नाडी भविष्य - एक चिकित्सा

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
20 Sep 2008 - 12:46 pm
गाभा: 

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकातील काही भाग अवलोकनासाठी ठेवत आहे. चर्चा जरुर व्हावी. वस्तुत: हा विषय किती प्राधान्य क्रमावर असावा ? यात आपण आपला वेळ पैसा श्रम किती खर्च करावा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.नाडी केंद्र जेव्हा पुण्यात फोफावली तेव्हा आम्ही नाडी केंद्राचा अनुभव स्वतः घेतला आहे.
नाडी-ज्योतिष आणि फलज्योतिष

नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही. आम्ही नाडी ज्योतिषाकडे या बाबत विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही. प्रत्यक्षात असे दिसते की ताडपट्टीवर कोरुन ठेवलेल्या भाकितांचा संग्रह म्हणजेच नाडी ज्योतिष!
तुमची जन्म-तारीख, वेळ व ठिकाण इतक्या गोष्टी घेऊन पारंपारिक ज्योतिषी कुंडली बनवतो आणि तिच्यावरून फलज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमचे भविष्य सांगतो. नाडी-ज्योतिषी सुद्धा अगदी हेच करीत असतो, पण आव मात्र असा आणतो की तुमचे भविष्य पाच हजार वर्षापूर्वी कुणा एका त्रिकालज्ञानी महर्षींनी नाडी-पट्टीवर कोरून ठेवलेले आहे आणि तो ते फक्त वाचून दाखवत आहे. तो प्रथम तुमची नाडी-पट्टी शोधण्याचे नाटक करतो आणि नंतर पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो. ही या नाडी-ज्योतिषाची खासीयत व वेगळेपण आहे. दुसरा फरक असा आहे की जन्मकुंडलीवरून तुमचे नाव, तुमच्या आईबापांची नावे, तुमच्या मुलांची संख्या, त्यांची नावे, असली माहिती पारंपारिक ज्योतिष्याला सांगता येत नाही पण नाडी-ज्योतिषी मात्र असा दावा करतो की अशा प्रकारची माहिती नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेली असते, इतकेच नव्हे तर तुमच्या जन्मकुंडलीचा तपशील सुद्धा तुमच्या पट्टीत लिहिलेला असतो असेही तो सांगतो. नाडीज्योतिषाचे हे दावे कसे खोटे आहेत ते आम्ही पुढील विवेचनात दाखवणार आहोत.
कूट लिपीचा अडथळा.
नाडी-ज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, तामीळ भाषेच्या प्राचीन गुप्त किंवा कूट लिपीत पट्ट्या लिहिलेल्या असतात असे नाडीवाले लोक म्हणतात. मराठी माणसाच्या दृष्टीने हे म्हणजे आवाळूवर गळू व्हावे तसे आहे. तो मजकूर खुद्द तामिळी लोकांना सुद्धा जिथे वाचता येत नाही तिथे मराठी लोकांना तो काय कळणार! त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते. नाडी-पट्टीवरील मजकूर नाडी-ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे. नाडी-पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे, किंवा तुमची जन्मरास आणि लग्न-रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची ? जर काही मार्गाने तुम्हाला तशी खात्री करून घेता आली तर मग तुम्ही नाडी-भविष्यावर खुशाल विश्वास ठेवा असे आम्ही म्हणतो.
पट्टी शोधण्याचे नाटक.
तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करतांना नाडीज्योतिषी तुम्हाला अनेक सूचक प्रश्न विचारत जातो व भराभर पट्ट्या उलटत जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला दोन मुले आहेत ना ? पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा आहे ना ? तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल ? पण हे लक्षात घ्या की हे प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा तुमची पट्टी अजून त्याला सापडायचीच असते. तो हे जे सूचक प्रश्न विचारत असतो ते केवळ त्याच्या व्यवहार-चातुर्यामुळे विचारत असतो,--तुमची पट्टी वाचून विचारत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पट्टीत हे तपशील खरोखरीच आहेत की नाहीत ते तुम्हाला कधीच समजणार नाही.
नाडीकेंद्रात तुमच्या अंगठयाचा ठसा घेतल्यावर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण इतक्या गोष्टी नाडीज्योतिषी तुम्हाला सुरुवातीलाच विचारून घेतो. संबंधित वर्षाचे पंचांग त्याच्या हाताशी असतेच. जन्मतारखेवरून तुमची रास व नक्षत्र आणि जन्मवेळेवरून तुमची लग्नरास त्याला लगेच कळते. आता असे पहा की, या इतक्या सर्व गोष्टी जर तुमच्या नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेल्या असतील तर अमुक एक पट्टी तुमचीच आहे किंवा नाही हे सांगणे त्याला अगदीच सोपे नाही का ? तुमची पट्टी ओळखण्यासाठी आणखी खाणाखुणांची खरे तर त्याला काहीही आवश्यकता नाही. अगदी एकसारखी संपूर्ण नावे असलेली अनेक माणसे असू शकतात हे जरी खरे असले तरी जन्मतारीख-वेळ-ठिकाण एकच असलेली व नावेही सारखीच असलेली माणसे सापडणे अशक्यप्राय आहे. शिवाय, अंगठयाच्या ठशाचे शास्त्रीय वर्णन पट्टीत लिहिलेले असते असेही नाडीवाले लोक सांगतात, म्हणजे तीही आणखी एक व्यवच्छेदक खूण त्याला उपलब्ध असते. सांगायचा मुद्दा हा की एवंगुणविशिष्ट अशा त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती अस्तित्वात असणे अशक्य आहे, म्हणून तिची पट्टीही एकमेवाद्वितीय असणार. पण, गंमत अशी की, इतक्या सगळया खाणाखुणा हाताशी असूनही तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करीत असलेला नाडी-ज्योतिषी पट्टी शोधण्याच्या मिषाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो व त्यातून तुमच्या तोंडूनच तुमच्याबद्दलची पुष्कळशी माहिती काढून घेतो. किंबहुना तोच त्याचा खरा उद्देश असतो. पुरेशी माहिती हातात आली की तुमची पट्टी सापडली असे तो म्हणतो, नाहीतर पट्टी सापडत नाही असे म्हणतो. वास्तविक, त्याच्या दृष्टीने कुठलीही पट्टी तुमची पट्टी ठरू शकते. म्हणून तर अगदी मोजक्या पट्ट्यांच्या भांडवलावर हा धंदा वर्षानुवर्षे चालू शकतो. या धंद्यातली खरी मख्खी हीच आहे.
नावे शोधण्याची युक्ती.
तुमच्या आईचे नाव काय? असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे, त्याचे आद्याक्षर य र ल व यापैकी आहे का, ते नाव देवीचे आहे का, असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो. भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत! जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते ? सरळ नावे वाचली नसती का ? तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो. हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे. ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो ! पट्टीत नावे असणे अशक्य का आहे ते पुढील चर्चेवरून कळेल :-
व्यक्ती-गणिक तयार भाकित-पट्ट्या -- एक थोतांड.
व्यक्तीचे पूर्ण नाव व तिच्या जन्मकुंडलीची माहिती जिच्यावर लिहिलेली आहे अशी एखादी नाडीपट्टी जर खरोखरीच अस्तित्वात असेल तर ती पट्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच निरुपयोगी होईल कारण तिचा पुन: उपयोग कुणालाही होणार नसतो. आमच्या विवेचनातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे, का ते सांगतो. नाडीज्योतिषाचा उगम किमान ५००० वर्षांपूर्वी झाला असे नाडीवाले लोक सांगतात म्हणून गेल्या पाच हजार वर्षात निकामी झालेल्या पट्ट्यांची संख्या किती होते याचा जरा अंदाज करून पाहू. सन १९०१ या वर्षात अगस्त्य नाडीच्या सर्व ठिकाणच्या शाखात मिळून दररोज सुमारे ५० लोक आपापल्या पट्ट्यांचे वाचन करून घेऊन गेले असे समजू. म्हणजे त्या एका वर्षात सुमारे १८००० लोक त्यांच्या पट्ट्या पाहून गेले. आज त्यांच्यापैकी कुणीही माणूस हयात नसेल. म्हणजे इतक्या पट्ट्या आता निकामी झाल्या आहेत. हाच हिशोब सन १९०० च्या आधीच्या प्रत्येक वर्षाला लावला तर ५००० वर्षांच्या काळात पाच हजार गुणिले १८००० म्हणजे ९ कोटी पट्टया आजवर निकामी झाल्या आहेत. आणि शिवाय, आजपासून पुढे जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत त्यांचा हिशोब वेगळाच केला पाहिजे! म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी ९ कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे. आता यापुढची गंमत पहा. प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी-पट्ट्या असतात व एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेेवलेले असते, याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी-पट्ट्या असतात, अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती-पत्रकावरून दिसते. ते खरे असेल तर, ९ कोटी गुणिले १६ म्हणजे १ अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या, आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात! म्हणजे, त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती ? दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम! स्वत: महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते व त्यांचे पन्नास-एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे. धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण, ज्यांनी वेदाध्ययन व यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली! याचा इत्यर्थ इतकाच की व्यक्तीचा नामनिर्देश व जन्मकुंडलीचा निर्देश केलेल्या भाकित-पट्ट्या हे एक थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवणारे एकतर भोळसट आहेत किंवा चलाख आहेत.
विंग कमांडर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. ( आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात, ओकांना असल्या शंका येतच नाहीत. येणार कशा ? अंधश्रद्धा एकदा मानगुटीस बसली की शहाणासुर्ता माणूससुद्धा कसा मॅड होतो त्याचे हे उदाहरण पहा: बोध अंधश्रद्धेचा पृष्ठ १२१ वर ते म्हणतात या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदर्शन होत राहील यात शंका नाही.
( म्हणजे मग मजकुराबरोबर नावेही बदलत असली पाहिजेत? ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो: पट्ट्या मोजक्याच असतात, त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या जातात, तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही. हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे! आता आणखी काय पाहिजे ?

नाडी-पट्टीत जन्मकुंडलीचा निर्देश असणे अशक्य.
जन्मकुंडलीचा निर्देश का अशक्य आहे ते आम्ही आकडेवारीच्या मदतीने वर दाखवले. आमच्या या म्हणण्याची शहानिशा अप्रत्यक्ष मार्गानेही करता येते. तो मार्ग असा : तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण या बाबी नाडी-ज्योतिष्याला तुमच्या तोंडून काढून घेता येत नाहीत. जर तुम्ही म्हणालात की बाकी सगळी माहिती मी देतो पण जन्मवेळ सांगत नाही, तर तो उघडपणे म्हणू शकत नाही की जन्मवेळ दिली नाहीत तर तुमची पट्टी सापडणार नाही. कारण, त्याचा दावा असा असतो की अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने किंवा कुंडलीच्या मदतीने तो तुमची नाडीपट्टी शोधणार आहे. जन्मवेळ नाही म्हटल्यावर नाडीवाल्याची गाडी अडते, कारण जन्मवेळेशिवाय त्याला तुमची कुंडली बनवता येत नाही, आणि कुंडलीशिवाय भाकिते सांगता येत नाहीत. म्हणून अशा वेळी तो थोडेफार प्रश्न विचारल्याचे नाटक करून सन्माननीय माघार घेतो - म्हणजेच पट्टी सापडत नाही असे सांगतो. इथे काय घडते ते पहा. तुमच्या अंगठ्याचा ठसा तुम्ही दिलेला असतोच, आणि शिवाय तुमचे नाव, वडलांचे नाव व जन्मतारीख हेही सांगितलेले असते, फक्त जन्मवेळ लपवलेली असते. तुम्हाला अनेक प्रश्न विचारून तुमच्याकडून तुमचे वैयक्तिक तपशील त्याने मिळवलेले असतात. तेवढ्या माहितीवरून त्याला खरे तर पट्टी सापडायला हवी. पण ती सापडत नाही असे तो म्हणतो त्याचे खरे कारण हेच की जन्मवेळ माहीत नसल्यामुळे त्याला कुंडली बनवता येत नाही व भाकीत वर्तवता येत नाही. पट्टी सापडत नाही असे सांगण्यात त्याचा दुसराही एक हेतु असतो तो असा की तुमच्या पट्टीतला कुंडलीचा तपशील सांगण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही, व त्यामुळे पट्टीत कुंडलीचा काहीही तपशील नसतो हे त्याचे बिंग फुटणार नाही. परंतु ही युक्ती जर तो अशा प्रत्येक प्रसंगी वापरील तर अप्रत्यक्षपणे हेच सिद्ध होईल की पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो. आम्ही अनेकदा हा प्रयोग केला आहे व अनुभव घेतला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनीही हा प्रयोग करून पहावा. वस्तुस्थिती अशी आहे की, नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो. ज्यांना नावाबाबत प्रयोग करायचा असेल त्यांनी जन्मवेळ सुद्धा सांगावी. तुमच्याा आईचे नांव पट्टीत लिहिलेले आहे असा दावा नाडी ज्योतिषी करतो. म्हणून जेव्हा तो तुमच्या आईचे नांव किती अक्षरी आहे, वगैरे प्रश्न विचारु लागेल तेव्हा त्याला सांगावे की, मी या प्रश्नांची उत्तरे देणार नाही. ते नांव पट्टीत असेल तर त्याने ते वाचून दाखवावे.
पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो असे आम्ही म्हणण्याचे दुसरे कारण असे आहे की, नाडीपट्टीतली भाकिते महर्षींनी अंतर्ज्ञानाने लिहिली असे जर नाडीवाले म्हणतात तर भाकिते वर्तवण्यासाठी जन्मकुंडल्यांची महर्षींना काहीच गरज नव्हती हे ओघानेच आले. म्हणजे, नाडीपट्टीत कुंडल्यांची माहिती असण्याचे काहीच सबळ कारण दिसत नाही.
तिसरे कारण असे की, नाडीवाल्यांची भाकिते कुंडलीतल्या १२ स्थानानुसार वर्तवलेली असतात असे त्यांच्या माहिती-पत्रकातच म्हटलेले आहे. अशा पद्धतीचे फलज्योतिष महर्षींच्या काळात म्हणजे ५००० वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हते, मेषादि १२ राशीही तेव्हा प्रचारात नव्हत्या हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या कुंडलीचा तपशील पट्टीत असणे शक्य नाही. या तीन कारणांमुळे पट्टीत कुंडलीचा तपशील असतो हा नाडी-ज्योतिष्यांचा दावा खोटा ठरतो.
इथे एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे: तुम्ही जन्मतारीख बिनचूक सांगून जन्मवेळ अंदाजे सांगितलीत तरी ढोबळ मानाची कुंडली नाडी-ज्योतिषी बनवील व तिच्यावर वेळ भागवून नेईल. जन्मठिकाण ही बाब ढोबळ कुंडलीत कमी महत्वाची असते.
मग लोक खोटे बोलतात काय?
नाडीकेन्द्रात आपल्याला काय काय अनुभव आले याचे रसभरीत वर्णन करताना लोक नकळत खोटे बोलतात व अतिशयोक्ती करतात असे अनुभव आम्हाला आले आहेत. ''आम्ही नुसता अंगठा दिला, बाकी काही माहिती दिली नाही. तरी सुद्धा ही माहिती पट्टीत आली!`` असे कौतुकाने सांगतात. परंतु नाडीवाल्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना या बाबतची पुष्कळशी माहिती त्यांनी दिलेली असते हे त्यांना आठवतही नाही. परंतु त्यांच्या सोबत गेलेल्या माणसांना आम्ही खोदून प्रश्न विचारले असता आम्हाला असे आढळून आले की तशी माहिती नाडीवाल्याने आडवळणाने प्रश्न विचारून त्यांच्याकडून काढून घेतलेली होती.
धूळफेक करणारा प्रचार.
नाडीज्योतिष हा एक चमत्कार आहे असा प्रचार काही लोक करीत असतात. लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा हे नगदी पीक आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. ते पीक जोपासणे व वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. अशा प्रचारावर सूज्ञ वाचकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

