परदेशात नोकरी कराविशी वाटते..काय करावे..

राम दादा's picture
राम दादा in जनातलं, मनातलं
15 Nov 2008 - 4:42 pm

मित्रानो..आपल्यातील बरेच मित्र परदेशात काम करतात्..त्याप्रमाणे मलाही परदेशात नोकरी करण्याची ईच्छा आहे..

मी आयटी मध्ये काम करतो..संगणक अभियंता..साधारण २ वर्षाचा अनुभव आहे...माझ्यासारखे बरेच मित्र आहेत .ज्यांना परदेशात नोकरी करवीशी वाटते..

त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. बहुतेक अनुभवी मित्र आपल्या मिपामध्ये आहेत..

त्यांनी योग्य ती माहिती द्यावी. ( माहीती एबीसीडी पासुन सांगावी )

आपला
राम दादा..

नोकरीविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Nov 2008 - 5:38 pm | विसोबा खेचर

अरे आपला देश काय वाईट आहे? आपल्या देशात काय नोकर्‍या मिळत नाहीत? आपल्या देशात काय दोन वेळची भाकरी मिळत नाही?

तात्या.

टारझन's picture

15 Nov 2008 - 6:29 pm | टारझन

अरे आपला देश काय वाईट आहे?

नाही बिलकुल नाही ... आपला देश बेष्ट आहे ... आणि परदेशात नोकरी म्हणजे आपला देश वाईट असं नाही :)

आपल्या देशात काय नोकर्‍या मिळत नाहीत?
मिळतात .. जरूर मिळतात .. पण हेही परदेशी जाण्याचं कारण नाही

आपल्या देशात काय दोन वेळची भाकरी मिळत नाही?
आपल्याला फक्त २ वेळच्या भाकरीचीच गरज असती तर मग आटापिटा करायची गरजच काय हो तात्या ?
मी भारतात होतो तेंव्हा १ तारखेला लोड झालेला पगार ७ तारखेला खाली होत असे .. मग ७ ते ३० आमचा मंथ एंड असे. हे काहीही फालतु लाड न करता. पण बाहेर आल्या पासून बक्कळ सेव्हींग होउ शकलं .. अर्थात बाहेर रहायला काही गोड नाही वाटलं ...पण जर पुढच्या २० वर्षांची सोय करायची असेल तर आत्ता दोन वर्ष बाहेर राहून "केवळ भाकरी"च्या वर कमाई हवीच प्रत्येकाच्याच घरी जमिनदारी असेल असं नाही ,,, गरजा असू शकतात. .आज जर घर घ्यायचं म्हंटलं, आणि तुम्हाला फक्त तुमच्या भारतिय सॅलरीचं इनकम असेल तर ते शक्य आहे का ? शिक्षणासाठी काढलेली कर्ज , अन्य आपत्तींमुळे निर्माण झालेला आर्थिक खड्डा , फक्त भाकरीपुरत्या मिळणार्‍या पैशातून साध्य होइल का ?

असो ,
आम्हीही परदेशी संधीची वाट पहात आहोत. माझं घर माझं कुटूंब यांचा विचार करतो म्हणूनच मला बाहेर जावे लागेलच ... भारतात राहून बाहेरचा पगार कोणी देत असेल तर आम्ही जगातील सर्वांत आनंदी एंप्लॉइ असू ..

-आयटीवाला टारझन

संताजी धनाजी's picture

16 Nov 2008 - 8:26 am | संताजी धनाजी

एकदम बरोबर.

पण सध्याची परीस्थिती पहाता परदेशात जाणे धोक्याचे ठरु शकते ह्याचाहि विचार व्हावा असे मला वाटते. एक वर्षभर तरी आहे ती नोकरी टिकवुन ठेवणे महत्वाचे आहे.
जरी परदेशात [चांगली] नोकरी मिळाली तरी ती किती दिवस राहील ह्या गोष्टिची शाश्वती नाही. अमेरीकेतील मिपाकरांना ह्याची चांगलीच कल्पना असेल.

माझा अमेरीकेतील एक भावाच्या मते तेथील परीस्थिती अत्यंत खराब आहे. कधीही नोकरी जावू शकते अशी स्थिती आहे.

- संताजी धनाजी

अवलिया's picture

15 Nov 2008 - 8:06 pm | अवलिया

तात्या आपल्याशी पुर्ण सहमत आहे...

ज्यांना जायचे परदेशी त्यांनी खुशाल जावे...परत याल तेव्हा आनंदाने स्वागत करु
पण तिथले गोडवे गात आमचा अपमान कराल तर याद राखा
अवघ्या साडेतीनशे वर्षांपुर्वी देव मस्तकी धरुन आमच्या पुर्वजांनी केलेल्या हलकल्लोळाची रग अजुनही रक्तात आहे हे विसरु नका.. येवढेच सांगतो.

नाना

जाण्यापुर्वी इकडे नजर टाका
http://money.cnn.com/galleries/2008/news/0811/gallery.global_crisis/inde...

भास्कर केन्डे's picture

16 Nov 2008 - 10:41 am | भास्कर केन्डे

परदेशात जाणारे म्हणजे मातृभूमीचे दुश्मन असा आपल्याकडे गैरसमज आहे असे बरेचदा वाटते. आपल्या प्रतिसादांनी तेच दिसून येत आहे.

मला तरी बाहेरच्या देशांतल्या येवढ्या वर्षांच्या वास्तव्यात कोणीही भारताचा आपमान करणारा भेटलेला नाही. तक्रारी तर भारतात राहणारे लोकही करतात हो. मग परदेशातून जाऊन आलेल्याने त्या केल्या तर काय बिघडले?

उलट इकडे अमेरिकेत आम्ही भारतीय लोक (त्यात इथला पासपोर्ट असणारे सुद्धा आले) पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन या राज्याच्या विधानसभेच्या इमारतीवर तिरंगा फडकवून मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो. इकडे दहा-पंधरा वर्षापूर्वी भारत नेमका कुठे आहे हे सुद्धा सामन्य लोकांना माहिती नव्हते. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. का झाले आहे हे? कारण भारतीय तरुण रोजगारा साठी इकडे आला पण "भारत का रहनेवाला हूँ" असे म्हणत. त्याने जिथे जिथे गेला तिथे तिथे भारताबद्दल तिथल्या लोकांची भारताबद्दल चांगली मानसिकता तयार केली. त्याही पुढे जाऊन लॉबी/दबागट निर्माण केले.

