करोना विषाणू
हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.
COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे.
यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात.
बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात.
१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.
गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो.
रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो.
यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे.
आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे.
अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे).
कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे.
करोना विषाणू पासून आपला बचाव--
१) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे
२) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे
३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे
आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे.
हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे.
आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे.
चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात
अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल
सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती .
स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती
इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती
तर
करोना मध्ये हि १-२ % आहे
मग आज इतकी भीती का पसरली आहे ?
सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे.
भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते.
वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.
हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.
पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.
लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
प्रतिक्रिया
20 Mar 2020 - 5:48 am | चौकस२१२
"हे करताना अनेक कायदेशीर बाबी त्या कंपनीला पाळाव्या लागतात कारण चुकून कोणाचा त्या रोगाने मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा खटला होऊ शकतो आणि कंपनीची कीर्ती रसातळाला जाऊ शकते."
याबाबत कुतूहल आहे , खास करून औषधाचे बाबतीत... जर विषाणू दिला गेला असेल तर रोग होणारच ना?
वेळ मिळेल तेव्हा जरूर प्रकाश टाकावा हि विनंती
मी पूर्वी शरीराशी संबंध येणाऱ्या उपकरणे उदाहरणार्थ "इम्प्लांटेबल डिवाइस" क्षेत्रात थोडे काम केले आहे पण औषधे अशी पडताळून पाहणे उपकरणाच्या चाचणी पेक्षा अवघड असावे असे वाटते !
तसेच यातील "शरीरात चाचणी" हि भारत किंवा मेक्सिओ सारखया देशात औटसोर्स केली जाते असे ऐकले आहे ? तसे असेल तर...पण बहुतेक औषधी उद्योगांचे पहिले विपणन लक्ष हे पाश्चिमात्य देश/ जपान असे असते ज्यात सुद्धा बर्फाळ कॅनडा पासून ते दमट दक्षिण जपान एवढी विविधता मग जे भारतीय माणसावर तपासले जाते ते इतर देशात लागू कसे होते? त्या त्या देशातील माणसाची प्रतिकारशक्ती / तिथलं वातावरण वेगळे !
अजून एक ऐकले आहे ते खरे का? कि लस बनवण्यासाठी कोंबडीचे अंडे हे माध्यम सर्वात उत्तम "घर" समजले जाते ?
थोड्या विषयांतराबद्दल क्षमस्व
20 Mar 2020 - 8:05 pm | सुबोध खरे
पण बहुतेक औषधी उद्योगांचे पहिले विपणन लक्ष हे पाश्चिमात्य देश/ जपान असे असते ज्यात सुद्धा बर्फाळ कॅनडा पासून ते दमट दक्षिण जपान एवढी विविधता मग जे भारतीय माणसावर तपासले जाते ते इतर देशात लागू कसे होते
भारतीय माणसाचे रक्त अमेरिकी किंवा आफ्रिकेतील माणसाला कसे चालते? कारण सर्व माणसांचे डी एन ए एकच आहेत.
अर्थात
केवळ भारतीय ते सुद्धा तुम्ही फक्त ९६ कुळी मराठा किंवा कुलीन बंगाली भद्रलोक घेतले तरी त्यांच्यात त्यांचे शरीर औषधास प्रतिसाद कसा देईल हे वेगवेगळे असते.
त्यामुळे औषध प्रत्यक्ष बाजारात आले तरीही कंपन्या ते देणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात असतातच आणि काही दुष्परिणाम आढळले तर ते औषध बाजारातून परत मागवले जाते.
आता भारत किंवा इतर गरीब देशात यांची चाचणी घेतली जाते याचे कारण अमेरिकेतील स्वयंसेवकांना डॉलर मध्ये पैसे द्यावे लागतात आणि काही वाईट घडले तर दशलक्ष डॉलर्स मध्ये नुकसान भरपाई द्यावी लागते.
याउलट भारत बांगला देश येथे स्वयंसेवकांना डॉलर्स मध्ये नव्हे तर रुपये किंवा टका मध्ये पैसे द्यावे लागतात आणि जर काही मोठा झोल झाला तर मामला "सेट" करून घेता येतो जसं भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये झालं.
गरीब देशात मानवी आयुष्याची किंमत बरीच कमी असते
20 Mar 2020 - 8:45 pm | माहितगार
:(
20 Mar 2020 - 8:47 pm | माहितगार
CoVID19 शैक्षणिक सुट्टी कालावधीत सोशल डिस्टन्सींग राखले जाईल असे शालेय आणि महाविद्यालयीन मुला (मुलींसाठी) खेळ सुचवा. कदाचित क्रिकेट ?
21 Mar 2020 - 10:18 pm | आवडाबाई
हाच उपाय दिसतो. क्रिकेट मधे बॉलला सर्रास थुंकी लावतात, ओरडून बोलतात तेव्हा तुषार उडू शकतात.
सध्या तरी पुर्ण अलगीकरण हेच योग्य वाटते.
* पुण्यातील कालची एका महिलेची केस community infection असण्याची भिती आहे,* सावधपणा राखायला हवा.
चित्रे काढणे, वाचन, संगीत ऐकणे, गाणे, वाद्य वाजवणे, आवडत्या विषयावर संशोधनपर माहिती गोळा करणे, भेंड्या लावणे(हे कुठे गायब झालय सध्या), dumb charade, वैदिक गणित, एखादी भाषा शिकणे अशा गोष्टी करता येतील. कोरोनाच्या data चे statistical analysis करण्याचा प्रयत्न करता येईल, prediction किती बरोबर येते लवकरच कळेल.
22 Mar 2020 - 8:23 am | माहितगार
होय बरोबर आहे तुमचे. मी लिहिण्यापुर्वी सोसायटीतील मुलांना फुटबॉल आणि डब्बा ऐसपैस का काय खेळताना पाहीले यात सोशल डिसटंसींगचा रुल अमलात येत नाही. क्रिकेट सुद्धा परफेक्ट नाही कदाचित बॅटमिटंन मध्ये एकमेकांवर पडण्याचे प्रमाण कमी व्हावे असे वाटते. अर्थात बॅटचे हँडल स्वच्छ ठेवणे आलेच आणि फुलाला एका पेक्षा अधिक व्यक्तींचा स्पर्ष ही आला.
बैठ्या खेळात पत्त्यांचे खेळ, बिजनेस व्यापार सोंगट्या ज्यात खेळातील वस्तुची देवाण घेवाण होते सगळे हात लावतात ते टाळणे श्रेयस्कर असेल असे वाटते. जे खेळ खेळणी प्रत्येकाची स्वतंत्र ठेऊन खेळता येतील ते बरे. जी खेळणी साबणाच्या गरम पाण्यात धुऊन घेता येतील ती धुऊन वापरणे श्रेयस्कर असेल. चेस सारखा खेळ एकाने कायम एकाच रंगाच्या सोंगट्या वापरुन खेळल्यास श्रेयस्कर असावे.
बाकी तुम्ही सोलो अॅक्टीव्हितीजचे पर्याय सांगितलेत त्यात शब्द कोडी सोडवणे हे ही असू शकेल. टिव्हीवर भरपूर पिक्चर आणि कार्टून्स बघण्याचेही स्वातंत्र्य काही कालावधीसाठी मुलांना देऊ शकता यावे असे वाटते.
21 Mar 2020 - 10:49 am | गोंधळी
चायना मध्ये सलग तिसर्या दिवशी एकहि नविन केस आलेली नाही.
पण ज्या वेगाने हा पसरत आहे त्यावरुन हा ह्वायरस वातावरणात जास्त वेळ जिवंत राहत असावा असे वाटते.
21 Mar 2020 - 12:22 pm | मित्रहो
या धाग्यावर खरच खूप छान माहिती मिळत आहे. आता मी माझा लॅपटॉप एकदा सॅनटायझरने साफ करुन घेतो कारण नाही म्हटले तरी बाहेर जावे लागते. मोबाईल करीत होतो.
जे औषधाच्या बाबतीत सांगितले आहे मला वाटते ते सुद्धा सध्या ट्रायल या प्रकारात मोडतात. क्लोरोक्वीन किवा एचआयव्हीची औषधे वगैरे. जयपूर कॉकटेल म्हणत आहेत ते. हे इतरत्रही प्रयत्न करण्यात आले.
21 Mar 2020 - 2:12 pm | आवडाबाई
डॉकसाब,
बाजारातून आणलेली फळे खाताना कोणती काळजी घ्यावी, मुख्यत्वे सफरचंद वगैरे जी आपण साल न काढता खातो.
नेहेमीप्रमाणे थंड पाण्याने धुवून घेतली तर पुरेसे राहिल का? आधी त्यांना कोण कोण हात लावून गेले माहित नसते - ह्या संदर्भात.
21 Mar 2020 - 8:14 pm | सुबोध खरे
मुळात जी फळे आपण सालासकट खातो उदा सफरचंद द्राक्ष ती घरी आणल्यावर थोड्याशा साबणाच्या पाण्यात काढून पाण्याने धुऊन घ्यावीत. कारण त्यावर मारलेली कीटकनाशके आपल्या पोटात जाऊ शकतात.
