ह्याव ए नाईस डे

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
26 Sep 2008 - 12:10 am

"मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं"
असं विरेन मला ज्यावेळेला मी त्याच्या घरी तो एकाएकी आजारी झाल्याचे कळल्यावर भेटायला गेलो तेंव्हा सांगत होता.
विरेन माझ्या मित्राचा मोठा मुलगा.त्याचे वडिल -माझा मित्र-तो संगीततज्ञ माणूस.
तो मराठी सिनेमात खूपदा पार्श्वसंगीत द्दायचा.त्याचा वाद्दवृंद पण होता. निरनिराळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरात निमंत्रण मिळाल्यावर हा वाद्दवृंद घेवून जायचा.
अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांने हा सर्व कामाचा भार विरेन वर- आपल्या मुलांवर- टाकला होता.

नेहमीच गावोगाव फिरून, नाही म्हटलं तरी खाण्यापिण्याची आणि विश्रांती आणि झोपेची नकळत आबाळ होत असतेच.
विरेनला असंच कुठेतरी इंनफेक्शन झाल्याने त्याला अचानक हॉस्पिटलात जावं लागलं. आठदहा दिवसांनी त्याच्या आजाराला उतार मिळाल्याने डॉक्टरनी त्याला घरी पाठवलं होतं.आणखी थोडी विश्रांती पण घेण्याची सुचना केली होती.

विरेन मला म्हणाला,
" आठ दिवसापुर्वी मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.मला छातीत खूप कळा येवून भयंकर श्वास लागला होता.स्कॅन केल्यावर माझ्या फुफ्फुसात ब्लडक्लॉट आला होता असं समजलं.
मी वाचलो हे पाहून सर्वजण मला तक्दीरवान म्हणत होते.रोगाचं इंग्लीश नांव मला माहित असलं नसलं तरी,ते दुखणं,ती भिती आणि त्यातून आलेले ते डिप्रेशन ह्याची मला मुळीच कल्पना नव्हती."
मी त्याला म्हटलं,
"सतत कामात व्यग्र असलेल्या तुला एव्हडे दिवस काढायला मोठं संकटच वाटलं असणार."
त्यावर म्हणतो कसा,
"सांगतो काय! रोजच्या डॉक्टरच्या व्हिझीट्स,नर्सीसचे तासा तासाने औषध आणि इतर उपाय,ते हॉस्पिटलातलं वरचेवर येणारं खाणं,याने वेळ जात होता.पण आता घरी आल्यावर ही नकळत मला मिळणारी विश्रांतीची भेट अगदी जीवावर आली आहे.एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर लक्ष केंद्रीत होत नाही.रेडिओ चालू करून नकोसा होवून परत बंद करावासा वाटतो.
साठलेल्या कामाचे काळे ढग माझ्या डोक्यावर जमा होतात,पण एखादी औषधाची गोळी घेवून,किंवा एखादा व्हिडीयो पाहून काळजी दूर जात नाहीत.
हा अनपेक्षित मिळालेला विरंगुळा नकोसा होतो,जणू तो श्राप कसा वाटतो.बरेच दिवस न भेटलेल्या एखाद्दा मित्राचा फोन आला तर जरा वेळ जातो."

मग मी त्याला विचारलं,
"मग तू तुझा वेळ कसा घालवतोस?"
त्यावर त्याने मला एक गम्मतीदार किस्सा सांगितला.तो म्हणाला,
" एखाद्दा अनोळख्याचं गोड स्मित पुन्हां आयुष्याची दोरी पकडून धरायला उद्दुक्त करतं.माझीच एक विद्दार्थीनी मला त्यादिवशी भेटायला आली.आणि नंतर जाताना मला "ह्याव ए नाईस डे" म्हणाली.तिच्या नजरेत मला सच्चाई दिसली.ती निघून गेल्यावर
माझ्या मनात आलं,की आजचा माझा हा दिवस,नव्हे तर उद्दाचा दिवस, कदाचित येणारे पुढचे दिवस मी सदिच्छेने संभाळले पाहिजेत.
माझ्या डॉक्टरकडे विचारणा करून सुद्धा तो माझा जीवघेणा दिवस माझ्या आयुष्यात का आला ह्याचं समर्पक उत्तर नसणार.आणि त्या माझ्या विद्दार्थीनीने मला हा दिवस चागला जाण्याची दिलेली सदिच्छा ही मला करून दिलेली एक भरवंशाची आठवण असावी."

हे विरेनचे उद्गार ऐकून मी त्याला विचारलं.
" मग आज मी तुला भेटायला आलेला दिवस तुला कसा वाटला?"
मला म्हणाला,
"काका,त्यानंतर मी एव्हड्या झपाट्याने बरा होत आहे,की रोज मी माझ्या आई बाबाना नतमस्तक होवून अस्थाला जाणाऱ्या सूर्याचे दर्शन घेवून विश्रांतीसाठी सध्यातरी लवकर झोपायला जातो.
मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख