आमचं एकत्र कुटुंब हाय, आमी दोघी जावा.
चालता बोलता थोरल्या जावेनं हाथरुण धरलं,
लगेच दवाखान्यात हलिवलं,
ही म्हणू नका ती म्हणू नका,
माप चाचण्या केल्या,
उसाचा सगळा पैका बगा औषधाला घातला,
म्या माज्या बांगड्या काढून दिल्या ह्यांच्याजवळ
म्हणल असू दे अडीनडीला
देवाला साकड घातलं,
माज्या बहिणीला बर कर म्हणलं,
तिला आराम पडूस्तवर काय माज्या
डोळ्याला डोळा न्हाई लागला,
दवाखान्यात, घरी सगळं पळून पळून केलं,
परवा नंदुबाई आल्यावत्या बगायला,
डोळ्याला पदर लावून म्हणाल्या,
"पोराबाळाची आई हाये, बरी कर देवा"
चुलीवर चाच आधाण ठीवलेल.
भुंड्या हातानं म्या चुलीतला जाळ म्होर सारला,
"मंजी, माज प्वाटपाणी पिकलं न्हाय मनून मी मेली तरी चालतंय?"
प्रतिक्रिया
23 Jun 2015 - 5:55 am | श्रीरंग_जोशी
विचार करायला लावणारं भाष्य केलंय या शतशब्दकथेतून.
कुणी मृत्यूशी संघर्ष करत असल्यास किती मुलंबाळं आहेत हे अनोळखी लोकांकडून विचारलं जातं. मुले लहान असतील तर ती अनाथ होऊ नये असा विचार असतो. किंवा कुणाचा अपघाती / अचानक मृत्यू झाल्यावरही अशीच चौकशी केली जाते.
मला वाटतं अशा विधानांचा उलट अर्थ काढला जाऊ नये.
अर्थात विवाहानंतर बराच काळ अपत्यहीन राहणार्या जोडप्यांबाबत विशेषतः स्त्रियांबाबत नकारात्मक शेरे मारले जाणे आपल्या समाजाच्या बाबतीत अपवादात्मक म्हणता येणार नाहीच... :-( .
23 Jun 2015 - 6:57 am | रातराणी
नणंदेला पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये नंदुबाई म्हणायची पद्धत आहे. (फार पूर्वी ऐकलेलं, आता आहे की नाही माहित नाही).
त्यामुळे अनोळखी बाईकडून ही विचारणा नाही झालेली.
पण अनोळखी लोकांकडून अशी चौकशी होते आणि इतरांनी त्याचे उलट अर्थ काढू नयेत याच्याशी सहमत.
23 Jun 2015 - 7:16 am | श्रीरंग_जोशी
हो नणंद आहे ते कळले होते पण अशा परिस्थितीत मुलेबाळे पोरके होण्याच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त करणे ही एक सवय असू शकते. कुठे काय बोलावे याचे भान नेहमी राहतेच असेही नाही.
अशी परिस्थिती नसतानाही कथेतली नणंद कथानायिकेला असे काही बोलली असती तर तिच्या उद्देशाबाबत कसलीही शंका वाटली नसती.
23 Jun 2015 - 7:38 am | रातराणी
तिच्या दृष्टीकोनातून पाहिले तर अशी परिस्थिती असताना काय आणि नसताना काय, असे काही बोलणे चूकच. आणि नेमके हेच भान आपल्या जवळच्या पोक्त स्त्रियांना नसणे हे दुर्देव.
26 Jun 2015 - 11:47 am | स्वीत स्वाति
...हे भान खुप स्रियाना नसते ...
23 Jun 2015 - 7:22 am | एक एकटा एकटाच
सुन्न.........
23 Jun 2015 - 7:35 am | अजया
निपुत्रिकेला कायम सहन करायला लागणारी भळभळती जखम तिच्या शब्दातून व्यक्त झालीये :(
23 Jun 2015 - 8:12 am | खेडूत
कथा आवडली .
लोकांचे विचार बदलायला वेळ लागेल !
