पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास?
उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता.
इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य!
असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं.
मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं.
स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला.
मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल?
बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, " मुंबईच्या आहेत मॅडम."
स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है".
मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती.
मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही.
चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला.
मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती.
पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी!
* अन्यत्र पूर्वप्रकाशित
प्रतिक्रिया
13 Nov 2014 - 6:23 pm | कपिलमुनी
डिस्क्लेमर टाका ओ !
सत्ता , पैसा , सीट याचा सद्य राजकारणाशी संबंध लावून धागा हायजॅक करू नये :)
13 Nov 2014 - 7:01 pm | आतिवास
मिपाकर सूज्ञ आहेत असा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे डिसक्लेमर टाकला नाही.
13 Nov 2014 - 6:25 pm | एस
सत्ता हे एक व्यसन असते. प्रत्येक सत्ताधार्याला फक्त एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे अधिक सत्ता. पैशाचे म्हणाल तर स्वतःचे प्रत्यक्ष मूल्य शून्य असूनही इतर सर्व गोष्टींचे मूल्य ठरवू शकणारा दुसरा कुठलाच घटक नसावा. साहजिकच पैशातून सत्ता आणि मग सत्तेतून पैसा ही हाव मानवी मनाला लागणे भागच आहे. मग ती सत्ता स्वकीयांवर असो, इतरांवर असो वा त्याबदल्यात स्वतःच्या मूल्यांचा, भावभावनांचा बळी देऊन अजाणतेपणी पत्करलेली त्याच सत्तेची गुलामी असो.
बाकी आपले लेख नेहमीप्रमाणेच विचारप्रवृत्त करणारे असतात हेवेसांनल.
13 Nov 2014 - 7:32 pm | बहुगुणी
बाकी आपले लेख नेहमीप्रमाणेच विचारप्रवृत्त करणारे असतात हेवेसांनल.
सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का?
हा कळीचा प्रश्न विचारून टोचल्याबद्दल धन्यवाद! असे लेख नियमाने वाचनात येत राहिले तर समाजाची मानसिकता बदलू शकेल असा (भाबडा?) आशावाद.13 Nov 2014 - 8:15 pm | मधुरा देशपांडे
+१
लेख आवडलाच!
15 Nov 2014 - 12:19 am | आतिवास
पैशाचे म्हणाल तर स्वतःचे प्रत्यक्ष मूल्य शून्य असूनही इतर सर्व गोष्टींचे मूल्य ठरवू शकणारा दुसरा कुठलाच घटक नसावा.
हे आवडलं.
पण यावर अधिक विचार करावा लागेल मला.
18 Nov 2014 - 5:48 pm | बॅटमॅन
हाण तेजायला. एकच नंबर!
13 Nov 2014 - 6:26 pm | अनुप ढेरे
छान लिहिलय!
13 Nov 2014 - 6:31 pm | आनन्दा
वा वा!
13 Nov 2014 - 6:49 pm | जेपी
ताई,
मी आजही लातुरात 11 किमीचा प्रवास एकटा 20 रु मध्ये करु शकतो.तिथे चित्रकुट सारख्या ठिकाणाचा काय पाड.
13 Nov 2014 - 7:03 pm | आतिवास
सहमत आहे. अशा प्रवासांत सोयी नसतात, गर्दी असते; पण प्रवास करता येतो.
२२-२५ लोक भरलेल्या 'जिपड्या' तून अनेकदा प्रवास केला आहे, त्याचीही आठवण तुमच्या प्रतिसादाने जागी झाली.
13 Nov 2014 - 6:50 pm | आदूबाळ
आवडलं. आधीही आवडलं होतं.
(अवांतरः आधी कुठे वाचलं होतं?)
15 Nov 2014 - 12:23 am | आतिवास
दुस-या संस्थळावर प्रकाशित केलं होतं आधी. तेव्हा मी 'मिपा'कर नव्हते त्यामुळे तेव्हा इथं प्रसिद्ध केलं नव्हतं.
13 Nov 2014 - 7:20 pm | राही
लेख आवडला. सुंदर शैली आणि मूलगामी चिंतन.
13 Nov 2014 - 7:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है".
हे वाचताना हसू आलं, पण डोळ्यांच्या कडा किंचीत ओलसर झाल्या.लेख आवडला (नेहमीसारखाच) हेवेसांन !
13 Nov 2014 - 8:15 pm | मोहनराव
सुंदर लेख!!
13 Nov 2014 - 8:17 pm | सस्नेह
तितकेच भिडले (नेहमीप्रमाणेच)
स्वतःबदद्ल अलिप्त होऊन परिस्थितीचे काटेकोर निरीक्षण हे तुमच्या लेखनाचे वैशिष्ट्य विशेष भावते.
13 Nov 2014 - 8:54 pm | यशोधरा
हृद्य. फार टोचणारं आहे.
13 Nov 2014 - 8:59 pm | अजया
अंतर्मुख करणारे लिखाण!अावडलंच.
13 Nov 2014 - 10:49 pm | रेवती
कसंसं झालं पण लेखन आवडलं.
पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो
यावरच तर खरं रोजचे जीवन चालू असते असे वाटते. खूप उदाहरणे आपल्या आजूबाजूला रोजची आहेत पण तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात मी मांडू शकणार नाही. असो, त्यानिमित्ताने एका गरीब बिहारी आईने १० रुपये महिना मोबदल्यात सावकाराकडे काम करून मुलाला कारकून बनेल इतके शिकवले व मुंबैत त्याला नोकरी मिळाल्यावर आईला आकाश ठेंगणे झाल्याचे त्या मुलाकडून ऐकल्याचे स्मरले.
15 Nov 2014 - 3:56 pm | आतिवास
अशी खूप उदाहरणं समोर असतात. बचत गटाच्या एका बैठकीत एका आदिवासी स्त्रीने फक्त २५ रुपयांचे (फक्त पंचवीस) कर्ज मागण्याची घटना माझ्यासमोर घडली आहे - ती फार तर दहा एक वर्षांपूर्वी!
खूप उदाहरणे आपल्या आजूबाजूला रोजची आहेत पण तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात मी मांडू शकणार नाही.
याच्याशी मात्र असहमत. प्रत्येकाची शैली वेगळी असते इतकंच. अनुभव महत्त्वाचा. त्यामुळे जरुर लिहा, मी वाट पाहतेय.15 Nov 2014 - 7:01 pm | रेवती
:)
14 Nov 2014 - 1:25 am | पिवळा डांबिस
लिखाण आवडलं.
14 Nov 2014 - 1:42 am | मुक्त विहारि
नेहमीप्रमाणेच... मस्त लिखाण..
14 Nov 2014 - 1:51 am | आनन्दिता
खुप खुप आवडला लेख!
14 Nov 2014 - 1:55 am | पहाटवारा
तुमचे लेख नेह्मी विचार करायला लावतात..
काहि वेळा आपण केवळ कुणी आपल्याला फसवत तर नाहिये ना या भावनेने अटी-तटीवर येउन भांडतो अगदी थोड्या पैशासाठी .. त्याची किंमत तसे पाह्यला गेले तर फारशी नसतेहि, पण कदाचीत सवय म्हणा किंवा समोरच्या पेक्शा हि पैशाची सत्ता तुमच्या हाती जास्त असल्याने म्हणा, बरेचदा आपण टोकाचे वागतो.
एक किस्सा आठवतो आहे बर्याच वर्षांपूर्वीचा, कडाक्याच्या थंडीतला, दिल्लीतला.. त्याकाळी नवी नोकरी लागली होती अन सर्वच मित्रांच्या हाती बर्यापैकी पैसे खेळू लागले होते. असेच एका रात्री कुणीतरी जेवण झाल्यावर त्या थंडीत आईस्-क्रीम खायला जायचा प्लान बनवला. थोड्या दूर जाण्यासाठी म्हणून २ सायकल्-रिक्शा करून आम्हि ३-४ जण गेलो. आम्च्या रिक्शावाल्याने जे पैसे सांगितले ते आम्हा दोघांपैकी कुणीतरी देउन टाकले तर दुसर्या रिक्शावाल्याबरोबर त्या रिक्शात आलेला एक मित्र हुज्जत घालू लागला कि इथे रोज येणे-जाणे आहे आणी तू २ र. जास्त मागतो आहेस, थंडी असली तर काय झाले, अंतर तर सारखेच आहे ना.. वगैरे.. आम्ही समजावून पण तो काहि ऐकेना. शेवटी कंटाळून रिक्शावाल्याने सोडून दिले (म्हणजे बघा त्याने किती हुज्जत घातली असेल !).. जेव्हा आम्हि त्याला नंतर विचारले कि तुला २ रु नी काय इतका फरक पडणार होता, तर त्याचे म्हणणे की हे लोक फसवतात. मनात विचार आला जरी २ पैसे जास्त मिळण्यासाठी हे हातावर पोट असणारे लोक फसवत/अडवत असले, तरी एवढ्या छोट्या रकमेने जर तुम्हाला फारशी झळ पोहोचणार नसेल तर काय हरकत आहे...
-पहाटवारा
14 Nov 2014 - 8:32 am | टवाळ कार्टा
+११११११११११११
15 Nov 2014 - 4:01 pm | आतिवास
मनात विचार आला जरी २ पैसे जास्त मिळण्यासाठी हे हातावर पोट असणारे लोक फसवत/अडवत असले, तरी एवढ्या छोट्या रकमेने जर तुम्हाला फारशी झळ पोहोचणार नसेल तर काय हरकत आहे...
सहमत आहे. एक रूपयासाठी किती मनस्ताप करून घ्यायचा, किती हुज्जत घालायची ही अर्थात ज्या-त्या व्यक्तीची निवड असते.14 Nov 2014 - 2:50 am | श्रीरंग_जोशी
नेहमीप्रमाणेच विचार करायला लावणारे अनुभवकथन.
14 Nov 2014 - 4:30 am | स्पंदना
माताय!!
खरच किती टोचणी लागते जीवाला असल्या साध्या साध्या गोष्टींची की सांगता सोय नाही.
जयपुरमध्ये पहिल्यांदा सायकल रिक्षात बसल्यावर अक्षरशः उतरुन त्या माणसाला मदत करावीशी वाटत होती, काय सांगु किती लाज वाटली सुखासीनतेची!!
मग दुसर्या दिवशी पेट्रोलच्या रिक्षातपण बसवेना, कोठेतरी आपण त्या माणसाची रोजीरोटी काढुन घेतोय अस वाटायला लागल.
