गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला.
एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार."
खरोखरच चांगला विचार.
तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला,
एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या. आम्ही तुम्हाला वर ओढतो."
तो माणूस काही केल्या हात समोर करत नाही. लोक म्हणतात "काय झाले ह्याला?"
तेवढ्यात दुसरा एक माणूस पुढे येतो आणि म्हणतो," अरे हा माणूस एकदम कंजूस आहे. कोणाला काही देत नाही." आणि मग त्या माणसाकडे पाहून बोलतो,"अहो, माझा हात घ्या. त्याला धरून वर या".
लगेच तो (कंजूस) माणूस पुढे होऊन ह्याचा हात पकडतो.
वाटले, हात धरण्यावर थोडे लिहू. पण खूप विचार करूनही ते शब्दात बाहेर आले नाही. मग विचार केला, एकाच गोष्टीवरून दोन वेगळे विचार मनात येतात ते लिहूया. म्हणून हा प्रयत्न...
थोडे असे, थोडे तसे.
महाविद्यालयात असताना एका मित्राने पुढील सांगितले होते. आता कुत्र्या-मांजरांचे विचार त्याला कोणी सांगितले हे मी त्याला नाही विचारले, तुम्ही मला नका विचारू ;)
कुत्र्याला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा तो विचार करतो, "हा माणूस मला खायला देतोय. हा नक्कीच महान/देव आहे."
मांजरीला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा ती विचार करते, "हा माणूस मला खायला देतोय. म्हणजे मी नक्कीच कोणीतरी महान/देव आहे."
२/३ दिवसांपूर्वी 'स्टार माझा' पाहताना हे मनात आले.
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. आपण मॉल मध्येच जाऊन घेतले पाहिजे. आपले पैसे वाचतील.(सर्वसामान्यांचा विचार)
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. त्यांनी नक्कीच साठा करून ठेवला असेल. त्यांची चौकशी करायला पाहिजे. (सरकार आणि वृत्तवाहिन्यांचा विचार)
बघूया, आणखी काही असे विचार आठवतात का?
(हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)
प्रतिक्रिया
12 Apr 2008 - 1:18 am | विसोबा खेचर
हम्म! लेखन बर्यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :)
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला.
मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन!
तात्या.
28 Apr 2008 - 11:08 pm | देवदत्त
धन्यवाद तात्या..
आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही.
आता एक आठवला तो लिहितो...
वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते.
भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच.
पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.