23 Jun 2015 - 12:33 pm | मुक्त विहारि
असे झाले तर आनंदच आहे....
पण ....
आज देखील निपुत्रिक स्त्रीला समाजात मान मिळत नाही. किंबहूना अशा स्त्रीला टोमणे मारणार्या बायकाच जास्त असतात.
बर्याच वेळा अशा जोडप्यात पुरुषांचा दोष जास्त असतो पण ह्याचे खापर मात्र, त्या दुर्दैवी स्त्रीवरच फोडल्या जाते.
पुरुषांना पण थोडा त्रास सहन करायला लागतो, पण तो जर कर्तबगार (पिसा आणि सत्ता असणारा) असेल तर, त्याच्या वाट्याला कुणी जात नाहीत.
23 Jun 2015 - 8:41 am | उगा काहितरीच
अवघड आहे.
23 Jun 2015 - 9:23 am | पाटील हो
:-(
23 Jun 2015 - 9:49 am | चुकलामाकला
कथा आवडली . पण बर्याचदा असा हेतू मनात नसतो.
24 Jun 2015 - 1:06 am | रुपी
अशा वाक्यांतून बर्याचदा सहानुभुती त्या मुलांबद्दलसुद्धा असते.
शिवाय एकाला बरं कर म्हणणं याचा अर्थ त्याजागी दुसरं कुणी जायलाच पाहिजे असाही नसतो.
23 Jun 2015 - 9:49 am | विशाल कुलकर्णी
आवडलीच...
23 Jun 2015 - 12:14 pm | पद्मावति
कथा मनाला दोनशे टक्के पटली, भावली आणि भिडली.
23 Jun 2015 - 12:26 pm | खटपट्या
कथा आवडली..
23 Jun 2015 - 12:28 pm | मुक्त विहारि
आणि परत एकदा एक खपली निघाली...
23 Jun 2015 - 12:54 pm | मधुरा देशपांडे
छान जमली आहे कथा.
23 Jun 2015 - 1:19 pm | मुक्त विहारि
सहज म्हणून एका मित्राकडे गेलो होतो.
मित्र बर्यापिकी सुखवस्तू.(वयाच्या ४८व्या वर्षी निवृती घेतलेला)
बोलता-बोलता त्याने पण हीच व्यथा बोलून दाखवली.
त्याच्या बायकोला, डोहाळ जेवण, बारशी, अशा कार्यक्रमांना बोलावतात.... पण..."ओटी" भरायला मात्र देत नाहीत.
कारण, काय तर म्हणे "निपुत्रिक बाईने ओटी भरायची नसते."
वाय.झेड. पणा, दुसरे काय?
त्या दिवशी बायकोला हे सांगीतले.
आमची बायको म्हणाली...समाज गेला तेल लावीत.
ह्या श्रावणांत जिवतीच्या पुजेला, तिलाच बोलवीन.
आणि आपल्या सुनांच्या डोहाळजेवणाला आणि बारशाला तिच्याकडूनच सुनांची ओटी भरून घेईन.
अशा व्यक्तींना दूर लोटणे, म्हणजे , एका प्रकारे तुम्ही देवाच्या निर्णयालाच, आव्हान देण्यासारखे आहे.
कारण,
मुल होणे, न-होणे हे देवाच्या हातात. (एक-दोन मुले झाली की, मुले जन्माला न घालणे ही, राष्ट्र-सेवा.)
23 Jun 2015 - 1:24 pm | टवाळ कार्टा
+१११११११११११११११
24 Jun 2015 - 2:03 am | रातराणी
+१
शेजारच्या काकूंना मुलबाळ न्हवते. मी स्वतः त्यांच्या घरी इतकी लाडात वाढलीये की मला कुणी पूर्ण नाव विचारलं तर लोक आश्चर्य करायचे "तू त्यांची मुलगी नाहीस?"
आईने कधीही त्यांना कुठल्याही महत्वाच्या कार्यात वगळले नाही. अगदी बहिणी वाटाव्या अशी जोडी होती त्यांची. वयाच्या अवघ्या ४०-४५ वर्षी ब्रेन हेमरेज ने त्या गेल्या त्याचा सर्वात मोठा धक्का आमच्या आणि काकूंच्या माहेरीच बसला. सासरचे अगदी निर्विकार! केवळ त्यांना जन्म देता आला नाही म्हणून त्यांचे तुमच्या आयुष्यात असलेले सून म्हणून, जाऊ म्हणून, काकी म्हणून त्यानी दिलेल्या प्रेमाला काहीच किंमत नाही का? माझे स्वतःचे आजोबा गावावरून आले की आधी त्यांच्याकडे जात. अशी माणस जोडणारा स्वभाव असताना सासरचे त्यांना देत असलेली तुटक वागणूक मला तेव्हाही समजली नाही आणि दुर्देव हे की चित्र अजूनही बदलले नाहीये. लग्नाला क्ष वर्षे झाली पण अजून गुड न्यूज नाही म्हणून सासरी जायला घाबरणारी मैत्रीण पाहिली आहे.
30 Jun 2015 - 7:59 pm | gogglya
बायको, आणी तिच्या २ मैत्रिणी, यांना काही कारणांमुळे [ अजूनही ] अपत्ये नाहीत. त्यांची अजून १ जिवलग [ ? ] मैत्रीण होती, जी तिचे लग्न होईपर्यंत एकदम घनिष्ट मैत्रीण होती. लग्ना नंतर काहीच महिन्यांत त्या मैत्रिणीने या सगळ्यांशी एकदमच संबंध तोडुन टाकले. या सगळ्यांना काहीच कळेना की असे नक्की काय झाले ? नंतर कळाले की ही मैत्रीण गर्भवती होती आणी या तिघींना अपत्य नसल्याने त्यांची सावली पडून स्वतःच्या गर्भावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणुन तिने संबंध तोडुन टाकले.
प्रसूती नंतर काही वर्षांनी त्या मैत्रिणीने परत या तिघींना संपर्क केला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. सध्या ती एकटीच असते आणी या तिघी मात्र अजून जवळ आल्या आहेत…
23 Jun 2015 - 1:45 pm | आतिवास
कथा आवडली.
फक्त 'इस्पितळ' ऐवजी 'दवाखाना' शब्द कथाशैलीशी अधिक सुसंगत ठरेल असं वाटतं.
26 Jun 2015 - 1:58 am | रातराणी
ओह! तुमची पंखा आहे मी! धन्यवाद :) बदल पटतोय पण आता संपादकांचा वेळ जाऊ नये म्हणून त्यांना सुचवत नाही.
23 Jun 2015 - 2:44 pm | बॅटमॅन
मस्त कथा...बाकी अपत्य नसलेल्यांना 'निपुत्रिक' च म्हणतात, 'निकन्यिक' म्हणत नाहीत हेही एकदम रोचक आहे.
मुवी, +११११११११११.
23 Jun 2015 - 2:50 pm | स्मिता.
तसंच नवविवाहितेला आशीर्वाद देतांनाही 'पुत्रवती भव' असाच असतो, कोणी 'कन्यावती भव' असा आशीर्वाद देत नाहीच, पण घेणार्यालाही तो अपेक्षित नसतो.
24 Jun 2015 - 12:39 am | अत्रुप्त आत्मा
या दोन्हीवर तोड म्हणून 'अपत्यवान भव' ..असा काहिसा आशिर्वाद दिला तर?
26 Jun 2015 - 6:37 am | मुक्त विहारि
+ १
23 Jul 2015 - 5:20 pm | जडभरत
५तारे
24 Jun 2015 - 12:54 am | श्रीरंग_जोशी
बॅट्या - आशयाशी सहमत आहेच पण कन्येसाठी पुत्री हा समानार्थी शब्द असल्याने हा आक्षेप तितकाही पटत नाही.
