचं आहे आणि तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जीवन फुलवायचं आहे.... असा सगळा विचार करता करता लक्षात आलं की हे सगळं करायचं, तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.
सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्यापासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते, याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी खर्चात कुठे कुठे कपात करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहत होतो, ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचं गाव होतं, त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबं आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती. एकाच कंपनीत असलो, तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्समध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्याइतपत होती. तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. आमच्यासारख्याच परिस्थितीत असणाऱ्या इतर बऱ्याच कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघांकडे वेगवेगळ्या गाड्या होत्या. आम्ही मात्र दोघांत एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली, तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो, तोपर्यंत ही व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरू झाली की लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे, घराची किंमत आवाक्यात, गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडं देत छोट्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये? असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला, ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्याने घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (उदा., वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचं ठिकाण इ.) टाकले, की त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्षं त्या घरात राहणं आवश्यक आहे, याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं, तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच-सहा वर्षं तरी राहणं गरजेचं होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खातरी नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन वर्षांतून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी. आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो. मोबाइल फोनचं बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून ते चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ट प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या, पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या, त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्य होईल तेवढं घरून डबा घेऊन जाणं आणि कँटीनमध्ये विकत घेऊन खाणं टाळलं. याचा दुहेरी फायदा होतो - पैसे तर वाचतातच, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना 'हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना?' असा प्रश्न करत असतो. त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.
याचा अर्थ असा नाही की आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसलो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचं त्याची एक साधारण यादी सुरुवातीलाच तयार केली होती. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि वीकान्ताला जवळपास भटकंती, कँम्पिंग आणि नवऱ्याच्या रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग या छंदासाठी वाजवी खर्च करण्याची आमची तयारी होती. या सगळ्या गोष्टींसाठी साहित्य घेताना आम्ही नेहमी उत्तम दर्जाचंच घेतो. पण जिथे पैसे वाचवणं शक्य आहे, तिथे या गोष्टी करतानाही वाचवतो. उदा., चांगलं साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतं ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो, त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना 'एअर बी अँड बी'सारख्या साइटवरून शोध घेऊन जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो. बाहेरच्या देशात गेलो, तरी लोकल ट्रान्स्पोर्टने फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अशा गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधीदेखील मिळत आहे. वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच ही गोष्ट आहे ना, याचा काटेकोरपणे विचार करतो.
वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर कुटुंब म्हणून आमचा कल आहे. शिवाय आउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अशा संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्टमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून अखेर आम्ही सहा महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्या वेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. इथेसुद्धा एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तशाच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे काय चांगले पर्याय आहेत याचा शोध चालू आहे. इथे काही वर्षं राहिल्यानंतर कदाचित आणखी काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. आम्ही चाळीशी गाठेपर्यंत, म्हणजे आणखी पाच-सहा वर्षांत हे होईल अशी अपेक्षा आहे.
एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल. हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल, पण मूळ संकल्पना तशीच राहील.
शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच, तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचाखोचा जाणून घ्यायला हव्यात. अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खातरीशीररित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या. पैसा साठवणं हे अंतिम ध्येय नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असं नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे.
मला जरी या विषयातलं खूप जास्त ज्ञान नसलं, तरी आम्ही (म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यत्वे माझ्या नवऱ्याने) खालील पुस्तकं आणि ब्लॉग्ज फोरम्स वाचले / अजूनही वाचत आहोत :
आर्थिक स्वावलंबन, मुदतपूर्व निवृत्ती आणि गुंतवणूक यासाठी वाचलेल्या पुस्तकांची यादी.
- इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामिन ग्रॅहम
- बॉगलहेड्स,गाईड टु इन्व्हेस्टींग
- कॉमन स्टॉक्स फॉर अनकॉमन प्रॉफिट्स
- अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीम
- सिंपल पाथ टू वेल्थ
- द वेल्दी बार्बर
- द वेल्दी रेंटर
- हाऊ टू रिटायर हॅपी, वाईल्ड अँड फ्री
यू एस ब्लॉग्स / फोरम्स
१.एमएमएम
२. बॉगलहेड्स फोरम
३. मॅडफिएन्टिस्ट
भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला :
१. जागो इन्व्हेस्टर
२. सुब्रमनी
३. फ्री फिन कॅल
कॅनडा ब्लॉग्स / फोरम्स
१. फायनान्शिअल विस्डम
२. केनेडिअन काउच पोटेटो
तुम्हीसुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल, तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचंही स्वागत आहे.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
29 Mar 2017 - 11:38 am | संजय क्षीरसागर
१ ) मागच्या वर्षी नायगारा ट्रिपमध्ये.....
२) वर्षातून २-३ वेळा आम्ही मित्रमंडळी कुटुंबासहित .....
३)मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांनाच... आठवड्यातून २-४ वेळा तरी करतोच
४)मला गाड्यांचा शौक आहे, त्यामुळे विविध गाड्या मी चालवलेल्या आहेत. ...
५) येत्या ३-४ महिन्यात बरंच फिरणार आहे, जाऊन आलो की सांगतो.
असोच, आता पितळ उघडं पडलं! हे असले कार्यक्रम सगळेच करतात त्यात काही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा सुट्टीच्या दिवशी, स्वतःच्या एपतीप्रमाणे, असं काही तरी करतातच. तुमची ट्यूबलाईट अजूनही पेटत नाही.
हा तुमचा दिनक्रम नाही.
२)
स्वतःची लाल करणाऱ्यांवर चढायला पण मला खूप आवडतं, जे मी तुम्हाला दिलेले प्रतिसाद वाचून कळलंच असेल.
या वाक्यामुळे तुमचा आयडी जाऊ शकेल ! अशी भाषा दोनच गोष्टी दर्शवते ; एक उद्विग्नता आणि दोन अपब्रींगींग ! इतक्या खालच्या लेवलला मला उतरता येत नाही.
सो लेट मी कन्क्लूड,
१) विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच.
२) आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे. सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक दिवस आणि संपूर्ण आयुष्य मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य. ते लेखात अपेक्षित असलेलं आणि तुम्ही मिळवलेलं लिमीटेड स्वातंत्र्य नाही.
३) खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे.
४) ज्याच्या दृष्टीनं स्वेच्छा प्रथमआणि पैसा दुय्यम (नीट वाचा, दुय्यम. निरुपयोगी नाही), तो खरा आर्थिक दृष्टीनं स्वतंत्र. थोडक्यात, सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणे
अशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतो.
अशी व्यक्ती प्रत्येक दिवस इहलोकी सहलीला आल्यासारखा जगते !५) असं सर्वांगिण स्वातंत्र्य मिळवायला कमालीची आकलन क्षमता हवी. ज्या आयुष्यात पुढच्या श्वासाचा भरवसा नाही तिथे भविष्यकालीन स्वातंत्र्याची अपेक्षा मूढता आहे. आणि जिथे साहस नाही तिथे पैसा केवळ मानसिक दिलासा आहे. जे स्वातंत्र्य पैश्याच्या आधारावर मिळवलेलं आहे ते कुचकामी आहे कारण ज्याचा आधार घेतला आहे तो पैसा वापरतांना, आधार सुटण्याची भीती कायम आहे.
थोडक्यात, जी गोष्ट वापरायची तीच जीवनाचा आधार म्हणून घेण्याचा तो वेडेपणा आहे. आणि जी गोष्ट जीवनाचा खरा आधार आहे, तो श्वास, ज्या वर्तमानाचा उत्सव करायला सांगतो आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणा आहे.
जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे. अशा स्वप्नांच्या वाटेवर चालणारे कधीही मुक्त आणि स्वच्छंद होऊ शकणार नाहीत.
29 Mar 2017 - 10:59 am | अप्पा जोगळेकर
साहेब,
तुमची केस हाताबाहेर गेली आहे.
माझ्यासारखे जगून दाखवा असे आव्हान तुम्हीच दिले होते ना मी त्या संदर्भात विचारले होते. मला काही त्रास नाही तुमच चालू राहू दे.
मिळमिळीत, महत्वाकांक्षा विरहीत जीवनासाठी शुभेच्छा.
एखादा माणूस भरभरुन जगतो एखादा मरत नाही म्हणून जगतो.
इत्यलम.
29 Mar 2017 - 11:55 am | संजय क्षीरसागर
माझ्यासारखे जगून दाखवा असे आव्हान तुम्हीच दिले होते ना मी त्या संदर्भात विचारले होते.
तुम्ही पुन्हा न वाचताच ठोकाठोकी चालू केली. परत नीट वाचा :
७) एखादा आयडी जर मी सुद्धा स्वतंत्र आहे, मला हवं तसं जगू शकतो, तुम्ही जगता त्या पॅटर्नमधे काही विषेश नाही वगैरे म्हणत असेल आणि वास्तविकात परिस्थिती नेमकी उलट असेल तर समजावून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.
आता तुम्ही म्हणतायं :
मिळमिळीत, महत्वाकांक्षा विरहीत जीवनासाठी शुभेच्छा. एखादा माणूस भरभरुन जगतो एखादा मरत नाही म्हणून जगतो.
आता खरंच हिंमत असेल तर तुमच्या रसभरीत आणि दुर्दम्य महत्वाकांक्षी जीवनाचा सारीपाट इथे उलगडा ! तुमच्याकडे तसं काहीही नाही हे प्रतिसादातली उद्विग्नताच दर्शवते तरीही एक ट्राय मारुन पाहा. ट्रेमा, उदय, म्हसोबा आणि तुमच्या परिस्थितीत, अत्याधिक जळजळ, या एकाच लक्षणाचा फरक आहे, हे तुम्ही स्वतःच दाखवून द्याल !
28 Mar 2017 - 3:48 pm | अप्पा जोगळेकर
तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपली व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत राहणे, तंदुरुस्त राहणे आणि मरेपर्यंत काम करत राहणे असावे असे व्यक्तिशः वाटते.
त्या हिशोबाने रिटायरमेंट हा कन्सेप्ट पटत नाही.
आणि ते वायफळ खर्च कमी करणे वगैरे पटले नाही. भविष्यात उपयोग व्हावा म्हणून थोडीफार बचत प्रत्येक जण करतोच.
म्हणजे जर वायफळ असेल तर एरवीसुद्धा तो केला जात नाहीच.
28 Mar 2017 - 5:30 pm | संजय क्षीरसागर
अर्थात,
तरी आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपली व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत राहणे, तंदुरुस्त राहणे आणि मरेपर्यंत काम करत राहणे असावे असे व्यक्तिशः वाटते.
याच्याशी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्याचा काहीएक संबंध नाही. सकाळी लवकर उठणं, योगा, प्राणायाम, फिरायला जाणं मोफत आहे. व्यावसायिक कौशल्ये सतत विकसित करत जाणं हे आर्थिक स्थितीशी फारसं संबधित नाही, ते वृत्तीशी संबधित आहे.
त्या हिशोबाने रिटायरमेंट हा कन्सेप्ट पटत नाही.
काम हा छंद केल्यावर तो रोजचा आनंद आहे, त्यामुळे त्याचाही आर्थिक स्वावलंबनाला मोठा हातभारच आहे.
वायफळ असेल तर एरवीसुद्धा तो केला जात नाहीच
येस, वेरी अॅप्ट. बट अ कॉमनसेंस ऑबजर्वेशन.
28 Mar 2017 - 4:30 pm | सानझरी
100 :D
28 Mar 2017 - 8:57 pm | पिशी अबोली
लोक असंबद्ध, अहंकारी प्रतिसाद वाचून त्यावरचा विशेष उतारा म्हणून पुन्हा एकदा हा मुद्देसूद लेख वाचतील हे अजून एक यश..
28 Mar 2017 - 9:47 pm | संजय क्षीरसागर
ज्यांना खरा हेतू कळेल ते पैश्याचं मनावर सतत असलेलं ओझं झुगारुन स्वप्नांच्या वाटेवर वगैरे न चालता वास्तविकात मुक्तपणे जगायला लागतील.
29 Mar 2017 - 5:10 am | एमी
http://www.maayboli.com/node/61836 प्रतिसाद वाचा.
29 Mar 2017 - 6:06 pm | आजानुकर्ण
संक्षींच्या प्रतिसादांचा अर्थ लक्षात न घेता अनेकजण त्यांच्यावर तोंडसुख घेत आहेत असे दिसते. अमुकतमुक पैसा मिळाला म्हणजे आपण स्वतंत्र ही विचारसरणी चुकीची वाटते. 'अमुकतमुक पैसा' हे कायमच मूविंग टारगेट राहते. माझ्या बऱ्यापैकी ओळखीतल्या एकाने त्याची कंपनी $३५ मिलियनला विकली. आता पुढे थोडंफार काम करुन पुरेसे पैसे (!) मिळाल्यावर रिटायर होता येईल असा त्याचा प्लॅन असल्याचे कळले. पुढे तो नव्या मालक कंपनीत सीओओ वगैरे पदावर जॉईन झाला. आणि मार्केट कसे डल आहे. जितका ठरला होता तितका बोनस मिळत नाही. रेवेन्यू टारगेट मिस होतात, त्यामुळे एकंदर रिटायरमेंटचा प्लॅन गंडलाय वगैरे रडकथा सांगत बसतो.
अशी आणखी एकदोन उदाहरणे माहीत आहेत. त्यामुळे बँकबॅलन्सचा विशिष्ट आकडा पार केल्यावर स्वावलंबनाची आणि सुखाची गुरुकिल्ली सापडेल हे आता मला पटत नाही.
29 Mar 2017 - 7:06 pm | संजय क्षीरसागर
धन्यवाद हो, कर्णजी !
पहिला सेंसिबल प्रतिसाद यायला तब्बल पाच वर्ष लागली !
किमान एका सदस्याला लेखनाचा हेतू कळला हे काय कमीये ? बाकीच्यांनाही यथावकाश तो पोहोचावा ही कामना !
29 Mar 2017 - 10:08 pm | संदीप डांगे
+१००००
अजानुकर्ण! सॉल्लिड उदाहरण दिले आहे.
बाकी, वक्त एक बहती गंगा है, मौजमें बस बहते चलो...
आपआपली टार्गेट्स अचिव्ह करायला समद्यांस्नी शुभेच्छा!
30 Mar 2017 - 12:25 am | ट्रेड मार्क
एवढे असूनही जर तो पैश्यांच्या मागे असेल तर तो मूर्खपणा आहे. पण कदाचित असंही असू शकेल की अधिक पैसे मिळवणे हे उद्दिष्ट नसून काही कामधंदा न करता तो वैतागला असेल आणि काहीतरी करायचं म्हणून त्याने नोकरी स्वीकारली. एकदा त्यात पडल्यावर अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी अपरिहार्य आहेत. नोकरी करण्यापेक्षा परत एक स्टार्ट-अपचा पर्याय त्याने स्वीकारायला पाहिजे होता/ आहे. यात तो स्वतःच्या स्पीडने पाहिजे तेव्हा काम करू शकला असता.
'अमुकतमुक पैसा' हे कायमच मूविंग टारगेट राहते.
हे बरोबर आहे. म्हणून ऊर फुटेस्तोवर पैश्याच्या मागे लागू नये. पण म्हणून पैसे वाचवूच नयेत, साठवूच नयेत हा दृष्टिकोन बरोबर आहे का? पैसे मिळवण्याचा वेळ आणि आयुष्यातले आनंद घेण्याचा वेळ यांच्यात समतोल असावा. प्रस्तुत लेखात लेखिका हेच सांगायचा प्रयत्न करत असावी. आपल्या आनंदात कमतरता न आणता अनावश्यक खर्च कमी करून ते पैसे गुंतवले तर काय चूक आहे? थोडक्यात फिक्स टारगेट न ठेवता आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासून पण अनावश्यक खर्चात काटछाट करून जे साठेल ते साठेल. त्याची गुंतवणूक करायची का नाही, कशी व कुठे करायची ज्याचं त्याचं ती व्यक्ती ठरवेल. इथे फक्त लेखिकेने तो विषय आणि ते काय करतात याची माहिती सादर केली. माझे लेख, ज्यावर संक्षींनी टिपण्णी केली आहे, वाचलेत तर नेहमीच्या वापरातल्या गोष्टींमधून मी कसा फायदा मिळवला अथवा थोडे प्रश्न विचारून समोर आलेल्या अडचणीतून कसा मार्ग सापडला हे सांगितलं आहे. यात कुठलेही जीवनाविषयक तत्वज्ञान आम्ही सांगत नाहीये. बरं हेच आणि असंच सगळ्यांनी करावं असाही आग्रह नाहीये.
पण प्रॉब्लेम कुठे येतो की या धाग्यांवर एक मिपाकर येऊन मी बघा कसं जगतो नाहीतर तुम्ही, तुमचं जिणं म्हणजे गळ्यातलं लोढणं असं सांगतो. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं न देता दूषणं देत बसतो. एक साधा सरळ उपाय आहे, आपण ज्या विषयाला महत्वाचं मानत नाही त्या विषयांशी संबंधित धाग्यांवर न येणे. ही अर्थात सूचना आहे. किंवा तुम्ही जसे सांगितलेत की हे "मूविंग टारगेट" आहे हे ठीक. मग यावर चर्चा होऊ शकते. पण उद्या समजा तुम्ही कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या राजकारणावर धागा लिहिलात आणि यावर येऊन मी तुम्हाला सांगत बसलो की कसली नोकरी आणि कसलं राजकारण, मारायची लाथ सगळ्यावर. नाहीतर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. तुम्ही म्हणजे काय करायचं हे परत परत विचारूनसुद्धा मी जास्त स्पष्टीकरण न देता एकच पालुपद चालू ठेवलं तर तुम्ही काय कराल? हे एकापेक्षा अधिक धाग्यांवर झालं तर तुम्ही काय कराल?
