पूर्वीच्या काळी एकदा लग्न झाले की ते आयुष्यभर टिकवावे लागत असे. लग्न ही संस्था वास्तविक जीवनातल्या काही गरजा भागवण्यासाठी निर्माण झाली, अनेक गरजांपैकी महत्त्वाची एक गरज शारीरीक होती. पण हे लक्षात न घेता लग्न हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला गेला. एखाद्याचे लग्नच झाले नसेल तर त्याच्याबद्दल फार विचित्र मते व्यक्त केली जातात, याच्यात काहीतरी कमतरता असली पाहीजे असे बोलले जाते. स्त्रियांना तर बिन लग्नाचे राहण्याची परवानगीच नाही. "आई" होण्या मधेच तिच्या जन्माचे सार्थक आहे. आता आई ही जगातली सर्वात महान गोष्ट आहे. आई होण्यासाठी आधी कुणाची पत्नी झाले पाहीजे. तो जोडीदार कसा मिळेल कुणास ठाऊक (आई होण्याच्या सध्याच्या नव्या तंत्रज्ञानाची चर्चा नंतर करू. इथे तो विषय नाही) पण ज्यासाठी लग्न केले त्या गरजा पूर्ण होत नसल्या तरी लग्न टिकवून ठेवावे लागते. कारण आजूबाजूच्या समाजाचा दबाव. लग्न मोडल्यास होणारी नाचक्की.
ही नाचक्की एवढी असते. त्यामुळे अनेक जोडपी एकमेकांशी पटत नसतानाही वेगळे होत नाहीत. मानसिक कोंडमारा सहन करत जगतात. क्वचित प्रसंगी एकाकडून आत्महत्येचाही मार्ग स्वीकारला जातो. पण जिवंतपणी घटस्फोटाला सामोरे जाण्याचे धाडस नसते.
याउलट दोघांपैकी कुणा एकाचा मृत्यू ओढवल्यास मात्र समाज याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहू लागतो. घटस्फोटापेक्षा मृत्यूने केलेली ताटतूट बरी अशी परिस्थिती असते. कारण यात सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागत नाही.
अनेकदा सामाजिक प्रतिष्ठे बरोबरच मुलांसाठीही लग्न टिकवले जाते. वेगळे झालो तर मुलांची वाताहत होईल ही भिती असते. दोघांपैकी एकच जण कमावणारा असेल तर हे सोडून देणे परवडत नाही. त्यातही नवरा दारुडा, बेवडा, जुगारी, बाहेर ख्याली, मारहाण करणारा असेल तर जगणे मुश्किल होते. माहेरचे दरवाजेही कायमचे बंद झालेले असतात.
जिस घर में मेरी डोली आई थी, उसी घर से ही मेरी अर्थी उठेगी। मैं मायके वालों पर बोझ नहीं बनूंगी असल्या हिंदी फिल्मी डायलॉगचेही मनावर घट्ट संस्कार असतात.
उलटही असते. एखाद्या स्त्रीचाही पतीला त्रास होत असतो. पण सामाजिक प्रतिष्ठेपायी आणि मुले असली तर त्यांच्यासाठी वेगळे होता येत नाही. पत्नीकडून घरकामाची अपेक्षा करावी की नाही हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. पण काही मुलींना छानछोकीची आवड असते. पैसा उडवण्यावर भर असतो. घरात स्वयंपाक करण्यात रस नसतो. पण दोन वेळ जेवायला तर हवे असते. मग महागडी कामवाली नोकरीस ठेवली जाते. एरवी शॉपिंग वगैरे वर उधळपट्टी. यातून खटके उडायला सुरुवात होते. वेगळे व्हायचे तर कायदे पोटगी मागतात. कमावणार्याने न कमावणार्याला खंडणी द्यावी लागते. त्याला घाबरून एकत्र राहण्याचे नाटक करावे लागते. काही वेळा नवर्याला बायको प्रिय असते पण तिला आणखी कुणीतरी प्रिय असतो. किंवा उलटही असते. सगळीच गडबड.
लग्न ही अशी गोष्ट आहे. जी फक्त दोघांचीच असते. लग्न जमवताना मध्यस्थ उपयोगाला येऊ शकतो. पण लग्न टिकवण्यासाठी थर्ड पार्टीचा उपयोग नसतो. ती जबाबदारी ज्याची त्यानेच उचलायची. वर्गात लहान मुलांना शिक्षक गप्प बसा, शांत बसा म्हणतात. पण संसारात नीट नांदा असे कोण कुणाला म्हणणार ?
कधी कधी नवरा बायको पेक्षा इतर माणसे घरात असतील तर स्थिती आणखी बिकट होते. उदा सासू सासरे, मुलाचे आईवडील.
अनेकदा जवळपास राहणार्या मुला मुलींचे प्रेम जमते. दिवसा काही वेळ भेटून रात्री दोघे आपापल्या घरट्यात परततात. काही तासांच्या विरहामुळे प्रेम टिकून राहते. पुढे लग्न झाले तर सुरुवातीचा काही काळ प्रेम टिकते. मग बहर ओसरतो. एकमेकांबद्दलचे आकर्षण कमी होते. त्यातही वय कमी असेल तर पोक्तपणा आलेला नसतो. स्वभावात उथळपणा असतो. वयही अल्लड असते. मोकाट वासरासारखे मन दिसेल त्या नव्या व्यक्तिवर प्रेम करायला सुरुवात करते. पहील्या प्रेमातून सुटका हवी असते. त्यामुळे २५ च्या आत लग्न हे फुशारकीने मित्रांमधे सांगितलेले असते. पण ३० च्या आत काडीमोडही होतो. असे का होते. लग्न करताना जे तात्कालिक आकर्षण वाटलेले असते त्यालाच प्रेम असे समजले जाते आणि फसगत होते. लम्हों ने खता की थी, सदियों ने सज़ा पायी अशा अल्लड मुलांची प्रकरणे घरातल्या वडिलधार्यांनीही काळजीपूर्वकपणे हाताळली पाहीजेत. अशा अल्लड लग्नात अपत्यप्राप्ती झाली तर प्रकरण आणखी अवघड बनते. जे लोक स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाहीत त्यांच्यावर निसर्ग इतरांचीही जबाबदारी टाकून मोकळा होतो.
वरच्या उदाहरणात बर्याचदा लग्न इतक्या घाईत झालेले असते, प्रेम इतके उतू जात असते की मुलीला कॉलेज शिक्षणही पुरे करू दिले जात नाही. या काळात मुलगीसुद्धा मैत्रिणींना या गोष्टी फार कौतुकाने सांगते. "अगं बघ ना, किती घाई यांची लग्नाची. माझ्या फायनल एक्झामपर्यंत थांबायचीसुद्धा तयारी नाही" या जगात एखाद्या गंभीर रोगावर घाईघाईने ऑपरेशन करावे लागते, इतरही काही तातडीच्या गोष्टी असतात. पण लग्न ही घाईने करण्याची गोष्ट कशी असू शकते ?
काही मुलींचे असे कमी वयात लग्न होते. मूल होते. त्या आई बनतात. एव्हाना विचारात पोक्तपणा आलेला असतो. आपली नवर्याची निवड चुकली हे जाणवायला लागते. मग मात्र नव्या जोडीदाराचा शोध सुरु होतो. मूल झाल्यानंतर हे असे का होते याचे मानसशास्त्र अभ्यासले पाहीजे.
एक कॉलेजला जाणारी तरुण मुलगी. तिचे कुटूंब टिपिकल मराठी. जवळच्या बिल्डिंगमधे शिकायला आलेले काही परप्रांतीय विद्यार्थी होते. बरं "या वयात कोणीतरी मित्र हवाच अन्यथा तुम्ही मागास" अशी हल्लीच्या सिनेमा, मालिकांनी मुलींची करून दिलेली समजूत. त्या दबावामुळे हिने त्याच्याशी ओळख करून घेतली. मैत्री वाढवली. टिपिकल मराठी कुटूंबात आपण फार काही थ्रिलिंग करत आहोत. अशी तिची अल्लड वयातली भावना. कॉलेज संपतंय ना संपतंय तोच घरच्यांनी त्या मुलाबरोबर लग्न करून दिले. मूल होइपर्यंत हे प्रेम टिकले. आई बनल्यावर हिला नवर्यामधे अनेक दुर्गुण दिसू लागले. खटके उडू लागले. सायमलटेनियसली हिने नवा पर्याय शोधूनच ठेवला होता. शेवटी लहान मूलाला घेऊन माहेरी आली. माहेरी काही काळ राहून दुसर्या जोडीदाराबरोबर लग्न करून मोकळी झाली. मूलाने कुणाला वडिल मानायचे, नवा नवरा मूलाशी कसा वागेल. अनेक प्रश्न. त्यातही अपत्य मुलगी असेल तर ?