बाकी साल न खातो तशी फळे उदा कलिंगड केळे इ सध्या तरी साबणाच्या पाण्याने धुवून खावी.
एकदा हि करोनाची साथ संपली कि कलिंगड सारखी फळे निदान तरी पाण्याने धुवावीत कारण कापताना त्याच्या खायच्या भागाला आपला हात लागतोच तेंव्हा तेथे असलेली माती किंवा कीटक नाशके पोटात जाऊ शकतात.
बाकी केळं खाताना आतल्या गराला हात न लावता खा आणि मग आपले हात धुवा
21 Mar 2020 - 10:03 pm | आवडाबाई
सालासकट खातो ती पण फळे कधी साबणाने धुवून खात नव्हतो. चला अजून एक लाईफस्टाईल बदल ह्या निमित्ताने .
खूप आभार.
21 Mar 2020 - 7:34 pm | नमकिन
आजचा दिवस हा प्रत्येक देशाच्या हलगर्जीपणामुळे पहावा लागतो आहे असे आढळले. इथे रोग हवेमार्फत पसरता आजचे निर्बंध योग्य ठरते पण परदेशी पर्यटक वा प्रवासी यांना अटकाव केला नाही, घरी जाऊन झोपा एकटेच असे नुसत्या सूचनेवर विसंबून स्मार्ट सरकारने झोपा केला.
स्मार्ट सुशिक्षीत, ऊच्च आर्थिकदृष्ट्या सक्षम जनतेला सरकार आवरू शकले नाही. आज त्या उद्दाम, मुद्दाम वागण्याचे गंभीर परिणाम सर्व जनता भोगतेय.
१२ मार्च रोजी बाहेरच्या विमान वाहतूक प्रतिबंध केला तोच महीनाभर आधी केला असता तर साधारण १०लाख परदेशी वा देशी लोकांना थोडी गैरसोय झाली असती पण संपूर्ण भारत देशात १२५कोटी लोकसंख्या सुरक्षित रहाती.
गेला बाजार फक्त देशी नागरिक जे बाहेरच्या देशातून आलेले होते त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात सरकारने सोय करून ठेवले असते १४ दिवस तरी चालले असते. पण श्रीमंतांच्या यादीत मोडणारा मोकाट रोग घेऊन फिरताना दिसतात पण गरीबांना कामधंदा सोडून घरी बसवतात हे सरकारी अधिकारी व नेते.
निव्वळ निष्कलंक राहिले सर्व रोगी व राजकीय सत्ताधारी निर्धास्त.
काय वाट्टेल ते चालले आहे भाऊ इतकं टरकून ठेवले आहे आमची धडगत नाही कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी बळजबरीने डांबण्यात आले आहे. बिनडोक पणा सगळा, एखाद्या राजकीय पक्षाने बंद पुकारला तर देशाचं किती लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, दंगलखोर पकडून भरपाई वसूल करण्यात येते.
कोरोना पसरविणारे व पसरवू देणारे सरकार विरोधात भरपाई वसूल केली पाहिजे. श्रीमंतांच्या गुर्मीचा भुर्दंड सहन करतेय गरीब बिचारी जनता.
22 Mar 2020 - 11:16 pm | शकु गोवेकर
हा विषय नमकीन यांनी बरोबर सांगितलं असे वाटते
23 Mar 2020 - 9:22 am | चौकस२१२
" इतकं टरकून ठेवले आहे "... कोणी? सरकारने? उगाच सगळं खापर का फोडताय सरकारवर?
अश्या प्रसंगी जनतेने आणि माध्यमाने सरकार काय करत आणि नाही याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे हे मान्य .. सिंहावलोकन करून सल्ला देना सोप्पं असतं
जगभर च्या सरकारांना आज याला सामोरे जावे लागतंय...
सरकार चालवणारे, मोठे उद्योग किंवा मोठ्या संस्था चालवणारे नेते/ अधिकारी यांचा काम अश्याप्रसन्गी सोप्पं आहे असे वाटते का? किती गोष्टी एकावेळी सांभाळाव्या लागत असतील अश्यावेळी याची यादी केली तर चक्कर येईल
स्वतःला त्याखुर्चीत बसवा क्षणभर... आणि मग टीका करा... मी बसवले क्षणभर त्या खुर्चीत मला आणि माझी वीतभर फाटली ( चड्डी)
23 Mar 2020 - 3:39 pm | नमकिन
मास (मास्क) हिस्टेरिया चार प्रकार आहे हा.
अहो आज विमानतळ बंद करून काय उपयोग, विषाणू शरीरात घेऊन १०लाखावर प्रवासी शिरले पूर्ण देशातील जनतेला संसर्ग वाटायला.
उगीचच सगळ्यांच्या उल्लेखाने विषय भरकटत जातो.
सिंहावलोकन नाही तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे तत्व शिकवण आहे. पंचतंत्र इसापनीती बोधकथा आठवा.
१२५ कोटी घरी बसवतात जनतेला. कारखाने, उत्पादन, वितरण ठप्प करून हूकूमशाही चे प्रयत्न करत आहेत सरकार.
दूरदृष्टी अभावामुळे होणारे आजार असे वर्णन करताना दोषी मात्र भयभीत झालेल्या भाबड्या जनतेला टाळ्या, ताटल्या बडवायला लावून कर्मचारी कौतुक केले ही भावना प्रबळ करण्याचे चलाख महापुरुष आहे.
इथे भावनांना कुरवाळत भ्रमिष्ट केले जात आहे. विषाणू पसरवण्यास पूरक धोरण राबवले म्हणजे मंदी, अर्थव्यवस्था, कर ऊत्पन्न, परराष्ट्र नीती वगैरे गोष्टी बाजूला पडल्यात आपोआप.
मूळात जिथे संसर्ग पोचले ते परदेशातून आलेल्या लोकांनी जाणते -अजाणतेपणी हे तरी खरं आहे ना. संपूर्ण १ महिना वेळ होता आपल्या सरकारला. चीन येथे लागण पसरल्याच्या बातम्या आपण २०-२५ जानेवारी पासून वाचतोय. तेथील प्रतिबंधक उपाय, शहरे बंद करणे हे व इतर प्रकार आज २ महिन्यांनी आपण भारतात करतोय हे मोठा कालावधी हातात असूनही सरकार नाकर्तेपणा चा परिणाम.
23 Mar 2020 - 5:41 pm | Rajesh188
विमान सेवा २ महिन्ाभरापूर्वी बंद केली असती तर आता ही वेळ आलीच नसती
23 Mar 2020 - 7:58 pm | सुबोध खरे
11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने विमान प्रवासावर बंदी घालण्याची गरज नाही असे वूहान च्या साथीबद्दल केलेल्या शिफारशीत म्हटलेले आहे.
यानंतर इतक्या दिवसांनी आता त्यांना असेवाटते आहे की हवेतील सूक्ष्म कणांमध्ये करोनाचा विषाणू जिवंत राहू शकतो त्यामुळे आपल्याला कदाचित मुखवट्याचा फायदा होईल.
इतके दिवस मुखवट्या चा फायदा होणार नाही अशीच शिफारस होती.
जसे जसे रोगाबद्दल जास्त समजत जाते तसे आपण त्याबद्दल आपली माहिती अद्ययावत करत जातो.
Retrospectively all are wise.
25 Mar 2020 - 9:20 am | नमकिन
शिफारस करून त्यांनी त्यांचे काम केले. आपण जागरूक राहून आपल्या देशातील सोयी, सवयी माहीतच असलेल्या सरकारने वेळेत योग्य प्रतिबंधक उपाय केले नाही.
२१ दिवस देशं बंद केला, २५मार्च पासून.
२०जानेवारी वूहान चार विषाणू प्रसार सर्व जगाला कळला होता, इटली प्रकोप मार्च सुरूवात झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवला पण केंद्रीय मंत्री व नेतृत्व इतर स्थानिक राजकीय घडामोडीत गुंतलेले होते. ६० दिवस होते सरकार कडे.
चूका होतात पण त्या मान्य केल्या तरंच पुढे सुधारणा होईल अन्यथा तेच योग्य ठरवण्याची धडपड ही अशी मारक ठरत असते, सर्व सामान्य जनतेला.
25 Mar 2020 - 9:41 am | नमकिन
आता हरेक छोट्या शहरात कोरोना पसरविणारे शिरले ते परदेश प्रवास केलेले आहेत हे वारंवार दिसले तरी सरकारने रोज जुजबी तपासणी करून घरी सोडले. लोकशाही जनता एवढी आज्ञाधारक आहे का नुसत्या विनंती चा मान ठेवून घरीच राहील या भाबड्या आशेवर सरकार विसंबून राहीले ही दुसरी चूक.
