डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
28 Nov 2008 - 5:42 pm

(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...)

हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू.
१. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे. या तिन्ही आघाड्यांवर असलेल्या मर्यादांमुळे अशा हल्ल्यांमध्ये सातत्य राखणे या संघटनांना शक्य होत नसे. या संघटना युद्धाला निघालेल्या आहेत आणि या युद्धाचे नियम वेगळे आहेत. पण युद्ध म्हटले की सातत्यपूर्ण हिंसक दबाव हा आवश्यक असतो. तोच येथे साध्य होत नव्हता.
२. याआधीचे हल्ले निष्प्रभ ठरण्याचे आणखी एक कारण आहे. हे हल्ले खरे तर दहशत निर्माण करण्यासाठी केले जात होते, पण त्यातून त्या-त्या हल्ल्याच्या घडीपुरती भीती निर्माण होत असे. त्यानंतर पुनश्च जनजीवन सुरळीत झाल्यासारखे, बदलत्या परिस्थितीला सरावल्यासारखे होत असे (मुंबई सावरण्याच्या किंवा तत्सम बातम्या पुरेशा बोलक्या ठराव्यात). तेव्हा दहशत नाही, दहशत नाही म्हणून दबाव नाही, दबाव नाही म्हणजे हेतूंची पूर्तता नाही या चक्रात ते सापडत.
३. या संघटनांचे नेतृत्त्व अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांनी प्राणत्यागासाठी जमवलेले सारेच अनुयायी शिक्षीत आहेत. प्रचंड प्रमाणात निष्ठा हा त्यांचा अनन्यसाधारण गुण आहे. हे सारे ध्यानी घेतले तर असे हल्ले करून ताकद वाया घालवण्यात अर्थ नाही हे त्यांच्या ध्यानी आले असल्यास नवल नाही. त्यातून मुंबईच्या हल्ल्यातून त्यांनी एका नव्या डावपेचाची उभारणी केली आणि तो आता यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. बेस्लन आणि संसदेवरील हल्ला ही त्यांच्यालेखी रंगीत तालीम असणार आहे. संसदेवरील हल्ल्याला भावनिक किनारच अधिक होती, कारण तो मानबिंदूवरचा हल्ला ठरला. पण दहशत? ती काही त्यातून म्हणावी तशी निर्माण झालीच नाही. कालच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबई सुन्न होती ही बाब मात्र पुरेशी बोलकी आहे. हे या हल्ल्याचे 'यश' आहे. आणि असे हल्ले हेच भविष्यातील हत्यार हे या संघटनांना आता समजून चुकले आहे.
हे नवे हत्यार म्हणजे प्राणत्यागास तयार असणाऱ्या अनुयायांना असे हल्ले करण्यासाठी कोणत्याही भागात घुसवणे. एखाद-दुसऱ्या अनुयायाने जाऊन बॉम्बस्फोट घडवत प्राणत्याग करावयाचा आणि आपण मरता-मरता समोरच्या शक्य तितक्या अधिकाधिक लोकांना मारण्याची एक घटना घडवण्यापेक्षा हे हत्यार प्रभावी आहे. या हत्याराचा जो वापर मुंबईत दिसला त्याला युद्धाची छटा आहे. कारण येथे केवळ गोळीबार नव्हता. ग्रेनेड होते. ग्रेनेड फेकून स्फोट घडवायचे आणि त्याच्या आडून गोळीबार. काश्मीरमध्ये घूसखोर घुसवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डावपेचाची आठवण आल्यास नवल नाही.