सारांश :- नाडी-पट्टीत व्यक्तींची नावे व जन्मकुंडलीचा तपशील असणे शक्य नाही हे आम्ही दाखवले. नाडी-ज्योतिषी स्वत:च भाकिते वर्तवतात व ती महर्षींच्या नावावर खपवतात हेही आम्ही दाखवले. अर्थात्, या सर्व गोष्टी अप्रत्यक्ष रितीने परिस्थितीजन्य पुराव्यावरून व तर्काचा उपयोग करून सिद्ध होतात. नाडीज्योतिषाला कूट लिपीची तटबंदी आणि 'नाडी पट्टी सापडत नाही` ही पळवाट उपलब्ध असल्यामुळे त्याच्याविरुद्ध थेट पुरावे देणे शक्य होत नाही. नाडी-ज्योतिषाची भाकिते किती खरी ठरतात व किती खोटी ठरतात, हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

20 Sep 2008 - 12:50 pm | अवलिया

बरोबर आहे तुमचे म्हणणे. भारतातील लोक समस्यांमुळे भाबडे बनतात त्यामुळे विचार न करता कुठुन तरी समस्या सुटावी म्हणुन अशांच्या नादी लागतात. भविष्य काय देवदेवस्की काय तसेच अनेक इतर गोष्टी काय..... मुळ हेतु दुर राहुन भलतेच लोक त्याचा गैरफायदा घेतात अन श्रद्धेला विकृत रुप प्राप्त होते. आपण आपल्याकडुन होईल तितके समजावण्याचे प्रयत्न करायचे.

पण आभाळच फाटले तर काही करु शकत नाही तसेच हे आहे. असो.

नाना

विजुभाऊ's picture

20 Sep 2008 - 2:38 pm | विजुभाऊ

बरे झाले नाडी ही लोकाना अनाडी कशी बनवते सांगितले ते.
धन्यवाद .
http://www.misalpav.com/node/3494 या इथे पहा नाडी वाल्या बाबानी त्यांच्या नाडी बद्दल दिलेली उपयुक्त(?) माहिती. धादांत थोतांड लोकांच्या गळी कसे उतरावे याचा वस्तुपाठ आहे
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, नाना आणि इतर भविष्य बघणारे, विचारायला जाणारे लोक्स,

माझा एकच प्रश्नः

काय गंमत आहे उद्या काय होणार ते आजच कळलं तर? इफेक्टिव्हली आपण उद्याचा दिवस आजच जगलो. मग उद्यापर्यंत वाट का बघायची? तसंच आपल्या आयुष्यात पुढे काय काय होणार आहे हे कळलं तर पुढचं आयुष्य निरस नाही का होत?
उदाहरणार्थ: मी ती एलियनायटीसेलिया कथा लिहित आहे (आज चौथा भाग येणार), त्यात अनेकांना औत्सुक्य आहे पुढे काय ते वाचायचं, मला नाही आहे कारण मला माहित आहे पुढे काय लिहिणार आहे ते!

(शंकासूर) अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2008 - 1:19 pm | प्रकाश घाटपांडे

भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही.त्याला काडीचा आधार पुरतो. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
प्रकाश घाटपांडे

धनंजय's picture

20 Sep 2008 - 4:18 pm | धनंजय

ही अत्यंत खोलवर रुजलेली मानव्य उर्मी आहे. खरे आहे.

विज्ञानाच्या प्रगतीचा पाया भाकिते करणे आणि ती तपसणे हाच आहे.

अमोल केळकर's picture

20 Sep 2008 - 1:13 pm | अमोल केळकर

विस्तृत माहिती आवडली
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2008 - 1:58 pm | प्रभाकर पेठकर

अत्यंत मुद्देसूद, उद्बोधक विवेचन. अभिनंदन.

झकासराव's picture

20 Sep 2008 - 2:01 pm | झकासराव

वा!
घाटपांडे काका मुद्देसुद लिहिल आहात.
अगदि हेच मला वाटत होत की इतक्या वर्षापुर्वी जर पट्ट्या बनवल्या असतील तर किती बनवाव्या लागतील. आजची फक्त भारतातीलच लोकसंख्या आहे १२० कोटी.
मग एखादा अभारतीय असेल त्याची पट्टी असेल की नाही?? जर असेल (असणारच डॉलरमधला लाभ कोण सोडेल?? :)) तर मग आजच्या घडीला पृथ्वीवर जीवीत असलेल्या सगळ्या देशांची लोकसंख्या इतक्या पट्ट्ञा असायलाच हव्यात ना???
बर समजा मी पुण्यात राहतो म्हणून मी पुण्यातल्याच केंद्रात जाइन आणि माझी पट्टी तिथेच असेल का?? हे का????????
समजा माझ्या डोक्यात किडा उठला आणि मी साउथ इन्डीयात जावुन पट्टी बघणार असच म्हणालो तर??
तिथेही असणार का माझी पट्टी?? जर हो अस उत्तर असेल तर ह्याच्या अर्थ पट्ट्यांच्या अनेक प्रती (झेरॉक्स हो)असायला हव्यात ना??
मग आता करा विचार आणि मांडा गणीत. आजच्या घडीला जीवीत असणारे लोक तेवढ्याच पट्ट्या गुणिले नाडीकेंद्राची संख्या म्हणजे तेवढ्या टोटल पट्ट्या झाल्या की. :)
लयीच भारी हा ते पट्ट्ञा बनवणारे कारागीर.
कुठे मिळतील हो. आम्ही आमच्या कारखाण्यात कामाला ठेवतो की. :)
माझ्या एका मित्राने तिकडे जावुन अनुभव घेतला आहे. आता त्यालाच विचारेन नेमक काय काय असत तिथे आणि त्याला जी कॅसेट मिळाली आहे त्यात काय आहे ते.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आंबोळी's picture

20 Sep 2008 - 2:44 pm | आंबोळी

अगदि हेच मला वाटत होत की इतक्या वर्षापुर्वी जर पट्ट्या बनवल्या असतील तर किती बनवाव्या लागतील. आजची फक्त भारतातीलच लोकसंख्या आहे १२० कोटी.
मग एखादा अभारतीय असेल त्याची पट्टी असेल की नाही?? जर असेल (असणारच डॉलरमधला लाभ कोण सोडेल?? ) तर मग आजच्या घडीला पृथ्वीवर जीवीत असलेल्या सगळ्या देशांची लोकसंख्या इतक्या पट्ट्ञा असायलाच हव्यात ना???
बर समजा मी पुण्यात राहतो म्हणून मी पुण्यातल्याच केंद्रात जाइन आणि माझी पट्टी तिथेच असेल का?? हे का????????
समजा माझ्या डोक्यात किडा उठला आणि मी साउथ इन्डीयात जावुन पट्टी बघणार असच म्हणालो तर??

असाच प्रश्न मी एका नाडीपट्टीची बाजू घेवून भांडणार्याला विचारला होता त्याने मला सांगितले की पट्टी वर भविष्य लिहिणार्‍याना हे पण दिसले होते की कोणकोण लोक पट्ट्या बघायला येतील आणि त्यानी फक्त त्यांच्याच पट्ट्या लिहिल्या. तसेच कोण कुठे जाउन भविष्य पहाणार आहे हे पण माहित असल्याने त्या त्या पट्ट्या त्या त्या गावच्या केंद्रात पोचवल्या.(अश्या तर्हेने त्यानी जगाचा नसला तरी वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आपल्या पुरता सोडवला. :> )

अवांतर : मी नाडीपट्टीच्या बाजुने बोलतोय असा (गैर)समज कृपया करुन घेउ नये. पुराव्यादाखल इतर धाग्यात मी याची बरिच टवाळी केली आहे. माझ्या कडे असलेली माहिती फक्त दिली.

आंबोळी

झकासराव's picture

20 Sep 2008 - 3:50 pm | झकासराव

आंबोळी हे मीच लिहिणार होतो डोळा मारलेली स्मायली टाकुन पण म्हणल बघाव एखाद्या
नाडीभक्ताकडून हेच उत्तर येत का ते.
जल्ला ते तर तुच दिलस की. :)
बाय द वे तुला तस उत्तर दिलेली व्यक्ती महान आहे आणि ती इतकी हुकलेली आहे की परत नॉर्मल होण्यासाठी परिस्थितीचे चटके हाच उपाय.
सांगुन उप्योग नाही.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विजुभाऊ's picture

20 Sep 2008 - 2:48 pm | विजुभाऊ

प्रश्नः पायजम्याच्या शिवणीच्या आत हरवलेली नाडी शोधण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत याचे २१ अपेक्षीत कोठे मिळेल?
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2008 - 3:00 pm | प्रकाश घाटपांडे

यावर तोडगा आहे. पायजम्याच्या नाडीच्या दोन टोकांची अगोदरच गाठ मारावी. म्हणजे हरवली तरी प्रोग्राम लूप मध्ये जातो. गाठी सकट शिवणीच्या आत जाते पण आयत्यावेळी घोटाळा करत नाही. ;)
प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ's picture

20 Sep 2008 - 3:48 pm | विजुभाऊ

एखादा माणूस त्याच्या मागच्या जन्मात माणूस चा का असतो?
गेल्या जन्मात कोणी माणुस देवीचा ब्याक्टेरीया किंवा मलेरीया चा व्हायरस कधीच नसतो का?
जर आत्मे निर्माण होत नसतील नष्ट /होत नसतील तर जगाची लोकसंख्या का वाढते आहे?
नव्या आत्म्यांचा पुरवठा कोठुन होतो?
( कदाचित येथील आत्मे बदलीवर दुसर्‍या गॅलेक्सीतल्या पृथ्वीवर सारख्या ग्रहावर जात असतील)

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

वेताळ's picture

20 Sep 2008 - 11:02 pm | वेताळ

मी नाडी वाचनाचा अनुभव घेतला आहे.भराभर प्रश्न विचारत जातात व हो का नाही हे उत्तर तुम्ही देत जाता. ह्यात भुतकाळ १००% कळतो कारण तो आपण अगोदर हो नाही प्रशोन्नतरात सांगितला असतो. बाकी फ्युचर इझ अंधेरा.
वेताळ

ऋषिकेश's picture

21 Sep 2008 - 12:36 am | ऋषिकेश

:)
अतिशय मस्त! आधी तुमच्या लेखात यातील बराचसा भाग वाचला होताच. तेव्हा प्रमाणे आताही पटला :)

बाकी ओकबुआ,आता इथे मुद्याचे बोलाल का? का फक्त ट्राय करा ट्राय करा सांगत राहणार? बोला बोला!?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धोंडोपंत's picture

21 Sep 2008 - 7:28 am | धोंडोपंत

मित्रवर्य श्री प्रकाशराव घाटपांडे यांस,

उत्तम लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन. विषय नीट मुद्देसूदपणे मांडला आहात. सर्व मुद्दे त्यात आलेले आहेत असे वाटते.

ज्या कोण्या ऋषिमुनींनी या पट्ट्या लिहिल्या असे म्हणतात, त्या सर्वांनाच तामिळ येत होते का? हा पहिला प्रश्न

या नाडीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह आहे. साधारण ओळखीचा माणूस त्या केंद्रात जातकाला घेऊन जातो. त्याने सर्व डेटा आधी दिलेला असतो.

आमचे गुरूवर्य श्री. के. एस. कृष्णमूर्ती यांनी या नाडीपद्धतीतील तद्दन खोटारडेपणावर प्रचंड ताशेरे ओढले आहेत.

ज्योतिषशास्त्राला बदनाम करणार्‍या या लोकांकडे जातांना जातकांनी नीट विचार करावा.

आपला,
(लोकहितवादी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2008 - 9:03 am | प्रकाश घाटपांडे

अभिरुची ,संस्कृती अशा करमणुक केंद्रात कळसुत्री बाहुल्या, जादुगार आणि आता ज्योतिषी सुद्धा बसतात. उत्सुकतेपोटी गंमत म्हणुन आपली पट्टी पहाणे यात मज्जा येते. नंदी बैलवाल्याचा बैल शंभराची नोट ज्याच्या खिशात असेल त्याच्या ठिकाणी उभा राहतो. होस्टेल मधे वा कुटुंबात नातेवाईकांच्या गप्पात मजा म्हणून प्लँचेट केले जाते. त्यात कुणाच्या तरी मनातल्या गोष्टी आत्म्याला कळल्याप्रमाणे उत्तरे ही मिळतात. मित्रांच्यात काही " किरो "इतरांचे हात पाहुन भविष्यही सांगतात व हिरो बनतात. मोबाईलवर ही भविष्य ही सेवा झाली आहे. रेल्वे बस स्थानकांवर वजनाच्या तिकीटावर ही भविष्या येतेच की.
हा सर्व करमणुकीचा भाग असतो . मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी करमणुक आवश्यक आहेच. फक्त त्याला किती महत्व द्यायचे हा खरा मुद्दा आहे
प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2008 - 9:14 am | प्रभाकर पेठकर

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी करमणुक आवश्यक आहेच. फक्त त्याला किती महत्व द्यायचे हा खरा मुद्दा आहे.

लाखाची गोष्ट.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2008 - 9:22 am | प्रकाश घाटपांडे

अभिरुचीत जादुगाराने इतरांच्या करमणुकीत खंड पडू नये म्हणुन पेठकर काकांना खुपच महत्व दिले होते . त्याचा एक डोळा सतत पेठकर काकांवर बारीक नजर ठेउन होता. ;)
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2008 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाडी भविष्याच्या समजांबद्दल प्रबोधन करणार्‍या लेखाबद्दल आभार.