म्हणून बर्यापैकी नोकरी लागल्यावर, आर्थिक दृष्टिने स्थैर्य आल्यावर, विचारांमधे पोक्तपणा आल्यावर, इतरांच्या वाइट अनुभवामधून शिकणे झाल्यावर केलेले लग्न बर्याचदा टिकाऊ असते.
जिथे नवरा बायको दोघेही कमावत आहेत अशा ठिकाणी एकमेकांवर आर्थिक अवलंबित्त्व नसते. दोघांनाही पैसा मिळवण्याचे आणि पैसा खर्च करण्याचे स्वातंत्र्य असते. बांधिलकी कोणतीच नसते. विशेषतः हे लोक सध्याच्या आयटी मधले असतील तर यांची जीवनशैली उच्च असते. एक फोन फिरवला की पिझ्झा, माँजिनीचा केक दारात हजर होतो. पैसा फेको और फ्लिपकार्ट का तमाशा देखो अशी सवय लागलेली असते. या लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना अचाट असतात. छोट्या छोट्या कारणावरून कुरबुरी होतात. कोणती गाडी घ्यावी इथपासून, तिचा रंग कोणता असावा हे वादाचे मुद्दे असू शकतात. एवढेच नाही तर काही जणींना नवर्याचे सोशाल ड्रिंकिंग पसंत नसते. काही जणींना नवरा पीत नाही हा मागासपणा वाटतो. मूल झाले असल्यास 'पिलू'ला कोणत्या शाळेत घालायचे हा भीषण मतभेदाचा मुद्दा बनू शकतो. अनेकदा मुलीच्या आईचे फोनवरचे सल्ले आगीत तेल ओतण्याचे काम करतात. मुलाची आईही अशावेळी मागे का राहील.
काही आयटीवाले, कॉल सेंटरवाले एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्या कामाचे टाइमटेबलही तिसर्याच देशाच्या वेळेप्रमाणे असते. जेवणासाठीही घरी येण्याची गरज पडत नाही. ऑफिसच्या कँटिनमधे सर्व काही मिळते. ऑफिसमधे किंवा ऑफिसमधल्या सहकार्यांबरोबरच बहुतेक वेळ जातो. सहवासातून प्रेम उत्पन्न होते. यातून नवी नाती शोधली जातात, नात्यांची फेरमांडणी होऊ शकते.
खूपदा लग्न ठरवताना या कानाची खबर त्या कानाला लागू दिली जात नाही. पण गडबड झाली की मात्र बोंबाबोंब केली जाते. यासाठीच लग्न करताना पुरेसा वेळ घ्यावा. चार लोकांचा सल्ला किंवा माहिती घ्यावी. विकत घेतलेली वस्तू पसंत पडली नाही तर बदलून घेण्याइतके लग्न सोपे नसते. किंवा एका जन्मात एकच संधी असते. म्हणून जी करायची ती बोंबाबोंब लग्नापूर्वी केली तर फायदेशीर ठरते. मगाशी म्हटल्याप्रमाणे काही गरजांसाठी लग्नाचा पर्याय शोधला जातो. या गरजा तात्कालिक असतील तर जन्मभराची बाधिलकी कशासाठी ?
काही जणांचे लग्न केल्यावर फार हाल होतात. अशावेळी
जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली याचप्रमाणे
लग्नाने छळले होते, घटस्फोटाने सुटका केली म्हणण्याची वेळ येते. अशांना घटस्फोट सुटकेचा मार्ग वाटतो.
म्हणजे लग्न कशासाठी हा प्रश्न उरतोच.
प्रतिक्रिया
15 Nov 2016 - 1:08 pm | अनन्त अवधुत
या दोन वाक्यावर प्रतिसाद शतक साजरे होऊ शकते
14 Sep 2017 - 2:47 pm | नर्मदेतला गोटा
___/\___
15 Nov 2016 - 1:19 pm | पाटीलभाऊ
मग आम्ही लग्न करावं कि नाही :D
उंबरठ्यावर असलेला,
पाटीलभौ
15 Nov 2016 - 1:27 pm | चिनार
करा हो...काय होत नाय !
15 Nov 2016 - 1:32 pm | चिनार
कायप्पा वर फिरत असलेला मेसेज..
मोदींची नवीन सर्जिकल स्ट्राईक...
आज रात्री बारा वाजेनंतर सगळी जुनी लग्न कायदेशीर रीत्या वैध नाही. ज्यांना आपले नवरे किंवा बायका बदलून घ्यायच्या असतील त्यांना पन्नास दिवसांची मुदत. नवरा किंवा बायको सरकारी खात्यात सुद्धा कायमचे जमा करता येऊ शकतात !!