जनता कर्फ्यू लावून हेच चालू होते. संशयित मोकाट, सामान्य जनता घरात. टाळ्या वाजवत. २३मार्चला विमान प्रवास वाहतूक थांबवली जेव्हा संसर्ग ३०० लोकांना झालेला.
कहर केला.
25 Mar 2020 - 12:20 pm | सुबोध खरे
जागतिक आरोग्य संघटनेने इतके पुढे मागे (FLIP FLOP) केले आहे कि नक्की त्यांच्यावर विश्वास ठेवावा कि नाही हे कठीण आहे.
११ जानेवारीला त्यांच्या साईट वर होते कि वूहान मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर काही विविक्षित खबरदारी घ्यायची गरज नाही
१४ जानेवारीला होते कि विमान सेवा बंद करण्याची गरज नाही.
१६ जानेवारीला लिहिले होते कि एका माणसाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता फारशी नाही.
१० फेब्रुवारी ला होते कि लॉक डाऊन करून काही फायदा होणार नाही.
इतके दिवस सांगत होते कि तोंडावर मुखवट्याची गरज नाही
आता सांगत आहेत कि मुखवटा आवश्यक आहे कारण खोकले किंवा शिंकले कि सूक्ष्म कण हवेत धुरळले(AEROSOL) जातात आणि त्यापासून पण हा रोग होउ शकेल. त्याच संघटनेचा दुजोरा देत मी हा लेख लिहिला आहे. यात मी तोंडघशी पडलो आहे.
सामान्य माणसे तर सोडाच आमच्या सारखे अनेक वैद्यकीय क्षेत्रात आहेत ते पण तोंडघशी पडत आहेत.
सरकारने एकदम एखादं मोठं पाऊल उचललं आणि नंतर जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केले तर सरकार ची अवस्था फार बिकट होईल.
शेवटी शाहीन बागच्या लोकांना हाकललं. त्यांची मागणी होती कि आम्हाला मुखवटे आणि हॅन्ड सॅनिटायझर द्या. आंदोलन यांनी करायचं आणि सरकारकडून अशा मागण्या करायच्या. याबद्दल काही बोलायचं तर सगळे लिब्रान्डु अंगावरच येतात.
सरकारला शिव्या देणं फार सोपं आहे. ज्यांनी तेथे काम केलेलं असतं त्यांना प्रत्यक्ष काय समस्या आहेत ते लक्षात येतं.
25 Mar 2020 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिक आरोग्य संघटना देशभराकडून प्रचंड डोनेशन मिळवत असते, मला वाटतं असेच असेल तर आवरलं पाहिजे यांना.
जागतिक नागरिकांच्या आरोग्यासाठी अशी संघटना धोकादायक वळणावर उभी आहे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
25 Mar 2020 - 2:51 pm | मराठी कथालेखक
या सगळ्यातलं आंतरराष्ट्रीय राजकारण कुणीतरी उलगडून समोर ठेवायला हवं.. खूप भयंकर आहे हे सगळं... सामान्य लोकांना वेठीस धरुन खेळ खेळले जात आहेत असं मला वाटतं.. पुर्वी बंदूका तोफांनी युद्ध व्हायची आता राजकारण, अर्थकारण, व्यापारयुद्ध आणि कदाचित व्हायरस-व्हायरस खेळून समोरच्याला जेरीस आणायचे प्रयत्न चालत असावेत अशी शंका मनात येते... एकूणातच या प्रकरणात खच्चून नाट्य भरलेले आहे. आणि अर्थकारणही.. लस आली की तिची किंमत काय असेल ? ती कंपनी किती बिलियन्स कमवेल याचा काही अंदाज ? बाकी ब्लॉक ब्लस्टर चित्रपट, खळबळजनक माहितीपटे, बेस्ट सेलर पुस्तके यांना खूप मटेरियल मिळेल हे नक्की.
25 Mar 2020 - 3:25 pm | चौकस२१२
सरकारला शिव्या देणं फार सोपं आहे.
सहमत
पण काय आहे कि हि मस्त संधी आहे राजकारण खेळण्याची
थोडे महिने नंतर तर आगडोंब उसळणार आहे ...या वैद्यकीय साथीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर तर होणारच आणि मग फक्त भारत ह एक देश असेल कि सगळं खापर फक्त सरकारवर फोडला जाईल... जगात जणू काही अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाच नाहीये
जिथे हेल्मेट सक्ती वर विरोध होतो तिथे काय बोलायचे.. मरा लेको ..
26 Mar 2020 - 4:28 pm | नमकिन
भारतीय अर्थव्यवस्थाGDP 1.3% = 3.3 लाख कोटी रुपये कमी होईल असे भाकीत काल झी मीडिया हिंदी वाहिनी वर सांगितले.
पण रोजचा इंधन व देखभाल खर्च वाचतोय की. त्यात इंधन दर गडगडले आहे ती बचत फार मोठी आहे.
25 Mar 2020 - 3:20 pm | चौकस२१२
हो बरोबर , मोदी. सीआयए आणि ट्रम्प दादा आणि जगातील बलाढ्य भांडवलशी उद्यानगी यांनी काहीतरी जागतिक कट रचूनच हे सगळं केलाय.. आणि आता बारामतीचा जाणता राजा आणि पप्पू राजकुमार हे यातून वाचवणार
हात टेकले ह्या मोदी द्वेषाला ....
22 Mar 2020 - 8:01 am | वामन देशमुख
रोगप्रतिकारशक्ती वाढवावी यासाठी कोणकोणते प्रॅक्टिकल उपाय / इलाज आहेत? डॉक्टरांनी / तज्ज्ञांनी इथे माहिती माहिती दिली तर ते आचरणात आणता येतील.
म्हणजे, केवळ COVID-19 च्या प्रतिकारासाठीच म्हणून नाही तर सर्वसाधारणपणे, आपण शक्य तितक्या कमी वेळा आजारी पडावे म्हणून दिनचर्येत काय बदल करता येतील?
23 Mar 2020 - 8:05 pm | सुबोध खरे
आपल्या आहारात भाज्या फळे सुका मेवा सारखे पदार्थ वाढवावेत. वेळेवर चौरस आहार जेवण म्हणून घ्यावा. प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा प्रक्रिया न केलेले पदार्थ खा, तेल तूप मैद्याचे पदार्थ कमी खा
सिगरेट तंबाखू दारू बंद करा.
नियमित व्यायाम करा निदान 7 तास तरी झोप घ्या. वजन प्रमाणात ठेवा. मिताहार घ्या.
या त्रिकालाबाधित गोष्टी सर्व पॅथी चे डॉक्टर सांगतात.
पण तहान लागल्यावर विहीर खणण्या ची मानवी वृत्तीच आहे.
कर वाचवण्यासाठी फेब्रुवारी मार्च मध्ये माणसं जागी होतात ती याच कारणामुळे
22 Mar 2020 - 10:37 am | चौकटराजा
च..... यानी केद्र सरकारला विनन्ति केली की काही पेशण्ट तुम्ही मला द्या मी त्याना तीन दिवसात बरे करून दाखवतो केवळ न्युट्रीशन चा जोरावर ! डॉ हर्शवर्धन यानी त्याना नकार दिला व कारण असे सान्गितले की हा आंतर राष्ट्रिय मामला असल्याने तसे करता येणार नाही. डॉ रायचौधरी यान्च्या माहितीनुसार ( सन्दर्भ लॅन्सेट ) दरवर्षी इन्फेक्शन मुळे एक कोटी २० लाख लोक मरत असतातच .जगाच्या लोकसंख्याच्या तुलनेत १०००० मृत्यू स्वाभाविक आहे. डब्लू एच ओ चाच हा एक फ्रॉड आहे ज्यामुळे त्यांचे महत्व अधोरेखित होऊन त्यांना देणग्या मिळतात . हा सारा भयगंड निर्मितीचा खेळ आहे असे त्यांचे ठाम मत आहे !
22 Mar 2020 - 7:16 pm | गामा पैलवान
चौकटराजा,
मलाही करोनासंबंधी जरा जास्तंच अतिशयोक्ती होतेय असं वाटतंय. इटलीत केवळ लोम्बारडी प्रांतात सर्वोच्च लागणी २५०००+ झाल्यात आणि द्वितीय क्रमांकावर रोम प्रांती ६७०० आहेत. हा फरक बराच व्यस्त आहे. लोम्बारडीस व त्यास चिकटून असलेल्या प्रांतांची आकडेवारी येणेप्रमाणे :
--------------------------------
प्रांत : लागणी / मृत्यू
--------------------------------
ओस्ता खोरे : ३१३ / ८
लिगुरीया : १४३६ / १५२
पिदेमाँत : ३७५२ / २३८
लोम्बारडी : २५५१५ / ३०९५
--------------------------------
स्रोत : https://en.wikipedia.org/wiki/2020_coronavirus_pandemic_in_Italy#Statistics
इथेही लोम्बारडीचं प्रमाण इतरांपेक्षा खूप म्हणजे खूपंच जास्त आहे. जो कोणी मेला तो करोनामुळे अशी अफवा उठवून दिलेली वाटते. लागण व मृत्यूदर यांचं प्रमाण कमी असेल तोवर दिसायला ठीक दिसतं. मात्र ते व्यस्त होऊ नये म्हणून लागण झालेली नसतांनाही लागण झाल्याची बतावणी केलेली असू शकते.