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी करमणुक आवश्यक आहेच. फक्त त्याला किती महत्व द्यायचे हा खरा मुद्दा आहे

१००% सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन's picture

21 Sep 2008 - 1:40 pm | नंदन

लेख आवडला. नाडीभविष्यामागच्या मानसिकतेची नाडीपरीक्षा अगदी अचूक केली आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

जीएस's picture

21 Sep 2008 - 4:01 pm | जीएस

उत्तम लेख लिहिला आहे. अनेकांचे अचाट अनुभव ऐकुनही, माझे मात्र असेच मत बनले होते कि हा विलक्षण चलाखीचा प्रकार आहे, त्यामुळे मी चार वर्षापूर्वी कल्याणीनगर येथील अतिशय प्रसिद्ध अशा नाडीजोतिषवाल्याकडे गेलो, जातांना छोटा डिजिटल रे़कॉर्डर घेउन गेलो, सुरूवातीचे संपूर्ण संभाषण ध्वनिमुद्रित केले, नंतर पट्टी सापडल्यावर काय काय सांगितले जाते त्याची तेच आपल्याला कॅसेट देतात. घरी जाउन सावकाश दोन्ही गोष्टि ऐकल्या आणि त्यांच्या चातुर्याला दाद दिली. तेंव्हाच एक लेख लिहायचा होता, पण ते राहूनच गेले आणि मग त्या कॅसेटही काळाच्या ओघात कुठेतरी गेल्या.

ही इतकी बेमालूम फसवणूक आहे की पाच सात वर्षे परिश्रमपूर्वक शिकल्याशिवाय कोणाला जमू शकेल असे वाटत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2008 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

सातार्‍याचे बीएसएनएल चे एक अधिकारी श्री ओंकार पाटील हे मद्रास प्रांतात १९९६ साली गेले होते. त्यावेळी नाडी भविष्य हा विषय मिडियात चघळला जात होता. त्यांनी असाच पॉकेट रेकॉर्डर खिशात ठेउन अगस्ती नाडी केंद्राच अनुभव घेतला. एकूण प्रश्न २६० झाले. या स्वानुभवावर किस्त्रीम दिवाळी १९९६ मध्ये त्यावर "नाडी परिक्षा" हा खळबळजनक व सविस्तर लेख लिहिला होता. अंधश्रद्धा निर्मुलन समिति (अंनिस) ने संपादित केलेल्या "प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा "या पुस्तकात त्याचा समावेश आहे. सदर लेख अतिशय वाचनीय आहे.
प्रकाश घाटपांडे

सखाराम_गटणे™'s picture

21 Sep 2008 - 7:48 pm | सखाराम_गटणे™

सगळे मुद्दे व्यवस्थीत सागिंतले आहेत. जोतीष्यचे समर्थेक कधी असल्या मुद्द्याची उत्तरे देत नाहीत.

जोतीष पुर्वग्रहीत द्रुष्टी असणार्यावर चालत नाही - पुल ;)

बाकी काय बोलायचे?

* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
(सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)

गणा मास्तर's picture

21 Sep 2008 - 9:53 pm | गणा मास्तर

काका नाडी ज्योतिषाबाबत अतिशय छान माहिती दिलीत.
खरे तर कधी कधी आपण आयुष्याबाबतचे निर्णय घेतो तर कधी कधी आयुष्य आपल्या बाबतीत निर्णय घेते.

(आपला लकडी पुलावर पोपट ज्योतिषाकडे भविष्य बघुन त्यांच्य पोटापाण्याची सोय करणारा)
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

लिखाळ's picture

22 Sep 2008 - 3:12 am | लिखाळ

ओकसाहेबांचा लेख वाचल्यावर आपला लेख वाचला. आपण चांगल्या तर्‍हेने नाडी ज्योतीषाचे खंडन केले आहे. आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.
हा प्रकार करमणूकी खातर तरी जाउन पहावा असे आता वाटत आहे. पण ते भौगोलिक अंतर लक्षात घेता इतक्यात शक्य नाही.

आपल्या अनुदिनीवरचा डेरेन ब्राउनचा विडिओ पुरेसा बोलका आहे.
--लिखाळ.

मृदुला's picture

22 Sep 2008 - 4:37 am | मृदुला

माहितीपूर्ण लेख. मी तर नाडी ज्योतिष हे नाव प्रथमच ऐकले/ वाचले आहे इथे मिपावर.

नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो.

म्हणजे कुंडली बनवून भाकिते वर्तवता येतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

प्राजु's picture

22 Sep 2008 - 6:45 am | प्राजु

नाडी ज्योतिषाच्या नाड्या मस्त आवळल्या आहेत.
अतिशय माहीतीपूर्ण आणि उद्बोधक लेख. आवडला. हा तुमचा लेख एखाद्या वतमान पत्रात दिलात तर खळबळ उडेल..
कोणत्याही पट्टीला माझं भविष्य ठरवण्याचा अधिकार नाही.
आवांतर : सर, तुमचे नाव करमचंद ठेवावे असे वाटू लागले आहे
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ's picture

22 Sep 2008 - 4:06 pm | विजुभाऊ

यातल्या एकाही गोष्टीवर किल्ला लढवणारे बोलले नाहीत.
ते बहुतेक बालेकिल्ल्यात बसले असावेत.

एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत म्हणे. तात्पर्य लग्न होण्यासाठे पायजम्यात किमान दोन नाड्या असाव्यात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 5:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> ते बहुतेक बालेकिल्ल्यात बसले असावेत.
=))

>> एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत म्हणे. तात्पर्य लग्न होण्यासाठे पायजम्यात किमान दोन नाड्या असाव्यात
कोणाच्या पायजम्यात दोन नाड्या असाव्यात? तुम्ही किती ठेवल्या होत्या? काही लोकांना या मार्गदर्शनाची गरज असणार!

त्यांनी गटणे म्हणतो तसे इलास्टिक वापरले होते (पण ते लेंग्याच्या खिशात नाडी ठेवून गेले होते असे ऐकून आहे!) ;)

चतुरंग

आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.
मित्र हो,
आत्ता पर्यंत आपण नाडी ग्रंथ भविष्याच्या विरोधातील एका बाजूचे विचार वाचलेत वा ऐकलेत असतील. मात्र त्याविरोधी विचारांच्या संदर्भात समर्पक उत्त्तरे मी आणि प्राचार्य गळतगे व अन्य लोकांनी कित्येक वर्षापूर्वी लेखातून व पुस्तकातून सडेतोडपणे दिलेली आहेत. त्यामुळे त्याच त्याच पोकळ आक्षेपांना उत्तरे देण्यात आम्हाला काही स्वारस्य उरलेले नाही. म्हणून मी त्याविषयी लिहायचे टाळतो. त्याचा अर्थ नाडीवर पुरावे देऊन लिहिण्यासारखे काही राहिले नाही वा नसेल म्हणून ओकबुवांची (एकांनी मला दिलेले नाव) दातखीळ बसली असावी व आता तरी त्यांच्या भूलथापांना खंड पडेल असे वाटले असावे. त्यांचा असा ग्रह होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांना तसे वाटले तर मला काही वाटणार नाही. कारण आत्ता पर्यंतच्या लिखाणामुळे या मंडळीची मानसिकता नाडी ग्रंथ भविष्याकडे कुत्सितपणे पहाण्याची व मानण्याची असल्याने त्यांना कितीही तर्कपूर्ण पुराव्यांनिशी दाखवून दिले तरी मीच काय कोणीही त्यांना पटवून - समजाऊन सांगून मान्य करायला लावणे शक्य नाही. हे वेगळे सांगायला नाडी पट्टया पहायची गरज नाही. अशा बुद्धिवादी लोकांनी मी, विंग कमांडर ओक, सांगतो म्हणून नाडी भविष्य मानावे असा माझाही मुळीच आग्रह नाही. पण काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो त्यापैकी ही एक बाब आहे.
काहींचा असा दावा आहे की मी अनुभव घेणार नाही. आम्ही नाडी भविष्याचा अनुभव घेतला आहे असे जे दावा येथे करतात त्यांनीही प्रत्यक्ष त्यांच्या संदर्भात नाडीपट्ट्या पाहिलेल्या नाहीत. तुम्ही सादर केलेले पुरावे ही पहाणार नाही. तुमच्या पुराव्याचे खंडनही करणार नाही. तरीही नाडी भविष्याला मान्यताही देणार नाही. कारण आमची विचारधारा अशा प्रकारांना मान्यता देत नाही. मग ते डॉ.जयंत नारळीकर असोत किंवा डॉ नी. र. वऱ्हाडपांडे असोत किंवा महान स्वर्गीय डॉ. अब्राहम कोऊर असोत वा पालघाटच्या भागातील श्री. बी.प्रेमानंद असोत. या सर्व लोकांच्या नाडी भविष्यावरील विचारांना अत्यंत तर्कपूर्ण आणि पुराव्यानिशी उत्तरे गेलेली आहेत. तरीही ‘अजून माझे वैयक्तिकरित्या जोवर समाधान होत नाही तोवर मी कसे मानू’ असा प्रत्येकाचा प्रश्न असल्याने मी कोणा कोणाचे समाधान करत फिरणार? शिवाय, ‘ओक, हे पुरावे ठीक आहेत हो. पण आणखी पुरावा आणा. मग मानायचे की नाही ते पाहू. असे प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे व आपली वैचारिक हार मान्य न करणाऱ्यांची भूक भागवणे कोणाला तरी शक्य आहे काय? असो.
असे जरी असले तरीही मी असा प्रस्ताव मांडू इच्छितो की जर मिसळपावचे आणि उपक्रमींचे संपादकमंडळ माझ्या विचारांची गळचेपी करणार नसतील तर मी त्यांना अशी विनंती करू इच्छितो की माझ्या आत्ता पर्यंतच्या लिखाणाला त्यांच्या त्यांनी माध्यामातून समाविष्ट करायला मान्यता द्यावी. तसे असेल तर मी त्यांना ‘बोध अंधश्रद्धेचा’ या पुस्तकाची एक प्रत सप्रेम भेट पाठवू इच्छितो. त्यावरून त्यांनी ते पुस्तक आपल्या माध्यामातून जगाच्या पाठीवरील कोणाही मराठी वाचकाला वाचायला मिळण्याची आयती सोय होईल. सध्या माझ्य़ाजवळ अशी यंत्रणा वा तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही की मी आपल्या बळावर हे काम करू शकेन. अर्थात ही मी घर बसल्या नाडी भविष्याची फुकटात जाहिरातबाजी करायला मागत आहे, असे वाटत असेत तर माझा काही आग्रह नाही.
माझा असा पुर्व अनुभव आहे की नाडी भविष्याविरुद्ध जरा खुट्ट झाले की पुरोगामी विचारांचा मुखवटा चढवलेल्या प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या अक्षरात छापून येते पण त्याचा प्रत्यावाद केलेल्या लिखाणाची साधी दखलही घेतली जात नाही. सध्या त्य़ांची ती गरज असल्याने मी त्यांची कुचंबणा समजू शकतो. असो.

जैनाचं कार्ट's picture

23 Sep 2008 - 9:43 am | जैनाचं कार्ट (not verified)

अहो एक तरी पुरावा द्या की ,
पुर्ण आयुश्यात आम्ही नाडी हा शब्द बाबाच्या ईजारीला बांधण्यासाठी लावलेल्या धाग्यासाठी वापरताना पाहीले होते व आज येथे मिपावर... नाडी भविष्य आहे काय ? वर काकांनी काही मुद्दे दिले आहेत त्या बद्द्ल तुमचे मत काय ? तुम्ही वर किती जणांचे समाधान करु असा सुर लावलेला आहे, मिपा वर सध्या दोन एक हजार सदस्य आहेत तुम्ही दोन एक व्यवस्थीत पुरावे द्या... !

जास्त गरज असेल तर मी तुम्हाला माझी जन्म कुंडली देतो माझेच नाडीभविष्य सांगा... माझा भुतकाळ येथेच मिपावर मुद्रित आहे .. तो पाहून देखील अजून काही माहीतीची गरज असेल तर ते सांगा... जसे जन्मवेळ / दिनांक / स्थळ सर्व माहीती येथे ओपन मध्ये देण्यात येईल.. माझे भुतकाळ व भविष्य काळ ह्यातील फक्त तीन गोष्टी सांगा, तुमची जी फी असेल ती तुमच्या बँक मध्ये आम्ही आगाऊ जमा करु ह्याची खात्री असु दे !

बघा जमत असेल तर !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2008 - 10:42 am | प्रकाश घाटपांडे

नाडी ज्योतिषावर आम्ही १३ एप्रिल २००१ रोजी पडताळा घेण्याचा प्रयोग केला. त्यासाठी फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या वतीने (म्हणजे आम्हीच) १० एप्रिल २००१ रोजी पत्रकार परिषद घेतली. त्याचा वृत्तांत खालील प्रमाणे
पाच हजार वर्षापूर्वी अगस्त्य ऋषिंनी लिहिले आहे असे सांगितले जाणाऱ्या नाडी भविष्याचा पडताळा घेण्याचा प्रयोग
फलज्योतिष चिकित्सा मंडळ हे फलज्योतिषाची चिकित्सा करणाऱ्या मंडळींचा एक अनौपचारिक ग्रुप आहे. मंडळातर्फे नाडी भविष्य या ज्योतिष पध्दतीचा अभ्यासप्रकल्प जनहितार्थ हाती घेण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने सर्व वाचन साहित्य मंडळाकडे विनामूल्य उपलब्ध आहे.या विषयावरील लोकांचे विविध अनुभव व मते जाणून घेण्याकरिता मंडळाने दि. १-४-२००१ रोजी खुल्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात पूर्वदूषितग्रह न बाळगता सत्यासत्यता तपासावी असा सूर होता.
उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी चार केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. प्रत्यक्षात संबंधिताने अंगठयाचा ठसा दिल्यावर त्याच्याकडूनच अनेक प्रश्न विचारुन ही माहिती काढून घेतली जाते याची आम्ही खात्री केली आहे. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे तेथे सांगितले जाते. त्यावरुन ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पटटया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्राने अगोदरच सांगितले आहे. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात.
आम्ही असे म्हणतो की, पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. चोर सोडून संन्याशाला फाशी बसली असती. मग व्यक्तीचे नांव आणि ठसा हे दोन्ही पॅरामीटर्स अन्य कुणातरी व्यक्तीचे बाबत जुळतील अशी शक्यताच नाही हे ठामपणे म्हणता येते. मग या दोन पॅरामीटर्सच्या आधारे त्यांना व्यक्तीची पट्टी निश्चित करण्यासाठी कुठलीच अडचण येता कामा नये. तरीही पटटी हुडकून काढण्यासाठी सोपे पडावे म्हणून हे दोन घटक कमी आहेत असे घटकाभर मानू. जन्मसाल व पित्याचे नांव हे अजून क्ल्यू देउ. स्वत:चे नांव व ठसा या 'नेसेसरी कण्डीशन` झाल्या. अंगठयाचा ठसा, स्वत:चे नांव, पित्याचे नांव व जन्मसाल या 'सफिशंट कण्डीशन` झाल्या. असे करत करत व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती तयार देउ व मोअर दॅन सफिशंट या कण्डीशनपाशी येवून ठेपू. याआधारे आम्ही नाडी केन्द्राला खालील प्रयोग सुचवला आहे.
मंडळाचे सदस्य मा. श्री. रिसबूड यांनी नाडी केन्द्राला एक रजिस्टर्ड पत्र पाठविले असून त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून वरील सर्व माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. पत्राला त्यांनी लेखी उत्तर दिले नाही. परंतु रिसबूडांनी फोनवर विचारणा केली असता आपण हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी पाच वाजता करु असे तोंडी सांगितले आहे.
या पत्रकाद्वारे मंडळ पत्रकारांना असे आवाहन करिते की, त्यांनी सदर प्रयोगाचे वेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे प्रसंगी स्वत:च्या अंगठयाचा ठसा देउन कुंडली शोधण्यास नाडी केन्द्रास उद्युक्त करावे व नाडी भविष्याची सत्यासत्यता पडताळून जनतेसमोर आणावी. त्यासाठी पत्रकारांना पत्रकार भवन येथून नाडीकेंद्रापर्यंत नेण्याआणण्याची सोय फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे करण्यात येत आहे. तरी सर्वांनी दि.१३.४.२००१ रोजी सायं. ५.०० वा. पत्रकार भवन, नवी पेठ, या ठिकाणी उपस्थित रहावे.
===========================================================

प्रकाश घाटपांडे

महेश हतोळकर's picture

23 Sep 2008 - 11:00 am | महेश हतोळकर

या प्रयोगाचे पुढे काय झाले? का प्रयोग झालाच नाही?

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2008 - 11:21 am | प्रकाश घाटपांडे

आमचा अगोदर त्या नाडी केंद्राशी पत्रव्यवहार झाला होताच. पत्रकार परिषदेतच सविस्तर माहिती व शंकांना उत्तरे दिल्यानेपत्रकार नाडी केंद्रात आले नाहीत. पण आम्हाला जाणे क्रमप्राप्त होते. रिसबुड ,मी व अन्य काही हौशी लोक गेलो .कागदावर ठसे दिले. जन्मतारीख व नाव सागितले. त्याने आतमध्ये जाउन आमच्या व आमच्या सोबत आलेल्या काही हौशी लोकांच्या पट्ट्या इथल्या स्टॉक मध्ये नाहीत असे सांगितले. त्या तांबारम मधील मेन स्टॉक मधुन आणाव्या लागतील. आमचे लोक तिथे जात येत असतात त्यामुळे तुम्ही दहा दिवसांनी फोन करा. आम्ही त्यानंतर तीन वेळा फोन केले पण पट्ट्या मिळाल्या नाहीत हेच उत्तर.
आमच्या सारख्या लोकांच्या दुप्पट फी पेक्षा इतर लोकांना दिलेला सवलतीचा रेट परवडतो.
प्रकाश घाटपांडे

अभिज्ञ's picture

23 Sep 2008 - 1:18 am | अभिज्ञ

ह्या विषयावरिल संयत प्रतिसाद वाचला.
सर्वप्रथम आपण एखाद्या गोष्टीचे समर्थन करताय व त्याची कोणी टिंगल टवाळि केली/करत असेल तर समस्त मिपाकरांतर्फे
मी आपली माफि मागतो.
आपल्या प्रतिसादातून आपण फक्त "अनुभव घेउन पहावा" एवढेच ध्वनित करत आहात.
श्री.घाटपांडे ह्यांनी मांडलेल्या एकाहि मुद्याचा आपण प्रतिवाद करताना दिसत नाहि.
त्याबद्दल आपण काहि लिहिलेत तर खुली व पोषक चर्चा करता येइल.

अभिज्ञ.

मृगनयनी's picture

23 Sep 2008 - 12:35 pm | मृगनयनी

वरील चर्चा पाहुन १ गोश्ट येथे नमूद करावीशी वाटते, की योग्य वेळ आणि परिस्थिती आल्याशिवाय, कोणत्याही व्यक्तीची पट्टी मिळत नाही... किन्वा मिळाली, तरी वाचली जात नाही. वरकरणी पाहता कोणालाही हे थोडं विचित्र वाटणं साहजिक आहे.

परन्तु ही १ सत्यघटना आहे:

पुण्यातील एका नाडी-जोतिषाच्या केंद्रात १ माणुस त्याची "पट्टी"पाहण्यासाठी गेला. त्याच्या उजव्या अंगठ्याचा ठसा आणि जन्मवेळ, तारीख, जन्मठिकाण इ. नोंदवुन घेऊन केंद्रातील लोकांनी त्या माणसाचा फोन नम्बर घेतला. आणि "आम्ही तुमची पट्टी सापडल्यावर बोलावु" असे सांगितले.

काही दिवसांनी त्या माणसाला फोन आला, की "तुम्ही पट्टी पाहण्यासाठी आज केंद्रात यावे." त्याप्रमाणे तो माणुस गेला. पद्धतीप्रमाणे त्याच्या अंगठ्याच्या ठशाशी मिळत्या-जुळत्या १०-१२ पट्ट्या तेथे काढल्या होत्या. त्या माणसाला विविध प्रश्न विचारुन "फिल्टर" झालेली १ पट्टी, मिळाली, जी त्या माणसाची होती.

(फिल्टर : जेव्हा नाडी ज्योतिशी प्रश्न विचारतात, तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे "हो" किन्वा 'नाही' अश्या स्वरुपातच आनि जे सत्य उत्तर आहे, तेच देणे गरजेचे असते. जेव्हा त्यांनी वाचलेली एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात नसेल्...तेव्हा त्याचे उत्तर 'नाही' असेच देणे गरजेचे असते. कारण त्यामुळे १ च पट्टी अशी मिळते, जी फक्त तुमचीच असते.)

असो... त्या पट्टीत नमूद केल्याप्रमाणे सर्व गोष्टी, त्या माणसाच्या बरोबर मॅच झाल्या..... फक्त १ सोडुन.. ती म्हणजे.. पट्टीत नमुद केल्याप्रमाणे पट्टी वाचते वेळी त्या माणसाच्या हयात असलेल्या भावांची संख्या २ असली पाहिजे. परंतु 'त्या' माणसाला मात्र प्रत्यक्षात ३ भाऊ होते. त्यामुळे तो कन्फ्युज झाला. पण तेवढाच १ फरक सोडला, तर बाकीच्या इतर बारीक-सारीक गोष्टीसुद्धा त्याच्या आयुष्याशी मिळत्या-जुळत्या होत्या. त्यामुळे ती पट्टी पुर्णपणे वाचली गेली. ती परत वाचुन ऑडिओ-केसेट्मध्ये रे़कॉर्ड ही केली गेली. त्या माणसाला उपायही सांगितले गेले. आणि तो माणुस घरी गेला.

परन्तु, घरी गेल्यावर त्याला समजले, की त्याच्या एका भावाचा अपघाती मृत्यू झालेला होता. आणि ज्यावेळी अपघात झाला, ती वेळ आणि नाडी-भविष्य बघण्याची वेळ ही जवळ-पास एकच होती. म्हणजेच त्या पट्टी-मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या माणसाचे जेव्हा २ च भाऊ जिवंत होते.... जेव्हा त्याची पट्टी वाचली गेली. !!!

या घटनेला नास्तिक, "योगायोग" ही म्हणु शकतात... परन्तु ज्यांचा विश्वास आहे.... त्यांना मात्र या घटनेवरुन योग्य तो अर्थबोध नक्की होईल.

_________________________________________________________

अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.... शेवटी श्रद्धा हीच महत्वाची असते. परन्तु ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची, ती व्यक्ती ही तितक्या योग्यतेची असावी लागते. नाडी-भविष्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.

केवळ टिंगल करण्याच्या किन्वा खरं खोटं करण्याच्या उद्देशाने गेलेल्यांना पट्टी कधीच मिळत नाही. परन्तु आयुष्यातील महत्वाचे... अगदी जन्म-मरणाचा प्रश्न असणारे निर्णय घेण्याची वेळ आलेली व्यक्ती जेव्हा श्रद्धेने नाडी-जोतिष बघण्यसाठी येते, तेव्हा पट्टी नक्की सापडते.. आणि उचित दिशा ही मिळते.

:)

जैनाचं कार्ट's picture

23 Sep 2008 - 12:40 pm | जैनाचं कार्ट (not verified)

तो महाशय कोण आहे ?
त्यांचे नाव-गाव काय आहे !
तुम्ही वर लिहले आहे की रेकॉर्डींग केले गेले आहे , ते उपलब्ध होऊ शकेल का ?

जन्मवेळ, तारीख, जन्मठिकाण इ.

नाडी साठी ह्या सर्व माहीतीची गरज असतेच असे नाही हे ओक साहबांनी लिहून ठेवले आहे मग का दिली माहीती ?

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 1:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजेच त्या पट्टी-मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या माणसाचे जेव्हा २ च भाऊ जिवंत होते.... जेव्हा त्याची पट्टी वाचली गेली. !!!
पट्टी काळाप्रमाणे बदलते का? त्या माणसाची पट्टी एक दिवस (आठवडा, महिना, वर्ष) आधी वाचली गेली असती तरीही दोनच भाऊ लिहिलेले सापडले असते का?
आणि "तो" माणूस कायम "सर्वनाम" स्वरुपातच का समोर येतो?

केवळ टिंगल करण्याच्या किन्वा खरं खोटं करण्याच्या उद्देशाने गेलेल्यांना पट्टी कधीच मिळत नाही. परन्तु आयुष्यातील महत्वाचे... अगदी जन्म-मरणाचा प्रश्न असणारे निर्णय घेण्याची वेळ आलेली व्यक्ती जेव्हा श्रद्धेने नाडी-जोतिष बघण्यसाठी येते, तेव्हा पट्टी नक्की सापडते.. आणि उचित दिशा ही मिळते.

ज्यांचा विश्वास नाही किंवा सत्यासत्यता पडताळून विश्वास ठेवायचा असेल त्यांना काही सापडणारच नाही! तेव्हा विश्वास न ठेवणार्‍या कुदळ-फावड्यांनो, तुमच्या हातात डोंगर पोखरून उंदीरही पडणार नाही.
किंवा, महर्षी ज्ञानी असल्यामुळे त्यांनी आपणा पाखंड्यांसाठी नाड्या बनवल्याच नाहीत (तेव्हा दुकानात जा आणि स्वतःच्या विजारी/पायजमे/सलवारसाठी स्वतःच नाडी घेऊन या) ...

महेश हतोळकर's picture

23 Sep 2008 - 12:54 pm | महेश हतोळकर

काही दिवसांनी त्या माणसाला फोन आला, की "तुम्ही पट्टी पाहण्यासाठी आज केंद्रात यावे." त्याप्रमाणे तो माणुस गेला. पद्धतीप्रमाणे त्याच्या अंगठ्याच्या ठशाशी मिळत्या-जुळत्या १०-१२ पट्ट्या तेथे काढल्या होत्या. त्या माणसाला विविध प्रश्न विचारुन "फिल्टर" झालेली १ पट्टी, मिळाली, जी त्या माणसाची होती.

कसे शक्य आहे? अंगठ्याचा ठसा एकमेव असतो. कृपया ही बाब स्पष्ट करा. इतरही बर्‍याच जणांनी हाच प्रश्न विचारला आहे. पण उत्तर मिळालेले नाही.
दुसरा मुद्दा. टिंगल करणार्‍यांची गोष्ट एक वेळ समजू शकते पण खरं खोटं करणार्‍यांचा उद्देश्य तर नक्कीच गंभीर आहे. मग त्यांची पट्टी का नाही मिळत?
माझा तर्क:
खरं खोटं करणारे आणि जीवन मरणाचा प्रश्न असणारे यांच्यात एक मूलभूत फरक असतो. खरं खोटं करणारे त्यांना विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबाबत सावध असतात. जर एखादा प्रश्न पुढची माहिती उघड करेल असे वाटले तर ते स्पष्ट नकार देतील. जीवन मरणाचा प्रश्न असणारे अशी सावधानता दाखवत नाहीत.
अर्थात हा माझा केवळ तर्क आहे. कारण मी आजून अनुभव घेतलेला नाही. पण अनुभव घ्यायला गेलो तर नक्की असाच वागेन.

महेश हतोळकर

जैनाचं कार्ट's picture

23 Sep 2008 - 12:58 pm | जैनाचं कार्ट (not verified)

खरं खोटं करणारे त्यांना विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबाबत सावध असतात. जर एखादा प्रश्न पुढची माहिती उघड करेल असे वाटले तर ते स्पष्ट नकार देतील. जीवन मरणाचा प्रश्न असणारे अशी सावधानता दाखवत नाहीत.

१००% सहमत.

कोणी मृगनयनी म्हणते आहे म्हणून आम्ही वरील घटना का सत्य मानावी ?

योग्य पुरावा द्या !

वर मी लिहलेच आहे ओक साहेबांसाठी तेच नयनी तुझ्या साठी देखील जी हवी ती माहीती देतो माझा भुतकाळ व भविष्यकाळ ह्यातील तीन घटना सागाव्यात... पुर्ण भवीष्य जाऊ दे उडत !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

जैनाचं कार्ट's picture

23 Sep 2008 - 12:51 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>केवळ टिंगल करण्याच्या किन्वा खरं खोटं करण्याच्या उद्देशाने गेलेल्यांना पट्टी कधीच मिळत नाही. परन्तु आयुष्यातील महत्वाचे... अगदी जन्म-मरणाचा प्रश्न असणारे निर्णय घेण्याची वेळ आलेली व्यक्ती जेव्हा श्रद्धेने नाडी-जोतिष बघण्यसाठी येते, तेव्हा पट्टी नक्की सापडते.. आणि उचित दिशा ही मिळते.

=))

आपलं पाप (खोटेपणा) कसं लपवावे ह्या नाडि वाल्याकडून शिकावे ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2008 - 1:02 pm | प्रकाश घाटपांडे

ज्या लोकांच्या मनात खालील प्रश्न येतात त्यांना खुशाल पाखंडी म्हणावे

१) या नाडी केन्द्रात नाडी बंडलांची संख्या किती आहे? एका बंडलात किती नाडी पट्टया असतात?

२) आपण महाराष्ट्रात जी नाडी बंडले आणलीत ती महाराष्ट्राचे संबंधाने सॉर्टिंग करुन आणलीत का? हे सॉर्टिंग कसे केले?

३) आजतागायत अगस्त्य नाडी केन्द्रात जे लोक नाडी पटटी पाहून गेले व आज हयात नाहीत ( उदा. १९ व्या शतकाच्या आधी जन्मलेले) अशा लोकांच्या नाडी पट्टया आपण जपून ठेवता की टाकून देता?

४) आपल्या पत्रकात जी नोट दिली आहे त्या नुसार असे दिसते की जनरल कांडम व्यतिरिक्त ११ कांडम विशिष्ट प्रकारचे भविष्य सांगण्या करिता आहेत. तसेच आणखी चार ही स्पेशल कांडे आहेत. या प्रत्येक कांडाकरिता स्वतंत्र पट्टी आहे का?

५) पट्टीत जन्मकुंडली असते की जन्मकुंडलीचा तपशील असतो?

६) भविष्य जन्मकुंडलीचे आधारे लिहिलेले असते की अंतर्ज्ञानाने?

७) अंतर्ज्ञानाने असेल तर कुंडली पट्टीत कशासाठी असते?

८) अंगठयाचा ठसा घेतल्यावर विवक्षित पट्टी ही त्याच व्यक्तिची आहे हे निश्चित करण्यासाठी आपण अनेक प्रश्न विचारता.

९) आंगठयाचा ठसा तर एकाचा दुसऱ्या सारखा कधीच नसतो मग एवढे प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय?