डांगेंजी:
आपआपली टार्गेट्स अचिव्ह करायला समद्यांस्नी शुभेच्छा!
हेच तर मान्य नाहीये ना. सगळ्यांचं टारगेट एकच पाहिजे वेळकाळाचं बंधन नसलेलं आणि टार्गेट नसलेलं स्वच्छंदी जीवन.
असो. आधीच वेळ फुकट घालवून दोष आणि अपमान पदरी पडलेला आहेच. त्यामुळे रजा घेतलेली बरी.
29 Mar 2017 - 7:25 pm | चतुरंग
संक्षींच्या सांगण्यातला अर्थ लक्षात घेतला जात नाहीये.
"पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही". इतका त्यांच्या सांगण्याचा एका वाक्यात अर्थ आहे.
मूविंग टार्गेट्स ठेवून आपण त्यातून मुक्त होऊ असे भासत राहणे हे बदलू शकले तरच खर्या अर्थाने स्वतंत्र होता आले.
तसे नसेल तर तुम्ही आनंदी नाही, मजा करत नाही, सतत पैशाचा विचार करता असा अर्थ नाहीये - फक्त तुम्हाला वाटते तितके तुम्ही स्वतंत्र नाही आहात इतकाच आहे.
(त्यांच्या विरुद्ध वरती वापरली गेलेली अश्लाघ्य भाषा बरोबर नाही - निषेध नोंदवतो!)
-चतुरंग
29 Mar 2017 - 8:17 pm | संजय क्षीरसागर
पुनश्च धन्यवाद !
29 Mar 2017 - 8:27 pm | चतुरंग
फक्त उजाडलं आत्ता! :)
29 Mar 2017 - 8:55 pm | संजय क्षीरसागर
थँक्स अ लॉट !
29 Mar 2017 - 11:31 pm | ट्रेड मार्क
"पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही"
हे तत्वज्ञान कधीच मान्य केलंय. एवढं सगळ्यांनी सांगून झालं की अगदी १२ महिने २४ तास पैश्यांचा विचार कोणीच करत नाही. प्रत्येकाचे आयुष्य, ते जगायचा दृष्टिकोन, छंद, अडचणी हे वेगळंच असणार आहे. त्यात प्रत्येकाने संक्षींसारखंच जगावं हा अट्टाहास का? आणि जे वेगळं जगत असतील ते यःकश्चित हा दृष्टिकोन का?
माझ्या क्रेडिट कार्डच्या धाग्यावर मी फक्त क्रेडिट कार्ड्स वापरून मी कसा फायदा करून घेतला हे सांगितलं. त्यात इतरांनी त्यांचे अनुभव सांगावे, अडचणी सांगाव्या आणि त्यातून सगळ्यांना फायदा होऊ शकेल हा उद्देश होता. त्यात सुद्धा संक्षी कर्ज घेणाऱ्या सगळ्यांचं आयुष्य निरर्थक आहे हे सांगत बसले. वर स्वतः क्रेडिट कार्ड्स वापरतात हे पण सांगितलं. पण कर्ज काढून घर घेऊ नये यावर क्रेडिट कार्डच्या धाग्यात वाद घालत होते. डाऊन पेमेंटचे पैसे नसताना पूर्ण किंमत देऊन घर कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन मात्र करू शकले नाहीत. पूर्ण स्वच्छंदी जीवन जगायला कोणाला आवडणार नाही? पण ते कसं साध्य करायचं हे ते समजावून सांगत नाहीत. नुसतंच फक्त आताच्या क्षणात जगा, पुढचा विचार करू नका आणि कर्ज काढू नका हे सांगतात आणि हे जर तुम्ही करत नसाल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे हे ठासून सांगतात.
तुम्ही आधीच्या आणि या धाग्यांवरचे प्रतिसाद नीट वाचले असतील तर संक्षींनी सगळ्यांचे आयुष्य निरर्थक ठरवूनही माझ्यासकट सगळे सभ्य भाषेत विचारत होते. पण मग पुढे त्यांनीच फेफरं येईल, तोंडाला फेस येईल, पितळ उघडं पडेल अशी भाषा सुरु केली. एकतर पहिल्यापासून सगळ्यांना यःकश्चित प्राणी समजत आहेत आणि वर ही भाषा ३ वेळा तरी वापरली आहे. यावर एकदोघे सोडून कोणाला आक्षेप घ्यावा वाटला नाही. मी एकदा बोललो तर ते एवढं लागलं? मग त्यावर माझ्या अपब्रींगींग वर म्हणजेच माझ्या आईवडिलांवर गेले आणि वर म्हणतात की इतक्या खालच्या लेवलला ते जाऊ शकत नाहीत.
मी यापूर्वीही त्यांचेच प्रतिसाद दाखवून ते कसे गोंधळलेले आहेत हे दाखवून दिलं आहे.
तरीही आता त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर प्रतिवाद करायचा तर -
विकेंडस आणि रजा यामधे जमेल तेवढी मजा करणं यात काहीही विषेश नाही. गोरगरीब सुद्धा स्वतःच्या एपतीप्रमाणे ते करतातच.
बरोब्बर. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे मजा करतातच हे त्यांनी मान्य केलंय. त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे ते त्यांना जमेल तेव्हा काम करू शकतात. सगळ्यांना ती सवलत असेलच असं नाही. विशेषतः नोकरी करणारा सोमवार ते शुक्रवार या मध्ये सुट्टी/ रजा न घेता मन मानेल तसं वागू शकणार नाही हे सर्वमान्य सत्य आहे. त्यावर मला चॅलेंज देण्यात काय अर्थ आहे? तरीही, नोकरी करत असूनही, मी बऱ्यापैकी माझ्या टर्म्सवर काम करतोय हे मी दाखवून दिलं आहे. पण ते त्यांना मान्यच करायचं नाहीये.
आर्थिक स्वातंत्र्य जर सर्वांगिण स्वातंत्र्य देऊ शकले नाही तर व्यर्थ आहे.
हेच आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते स्टेप बाय स्टेप सांगा अशी सगळ्यांची विनंती होती आणि अजूनही आहे. यावर नुसतंच पैसे दुय्यम आहे, मनाला येईल तसं जगा, भविष्याचा विचार करू नका, पूर्ण पैसे असल्याशिवाय घर घेऊ नका या सांगण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला हे स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे कळलं तर कृपया मलाही सांगा. संक्षींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं कळण्याएवढी माझी आकलनशक्ती नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा. समजलं तर माझ्या निरर्थक आयुष्याला जरा अर्थ येऊ शकेल.
खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक विवंचनेपासून स्वातंत्र्य. ज्याची नजर अजूनही पैश्यावरच आहे आणि ज्याच्या दिवसाचा प्राइम टाईम अर्थार्जनासाठीच जातो, तो अजूनही आर्थिक गुलामीतच आहे.
दिवसाचा प्रत्येक क्षण आर्थिक विवंचना करावी एवढी वाईट परिस्थिती नाहीये. पण म्हणून मी कामधंदा सोडून बसावं का? नोकरीची जी वेळ ठरलेली आहे तीचं काय करणार? म्हणून तर त्यांना विचारत होतो की असा कुठला व्यवसाय आहे की जो प्रत्येकाला त्याच्या मर्जीने करता येईल पण पैश्याची चिंता मात्र नसेल.
सर्वांगिण स्वातंत्र्य म्हणजे खुला आणि मुक्त दिनक्रम. मी मागे म्हटल्याप्रमाणे अशा व्यक्तीची प्रत्येक रात्र सॅटरडे नाइट आणि प्रत्येक दिवस संडे असतो
नोकरी करत असताना किंवा नोकरी न करता माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आजच्या सगळ्या गरजा भागवल्या जातील आणि आम्ही सगळे रोज मनाला येईल तसे उत्सव साजरे करत कसे जगू शकतो याचे मार्गदर्शन करावे हीच तर पहिल्यापासूनची मागणी आहे.
जी गोष्ट क्षणोक्षणी संपते आहे आणि जिच्यावर सर्वस्व अवलंबून आहे तीचा अव्हेर करुन, निर्जीव वस्तूला जीवनाचा आधार मानण्याची ती मूढता आहे.