असे बाहेरच्या देशांत भारताचे दबावगट निर्माण करुन भारताबद्दल अनुकूल मते बनवणारे परदेशस्थ भारतीय हे देशप्रेमी नव्हेत असे आपल्याला म्हणायचे आहे काय?

पण तिथले गोडवे गात आमचा अपमान कराल तर याद राखा
हे बिचारे राम महाशय परदेशात नोकरी करण्यासाठी मार्गदर्शन मागत असतील तर त्यांना शक्य असेल तर मार्गदर्शन करायचे सोडून जनू काय हा तिकडे गेल्यावर देशद्रोही बनून येणार आहे अशा प्रकारे त्याला धमकी देणे मला तरी पटले नाही. सावरकर, गांधी, बोस यांच्यासारखे महान देशभक्त सुद्धा परदेशात जाऊन आले नाहीत का?

टारु साहेबांनी उल्लेखल्या प्रमाणे जर एखाद्या तरुणाला एक-दोन वर्षे बाहेर राहून आल्यावर सर्व जीवन सुखकर करता येणार असेल तर ते त्याने का करु नये?

राहिला प्रश्न देशप्रेमाचा, तर परदेशात जाऊन आल्याने त्या तरुणाचा व एकदंर देशाचा सुद्धा विकास होण्यास हातभारच लागणार आहे... हे काही मुद्दे बघा...
१. देशांतराने माणसाला थोडे अधिक शहाणपण येते. आलेले अनुभव त्याला अधिक परिपक्व बनवतात. परिपक्व नागरीक हे चांगल्या समाजाच्या फायद्याचे की तोट्याचे?
२. असे तरुण परदेशात गेल्यावर आपल्या सोबत आपली संस्कृती सुद्धा त्या देशात घेऊन जातात. उदाहरण घ्यायचे झाले तर समजा या राम ने बाहेरच्या देशात जाऊन दोन चार गोर्‍या/काळ्यांमध्ये भारतीय जेवनाची आवड निर्माण केली तर ते परदेशी लोक जन्मभर भारतीय पदार्थांचे ग्राहक नाही का बणनार? पर्यायाने भारतातल्या निर्यातीत वाढ. असे थेंबे थेंबे तळे साचले तर विशाल समुद्र निर्माण नाही का होणार?
३.... बरेच मुद्दे आहेत... तुर्तास एवढेच.

मुळात मरठी माणूस बाहेर देशात जायला उदासिन. त्यात एखाद्याला जावे वाटले तर आपण त्याचे खच्चिकरण करु नये. येथे परदेशात मी असे काही तेलगू बांधव बघितले आहेत ज्यांनी प्रत्येकी १०-१५ नातेवाईक/मित्रांना इकडे यायला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन/मदत केली आहे. अगदी बांगड्याच्या दुकानदाराने इकडे येऊन आयटीत नोकर्‍या मिळवलेल्या पाहिल्या आहेत. जर पात्र मराठी तरूण बाहेरच्या देशात अनुभव घेऊन येऊ इच्छित असेल तर त्याला इतर मराठी-मराठी म्हणनार्‍यांनी शक्य असेच तर नक्कीच मार्गदर्शन केले पाहिजे.

आपला,
(परदेशस्थ भारतीय) भास्कर
आम्ही येथे वसतो.

>उदाहरण घ्यायचे झाले तर समजा या राम ने बाहेरच्या देशात जाऊन दोन चार गोर्‍या/काळ्यांमध्ये भारतीय जेवनाची आवड निर्माण केली तर ते परदेशी लोक जन्मभर भारतीय पदार्थांचे ग्राहक नाही का बणनार?

अहो चीनचेच उदा. घ्या ना!

आज आपल्याकडे एक बटाटावडा फक्त ३-४ रूपयांत मिळतो.
चीनमध्ये एका पुणेकर असणार्‍या स्त्रीने ४ भारतीय रेस्टॉरन्ट्स उघडली असून त्याची स्पेशल डिश म्हणजे बटाटावडा! तो तेथे थोडे कमी-अधिक तिखट मसाले लावून १७३ रूपयांस विकला जातो म्हणे!
(ही माहिती माझ्या वाचनातील आहे. मुळात मी परदेशात कधी गेलो नाही व सध्यातरी मायदेशातच राहावेसे वाटते. त्यामुळे मी कोणालाही याविषयी सल्ला देऊ शकत नाही. मी फक्त भास्कररावांशी सहमत आहे एवढेच !)

आपला नम्र,
वडापाव

संजय अभ्यंकर's picture

16 Nov 2008 - 11:45 pm | संजय अभ्यंकर

(अ)
भास्कर भाऊ व टारझन शी सहमत!

कामानिमित्त मी ही अनेकदा देशाटन करतो.
देशाटनाने, माणसाचे विचार व दृष्टी बदलते.
माणूस अंतर्मुख होऊन विचार करू लागतो व आपण भारतीय गुणवत्ता असुन सुद्धा, पाश्चात्यांच्या मागे का आहोत याची जाणीव होते.

परकियांची भारतीयांकडे पहाण्याची दृष्टी बदलत आहे.
तरी अजुनही अनेक देशांत भारतीयांबद्दल घृणा, द्वेश, कुतुहल इ. भावना आहेत.

पाश्चात्य देशांत भारतीयांना उच्च पदे, अधिकार सहज मिळत नाहीत.
माझ्या माहीतीतले एक महाशय मशिनटूल्स मध्ये जर्मन विद्यापीठातून डॉक्टरेट झाले. परंतू वयाची ५०शी उलटल्या नंतरही जर्मनांनी त्यांना सामन्य प्रशिक्षक म्हणूनच ठेवले. त्यांचा साहेब केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता प्राप्त होता.
जर्मनीत एका गावी ते अचानक भेटले तेव्हा ते एका सामान्य हॉटेलात रहात होते (जेथे स्वच्छतागृहे कॉमन होती).
हे पाहील्यावर ठरवले की परदेशात प्रशिक्षण इ. साठी जायचे, परंतू उपजिवीका भारतातच भली.