१०) आजमितीस भारताची लोकसंख्या ११०कोटीं आहे. प्रत्येक व्यक्तीची पट्टी महर्षींनी लिहिली आहे काय?

११) वर्षभरात सुमारे अंदाजे एक हजार माणसांच्या पट्टया आपल्याकडे पाहून झाल्या असतील का?

१२) मग एक व्यक्ती बरोबर सोळा पट्टया या हिशोबान या वर्षात १६ हजार पट्टया आपल्या संग्रही आहेत का?

१३) माणसांची संख्या पहाता पट्टयांची संख्या आम्हाला अपूरी वाटते मग या पट्टया एवढया माणसांना कशा पुरतात?

१४) ज्या व्यक्तींच्या पट्टया वाचून झाल्या आहेत त्या पट्टयांचा नंतर तुम्हाला काय उपयोग होतो?

१५) आपल्याला जर त्याचा उपयोग होत नसेल तर त्या व्यक्तिने ती पट्टी मागितली तर त्याला आपण द्याल का?

१६) हयात नसलेल्या माणसांच्या पट्टया तुमच्या संग्रहात असणारच त्यातील काही पट्टया आम्हाला अभ्यासासाठी द्याल का?

१७) पट्टयात व्यक्तींची नांवे असतात असे आपण म्हणता, आम्हाला ती वाचता येत नाहीत. ती नांवे तिथे आहेत याची खात्री आम्हाला करता यावी यासाठी तुम्ही देवनागरी असलेली ही अक्षरे कूट लिपीत कशी असतात हे तुम्ही लिहून द्याल का?

१८) मनुष्य ज्या दिवशी तुमच्या कडे येतो त्या दिवसाच्या आधीच्या घटना पट्टीत लिहिलेल्या असतात की नसतात?

(६_६ पाखंडी)
प्रकाश घाटपांडे

मृगनयनी's picture

23 Sep 2008 - 1:08 pm | मृगनयनी

वर मी लिहलेच आहे ओक साहेबांसाठी तेच नयनी तुझ्या साठी देखील जी हवी ती माहीती देतो माझा भुतकाळ व भविष्यकाळ ह्यातील तीन घटना सागाव्यात... पुर्ण भवीष्य जाऊ दे उडत !

राजे.. आपण जेव्हा पुण्यात याल, तेव्हा नाडी-जोतिष कार्यालयात जाऊन तुमच्या उजव्या अंगठ्याचा ठसा, जन्म्वेळ, तारीख देऊ.. तुमची पट्टी सापडल्यावर तुम्हाला अभिप्रेत गोष्टी नक्की कळतीलच!

इतकेच नव्हे, तर कोणत्या उद्देशाने नाडि-जोतिष बघायला आलेले आहेत, हे ही त्या पट्टीत नमूद केलेले असते.

उदा. काही जण शिक्षणासाठी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, यासाठी पट्टी पाहायला जातात. काही लोक "कोर्टाच्या केसचा निकाल" काय लागेल.. ते बघायला जातात.. काही जण लग्न कधी होईल... हे विचारायला जातात.

राजे.. तुमची पट्टी लवकर सापडो... ही शुभकामना.....

(चांगले कर्म करताना मी कोणालाही घाबरत नाही.... :) )

जैनाचं कार्ट's picture

23 Sep 2008 - 1:15 pm | जैनाचं कार्ट (not verified)

तुमची पट्टी सापडल्यावर तुम्हाला अभिप्रेत गोष्टी नक्की कळतीलच!

पण नाय सापडली तर मात्र हातात येईल त्या पट्टीने त्या पट्टी वाल्याला ठोकुन काढू !

सापडत कशी नाही हेच पाहतो ना पट्टी !

>>>तर कोणत्या उद्देशाने नाडि-जोतिष बघायला आलेले आहेत, हे ही त्या पट्टीत नमूद केलेले असते.

=))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2008 - 2:12 pm | प्रकाश घाटपांडे

भृगुनयनी ला अनुभव येतो आन मंग बाकीच्या लोकांनी डोळ्यावं काय पट्ट्या बांधुन घेतल्या का? संशय का नयनी आला?
प्रकाश घाटपांडे

च्यायला ते लाय डिटेक्टर, नार्को बिर्को सगळ्या चाचण्या बंद केल्या पाहिजे. सरकारने दहशतवाद्यांच्या नाड्या आवळायला या नाडीवाल्यांना बोलवले पाहिजे. म्हणजे मग देशात कुठेच बॉम्बस्फोट, दहशतवादी घटना होणार नाहीत आणि झाल्या तरी संशयितांना पकडले की त्यांना या नाडीवाल्यांकडे घेऊन जायचे. मग त्यांचा भूतकाळ तरी स्पष्टपणे कळेल. अगदीच कळला तर भविष्यकाळही कळेल. म्हणजे आणखी कुठे बॉम्बस्फोट होतील तेही आधीच समजेल. एकुणात काय सरकारने आता ही नाडीपरीक्षा गांभीर्याने घ्यावी बुवा.

अनिल हटेला's picture

23 Sep 2008 - 3:30 pm | अनिल हटेला

आत्ताच वाचली चर्चा !!

जोरात आहे अगदी !!!

तरी म्हणतोये जो तो नाड्या आणी इलॅस्टीकच्या का गप्पा मारतोये !!

असो ..... चालू देत .........

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

लिखाळ's picture

23 Sep 2008 - 3:58 pm | लिखाळ

चर्चा छान चालू आहे. अनुभव घेतल्याशीवाय बोलणे कठीण आहे पण तर्क करुन जे पटत नाही त्याचा अनुभव घ्यायला लोक जाणे सुद्धा मुष्किल आहे. त्यामुळे वर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची समाधानकारक नसली तरी चांगली उत्तरे मिळावीतच.

जुळ्या मुलांची कुंडली दोन मिनिटांचा फरक असला तरी वेगळी असते. असे सांगणारे ज्योतिषी, माझी जन्मवेळ मला साधारण लक्षात असली तरी माझी कुंडली मांडतात. या सारख्या अश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा मला अजून झाला नसताना नाडी-ज्योतीषावर विचार करण्याची माझी कुवत नाही.
--लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2008 - 4:35 pm | प्रकाश घाटपांडे


जुळ्या मुलांची कुंडली दोन मिनिटांचा फरक असला तरी वेगळी असते. असे सांगणारे ज्योतिषी, माझी जन्मवेळ मला साधारण लक्षात असली तरी माझी कुंडली मांडतात. या सारख्या अश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा मला अजून झाला नसताना नाडी-ज्योतीषावर विचार करण्याची माझी कुवत नाही


लिखाळ साहेब तुमच्या जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली. कुंडलीत जे आकडे असतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते पण वर्तुळाकार कुंडली मांडण्याची पद्धत पाश्चात्यात आहे.दक्षिण भारतात चौकटीतच परंतु थोडी वेगळया पद्धतीने मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे.
आता तुम्ही जी वेळ द्याल त्यावरुन ज्योतिषी कुंडलि मांडतो. ताळा पद्धतीने फक्त कुंडलीवरुन वय ही समजते. यात आश्चर्यकारक काहीही नाही

प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

23 Sep 2008 - 4:54 pm | लिखाळ

मला म्हणायचे होते की दोन जुळ्यांमध्ये २ मिनिटाचे अंतर असले तरी त्यांची बरोबर भाकिते आम्ही सांगु शकतो कारण दोन मिनिते हा फरक खुपच मोठा आहे असे ज्योतिषी सांगतात. एक मिनिट हे अंतर सुद्धा मोठे आहे आणि त्याने भाकित बदलते असे ते सांगतात. आता त्याच उलट भारतातल्या किती मुलांची जन्मवेळ रेडिओ-वेळेनुसार नोंदवलेली आहेत? अनेकांची जन्मवेळ १५-२० मिनिटाच्या फरकांत सुद्धा असते..तरी त्यांचे भाकित सुद्धा बरोबरच सांगणारे ज्योतिषी बहुसंख्येने नहित का? या विरोधाभासाचे आश्चर्य आहे.

जर कले-विकले पर्यंत हिशोब करणार्‍याला १५-२० मिनिटाचा फरक सुद्धा चालतो तर माझे डोके यापेक्षा जास्त विचार करु शकत नाही. अगदी योग्य वेळ स्विकारायची झाली तर हजारात एखाद्याची असेल. म्हणजे मग दुकाने बंद पडतील. असे माझे मत. हा तिढा मला सुटला नाही तर अजून नव्या ज्योतिष शाखांचे आकलन काय होणार कप्पाळ :) !!

--लिखाळ.

हैयो हैयैयो's picture

1 Oct 2009 - 9:59 am | हैयो हैयैयो

http://mr.upakram.org/node/2018

चिकित्सा : नाटक की थोतांड?
प्रेषक हैयो हैयैयो (शुक्र, 09/04/2009 - 03:04)

* तत्त्वज्ञान
* शिक्षण
* उपक्रम
* सामाजिक
* माहिती
* विचार
* संदर्भ

चिकित्सा : नाटक की थोतांड?

वाचकहो,

नमस्कार.

येथील मान्यवर सदस्यजनांनी श्री. घाटपांडे सर ह्यांचा "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण २ - नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष" हा लेख आपण वाचला असेल आणि त्याअनुषंगाने उपक्रम येथे नाडिग्रंथ - नाडिज्योतिष ह्या विषयावर चाललेल्या चर्चा आपणांस माहिती असतील असे गृहित धरून येथून पुढील लेख लिहितो आहे. एकूणातच ह्या संपूर्ण प्रश्नाचे स्वरूप सामाजिक आहे, त्यात लेखक श्री. घाटपांडे सर ह्यांचे कार्य हेही जनहितार्थच असल्यामुळे ह्या प्रश्नाकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा सर्वांगाने विस्तीर्ण झाला आहे. तरीदेखील हे लेखन 'व्यक्तिगत रोख असलेले' किंवा 'व्यक्तिगत पातळीवर गेलेले' अशी एखाद्याची समजूत होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्याकरिता म्हणून येथे दिलेले संदर्भ तपासावेत. कुठलेही व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप टाळण्याची काळजी घेऊनच हे लेखन केले आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

असो. ह्या चर्चांमध्ये एका ठिकाणी मी एक विचार मांडला होता जो आपण सारे जाणून आहात. त्याप्रमाणे 'चिकित्सक दृष्टीकोनातून आपण विचार करतो' असे प्रतिपादन करणार्‍या मंडळींनी प्रातिनिधिक स्वरूपात नाडिशास्त्राच्या सत्यासत्यतेविषयक एक ’परिक्षणयोजना’ करावी आणि अहवाल सादर करावा असे आवाहन केले होते.

ह्या आवाहनास काही प्रतिसाद येणे अपेक्षित होते, परंतु काही प्रतिसाद येणे झाले नाही. प्रतिसाद न येण्याचे कारणदेखील कळले नाही. त्याऐवजी 'नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न' असा नवा लेख लिहून प्रस्तुत लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले. वास्तविक पाहता चिकित्सकाने अशी सिद्ध उत्तरांची अपेक्षा करणे चिकित्सेस योग्य नाही. दुसर्‍यांनी दिलेल्या उत्तरांवर विसंबून चिकित्सापूर्ति होणे शक्य नसते असे मला व्यक्तिश: वाटते. असो.

ह्या नव्या लेखात पूर्वी श्री. विनायक सर ह्यांनी 'फलज्योतिषचिकित्सकांसाठी काही प्रश्न' असा प्रतिसाद पाठविला तेंव्हा प्रस्तुत लेखकाने विषयांतराचा धोका वाटतो असे सांगून त्याचे उत्तर प्रलंबित ठेवले. परंतु मी लिहिलेल्या प्रतिसादात उपस्थित केलेल्या काही साध्या सरळ अशा प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देण्यामध्ये स्वसोयिस्कररित्या स्वारस्य न दर्शविता त्यांनी श्री. पर्स्पेक्टीव सर ह्यांच्या प्रतिसादास उत्तर म्हणून 'महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार' असा एक नवा लेख लिहून स्वतः विषयांतर केले आहे असे एक निरिक्षण मी येथे नोंदवू इच्छितो.

येथे मी माझी ह्या प्रकरणातील भूमिका लेखकाकरिता आणि इतर चिकित्सकांकरिता म्हणून स्पष्ट करणे आवश्यक ठरेल असे वाटते. वास्तविक पाहतां मी विचारलेले प्रश्न तत्त्वतः एका तटस्थ आणि त्रयस्थ दृष्टिकोनातून विचारलेले होते. लेखकाशी माझा काही वैयक्तिक वाद असण्याचे काहीएक कारण नाही. मी नाडिग्रंथ नाडिज्योतिष किंवा श्री. ओक सर ह्यांचा समर्थक नाही. आपण अथवा इतर कोणी नाडिग्रंथांवर विश्वास ठेवावा अथवा ठेवू नये असेही माझे म्हणणे नाही. आपण स्वतः फलज्योतिषचिकित्सक आहात, मी तर ज्योतिषशास्त्राचा जाणकारही नाही. माझा स्वतःचा नाडिशास्त्राशी काही संबंध नाही. त्यामुळे आपणास काय सिद्ध करावयाचे आहे अथवा नाही अथवा कसे ह्या गोष्टीशी माझे काहीएक घेणेदेणे नाही हे लक्षात घ्यावे. ह्यापूर्वी ह्या विषयावर काय वादविवाद झाले आहेत आणि त्याचे फलित काय ह्याही गोष्टींशी माझे काहीएक घेणेदेणे नाही हेही लक्षात घ्यावे.

केवळ 'चिकित्सा' असा शब्दप्रयोग लेखक करतात म्हणून मला त्या चिकित्साकार्यामध्ये रस आहे. लेखक नाडिशास्त्रास 'थोतांड' असे संबोधितात त्याबाबत माझे काहीएक म्हणणे नाही. परंतु एखाद्या गोष्टीबद्दल एवढी अवहेलनापूर्वक शब्दयोजना करतांना 'आपण चिकित्सा केली' असा दावा लेखक अत्यंत पोटतिडकीने करत असल्याकारणाने मला काही प्रश्न पडले आहेत. माझे प्रश्न मी येथे पूर्वीच मांडले आहेत. लेखकाने केलेल्या संशोधनकार्यामध्ये मला ज्या शास्त्रीय त्रुटी आढळतात त्यावर आधारित असे माझे प्रश्न आहेत. लेखकास आपले म्हणणे शास्त्रशुद्ध रितीने सिद्ध करता आले असते आणि तर मी असा प्रश्ने विचारण्याचा उद्धटपणा खचितच केला नसता ह्याची नोंद घेतली जावी.

तर ह्या प्रश्नांची उत्तरे मला लेखकाकडून अपेक्षित आहेत. लेखकाने खरोखरीच चिकित्सा केली असेल तर ह्या प्रश्नांची उत्तरे देण्यास त्यांना काही प्रत्यवाय नसावा. मी हा लेख टंकावयास आरंभ करून सिद्ध करेपर्यंत लेखकाने आपला (बहुधा पूर्वीच टंकून सिद्ध असलेला असावा असा) नवा लेख प्रसिद्ध केला आहेच. येथे आधीच कथिल्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीच्या ऐतिहासिक वादाशी पत्रव्यवहाराशी माझे काहीएक घेणेदेणे नाही. त्यामुळे माझ्या प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत लेखकाने अथवा इतर चिकित्सकमंडळींनी कितीही टंकाटंकी केलीत तरी ते सर्प सोडून भूमि धोपटणे ठरेल.