16 Nov 2014 - 11:18 am | आतिवास
'सायकल रिक्षा' हा नेहमी एक द्वंद्वाचा मुद्दा असतो माझ्यासाठी - तुमच्यासारखाच!
14 Nov 2014 - 7:06 am | दिपक.कुवेत
विचारप्रवर्तक लेख (जे नेहमीच तुमचे असतात)
14 Nov 2014 - 7:24 am | मदनबाण
सुरेख लेखन...
माझ्या मता नुसार या जगात फक्त ३ प्रकारचे लोक असतात...
१} पैसा आणि सत्ता असणारे
२} दरिद्री
३} या दोघ्यांच्या मधे सरपटणारे मध्यमवर्गीय.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
14 Nov 2014 - 8:59 am | नाखु
आता बाणरावांशी सहमती आणी आमचे दोन पैसे:
माझ्या मता नुसार या जगात फक्त ३ प्रकारचे लोक असतात...
१} पैसा आणि सत्ता असणारे
हे राजकारण-गुंडगिरी-सत्ता-गुंडगिरी-राजकारण असे चक्र आहे.म्हणून दोन्ही एकरूप झाली आहे
२} दरिद्री
हा वर्ग असाच रहावा असा सत्ताधार्यांचा एक कलमी प्रयत्न असतो (म्हणून सबसिड्या/मोफत ई. गोश्टी किमान शहरात देऊन कायम दरिद्री (विचाराने) राहतील याची पुरेपूर काळजी सत्ताधारी घेतातच्.पिं.चिं. मध्ये एकाही झोपडपट्टीची जागा रिकामी झाली नाही,नवीन घरे देऊनही!!)
३} या दोघ्यांच्या मधे सरपटणारे मध्यमवर्गीय
हा वर्ग दरिद्रिंच्या समूर स्वतःला भाग्यवान समजतो तर पैसा आणि सत्ता असणारे
समोर असहाय्य!! मूल्ये कोडगं बनू देत नाहीत तर जगण्याची धडपड बेडर!!! त्या मुळे सरपटणारे+फरपटणारे !
16 Nov 2014 - 2:47 pm | आतिवास
'पैसा आणि सत्ता असूनही' अमुक आणि तमुक प्रकारचे, दरिद्री असूनही अमके...... वगैरे आणखी बरेच उपवर्ग त्यात सामील करता येतील!
14 Nov 2014 - 9:15 am | समीरसूर
खूप सुंदर लिहिले आहे.
14 Nov 2014 - 9:29 am | पगला गजोधर
दर्जेदार व आशयघन लेख.
14 Nov 2014 - 9:36 am | सुबोध खरे
असाच अनुभव मला हळेबिडच्या मंदिरात आला. माणशी दहा रुपये भरायला नसल्याने १०० माणसे दर्शनाच्या रांगेत उभी होती. त्यांच्या कडे पाहून मला कणव आली पण १०० माणसांच्या रांगेत उभे राहण्यासाठी मला वेळी नव्हता किंवा तेवढा धीरही नव्हता. परंतु मुलांना मात्र मी हे समजावून सांगितले कि तुम्ही ४० रुपये खर्च करताय तेवढे पैसे नसल्याने हच माणसे दोन तास रांगेत उभी राहतील. तेंव्हा पैश्याची किंमत काय आहे ते समजून घ्या.
दुसरा अनुभव मी चिपळूण हून मुंबईला येण्यासाठी सहकुटुंब निघालो चिपळूण स्टेशन वर सावंतवाडी दादर प्यासेंजरचे तिकीट काढले ३८ रुपये माणशी. स्टेशनावर प्रचंड गर्दी होती. शिवाय मागून नेत्रावती एक्स्प्रेस येणार अशी सूचना झाली. मी तिकिटाच्या खिडकीवर विचारले याचे तिकीट किती आहे तेंव्हा त्याने सांगितले कि १२५ रुपये. यावर मी माझे प्यासेंजरचे तिकीट रद्द केले आणि नेत्रावती एक्स्प्रेसचे स्लीपरचे तिकीट काढले. प्यासेंजरआली ती खच्चून भरली होती त्यात हि स्टेशनची गर्दी चढली. नंतर नेत्रावती एक्स्प्रेस ई तिच्यात मी टी सी ला विचारून आपला बर्थ राखीव करून घेतला. पुढे वीर ला नेत्रावती एक्स्प्रेसला पुढे पाठवले आणि आम्ही एक तास वाचवून अतिशय आरामात मुंबईत आलो. येताना मी मुलांना परत हेच सांगितले कि केवळ ३६० रुपये नाहीत किंवा वाचवण्यासाठी लोक किती कष्ट काढतात. नशिबाने तुम्हाला या गोशी सहज मिळतात तेंव्हा त्याची जाणीव ठेवा. पैसा कितीही मिळाला तरी तो डोक्यात( आणि डोक्यावर) चढू देऊ नका.
14 Nov 2014 - 6:43 pm | कपिलमुनी
खुप छान संस्कार !
17 Nov 2014 - 2:48 pm | आतिवास
इतर वेळी मी पैसे देऊन सोय विकत घेते; पण देवळात मात्र मी तसं कधीच करत नाही.
कदाचित मी भक्त नाही म्हणून असेल, कदाचित देवाच्या दारी तरी पैसे हा मुद्दा असू नये असं मला वाटतं म्हणून असेल ..
19 Nov 2014 - 3:35 pm | कपिलमुनी
कधी कधी पैसा हाच मुद्दा नसून वेळ आणि सोय हा मुद्दा असतो . खास करून लहान मुले , वृद्ध यांची गैरसोय , कमी वेळ असताना दर्शनाची आस असणे अशा प्रसंगी या सुविधेचा लाभ बर्याच जणांना होतो .
( आणि यातील उत्पनामुळे साउथची मंदीरे खुप स्वच्छ असतात. )
19 Nov 2014 - 8:42 pm | सुबोध खरे
@आतिवास
मुळात १०० माणसांच्या रांगेत उभा राहून दर्शन घ्यावे एवढा मी भाविक नाही.( कुठल्याही रांगेत उभे राहावे हा माझा मुळात पिंडच नाही) म्हणून मी आजतागायत शिर्डी, तिरुपती, सिद्धिविनायक किंवा लालबागचा राजा येथे गेलेलो नाही.
मी हळेबिड ला गेलो होतो ते एक उत्तम स्थापत्य शास्त्राचा आणि कोरीवकामाचा नमुना असलेले मंदिर म्हणून. मी सुद्धा त्या रांगेत उभा राहावे कि नाही या संभ्रमात होतो. पण माझे आणि मुलांचे कपडे पाहून तेथील एका माणसाने अशी सोय आहे हे सांगितले म्हणून मी ते भरले माणशी १०० रुपये असते तर ते भरले असते का हाही प्रश्न आहेच. मंदिर चारी बाजूनी पाहून परत आलो असतो.
14 Nov 2014 - 10:00 am | विटेकर
नेहमीप्रमाणेच तुमाचा लेख आवडला. तुमचा अनउभव खूपच बोलका आहे. ( तुम्ही नेमका काय व्यवसाय करता ? शक्य असेल तरच सांगा , उगाच कुतुहल म्हणून विचारले , कारण तुम्ही संवेदनाशील ही आहात आणि तुमच्या कामामुळे तुम्हाला फिरण्याची संधीही मिळती आहे, सह्सा असा संयोग असत नाही. मीही भारतभर फिरतो ,पण माझा असा थेट लोकांशी संपर्क येत नाही, आणि मला ते इतकया प्रवाहीपणे मान्डताही येणार नाही. त्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात ! अस्तु , अवांतर पुरे )
काहीसा असहमत अशासाठी की पैशाने सत्ताच काय छोटी छोटी सुखे ही विकत घेता येत नाही. विशेषतः शारीरी सुखाला मर्यादा येतात. पहिल्यांदा जगन्नाथ पुरीला गेलो तेव्हा मधुमेहामुळे मिठाईचा स्वाद घेता आला नाही तेव्हा फार फार वाईट वाटले होते.
आणि पैश्याने आयुष्यात जो सुसह्यपणा ( किंवा सत्ता) येतो , त्याच्या मर्यादा फार लवकर उघड्या पड्तात. its merely cotton candy feeling !
17 Nov 2014 - 2:52 pm | आतिवास
व्यवसाय खरं तर स्पष्ट होतो आहे वेगवेगळ्या लेखांतून. :-)
केवळ हातात पैसे आहेत म्हणून शारीरिक व्याधी दूर होत नाही हे मान्य - पण पैसे असतील तर ती व्याधी सुसह्य पातळीवर राखण्याची संधी उपलब्ध असते. परंतु नेहमीच नाही - या तुमच्या मताशी सहमत आहे.
14 Nov 2014 - 10:09 am | विटेकर
एखाद्या रिकशामध्ये जेव्हा खचाखच भरुन लोक जात असतात, किंवा एखादा सायकल रिक्शावाला जीव तोडून सायकल मारत असतो , त्याचे आपल्याला जितके वाईट वाटते तितके त्यांना वाईट वाटत नसते असे मला लक्शात आले आहे, शेवटी सुख आणि दु:ख या दोन्ही संकल्पना सापेक्ष आहेत. नो अब्सोलुट व्याल्यु ! आपण सारे तुलनेने सुखी किंवा दु:खी असतो.
म्हणजे आपण त्यांच्याबाबत असंवेदनाशील असावे असे माझे मुळीच म्हणणे नाही.
माझ्या बाबतीत मी हा प्रश्न सोडविला आहे. पुण्यात राहून देखील मी रिक्षावाल्याशी हुज्ज्त घालत नाही. भाजीवाल्याला कधीही रेट कमी करुन मागत नाही. आणि हे ही खरे आहे की कधी कधी ते मला फसवतात, ते ही मला कळते पण ते सोडून् देण्यात मला फारसे काही वाटत नाही. हरामखोर राजकारणी आमचे ट्याक्स चे लाखो रुपये वर्षानुवर्षे राजरोसपणे खिषात घालतात तेव्हा आम्ही काय करतो ?
14 Nov 2014 - 10:34 am | मदनबाण
खादा सायकल रिक्शावाला जीव तोडून सायकल मारत असतो , त्याचे आपल्याला जितके वाईट वाटते तितके त्यांना वाईट वाटत नसते असे मला लक्शात आले आहे
हे असं नक्कीच नाही, कित्येक वर्षांपूर्वी मी माझ्या माझ्या आई-वडिलां सोबत अश्या सायकल रिक्षा मधे बसलो होतो { बहुतेक उजैन सांदिपनी आश्रम { भगवान श्री कृष्ण यांचे शिक्षा स्थान} येथे जाताना} एका चढणावर त्या सायकल रिक्षावाल्याला दम लागु लागला आणि त्याला ती सायकल रिक्षा चालवणे कठीण होउ लागले, तेव्हा माझे वडिल त्या सायकल रिक्षातुन उतरले आणि त्या सायकल रिक्षा बरोबर बरेच अंतर { ते चढण संपे पर्यंत } धावत राहिले. त्यावेळी त्या सायकल रिक्षा वाल्याच्या डोळ्यातले भाव मी कधीच विसरु शकत नाही तसेच माझ्या वडीलांची ही कॄती सुद्धा.
भाजीवाल्याला कधीही रेट कमी करुन मागत नाही. आणि हे ही खरे आहे की कधी कधी ते मला फसवतात, ते ही मला कळते पण ते सोडून् देण्यात मला फारसे काही वाटत नाही. हरामखोर राजकारणी आमचे ट्याक्स चे लाखो रुपये वर्षानुवर्षे राजरोसपणे खिषात घालतात तेव्हा आम्ही काय करतो ?
एखादा व्यक्ती फसवणुक करतो म्हणुन दुसर्यानेही फसवणुक करण्याचे समर्थन कसे करता येइल ? जी वस्तू योग्य दरात घेणे शक्य असेल ती चढ्या दरात का घ्यावी ? आणि कोणताही विक्रेता त्याला होणारा नफा घेतल्या शिवाय व्यवसाय करणारच नाही { काही अपवाद वगळता}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;)
{Aashiq Banaya Aapne }
14 Nov 2014 - 11:06 am | मित्रहो
आवडले
बाकी पैशाने सत्ता मिळते हे जरी खरे असले तरी सत्तेमुळे पैसा मिळतो हेही तितकेच खरे आहे.
17 Nov 2014 - 2:55 pm | आतिवास
:-)
18 Nov 2014 - 9:27 am | मदनबाण
बाकी या लेखामुळे कधी इथेच लिहलेल्या पण नंतर उडवलेल्या माझ्या अनेक छोटेखानी लेखनापैकी एक फक्त ५ रुपयांसाठी आठवला होता.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }
14 Nov 2014 - 11:07 am | बोबो
आवडला लेख
14 Nov 2014 - 12:30 pm | असंका
आपल्या लेखातून आपण जे काम करतो त्याची जाहिरात होऊ नये हा आपला हेतू आहे हे आपणच मागे एकदा स्पष्ट केले होते. पण त्यामुळे, आपले लेख वाचताना एक प्रकारचे अधांतरीपण येते. ज्याला इंग्रजीत premise म्हणतात ते अजिबातच कळत नाही. म्हणजे आपल्याला हा हा अनुभव आला हे ठिक आहे, पण मुळात अशा आडबाजूला आपण का गेला होतात हे न कळल्यामुळे सतत एक 'ब्लँक' दिसत रहातो.
मात्र आपण म्हणता तशी गोष्ट मलाही अनुभवायला आली होती. मीही एकदा एकट्यासाठी सर्व प्रवाशांचं भाडं भरून जीप सोडायला लावली होती. (त्या आडबाजूच्या गावात पोचायलाच मला ३ वाजले होते आणि मला ऑफीसची वेळ गाठायची घाई होती.) जीप सुटते म्ह्णल्यावर लोक भराभर जमा झाले. जीप जवळजवळ भरलीपण. तरीही मी ठरल्याप्रमाणे आठ लोकांचं भाडं त्याला दिलं. शेवटी मी एक्ष्ट्रा पैसे देत अस्ल्याने त्याला त्याचा नेहेमीचा शेवटचा थांबा सोडून पार मला हव्या असलेल्या दारात जायला लावले. त्यानेही आनंदाने नेले. शिवाय बसताना आपण म्हणता तसं बहुतेक मी एकटाच होतो पुढच्या सीटवर.
सत्ता, म्हणण्यापेक्षा किती सहजपणे हे सगळं झालं, एवढेच मला जाणवले होते त्यावेळी. त्याला सत्ता म्हणता येइल का, हे सांगणे तसे अवघड आहे. शेवटी तो व्यवहार होता.
17 Nov 2014 - 3:01 pm | आतिवास
मुळात अशा आडबाजूला मी का जाते? तर कामासाठी!
पण त्या कामाबद्दल मला पुरेसं लिहावं लागतं - तोही कामाचा एक भाग असतो. तेच पुन्हा इथं लिहायचं तर मला कंटाळा येईल, म्हणून लिहीत नाही. कधीतरी माझ्या कार्यक्षेत्रातली एखादी घटना सविस्तर लिहीन इथं 'मिपा'वरही. पण ते पुरेसं कंटाळवाणं वाटेल वाचकांना याची मला खात्री आहे. :-)
14 Nov 2014 - 12:43 pm | पैसा
पुन्हा वाचतानाही तेवढाच आवडला. दर वेळी आपल्या नकळत अशी सत्तेची भावना येत असेल का? मला तसे वाटत नाही. अनेक कारणे असू शकतात. पण हीसुद्धा एक शक्यता मोठ्या प्रमाणात असावी याच्याशी सहमत आहे.
पैशाम्ची किंमत प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. रोजचा खर्च हजारांत असणारेही असतात तसे एक हजार रुपयात महिनाभर संसार चालवणारेही असतात. उत्तर भारतात आणि बंगालात रेल्वेमधे चहा पिऊन जे कुल्हड आपण फेकून देतो, तेच इकडे फॅन्सी वस्तू म्हणून अवाच्या सवा किंमत देऊन विकत घेतो. हॉटेलमधे जेवणाचे बिल ५ हजार करताना काही वाटत नाही, पण एखाद्या संस्थेला मदत करताना तीच ५ हजाराची रक्कम मोठी वाटते. आणखी कोणाला तीच रक्कम जीव वाचवणारीही ठरू शकते. सगळं व्यक्तीसापेक्ष आहे शेवट.
14 Nov 2014 - 1:06 pm | मराठी_माणूस
छान लेख.
लेखात तुम्ही खालील प्रश्न विचारला आहे
त्याचे उत्तर तुमच्याच लेखात दडलेले आहे, ते म्हणजे
ह्याची जाणीव प्रत्येकाने सदैव ठेवली तर सत्तेची उर्मी टाळता येईल
14 Nov 2014 - 5:28 pm | आतिवास
पण हेच तर अवघड!
14 Nov 2014 - 1:06 pm | मृत्युन्जय
लेख सुरेख आहे.
14 Nov 2014 - 2:44 pm | माधुरी विनायक
असे अनुभव शेअर केल्याबद्दल मनापासून आभार. निव्वळ पोपटपंची किंवा शब्दबंबाळ भाषणबाजीपेक्षा असे प्रत्यक्ष अनुभव खूप काही शिकवून आणि एखाद्या गोष्टीकडे, प्रसंगाकडे बघायची नवी दृष्टी देऊन जातात...
14 Nov 2014 - 3:03 pm | धर्मराजमुटके
मी ही असेच एकदा पैसे देऊन प्रवासाचे सुख विकत घेण्याचे ठरविले आणी त्याप्रमाणे जीपवाल्याला तीन सीटचे पैसे जादा देण्याची ऑफर दिली तर जीपवाला मला म्हणाला तुमचे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. एकडे लोकांना एक गाडी सुटली की पुढची गाडी १ तासाने येईल की २ तासाने ते माहित नसतं. त्यांचा वेळ हा वेळ नाही काय ? मी रस्त्याने जोपण हात करेन त्याला घेऊनच जाणार. तुम्हाला बसायचं तर बसा. तेव्हापासून मी असे विकतचे सुख विकत घेण्याचा विचार करत नाही.
14 Nov 2014 - 5:24 pm | आतिवास
काही ठिकाणं अशी आहेत की तिथं खाजगी वाहनांची वारंवारिता कमी असते. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो अनुभव मीही घेतलाय. शिवाय एकाच शहरात प्रवास करणं आणि एका गावातून दुस-या गावात प्रवास करणं - अशाही वेळी वाहनचालकांची वागणूक वेगळी असते असा अनुभव आहे. शिवाय एखाद्या परक्या व्यक्तीसाठी स्थानिकांना न दुखावणे यात व्यावहारिक शहाणपण जास्त आहे. अशा वेळी आपल्याला काही पर्यायच नसतो आहे त्या व्यवस्थेला शरण जाण्याविना!
15 Nov 2014 - 12:18 am | धर्मराजमुटके
थोडीसी दुरुस्ती. मी तर म्हणेन अशा व्यवस्थेत स्वतःला आनंदाने गुंफून घ्यावे. बर्याचदा आपण समजतो तितकी ती परिस्थीती कठीण नसते. मात्र काही वेळा फक्त स्त्रियांना अनुभवायास येणार्या दु:खांबद्दल मला व्यक्तीशः दिलगीरी वाटते. तेव्हा वाटेल॑ ती किंमत मोजून आपली सुरक्षीतता विकत घ्यावी याबाबत दुमत नाही.
15 Nov 2014 - 3:52 pm | आतिवास
सहमत आहे.
कदाचित फक्त स्त्रियांची गर्दी असलेल्या वाहनातून प्रवास करताना मी काही 'अधिक' विकत घेण्याचा प्रयत्न करणार नाही. मुंबईची लोकल, दिल्लीची मेट्रो, लाल एसटीत दोन जागांवर तिसरीला सामावून घेणं - या गोष्टी सहजतेने होतात.
14 Nov 2014 - 11:56 pm | श्रीगुरुजी
आपला अनुभव वाचल्यावर शराबी चित्रपटातील जयाप्रदाच्या नृत्यासाठी संपूर्ण सभागृह एकट्यासाठी आरक्षित करणार्या अमिताभची आठवण आली.
बाकी अनुभव सुंदर!
15 Nov 2014 - 5:09 pm | गजानन५९
खूप दिवसांनी असा निवांत आणि डोक्यात घुसणारा लेख वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.
अवांतर -
माई मोड ओन ‘ अरे गुरुजी लेखाचा विषय काय आणि तू उदाहरण काय देतोस’ मी मोड ऑफ
15 Nov 2014 - 10:26 am | सुधीर
लेख आवडला. साचेबद्ध आयुष्य जगणार्या माझ्यासारख्या माणसाला तुमच्या वेगवेगळ्या अनुभव समृद्धीच्या खजिन्याचा हेवा वाटतो.
15 Nov 2014 - 1:06 pm | प्यारे१
लेख आवडला. म्हणूनच मालकीहक्क दाखवण्यापेक्षा विश्वस्त ही भूमिका जास्त वठवण्यासाठी महत्त्वाची वाटते.
15 Nov 2014 - 1:06 pm | प्यारे१
म्हणूनच मालकीहक्क दाखवण्यापेक्षा विश्वस्त ही भूमिका वठवण्यासाठी जास्त महत्त्वाची वाटते.
15 Nov 2014 - 1:18 pm | तिमा
लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
पण लेख वाचल्यावर एक आठवण झाली. मुंबई-पुणे प्रवासात असेच एक्स्ट्रॉ रिझर्व्हेशन करुन आरामशीर प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता. पण अप-डाऊन करणार्यांच्या दादागिरीपुढे काही चालले नाही, उलट खास 'पुणेरी मुक्ताफळे' ऐकावी लागली.
15 Nov 2014 - 9:57 pm | मारवा
पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का?
15 Nov 2014 - 10:05 pm | मारवा
हा प्रश्न मोठा मार्मिक आहे पैसा पद आदि चा पाठलाग हा मुळात सत्ताकांक्षे ची च प्रेरणा आहे यात फार तथ्य आहे.
गंमत अध्यात्मिक पारलौकिक क्षेत्रातहि अशीच सत्तेची आकांक्षा दिसते. ती मोठ ग्लोरीफाय होउन येते सटल असते मात्र असते तीच सत्तेची ओढ
बाहेरच्या जगाचा पुर्ण त्याग केलेले आंतरीक जगातली पदे मिळवण्याच्या मागे लागतात.
गुरु च्या अधिक जवळचे, समाधी च्या अॅडव्हान्स टप्प्यावरचे, विशेष कृपा झालेले, चोजन फ्यु इ.इ.
जो माणुस बाहेर एक एक पद चढु पाहण्याची धडपड करतो तीच धडपड परत इथे सुरु
फक्त दिशा स्वरुप बदललेल
शॅलो एम्प्टी माइंड परत परत तेच तेच फक्त दिशा व स्वरुप बदलते.
स्वामी विवेकानंदाच्या पत्रांमध्ये बघा कायम पैसा जमविण्याची सतत व्याकुळ धडपड मिशन च्या कामासाठी, प्रचारासाठी, महान भारतीय संस्कृती साठी. गुरुसाठी सगळ ठिकच आहे
पण परत परत तेच ते
15 Nov 2014 - 10:15 pm | प्यारे१
हे जरा व्यवस्थित मांडता येईल काय? नक्की काय म्हणायचंय ते समजलं नाही म्हणून विचारलं.
16 Nov 2014 - 2:45 pm | आतिवास
तथाकथित अध्यात्म क्षेत्रातही सत्तेचा हा 'सूक्ष्म' खेळ पाहायला मिळतो - कधीकधी तो उबग आणण्याइतपत उघड असतो याच्याशी सहमत.
पण विवेकानंदांची ४०० पानांची पत्रं वाचून तुम्हाला जे वाटलं त्याच्याशी मात्र मी असहमत आहे.
अर्थात लेखाचा विषय 'विवेकानंद' नसल्याने अवांतर नको म्हणून थांबते. तुम्ही वेगळा धागा काढा या विषयावर, मग कदाचित लिहीन. पण हा प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न असतो त्यामुळे त्यावर काथ्या कुटण्यात मला फारसं स्वारस्य नाही.
16 Nov 2014 - 2:59 pm | प्यारे१
मला मारवा ह्यांच्या प्रतिसादातून जे समजलं त्यानुसार सत्तेचा खेळ हा बाह्य नसून अंतरंगातला आहे.
आखाड्याचे महाराज सत्तेसाठी उघड उघड स्पर्धा करणं हे तर आहेच आणि त्याचा उबगही येणं साहजिकच आहे.
योगी, महाराज, साधू, साध्वी म्हणवणारे आमदार खासदार मंत्री असलेले पाहताना त्यातला विरोध चीडच आणतो पण मारवा ह्यांचा प्रतिसाद काहीसा वेगळा वाटतोय.
म्हणूनच त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते विचारलं होतं.
15 Nov 2014 - 10:12 pm | vikramaditya
बहुतेक वेळा पैसा स्वःताबरोबर अनेक वाइट गोष्टी आणतो. विषय फार गहन आहे. प्रतिक्रिया पण चांगल्या आल्या.
16 Nov 2014 - 11:57 am | बिपिन कार्यकर्ते
व्वा!
17 Nov 2014 - 3:02 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
18 Nov 2014 - 10:24 am | प्रभाकर पेठकर
लेखात वापरलेला 'सत्ता' हा, नकारात्मक छटा असणारा, शब्द अयोग्य वाटतो. इथे 'सोय', स्त्रियांच्या बाबतीत 'सुरक्षितता' हे शब्द जास्त योग्य आहेत.