माझ्या माहीतीतील आणखी एक भारतीय तंत्रज्ञ (जो जन्माने व अर्हतेने कॅनेडीयन होता व कॅनडात स्थाईक होता). उपजीवीका व ज्ञान दोन्ही मिळवण्यासाठी तो जर्मनीत आला.
तो जेथे काम करीत होता, तेथे लोकांनी त्याला बरेच पीडले. त्याच्या कारचे टायर बर्स्ट करणे, कारची काच फोडणे इ.
ह्या प्रकाराला कंटाळून त्याने आपली कार कंपनी पासून दोनएक की.मी. दूर पार्क करायला सुरवात केली. तरिही त्याच्या मागची पिडा थांबली नाही, शेवटी तो पुन्हा कॉनडात परत गेला.

हि उदाहरणे ७-८ वर्षां पूर्वीची आहेत व हि उदाहरणे केवळ प्रातीनिधिक आहेत. सर्वांनंच असले अनुभव येतील असे नाही.

परदेशी मिळवलेला पैसा हा त्यादेशात आपल्याला केवळ चांगले जीवनमान देतो (उत्तम बचत नव्हे).
परंतू कालांतराने भारतात येणार असलो तरच तो पैसा भारतात उत्तम जीवनमान व उत्तम बचत देऊ शकतो.

(ब)
आता काही मुद्दे तात्या व नानांनी माडलेले:

आपला देश नक्कीच वाईट नाही. गेल्या १८ वर्षांपासुन देशाटन करून व पाश्चात्यांबरोबर कामकरून जाणवते की भारतीयांचे (अर्हता व गुणवत्ता धारक भारतीय) उत्पन्न वार्षीक १२ ते १५% वाढत आहे.
त्याउलट पाश्चात्यांचे उत्पन्न केवळ १ ते ३% वाढत आहे.

१८ वर्षांपूर्वी जर्मनीहून भारतात येणारे फिटर, इलेक्ट्रिशियन सुद्धा पंचतारांकीत हॉटेलात रहात,
आता ते ३ व ४ तारा हॉटेलात राहू लागले. काही देशांत तर भत्ते बरेच कमी झाले, ही लोक आता साधे पण स्वच्छ हॉटेल मिळाले तरी स्विकारतात.
माझ्या अंदाजा प्रमाणे येत्या १० ते १५ वर्षांत अर्हताप्राप्त भारतीय, भारतातच पाश्चात्यदेशांच्या तोडीचे उत्पन्न मिळवू लागतील.

परदेशात जाऊन आल्यानंतर उठसुठ भारतीयांना व भारतीय व्यवस्थेला दुषणे देणारेही काही लोक आहेत.
असे लोक विसरतात की आपण बाहेरचे जग पाहीले नसते तर आपणही सामान्य भारतीयांप्रमाणेच जगलो - वागलो असतो.

(क)
असो, आपण रामदादांनी विचारलेल्य प्रश्ना पासून बरेच दूर जात आहोत.

(ड)
भास्करभाऊंनी मांडलेला तेलगू बांधवांबद्दलचा मुद्दा पटला.
जेव्हा जेव्हा अमेरीकेत नोकर्‍यांना घरघर लागते, तेव्हा, तेलगू समाज आपल्या प्रांतीयांना शक्य तितका जास्तकाळ आधार देतो.

भय्ये, तेलगू, तमीळ इ. प्रांतीयांचे आपल्या समाजा बद्दलचे प्रेम, त्यांचे समूहशास्त्र स्पृहणीय आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 1:28 am | विसोबा खेचर

व आपण भारतीय गुणवत्ता असुन सुद्धा, पाश्चात्यांच्या मागे का आहोत याची जाणीव होते.

असहमत..! ऐहिक सुखं हा निकष घेतला तर ठीक, एरवी भारत सगळ्यांच्या पुढे आहे आणि राहील..! अणि सुख हे शेवटी मानण्यावर असतं!

तरी अजुनही अनेक देशांत भारतीयांबद्दल घृणा, द्वेश, कुतुहल इ. भावना आहेत.

भारताबद्दल घृंणा बाळगणार्‍या परिकायांना आम्ही फाट्यावर मारतो! एवढीच जर घृणा असेल तर नका ना येऊ इथे, इथल्या बाजारपेठेचर डोळा ठेवून धंदा/व्यवसाय करून पोटाची आग विझवायला! त्यांच्या भारताविषयीच्या घृणेला, द्वेषाला आम्ही काडिचीही किंमत देत नाही, देणार नाही.. आम्ही काय आहोत, कस आहोत हे आमचं आम्हाल माहित्ये, परकियांनी ते आम्हाला सांगण्याची गरज नाही..!

माझ्या माहीतीतले एक महाशय मशिनटूल्स मध्ये जर्मन विद्यापीठातून डॉक्टरेट झाले. परंतू वयाची ५०शी उलटल्या नंतरही जर्मनांनी त्यांना सामन्य प्रशिक्षक म्हणूनच ठेवले. त्यांचा साहेब केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता प्राप्त होता.
जर्मनीत एका गावी ते अचानक भेटले तेव्हा ते एका सामान्य हॉटेलात रहात होते (जेथे स्वच्छतागृहे कॉमन होती).

अहो, बोलूनचालून जर्मनी हा परका देश! त्या डॉक्टरेट मिळवणार्‍या माणसालाच जिथे स्वाभिमान नाही, आहे ती फक्त केवळ जर्मनांची लाचारी! तिथे आपण काय बोलणार?

साला, त्या डोक्टरेट मिळवणार्‍या माणसापेक्षा आम्ही केवळ बी कॉम आहोत ते बरे आहोत! दुनियेला फाट्यावर मारत मस्त स्वत:च्या मस्तीत, जिथून कुणी 'उठ' म्हणणार नाही अशा स्वत:च्या हक्काच्या जागेत स्वाभिमानाने जगत असतो! कुणा जर्मन, अमेरिकेन गोर्‍या माकडापुढे साली लाचारी पाहिजेच कशाला? आपण म्हणता त्याप्रमाणे केवळ अप्रेंटिसशीप दर्जाची अर्हता असलेलं कुणी गोरं माकड जर आपला साहेब होणार असेल तर आपली डॉक्टरेट काय चुलीत घालायची आहे?

गेल्या १८ वर्षांपासुन देशाटन करून व पाश्चात्यांबरोबर कामकरून जाणवते की भारतीयांचे (अर्हता व गुणवत्ता धारक भारतीय) उत्पन्न वार्षीक १२ ते १५% वाढत आहे.
त्याउलट पाश्चात्यांचे उत्पन्न केवळ १ ते ३% वाढत आहे.

होच का? धत तेरीकी! :)

ही महिती बरी दिलीत..! परकियांच्या स्वच्छता/टापटीप, आदर्श शासनव्यवस्थेचं वगैरे काय झालं देव जाणे! :)

परदेशात जाऊन आल्यानंतर उठसुठ भारतीयांना व भारतीय व्यवस्थेला दुषणे देणारेही काही लोक आहेत.

आमचा मूळ मुद्दा हाच आहे..!

आपला,
(निवासी भारतीय!) तात्या.

--

या जगात सर्वात महत्वाचं आणि अभिमानाचं बिरुद जर कोणतं असेल तर ते "निवासी भारतीय" हे आहे असं आम्ही मानतो! आम्ही सगळ्या जगाच्या पुढे आहोत आणि राहू.. असेच आम्ही मानतो..! इतर कुणी परकीय ते मानोत/अथवा न मानोत, आम्ही त्यांना तो अधिकारच दिलेला नाही..!

भारतापुढे सर्व परक्या राष्ट्रांना आम्ही फाट्यावर मारतो..!

मराठी_माणूस's picture

18 Nov 2008 - 10:17 am | मराठी_माणूस

सावरकर, गांधी, बोस यांच्यासारखे महान देशभक्त सुद्धा परदेशात जाऊन आले नाहीत का?

ह्या महात्म्यांचा ह्या चर्चेशी काय संबंध ?

राम दादा's picture

15 Nov 2008 - 6:01 pm | राम दादा

तात्या मला आपला अभिमान वाटतो...पण आपण जर दुसर्‍या देशात जात असेल तर त्याला पण काहीतरी कारण असते...आपली परिस्थिती...आणि..शेवटी जगाच्या कोणत्याही ठिकाणी आपण असलो....तरि आपल्याला आपल्या देशाचा आभिमान असायला हवा..बाबासाहेब आंबेडकर सुद्धा परदेशात गेले..महात्मा गांधी लंडनला गेले...शेवटी आपण जगात कुठे जातो याला महत्व नाही...त्याचा आपल्या भारतियांना देशासाठी फायदा करुन धेता आला पाहिजे....परदेशातुन काहीतरि नक्की फायदा होईल तोही आपल्या देशासाठी..हे पहावे..सगळेच लोक कायमचे देश सोडुन जात नाहित...

आपला
राम दादा..

वेताळ's picture

15 Nov 2008 - 6:45 pm | वेताळ

त्यांनी योग्य ती माहिती द्यावी. ( माहीती एबीसीडी पासुन सांगावी )

म्हणजे बालवाडी पासुन तुम्हाला शिकवावे लागणार. :>
वेताळ

मीनल's picture

15 Nov 2008 - 8:31 pm | मीनल

माझ्या मते हा उत्तम धागा आहे.
परदेशात काम करावेसे वाटणे योग्य की अयोग्य यासाठी याआधी एक धागा सुरू केला गेला होता.

इथे परदेशात जायाचे असल्यास काय करावे याबद्दलच चर्चा/विचार/सल्ले असावेत.

परदेशात काम करण्यसाठी सुशिक्षितच असायला हवे असे नाही.अनेक अशिक्षित परदेशात काम करित आहे.तश्या प्रकारची कामे करायची त्यांची तयारी आहे,कारण ते आपली लायकी जाणून आहेत.
मिपाचे वाचक/लेखक याप्रकारातले नाहीत.त्यामुळे त्याचा विचारच नको.

शिकलेल्या लोकांनी आपल्या शिक्षणाची मागणी कुठे आहे ते आधी पहावे.तसेच अनुभवाचाही विचार करावा.
परदेशात म्हणजे नेमके कुठे हे कळल्यावर नोकरी साठी प्रयत्न करावा.
माझे असे मत आहे की मल्टी नॅशनल कंपनीतून परदेशात जाणे सोपे जाते.
आमचा असा अनुभव आहे की कुठल्याच्या कंपनीत नुसता अर्ज करून आपला बायोडेटा पाठवून नोकरी मिळत नाही.
रेकमेंडेशन आवश्यक असते.
मित्र,वरिष्ठ आधिकारी याबाबतीत मदत करू शकतात.
नातेवाईक फारच वेळा मदत करतात असे वाटते.

मीनल.

ही प्रार्थना वाचताना मला नेहेमी वाटायचं की देवा ही अरीष्ट देशांतरी पाठव असा अर्थ आहे,
आता असं कळतं की ही अरीष्ट माणसाला देशांतराला पाठवतात.
मला वाटतं की जरूर जावं बाहेर. होय. काहीवेळा कौटूंबीक सुख डिस्काउंट करावं लागेल .पण इलाज नाही. काय सांगावं साठलेल्या पैशात जन्मभराचं स्वातंत्र्य मिळेल कदाचीत.

आजानुकर्ण's picture

17 Nov 2008 - 2:01 am | आजानुकर्ण

याचबरोबर एखाद्याकडे असलेल्या तांत्रिक (किंवा इतर स्वरूपाच्या) कौशल्याला स्वदेशात न्याय न मिळणे हे एक कारण असावे.

आपला,
(कुशल) आजानुकर्ण

चतुरंग's picture

16 Nov 2008 - 9:28 am | चतुरंग

तुम्ही आत्ता करीत असलेली नोकरी त्यात असलेले फायदे तोटे (पैशासकट सगळ्याच बाबतीतले - जसे घरच्या इतर जबाबदार्‍या, जमीनजुमला शेतीवाडी असेल तर त्याकडे कोण कसे बघणार, आई-वडिलांना लगेच आधार लागतोय का? तुम्ही एकुलते एक आहात का? इ.) तपासावेत.
परदेशात नोकरीला जावे असे वाटण्यामागे नेमकी कारणे काय आहेत (फक्त पैसा सोडून) तीही तपासावीत. छान मजा करावी, ऐषाराम असतो, पार्ट्या होतात वगैरे अशा कल्पनांनी भारले जाऊन त्यामुळे जाण्याचे ठरवत असाल तर सावध व्हा! सुखी माणसाचा सदरा जगात कुठेच नाही. प्राप्त परिस्थितीत सुख-दु:ख सगळीकडेच आहे. तुम्हाला त्यातले काय चालते आहे हे ठरवा. जसे परदेशी गेल्यावर सारखे सारखे नातेवाईक-मित्र भेटणार नाहीत, एकटेपणा येईल, होमसिक व्हाल, सण-समारंभाना मुकाल इ. पैसा मिळेलही पण किती कालावधी साठी, कुठे, नोकरीची शाश्वती हे सगळे आळवावरचे पाणी आहे!
तेव्हा ह्याचा व्यवस्थित चार्ट मांडून तुलना करा. परदेशी असलेल्या, तिथून परत आलेल्या अशा मित्रांशी बोला. त्यांचे अनुभव ऐका आणि मग निर्णय घ्या. निर्णयाची जबाबदारी ही सर्वस्वी तुमचीच असूद्या म्हणजे काही चुकले तरी तुमचे मन दुसर्‍याला दोष देत नाही.
तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा!

चतुरंग

एकलव्य's picture

16 Nov 2008 - 9:43 am | एकलव्य

पैशाची जमेची बाजू अनेकांनी मांडली आहेच तसेच वाढत्या अस्थिरतेचे धोकेही सांगितले आहेत. देशातही अगदी भरगच्च पगार मिळतात आणि तेथेही नोकरीची शाश्वती नाही हे लक्षात घ्या. एकूण गोळाबेरीज पाहता परदेशी जाण्याची संधी जरूर घ्यावी असे सांगावेसे वाटते.

आजचे आणि उद्याचे जग तुमचा अनुभव किती विस्तीर्ण आहे यांवर भर देणारे आहे. दुसरे जग पाहिल्यानंतर कदाचित तुमचे अनुभवविश्व एकदम रुंदावेल आणि त्याचा दूरगामी फायदा नक्की होईल. आपली स्वतःची ताकद नेमकी कशात आहे आणि कोठे आपण सुधारणा करू शकू हे समजण्यासाठी चार भिंतीबाहेर पडण्यासारखी शाळा नाही.

असो... व्हिसा, खर्च आणि आजकालचे जॉब मार्केट पाहता भारतातील जी कंपनी तुम्हाला काही काळासाठी परदेशी पाठवू शकेल किंवा कसे याविषयी फिल्डिंग लावल्यास लवकर मासा गळाला लागेल असा उगाचच सल्ला द्यावासा वाटतो. अन्यथा मळलेली वाट म्हणजे शिक्षणासाठी परदेशी येण्यापासून सुरवात करावीत. पण हा कदाचित आतबट्याचा व्यवहार होऊ शकतो. शिक्षणासाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी परदेशात राहावे लागणे होऊ शकते. परंतु आर्थिक दिवाळखोरी असेल तरीही अनुभवाच्या शिदोरीत भर नक्की पडेल. बाकी हिशेब तुम्हालाच मांडायला हवेत.

(आयुष्यभराचा विद्यार्थी) एकलव्य

राम दादा's picture

16 Nov 2008 - 10:07 am | राम दादा

मित्रांनो खुपच छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

याचा माझ्यासकट सर्वांना फायदा होईल.

राम दादा.

वर्षा's picture

16 Nov 2008 - 11:04 am | वर्षा

परदेशी प्रोजेक्टसाठी निवड करताना (खास करुन आशियाई/युरोपियन देशांतील प्रोजेक्ट्स) ज्यांना एखादी परदेशी भाषा अवगत आहे (किमान बोलणं आणि काही प्रमाणात लिहिणं) अशा उमेदवारांना जास्त महत्त्व दिलं जातं. तेव्हा शक्य असल्यास एखादी भाषा शिकून ठेवणे फायद्याचे ठरते.
-वर्षा

भास्कर केन्डे's picture

16 Nov 2008 - 11:16 am | भास्कर केन्डे

परदेशात नोकरीसाठी बाहेर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

मी आपणाला अमेरिकेत व तेही आयटी मध्ये कसे यायचे याचे वैयक्तिक अनुभवावरुन मार्गदर्शन देऊ शकतो.

१. विद्यार्थी म्हणून जाऊन (एफ व्हिसा) व त्याच्या धरतीवर नंतर नोकरीचा परवाना (एच१ व्हिसा) मिळवून.
२. भारतात मोठ्या कंपनीत नोकरी पकडून त्या कंपनीचे परदेशात बस्तान असेल तर त्या माध्यमातून. यात ते तुम्हाला एल-१, एच-१ वा बी अशा वेगवेगळ्या व्हिसावरून पाठवू शकतील.
३. परदेशातल्या कंपन्यांमध्ये अर्ज करुन नोकरी मिळवावी व त्याच्या अधारावर व्हिसा मिळवावा... हा एच-१ व्हिसा असतो.

  • एच१ मध्ये तुम्ही अमेरिकेत नोकर्‍या बदलू शकता तसेच इथे कायम वास्तव्यासाठीही (ग्रीन कार्ड) अर्ज करु शकता.
  • एल१ हा व्हिसा साधारणतः मॅनेजर सारख्या पोझिशनसाठी असतो. यावर आल्यावर तुम्हाला येथे कंपनी बदलता येत नाही. परंतू तुमच्या कंपनीने ठरवले तर ते कायम वास्तव्याच्या अर्जासाठी परवाणगी देऊ शकतात.
  • बी व्हिसा मात्र अल्प मुदतीसाठी व व्यवसाय निमित्ताने मिळालेला असतो व तुम्हाला ३ महिन्यात परत जावे लागते.

तुमची कंपनी जर तुम्हाला काही कारणास्तव पाठवू शकत नसेल तर तुम्ही पर्याक क्र. ३ निवडू शकता. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील.

१. लवकरात लवकर काही चांगल्या, विश्वसनीय अमेरिकास्थित कन्सल्टींग कंपन्यांशी संपर्क करा. त्यांच्याशी काय व कशा वाटाघाटी करायच्या हे तुम्हाला हवे असेल तर विस्ताराने कळवील. २. व्हिसा फी, वकीलाची फी,प्रवास खर्च, इथे येऊन प्रोजेक्ट मिळेपर्यंतचा खर्च, राहण्याची व्यवस्था यावर सगळे अगोदर पक्के करुन घ्या.
३. इथे आल्यावर तुम्हाला हवी असेल तर ट्रेनिंग, मार्केटिंग, विमा (इन्श्यूरंस), वगैरे मध्ये काय व कशी मदत मिळणार याची माहिती काढून घ्या. बेंचवर असताना पगार मिळणार का, किमाण पेस्टब मिळणार का... अशा अनेक गोष्टी विचारुन घ्या.

खर्चाचा ताळेबंद साधारणतः असा आहे... अमे. डॉलर मध्ये...
व्हिसा फी + वकीलाची फी = २५०० ते ३५००
प्रवास खर्च = १३००
एकटे आलात व इतर तरुणांसोबत राहिलात तर महिना खर्च = १००० ते ३००० (ठिकाण व आपल्या राहण्याच्या पद्धतीवर आवलंबून) काही नग ५०० मध्येही महिना काढतात. आम्ही त्यांना सांष्टांग दंडवत घालतो.
विमा = २०० ते ७०० प्रति महिना... तुमच्या कंपनीवर अवलंबून आहे.

यातील किती खर्च तुम्हाला करावा लागेल व किती तुमची कंपनी उचलेल हे त्या-त्या कंपनीवर व तुमच्या वाटाघाटीवर अवलंबून आहे. बर्‍याच कंपन्या सुरुवातीला रहाण्या, खाण्या-पिन्याची सोय करतात.

तूर्तास येवढेच...

प्रश्न येऊ द्यात. माझ्या परिने उत्तरे द्यायचा प्रयत्न करीन.

आपला,
(मदतनीस) भास्कर
आम्ही येथे वसतो.

भास्कर साहेब खुप छान माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद्..तुमच्या प्रतिसादाने बरेच प्रश्न मनामध्ये पडले ..त्यातला हा एक.

समजा परदेशातील कन्सलटंट कंपन्याशी संपर्क केला तर काय प्रोसेस असते..त्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरे होइल..

शैक्षणिक... नोकरीचा अनुभव....ऑफर..काँट्रॅक्ट ..प्लेसमेंट ..याबाबत काय प्रोसेस असते ती..माहिती द्यावी...

विसोबा खेचर's picture

16 Nov 2008 - 11:40 am | विसोबा खेचर

राम दादा,

देव करो आणि परदेशात दमड्या मिळवायला जायची आपली इच्छा लौकरात लौकर पूर्ण होवो हीच प्रार्थना..!

म्हणजे नजीकच्या काळात,

"छ्या! काय साली भारतात दुर्व्यवस्था/उकाडा/अस्वच्छता/भ्रष्टाचार वगैरे वगैरे..! त्यापेक्षा अमेरिका/युरोप कितीतरी छान छान, सुंदर सुंदर आणि अगदी आदर्श राज्यकारभार असलेले देश...!"

असली गाणी गायला तुम्हीही मोकळे..! :)

च्यामारी लहानपणापासून ते जवानीपर्यंत इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं! :)

बाकी, हल्ली भारतातही टोपलीचे संडास जाऊन काही ठिकाणी कमोड आले आहेत हो! :)

आपला,
(मूळचा देवगडचा!) तात्या बर्वा. :)

भास्कर केन्डे's picture

16 Nov 2008 - 1:43 pm | भास्कर केन्डे

च्यामारी लहानपणापासून ते जवानीपर्यंत इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं!
नशिबावान आहात हो तात्या! नाहीतर आमच्या बीड जिल्ह्यात गावाकडं हिवाळ्याच्या मध्यात नद्या आटल्याकी दगाडावरच काम भागवावं लागायचं बरेचदा. ;)
च्यामारी टमरेळ भरुन आणायला दोन्-चार किमि कोण पायपिट करा ;)

आपला,
(गाववाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2008 - 4:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदादा,

केल्याने देशाटन पंडीतमैत्री सभेत संचार। मनुजा चातुर्य येतसे फार॥

असं कोणी रघुनाथ किंवा वामनपंडीतानी लिहून ठेवलेलं आहेच.

तेव्हा जरुर जाऊन या. बाहेरची स्वच्छता, लोकांना असलेली शिस्त, नेहेमी हसतमुख असणारे चेहेरे हे बघा. कामाच्या ठिकाणी लोकं दाखवतात ती व्यावसायिक वृत्ती या आणि अशा अनेक गोष्टी आपण भारतीयांनी शिकण्यासारख्या आहेत. चांगल्या गोष्टी कोणाहीकडून शिकता येतात आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करता येतं. अनेक गोष्टींच्या बाबतीत 'जगात असंही असू शकतं' हे जागा बदलल्याशिवाय कळतच नाही, तेव्हा तेही बघून घ्या. घरापासून खूप लांब राहूनही बरंच शिक्षण होतं ते मिळवा.
अर्थात फुकटात काहीच मिळत नाही. परदेशात रहाण्याचे तोटे बर्‍याच लोकांनी वर सांगितलेले आहेतच; तेव्हा मी ते पुन्हा सांगण्याची गरज नाही.
तेव्हा शुभेच्छा!

(परदेशात राहून आनंदानी घरी परत आलेली) अदिती

भाग्यश्री's picture

17 Nov 2008 - 1:40 am | भाग्यश्री

सहमत..
संधी मिळत असेल तर जरूर जाउन यावे..

http://bhagyashreee.blogspot.com/

आजानुकर्ण's picture

17 Nov 2008 - 1:53 am | आजानुकर्ण


च्यामारी लहानपणापासून इथे टोपलीच्या संडासात बसायचं आणि तिथे गेल्यावर जळ्ळ्या तिथल्या कमोडाचं पण कवतिक करायचं!


"छ्या! काय साली भारतात दुर्व्यवस्था/उकाडा/अस्वच्छता/भ्रष्टाचार वगैरे वगैरे..! त्यापेक्षा अमेरिका/युरोप कितीतरी छान छान, सुंदर सुंदर आणि अगदी आदर्श राज्यकारभार असलेले देश...!"