आ.न.,
-गा.पै.
23 Mar 2020 - 5:43 pm | Rajesh188
खरे आकडे कधीच बाहेर येत नाहीत.
मीडिया करवी फक्त भीती पसरवली आहे.
22 Mar 2020 - 10:46 pm | दीपक११७७
डॉक्टर साहेब,
या कोरोनाचे पुढे म्यूटेशन होऊन मानवास हितकारक होऊ शकते का? अथवा याचेच म्यूटेशन करून anti कोरोना तयार करता येऊ शकतो का ?
23 Mar 2020 - 6:17 am | भुजंग पाटील
डॉक्टर साहेब, थोडी गल्लत होतेय का?
व्हायरस चे नाव SARS-CoV-2 असे आहे. ( severe acute respiratory syndrome coronavirus 2 ) त्यातून होणर्या आजाराला COVID-19 म्हणतात.
सन्दर्भः
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/technica...(covid-2019)-and-the-virus-that-causes-it
23 Mar 2020 - 8:08 pm | सुबोध खरे
आपले म्हणणे बरोबरच आहे.
पण बोली भाषेत जसे radiograph ला Xray म्हणतात तसंच आहे.
(मिपा वर संपादनाची सोय नाही म्हणून मी काही केले नाही)
23 Mar 2020 - 8:49 am | चौकटराजा
https://www.youtube.com/watch?v=ox4dJB7SSoU करोना को करो बदनाम ... ?
23 Mar 2020 - 9:07 am | Rajesh188
खूप corona ग्रस्त रुग्णांत ताप,खोकला,ही लक्षणं दिसत नाहीत .
पण चव न समजणे आणि वास न येणे ही दोन्ही लक्षण सर्व corona grast रुग्णांत दिसतात.
अशा व्यक्तींनी 8 दिवस स्वतःला वेगळे ठेवावे
23 Mar 2020 - 5:45 pm | Rajesh188
आता एक सुधा चीन विषयी बातमी येत नाही.
पाहिले औषध नव्हती तरी साथ आपोआप जात असे .
आता सुध्दा तीच अवस्था आहे.
दोन तीन महिन्यात नैसर्गिक रित्या साथ निघून जाईल .
23 Mar 2020 - 9:30 pm | कळस
घरच्या घरी दुधाची पिशवी बाहेरुन कशी Disinfect करावी, याबद्दल कोनी सन्गु शकेल का?
24 Mar 2020 - 11:17 am | सुबोध खरे
Lysol is a cationic surfactant and quaternary ammonium compound.
हे सर्व तर्हेच्या जिवाणू विषाणू आणि बुरशी साठी उपयुक्त आहे. आपण त्यांनी सांगितलेल्या तर्हेने पाण्यात द्रावण करून फरशी पुसण्यासाठी वापरले तर धुळीतून येणाऱ्या सर्व जंतूनपासून आपल्याला संरक्षण मिळते. घरात रांगणारी दात येऊ घातलेलीकिंवा चालायला लागलेली लहान मुले असतील जी जमिनीवरची कोणतीही वस्तू तोंडात घालतात अशा घरात तर रोज एकदा याने फरशी पुसून घ्यावी.
24 Mar 2020 - 11:19 am | सुबोध खरे
दुधाची पिशवी आपण साबण आणि पाण्याने धुवून घ्यावी.
उत्तम म्हणजे दूध आणण्यासाठी एक मोठ्या तोंडाची कापडी पिशवी घेऊन जा आणि त्यात दुकानदाराला दुधाच्या पिशव्या टाकायला सांगा घरी आल्यावर दोन्ही साबण आणि पाण्याने धुवून घ्या
24 Mar 2020 - 11:19 am | सुबोध खरे
दुधाची पिशवी आपण साबण आणि पाण्याने धुवून घ्यावी.
उत्तम म्हणजे दूध आणण्यासाठी एक मोठ्या तोंडाची कापडी पिशवी घेऊन जा आणि त्यात दुकानदाराला दुधाच्या पिशव्या टाकायला सांगा घरी आल्यावर दोन्ही साबण आणि पाण्याने धुवून घ्या
27 Mar 2020 - 4:49 pm | कळस
खरेसाहेब, माहीतीबद्दल धन्यवाद
24 Mar 2020 - 1:21 pm | टर्मीनेटर
माहितीपूर्ण लेख आणि चर्चा!
25 Mar 2020 - 1:36 pm | मित्रहो
या संपूर्ण प्रकरणात जागतिक आरोग्य संघटनेने बऱ्याच बाबतीत घुमजाव केलेले आहे. आधी सांगितले हा रोग हवेतून पसरत नाही आता म्हणतात पसरू शकतो. आधी सांगितले सोशल डिस्टंसिंग हाच उपाय आहे आता म्हणतात नाही ते उत्तर नाही. भरपूर टेस्ट करा आणि रोगींचे अलगीकरण करा . लॉकडाउन हा बचावात्मक पवित्रा आहे. वुहान मधे हा रोग पसरुन तो आता आटोक्यात यायला लागला तरी हे नक्की समजत नाही आहे की रोग कसा पसरतो. भारतासारख्या जपान या देशाने सुद्धा फार टेस्ट नाही केल्या. त्यांच्या इथे सुद्धा चीनचे लोक येत होते. जपानमधे वृद्धांची संख्या खूप जास्त आहे तरी आजतागायत तेथील रुग्णांची संख्या कमी आहे. तीच गोष्ट तायवानची. दक्षिण कोरीयाने खूप टेस्ट केल्या.
आपल्या इथे टेस्ट तयार झाली. चीन कुठलीतरी अॅसिड टेस्ट करते. या साऱ्या टेस्ट सारख्याच आहेत की वेगळ्या.
जानेवारी फेब्रुवारीमधे भारतात कितीतरी मंडळी चीनमधून आले. संपूर्ण महिन्यात पॉझिटिव्ह केसेस कमी आल्या आता मात्र रोज वाढत आहेत. असे का व्हावे.
25 Mar 2020 - 2:05 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
अगदी अगदी. जागतिक आरोग्य संघटना ( = वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) स्वत:स जगाची डॉक्टर मानते. पर्यायी दृष्टिकोनाचा आदर सोडा, विचारही नाही. हिच्या प्रमुखांनी करोनाच्या संसर्गाविरुद्ध आक्रमक रणनीतीची शिफारस केली आहे. या 'आक्रमक हाताळणी'मध्ये प्रत्येक संशयितांची सखोल चाचणी करून त्यांना बळेच विलग करायचं म्हणताहेत. संदर्भ : https://newsbaba.in/who-chief-said-rapidly-growing-epidemic-but-with-thi...
विषाणूविषयी व्यवस्थित माहिती नसतांना इतकं टोकाचं पाऊल उचलावं का? यावरनं नाझी जर्मनीची आठवण होते.
आ.न.,
-गा.पै.
25 Mar 2020 - 4:01 pm | उगा काहितरीच
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य /तिव्र) व त्यातून बरं झालेल्या व्यक्तीला परत कोरोनाची लागण होऊ शकते का ?
25 Mar 2020 - 7:29 pm | सुबोध खरे
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य /तिव्र) व त्यातून बरं झालेल्या व्यक्तीला परत कोरोनाची लागण होऊ शकते का ?
बहुसंख्य विषाणूमुळे होणाऱ्या आजारात आपल्या शरीरात प्रतिपिंडे(antibodies) तयार होतात आणि या प्रतिपिंडाची आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये त्याची स्मरणशक्ती राहते.
यामुळे दुसऱ्यांदा परत याच विषाणूंचा प्रादुर्भाव झाला तर याच पांढऱ्या पेशी परत ती प्रतिपिंडे वेगाने तयार करतात आणि त्या विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव रोखतात. यामुळेच आपल्याला गोवर कांजिण्या सारखे आजार परत होत नाहीत.
एच आय व्ही सारख्या आजारात हि प्रतिपिंडे तयार करणाऱ्या पेशींवरच विषाणू हल्ला करतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती लुळी पडते. अशीच स्थिती केमोथेरपी मध्ये होत असल्याने रुग्णाची प्रतीकारशक्ती खच्ची होते.
सध्याच्या या विषाणू बद्दल तो नवीन असल्याने आपल्याला पूर्ण माहिती नाही परंतु बाकी करोना गटाच्या विषाणूंमध्ये हा आजार परत होत नाही त्यामुळे या विषाणूत एकदा झाला तर पुन्हा होणार नाही असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
कांही शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत त्यांना परत होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना बैद्यकीय चमू मध्ये सामील करून घ्यावे.परंतु यात सर्व तज्ज्ञांत एकवाक्यता नाही आणि बरेच तज्ज्ञ असा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. .
