केवळ शब्द भारलेले
इकडून तिकडे वाहणारे
तिकडून इकडे झरणारे......
कुणाकुणाचे संचित असते
क्षणामनाला जाणिव देते
प्रत्यक्षाहून, अमूर्त संपन्न!
भास नसे हा खास तरीही
आभासाच्या जगात फिरते
गूज मनाचे मनास वदते.
इतक्या रुतल्या गाठी रेशीम
व्रणही वाटे जपून ठेवू
नशिबाला मग कौलच लावू
दिगंताला निघताना तरी,
हात खराच हाती घेऊ!
प्रतिक्रिया
11 Aug 2015 - 8:39 am | जडभरत
छान आहे. पण शेवटच्या कडव्यात जराशी लय बिघडते. तिथेही ३-३ ओळींचे विभाग पाहिजे होते. पहिल्या ३ कडव्यांत लय खूप छान जमलीये.
11 Aug 2015 - 3:12 pm | शिव कन्या
वाचून प्रतिसाद दिलात, धन्यवाद.
शेवटच्या कडव्यातील लय मुद्दाम विस्कळीत केलीय.कारण त्यातील आशय अनिश्चित भविष्याशी निगडीत आहे.हा आशय अन् बांधणीचा खेळ आहे.लिहिणारीची अस्वस्थता ध्वनीत करण्यासाठीचा हा साधा प्रयोग आहे. याच ओळी शब्दांत फेरफार करुन तालात बांधता येतात.आशय दोन ओळीत मावला म्हणून शेवटी तिसऱ्या ओळीचे पाणी कशाला?
इतक्या रुतल्या रेशीमगाठी!
व्रणही वाटे जपून ठेवू
नशिबाला मग कौल लावू!
दिगंताला निघताना तरी
हात खराच हाती घेऊ!
11 Aug 2015 - 9:56 am | एस
छान, अमूर्त काव्य.
11 Aug 2015 - 5:07 pm | वेल्लाभट
सुंदरच !