नाना पाटेकरशी एकदा चित्रपटकथेवर चर्चा झाली होती. तेव्हा तो म्हणाला होता की सर्वोत्तम कथा ती, की जीचा जीव एका वाक्यात सांगता येतो.
ती सध्या काय करते ? एका वाक्यात सांगायची तर, ती सध्या काहीही करत असू दे, समोरासमोर आल्यावर, आपण जे तेव्हा बोलू शकलो नाही ते आठवून आणि अवघडून जाऊन, अजून दूर जाण्यापेक्षा, आज ते बोलून, दोघातलं प्रेम तितक्याच उत्कटतेनं आणि अपराधशून्य मनानं जपून, आपण एकमेकांशी सुहास्यवदनानं बोलू शकतो.
इतकी साधी स्टोरीलाईन सतीश राजवाडेनी जी काय बेहद्द रंगवलीये ती भान विसरुन पाहात राहावी अशी आहे.
संजीव अभ्यंकर एकदा म्हणाला होता की गोष्ट साधीशी असते. बोललो तर ती एका वाक्यात सांगता येईल, गाण्यात रंगवून ती तीन मिनीटांची करता येईल आणि रागदारीत तिचा तास-दिड तासाचा माहौल करता येतो. ही महौल रंगवण्याची प्रक्रिया सृजनशीलता आहे. सतीश राजवाडेनी प्रत्येक संवेदनाशिल मनाच्या कोपर्यात लपलेली एक साधीशी गोष्ट दोन-अडीच तास रंगवलीये. चित्रपट हा मनोरंजनाचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे मूळ कथा सतीशची आहे पण तीची चित्रपटकथा मनस्वीनी रविंद्रनी केलीये. हा स्क्रीन प्ले म्हणजे मूळ कथा साधारण २२/२३ प्रवेशात (फ्रेम्समधे) रुपांतरीत केली जाते. पटकथा म्हणजे चित्रपटाचा प्राण असतो. मनस्वीनीनं ते काम एकदम भारी केलंय.
राजू हिरानी सारखा दिग्गज म्हणतो की खरा चित्रपट एडिटरच्या टेबलवर तयार होतो. म्हणजे पटकथेचे हे २२/२३ प्रवेश कसे अरेंज करावे, त्यांची एकमेकात गुंफण कशी व्हावी आणि प्रत्येक फ्रेमगणिक चित्रपट क्लायमॅक्सकडे कसा नेला जावा हे एडिटरचं कौशल्य आहे. चित्रपटाचा फायनल इंपॅक्ट काय होणार ते सरते शेवटी एडिटींगवर अवलंबून आहे. राहूल भटनाकरनं ते काम इतकं उत्कृष्ठ केलंय की बोलता सोय नाही.
चित्रपट तीन लेवल्सवर घेतलायं. नुकत्याच वयात येऊ लागलेल्या अनुराग आणि तन्वीतलं, वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षात उमलणारं प्रेम. म्हणजे नक्की काय ते न कळणारं पण तरीही ओढ लावणारं एक मोहक आकर्षण. हा भाग खुद्द सतीशच्या मुलानं म्हणजे हृदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्नीहोत्रीनं अक्षरशः अफाट रंगवालायं. दोघांनी इतकी भारी कामं केलीयेत की आपण आपल्या बालपणाच्या नॉस्टालजीयात जातो. कुठेही अवघडलेपणा नाही, यत्किंचतही सवंगता नाही आणि तरीही उत्सुकता आणि कथेचा प्रवाह ओघवता ठेवणारा सुरेख अभिनय या दोन्ही बालकलाकारांनी केलायं.