या हत्याराच्या वापराने केवळ सामान्य जनमानसातच नव्हे तर त्या-त्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठी दहशत निर्माण करता येते हे स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या हल्ल्यानंतर सुन्न झालेले सरकार जागे होण्यास दुसऱ्या दिवसाची दुपार उजाडावी लागली आहे. जागे झाल्यानंतरही सरकारच्या ध्यानी काय आले तर आपली हतबलता. त्यामुळे नेहमीच्या इशारेबाजीपलीकडे काही विचार जनतेसमोर मांडून तिला धीर देण्याचे काम झालेले नाही. दहशत हा हेतूपूर्ततेचा एक मार्ग खरोखरच ठरू शकतो असे या संघटनांना आता वाटू लागले तर त्यात नवल नाही. म्हणजेच आज मुंबईत जे धडले ते उद्या चेन्नईत घडू शकते, कोलकत्यात घडू शकते. नव्हे समुद्र किनारा असलेल्या कोणत्याही शहरात घडू शकते. दहा अनुयायी, खचाखच भरलेला दारूगोळा आणि एक अख्खे शहर वेठीला. मरायचेच आहे, त्यामुळे बाकी काही तयारीची आवश्यकता नाही. समुद्री मार्ग हा एक प्रकार. समुद्री मार्गाने येऊन कुठेही घुसून हा अंदाधुंद गोळीबार करीत दहशत पसरवायची. दहशतीचा कालावधी वाढवण्यासाठी ओलीस धरायचे. किंवा काही करून जनसामान्य या अंदाधुंदीत अडकून पडतील असे पहावयाचे.
हे नवे हत्यार थोडे पूर्वनियोजन केले तर प्रभावी ठरते. हे पूर्वनियोजन बॉम्ब पेरण्याइतके सखोल गरजेचे नाही. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करणेच हेच एक जोखमीचे काम असते. येथे ते नाही. तयार सामग्री घेऊन केलेला हल्ला असे हे स्वरूप आहे. लक्ष्य, कालावधी, अनुयायी या तीन बाबी असतील तर शस्त्रे पुरवणे, दारूगोळा पुरवणे सोपे ठरते. ग्रेनेडचा वापर असल्याने प्रभावक्षमता वाढते. अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही.
मुंबईच्या हल्ल्यानंतर जवळपास प्रत्येक जण या हल्ल्यामागे अगदी तपशीलवार तयारी कशी आहे याचे वर्णन करीत बसला आहे. ही तयारी असणे स्वाभाविक आहे हे ध्यानी घेतले जात नाही, कारण हे युद्ध आहे हेच मुळात मनात रुजलेले नाही. या हल्ल्यांना दहशतवादी हल्ला असेच मानले जाते. त्यामुळे मग त्यामागे असलेल्या तयारीचाच विचार करण्यावरच अधिक भर असतो. ही इतकी तपशीलवार तयारी आहे, कारण त्यांच्या लेखी हे युद्ध आहे. अशी तयारी न करता त्यांनी काही केले तर ते फसतील इतकी ही साधी गोष्ट आहे. नुसतीच दहशत पसरवणे हा त्यांचा हेतू नाही. दहशत हे एक टॅक्टिक आहे, एका व्यापक स्ट्रॅटेजीचे. प्रतिस्पर्ध्यांसाठी काही पेनपॉईंट्स तयार करावयाचे आणि त्यातून त्यांना जेरीला आणावयाचे ही त्यांची गरज आहे. कारण हे युद्ध आहे.
अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक. साध्या भाषेत सांगावयाचे तर मुल्ला-मौलवी, अनेक देशांत कागदोपत्री असलेल्या सरकारव्यवस्थेतील त्यांची प्रभावळ.
हे युद्ध आहे या वास्तवाचा स्वीकार केला तर त्याचा सामना करण्यासाठी प्रतिपक्षालाही एक राजकीय उद्दिष्ट्य ठेवणे आवश्यक ठरते. अन्यथा युद्धाचा सामना करणे शक्य होत नाही. या विशिष्ट परिस्थितीत राजकीय उद्दिष्ट्ये काय असू शकतात? एक तर या शत्रूच्या राजकीय उद्दिष्ट्याला केवळ बळाच्या जोरावर संपुष्टात आणणे किंवा दुसरे म्हणजे शत्रूच्या या राजकीय उद्दिष्ट्यांची कारणेच संपवणे.