कुठे काय अव्हेरलं? जे मला आवडतं ते मी करतोय हेच मी कधीपासून सांगतोय. तुम्हाला आवडतं ते आणि तुम्ही करता तेच मी करावं हा आग्रह का? तुम्हाला कराओकेवर गायला आवडतं, मला नाही आवडत. मला ऐकायला आवडतं. मला पुस्तकं वाचायला, निसर्गसौन्दर्य; ग्रहतारे; पक्षी; नवनवीन ठिकाणं बघायला, विविध खाद्यपदार्थ खायला आवडतं. मला जमेल तसं, जमेल तेव्हा मी हे करत असतो. म्हणून माझी आवड हीन दर्जाची आहे? मी चांगलं आयुष्य जगतच नाहीये?
एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित समजायला सोपं पडेल. समजा एखाद्याकडे एक महिना पुरेल एवढे पैसे आहेत. संक्षींचा सल्ला मानून त्याने मन मानेल तसं वागायला सुरुवात केली. परिणामी त्याची नोकरी गेली. तरीही त्याने आपलं व्रत सोडलं नाही. महिन्याने त्याची बायको म्हणाली आज संध्याकाळी खायला काही नाही, तर मग याने काय सांगायचं की आत्ताचं बघ संध्याकाळची चिंता कशाला करतेस? भाड्याचं घर आहे पण भाडं भरलं नाही म्हणून घरमालकाने घर सोडायला सांगितलं आहे. या उदाहरणात त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कसं वागावं याचं मार्गदर्शन संक्षी किंवा ते जे सांगतात ते पटलेल्या/ समजलेल्या कोणीही करावे.
का मला एक माणूस, ओळख पाळख नसताना, तुझं आयुष्य व्यर्थ आहे हे परत परत सांगतोय? बरं मग कसं करायचं काय करायचं हे विचारल्यावर समाधानकारक उत्तर मात्र देत नाही. पैसे व्यर्थ आहे असा उपदेश करणारे बरेच बाबा/ बुवा हे सांगण्याचे मोजून पैसे घेताना बघितलेलं आहे. इथे जरा वेगळं काही ऐकायला मिळेल असं वाटलं पण पैसे गेलेले परवडले असं वाटेल, असा दोष आणि अपमान मात्र पदरी पडला.
30 Mar 2017 - 1:02 am | उदय
संक्षी यांनी केलेला पर्सनल अॅटॅक तुम्ही लक्षात घेतलेला दिसत नाही. त्यांची भाषा कशी आहे, ते पण बघा. तुम्ही १ वार केला की कधीतरी उलट वार येतोच. पेराल तसे उगवते.
30 Mar 2017 - 1:11 am | चतुरंग
बरोबर नाहीये - फेफरं येणे, फेस येणे आणि इतर पर्सनल अॅटॅक करायला नको होता याबाबत सहमत आहेच.
असो. मला इथे कोणाचीही बाजू घ्यायची नाहीये.
- (लेखनसीमा) रंगा
30 Mar 2017 - 12:09 am | संदीप डांगे
एक उदाहरण घेऊन बघू, कदाचित समजायला सोपं पडेल. समजा एखाद्याकडे एक महिना पुरेल एवढे पैसे आहेत. संक्षींचा सल्ला मानून त्याने मन मानेल तसं वागायला सुरुवात केली. परिणामी त्याची नोकरी गेली. तरीही त्याने आपलं व्रत सोडलं नाही. महिन्याने त्याची बायको म्हणाली आज संध्याकाळी खायला काही नाही, तर मग याने काय सांगायचं की आत्ताचं बघ संध्याकाळची चिंता कशाला करतेस? भाड्याचं घर आहे पण भाडं भरलं नाही म्हणून घरमालकाने घर सोडायला सांगितलं आहे. या उदाहरणात त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कसं वागावं याचं मार्गदर्शन संक्षी किंवा ते जे सांगतात ते पटलेल्या/ समजलेल्या कोणीही करावे.
>> संक्षी असं काही म्हणत आहेत हा चुकीचा अर्थ काढला जातोय.
एकंदर कुणाही एखाद्या मनुष्याकडे पैसे कसे येतात? तर दुसर्याला तो काहीतरी मूल्य असलेलं देतो. पैशाची संकल्पना आहे की दुसर्याला उपयोगी पडेल असं स्वतःकडे काही मौल्यवान असणे. ती म्हणजे वेळ, कौशल्य, शारिरिक क्षमता, वस्तु, सेवा. ह्याच्या बदल्यात विनिमयाचं साधन म्हणून ह्या सेवा-वस्तु घेणारा चलन (पैसा) देतो. तर हा पैसा म्हणजे विनिमयाचं साधन आहे. म्हणजेच पैसा हे केवळ साधन आहे, (साध्य आपण स्वतः आहोत. आपण आहोत तर पैसा आहेच). इट्स जस्ट अ टूल. एखाद्याकडे पैसा मिळवण्याचे काहीही पर्याय असू शकतात. तुमच्या-माझ्याकडे बुद्धि-कौशल्य-कला वगैरे आहे, चोरदरवडेखोराकडे चाकू-बंदूक आणि बेडरपणा असतो. त्यामुळे पैसा मिळवणे हे काही फार कठीण काम नाही. ते कठिण होते जेव्हा त्याच्याकडे एक जबाबदारी म्हणून बघितले जायला लागले तर.. पैसे कमावणे कठीण आहे हे सतत आपल्या मध्यमवर्गीय कुटूंबांमध्ये बिंबवले जाते, आपले आई-वडील पैसे कमवायला कीती कष्ट पडतात हे पिढ्यांपिढ्या आपल्याला सुनवत असतात. हां, ते एक वेगळं की कठीण-सोप्या परिस्थिती येतात आयुष्यात, पण त्याचा आणि पैसा कमावण्याच्या क्षमतेचा किंवा पैसे भरपूर गाठीला असण्याचा संबंध नसतो. एकूणच पैसा गाठीला असणे, नसण्याने मनुष्य म्हणून आपल्या जगण्याच्या स्वच्छंदतेवर परिणाम होऊ नये असा संक्षि अर्थ सांगत आहेत.
आता तुमचे उदाहरण घेऊया. तुमचे उदाहरण हे पैसे नसतील तर सर्व संपले अशा अर्थाचे आहे. हे पैशाला शरण जाणे आहे. मुद्दा काय आहे? घरी खायला प्यायला नाही हा. घरी धान्य आणायचे तर काही हालचाल केली गेली पाहिजे. धान्य आणायचे तर पैसा लागेल, पैशासाठी काम करायला पाहिजे, काम म्हणजे जे दुसर्याला उपयोगी पडेल असे. त्यातून पैसा उपलब्ध होईल आणि त्यातून धनधान्य घरी येईल. ओक्के? हा रस्ता सर्वसामान्यपणे मान्य असतो. आता यात मनमानेल तसे वागणे म्हणजे चोवीस तास झोपून राहणे, चोवीस तास टीवी बघणे, असे नसते. ह्याला आळशीपणा म्हणतात. स्वच्छंदीपणा नव्हे. मनमानेल तसे ह्याचा अर्थ काम न करता टाइमपास करत फिरणे असा नाहीये. मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे. हा संक्षि सांगत असलेला अर्थ तुमच्या उदाहरणाशी म्याच करत नाही. तुमचे उदाहरण आळशीपणाचे आहे, स्वच्छंदीपणाचे नाही, त्यामुळे संक्षिंच्या जगात याचे उत्तर मिळणार नाही.
एक मला समजलेलं ते सांगतो. संक्षि जे म्हणत आहेत तो नदीचा किनारा आणि तुम्ही तिघे-चौघे जे म्हणत आहात तो नदीचा दुसरा किनारा. कर्मधर्मसंयोगाने मला दोन्ही किनार्यांची थोडाफार अनुभव आहे म्हणून आधीही तुमच्या धाग्यात म्हटले आहे की संक्षींचे म्हणणे तुम्हाला समजणार नाही, त्यांची भाषाच वेगळी आहे. संक्षिही अट्टाहासाने पटवल्याशिवाय सोडणारच नाही हा बाणा घेऊन बसलेत. त्यामुळे मूळ संकल्पनेवर चर्चा होण्यापेक्षा भाषाशैली आणि आयडींची व्यक्तिगत घमासान ह्यातच चर्चा भरकटत आहे असे वाटते.
30 Mar 2017 - 2:31 am | ट्रेड मार्क
मी तेच सांगतोय ना की मी एक काम स्वीकारलं आहे. ज्यात मला ज्याच्याबरोबर काम करायचं आहे ती माणसं सोमवार ते शुक्रवार रोज ८ ते ५ या वेळात उपलब्ध असणार आहेत. मी सुद्धा या वेळेत उपलब्ध असावं अशी अपेक्षा आहे. मग ओझं म्हणून नव्हे तर त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी ही वेळ पाळणे बंधनकारक ठरते. पैसे मिळवणं या पेक्षा मी दिलेली कमिटमेंट पाळणं महत्वाचं आहे ना?