दुसर्या लेवलवर कॉलेजच्या वयात आलेल्या अनुराग आणि तन्वीतलं प्रेम आहे. आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे ही पात्र योजना इतकी उत्तम जमून गेलीये की चित्रपट मराठी असूनही वेगळीच उंची गाठतो. आर्या आणि अभिनयनी लाजवाब कामं केलीयेत. कुठेही वल्गॅरिझम नाही, पीटातून शिट्या याव्या असे डायलॉग्ज नाहीत पण तारुण्याचा जो काय माहौल रंगवालांय तो सदाबहार झाला आहे. अनुरागची तारुण्यातली मानसिकता की तन्वी ठीके आणि ती तर हातची आहे, तीच्यापेक्षा इतरही ऑप्शन्स ट्राय करुन पाहू ही गोंधळलेली स्थिती, प्रेक्षकाला स्वतःच्या तरुणपणाची आठवण करुन देते. पुढे तन्वी आपल्याला पुरती ओळखते त्यामुळे ती कितीही चांगली असली तरी तिच्यासमोर आपण फारच प्रेडिक्टेबल झालोत आणि त्यामुळे नेहमी बावळट ठरतो, हा फिल अनुरागला घुसमटवून टाकतो. हा सायकॉलॉजिकल टर्न अफलातून आहे. त्यामुळे तन्वीच्या मनात काहीही नसतांना अनुराग स्वतःची घुसमट थांबवायला, तिला एकतर तू तरी माझ्या आयुष्यातून दूर हो किंवा मी तरी इथून दूर जातो म्हणतो. इथे चित्रपट अनपेक्षितपणे कंप्लीट यू टर्न घेतो.
तिसर्या लेवलवर, अनुराग आणि तन्वीचे वेगवेगळ्या व्यक्तींशी विवाह झालेत. पण अनुरागला तन्वीचा मोह कायम आहे आणि तीच पिक्चरची टॅग लाईन आहे `ती सध्या काय करते ?'.
मग आयुष्याच्या अशा अनरिवाइंडेबल वळणावर अनुराग आणि तन्वी पुन्हा भेटतात आणि तन्वी म्हणते :
समोरासमोर आल्यावर, आपण जे तेव्हा बोलू शकलो नाही ते आठवून आणि अवघडून जाऊन, अजून दूर जाण्यापेक्षा, आज ते बोलून, दोघातलं प्रेम तितक्याच उत्कटतेनं आणि अपराधशून्य मनानं जपून, आपण एकमेकांशी सुहास्यवदनानं बोलू शकतो....... आणि अत्यंत सुरेखपणे हृदयात जपलेल्या दोघांच्या प्रेमाची पुन्हा सुरुवात होते.
चित्रपट नुसता प्रश्न मांडत नाही तर तितक्याच रोमँटीक अंगानं त्याचं उत्तरही देतो हे त्याचं मला भावलेलं यश.
उर्मिला कानीटकरनं स्वतःच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वानं अंकुशच्या पत्नीची भूमिका केलीये. तेजश्री प्रधाननं उत्तरार्धातली तन्वी सुरेख साकारली असली तरी सतीशनं या भूमिका एक्सचेंज करायला हव्या होत्या असं वाटून गेलं. म्हणजे उर्मिला तन्वी असायला हवी होती आणि तेजश्री अनुरागची पत्नी. त्यामुळे चित्रपटाचा इंपॅक्ट आणखी जबरी झाला असता. अंकुशच्या अभिनयाबद्दल केवळ आणि निव्वळ अप्रतिम याशिवाय दुसरे शब्द नाहीत. चित्रपटाला कंप्लीट वॉइस ओवर त्याचा आहे. खरं तर तोच चित्रपटाचा सर्वेसर्वा आहे पण त्यानं हे इतकं सहज केलंय की त्यामुळे सर्वांच्या भूमिका खुलून आल्या आहेत आणि कुठेच उजवं डावं करता येत नाही . अंकुशच्या या बेअरींगबद्दल त्याचं विषेश कौतुक आहे.