15 Nov 2016 - 3:42 pm | जितेन्द्र अशोक नाइक
हे फक्त स्वप्नातच घडू शकत मित्रा :)
15 Nov 2016 - 2:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
लग्न कश्यासाठी??
कारण आयुष्यात निव्वळ आनंदच सगळे काही नसते =))
15 Nov 2016 - 3:04 pm | मराठी कथालेखक
लग्नात आहेराच्या पाकिटात घालून जून्या पाचशेच्या नोटा खपवता येतात म्हणून :)
15 Nov 2016 - 11:20 pm | नर्मदेतला गोटा
:)
15 Nov 2016 - 11:38 pm | सही रे सई
लग्न कशासाठी?
माझी एक मैत्रीण म्हणते कि २५-३० वर्षाच्या आयुष्यात त्याच त्याच प्रोब्लेम चा कंटाळा येतो माणसाला. बर प्रोब्लेम च उत्तर पण बर्याच वेळा सापडत नसत. अशावेळी लग्न केल्यामुळे जरा नवीन प्रकारचे प्रोब्लेम येतात जीवनात. तेव्हढाच चेंज आयुष्यात. शेवटी काय नवीन नवीन सुख नाही मिळवू शकत माणूस तर निदान नवीन नवीन दुख तरी मिळवावे.
16 Nov 2016 - 3:15 am | संदीप डांगे
लग्न कशासाठी? हेच शोधण्यासाठी!
16 Nov 2016 - 4:39 pm | दुर्गविहारी
कॉलिंग सं.क्षी. सर ;)
16 Nov 2016 - 7:13 pm | गामा पैलवान
नगो,
२५ च्या आत लग्न आणि नंतर काही वर्षांनी पश्चात्ताप अशी तीन उदाहरणं पाहण्यात आहेत. पहिल्यात ती बाहेर शोधायला लागली, दुसऱ्यात त्याने बाह्यसंशोधन सुरू केलं. दोघांचेही जोडीदार समंजस (की असहाय्य?) आहेत म्हणून संसार टिकलेत. तिसरं जोडपं काडीमोड घेऊन मोकळं. भाग्यवान म्हणावं का, असा प्रश्न आहे.
आ.न.,
-गा.पै.
16 Nov 2016 - 7:47 pm | मारवा
मिलन असतं.
अजुन काही प्रयत्न करतो
१- विवाहात नुसते देहाचेच नाही तर मनाचेही मिलन अधिक महत्वाचे असते.
२- विवाह हा दोन कुटुंबाना जोडणारा घटक असतो.
३- विवाह हा दोन शरीरांच नाही तर दोन आत्म्यांचं मिलन असतं एक मुलाचा आत्मा एक मुलीचा आत्मा.
४- विवाह हा एक संस्कार आहे गुड्डा गुडीयो को कोइ खेल नही है.
५- विवाह हे एक पवित्र बंधन आहे.
६- विवाह ही पोटापाण्याची सोय आहे.
७- विवाहाचा आंबाच नाही तर कोय चाखण्यातही आनंद आहे.
अजुन जरा जमुन नाही राह्यलय या धाग्याला पुन्हा भेट देतो.
16 Nov 2016 - 9:45 pm | नर्मदेतला गोटा
जे लिहीलंय ते छान लिहीलंय
हे तर फार महत्त्वाचे
14 Sep 2017 - 2:54 pm | पैसा
>>>>लग्न ही अशी गोष्ट आहे. जी फक्त दोघांचीच असते. >>>>
नाय ओ! आपल्याकडे मुलीचे लग्न अख्ख्या कुटुंबाशी होते. सासू, नणंद, दीर, सासरा आणि शेवटी नवरा असा प्राधान्य क्रम असतो. पाहुणे नातेवाईक आले की त्यांचा नंबर नवऱ्याच्या आधी असतो. आणि स्वतः:चा नंबर सगळ्यात शेवटी.
14 Sep 2017 - 7:16 pm | जेडी
हिंदु विवाहात आत जाण्याचा मार्ग आहे पण बाहेर पडण्याचा सोपा मार्ग नाही.
मला ह्या लेखात मुलींवरच जास्त टिका वाटली.
लग्न वय, शिक्षण किंवा पैसा ह्यावर नाही टिकत तर माणसाचे माणुसपण समजुन घेण्याने टिकते.