प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या भाषेत टाइम अँड मटेरियल आणि फिक्स बिड असे प्रकार असतात. टाइम अँड मटेरियल मध्ये वरील उदाहरण बसू शकतं. आता फिक्स बिड प्रकारात समोरची व्यक्ती म्हणते एक काम आहे जे X दिवसात पूर्ण करायचं. मी ते स्वीकारतो, यात जर मी कोणावर अवलंबून नसेन तर मग मला दिवसातल्या ठराविक वेळीच काम केलं पाहिजे हे बंधन नसणार, मी X दिवसात काम पूर्ण करण्याशी मतलब असेल.
संक्षी स्वतःचा व्यवसाय एकट्याने करतात, त्यामुळे मनाला येईल तेव्हा काम करणे त्यांना शक्य आहे. पण नोकरी करणाऱ्याला तू माझ्यासारखं करून दाखव नाहीतर तुझ्या जीवनाला अर्थ नाही हे सांगण्यात काय हशील आहे?
मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे.
बरोबर. मी तेच तर करतोय हे मी उदाहरणाने सांगितलं आहे. मला वाटेल तेव्हा मी सुट्टी घेतो, ऑफिसच्या वेळेत बायकोबरोबर लंचला सुद्धा जातो. पण मला ती सोय आहे म्हणून सगळ्यांनाच असेल असं नाही. किंबहुना माझ्याच बरोबर काम करणाऱ्यांनासुद्धा असेल असं नाही. मलाही कायम उपलब्ध असेल असंही नाही. फरक व्यवसायाच्या फॉरमॅटमध्ये आहे. मी एखाद्या डॉक्टरला डिवचलं की काय तुझं आयुष्य कॉल आला की जायला लागतं, तर तो माझी कीव करेल. इथले CPA फेब्रुवारी ते जून मरेस्तोवर काम करतात मग उर्वरित महिने निवांत असतात. त्यातल्या एखाद्याला मी म्हणलं दर महिन्याला एक बाहेरची ट्रिप आणि आठवड्याला एक पार्टी करू (उदाहरण चुकलं का?) तर या ५ महिन्यांच्या काळात येईल का? हां, व्यवसाय सेम असल्याने संक्षी याच्याशी तुलना करू शकतात. पण तरीही असलेल्या जबाबदाऱ्या, वय, आवड यामुळे फरक राहणारच.
एकूणच पैसा गाठीला असणे, नसण्याने मनुष्य म्हणून आपल्या जगण्याच्या स्वच्छंदतेवर परिणाम होऊ नये असा संक्षि अर्थ सांगत आहेत.
अध्यात्मिक उपदेश म्हणून बरोबर आहे. आता माझे प्रतिसाद वाचून तुम्हाला कळलं असावं मी काय काय करतो. आता यात तुम्हाला मी माझ्या मनाप्रमाणे जगत नाही असं वाटतं का? मी एकटा काम करत नसल्याने दिवसात ज्या मिटींग्स ठरवलेल्या असतात त्या अटेंड करणे मी स्वीकारलेल्या जबाबदारीचा भाग आहे. यातही मी आज येणार नाही हे मी सांगू शकतो. मला एकट्याने जे काम करायचं आहे ते दिवसाच्या याच वेळेत करायचंय असं बंधन नाहीये. पैश्याचा विचार न करता मला पाहिजे ते मी करू शकतो. फक्त मी मनाला आलं म्हणून रिबॉक असं लिहिल्यामुळे १००० रुपयाला मिळणारे मोजे घेणार नाही. थोडक्यात आवडीचं आहे आणि जबाबदारी म्हणून जे काम माझ्याकडे आहे ते मी करतो, त्याबदल्यात मला पैसे मिळतात. त्यावर अजून जास्त पैसे मिळावे म्हणून मी बाकी सगळं सोडून पैश्याच्या मागे धावत नाही. फक्त जे खर्च मी करणार आहे ते तारतम्याने करतो. पैसे जे हातात आहेत ते योग्य ठिकाणी गुंतवतो. एक फ्लॅट कर्ज काढून घेतला, ते ४ वर्षात फेडून टाकलं. त्या ४ वर्षांत बाकी लाईफस्टाईलमध्ये फरक नव्हता. आता अजून एक तयार होतंय (दुसरं घेऊन किमती वाढवल्याबद्दल आधीच दोष स्वीकारतो). तेही कर्ज फार नाही. पण मग यात माझं आयुष्य निरर्थक वाया चाललंय का?
संक्षि जे म्हणत आहेत तो नदीचा किनारा आणि तुम्ही तिघे-चौघे जे म्हणत आहात तो नदीचा दुसरा किनारा
माझा किनारा कसा छान आहे आणि तुमचा किती घाण आहे असं ते नुसतंच खिजवत आहेत. आम्ही त्या किनारी कसं यायचं याचं मार्गदर्शन करायला सांगितलं की आत्ताचा क्षण महत्वाचा, आहे नाही ते सगळं सोडून या किनारी यायचं म्हणतात. ते तिथे कसे गेले यावर मला साक्षात्कार झाला म्हणतात. पण नदीत मगरी आहेत त्यांना कसं टाळायचं, होडी कशी बांधायची, कुठे पूल आहे का हे सांगत नाहीत. वर खिजवणं आहेच. आम्ही कुठलाही किनारा तर सोडाच पण नदीत गटांगळ्या खाणारे यःकश्चित मानव आहोत. किनाऱ्याला कसं लागायचं तेच तर कळत नाहीये. तुम्ही अर्धवट का होईना किनाऱ्याला लागलेले दिसताय, जरा हात द्या की आम्हाला.
30 Mar 2017 - 11:37 am | संदीप डांगे
तुमच्याशी असहमतीचा प्रश्न येत नाहीये. माझी विचारधारा अशी आहे की प्रत्येक मनुष्य हा स्वतंत्रपणे वेगळा आहे, ज्याच्या त्याच्या इच्छा आकांक्षा ह्या इतरांपेक्षा वेगळ्या असू शकतात, इंडिव्हिज्युअलीजम मी मानतो. त्यामुळे तुम्ही माझ्यासारखे आयुष्य जगूच शकत नाही हे मी तरी म्हणणार नाही कारण तसे म्हणणे शुद्ध बावळटपणा आहे.
Every life is different. एवढे मला कळते व तेवढेच पुरेसे आहे असे वाटते.
बाकी संक्षि काय म्हणत आहेत व त्याचा सविस्तर अर्थ नंतर कधीतरी... आज के लिये इतना बस! :-)
30 Mar 2017 - 3:22 am | उदय
पैसा मिळवणे हे काही फार कठीण काम नाही.
"If wishes were horses, beggars would ride."
मन मानेल तसे म्हणजे मला हवे तितके पैसे मिळवायला मला किती काम कुणाचे करुन द्यायला लागेल तेवढे प्रयत्न करणे, आणि ते करत असतांना मनावर जबाबदारीचे कोणतेही दडपण नसणे. करत असलेले काम आवडीने करणे, रस घेऊन करणे, क्षण आणि क्षण आनंदात जगणे.
बरं, मी जर म्हणालो की हे मी करतो तर तुम्ही मला किंवा इतर कुणाला "आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र" म्हणाल का? (हा धागा आर्थिक स्वावलंबनाबद्दल आहे, हे लक्षात घ्या.)
30 Mar 2017 - 11:21 am | संदीप डांगे
नक्कीच! शेवटी ती एक मनाची अवस्था आहे, ज्याने ती ओळखली व अंगिकारली तो स्वतंत्रच आहे.
बाकी, ते होर्सेस बेगर्स काही कळलं नाही, समजावू शकाल काय?
31 Mar 2017 - 2:04 pm | अर्धवटराव
30 Mar 2017 - 9:16 am | पैसा
वा वा! इडो, तुझा धागा मस्त धावतो आहे बै!
अवांतरः ( मी जर संपादक असते तर एवढ्या प्रतिक्रिया आल्या म्हणून तुझा आनंद फार टिकू दिला नसता.)
=)) =))
30 Mar 2017 - 10:22 am | इडली डोसा
पैसाताई तुम्ही तुमचे अनुभव पण लिहा ना.
30 Mar 2017 - 10:51 am | पैसा
नक्को ग बै! एवढे मोठमोठे लोक लिहीत असताना आमच्यासारख्या क्षुद्र लोकांनी तोंड उघडू नये. लै मज्जा येते आहे इथे. =))
30 Mar 2017 - 9:41 am | एमी
अजानुकर्ण, चतुरंग, संदीप डांगे >> +1
31 Mar 2017 - 6:04 am | आजानुकर्ण
मी दिलेलं उदाहरण अपवादात्मक आहे असं माझ्या निरीक्षणात कुठंही दिसलं नाही. मी शाळेत असताना चांगल्या कॉलेजला अॅडमिशन मिळालं की मी सुखी होईल असं वाटायचं. कॉलेजमध्ये ३-४थ्या वर्षी चांगल्या कंपनीत प्लेसमेंट झाली की सुखी होईल असं वाटायचं. कंपनीत जॉब सुरु झाल्यावर प्रमोशन मिळालं की सुखी होईल असं वाटायचं. प्रमोशन झाल्यावर किमान एकदोन वर्षंतरी ऑनसाईट पाठवल्यावर सुखी होईल असं वाटायचं. प्रोफेशनल बाबतीत जे टारगेट्स आहेत तसेच वैयक्तिक आयुष्यातही होते. लग्न झाल्यावर, वजन कमी केल्यावर, बीएमआय कंट्रोलमध्ये आणल्यावर, घर घेतल्यावर वगैरे वगैरे सगळं यथास्थित होऊनही जर कायम पुढच्या लक्ष्याकडे लक्ष ठेवून जगणं सुटलेलं नाही. गंमत म्हणजे घर, कुटुंब, लग्न, नोकरी, शिक्षण, परदेशप्रवास, प्रमोशन, डॉलर्समध्ये पगार, वगैरे सर्व गोष्टी मनासारख्या मिळाल्यावरही गावात राहत असताना मित्रांबरोबर गोट्या खेळायचो ते दिवस सर्वात आनंदी होते असं वाटतंय.
त्यामुळं आहे त्या परिस्थितीत जर तुम्ही मनसोक्त, सुखी, स्वावलंबी जगत आहात असे वाटत नसेल तर अमुकतमुक आकडा गाठल्यावर तसे जगाल ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे.
शिवाय किमान भारतासारख्या अर्थव्यवस्थेत 4% सेफ विथड्रॉवल रेट वगैरे रेकमेंडेशन अत्यंत बंडल आहे. वेड फाऊ (ज्यांनी या सेफ विथड्रॉवल रेटवर बराच अभ्यास करुन अमेरिकेसाठी 4%च्या निष्कर्ष काढलाय) यांचा इमर्जिंग मार्केटबद्दलचा रिपोर्ट इथे आहे. त्यात 3% पेक्षा कमी रेट सांगितलाय.
http://international-pension-workshop.com/wp-content/uploads/papers-9/ME...
हे सगळं करुन उद्या भूकंप झाला, पाकिस्तानने अणुबाँब टाकला, आपण राहतोय त्या गल्लीत दहशतवादी हल्ला झाला तर या सगळ्या प्लॅनिंगची बोंब होण्याची शक्यता आहे ते वेगळेच.
अधिक विस्ताराने वाचायचं असेल तर हे पुस्तक चांगलं आहे.
https://www.amazon.com/Unveiling-Retirement-Myth-Jim-Otar/dp/0968963420
31 Mar 2017 - 10:55 am | संजय क्षीरसागर
त्यामुळं आहे त्या परिस्थितीत जर तुम्ही मनसोक्त, सुखी, स्वावलंबी जगत आहात असे वाटत नसेल तर अमुकतमुक आकडा गाठल्यावर तसे जगाल ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे.
याचं कारण फार साधं आहे. भविष्यकाल हे मनाचं मृगजळ आहे. ते गाढवासमोर त्याच्या दोन कानांच्या मधोमध, वर बसलेल्या मालकानं धरलेल्या गाजरासारखं आहे.
गाढव कितीही चाललं तरी गाढव आणि गाजर यातलं अंतर कायम राहील.
आणि सर्वात मोठा पॅराडॉक्स म्हणजेते गाजर (भविष्यकालीन आनंदाची आशा), आपणच स्वतःसमोर धरलंय
! पण इतकी साधी गोष्ट सुद्धा ज्याला कळत नाही त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही.गंमत म्हणजे घर, कुटुंब, लग्न, नोकरी, शिक्षण, परदेशप्रवास, प्रमोशन, डॉलर्समध्ये पगार, वगैरे सर्व गोष्टी मनासारख्या मिळाल्यावरही गावात राहत असताना मित्रांबरोबर गोट्या खेळायचो ते दिवस सर्वात आनंदी होते असं वाटतंय.
यात थोडीशी सुधारणा हवी. जसा भविष्यकाल कधीही येत नाही तसाच
भूतकाल मृत व्यक्तीसमान आहे, त्याच्या आठवणी खेरीज त्याचा कुठेही लवलेश नाही.
नाऊ इट इज अप टू अस, गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत वर्तमान व्यर्थ करायचा की `इट इज ओके' म्हणूनसांप्रत क्षणाचा उत्सव करायचा.
31 Mar 2017 - 2:49 pm | अर्धवटराव
काहि ऑब्सर्व्हेशन्स.
०) पैशाची साठवण करुन त्यात भविष्यकालीन सुरक्षा शोधण्याचं मूळ कदाचीत आपल्या जेनेटिक्समधे कोरलं गेलय. आपल्या शरीरात चरबी साठवली जाते, थोडंफार तसच. वर डांगेसाहेब म्हणातात तसं पैसा हे विनियोगाचं साधन आहे, वस्तु व सेवेची गॅरंटी आहे. अनाकलनीय भविष्याच्या सोयीसाठी हि गॅरंटी साठवुन ठेवावी असं वाटणं अगदी स्वाभावीक आहे, नैसर्गीक आहे.
१) ज्याला खरच पैशाची किंमत कळते त्याला पैशाचं मानवी आयुष्यातलं स्थान देखील कळतं, 'पुरेसा' पैसा म्हणजे किती हे सुद्धा कळतं, थोडं कमि-जास्त झालं तर सावरायचं कसं हे देखील कळतं.
२) बरेचदा, किंबहुना बहुतांशवेळी, आपल्या आयुष्यातलं पैशाचं महत्व इतरांनी ठरवुन दिलेलं असतं. कुटुंब, समाज, मित्रं परिवार... असं सगळं मोहोळ कारणीभूत असतं. पुर्वायुष्यात थंड डोक्याने 'ऐकावे जनाचे पण करावे मनाचे' हा फंडा वापरणे फार कमि लोकांना जमते. त्यामुळे आपला स्वभाव, महत्वाकांक्षा, जगण्याची रीत हे सगळं पैशात ट्रान्स्लेट करत बसण्यात वेळ जातो. हे ज्याचं त्याला कळणं सर्वात महत्वाचं असतं.
३) सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्यावर असलेल्या खर्या-खोट्या जबाबदारीच्या कल्पना. त्यातलं वास्तव किती, काल्पनीक किती याचा उलगडा व्हायला देखील शांत डोक्याने विचार करणं गरजेचं असतं.
४) प्रॅक्टीकली माणसाने शक्य तेव्हढं लवकर पैसा मिळवणं सुरु करावे व अगदी सुरुवाती पासुन १/३ कमाईची इन्व्हेस्टमेण्ट, १/३ कमाई दैनंदीन जगणं, १/३ कमाई आपले छंद, ऐय्याशी इ. करता खर्च अशी सवय लावावी. यामुळे मुद्दा क्र. १ चे आर्थीक शक्याशक्यतेचे वास्तवीक आकडे समोर यायला फार मदत होते.
५) आर्थीक नियोजनातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे व्यावसायीक महत्वाकांक्षा होय. जिथुन मिळेल तिथुन हा महत्वाकांक्षेचा किडा विकत घ्यावा, त्याच्या कडुन स्वतःला चावुन घावं आणि त्या जखमेच्या दु:खाचं स्मरण ठेवत घोडदौड करावी.
६) हे सगळे मनाचे खेळ आहेत याचं नित्य स्मरण ठेवावं.
जय जय श्री लक्ष्मीनारायण गोविंद :)
1 Apr 2017 - 1:07 am | ट्रेड मार्क
बहुतेक माणसं परिस्थितीनुरूप वागत असतात. भूतकाळ मृत व्यक्तीसमान आहे म्हणलं तरी त्यातल्या आठवणी उगाळत बसू नये, पण त्यातून मिळालेले अनुभव कधी विसरू नये या मताचा मी आहे. थोडक्यात त्या अनुभवांचा सद्य परिस्थितीत वापर करता येऊ शकतो आणि परिस्थिती हाताळायला मदत होऊ शकते.
आपल्या आयुष्यापुढे पैसा दुय्यम आहे यात शंका असायचं काहीच कारण नाही. आजार बळावला असताना पैसे वाचवायचे म्हणून डॉक्टरकडे जाणार नाही असं म्हणणारे लोक विरळाच असतील. पण त्याचबरोबर सर्दीपडश्यासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाणे हाही मूर्खपणाच आहे.