गाणी पुन्हा एकदा ऐकावी लागतील कारण इतक्या सुरेख कथानकाला संगीत फारशी उंची देऊ शकलेलं नाही. आणि लिरिक्सही फारशी प्रभावी नाहीत. वास्तविकात इतक्या उत्तम स्टोरी लाईनला संगीत कुठल्या कुठे नेऊ शकलं असतं. पण त्याशिवायही चित्रपटाचा इंपॅक्ट मस्त आहे हे नक्की.
प्रतिक्रिया
13 Jan 2017 - 9:08 pm | समीर_happy go lucky
आवडलं परीक्षण
13 Jan 2017 - 9:13 pm | संजय क्षीरसागर
धन्य झालो ! आभार्स !
13 Jan 2017 - 9:54 pm | निष्पक्ष सदस्य
छान समीक्षा केली आहे.
अभिनयचा चेहरा सपक वाटतो,हेअरस्टाईल वडीलांचीच काॅपी मारली आहे,मानेपर्यंत केसांचा झुबका वाढवणे वगैरे.आणि तेजश्री प्रधान आपल्याला आवडत नाही,फारच मुळमुळीत बोलणं बोलते.
परत "पहिलं प्रेम" हा चित्रपटाचा विषय असल्याने,चावून-चावून चोथा झाला आहे.एकंदरीतच विशेष असं काहीच नाहीये.
13 Jan 2017 - 10:04 pm | निष्पक्ष सदस्य
एक राहिलंच,,,
जर बायको "तो काय करतो" हे विसरली असेल अन् आपल्यावर जीवापासून प्रचंड प्रेम करत असेल,संसारामध्ये समरस झाली असेल,तर स्वतःच पहिलं प्रेम आठवून ते कुरवाळत बसणे हे इनडायरेक्टली बायकोचं प्रेम पायदळी तुडवल्यासारखं आहे,खरं तर हा अजामीनपात्र गुन्हाच असायला हवा.
13 Jan 2017 - 10:33 pm | संजय क्षीरसागर
ती काही पत्नीचा जागा घेत नाही किंवा पत्नीचा तो काही आपल्याला रिप्लेस करत नाही .
ज्याला त्याला आपल्या जागा तशाच ठेवून, पत्नीचा असेल तर तो, पतीची ती, आणि सांप्रत पती- पत्नी, मनातला गिल्ट सोडून, एकमेकांचे चांगले मित्र राहू शकतात, इतका साधा आणि निखळ मेसेज आहे.
14 Jan 2017 - 1:29 am | रेवती
हम्म्म......चित्रपट खरच बरा दिसतोय असं तुमच्या परिक्षणावरून वाटतय.
परिक्षण आवडले.
14 Jan 2017 - 7:49 am | संजय क्षीरसागर
तन्वीची आठवण म्हणून अनुरागनं पत्नीला (राधिका) मनमोकळेपणानं सांगून, स्वतःच्या मुलीचं नांव सुद्धा तन्वी ठेवलंय. तन्वी अनुरागच्या अपरोक्ष त्याच्या आईला भेटण्यासाठी घरी येते आणि मुलीला नांव विचारते आणि ते ऐकून सर्द होते, तेव्हा राधिकाच तिला हे सांगते. हा प्रसंग तर इतका हृद्य आहे की सगळं थिएटर स्तब्ध होतं.
14 Jan 2017 - 9:47 am | ज्ञानोबाचे पैजार
परिक्षण आवडले. सिनेमा नक्कीच चांगला असेल.
जरुर पहाण्यात येईल.
पैजारबुवा,
14 Jan 2017 - 10:40 am | संजय क्षीरसागर
आणि तन्वींनी सुद्धा जरुर पाहावा असा चित्रपट आहे.
14 Jan 2017 - 11:52 am | अॅस्ट्रोनाट विनय
परीक्षण वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सतीश राजवाडे भारी director आहे
14 Jan 2017 - 12:30 pm | हतोळकरांचा प्रसाद
समीक्षा आवडली! चित्रपट पाहण्याची उत्सुकता आधी नव्हती, ती निर्माण झाली!