तात्यांशी सहमत आहे.

दुर्दैवाने बहुसंख्य परदेशस्थ विनाकारण (कॅज्युअली किंवा अदरवाईज) भारतीय व्यवस्थेला नांवे ठेवत असतात असे निरीक्षण आहे. अगदी अलीकडे निवडणुका झाल्यावर कॉफी पिताना करायच्या फालतू चर्चांमध्येही भारतातील निवडणूक व्यवस्था कशी गंडलेली आहे वगैरे सांगायला आपले परदेशीय बांधव पुढे पुढे करत होते हे आठवते. मी राहतो इथे कृष्णवर्णीय समाज संख्येने जास्त आहे. त्यांना (विनाकारण) कल्लू म्हणून हिणवणे, त्यांना संस्कृतीच कशी नाही आणि ते कसे जनावरासारखे राहतात हे सांगणे. (त्यांना कल्लू हा शब्द कळतो असे उडत उडत कळाल्यावर घनश्याम किंवा कोयला असे शब्द शोधून काढणे, त्या निमित्ताने भारतातील आरक्षण व इतर गोष्टींवर मते ठोकणे. तेच मक्कूंच्या बाबतीत करणे. ओबामा निवडून आल्यावर काळे लोक कसे वरचढ होतील हे ठासून सांगणे ... वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत.) भारतातील शिक्षणव्यवस्था, एकंदर समाजरचना याचा काडीचाही विचार न करता मत ठोकून द्यायला आपल्याच लोकांना काहीही वाटत नाही हे पाहून दुःख होते.

सुदैवाने मराठी संकेतस्थळांवरील परदेशस्थ बांधवांच्या ऑनलाईन जाणीवा प्रगल्भ वाटताहेत (उदा. अमेरिकन सणांमध्ये सहभागी होणे, स्वतःचा 'वेगळेपणा' अधोरेखित न करणे वगैरे वगैरे ... ही समाधानाची बाब आहे.

आपला
(प्रगल्भ) आजानुकर्ण

लिखाळ's picture

17 Nov 2008 - 4:44 pm | लिखाळ

>भारतातील शिक्षणव्यवस्था, एकंदर समाजरचना याचा काडीचाही विचार न करता मत ठोकून द्यायला आपल्याच लोकांना काहीही वाटत नाही हे पाहून दुःख होते. <
स्वाभिमानशून्य आणि फारसा विचार न करता मते ठोकऊन देणार्‍या लोकांमुळे अभारतीय लोकांच्या मनात भारताबद्दल भलतीच मते तयार होतात याचा या महाभागांना पत्ताच नसतो. भारताबाहेर माणसाला पाठवताना त्याला भारताच्या काही किमान चांगल्या गोष्टींची माहिती असावी याची भारतीय वकिलातीने काळजी घ्यावी :) असे वाटु लागले आहे. तसेच वागणुकीचे सुद्धा काही धडे द्यावेत.

अनेकदा वाटते की आपल्या शहराच्याच बाहेर न पडलेल्यांना अनुभव समृद्ध होण्यासाठी आणि 'जगाची' माहिती मिळवण्यासाठी परदेश प्रवास ही मोठी उडी आहे.. त्यांनी आधी भारतात प्रवास करावा ! (नाहितर पैशासाठी बाहेर जात आहे असे स्पष्ट सांगावे आणी बाहेर जाऊन 'चड्डीत राहावे' :)

> सुदैवाने मराठी संकेतस्थळांवरील परदेशस्थ बांधवांच्या ऑनलाईन जाणीवा प्रगल्भ वाटताहेत <
या वाक्यातील शब्दरचनेला दाद !
-- लिखाळ.

आजानुकर्ण's picture

17 Nov 2008 - 6:42 pm | आजानुकर्ण

स्वाभिमानशून्य आणि फारसा विचार न करता मते ठोकऊन देणार्‍या लोकांमुळे अभारतीय लोकांच्या मनात भारताबद्दल भलतीच मते तयार होतात याचा या महाभागांना पत्ताच नसतो.

अगदी. मात्र किमान पदवीधर असलेल्या लोकांनीही थोडे तारतम्य बाळगावे असे वाटते. (त्यासाठी भारतीय वकिलात वगैरे कशाला)


या वाक्यातील शब्दरचनेला दाद !

आमचे प्रतिसाद उपसंपादित होऊ नयेत यासाठी आता आम्हीच काळजी घेतो.

आपला,
(मॉडरेटेड) आजानुकर्ण

प्राजु's picture

17 Nov 2008 - 3:17 am | प्राजु

संधी मिळाली आणि मानसिक तयारी असेल फायदे तोटे सहन करायची तर जरूर ती संधी घ्या. चौकटीतून बाहेर पडल्याशिवाय खर्‍या जगाची ओळख नाही होत. चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी सगळीकडेच कमी आधिक फरकाने असतात आणि असणार. त्यातल्या आपल्याला कोणत्या घ्यायच्या आहेत ते निश्चित असलं म्हणजे भरकटण्याची भितीच नाही. शुभेच्छा!
असं म्हणतात कि डोंगराची उंची समजण्यासाठी त्याच्या पायथ्याशी न राहता त्याच्यापासून लांब जावे म्हणजे उंची समजते. आपल्या देशापासून लांब आलो की समजतं , आपला देश म्हणजे सोनं आहे. आपली संस्कृती, आपले सण्-वार, नातेवाईक,जेवण खाण.. यांच्यापासून लांब गेल्यावरच त्यांच्या सोबत असण्याची किंमत समजते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मृदुला's picture