पुढच्या क्षणी आपण असू की नाही याची कोणालाच खात्री नाहीये. भविष्यकाळ हे गाजर म्हणण्यापेक्षा (लांबच्या) भविष्यकाळात मला एवढे पैसे पाहिजेत याला गाजर म्हणणं योग्य ठरेल. तरीही तारतम्य राखणे आवश्यकच आहे. म्हणजेच रिटायरमेंटची तरतूद करायची म्हणून आत्ता मन आणि पोट मारून जगण्यात अर्थ नाही. आत्ता सुद्धा छान मनासारखं जगा, आवडीच्या गोष्टी करा, खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा मिळतो. हाती उरतील ते नीट गुंतवून ठेवा. याउलट, उद्या कोणी बघितलाय असं म्हणून आज सगळं उधळून टाकणं हाही मूर्खपणा आहे.
आजानुकर्ण म्हणतात ते वाटणं त्या त्या वयात बरोबरच आहे. कॉलेजमधल्या तरुणाला भविष्याची स्वप्न बघू नको हे सांगणं कितपत संयुक्तिक आहे? लग्नाळू मुलाला सांगून आलेली मुलगी चांगली आहे का नाही हे कुठे बघत बसतो, पुढचं कोणी बघितलंय? लग्न चालेल तेवढं चालेल, आत्ता तर मजा करून घे असं कोणी हितचिंतक सांगेल? चांगली नोकरी करणाऱ्या, नुकतंच लग्न झालेल्या पण आईवडिलांची जमापुंजी त्यांच्यासाठीच राहूदे अशी इच्छा असलेल्या मुलाला ५०-६० लाख रुपये एकरकमी नाहीत म्हणून फ्लॅट न घेता भाड्याच्या घरात रहा हे सांगणं किती योग्य आहे? एवढंच काय, थोडे पैसे जमले की घेऊ आपलं घर या विचाराने बायकापोरांसकट दर एक दोन वर्षाने घर बदलायला लागलेल्या माणसाला कशाला पाहिजे स्वतःच घर हे सांगून बघा.
बहुतेक सगळ्यांचं लहानपण आनंदी असतं कारण तुमची चिंता करणारं दुसरं कोणीतरी असतं. त्या वयात आनंद व्हायला छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा पुरेश्या असायच्या. सुखी असणं आणि आनंदी असणं यात थोडातरी फरक आहे. पैश्याची तंगी असताना आणि ते मिळवण्यासाठी झगडतानाही एखाद्या संध्याकाळी बायकोसाठी थोडा वेळ काढून, एक छान गजरा घेऊन फिरायला जाणं यातला आनंद पैश्यात मोजता येणार नाही. तेवढा आनंद कदाचित भरपूर पैसे असताना ठरवून पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्यावरही मिळणार नाही.
स्वच्छंद म्हणजे काय फक्त मनाला येईल तेव्हा झोपून उठणं, इच्छा होईल तेव्हा काम करणं, सुट्टी घेणं, फिरायला जाणं यातच आहे का? आपल्या आवडीचं काम करायला मिळणं, स्वतःसाठी वेळ देता येणं, आपला छंद जोपासता येणं, आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ व्यतीत करता येणं, भविष्याच्या ओझ्याखाली दबून न जाणं हे स्वच्छंदी जगणं नाहीये? प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप वेगळे, त्यानुसार आलेली बंधनं वेगळी, गरजा वेगळ्या असतात. मग एखाद्या नोकरी करणाऱ्याने व्यवसाय करणाऱ्याला बघ मला कसे महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतात असं हिणवण्यात किंवा एकटं काम करणाऱ्या व्यावसायिकाने मला कसं पाहिजे तेव्हा काम करता येतं असं नोकरी करणाऱ्याला हिणवण्यात काय अर्थ आहे?
भविष्याची चिंता किंवा सोय करण्यापेक्षा मी बघा कसा जगतो आणि तुम्ही सगळे कसे बेकार जगताय हा अहंगंड जास्त वाईट आहे असं माझं मत आहे. तसंही स्वतःकडे सगळे पैसे नसताना आईवडिलांची पुंजी वापरून मग त्यावर बढाया मारणाऱ्याकडून कर्ज न घेता घर कसं घ्यावं या सल्ल्याची अपेक्षा चुकीचीच होती म्हणा.
असो. उम्मीद पे दुनिया कायम है म्हणतात ते काय उगाच का?
1 Apr 2017 - 3:12 am | वीणा३
ट्रे मा दादा, मला बरेचदा लॉगिन करून प्रतिक्रिया द्यायला जमत नाही. पण संक्षी च्या उत्तरामुळे तुम्ही थोडेसे वैतागलेले दिसतंय (मीही मागे त्यांना १-२ वेळा प्रश्न विचारून वैतागले होते ) अस तुमच्या २-३ प्रतिक्रियांवरून वाटलं म्हणून हि प्रतिक्रिया.
संक्षी सतत सांगत असतात कि "जे जगतो तेच लिहितो" आणि तो खूपच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे बरेचदा त्यांच्या जगण्याच्या बाहेरचे प्रश्न विचारले कि उत्तर मिळत नाही (म्हणजे ते देतात पण ती इथे कोणालाही समजली आहेत अस वाटत नाही). बरेचदा मला असाही वाटतं कि त्यांना प्रॉब्लेम समजत नाही कारण ते तो प्रॉब्लेम "जगले" नाहीयेत.
मला वाटत कि जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही गटात बसत असाल तर संक्षी ना तुमचे प्रॉब्लेम्स कधीच समजणार नाहीत, त्यांची उत्तर चंद्र ताऱ्यांवर जातील.
१. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गट-कार्यात (team activity ) काम करत असाल / तुम्ही केलेल्या कामावर दुसऱ्याचा काम अवलंबून असेल - यात वेग-वेगळी ऑफिस आली, अक्खी manufacturing इंडस्ट्री आली फिल्म इंडस्ट्री आली, अक्खी हॉटेल आणि सर्विस इंडस्ट्री आली (आणि असंख्य प्रकारच्या नोकऱ्या / व्यवसाय आले)
२. तुम्ही एखाद्या हॉस्पिटल / अग्निशमन दल / सैन्य दल - कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन नोकर्यांमध्ये असाल
३. तुमच्यावर एखाद्या व्यक्तीची जबाबदारी असेल (नुसते पैसे पुरवणं नाही तर वेळ सतत द्यावा लागण ) - लहान बाळ असेल / शाळेत जाणार मूळ असेल / वृद्ध असतील ज्यांना वेळेवर औषध द्यायला लागतं सतत बघायला लागत
या प्रकारामध्ये पैसे हा मुद्दा नसला तरी वेळ हा आहे, तुम्ही कधीच तुम्हाला हवं ते त्या क्षणी करू शकणार नाही, थोडाफार प्लँनिंग करावच लागेल.
आणि
४. जर तुम्हाला तुमच काम खरंच मनापासून आवडत असेल, त्यात तुम्हाला पैसे मिळत असतील पण जरी नाही मिळाले / कमी मिळाले तरी तुम्ही ते जब्बरदस्त एन्जॉय करत असाल. - मागे कोणीतरी इथे हेच सांगितलं, आणि त्यांना बरेच शब्द उत्तर म्हणून मिळाले :P )
ज्या लोकांचा पैसे हा मुद्दा आहे (मागे कुणीतरी हॉस्पिटल मध्ये मुलीच्या इलाजासाठी पैसे नसल्याचं उदाहरण दिलं होत), त्यातही उत्तर मिळणार नाही. कारण पैशाचा तुटवडा हा प्रॉब्लेम ते (बहुधा ) "जगले" नाहीयेत. त्यांचे आत्तापर्यंतच्या कुठल्याही विषयावरचे प्रतिसाद तेव्हाच ठीक वाटतात, जेव्हा ते तो विषय जगलेले असतात (त्यांची कविता/ गजल इ वरची रसग्रहण वाचनीय (थोडी शब्दबंबाळ तरीही )असतात).
त्याचे अध्यात्मावरचे प्रतिसाद / विचार संपूर्ण चुकीचे नाहीयेत असा अनेक लोकांनी इथे बरेचदा सांगितलंय. फक्त ते ज्या पद्धतीने सांगतात ती बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटते आणि त्यातून वाद वाढतात. त्यात ते भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया (ज्यात काही गोष्टी कदाचित सगळ्यांना पटू शकतात), वादग्रस्त होतात.
माझ्या आसपास असंख्य उदाहरण आहेत कि ज्यात सगळ्या प्रॅक्टिकल (पैसे, वेळ तब्ब्येत ) गोष्टी उत्तम असूनही लोक सतत चिंतेत असतात, त्यांनि संक्षीचे (खरंतर इतर अनेकानी आधीच सोप्या शब्दात सांगितलेले आहेत, पण ते हे मान्य करणार नाहीत ;) ) विचार नक्की वापरावेत असं वाटत. पण त्याच बरोबर अनेक लोक संक्षी प्रमाणेच विचार करून जगत असतात (फक्त त्याची जोरदार आणि शब्दबंबाळ जाहिरात करत नाहीत) हे सुद्धा दिसत.