14 Jan 2017 - 12:59 pm | संजय क्षीरसागर
शक्यतो इ-स्क्वेअर जीके रोड, स्क्रीन थ्रीला पाहा. मजा येईल.
14 Jan 2017 - 3:04 pm | हतोळकरांचा प्रसाद
हो प्रयत्न करतो! सहसा पिंपळे सौदागरच्या सिटी प्राईडला जातो. एकतर जवळ आहे आणि ते लोक मराठी चित्रपट रॉयल कलासवाल्या स्क्रीनला लावतात बरेच वेळा. स्वस्तात रिक्लायनरवर बसून (खरतर झोपून) चित्रपट बघता येतो :):).
14 Jan 2017 - 3:37 pm | संजय क्षीरसागर
ते लोक मराठी चित्रपट रॉयल कलासवाल्या स्क्रीनला लावतात बरेच वेळा. स्वस्तात रिक्लायनरवर बसून (खरतर झोपून) चित्रपट बघता येतो
हा फंडा आवडला !
14 Jan 2017 - 3:19 pm | प्रचेतस
शक्यतो इ-स्क्वेअर जीके रोड, स्क्रीन थ्रीला पाहा
जीके रोड म्हणजे कुठला?
14 Jan 2017 - 3:24 pm | संदीप डांगे
गणेशखिंड रोड?
14 Jan 2017 - 3:29 pm | प्रचेतस
राइट.
तोच असावा पण त्याला जीके रोड म्हणतात हे पहिल्यांदाच कळलं.
जिथे रॅण्डचा वध झाला तिथे एक लहानशी शिळा आहे त्या प्रसंगाच्या स्मरणाची, नेमकी कुठे ते माहीत नाही.
14 Jan 2017 - 11:33 pm | धडपड्या
सेन्ट्रल समोर, म.न.से. च्या मेडिकल शेजारी..
14 Jan 2017 - 1:03 pm | प्रचेतस
एकदम दिलखुश परिक्षण लिहिलंत संक्षी. पण चित्रपट काही बघणे होणार नाही.
14 Jan 2017 - 1:43 pm | पैसा
तेलुगु सिनेमा बघणार म्हणलास की रे काल! =))
14 Jan 2017 - 1:47 pm | प्रचेतस
=))
तो आमच्या आदरस्थानावर आधारीत आहे म्हणून हो. बाकी कै नै.
14 Jan 2017 - 7:17 pm | अत्रुप्त आत्मा
@एकदम दिलखुश परिक्षण लिहिलंत संक्षी. ››› +१
चित्रपट बघणार नक्कीच. कारण राजवाडेचा आहे. राजवाडे म्हणजे अगदी अॅज इट इज चित्रपटमेकर माणूस.
14 Jan 2017 - 3:16 pm | पद्मावति
मस्तं लिहिलंय. आवडलं.
19 Jan 2017 - 11:23 pm | संजय क्षीरसागर
कसा वाटला ?
25 Jan 2017 - 10:03 am | अत्रे
"ती सध्या" भयंकर unrealistic पिक्चर आहे .
दुकानात जाऊन हिरो ऑर्डर देतो - "बटर, ब्रेड आणि साबण "
आणि दुकानदार कोणतेही प्रश्न न विचारात या वस्तू आणून देतो!
कोणता ब्रँड, किती साइझ .. काहीही प्रश्न दुकानदाराला पडत नाहीत.
25 Jan 2017 - 11:39 am | संजय क्षीरसागर
अशा अँगलनंपण पिक्चर पाहाता येतो !
27 Jan 2017 - 4:14 pm | जगप्रवासी
अहो त्यांच्या आयडीच नाव वाचा, अहो त्यांच्या आयडीच नाव वाचा, "अत्रे" आहेत ते. मग किती सूक्ष्म निरीक्षण शक्ती असेल विचार करा.. मग किती सूक्ष्म निरीक्षण शक्ती असेल विचार करा.