एखाद्या समुहाची राजकीय उद्दिष्ट्ये केवळ बळाच्या जोरावर संपवणे असेच पहिले उद्दिष्ट्य ठेवून इराक, अफगाणीस्तान येथे कारवाई झाली. ती यशस्वी झालेली नाही, कारण ती यशस्वी होत नसते. कोणत्याही समुहावर अशा स्वरूपात राज्य करणे शक्य नसते. राजकीय उद्दिष्ट्ये तशी निकालात निघत नसतात. तसा कोणताही प्रयत्न फसवा असतो. कारण हा वरवरचा उपाय असतो.
प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले पाहिजे. तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो. आणि सध्याच्या परिस्थितीत तरी ती तयारी कोणाचीच दिसत नाही.
भारतावर होणाऱ्या हल्ल्यांशी थेट संबंध असलेला देश म्हणजे पाकिस्तान. या हल्ल्यांचे हत्यार विकसीत करणारे मेंदू त्या देशात आहेत हे खरे, पण ते दडले आहेत ते पाकिस्तान "राज्य" (एक नेशनस्टेट या अर्थाने) या मुखवट्याच्या आड. हा मेंदू तेथे आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. प्रश्न येतोय तो मुखवट्याचा. त्याचे काय करावयाचे?
एकदा का प्रश्न येथे येऊन ठेपला की बाकी सारे पवित्रे निकामी ठरतात. पाकिस्तानविरोधात युद्ध करावे वगैरे बाबी मूर्खपणाच्या ठरतात, कारण युद्ध हे समोर असलेल्या शत्रूशी होत असते. येथे तसा शत्रूच नाहीच. पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारून या समस्येचा बंदोबस्त होणार नाही, कारण युद्ध करून पुढे काय? युद्धात विजय मिळवून तेथे राज्यव्यवस्था साकारण्याचे आव्हान केव्हाही सोपे नसते आणि नाही. कारण तसे करून तेथील इतर घटकांनाही वैरी बनवले जाण्याची प्रक्रिया होत असते. इराक-अफगाणिस्तानात अशा प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही. ते देश स्थिर झाले आहेत असा दावा करणे तर मूर्खपणाचे आहे. म्हणजे अशा राजकीय उद्दिष्ट्यावर आधारलेल्या युद्धाचा पर्याय संपतो. राहते काय?
(या प्रश्नाचे उत्तर जाहीरपणे देता येणार नाही).
अशा स्थितीत या विषयाकडे एकेका विशिष्ट देशाचा प्रश्न म्हणून किती काळ पहात रहावयाचे? भारतावर काल झालेल्या हल्ल्याचे राजकीय संदर्भ थेट आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. हो, काश्मीर हा त्यातला एक मु्द्दा आहे. पण त्या हल्ल्यामागे असलेल्या ताकदींचे इतर हेतू आहेतच. ते म्हणजे त्यांच्या मायभूमीचे स्वातंत्र्य. त्यात इराक आहे, अफगाणिस्तान आहे. मक्का-मदिनाही आहे. कारण सौदी अरेबिया खऱ्या अर्थाने स्वयंशासीत आहे असे या संघटना मानत नाहीत आणि त्यात काही अंशी तथ्यही आहे. इस्लामी बहुसंख्य अशी बहुतेक राष्ट्रे आखातात असणे, तेथे तेलाचे साठे असणे आणि तेथील सरकारे अमेरिकेच्या अंकीत असणे ही मांडणी नवी नाहीच.
म्हणजेच, हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या मेंदूचा बंदोबस्त केला पाहिजे. तो करावयाचा असेल तर आधी मुखवट्याचा फैसला करावा लागेल. हा असा डावपेच ठरवण्यासाठी काय करावे लागेल?
-- पूर्ण --