22 Jul 2015 - 2:14 pm | बॅटमॅन
वेल, पुत्रिक हा शब्द पुत्री या शब्दाशी निगडित नसून पुत्र या शब्दाशीच निगडित आहे असे वाटते. तसे नसते तर दीर्घ वेलांटी दिसली असती. नेमके काय ते पाहून सांगतो.
23 Jul 2015 - 2:30 am | श्रीरंग_जोशी
अवश्य तपास.
निपुत्रिक हा शब्द अपत्यहीनांसाठीच वापरला जातो. ज्यांना अपत्य म्हणून केवळ मुलगी / मुली आहे(त) अशांना निपुत्रिक म्हंटले गेलेले मी कधी पाहिले नाही.
निपुत्रिक मध्ये पुत्र हा मूळ शब्द म्हणून वापरला गेला असावा जो या ठिकाणी पुत्र अथवा पुत्री दोहोंसाठीही लागू असावा. असो हा माझा समज आहे, खात्रीशीर माहिती नाहीये.
23 Jun 2015 - 3:08 pm | अपरिचित मी
छन लिहिलिये कथा....भावनाचे उत्तम प्रदर्शन||
24 Jun 2015 - 4:21 am | रेवती
कथा आवडली पण नणंदबाईच्या मनात त्यावेळी तरी तसं काही नसावं, कारण आजारी माणूस हेच त्यावेळी विचार करण्याचा मुद्दा असतो. धाकटीला ते लागले तेही नैसर्गिकच!
24 Jun 2015 - 4:27 am | दिपोटी
शतशब्दकथा आवडली!
- दिपोटी
24 Jun 2015 - 5:16 am | मनीषा
आपल्या समाजात मुल नसणे हा स्त्रीचाच दोष समजतात अजुनही आणि त्यापायी स्त्रीला अतोनात अवहेलना सोसावी लागते. त्यामुळे तिच्यासाठी तो एक हळवा विषय असतो . त्यामुळे तिच्या मनात असे येणे सहाजिक आहे. पण लगेच नणंदेला अपराधी समजण्याचे कारण दिसत नाही. ती तिची त्या परिस्थित उमटलेली सहज प्रतिक्रिया असू शकते.
कथाविषय कमी शब्दात पण प्रभावीपणे मांडला आहे.
24 Jun 2015 - 8:48 am | नूतन सावंत
चर्र झाले काळजात.पण मला असा अनुभव काही आला नाही घरी,दारी, शेजारी समाजात कधीही कोणी ओटी भरू नको म्हणून सांगितले नाही.मी माहेरी वा सासरी मोठी असल्याने उलट अग्रहक्क आहे.
24 Jun 2015 - 11:58 pm | NiluMP
कथा आवडली
25 Jun 2015 - 3:12 am | रातराणी
खूप खूप धन्यवाद!
26 Jun 2015 - 1:29 pm | पैसा
चांगली जमलीय कथा. थोड्या शब्दात खूप काही सांगणारी!
26 Jun 2015 - 2:14 pm | स्नेहल महेश
कथा आवडली
26 Jun 2015 - 2:53 pm | वटवट
सुन्न्न करणारी.... सुंदर तरी कशी म्हणू??
29 Jun 2015 - 3:23 pm | तुडतुडी
कथा नायिकेने नंदू बाई च्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यासारखा दिसतोय
22 Jul 2015 - 12:58 pm | बोका-ए-आझम
शतशब्दकथेऐवजी मुक्तछंदातली कविताच वाटली.
23 Jul 2015 - 2:04 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कथा !
नणंदेच्या म्हणण्याचा रोख इतर कशापेक्षा "मुले अनाथ झाली तर त्यांचे कसे होईल" याबद्दल मनात कणव दाटून आल्यामुळे असावा असेच वाटते.
23 Jul 2015 - 1:12 pm | ब़जरबट्टू
जमलीय आणि भिडलीय पण ...
23 Jul 2015 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
23 Jul 2015 - 2:36 pm | कन्यारत्न
"मंजी, माज प्वाटपाणी पिकलं न्हाय मनून मी मेली तरी चालतंय?"
23 Jul 2015 - 8:10 pm | रातराणी
धन्यवाद!