25 Mar 2020 - 7:56 pm | प्रचेतस
पण हा विषाणू SARS प्रकारातला आहे. सर्दी खोकला ताप आदी विकार मनुष्याला नेहमीच होत असतात आणि ते बहुतांशी आपोआप बरेही होतात त्याप्रकारेच हा मनुष्याला पुनः बाधित करू शकतो का आणि आपोआप बरा होऊ शकेल का?
25 Mar 2020 - 10:44 pm | उगा काहितरीच
धन्यवाद डॉक्टर !
28 Mar 2020 - 9:45 am | मदनबाण
Mystery In Wuhan: Recovered Coronavirus Patients Test Negative ... Then Positive
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raftaara... :- Lucifer
25 Mar 2020 - 10:08 pm | सुबोध खरे
सध्या तरी या रोगावर नक्की असे औषध नाही आणि 95 टक्के लोक स्वतःहूनच बरे होतात. उरलेले 5 % याना काही गुंतागुंती होतात म्हणजे न्यूमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास किंवा हृदयाचे काम अनियमित होणे.
हे बहुधा अशा लोकांना होते ज्यांचे वय 70 पेक्षा जास्त आहे मधुमेह रक्तदाब किंवा हृदय विकार असे आजार आहेत किंवा सिगरेट पिणारे आहेत.
अशा लोकांना कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडू शकते. जर भारतभरात 60 कोटी लोकांना या गुंतागुंती एकत्र झाल्या तर आपल्याकडे 3 कोटी लोकांना एकत्र कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होणार नाही आणि यातील अगदी 30-33 टक्के लोक बाहेर आले नाहीत तरी आपल्याकडे 1 कोटी लोकांचा मृत्यू होईल.
याच ऐवजी आपण या आजाराचे प्रसारण थांबवले तर एप्रिल मे मधील गरमी मुळे हा आजार आपोआप बराच कमी होईल. अर्थात हे विषाणू नाहीसे होणार नाहीत म्हणजे हा आजार उरलेल्या लोकांना पुढच्या काही वर्षात होईलच पण तेंव्हा त्यांना गुंतागुंत झालीच तर कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होईल आणि त्यातील बऱ्याच माणसांना वाचवणे शक्य होईल.
25 Mar 2020 - 10:59 pm | Vidyadhar1974
डॉक्टरसाहेब जालावर काही ठिकाणी करोंना विषाणू वर तपमानाचा परिणाम फारसा होत नाही असेही वाचलेले आढळले. नक्की सत्य काय आहे कृपया मार्गदर्शन करा.
28 Mar 2020 - 12:25 pm | सुबोध खरे
Warm, humid climate linked to slower COVID-19 transmission: MIT Study
https://www.thehindubusinessline.com/news/science/warm-humid-climate-lin...
https://economictimes.indiatimes.com/news/science/warm-humid-climate-lin...
26 Mar 2020 - 2:10 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
तुमचं हे विधान वाचलं :
यावरनं इथे ब्रिटनमध्ये एक विधान प्रसृत झालं होतं ते आठवलं :
या लेखानुसार जर करोना गेले दोनतीन महिने ब्रिटनमध्ये गुपचूप रीत्या पसरला असेल तर आजपावेतो निम्म्या ब्रिटिशांना लागण झालेली असायला हवी. मात्र लेकासंख्येच्या मानाने प्रत्यक्ष रोगी आढळण्याचं प्रमाण नगण्य आहे. याचा अर्थ बहुसंख्य ब्रिटीश जनतेची शरीरं आपोआप प्रतिकारसज्ज झालीत असाही काढता येऊ शकतो. विषाणूशी परिचय झाल्याने ही प्रतिकारक्षमता उत्पन्न झालेली आहे. हिला परिचयकाठिन्य म्हणजेच हार्ड इम्युनिटी म्हणतात (चूभूदेघे).
काही जण म्हणतील की द सन हे वृत्तपत्र नसून चघळपत्र आहे. मात्र तरीही उपरोक्त मत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनातनं पुढे आलेलं आहे. मग भारतातही हेच घडायला हवं ना? चीनमध्येही हेच घडलं असणार ना? इतका गोंधळ कशासाठी?
आ.न.,
-गा.पै.
28 Mar 2020 - 12:23 pm | सुबोध खरे
आपण म्हणताय ते बरोबर आहे परंतु जोवर प्रतिपिंडांच्या(ANTIBODY) चाचणीचा अहवाल येत नाही तोवर असे काही खात्रीने म्हणता येणार नाही.
भारतात सुद्धा अशी परिस्थिती असें शक्य आहे.
26 Mar 2020 - 5:06 pm | तेजस आठवले
ह्या धाग्यावरही राजकारण आलं हे बघून भरून आले. मिपा परत पहिल्यासारखे झाले असे मानायचे का ?
खायला जास्त काही मिळत नसताना सुद्धा काही लोकांना पानात नमकीन हवंच असतं ह्या प्रवृत्तीला कोण काय करणार.
सरकारला जे जे शक्य होईल ते ते सरकार करणारच आहे. आधी का नाही केलं आणि नंतर का नाही केलं ह्या घरी बसून करायच्या गप्पा आहेत.
अजून दोन दिवसांनी समजलं कि हा रोग वाहत्या पाण्यातून पसरतो तर सरकारने आमच्या घरात पाणीपुरवठा अजून का चालू ठेवला आहे असं ओरडत लोक पुढे येतील. नंतर एका दिवसाने सरकारने पाणी बंद केलं आता आम्ही तहानेने तडफडून मरु म्हणून ओरडा चालू होईल.
करोनाग्रस्त लोकांचा आकडा वाढतच जाणार आहे. त्यातून किती जण सुखरूप बाहेर येतात हा आकडाही आपल्या डोळ्यांसमोर यायला हवा.
सध्यातरी घरी राहा, सुरक्षित राहा. जगलात तर सरकारला शिव्या घालायला भरपूर संधी शिल्लक आयुष्यात येतीलच.
27 Mar 2020 - 6:10 am | चौकस२१२
बरोबर बोललात ... आणि यात कोस्पारेसी थेअरी वाले पण ..
26 Mar 2020 - 6:41 pm | चौकटराजा
मी जगलो वाचलो तर पुढच्या हिवाळ्या पूर्वी व नन्तर नियमित पण अर्थात डॉ च्या सल्याने न्युमोनिया व फ्लू ची लस घेणार आहे. ही मधुमेही प्लस ६५ याना अत्यन्त आवश्यक आहे असे सान्गितले जाते !
मी एक व्हिडिओ पाहिला त्याचा सारान्श असा की माणूस आपल्या पेशीवरचे रिसेप्टरचे डिझाईन जन्मात बदलू शकत नाही. विषाणू ज्यावेळी शरीरात प्रवेश करतो त्यावेळी नट म्हणजे आपल्या पेशीचा रेसेप्टर व पाना म्ह्ण्जे विषाणू चे काटेरी टोक.असे जिथे जुळते त्याच अवयवाला सन्सर्ग होतो. मग त्याचे अनुशन्गिक परिणाम इतर अवयवाकडून होतात. विषाणूला ही जुळणी जमली नाही तर विषाणू त्याच्या मेमरीत साठवून पाना बदलायचा प्रयत्न करतो . ही त्याची क्रिया मानवी शरीरातील बदलापेक्शा उदा अन्टोबोडी ( या आपण निर्मिलेला पाना )पेक्षा जलद होऊ लागल्या तर लढा विषाणू जिकतो .दरम्यान विषाणू
बदलण्याचा प्रक्रियेला परिसराचा अड्सर उदा तापमान ई झाला तर साथ आटोक्यात येते.
26 Mar 2020 - 11:34 pm | Rajesh188
Corona grast लोकांचे जे मृत्यू होत आहेत ते फक्त कोरोना नी च होत आहेत हे नक्की आहे का.
नाही तर इन्फ्लुब्झा नी मरायचे आणि corona positive निघाला म्हणून बिचारा corona विषाणू बदनाम व्हायचा.
Corona बरोबर प्रतेक रुग्णाची influenza,flue ह्याची पण टेस्ट केली पाहिजे
27 Mar 2020 - 1:37 pm | गामा पैलवान
Rajesh188,
अगदी बरोबर म्हणालांत पहा. करोनाची प्रत्यक्ष लागण झालेले ( = infected) आणि शरीरात केवळ करोना सापडलेले ( = tested positive) या दोहोंत महदंतर आहे. माझ्या अंगात करोना सापडला म्हणजे मला त्याची लागण झालेली असेलंच असं नाही.
या बाबतीत वार्तांकन करतांना माध्यमांनी पारदर्शकता व सावधगिरी बाळगणं जरुरी आहे. पण बातम्यांवरून दिसतं की, घबराट माजवणं हाच माध्यमांचा हेतू आहे. लोकांना अकला नाहीत म्हणून बराच ओरडा झाला आहे. पण प्रसारमाध्यमांनी जो बेजबाबदारपणा दाखवला त्याविरुद्ध म्हणावा तसा निषेधाचा सूर उमटलेला दिसून येत नाही.