तरी मी पूर्वी मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ होय किंवा नाही अशी दिलीत तरी आपणांस जे म्हणावयाचे आहे ते आम्ही मान्य करावे की नाही ते आम्हाला समजेल.

अन्यथा आपली चिकित्सा ही नाटक आहे की थोतांड असा एक यक्षप्रश्न मी आणि माझ्यासारख्या तटस्थ भूमिका बाळगणार्‍या लोकांसमोर उभा राहील.

धन्यवाद,

हैयो हैयैयो

-
»

* 1280 वाचने

सहमत
प्रेषक विनायक (शुक्र, 09/04/2009 - 03:41)

आपल्याप्रमाणेच मीही फलज्योतिष किंवा नाडीभविष्याचा समर्थक नाही. किंबहुना नाडीभविष्याबद्दल घाटपांडे यांनी विचारलेले प्रश्न तर्कशुद्ध आहेत आणि नाडीभविष्यवाले त्यांना समर्पक उत्तर न देऊन नाडीभविष्याची हानी करत आहेत हे माझे मत आहे. तसेच फलज्योतिषचिकित्सक पण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे टाळून फलज्योतिषचिकित्सेची हानीच करत आहेत. पुनरावृत्ती टाळण्यासाठी जुन्या लेखांचे संदर्भ देतो असे कारण ते देतात पण किती लेख ते पुन्हा पुन्हा या आणि दुसर्‍या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करत आहेत याचा काही हिशेब आहे का? जोतिराव फुल्यांचे ज्योतिषविषयक विचार मिसळपावावर प्रसिद्ध केल्यावर इथे दुवा देऊन भागले असते पण इथेही तो लेख प्रसिद्ध केलाच. नाडीभविष्यवाल्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. माझा आक्षेप याला नाही. लेखकाची मर्जी. फक्त पुनरावृत्ती टाळणे हे कारण त्यांनी थोडक्यात आणि स्पष्ट उत्तरे देण्याचे टाळण्यासाठी पुढे करायला आक्षेप आहे कारण पुनरावृत्तीचे लेखकाला वावडे नाही. मलाही नाही. ब्रह्मसूत्रात "आवृति: असकृत् उपदेशात्|" असे एक ब्रह्मसूत्र आहे. गोषवारा अर्थ असा की "उपदेशाची पुनरावृती आवश्यक असते" (मला संस्कृत येत नाही तज्ज्ञांनी चुकले असल्यास योग्य अर्थ सांगावा).

विनायक
»

* प्रतिसाद
* विनायक यांना व्यनि पाठवा

अंशतः सहमत
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शुक्र, 09/04/2009 - 04:35)

पुनरावृत्ती टाळण्यासाठी जुन्या लेखांचे संदर्भ देतो असे कारण ते देतात पण किती लेख ते पुन्हा पुन्हा या आणि दुसर्‍या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करत आहेत याचा काही हिशेब आहे का?

नाही. ते प्रतिसादाच्या उस्फुर्ततेवर अवलंबुन असते.

जोतिराव फुल्यांचे ज्योतिषविषयक विचार मिसळपावावर प्रसिद्ध केल्यावर इथे दुवा देऊन भागले असते पण इथेही तो लेख प्रसिद्ध केलाच.

खर॑ तर तो मी पुर्वीच उपक्रमावर् प्रसिद्ध करावयास हवा होता. पण ते आळशीपणामुळे राहुन गेले. पर्स्पेक्टीव च्या निमित्ताने तो प्रसिद्ध केला एवढेच. उपक्रमींन अन्यत्र शोधावा लागु नये म्हणुन तातडीने इथेच प्रसिद्ध केला. दुवा क्लिकण्यापेक्षा पुढ्यात थेट उपलब्ध झाला तर सहजपणे वाचले जाते असा अनुभव आहे. अर्थात काही लोक दुवा क्लिकण्याचे कष्ट घेतात हा भाग वेगळा.

फक्त पुनरावृत्ती टाळणे हे कारण त्यांनी थोडक्यात आणि स्पष्ट उत्तरे देण्याचे टाळण्यासाठी पुढे करायला आक्षेप आहे कारण पुनरावृत्तीचे लेखकाला वावडे नाही.

पुनरावृत्तीच वावडे नाही हे मान्य. काही वेळा काही लोकांसाठी पुनरावृत्ती हा दोष असतो तर काही वेळा काही लोकांसाठी तो पुनर्प्रत्ययाचा आनंद देतो. रेडिमेड उत्तरांपेक्षा दिलेल्या संदर्भातुन वाचकांनीच उत्तरे शोधावीत हा ' अमके वाचावे, तमके वाचावे ' सांगण्याचा उद्देश. शिवाय व्यक्ती म्हणुन आमचे काही पुर्वग्रह,गुणदोष आहेतच की
अवांतर-नाडीग्रंथाचा एकदा तरी अनुभव घ्यायला हरकत नाही. अगदी कॉमन मॅन म्हणुन कुणीही तो घ्यावा.
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

दुवा
प्रेषक वसंत सुधाकर लिमये (शुक्र, 09/04/2009 - 13:16)

जोतिराव फुल्यांचे ज्योतिषविषयक विचार मिसळपावावर प्रसिद्ध केल्यावर इथे दुवा देऊन भागले असते पण इथेही तो लेख प्रसिद्ध केलाच.

मग तुम्हीच का दिला नाहीत तो दुवा तुमच्या लेखात? उगाचच ब्राह्मणांना झोडपणारा महात्मा वगैरे शब्दांचे डोलारे उभे करण्यापेक्षा एक दुवा देऊन काम झाले नसते का? प्रकाश घाटपांडे चिवट आहेत म्हणून त्यांनी लगेच तो लेखच इथे दिला. त्यात तुम्ही म्हंटलेले असे काही दिसलेच नाही, म्हणून राग आला का? झाकली मूठ झाकलेलीच राहण्यात फायद्याचे असते असे काहिसे असावे बहुदा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
»

* प्रतिसाद
* वसंत सुधाकर लिमये यांना व्यनि पाठवा

प्रक्रिया
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शुक्र, 09/04/2009 - 14:01)

चिकित्सा ही वैज्ञानिक दृष्टीकोण अवलंबण्याची प्रक्रिया आहे
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

शतशः धन्यवाद.
प्रेषक हैयो हैयैयो (शुक्र, 09/04/2009 - 14:52)

शतशः धन्यवाद.

नमस्कार,

प्रथमत: उत्तरे देण्याचे करून माझ्यासारह्या तटस्थ उपक्रमकरांना उपकृत करणेबद्दल शतशः धन्यवाद.

आपण येथे लिहिलेली प्रतिक्रिया आणि त्यावर माझे उत्तर येथून पुढे.

* माझा प्रश्न: 1. नाडिकेंद्रांमध्ये पट्टी शोधण्यासाठी आपल्या अंगठ्याचा छाप का द्यावा लागतो?
* आपले उत्तरः नाडी वाल्यांच्या मते आंगठयाचा छाप हा पट्ट्यांची बंडले शोधण्यासाठी उपयोगी असतो
* आपल्या उत्तरावर प्रतिसादः - ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे आहेत काय? एक चिकित्सक ह्या नात्याने आपल्याकडून आपले स्वत:चे स्वानुभवाधारित मत अपेक्षित आहे. कृपया सिद्ध (रेडिमेड्) उत्तरे देणे टाळावे.

* माझा प्रश्न: 2. तो तसा दिल्यानंतरसुद्धा आपणांस काही प्रश्न का विचारले जातात?
* आपले उत्तरः एकसारख्या वर्णनाच्या अनेक व्यक्ती असु शकतात त्यातुन नेमकी हीच् ती व्यक्ती हे निश्चित करण्यासाठि त्याचा वापर् होतो. अधिक माहिती ओकांच्या पुस्तकात दिले आहे. उदा. बाकी वर्णन जमले पण बायकोचे नाव आईचे नाव इ जुळले नाही तर ती म्हणजे पट्टीतील व्यक्ती नव्हे असे समजुन ती पट्टी बाजुला करुन दुसरी पट्टी घेतली जाते.
* आपल्या उत्तरावर प्रतिसादः - आपण श्री. ओक सरांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीवर विसंबून उत्तर देता आहात असे प्रथमदर्शनी दिसते. कुठलेही चिकित्साकार्य ह्याप्रकारे दत्तक अनुभवांवर सिद्ध होते हे मान्य करता येणे तत्त्वतः शक्य होत नाही. माझ्या मते चिकित्सकाने स्वतःच्या चिकित्साकार्यावर इतर कोणाही मान्यवंतांच्या (अथवा महात्म्यांच्या) व्यक्त-अव्यक्त मतांचा प्रभाव पडू देऊ नये. ह्या गोष्टीस कारण असे की त्यामुळे आपली मते अस्ताव्यस्त होतात असा चिकित्साशास्त्राचा प्राथमिक सिद्धांत आहे. पुन्हा एकदा हेच सांगणे की आपण एक चिकित्सक, आणि त्या नात्याने आपल्याकडून आपली स्वत:ची स्वानुभवाधारित मते अपेक्षित आहेत.

* माझा प्रश्न: 3. ते तसे विचारावे लागतात असे नाडिवाचकाने सांगितले, तर ते तसे का विचारावे लागतात असे आपण त्यांना विचारले काय?
* आपले उत्तरः वरील प्रमाणे
* आपल्या उत्तरावर प्रतिसादः - वरील प्रमाणे

* माझा प्रश्न: 4. पोलीसखात्याच्या अंगुलीमुद्रातज्ज्ञांची कार्यपद्धति आणि जे स्वत:स ’अंगुलीमुद्रातज्ज्ञ’ असे म्हणवून घेत नाहीत अशा नाडिवाचकाची कार्यपद्धति ह्यात काही साम्य अथवा अंतर आहे काय?
* आपले उत्तरः एक अंगठयाचा ठसा हा दुसऱ्या सारखा कधीच नसतो हे सर्वसामान्य लोकांना माहित आहे. त्यामुळे आंगठयाच्या ठशाचे महत्व जाणीवपूर्वक जतन केले आहे. त्या अंगठयाच्या ठशाचे वर्णन नाडीपटटीत येते. त्यामुळे अंगठयाचा ठसा ही अगस्ती नाडी साठी महत्वाची गोष्ट बनते. जर ठसा युनिक आहे व त्याच्या वरुन त्यांना बंडलाच सॉर्टिंग करता येते तर वर्णनावरुन पट्टी का ठरवता येउ नये? पट्टीतील व्यक्ती तीच आहे का यासाठी प्रश्न विचारावे लागतातच ना!
* आपल्या उत्तरावर प्रतिसादः - 'अंगठ्याच्या ठशाचे वर्णन नाडिपट्टीत येते' ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे आहेत काय?

* माझा प्रश्न: 5. ह्या दोन पद्धती वेगळ्या आहेत अथवा नाहीत हे सिद्ध करण्यापूर्वीच दोहोंना एकाच परिमाणाने मोजणे हे चिकित्सेच्या दृष्टीने कसे योग्य ठरते?
* आपले उत्तरः हा सिद्ध करण्यापुर्वीच्याच प्रक्रियेचा भाग आहे. संशयाचा भाग म्हणा हव तर. आंगठ्याच्या ठशाचा नेमका काय उपयोग व रोल हे जाणुन घेण्यासाठी आपण ओकांची पुस्तके वाचलीत का?
* आपल्या उत्तरावर प्रतिसादः - जोपर्यंत 'अंगठ्याच्या ठशाचे वर्णन नाडिपट्टीत येते' ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आपले प्रस्तुत उत्तर तार्किकदृष्ट्या अर्धवट ठरते. 'सिद्ध करण्यापूर्वीच्या प्रक्रीयेचा भाग आहे' ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे आहेत काय? 'संशयाचा भाग' असे म्हणणे आपल्या चिकित्साकार्यास आणि आपले सिद्धांत सिद्ध करण्यास किती सहाय्यक अथवा उपयोगी ठरते? मी श्री. ओक सरांची पुस्तके वाचलेली नाहीत. आपले चिकित्साकार्य हे शास्त्रीय असल्याचे सिद्ध झालेच तर त्याबाबत त्यांचे काय म्हणणे आहे हे मी नंतर इच्छा होईल तसे तेंव्हा वाचेन.

अवांतर :

तूर्तास आपल्या चिकित्साकार्यामध्ये आणि आपल्या तथाकथित (त्रुटीपूर्ण?) वैज्ञानिक दृष्टीकोण अवलंबण्याच्या प्रक्रियापद्धतिमध्ये(?) विशेष रस आला असल्यामुळे नाडिज्योतिषाव्यतिरिक्त आपले इतर चिकित्सक विचार अभ्यासण्याचा मानस आहे. त्यावरही प्रश्न पडलेच तर तेही विचारण्याची मुभा असावी. उत्तरे देण्यास आपण सिद्ध असाल अशी आशा करू इच्छितो.

-
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

योग्य प्रश्न
प्रेषक ऋषिकेश (शनि, 09/05/2009 - 04:28)

श्री. हैयो हैयैयो यांनी योग्य (प्रति)प्रश्न विचारले आहेत. आणि त्याची उत्तरे चिकित्सकांपेक्षा नाडीअभ्यासक जास्त अधिकारवाणीने देऊ शकतील असे वाटते.
तेव्हा त्याची उत्तरे नाडीशात्राचे अभ्यासक/समर्थक देतील का?

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
»

* प्रतिसाद
* ऋषिकेश यांना व्यनि पाठवा

धन्यवाद.
प्रेषक हैयो हैयैयो (शनि, 09/05/2009 - 08:34)

धन्यवाद.

श्री. ऋषिकेश सर, आपणांस मी येथे विचारलेले (प्रति)प्रश्न योग्य वाटले ह्याचे समाधान आहे. धन्यवाद. आपण म्हणतां तसे ह्या प्रश्नांची उत्तरे नाडिवाचक लोक अधिकारवाणीने देऊ शकतीलही. परंतु मी येथे आधीच म्हटल्याप्रमाणे; एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व चिकित्सकांस मान्य नसल्यास 'ती तशी अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे चिकित्सकाचे उत्तरदायित्त्व ठरते. नाडिग्रंथांच्याबाबतीत 'अस्तित्त्व दाखवा' असे आपण म्हणाल, तर नाडिवादी मंडळी अस्तित्त्व दाखविण्यास सिद्ध आहेतच. परंतु मग ती चिकित्सा कशी होणार?

थोडक्यात काय, तर सदरील प्रश्नांची उत्तरे नाडिग्रंथवादींनी दिली, तर त्यावर तुमचा विश्वास बसणार आहे काय? आणि जर तुमचा तसा विश्वास बसणार असेल, तर मग चिकित्सकांचे आणि त्यांच्या तथाकथित चिकित्साकांडाचे महत्त्व ते काय? चिकित्साकर्म हे आपण समजतो तेवढे सोपे नाही. बहुधा 'नाडिग्रंथ हे थोतांड आहे' असा शोध लागल्याच्या हर्षानंदामध्ये, माझ्यासारखी (तटस्थ) मंडळी प्रश्ने विचारण्यास धजावतील (नारळीकरांच्याकडून परिक्षण मिळवूनदेखील) ह्या शक्यतेकडे चिकित्सकमहोदयांचे दुर्लक्ष झाले असावे असे वाटते!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* संपादन
* प्रतिसाद

सहमत् आहे
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शनि, 09/05/2009 - 08:36)

ओकांचे नाडी ग्रंथांवरील माहिती मिळवण्याचे काम, त्यांनी स्वतः घेतलेले वेगवेगळ्या नाडीग्रंथांचे अनुभव या बाबी सकारात्मक आहेत. त्यांच्या मताशी सहमत नसणे ही बाब भिन्न आहे. ओकांचे लेखन आपल्याला खालील दुव्यांवर पहाता येईल
http://marathi.mywebdunia.com/authors/c2hhc2hpb2Fr/articles/latest/?
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

सहमत नसणे ही बाब.
प्रेषक हैयो हैयैयो (शनि, 09/05/2009 - 09:25)

सहमत नसणे ही बाब.

श्री. ओक सरांचे नाडिग्रंथांवरील माहिती मिळवण्याचे काम, त्यांनी स्वतः घेतलेले वेगवेगळ्या नाडीग्रंथांचे अनुभव या बाबी काहीही असू शकतात. त्यांच्या मताशी आपण सहमत असलेच पाहिजे असा मला आग्रह नाही. एखाद्याच्या मतांशी सर्वसकटपणे प्रत्येकाने सहमत असणे शक्य नसते हे भान मी ठेवून आहो. विशेषतः चिकित्सकाने इतर कोणाच्याही-काहीही मतांशी सर्वसकटपणे सहमति अथवा असहमति दर्शविणे हे चिकित्सेसाठी योग्य नव्हे कारण असे केल्याने ती चिकित्सा ही मताधारित होण्याचा धोका असतो. पर्यायाने चिकित्सकाच्या स्वतःच्याच चिकित्साकार्याचे महत्त्व संपुष्टात येते. असो.

एखाद्याच्या मतांशी आपण वैयक्तिकरित्या सहमत नसाल, तर काही प्रत्यवाय नाही. परंतु एक चिकित्सक ह्यादृष्टीने आपण असहमत असाल, तर आपण स्वतः माहिती मिळविणे, स्वतः वेगवेगळे अनुभव घेणे हे कष्ट करून ह्यावर आधारित सार्थ उदाहरणे देऊन आपण कां असहमत आहात, ते स्पष्ट करणारे सार्थ आणि शास्त्रीय निष्कर्ष मांडणे आवश्यक ठरते.

सध्यापुरते श्री. ओक सरांचे लेखन विचारात घेत नाही. कारण आपण त्यांच्या लेखांची चिकित्सा केली असे मला आपल्या लेखांवरून वाटत नाही.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

ओकांचे लेखन
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शनि, 09/05/2009 - 09:56)

ओकांचे लेखन हे विचारात घेतल्या शिवाय नाडीग्रंथाच्या माहिती आधारे केलेल्या दावा वजा अनुभवाची चिकित्सा करता येत नाही .
ओकांच्या लेखना शिवाय
अमृततुषार - आत्मानंद ,यशवंत प्रकाशन पुणे
नाडी ग्रंथ एक अभ्यास - शांताराम आठवले अंजली पब्लिशिंग हाउस पुणे
ही पुस्तके जुनी आहेत व उपलब्ध आहेत
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

श्री. ओक ह्यांचे लेखन आणि इतर.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 11:48)

श्री. ओक ह्यांचे लेखन आणि इतर.

ओकांचे लेखन हे विचारात घेतल्या शिवाय नाडीग्रंथाच्या माहिती आधारे केलेल्या दावा वजा अनुभवाची चिकित्सा करता येत नाही .

आपल्या ह्या विधानास सुसंगत अशा माझ्या काही शंका आहेत.

1. आपण श्री. ओक ह्यांच्या दावा वजा अनुभवाची चिकित्सा करीत आहात की नाडिशास्त्राची चिकित्सा करित आहात?
2. असे करतांना आपली चिकित्सा ही व्यक्तिगत रोख असणारी किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारी असू शकते, आणि पर्यायाने अपूर्ण असू शकते अशी भीति एक चिकित्सक म्हणून आपणांस वाटत नाही काय? ती तशी वाटत नसेल तर कृपया कां वाटत नाही ह्याची कारणे द्या.
3. असा आपला समज आपल्या चिकित्सेच्या कितव्या पातळीवर झाला? असा समज होण्याची कारणे काय?
4. असा विचार केल्यास आपली चिकित्सा ही मताधारित होण्याची शक्यता आपणांस वाटत नाही काय? ती तशी वाटत नसेल तर कृपया कां वाटत नाही ह्याची कारणे द्या.
5. असा विचार केल्यास आपली चिकित्सा ही केवळ श्री. ओक ह्यांच्या लेखनातील मुद्द्यांना विरोध करण्यापुरती आहे असे कोणी आरोपिल्यास आपले काय उत्तर आहे?

ओकांच्या लेखना शिवाय
अमृततुषार - आत्मानंद ,यशवंत प्रकाशन पुणे
नाडी ग्रंथ एक अभ्यास - शांताराम आठवले अंजली पब्लिशिंग हाउस पुणे
ही पुस्तके जुनी आहेत व उपलब्ध आहेत.

असे आपण आता सर्वांसमोर मान्य करता, परंतु आपल्या लेखाचा प्रारंभच मात्र आपण "नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही" अशा वाक्याने करता. वरील पुस्तकांचा शोध आपणांस नव्यानेच लागला असेल असे आपली 'चिकित्सक' ही पदवी अवलोकिता जाणवत नाही. आपल्या चिकित्सेत मांडल्या जाण्यार्‍या विचारांच्या सोयीसाठी ही माहिती आपण पूर्वी दडवून ठेवली होती असे कोणी आरोपिल्यास आपले काय म्हणणे आहे?

तेंव्हा एकुणात, आपल्या चिकित्सेवर (आणि त्यातून मांडलेल्या सिद्धांतावर) आम्ही काय म्हणून विश्वास ठेवावा?

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

चिकित्सक मत
प्रेषक प्रकाश घाटपांडे (रवि, 09/06/2009 - 17:17)

आपण श्री. ओक ह्यांच्या दावा वजा अनुभवाची चिकित्सा करीत आहात की नाडिशास्त्राची चिकित्सा करित आहात?

दोन्ही चा प्रयत्न केला आहे. ओकांच्या पुस्तकातुनच् नाडीग्रंथाचा व त्यातील चमत्कारांचा प्रथमतः परिचय होतो . नाडीग्रंथ ओकांमुळे विशेष लोकप्रिय झाले. अगोदर लोकांना अनुभव घ्यायला मद्रास प्रांतात जावे लागे आता महाराष्ट्रातही नाडीकेंद्र झाली आहेत.
हा प्रश्न टिपीकल आहे. तुम्ही ज्योतिषी व्यक्तीची चाचणी घेत आहात कि ज्योतिषशास्त्र या विषयाची असा प्रश्न ही चाचणीत विचारतात. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण ती व्यक्ती आहे आन बरोबर आल तर फलज्योतिष बरोबर आल कारण ते शास्त्र आहे असा युक्तीवाद नेहमी ज्योतिषी करतात.

# असे करतांना आपली चिकित्सा ही व्यक्तिगत रोख असणारी किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारी असू शकते, आणि पर्यायाने अपूर्ण असू शकते अशी भीति एक चिकित्सक म्हणून आपणांस वाटत नाही काय? ती तशी वाटत नसेल तर कृपया कां वाटत नाही ह्याची कारणे द्या.

वाटते ना! उपाय म्हणजे इतरांनीही ओकांची पुस्तके वाचावीत आणि नाडीग्रंथाचा अनुभव घेउन त्याची चिकित्सा करावी

असा आपला समज आपल्या चिकित्सेच्या कितव्या पातळीवर झाला? असा समज होण्याची कारणे काय?

चौथ्या. प्रथम जातक नंतर् भाविक समर्थक नंतर अभ्यासक नंतर चिकित्सक. कारण विचार करण्याच्या पद्धतीत हळु हळु बदल झाला.म्हणुनच पुस्तक लिहावेसे वाटले.

असा विचार केल्यास आपली चिकित्सा ही मताधारित होण्याची शक्यता आपणांस वाटत नाही काय? ती तशी वाटत नसेल तर कृपया कां वाटत नाही ह्याची कारणे द्या.

केवळ मताधारित नाही तर तर्क, अनुभव व अभ्यास या आधारित तो प्रवास झाला.

असा विचार केल्यास आपली चिकित्सा ही केवळ श्री. ओक ह्यांच्या लेखनातील मुद्द्यांना विरोध करण्यापुरती आहे असे कोणी आरोपिल्यास आपले काय उत्तर आहे?

उत्तर क्रमांक २ नुसार

ओकांच्या लेखना शिवाय
अमृततुषार - आत्मानंद ,यशवंत प्रकाशन पुणे
नाडी ग्रंथ एक अभ्यास - शांताराम आठवले अंजली पब्लिशिंग हाउस पुणे
ही पुस्तके जुनी आहेत व उपलब्ध आहेत.

असे आपण आता सर्वांसमोर मान्य करता, परंतु आपल्या लेखाचा प्रारंभच मात्र आपण "नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही" अशा वाक्याने करता.

ग्रंथ शब्द हा जुन्या म्हणजे आर्यभट वराहमिहिर भास्कराचार्य .. अशा जुन्या ग्रंथकारांच्या ग्रंथांबद्दल आहे. वर उल्लेखलेली पुस्तके जुनी म्हणजे १९६७-७० च्या काळातील आहेत. ओकांच्या पुस्तकापेक्षा जुनी अशा अर्थाने.

तेंव्हा एकुणात, आपल्या चिकित्सेवर (आणि त्यातून मांडलेल्या सिद्धांतावर) आम्ही काय म्हणून विश्वास ठेवावा?

विश्वास ठेउच नये कारण आपणही स्वतः चिकित्सा करावी व नंतर मत बनवावे. कुणी तरी सांगतय म्हणून ते प्रमाण मानण्यापेक्षा त्याचा फक्त संदर्भ म्हणुन वापर करुन स्वतः चिकित्सा करावी असा संशयवाद सांगतो. चमत्काराच्या मागचा कार्यकारण भाव उघड झाल्यावर चमत्कार हा चमत्कार राहत नाही.
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

बापरे! हैयो हैयैयो!
प्रेषक धम्मकलाडू (शनि, 09/05/2009 - 16:00)

सध्यापुरते श्री. ओक सरांचे लेखन विचारात घेत नाही. कारण आपण त्यांच्या लेखांची चिकित्सा केली असे मला आपल्या लेखांवरून वाटत नाही.

बापरे! हैयो हैयैयो! असे तुम्हाला खरेच वाटते आहे काय? प्रकाश घाटपांडे ह्यांनी आणखी नक्की काय करायला हवे? आणखी किती वेळा किती ठिकाणी एखाद्याने दगडावर डोके आपटायचे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
»

* प्रतिसाद
* धम्मकलाडू यांना व्यनि पाठवा

होय.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 11:54)

होय.

असे तुम्हाला खरेच वाटते आहे काय?

होय मला खरेच असे वाटते.

आणखी किती वेळा किती ठिकाणी एखाद्याने दगडावर डोके आपटायचे!

आपण ज्याला डोके आपटणे म्हणतां त्यास ते चिकित्सा म्हणतांत, म्हणून मीही चिकित्सा म्हणतो.

प्रकाश घाटपांडे ह्यांनी आणखी नक्की काय करायला हवे?

निदान त्यांच्याच स्वतःच्या चिकित्सेची पूर्ति होईपर्यंत तरी श्री. घाटपांडे सर ह्यांनी माझ्या प्रश्नांस समर्पक आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत अशी माझी त्यांच्याकडे नम्र विनंती आहे.

धन्यवाद.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* संपादन
* प्रतिसाद

अंगठ्याच्या ठशाच्या युनिकनेस बाबत...
प्रेषक भटका (शुक्र, 09/04/2009 - 17:17)

अंगठ्याचे ठसे युनिक असतात ह्या मधे एक् गृहितक दडलेलं आहे असं मला वाटतं.

ते असं की ठसे तपासणार्‍या सर्व संस्था ठश्यांचे ठराविक पैलूच (स्टँडर्ड पॅरॅमिटर्स) तपासत असतील्.

पोलीस आणि नाडीवाले ठश्यांचे वेगवेगळे पैलू तपासत असतील् तर् "अंगठ्याचे ठसे युनिक असतात. म्हणून नाडीपट्टी पण एकच असली पाहिजे" या विधानाला अर्थ रहात नाही. असं जर विधान करायचच असेल तर् नाडीवाले ठश्यांमधे काय बघतात हे आधी माहित करून् घेतलं पाहिजे.

उद्या जर नाडीवाले असं म्हणाले की आम्ही फक्त रेषांची जाडीच् बघतो आणि रेषांची जाडी समान असलेले अनेक ठसे असू शकतात तर त्यात चूक काय्? भले त्यांची ठसे बघण्याची पद्धत रूढ अर्थाने अशास्त्रीय, नॉन् स्टँडर्डाइज्ड् असेल पण् त्यांचा युक्तिवाद खोडून् काढता येत् नाही आणि "ठश्यांच्या युनिकनेस" चा मुद्दापण गळून पडतो.

अर्थात हे माझं मत आहे..
»

* प्रतिसाद
* भटका यांना व्यनि पाठवा

ठराविक पैलू.
प्रेषक हैयो हैयैयो (शनि, 09/05/2009 - 08:55)

ठराविक पैलू.

श्री. भटका सर ह्यांनी एक महत्त्वाचे गृहितक येथे मांडले आहे. त्याची सत्यासत्यता काय हा विचार नंतर करता येईल. तूर्तास, ह्या गोष्टीवर आता विचार करून कुणी एक व्यक्ति आपले स्वतःचे असे स्वतंत्र मत मांडू शकते ह्याचे समाधान आहे. परंतु हे कार्य चिकित्सकमंडळींकडून पूर्वीच होणे अपेक्षित होते.

ते तसे त्यांच्याकडून झाले असते, तर निश्चितच अधिक समाधान झाले असते.