धर्मसमाजजीवनमानराजकारणलेखमतवाद

प्रतिक्रिया

सुनील's picture

28 Nov 2008 - 6:17 pm | सुनील

श्रावण सर,

तुमचा रोख हा पॅलेस्टीनींवरील इस्रायली सत्ता, काश्मिर खोर्‍यातील भारताची सत्ता आणि चेचेन्यावरील रशियाची सत्ता इ. वर आहे, हे उघड.

जरा वेळ द्या. डोकं खरोखरच थंड झाल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शैलेन्द्र's picture

28 Nov 2008 - 9:44 pm | शैलेन्द्र

खरचं चांगला लेख

अभिजीत's picture

29 Nov 2008 - 12:17 am | अभिजीत

खूपच चांगला लेख.
सध्याच्या परिस्थितीत इतकं संयमी आणि सर्वांगिण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

इतकी वर्षं दहशतवादाला आपण तोंड देत आहोत.
काश्मिर, पंजाब, उत्तर-पुर्व भारत इथला दहशतवादाला शक्यतो लष्करी ताकतीने उत्तर देण्यात आले.
सीमाभागातील दहशतवाद आता नागरी भागात पसरु लागला आहे हे या नव्या हल्ल्यातून सिद्ध होतंय.

जसं हे युद्ध व्यापक बनलं आहे तशीच उपाययोजना ही तितकीच व्यापक बनवावी लागेल.

आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रिय आणि धार्मिक अशा चढत्या भाजणीच्या फरकांचे संदर्भ यात आणावे लागतील.

सॅम्युअल हंटिग्टन यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन' चा संदर्भ या चर्चेसाठी उपयोगी पडु शकतो.
(अर्थात, अमेरिकेच्या युद्धखोरपणाचे उदात्तिकरण हा जरी या पुस्तकावरचा आक्षेप असला तरीही ... )

- अभिजीत

विसोबा खेचर's picture

29 Nov 2008 - 12:29 am | विसोबा खेचर

खूप चांगला आणि मुद्देसूद लेख..!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

29 Nov 2008 - 3:01 am | मुक्तसुनीत

लेख आवडला. मुद्देसूद वाटला. त्यात मांडलेल्या अनेक मुद्द्यांपैकी , सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेणे योग्य.

धर्माचा आधार घेऊन या संघटनांची बाधणी होत असल्याने हा सारा प्रकार म्हणजे इस्लामी दहशतवाद असे आजवर सारेच मानत आले आहेत. पण ते तितकेच आहे का? किंवा खरोखर हा इस्लामी दहशतवाद आहे का?
मूळ हेतू राजकीय आहे ("स्वातंत्र्य", "राष्ट्रउभारणी", "परकीय ताबा संपवणे") हे ध्यानी घेतले तर त्याला असलेला धर्माचा आधार हा मुखवट्यासारखा ठरतो.

अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक. साध्या भाषेत सांगावयाचे तर मुल्ला-मौलवी, अनेक देशांत कागदोपत्री असलेल्या सरकारव्यवस्थेतील त्यांची प्रभावळ.

मला वाटते, वरील वाक्ये आणि त्यात मांडलेले मुद्दे म्हणजे या लेखाचा "हार्ट ऑफ द मॅटर". बाकीचे अनेक उपमुद्दे आणि महितीचे घटक या मुख्य मुद्द्याला पूरक आहेत(असे मला वाटले).

दहशतीच्या कारवायांचा पाया राजकीय आहे , हे मला काही पुरते पटलेले नाही. एखाद्या गोष्टीला , राजकीय पाया असणे म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे. हजारो उदाहरणांतून १-२ उदाहरणे पाहू.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा मुद्दा राजकीय होता. म्हणजे काय ? तर तो मुद्दा लावून धरण्यामागे , त्याचे समर्थन करण्या वा विरोध करण्यामागे राजकीय उद्दिष्ट होते ते महाराष्ट्रातील दलित-दलितेतर मतांना ओढून घेण्याचे. याची परिणती शेवटी निवडणूक , सत्ताग्रहणात किंवा सत्तेत वाटा मिळण्यात व्हायची होती. हाच मुद्दा राज ठाकरे यांचा. उत्तर भारतीय काय अमिताभ बच्चन काय , हे मुद्दे काही नवे नव्हते , किंवा त्याबाबतच्या प्रश्नांनी काही वेगळे वळणही घेतले नव्हते. तर एका पोकळीतून राज यांनी प्रश्न आहेत असे अधोरेखित केले. समाजाचे ध्रुवीकरण केले. याची परिणती मतांमधे होणार. सत्तेच्या समीकरणात राज ठाकरे येणार. जास्त हिंसाचारी उदाहरणे घ्यायची तर आसामातील विद्द्यार्थ्यांचे घेऊ. काही वर्षांपूर्वी त्याला अतिशय गंभीर वळण लागलेले होते. पण त्याची परिणती राजकीय सत्ता मिळवण्यात झाली.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल बोलू. क्रांतिकारकांच्या बलिदानाबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. त्यांचे आपण नेहमी स्मरण करतो. एक व्यक्ती , एक भारतीय म्हणून मलाही तसे वाटतेच. भगतसिंग, आझाद , वासुदेव बळवंत , चापेकर या सगळ्यांबद्दल इतरांप्रमाणे मलाही आदर आहे, देशाकरता ते शहीद झाले असेच वाटते. पण एकूणा राजकीय घडामोडींमधे त्यांच्या कामामुळे काही निर्णायक फरक पडला काय ? त्यांच्या कामाचा पाया राजकीय आहे असे म्हणता येईल कदाचित. कारण त्यांना खरोखरच राजकीय सत्तांतरण हवे होते.