आ.न.,
-गा.पै.
27 Mar 2020 - 5:41 pm | सुबोध खरे
https://m.economictimes.com/news/science/warm-humid-climate-linked-to-sl...
27 Mar 2020 - 6:13 pm | कळस
शेतमालाचे नुकसान होईल , परंतु अवकाळी पाऊस ह्यावेळी कमीतकमी जीवितहानी टाळण्यासाठी तरी लाभदायक ठरेल असे दिसतेय...रविवारी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे..
27 Mar 2020 - 8:16 pm | Rajesh188
सकरमत्मक आणि बिलकुल तिखड मीठ न बातम्या देण्याची सवय मीडिया लागेल लागेल तो जगा साठी सुदिन च म्हणायचं.
किती लोकांना covid 9 ची लागण झाली आहे ह्याची बातमी जेव्हा देता तेव्हा किती लोक बरे झाले आहेत,किती लोकांना उपचार ची गरज पडली आहे किती लोक उपचार न करता बरे झाले आहेत ही पण आकडेवारी द्यावी म्हणजे पूर्ण माहिती मिळेल .
खूप धक्कादायक मुंबई मध्ये 170 लोक बाधित अशा प्रकारच्या बातम्या नसाव्यात.
काय माहित प्रतेक व्यक्ती ची तपासणी केली तर आता corona बाधित लोकांची संख्या लाखो मध्ये असावी .
शरीरात असंख्य रोग निर्माण करणारे विषाणू सापडतील प्रतेक व्यक्तीच्या शरीरात पण ते रोग ग्रस्त होत नसतील .
तसाच हा व्हायरस शरीरात असू शकेल..
27 Mar 2020 - 9:02 pm | Rajesh188
भारतात टेस्ट चा रिपोर्ट येण्यास 2 दिवसा पेक्षा जास्त वेळ लागत असेल तर मीडिया आज आलेल्या रिपोर्ट निकाल च आधार घेवून आज एवढ्या लोक वाढली अशी अर्धवट माहिती का देते.
सरळ शुद्ध शब्दात ते सांगू शकतात ना 3 दिवसा पूर्वी samples test la dile hote त्याचा आज हा रिपोर्ट आला आहे.
27 Mar 2020 - 10:35 pm | विनोद१८
धन्यवाद डॉक्टरसाहेब,
अतिशय उत्तम व माहितीपुर्ण उपयोगी लेख, बरीच भीती नाहीशी झाली.
पुन्हा एकदा धन्यवाद....!!
विनोद१८
30 Mar 2020 - 12:46 am | गामा पैलवान
ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो म्हणतात की ब्राझीली लोकं नैसर्गिकरीत्या प्रतिकारक्षम ( = naturally immune ) असावेत : https://www.telesurenglish.net/news/Bolsonaro-suggested-Brazilians-are-n...
लेखाच्या मते याचा अर्थ सामाजिक अलगीकरण तितकंसं महत्त्वाचं नाही. अतिस्वच्छता नसल्याने भारतीयांची प्रतिकारशक्ती ब्राझीली लोकांसारखीच नैसर्गिकरीत्या बळकट झालेली आहे. भारतातही अलगीकरण संपुष्टात आणलं पाहिजे.
-गा.पै.
30 Mar 2020 - 9:25 am | Rajesh188
जगातील स्वच्छ ते मध्ये अग्रेसर असलेल्या देशातच जास्त प्रकोप झाला आहे corona cha.
असे बतम्यावरून तरी दिसत आहे.
अस्वच्छ ,घाणेरडे देश कमी बाधित आहेत.
असे तरी सध्या चित्र आहे.
हा व्हायरस ची बाधा खूप लोकांना झाली असावी जेवढे आकडे दिसत आहेत त्या पेक्षा पण प्रचंड आकडा असावा बाधित लोकांचा .
पण खूप लोकांत कोणतीच लक्षण दिसत नसल्या मुळे टेस्ट केली जात नाही .
महाराष्ट्रात बाधित लोकांमधील 104 लोकांमध्ये कोणतीच लक्षण दिसत नाहीत रोगाची.
ही आरोग्य मंत्राचे स्टेटमेंट त्याला पुष्टी देत आहे.
30 Mar 2020 - 1:55 pm | गामा पैलवान
इटलीच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचं (की रुग्णालयाचं) अधिकृत संकेतस्थळ हे आहे : www.epicentro.iss.it
त्यांनी एक ६ पानी छोटा अहवाल प्रकाशित केला आहे : https://www.epicentro.iss.it/coronavirus/bollettino/Report-COVID-2019_17...
या अहवालाचं इंग्रजीत भाषांतरित शीर्षक (सौजन्य गूगल) : Report on the characteristics of patients with COVID-19 deposits in Italy The report is based on the data updated on 17 March 2020
यानुसार करोना रुग्णांची १७ मार्च पर्यंतची स्थिती सर्वसामान्य होती. करोना विषाणू अंगात उपस्थित असतांना जे मृत्यू झालेत त्या मृतांचे आरोग्य आधीपासूनच डळमळीत होते. ५० वर्षांखालील जे २ रोगी मेले त्यांपैकी एकास कर्करोग तर दुसऱ्यास मधुमेह होता.
जिज्ञासू गूगल भाषांतराच्या सहाय्याने हा अहवाल वाचू शकतात.
करोना हा प्रसारमाध्यमांचा गलबला म्हणजेच फुगवलेली बेडकी आहे.
-गा.पै.
13 Apr 2020 - 1:38 am | गामा पैलवान
बर्लिनचे क्षेत्रीय महापौर स्तेव्हन फॉन दासेल यांनी स्वत:च्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण करायचा निर्णय घेतला आहे. अशा रीतीनेही विषाणूस आळा घालता येतो. हा पर्यायी मार्ग का चाचपून पाहिला गेला नाही ? कृपया तत्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. धन्यवाद!
अधिक माहिती : https://www.ndtv.com/offbeat/why-a-german-mayor-infected-himself-with-co...
करोनाचे ९५ % रुग्ण स्वत:हून बरे होत असतील तर त्या पार्श्वभूमीवर उपरोक्त मार्ग आशादायी वाटतो.
-गा.पै.
27 Apr 2020 - 2:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन काही अपडेट्स संशोधन आणि नियंत्रणाच्या बाबतीत काही नवीन घड़ामोड़ी ?
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 8:33 pm | सुबोध खरे
करोना विषाणू सद्य स्थिती
हा धागा काढल्याला आता ५४ दिवस होऊन गेले आहेत. अजूनही या रोगावर नक्की असे औषध सापडलेले नाही आणि लस सुद्धा अजून कमीत कमी तीन महिने ते सहा महिने दूर आहे.
जगात आजमितीला ३० लाखाहून अधिक लोक या आजाराचे शिकार झाले असून यातील २ लाख १२ हजार दुर्दैवी यात मृत्युमुखी पडलेले आहेत.
आणि ९ लाख ३५हजार लोक यातून बरे झालेले आहेत.
भारतात जगाच्या मानाने रुग्ण संख्या २९ हजार असून त्यातील ९३९ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत.
म्हणजे एक कोटी लोकांमागे फक्त ७ लोक मरण पावले आहेत. हाच एकदा अमेरिकेसाठी ३०५८० आणि स्पेनसाठी ५० हजाराच्या जवळ आहे.
म्हणजेच जगाच्या मानाने आपण खूप सुदैवी आहोत.
याची अनेक कारणे असतील / आहेत त्या कारणात सरकारने वेळेत घेतलेला लॉक डाऊनचा निर्णय हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. बाकी आपला देश एकंदर उष्ण कटिबंधात आहे, आपल्याकडे असलेला क्षयरोगाच्या लसीकरणाचा कार्यक्रम आणि एकंदर अस्वच्छतेमुळे आपली असलेली प्रतिकार शक्ती असे अनेक घटक या सुदैवाला कारणीभूत आहेत /असावेत.
फ्लॅटनिंग द कर्व्ह चा अर्थ काय आहे?
आपल्याकडे दर एक कोटी लोकसंख्येसाठी जर ५० व्हेंटिलेटर /अतितीव्र उपचार (इंटेन्सिव्ह केअर बेड्स ) खाटा असतील तर आपल्या रोग्यांची संख्या आपल्याला दर एक कोटी लोकसंख्येसाठी १००० पेक्षा कमी ठेवणे आवश्यक आहे. कारण यातील ५ टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचा आजार होऊन त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडेल. या ५० व्हेंटिलेटर असणाऱ्या रुग्णांपैकी १० दुर्दैवी रुग्ण मृत्युमुखी पडतील.
परंतु इतर ४० रुग्ण १४ दिवसात बरे होऊन घरी जातील तोवर हेच व्हेंटिलेटर पुढच्या ५० रुग्णांसाठी कामी येतील.
याऐवजी जर आपण अनिर्बंधपणे बाहेर फिरत राहिलो असतो आणि आपली रुग्ण संख्या १००० ऐवजी ५००० झाली असती तर आपल्याला एक कोटी लोकांसाठी २५० व्हेंटिलेटरची ( ५ %) गरज भासली असती.