मुंबई सारख्या शहरातही गाड्यांना प्रथमवर्ग, द्वितीयवर्ग, वातानुकुलीत वर्ग असे चढत्या क्रमाचे वर्ग तुमच्या सोयीसाठी असतात. रस्त्यातूनही साधी बस, वातानुकुलीत बस, टॅक्सी, रिक्क्षा आणि पायी प्रवास असे अनेक प्रकार आपण रोजच्या आयुष्यात शहरातही अनुभवत असतो. आपल्या सोयी नुसार ह्या सुखांचा वापर केला जातो. कमी गर्दी, स्वच्छता, आसनव्यवस्था आणि आपला वेळ ह्या गोष्टी आपली 'खरेदीक्षमता' जोखून आपण वापरत असतो. दोन ठिकाणांमध्ये करावयाच्या प्रवासाचा वेळ ही सोय, उभे राहून की बसून प्रवास करायचा ही शारीरिक क्षमते संबंधी सोय, उकाड्यातली गर्दीतली घुसमट टाळण्याची सोय आदी सोयी आपण आपल्या ताकदीनुसार पाहात असतो. त्यात 'सत्ता' हा विचार नसतो. जिथून बस सुटते तिथून प्रवास सुरु होणार असेल आणि माझ्या जवळ भरपूर वेळ असेल तर मी टॅक्सीने जात नाही. बसनेच प्रवास करतो. कारण माझी सोय भागत असते. रिकामी बस सोडून मी टॅक्सीने प्रवास केला तर तीथे सत्तेची भावना प्रबळ आहे असे म्हणता येईल. रोजच्या घर ते कचेरीच्या अंतरात सायकल आणि मोटरसायकल दोन्हीचा वापर शक्य असू शकतो. पण सायकलचालविताना होणारे शारीरिक श्रम, घामाघूम अवस्था कचेरीत पोहोचल्यावर माझ्यात त्राण उरणार नसतील तर मोटरसायकलच मला जास्त 'सोयी'ची आहे.
समाजात (जगात कुठेही) वेगवेगळ्या आर्थिक स्तराचे लोकं राहात असतात. जी एखाद्याची चैन असते तीच दुसर्याची मूलभूत गरज असू शकते. सर्वांना एकाच पातळीवर आणणं शक्य आहे का? प्रत्येक जण शिक्षण, उच्च शिक्षण, व्यवसायभिमुख शिक्षण घेत असतो. का? आपला आर्थिक स्तर वाढावा आणि जास्त सुखासीन आयुष्य जगता यावं. ह्या अवस्थेसाठी कोणी बौद्धीक (शिक्षण) क्षमता वापरतो तर कोणी शारीरिक (श्रमाची कामे) क्षमता वापरतो. एकाचे काम दूसर्यासाठी अवघड असते.
सायकल रिक्षा किंवा ताकदीने ओढलेली रिक्षा ह्यात बसताना अपराधी वाटतं ही गोष्ट खरी आहे. कारण आपण पैशांकडे 'सत्ता', 'माज' अशा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहात नसतो. आपल्या स्वभावात ते नसतं. आपण संवेदनशील असतो. दुसर्याने आपल्या प्रवासाच्या सोयीसाठी घेतलेल्या श्रमांची आपल्याला जाणीव असते. म्हणूनच ती एक 'सोय' असते. सत्तेचा माज असता तर असे विचार आपल्या मनांत येणार नाहीत.
18 Nov 2014 - 7:09 pm | एस
हाही दृष्टिकोन पटण्यासारखा आहे. त्याच गोष्टीकडे पाहण्याची प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी किंवा सापेक्ष असू शकते. पण डोळे फिरतील एवढा विरोधाभास मात्र नसावा.
19 Nov 2014 - 1:32 am | आतिवास
सत्ता या शब्दाबाबत आपल्यापैकी अनेकांचा अनुभव बराच नकारात्मक असतो, पण सत्ता तशी सर्वत्र असते (फक्त राजकीय नाही). अनेकदा आपल्याला ती नको असली तरी आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी जास्त असल्याने ती सत्ता मिळते.
मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले
असं म्हटलं आहे मी, पण त्याचा परिणाम म्हणून इतरांपेक्षा विशेष सोय मला मिळवता आली - तीही एका अर्थी सत्ता आहेच!19 Nov 2014 - 3:55 pm | मराठी_माणूस
एक मुलभुत प्रश्नः जिथे पैसे देउन रांग न लावता झटकन दर्शन घेता येते तेथे खरच देव असतो का ?
19 Nov 2014 - 5:32 pm | कपिलमुनी
हा मुलभूत प्रश्न आहे .
19 Nov 2014 - 5:48 pm | बॅटमॅन
त्याचं उत्तर आम्हांला समजलेलं नाही, परंतु होकारार्थी उत्तर देणारे संशोधन एका गणितज्ञाने प्रसिद्ध केलेय बॉ. पाश्चिमात्य असल्याने त्याच्या विश्वासार्हतेवर कुणी संशयही घेत नाही.
http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof
19 Nov 2014 - 6:58 pm | कपिलमुनी
बॅटमुनी ,
त्या इक्वेशन पाहून झीट येउन पडलो आणि गुमानपणे देव हाये म्हणला ..
२-४ पोरांना दाखवल्याबरोबर त्यांनी पण वाद न घालता देव आहे हे मान्य केलाय
19 Nov 2014 - 7:22 pm | प्यारे१
मुलभुत प्रश्नानिमित्त मुलभुत प्रश्नः देव नक्की कुणाला म्हणायचंय?