अजून सहज काही मनात आलेले मुद्दे पण लिहायचा कंटाळा
१. इथेच मिपा वर खूप वर्षांपूर्वी वाचलेल "दुर्लक्ष हि सर्वात मोठी शिवी आहे". हे माझ्या अतिशय आवडत्या आणि life-changing वाक्यांपैकी एक आहे.
२. व्यासंग आणि छंद ह्यात खूप फरक असतो. खूप म्हणजे खूप जास्त. माझ्या मते व्यासंग म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन तर छंद म्हणजे गणपतीत / घरातल्या छोट्याश्या मैफिलीत जमेल तसा पण आवडीने तबला वाजवणारा घरातलाच कोणीतरी.
३. स्वतःच्या आवडीनिवडी, आयुष्य जगायची पद्धत, सवयी, विचार ह्या बाबतीत स्वतःला पटेल तसंच वागावं, उद्या काही बदल केला तरी फक्त आणि फक्त स्वतःला पटला म्हणूनच करावा, आणि कुणालाही त्याचं स्पष्टीकरण द्यायला जाऊ नये, पाहिलं वाक्य वापरावं.
बाकी या सगळ्या गोंधळात मूळ लेख (आणि त्यात दिलेल्या लिंक्स) हा चांगला आणि माहितीपूर्ण आहे. त्याबद्दल लेखिकेचे धन्यवाद.
1 Apr 2017 - 8:29 am | पैसा
उत्तम निरीक्षण. ट्रेडमार्कबद्दल सहानुभूती आहे.
हल्ली संपादक मंडळ आयडी बहुधा वापरात नसावा. तेव्हा जर आपला अपमान झाला असे कोणाला वाटले तर त्यानी संपादकांच्या वैयक्तिक आयडींना प्रतिक्रियांच्या लिंका पाठवून तक्रार नोंदवावी. तिथे दखल घेतली नाही तर नीलकांतला कळवावे. इथे एकाचा अपमान हा इतर अनेकजणांची करमणूक असू शकते हे लक्षात घेऊन हल्ली मी अशा धाग्यांपासून लांब रहाते. तसाही इथे काही बोलून उपयोग कधी नसतोच. चर्चेतून कोणी आपली मते बदलील ही शक्यता आंतरजालावर फार कमी. तेव्हा आपला वेळ आणि टंकन कष्ट अधिक विधायक कामासाठी वापरावेत.
1 Apr 2017 - 1:48 pm | संजय क्षीरसागर
तुमचा प्रतिसाद आहे म्हणून उत्तर देतो. अत्यंत निष्पक्षपणे वाचलं तर उपयोग होईल :
पाच वर्षापूर्वी तुम्ही म्हटलंय :
१)
हा दृष्टीकोन मला फारसा व्यवहारी वाटत नाही. कदाचित याची पुढील कारण असू शकतील.
१. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला उद्या यायची सवय झालीये....
.....आणि आजही त्यात फरक नाही. यापेक्षा मानसिकता न बदलण्याचा दुसरा उघड उदाहरण काय हवं ? हीच मानसिकता
आज
बदलावी लागते ! अदरवाइज व्यक्ती फक्त उद्याकडे डोळे लावून जगते आणि ही `उद्याची सवय
' म्हणजे`स्वप्नांची वाट आहे
'.२)
बरेचदा मला असाही वाटतं कि त्यांना प्रॉब्लेम समजत नाही कारण ते तो प्रॉब्लेम "जगले" नाहीयेत.
उलट आहे. मी प्रश्न मुक्त आहे ! कारण आय डोंट हॅव अ टुमारो .
आणि मजा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न फक्त डोक्यातच आहेत ! ज्या अर्थी सदस्य इथे टाईमपास करु शकतो म्हणजे त्याचं पोट भरलेलं आहे ! इतकी उघड गोष्ट तरी निदान निर्विवाद आहे.
३)
मला वाटत कि जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही गटात बसत असाल तर संक्षी ना तुमचे प्रॉब्लेम्स कधीच समजणार नाहीत, त्यांची उत्तर चंद्र ताऱ्यांवर जातील.....
नीट वाचलात तर तुमचंच गृहित तुम्हाला बालीश वाटेल. हे सर्व जग परास्परावलंबी आहे. माझे क्लायंटस माझ्यावर अवलंबून आहेत, मी त्यांच्यावर आहे. माझ्या संसाराचंही तेच आहे, अँड सो ऑन. फक्त आगीचे बंबवाल्यांना वगैरे इमर्जन्सी असते असं वाटणं ही वैचारिक मर्यादा आहे.
४)
कारण पैशाचा तुटवडा हा प्रॉब्लेम ते (बहुधा ) "जगले" नाहीयेत.
हा ज्योक वाटतोयं का पाहा. मी राजघराण्यात जन्मलोय असं वाटतंय का ?
एक गोष्ट नक्की, मला पैश्याचा
मानसिक तुटवडा नाही
जो इतरे जनांना कायम भासतो. कारण उद्याची किंवा कोणतीही कल्पना मला दहशत घालू शकत नाही.५)
इथेच मिपा वर खूप वर्षांपूर्वी वाचलेल "दुर्लक्ष हि सर्वात मोठी शिवी आहे
म्हणून तर मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही ! आणि ज्यांनी प्रतिसादातून आपले सभ्यतेचे संस्कार , प्रच्छन्नपणे दाखवले (आणि पुन्हा उलटी बोंबे मारतायंत) त्यांना पूर्णपणे बेदखल केलंय.
६)
व्यासंग आणि छंद ह्यात खूप फरक असतो.
तुम्हाला उपयोगी होईल म्हणून सांगतो, छंदाचाच पुढे व्यासंग होतो. जे स्वतः कडून, डायरेक्ट झाकीरसारखा तबला, सुरुवातीलाच वाजावा अशी अपेक्षा ठेवतात, ते जन्मात तबलाच वाजवू शकत नाहीत.
७)
त्याचे अध्यात्मावरचे प्रतिसाद / विचार संपूर्ण चुकीचे नाहीयेत असा अनेक लोकांनी इथे बरेचदा सांगितलंय. फक्त ते ज्या पद्धतीने सांगतात ती बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटते आणि त्यातून वाद वाढतात. त्यात ते भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया (ज्यात काही गोष्टी कदाचित सगळ्यांना पटू शकतात), वादग्रस्त होतात.
आता हे खरं तर तुम्ही आऊट ऑफ काँटेक्स्ट लिहीलंय . त्यामुळे
भलत्या धाग्यावर भलत्या गोष्टी बोलतात
हे याला अॅप्लिकेबल होतंय का पाहा.तरी तुम्ही विषय काढलायं म्हणून लिहीतो. माझे प्रतिसाद कळायला काही सदस्यांना पाच वर्ष लागली, काहींना आणखी पाच लागतील आणि काहींना समजणारच नाहीत. ओशो म्हणायचे `आय कांट डायल्यूट मायसेल्फ फरदर, यू विल हॅव टू रेज योरसेल्फ टू अंडरस्टँड मी'. मीही तेच सांगतो.
ज्या अर्थी आयुष्य जगलेले आणि प्रत्यक्ष उदाहरणं पाहिलेले सदस्य विचारसरणी मान्य करतात (अर्थात त्यांची मान्यता मला उपयोगी नाही कारण मी तर ऑलरेडी तसं जगतोच आहे)......
त्या अर्थी, अजून स्वप्नपूर्ती न झालेले किंवा त्या वाटेवर चालू इच्छिणारे काय म्हणतायंत याला शून्य अर्थ आहे.
3 Apr 2017 - 6:26 pm | ट्रेड मार्क
माझा आक्षेप फक्त "मी जगतो तेच फक्त खरं जगणं आणि बाकीचे जगतात ते लोढणं" या वृत्तीला आहे. प्रत्येक मनुष्य आणि त्याची परिस्थिती पूर्णतः वेगळी असते. जर तुम्ही एखाद्याला मार्गदर्शन करू शकत नसाल तर खिजवू तरी नये. खरंच मार्गदर्शन करत असाल आणि साध्या सरळ भाषेत समजत नसेल तर अगदी शिव्या देऊन केलं तरी चालेल.
बाकी तुम्ही म्हणालात ते १००% बरोबर आहे.
1 Apr 2017 - 6:34 am | कंजूस
टोटल करमणूक धागा ट्याक्स फ्री!!
11 Apr 2017 - 4:38 am | रुपी
छान लेख. गुंतवणूकीबद्दल नक्कीच मला बरेच शिकायचे आहे. या लेखात दिलेल्या लिंक्स आणि पुस्तके यांसाठी धन्यवाद!