एवढे व्हेंटिलेटर(इंटेन्सिव्ह केअर बेड्स ) आपल्याकडे नसल्याने आपल्याकडे पहिले ४० बरे झालेले सोडले तर १० दुर्दैवी आणि अधिक २०० लोक केवळ व्हेंटिलेटर/ इंटेन्सिव्ह वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडले असते.
म्हणजेच १३० कोटी लोकसंख्येच्या देशात २७ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले असते.
कदाचित आपल्याकडची लोकसंख्या किंवा गर्दी आणि कमी सामाजिक अंतर लक्षात घेतले तर हीच संख्या पाच किंवा १० पट सुद्धा( दीड ते अडीच लाख) झाली असती.
हर्ड इम्म्युनिटी/सामूहिक प्रतिकारशक्ती -- याचे सोपे उदाहरण अणुबॉम्ब विरुद्ध अणुभट्टी याचे देता येईल. अणुबॉम्ब मध्ये युरेनियमच्या एका अणूचे विभाजन झाले तर त्यातून तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात ते पुढच्या तीन अणुकेंद्रकांना फोडून त्यातून प्रत्येकी तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात. म्हणजेच हि साखळी १-३-९-२७-८१-२४३-७२९-२१८७ अशी वेगाने वाढत जाऊन अणुबॉम्बचा स्फोट होतो.
याऐवजी अणुभट्टीत बाहेर पडणाऱ्या तीन न्यूट्रॉन पैकी दोन न्यूट्रॉन हे ग्रॅफाइटमध्ये शोषले जात असल्यामुळे हि साखळी १-१-१-१-१-१ अशीच चालू राहते.
आपण हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारशक्ती कशी तयार होते ते पाहू. सुरुवातीला आपण लॉकडाऊन केले त्यात आपण संपूर्ण लोकसंख्येला या रोगापासून दूरच ठेवले.
आता लॉकडाऊन उघडले कि फक्त तरुण आणि सशक्त (प्रत्यक्ष काम करणारे) लोकांना बाहेर फिरायची परवानगी दिली जाईल आणि वृद्ध आणि इतर आजार (फुप्फुस/ हृदयविकार रक्तदाब, मधुमेह) असणाऱ्या लोकांना घरीच राहण्यास सांगितले जाइल.
यामुळे फक्त तरुण लोकांना हा आजार होइल परंतु त्यांना होणार हा आजार हा सौम्य स्वरूपाचा असून त्यांची मृत्युसंख्या खूप कमी असेल. काही आठवडयांनी या सर्व तरुणांची प्रतिकार शक्ती तयार झाल्यामुळे त्यांना परत संसर्ग झाला तरी त्यांना हा आजार लगेच परत होणार नाही म्हणजेच त्यांचे काम ग्रॅफाइट सारखे असेल.
जसजसे जास्तीत जास्त लोकसंख्या या रोगाच्या संसर्गात येईल तसतशी त्या लोकसंख्येत प्रतिकारशक्ती निर्माण होईल. हा आकडा जसजसा लोकसंख्येच्या ६०-७०% पर्यंत पोहोचेल तसतसा या आजाराचा प्रसार नगण्य होत जाईल.
या वेळेपर्यंत एक तर औषध किंवा लस तयार झालेली असेल म्हणजेच उरलेल्या ३० टक्के मुख्यत्वे वृद्ध किंवा इतर आजार असलेल्या लोकांना प्राधान्याने हि लस/ औषध देऊन आपण त्यांना या रोगाला बळी पडण्यापासून वाचवू शकू.
यासाठी कोणतेही अनमान न करता सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. जितके तुम्ही नियम पाळाल तितके आपण आपल्या वरिष्ठ नागरिकांना दीर्घायुष्य देऊ शकू.
काही शहाणे आम्हाला काही होणार नाही म्हणून निष्काळजीपणा दाखवतील त्यांना हात जोडून विनंती आहे - मान्य आहे कि आपल्याला आजार झाला तरी तो सौम्य असेल किंवा कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत परंतु हा आजार आपण आपल्या वृद्ध आईवडिलांना/ नातेवाईकांना संक्रमित केला तर त्यांच्या मृत्यूला आपणच कारणीभूत ठराल.
29 Apr 2020 - 6:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 9:28 pm | ऋतुराज चित्रे
ही तरुण लोकं घरी आल्यावर घरातील वृद्धांना संसर्ग होणार नाही का?
29 Apr 2020 - 6:59 pm | सुबोध खरे
एक म्हणजे जे लोक पोटासाठी आपल्या घरापासून लांब आहेत ते साधारण तरुणच लोक आहेत. त्यामुळे शहरात दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांत जास्त करून तरुणच आहेत.
इतर ठिकाणी खेड्यात लहान मोठ्या शहरात सुद्धा या तरुणांना आणि लहान मुलांना वृद्ध लोकांपासून १ मीटर अंतर ठेवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे ( जे सात आपल्या मोबाईल पासून टीव्ही रेडिओ आणि सार्वजनिक न्यासावर कानी कपाळी ओरडून सांगितले जात आहे.
त्यातून वृद्ध लोकांना पण लागण होणारच आहे परंतु एकदम हजारो लाखो लोकांना अतिदक्षता विभागात हलवायला लागले तर त्यांच्यावर उपचार करण्याच्या पायाभूत सुविधा आपल्याकडे अजून नाहीत म्हणूनच या रोगाचा प्रसार हळूहळू होईल अशा तर्हेने आपल्याला आपली जीवन पद्धती बदलायला लागणार आहे.
28 Apr 2020 - 9:52 pm | Prajakta२१
स्वीडन मध्ये lockdown न करता herd immunity च्या जोरावर साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत
ह्यातून ज्ये ना आणि मधुमेह किन्वा तत्सम रोग असणाऱ्यांना वगळले आहे
28 Apr 2020 - 11:27 pm | मराठी कथालेखक
दक्षिण कोरियाने लॉकडाऊन नाही केलेले पण तरी कोरोनाबाधितांच्या संख्येवर प्रचंड नियंत्रण मिळवले आहे.
लॉकडाउन मुळे फार काही साध्य होत नाही. ईटली मध्ये ९ मार्च पासून लॉकडाऊन आहे पण तरी तिथे बाधितांची संख्या ९ मार्च पासून आज २८ एप्रिल पर्यंत ९ हजारांपासून दोन लाखांवर गेली आहे. भारतातही २५ मार्च पासून आता पर्यंत ६५० पासून सुमारे ३० हजार पर्यंत वाढली आहे.
बरं लस यईपर्यंत लॉक डाऊन करुन ठेवावं हे ही शक्य नाही. तसं करायचं तर अजून ४-६ महिने किंवा त्याहूनही अधिक काळ लॉकडाऊन करुन ठेवावं लागेल. अर्थव्यवस्था पुर्णतः थांबेल, अनेक कामे अडकून पडल्याने ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचेही जीवनमान खालावेल.
आणि लॉकडाउन उघडले तर कोरोनाचा धोका पुन्हा वाढणारच आहे (आताही तो शून्यावर नाहीच, रोज नवे रुग्ण सापडतातच). फक्त वैद्यकीय व्यवस्था, तपासणी सुविधा वाढविण्याकरिता पुरेसा अवधी इतकंच काय ते लॉकडाऊनचं महत्व मान्य करता येईल. पण मग खरेच याकाळात वैद्यकिय सुविधा अनेक पटींनी वाढविण्यात आली का ? व्हेंटिलेटर, अतिदक्षता कक्ष अनेक पटींनी वाढवलेत का ? याबद्दल निश्चित माहिती माझ्याकडे नाही. पण तसे झाले असल्यास चांगलेच नाहीतर तेलही गेले आणि तूपही गेले असेच म्हणावे लागेल (लॉकडाउन नंतरचा कोरोनाने मृत्यू होण्याचा धोकाही कायम आणि अर्थव्यवस्थेला मोठा धक्काही ..)
29 Apr 2020 - 7:06 pm | सुबोध खरे
फक्त वैद्यकीय व्यवस्था, तपासणी सुविधा वाढविण्याकरिता पुरेसा अवधी इतकंच काय ते लॉकडाऊनचं महत्व मान्य करता येईल.
आपण वरील प्रतिसादात "फ्लॅटनिंग द कर्व्ह" हा मुद्दा परत एकदा वाचून पाहावा अशी आपल्याला विनंती आहे.
याशिवाय भारतातील मार्च मधील सरासरी तापमान आणि एप्रिलच्या शेवटी असलेले तापमान यातील फरक समजून घ्या.
A study by the National Environmental Engineering Research in Nagpur has found a “very strong” correlation — up to 85% — between the increase in the average day temperature and the reduction in Covid-19 spread for select cities in the country and for states like Maharashtra and Karnataka as a as a whole.
https://timesofindia.indiatimes.com/india/85-correlation-between-tempera...
याचा अर्थ सुद्धा समजून घ्या.
29 Apr 2020 - 9:16 pm | मराठी कथालेखक
हो वाचला आणि मान्यही आहे म्हणूनच मी हा मुद्दा मांडला ना.
हे मी म्हंटले आहे.. जर अशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असेल तर लॉकडाउन खर्या अर्थाने सत्कारणी लागला असे म्हणता येईल. नाहीतर व्हेंटिलेतरची कमतरता वगैरे मुद्दे लॉकडाऊन नंतरही कायम राहिलेत तर लॉकडाउनने फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं जाईल इतकंच.
असो. खाली दुसर्या एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे मला लॉकडाउनच्या चर्चेपेक्षा विषाणू बद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास जास्त आवडेल.
29 Apr 2020 - 1:55 pm | Rajesh188
प्रचंड लोकसंख्या,पायाभूत सुविधा ची कमतरता. ह्या मुळे lockdown shivay dusra marg भारताच्या जवळ नाही.
लोकसंख्येचा प्रमाणात डॉक्टर ची संख्या सुद्धा खूपच कमी आहे.
परत डॉक्टर जे आहेत ते सर्व मोठ्या शहर मध्येच एकवटले आहेत .
उपचाराच्या सुविधा वाढवणे,बेड वाढवणे,ह्या साठी आपल्याला मर्यादा आहेत.
Lockdown kele nahi tar prachand लोकसंख्येला बाधा होईल आणि त्या सर्वांना मेडिकल सुविधा देण्याची आपली क्षमता नाही .
जास्तीत जास्त लोकांना बाधा झाली तर त्यांच्या शरीरात covid १९ ला विरोध करण्याची क्षमता निर्माण होईल आणि ते रोगाला बळी पडणार नाहीत हे १००% सिद्ध झालेलं नाही.
परत परत बाधित होण्याची उदाहरणे जगात आहेत .
त्या मुळे विषाची परीक्षा नको.
लस उपलब्ध होई पर्यंत रुग्ण संख्या कमी ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे.
29 Apr 2020 - 4:40 pm | मराठी कथालेखक
लॉक डाऊन हवंच किंवा लॉकडाऊनला पर्याय नाही असं म्हणणार्यांना एकच प्रश्न.. लस येईपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवायचं का मग ? सहा महिने वा जास्त कालावधी लागला तरी ?
29 Apr 2020 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता कितीदिवस अशा अवस्थेत राहायचं ? जिंदगी तुम्हाला पूर्ववत सुरु करायचा निर्णय एक दिवस घ्यावाच लागेल आणि अचानक हे सुरु कारावे लागेल असे नाही तर त्याचे काही प्लान्सही असले पाहिजेत. आज आठबजेसे लॉकडाऊन नही रहेगा असे म्हणून चालणार नाही.
-दिलीप बिरुटे
29 Apr 2020 - 6:36 pm | मराठी कथालेखक
बरोबर आणि लॉकडाउन नसले तरी स्केल्ड डाउन (किंवा असाच काही शब्द देता येईल) चालू ठेवावे लागेल.
म्हणजे कारखान्यात , ऑफिसमध्ये, बसमध्ये , शाळेत , महाविद्द्यालयात, उपहारगृहांत (आणि अशा इतर अनेक ठिकाणी) बसण्याच्या /कामाच्या सुविधांमध्ये आवश्यक ते बदल करुन आवश्यक ते शारिरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंगपेक्षा फिजिकल डिस्टन्सिंग जास्त बरं वाटतं) ठेवता येईल अशी व्यवस्था करणे गरजेचे असेल. खरे तर लॉकडाऊनच्या काळातच याबद्दल योग्य त्या सुचाना देवून हे करायला हवे होते. गरजेप्रमाणे वस्तू, फर्निचर वारंवार सॅनिटाईज करणे हे व्हायला हवे. यामुळे वेळ व पैसा खर्च होईल आणि कार्यक्षमता कमी होईल हे मान्य पण पुर्ण बंद राहण्यापेक्षा कमी कार्यक्षमतेवर कामकाज चालू राहणे बरे. तसेच लग्न , अंत्यविधी ई कार्यात मात्र जास्तीत जास्त किती पाहुणे बोलवता येतील त्यावर बंधन कायम असावे. खासकरुन अंत्यविधीकरिता, तर लग्नाकरिता कार्यालयाच्या आकारानुसार किती लोक बोलवता येतील यावर बंधन घालावे. काल एक चित्रफीत पाहिली दुबईमध्ये लॉकडाउन उघडल्यानंतरचे व्यहवार यात एक जोडपे दागिन्यांच्या दुकानातून दागिने खरेदी करताना दिसत आहे. ग्राहक (अर्थात मास्क लावून ) आल्यावर त्याचे थर्मल स्कॅनिंग केले गेले , बिलींग होवून ग्राहक निघून गेल्यावर दुकानदाराने काउंटरवरील जागा, कार्ड स्वाइप करण्याचे यंत्र, ग्राहकाने हाताळलेले पेन ई लगेच सॅनिटाईज केले. तर दरवानाने दाराचे हँडल सॅनिटाईज केलेले दिसते आहे.
29 Apr 2020 - 7:09 pm | सुबोध खरे
आता लॉकडाऊन उघडले कि फक्त तरुण आणि सशक्त (प्रत्यक्ष काम करणारे) लोकांना बाहेर फिरायची परवानगी दिली जाईल आणि वृद्ध आणि इतर आजार (फुप्फुस/ हृदयविकार रक्तदाब, मधुमेह) असणाऱ्या लोकांना घरीच राहण्यास सांगितले जाइल.
यात लॉकडाऊनला पर्याय नाही असे कुठे तरी आपल्याला आढळले का?
यामुळे फक्त तरुण लोकांना हा आजार होइल परंतु त्यांना होणार हा आजार हा सौम्य स्वरूपाचा असून त्यांची मृत्युसंख्या खूप कमी असेल.
काही आठवडयांनी या सर्व तरुणांची प्रतिकार शक्ती तयार झाल्यामुळे त्यांना परत संसर्ग झाला तरी त्यांना हा आजार लगेच परत होणार नाही म्हणजेच त्यांचे काम ग्रॅफाइट सारखे असेल.
29 Apr 2020 - 9:11 pm | मराठी कथालेखक
हे तर आताही करता आलं अयामुळे फक्त तरुण लोकांना हा आजार होइल परंतु त्यांना होणार हा आजार हा सौम्य स्वरूपाचा असून त्यांची मृत्युसंख्या खूप कमी असेल.
हो पण या सगळ्यात लॉकडाऊनचे योगदान काय ?
असो.. धागा विषाणू बद्दलचा असल्याने विषाणू बद्दल अधिक चर्चा झाली तर ज्ञानात भर पडेल. लॉकडाउन गरजेचे की नाही हा पुर्णतः वेगळा विषय असू शकतो.
29 Apr 2020 - 9:23 pm | मराठी कथालेखक
पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ४ कोटी लशींची निर्मिती करणार आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधली आहे. याबद्दल अधिक काही माहिती आहे का ?
29 Apr 2020 - 9:52 pm | Rajesh188
अमेरिकेत तरुण व्यक्ती नी ग्रफाईड चे काम केले आहे का?
,इटली मध्ये केले आहे का?
व्हायरस नी सर्व वयातील व्यक्तीला यमसदनी धाडले आहे.
तरुण वाचतील असे काही नाही.
प्रतिकार शक्ती वयावरून ठरते हे तरी सत्य आहे का?(ह्या मध 60 वर्ष आतील लोकांचाच विचार करा)
निरोगी शरीर असणे ह्याचा पूर्ण संबंध वयाशी नाही.
1 May 2020 - 10:37 pm | धनावडे
ज्यांना लक्षण दिसत नाहीत आणि प्रतिकारशक्ती ज्यांची चांगली आहे ते स्वतःहून बरे झाल्याची उदाहरणे आहेत का?
7 May 2020 - 8:29 pm | चौथा कोनाडा
गेली अनेक वर्षे लसीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला तरीही एड्स, नागिण, सार्स, डेंग्यू इ. आजारांवर लस शोधता आलेली नाहीय,
त्या संबंधी कोविड१९ च्या लशीवर चर्चा करणारा गिरीश कुबेर यांचा रोचक लेख:
कोविडोस्कोप : आपली नाही ती लस..!
7 May 2020 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद माहितीपूर्ण. आणि आपण डोळे लावून बसलोय की लस कधी येईल. सुरक्षित अंतर ठेवून काळजी घेऊन पुढची वाटचाल करा असा आशय व्यक्त करणारा वास्तवपूर्ण प्रतिसाद.
-दिलीप बिरुटे
8 May 2020 - 7:46 am | माहितगार
रोचक,
हे एक रोचक वृत्त हिंदुस्तान टाईम्सवर
8 May 2020 - 7:48 am | माहितगार
* (स्वगतः) रोचक पेक्षा माहितीयूक्त असा शब्द प्रयोग अधिक योग्य ठरला असता का?