आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
5 Nov 2020 - 9:06 pm

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

‘ या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’
ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. त्या कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.

त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आज आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. ती प्रत्यक्ष लादण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की

अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. माध्यमांत अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...

नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान वीस वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

समाजविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2022 - 11:41 am | कर्नलतपस्वी

'आवाज', या दिवाळी अंकासाठी वाचनालयात बजाज स्कूटर सारखे अ‍ॅडव्हान्स बुकींग करावे लागत असे. कधीकधी दिवाळी अंक गुढीपाडव्याला वाचायला मिळत असे. अतिशयोक्ती वाटेल पण लहानपणी गावात सत्यपरिस्थिती होती.

बहुतेक तरूण भारत एक 'शांता निसळ'नावाने हिन्दुस्तानी संगीतावर उत्कृष्ट स्तंभलेखन करीत असत. ते नाव आजही लक्षात आहे.

नाटकाच्या मोठ्या जाहिराती पुर्वी वर्तमानपत्रात पाच दिवस सलग यायच्या पण बटाट्याची चाळ व वाऱ्यावरची वरात या पुलंच्या कार्यक्रमाची जाहिरात एक दोन लाईनची व एकच दिवस होत असे. तिकीटविक्री एकाच तासात संपवून बुकींग कारकून पुढील चार दिवस झोपा काढत असे.

कोयनानगर भुकंप आमच्या आयुष्यातील पहीला अनुभव. सकाळी मोठी माणसे काही बोलताना दिसली व वर्तमानपत्रात मोठे मथळे छापले गेले. काहीच दिवसात पुणे चिपळूण जाताना भुकंपाचे खरे स्वरूप दिसले.

बरेच आहेत पण आठवल्यावर.....

कुमार१'s picture

18 Sep 2022 - 11:44 am | कुमार१

छान किस्से.

'आवाज', या दिवाळी अंकासाठी वाचनालयात बजाज स्कूटर सारखे अ‍ॅडव्हान्स बुकींग करावे लागत असे

>>> +१
आठवले.

mayu4u's picture

23 Sep 2022 - 2:38 pm | mayu4u

किल्लारी भूकंपाच्या दुसर्‍या दिवशीची हेडलाईनः "उषःकाल होता होता काळरात्र झाली"

कुमार१'s picture

23 Sep 2022 - 3:37 pm | कुमार१

समर्पक.
त्या संध्याकाळ किंवा रात्रीची एक आठवण तत्कालीन 'सकाळ'च्या संपादकांनी दुसऱ्या दिवशी लिहिली होती.

बहुतेक तो अनंत चतुर्दशीचा दिवस होता ( चुभूदेघे). पुण्यामध्ये गणपतीची विराट मिरवणूक चालू होती आणि त्यातील एका मंडळाचे वाहन बैलगाडी होते.

तर ते बैल एकाक्षणी अक्षरशा बिथरले आणि एकदम शांत झाले होते. बहुदा भूगर्भातील घडामोडी त्यांना भूकंपपूर्व जाणवल्या असाव्यात असे वाटते.

जुन्या वजनमापांची चित्रमय उजळणी

ok

कुमार१'s picture

16 Dec 2022 - 9:13 am | कुमार१

16 डिसेंबर : भारतीय विजय दिवस

यानिमित्ताने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यासंबंधी वाचलेली एक आठवण.

आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सैन्यात माणेकशॉ आणि आयुब खान हे दोघेही नोकरीस होते. तेव्हा दोघे चांगले मित्र होते. त्यावेळेस माणेकशॉ यांना त्यांची फियाट गाडी विकायची होती म्हणून त्यांनी आयुब खान यांना विचारले. खान यांनी होकार दिला आणि विक्रीची किंमत ठरली चार हजार रुपये. खान गाडी घेऊन गेले परंतु पैसे मात्र त्यांनी लगेच दिले नाहीत. माणेकशॉ यांनी पण ते मागण्याची घाई केली नाही.

पुढे काळ लोटला. भारत व पाकिस्तान स्वतंत्र झाले. 1971 च्या दरम्यान हे दोघेही आपापल्या देशांचे सैन्यप्रमुख झाले. नंतर दोन्ही देशांचे युद्ध झाले व त्यात आपण जिंकलो आणि बांगलादेश स्वतंत्र झाला.

काही दिवसांनी दोन्ही देशांची एक उच्चस्तरीय बैठक ठरली. त्यात हे दोघे एकत्र आले. जेव्हा ते चहापानासाठी एकत्र भेटले तेव्हा आयुब खान यांनी ते चार हजार रुपये माणेकशॉ यांनी घ्यावेत अशी विनंती केली. तेव्हा माणेकशॉ हसून म्हणाले,


“अरे मित्रा, तू गाडीचं काय घेऊन बसला आहेस ? त्यापेक्षा कितीतरी अधिक पट तू मला दिले आहेस- अख्खा बांगलादेश !”

कुमार१'s picture

17 Feb 2023 - 4:11 pm | कुमार१

जोशी-अभ्यंकर मालिका हत्याकांडाचा उलगडा करणारी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक वाघ यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

कुमार१'s picture

3 Mar 2023 - 4:11 pm | कुमार१

आजही शहरांमध्ये ही कला जिवंत आहे तर !
ती भांडी वापरणारे शौकीन देखील आहेत.

ok

शालेय अभ्यासात कल्हईतील रसायनशास्त्रावर हमखास प्रश्न असायचे.

कंजूस's picture

3 Mar 2023 - 5:35 pm | कंजूस

अशा कल्हई केलेल्या भांड्यांमध्येच काही ठिकाणी केली जाते.

केवळ बिर्याणीच नव्हे तर पितळेच्या भांड्यांमध्ये काहीही शिजवायचे असले तर त्या भांड्याला कल्हई असावी लागते अन्यथा पदार्थ खराब होण्याची (कळकण्याची) शक्यता असते.

कुमार१'s picture

3 Mar 2023 - 7:42 pm | कुमार१

(कळकण्याची) शक्यता >> +१
कळकणे
हा एक छान शब्द आहे.

कुमार१'s picture

27 Mar 2024 - 11:14 am | कुमार१

स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ दरम्यान ६८ टप्प्यांत पार पडल्या.