याच प्रकारे , एकेकाळाच्या आयर्लंडमधील दहशतवादामागे जे चाललेले आहे त्याचे स्वरूप राजकीय होते असे म्हणायला जागा आहे. माझ्या अंधुक माहितीप्रमाणे या कारवायांच्या अंती आयर्लंड आणि यूके मधे सत्तेच्या वाटपाबद्दल आणि सार्वभौमत्त्वाबद्दल समझौता झाला. (चूभूद्याघ्या)

तात्पर्य काय ? की एखादे हिंसक/अहिंसक सामूहिक कृत्य करताना , त्याचा "पाया राजकीय" असतो , तेव्हा त्याचे उद्दिष्ट पोलिटीकल प्रोसेसशी मेळ खाणारे असते. जगभर चालणार्‍या इस्लामी दहशतवादाला अशी राजकीय चौकट आहे असे मला म्हणवत नाही. रशियन प्रजासत्ताकांपासून अमेरिकेपर्यंत , भारतापासून अफ्रिकेतील देशांपर्यंत , युरोपमधे लंडन, स्पेन मधे , ऑस्ट्रेलियन बेटांमधे जे घडले आहे , घडते आहे त्यात एक आणि एकच कॉमन धागा आहे : इस्लामाचे कडवे, जिहादी स्वरूप. आयर्लंड मधील दहशतवाद्यानी भारतात हल्ले केले नाहीत. सावरकर वगैरेंनी आपल्या क्रांतिकारक कारवाया इंगंडपुरत्या सीमित ठेवल्या. इस्लामी दहशतवादाचे तसे नाही. "इस्लाम खतरेमे" आहे असे त्याना वाटते म्हणून त्याचे परिणाम जगभर होतात. सर्व मुस्लिम दहशतवादी नक्कीच नसतात , एक टक्क्याच्या अगदी छोट्या हिस्शाइतकेच मुसलमान दहशतवादी असतील. पण सर्व दहशतवादी मात्र मुसलमान असतात. असे असेल तर दहशतवादाचे स्वरूप धर्माधिष्ठित नाही असे कसे म्हणायचे ? जिहाद आणि हिंसाचार ही इस्लामची शिकवण नाही , इस्लाममधून असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे अशी एक मतप्रणाली आहे. घटकाभर जर ती खरी मानली तरी , "मिस्-इंटरप्रिटेशन" केले आहे ते इस्लामचेच , आणि ते करणार्‍या घटकांमधला कॉमन धागा म्हणजे ते सगळे मुसलमान आहेत , हाच. तेव्हा लेखाचा हा जो आधारभूत मुद्दा आहे तो मला पटलेला नाही आणि तो का पटला नाही याची मीमांसा वर दिलेली आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Nov 2008 - 11:10 am | श्रीकृष्ण सामंत

लेख फारच मुद्देसुद आणि परत वाचण्या लायक वाटला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसुनाना's picture

29 Nov 2008 - 1:20 pm | विसुनाना

लेखकाने मूलगामी विचार करून हा लेख लिहिला आहे. लेख विचारप्रवर्तक आहे यात वाद नाही.
काही मुद्दे जरूर सहमत होण्यासारखे आहेत.
तरीही या लेखात व्यक्त झालेल्या विचारांच्या मूळ गाभ्याशी मात्र दुर्दैवाने असहमती प्रगट करावी लागत आहे.

या लेखात व्यक्त झालेल्या मतांना समर्पकपणे खोडून काढण्यासाठी एक सखोल लेख लिहावा लागेल. त्यावर विचार करत आहे.

सध्या प्रत्येक मुद्दा घेत नाही.

होणारा हल्ला त्यांच्या धर्माला लक्ष्य करून होत नाही तर "राज्य" या संकल्पनेला लक्ष्य करून होत आहे.

अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक.

प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले पाहिजे. तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो. आणि सध्याच्या परिस्थितीत तरी ती तयारी कोणाचीच दिसत नाही.

तो करावयाचा असेल तर आधी मुखवट्याचा फैसला करावा लागेल.

हे काही मुद्दे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अमान्य आहेत.

सुनील's picture

29 Nov 2008 - 2:53 pm | सुनील

"सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीनही पांडवांना देणार नाही", ही दुर्योधनाची गर्जना महाभारतीय युद्धाला कारणीभूत ठरली. मातृभूमीचे स्वातंत्र्य हा जगातील बर्‍याच युद्धांचे कारण आहे. इथे मातृभूमी या शब्दाचा अर्थ आधुनिक नेशन-स्टेट या संकल्पनेत बसेलच असे नाही. पांडवांना "त्यांची" भूमी कौरवांनी अन्यायाने बळकावली असे वाटले. अर्वाचिन काळात तीच भावना श्रीलंकेतील तामिळींची, आयरीश लोकांची, असमियांची, पॅलेस्टीनींची आणि काश्मिर खोर्‍यातील मुस्लीमांची आहे. त्यांना वाटणारा "अन्याय" हा खरा अथवा आभासी (पर्सीव्ड) असू शकतो. पण ती भावना आहे हे नाकारता येणार नाही.

"आपली" भूमी ही दुसर्‍याच्या जोखडातून मुक्त करणे, हे उद्दिष्ट्य राजकीयच आहे. ते गाठण्यासाठी चोखाळलेले मार्ग जरी विविध समुदायांनी वेगवेगळे अनुसरले असले, तरी अंतीमतः त्यावर राजकीय तोडगा हाच दीर्घकालीन उपाय आहे, यावर दुमत नसावे.

पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीवर ज्या लाजीरवाण्या अटी लादल्या गेल्या होत्या, त्यातच दुसर्‍या महायुद्धाची बीजे रोवली गेली होती. वास्तविक दुसर्‍या महायुद्धातही जर्मनीचा निर्णायक पराभव झाला होता, पण यात तिसर्‍या महायुद्धाची बीजे नव्हती. कारण देश जरी विभागला गेला असला तरी बेचिराख झालेल्या जर्मनीला (आणि जपानलाही) पुन्हा उभे राहण्यासाठी अमेरिकेने भरीव अशी आर्थिक मदत दिली होती.

यालाच आपण विन-विन सिच्युएशन म्हणूयात का?

लष्करी प्रश्नांवर लष्करी उत्तर, हे ठीकच. पण राजकीय प्रश्नावर उत्तर राजकीयच हवे. आयर्लंडच्या प्रश्नावर जसे विन-विन पद्धतीने तोडगा काढला गेला तसाच जर पॅलेस्टीन आणि काश्मिरवर काढला गेला तरच हा "इस्लामी" दहशतवाद आटोक्यात येईल.

काही महिन्यांपूर्वी मी इथे काश्मिरवर एक लेख टाकला होता. त्यातील काही वाक्ये पुन्हा उद्धृत करतो -

सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे लागेल की, काश्मिर हा राजकीय प्रश्न आहे त्यामुळे त्याचे राजकीय उत्तरच शोधावे लागेल. लष्करी उपायांनी फारतर काश्मिरच्या भूभागावर ताबा ठेवता येईल पण तेथील जनतेला भारताच्या बाजूने वळवता येणार नाही. शेवटी प्रदेश म्हणंजे त्या प्रदेशातील माणसे, केवळ जमीन नव्हे.

१) अधिक स्वायत्तता देणे -

२) लष्करी जांच कमी करणे -

३) घट्ट आर्थिक संबंध निर्माण करणे -

४) देशाचे स्थान उंचावणे -

एक वेगळा विचार करण्यास चालना देणारा लेख लिहिल्याबद्दल श्रावणसरांचे अभिनंदन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनंत छंदी's picture

29 Nov 2008 - 3:05 pm | अनंत छंदी

श्रावणजी कालचा हल्ला हा केवळ एका देशाचा प्रश्न नाही तर तो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे हा तुमचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. हिरव्या दहशतवादाने सार्‍या जगाला वेठीस धरले आहे, त्यामुळे जगातील सर्व देशांनी या दहशतवादाविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली पाहिजे. आपल्या देशात "त्यांचे" इतके लाड चालू असतानाही हे दहशतवादी त्यांचा छळ थांबवा अशी मागणी करीत असतील तर ती बाब गंभीर आहे. यावेळी सरदार पटेलांची आठवण येते आहे. फाळणीच्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंवर अनन्वीत अत्याचार सुरू असताना त्यांनी केलेली एक कृती पुरेशी ठरली होती.

विजय राणे's picture

29 Nov 2008 - 4:52 pm | विजय राणे

श्री मोडक
आपला लेख वाचला. आपण लष्करात वगैरे होतात का की आहात? एखाद्या युद्धात आपण भाग घेतला आहे का? की केवळ वाचलेल्या माहितीवर विश्‍लेषण केले आहे? हे विचारण्याचा कारण असे की काही विधाने ठोस वाटतात आणि खूपशी कच्ची.

हे नवे हत्यार थोडे पूर्वनियोजन केले तर प्रभावी ठरते. हे पूर्वनियोजन बॉम्ब पेरण्याइतके सखोल गरजेचे नाही. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करणेच हेच एक जोखमीचे काम असते. येथे ते नाही. तयार सामग्री घेऊन केलेला हल्ला असे हे स्वरूप आहे. लक्ष्य, कालावधी, अनुयायी या तीन बाबी असतील तर शस्त्रे पुरवणे, दारूगोळा पुरवणे सोपे ठरते. ग्रेनेडचा वापर असल्याने प्रभावक्षमता वाढते. अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही.

हे विधान फार धाडसाचे वाटते. हल्ल्यासाठी सखोल नियोजनाची गरज नाही, असा आपला दावा आहे. तो फारच पोकळ आणि बालीश वाटतो. कारण या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत येण्याची गेल्याच वर्षी रंगीत तालिम केल्याचे वाचनात आले आहे. आणि गेली साठ सात त्यांनी सुरक्षा यंत्रणेला झुंजत ठेवले आहे. त्यामुळे ते सुचेल तसे खचितच वागले वागले नसतील. त्यामुळे नियोजनाची गरज नाही, असे म्हणणे अयोग्य ठरते आणि आपण हा लेख टाइमपास म्हणून लिहिला की काय, अशी शंकाही वाटू लागते.

जीएस's picture

29 Nov 2008 - 8:46 pm | जीएस

एक मुद्देसूद लेख लिहायचा उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय इतिहास व वस्तुस्थिती याच्या फारच अपुर्‍या आकलनापोटी, वा पुरेशा अभ्यासाअभावी फार मोठे निष्कर्ष बेधडकपणे मांडले गेले आहेत असे लेख वाचून वाटते.

विसूनाना यांनीही मु़ख्य गाभ्यातील विसंगतीवर बोट ठेवले आहेच.

मात्र, विचारप्रवर्तक चर्चा कुठल्या भाषेत वा पातळीवर व्हावी याचे मात्र हा लेख चाम्गले उदाहरण आहे.

धन्यवाद