17 Nov 2008 - 4:07 am | मृदुला

यूके किंवा इंग्लंड/ स्कॉटलंड भागात थेट नोकरी मिळवण्यासाठी:
१. आपल्याजोग्या किती नोकर्‍या आहेत हे तपासावे.
मॉन्स्टरचे युकेचे संकेतस्थळ
टोटलजॉब्जचे संकेतस्थळ
२. इथे जर आपल्याला जमतील, आवडतील अश्या पन्नासेक नोकर्‍या दिसल्या तरच पुढे प्रयत्न करावा.
३. आपल्याला स्वतःचा व्हिसा काढता येईल का बघावे.
एचएसएमपी गुणांकन
जर पुरेसे गुण असतील आणि आपल्याला साजेश्या पन्नासेक नोकर्‍या वरच्या संकेतस्थळांवर असतील तर मग आपल्या सध्याच्या नोकरीत दोन महिन्यांची रजा मिळते का ते पहावे.
४. सगळे जमत असेल तर बँकेच्या एका खात्यात तीन लाख रुपये जमवावेत.
५. रजा घ्यायच्या तीन-चार महिने आधी, वरील नोकर्‍यांच्या संकेतस्थळांवर आपली माहिती भरून व्यक्तिरेखा तयार करावी. त्यात एचेसएम्पी गुणांकनातले गुणही लिहावेत. जर इमेलात काही विचारणा आल्या तर 'टेलिफोनिक इंटरव्यू' जमेल का ते चाचपावे.
६. बँकेत तीनलाख रु. सलग तीन महिने असतील तर एचेसएम्पीचा अर्ज करावा.
व्हीएफएसचे संकेतस्थळ
यासाठी साधारण ५५००० रू खर्च येतो. विसा मिळण्यास चार ते सहा आठवडे लागतात.
७. विसा मिळाल्यावर युकेला येता येते. तोवर काही मुलाखतींची आमंत्रणे जमवून ठेवावीत.
८. दोन महिने युकेमध्ये राहून नोकरी मिळवण्याची खटपट करावी.

या मार्गाने माझ्या दोन परिचितांना या वर्षी नोकरी मिळाली आहे. आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.

मैत्र's picture

17 Nov 2008 - 2:29 pm | मैत्र

राम दादा, परदेशात नोकरी करण्यात काहीही गैर नाही. असंख्य गोष्टी शिकायला मिळतील. एक वेगळा अनुभव आणि भारतापेक्षा जास्त सेव्हींग असे अनेक फायदे आहेत. दोन गोष्टी ज्या याच्या विरुद्ध आहेत :
१. अतिशय चांगल्या आणि ८ ते ५ प्रामाणिकपणे काम करण्याच्या वातावरणातून भारतातल्या राजकारण आणि हुजरेगिरिने लडबडलेल्या रोज रात्री ८ -१० पर्यंत काम अशा परिस्थितीत परत यायला बराच त्रास होतो.
२. सध्या अमेरिकेत आणि यु के मध्ये बरीच मंदी आहे. नवीन नोकर्‍या बर्‍याच कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी असलेल्या नोकर्‍या कमी झाल्या आहेत. नानांनी (चेंगट) सांगितल्या प्रमाणे हा अजूनही तळ नाही. अजून स्थिती बिघडेल.
गेल्या वर्षी यु के मध्ये जितक्या नोकर्‍या होत्या त्यापेक्षा आत्ताच वेबसाइट वर कमी दिसत आहेत. भारतापेक्षा नोकरी मिळण्यास वेळ लागतो. त्याच क्षेत्रात व टेक्नॉलॉजित अनुभव यावर त्यांचा भर असतो. आपल्याप्रमाणे शिकून काम करेल हि मानसिकता नाही.
यु के साठी ही सरकारी साइटःhttp://www.bia.homeoffice.gov.uk/workingintheuk/
तुम्हाला शुभेच्छा!!

लिखाळ's picture

17 Nov 2008 - 4:55 pm | लिखाळ

रामदादा,
बाहेर नोकरी शोधा, जग पाहा, बाहेरचे लोक आपल्या पेक्षा वेगळे आहेत की नाहित ते पाहा, आपल्याला शुभेच्छा !
बाहेर गेले की लगेच अनिवासी भारतीय होत नसतो. बाहेर गेले की लगेच भारतातले वाईट आठवून उलटीची भावना होत नसते आणि चांगले आठवून 'उमाळे' येत नसतात. चार महिने अमेरिकेच्या भेटीवर जाऊन येऊन पिवळे झालेले लोक जसे दिसतात तसे तीस-पस्तीस वर्ष इथे राहूनही सहजतेने भारतीय असलेले लोकही दिसतात.

जग गतिमान झाले आहे. 'बाहेर' हे फार 'लांब' राहिलेले नाही.
-- लिखाळ.

ललिता's picture

17 Nov 2008 - 6:39 pm | ललिता

स्थलांतर होतच असतं, सतत होतच राहिलंय... उदा. कोकणातल्या खेड्यातून लोकं मुंबईला आली, जग गतिमान आहे, आता परदेशात जाताहेत. म्हणून कुणी आपली संस्कृती/भाषा सोडली नाहीये. कोकणातले लोक मुंबईत राहतात मग काय कोकणी खाणं-पिणं, सणवार विसरलेत का? पंजाबी, गुजराती जगात जिथे जातील तेथे भारतीय पध्दतीनेच राहतात.

जमलं तर एकदा तरी परदेशी जाऊन यावं, अनुभव घेण्याच्या दॄष्टीने! जे भारतात गृहित धरून चालतो, त्याची किंमत समजते. उदा. कुटुंब व त्यांचा भावनिक आधार, घरातल्या कामात -पैसे मोजून का होईना- मिळणारी मदत.
परदेशात काम करताना, त्या त्या देशातल्या काम करायच्या पध्दती, वेळेचं नियोजन, प्रॉजेक्टस मॅनेजमेंटमधली कुशलता, ऑफिसातली टापटीप अशा बारीकसारीक गोष्टी शिकता येतात. या गोष्टी भारतात नसतात अशातला भाग नाही, पण अमेरिकेतल्यापेक्षा युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात वेगळा अनुभव येईल. त्यातलं चांगलं व आपल्याला पटेल ते उचललं तर फायदा होईलच की नाही?

जग गतिमान आहे, आणखी गतिमान होत राहील... या गतीमध्ये आपण सगळे खेचले जाणार आहोत - मग इच्छा असो वा नसो!

राम दादा's picture

18 Nov 2008 - 1:44 am | राम दादा

मित्रांनो..तुमच्या वरिल प्रतिसादावरुन जवळ जवळ सर्व शंका दुर होत आहेत्...यावरुन परदेशात जाण्याची ईच्छा पुर्णपणे निश्चित झाली आहे. हा त्याला काही थोडी वर्षे लागतील हे खरे...

खुप खुप आभारी आहे...
राम दादा.