-
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* संपादन
* प्रतिसाद

मुद्दा
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शनि, 09/05/2009 - 09:43)

१) आंगठ्याचा ठसा युनिक असतो
२) नाडीपट्टी युनिक असते. पट्टीवरील वर्णन केलेली व्यक्ती एकमेव असते
३) आंगठ्याचा ठसा हे पट्टी हुडकायचे साधन असते. आंगठ्याच्या ठशावरुन कुठले निकष लाउन हुडकायची हे तो सांगत नाही.आंगठ्याच्या ठशाचा माग काढत जर तो पट्टी पर्यंत पोहोचत असेल तर इतर प्रश्न का विचारायला लागतात? म्हणजे केवळ आंगठ्याचा ठशावरुन तुमची पट्टी शोधुन तुमचे भुत भविष्य वर्तमान त्यात असते असे सांगणे हे संशयास्पद आहे.
समांतर- पाच हजार वर्षापुर्वी ऋषी मुनींनी तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, वडिलांचे नांव, तुमची कुंडली ही लिहुन ठेवली आहे हे आपणास विश्वसनीय वाटते का?
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

नंदन निलेकणींशी बोलायला हवे.
प्रेषक धम्मकलाडू (रवि, 09/06/2009 - 12:53)

नाडीपट्टी युनिक असते. पट्टीवरील वर्णन केलेली व्यक्ती एकमेव असते

खरेच की काय? नंदन निलेकणी ह्यांनी केंद्र सरकारच्या युनीक आयडी ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ह्या नाडीवाल्यांची मदत घेता येईल काय? कुणीतरी निलेकणींशी बोलायला हवे. प्रचंड प्रमाणात खर्च वाचेल असे म्या अडाण्याला वाटते. नाडीच्या मदतीने येत्या पिढ्यांचे युनीक आयडीही काढून ठेवता येईल. कृपया जाणकारांनी ह्यावर भाष्य करावे, ही विनंती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
»

* प्रतिसाद
* धम्मकलाडू यांना व्यनि पाठवा

समांतर चिकित्सा.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 15:49)

समांतर चिकित्सा.

समांतर- पाच हजार वर्षापुर्वी ऋषी मुनींनी तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, वडिलांचे नांव, तुमची कुंडली ही लिहुन ठेवली आहे हे आपणास विश्वसनीय वाटते का?

उपक्रम सारख्या संकेतदळावर अशा प्रकारे अपरिपूर्ण माहिती देवून, एखाद्या विषयावर लोकांची मते मागवून त्यावर आधारून आपले विचार मांडणे ह्याला समांतर चिकित्सा म्हणतांत कां?

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* संपादन
* प्रतिसाद

तुम्हाला माझा मुद्दा खरच समजला का?
प्रेषक भटका (मंगळ, 09/08/2009 - 17:11)

>>१) आंगठ्याचा ठसा युनिक असतो.

परत तेच. कुठल्या निकषांसाठी ठसा युनिक असतो? आता तुम्हाला समजेल अश्या भाषेत मांडतो.. समजा माझ्या सोयीसाठी मी "अंगठ्याच्या ठश्याची रुंदी" हा एकच निकष वापरत असेन तर् एकच रुंदी असलेले अनेक ठसे मिळतील. अश्या परिस्थीतीत "अंगठ्याचा ठसा युनिक असतो" असा तुम्ही कितीही टाहो फोडलात तरी माझ्या लेखी त्याची किंमत शुन्य. कारण एकच रुंदी असलेले १० ठसे माझ्या समोर पडले आहेत्. म्हणूनच जर नाडीवाले पोलिस वापरतात तसले कुठलेच निकष वापरत नसतील् तर् "अंगठ्याचा ठसा युनिक असतो" या विधानाला अर्थ रहात नाही.
नाडीवाले ठसे तपासण्यासाठी कुठले निकष वापरतात हे तर् आधी माहित करून् घ्या..ते निकष चुकीचे असतील्, अत्यंत बिनडोक् असतील् पण् तो वेगळा मुद्दा झाला

"नाडीवाल्यांचे ठश्यांसाठीचे निकष्" माहीत नसताना अजूनही जर तुम्ही "आंगठ्याचा ठसा युनिक असतो." हाच मुद्दा ताणणार असाल तर् नाईलाजाने असं म्हणावं लागेल् की एकतर् तुम्हाला अजुनही मुद्दा पूर्णपणे समजला नाही आहे किंवा तुम्ही "बायस्ड" आहात.

"समांतर- पाच हजार वर्षापुर्वी ऋषी मुनींनी तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, वडिलांचे नांव, तुमची कुंडली ही लिहुन ठेवली आहे हे आपणास विश्वसनीय वाटते का?"

हा प्रश्न मला विचारायच कारण समजलं नाही..माझं उत्तर काहीही असलं तरी वरील मुद्याशी त्याचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. म्हणून् या प्रश्नाकडे दुर्लक्ष.
»

* प्रतिसाद
* भटका यांना व्यनि पाठवा

यत्र् तत्र नाडी
प्रेषक बाल सान्दीपानी (शुक्र, 09/04/2009 - 18:20)

थोडक्यात नाडी वाल्या कडून त्याबद्दल माहीती मीळायाला हवी.
»

* प्रतिसाद
* बाल सान्दीपानी यांना व्यनि पाठवा

ज्योतिष
प्रेषक बाल सान्दीपानी (शनि, 09/05/2009 - 19:08)

डेरेन ब्रोवुनचे एक ज्योतिरश्यावर आधारीत सुन्दर चलचीत्र.

दुवा :ज्योतिष
»

* प्रतिसाद
* बाल सान्दीपानी यांना व्यनि पाठवा

भारतात "प्रायव्हसी लॉज्" काय म्हणतात?
प्रेषक सहज (रवि, 09/06/2009 - 04:00)

बर्‍याच लोकांच्या न कळत व त्यांच्या लिखीत परवानगीशिवाय त्यांची खाजगी माहीती साठवण्याचा व त्याचा व्यावसायीक कारणाकरता (पैसे कमवायला) उपयोग करायचा अधिकार नाडीकेंद्रांना आहे का?

कायदा काय म्हणतो? वकील असल्याने श्री. हैयो हैयैयो यांना कदाचित आधिक माहीती असेल.

कोणी जाणकार खुलासा करु शकेल का?
»

* प्रतिसाद
* सहज यांना व्यनि पाठवा

सिद्ध करून दाखविता आल्यास.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 05:10)

सिद्ध करून दाखविता आल्यास.

बर्‍याच लोकांच्या न कळत व त्यांच्या लिखीत परवानगीशिवाय त्यांची खाजगी माहीती साठवण्याचा व त्याचा व्यावसायीक कारणाकरता (पैसे कमवायला) उपयोग करायचा अधिकार नाडीकेंद्रांना आहे का?

न्यायशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून आणि 'वकील असल्याने मला आधिक माहीती असेल' ह्या शब्दांत आपण माझ्यावर असलेला आपला विश्वास व्यक्त केला म्हणून हा खुलासा खालीलप्रमाणे करू इच्छितो:

'असा अधिकार नाडिकेंद्रांना आहे का' हा प्रश्नः

१. ही माहिती नाडिकेंद्रांकडून लोकांच्या नकळत - लिखित परवानगीशिवाय साठविली जाते असे उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करतां आल्यास, आणि
२. ही माहिती ज्यांच्याबाबतीतली आहे, त्यांच्या बाबतीत ती पूर्णत: बरोबरच आहे असेही उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करतां आल्यास, आणि
३. त्याचा व्यावसायिक कामाकरिता उपयोग केला जातो असा आरोप करून तोही उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करण्यात आल्यास

त्यानंतर विचार करता यावयाचा आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे साहजिकच चिकित्सकांच्या कक्षेत येते. तूर्तास तरी काही अनाकलनीय कारणाच्या भयापोटी आपल्या चिकित्सकमंडळींचे चिकित्साकर्म मंदावलेले दिसते.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

पण
प्रेषक सहज (रवि, 09/06/2009 - 05:32)

>त्यानंतर विचार करता यावयाचा आहे.

अहो ते नाडीकेंद्रवाले असा दावा करतात ना, की त्यांच्याकडे आधीपासूनच कूटलिपीत माहीती आहे व हवी असल्यास पैसे देउन मिळवा? इतर ज्योतिषवाले निदान पत्रिकामांडून (पत्रिका मांडायचे शास्त्र गुप्त नाही आहे, त्याचा अभ्यासक ते शिकू शकतो) ग्रहस्थिती बघुन भविष्य वर्तवतात. नाडीवाले दावा करतात कि कोणीतरी आधीपासुनच सगळे वैयक्तिक ओळखुन व ती माहीती साठवून आहे. बरोबर? का काही समजण्यात चूक होते आहे?
»

* प्रतिसाद
* सहज यांना व्यनि पाठवा

करेक्ट !
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (रवि, 09/06/2009 - 08:24)

नाडीकेंद्रवाले असा दावा करतात ना, की त्यांच्याकडे आधीपासूनच कूटलिपीत माहीती आहे व हवी असल्यास पैसे देउन मिळवा?

अगंठ्याचा छाप, जन्मतारीख आणि पैसे दिल्यावर नाडीपट्टीवर भाकिते उमटत असतील असे वाटते.
तो पर्यंत कुटलिपीतील भाकिते अन्य कुणाला वाचता येत नसतील असे वाटते. च्यायला अवघड होत चालला हा विषय. अनुभव घेतला नसल्याने हा प्रकार ढोंग आहे, असे आत्ताच म्हणनार नाही. बाकी चालू द्या....!

-दिलीप बिरुटे
»

* प्रतिसाद
* प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांना व्यनि पाठवा

वाटणे, अनुभव आणि चिकित्सा.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 11:33)

वाटणे, अनुभव आणि चिकित्सा.

अगंठ्याचा छाप, जन्मतारीख आणि पैसे दिल्यावर नाडीपट्टीवर भाकिते उमटत असतील असे वाटते. तो पर्यंत कुटलिपीतील भाकिते अन्य कुणाला वाचता येत नसतील असे वाटते.

चिकित्सेत जोपर्यंत तसे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या 'वाटण्याला' काही महत्त्व नाही.

च्यायला अवघड होत चालला हा विषय.

ह्या विषयाकडे माझ्यासारखे तटस्थ दृष्टिकोनातून बघा, सोपा वाटू लागण्याची एक शक्यता आहे!

अनुभव घेतला नसल्याने हा प्रकार ढोंग आहे, असे आत्ताच म्हणनार नाही. बाकी चालू द्या....!

आपल्या निर्मल प्रतिक्रियेचे स्वागत आहे. आपल्यासारखेच मत आमचे चिकित्सक मंडळींचे होते, तर समाधान झाले असते.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* संपादन
* प्रतिसाद

अहो तोच तर विषय आहे!
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 12:09)

अहो तोच तर विषय आहे!

नाडीकेंद्रवाले असा दावा करतात ना, की त्यांच्याकडे आधीपासूनच कूटलिपीत माहीती आहे व हवी असल्यास पैसे देउन मिळवा

त्यांचा तो दावा खोडून काढणे ही सर्वथा चिकित्सकांच्या कार्यकक्षेतील बाब आहे.

नाडीवाले दावा करतात कि कोणीतरी आधीपासुनच सगळे वैयक्तिक ओळखुन व ती माहीती साठवून आहे. बरोबर? का काही समजण्यात चूक होते आहे?

त्यांचा तथाकथित दावा समजण्यात आपल्याकडून काहीएक चूक होत नाही असे मला माझ्या समजुतीवरून वरकरणी वाटते आहे. परंतु 'त्यांचेकडे आधीपासूनच कूटतमिळलिपीत माहिती उपलब्ध आहे' हा दावा सत्य आहे की असत्य ह्याची चिकित्सकांकडून शास्त्रशुद्धरित्या पडताळली गेली तर तेथून पुढचा आपण म्हणतां तसा विचार करता येतो.

चिकित्सकांकडून काय चिकित्साकर्म झाले आहे, ते एवढ्यावरूनच ओळखावे, आणि त्या चिकित्साविचारांवर काय विश्वास ठेवावा, ह्याचा विचार व्हावा.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* संपादन
* प्रतिसाद

चमत्कार.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 13:15)

चमत्कार.

नमस्कार,

श्री. ओक सर ह्यांनी लिहिलेल्या ’भरकटलेली चर्चा’ ह्या लेखांत ’धनंजय ह्यांनी पट्टीत शशिकांत हे नाव कसे लिहिलेले आहे ह्याचे प्रात्यक्षिक देवून लिखाणाला दुजोरा दिला आहे’ असे लिहिले आहे. ह्यातील तमिळ अक्षरांबाबत आणि त्यांच्या लेखनाबाबत श्री. धनंजय सर ह्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या माहिती देवून मला काही प्रश्न विचारले होते. त्यावरील बरीच चर्चा आणि उत्तरे ह्या विषयास सुसंगत असल्याकारणाने त्या प्रश्नांची उत्तरे येथे खालीलप्रमाणे देणे करतो आहे.

श्री. धनंजय सर मला असे लिहितांतः

अन्यत्र एके ठिकाणी मी लिहिले आहे:

- - -(उद्धृत)
श्री. ओक यांनी एका पट्टीचे चित्र काही संकेतस्थळांवरती प्रकाशित केले आहे.

त्यात बाणांनी दाखवलेली अक्षरे लावण्या इतपत तमिळ लिपी मला वाचता येते. (पण बाकी पट्टीतले क्वचितच एखादे अक्षर मला लागते.)

बाणाने दाखवलेली अक्षरे अशी आहेत :
१. 'च' (तमिळ लिपीमध्ये च, छ, ज, झ, स, श, ष या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
२. 'चि' (तमिळ लिपीमध्ये चि, छि, जि, झि, सि, शि, षि या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
३. 'का' (तमिळ लिपीमध्ये का, खा, गा, घा या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
४. न्
५. त (तमिळ लिपीमध्ये त, थ, द, ध या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)

असे सर्व पर्याय असले तरी बहुतेक तमिळ वाचक "ससिकान्त" किंवा (वाचक ब्राह्मण असल्यास) "शशिकान्त" असाच उच्चार करेल.

परंतु त्या चित्राचे कशाबद्दल प्रमाण (यात नेमका काय चमत्कार) म्हणून काय अर्थ आहे, ते मला कळले नाही.

माझ्याकडील एका पुस्तकात "धनंजय" असा शब्द स्पष्ट छापलेला आहे, तो मी बघितला आहे. पण त्यावरून गीताप्रेस-गोरखपूर-भविष्य केंद्राचा चमत्कार असे कोणी म्हटल्यास मी अत्यंत संभ्रमित होईन.

त्याच प्रमाणे माझ्याकडील एका ग्रंथात (अमरकोष) जवळजवळ सर्व सामान्य संस्कृतोद्भव नावे कुठे ना कुठे सापडतात. या ग्रंथाची छापील प्रत मी वापरतो, पण या ग्रंथाचे हस्तलिखित (माझ्या खापरपणजोबांच्या माळ्यावर सापडलेली बरीच जीर्ण पाने) माझ्यापाशी आहेत. त्यातही खूप नावे सापडतील. माझ्या आजोबांना अमरकोष तोंडपाठ होता, त्यांना फार शोधाशोध न करता नाव असलेले पान लगेच सापडले असते. पण त्यात "नेमका चमत्कार तो काय?" हे कोणालाही पटवून देणे कठिण जाईल. "धनंजयचे पणजोबा हस्तलिखित बाडे भविष्य केंद्रा"स या चमत्कारातून काहीही सामर्थ्य मिळत नाही, असे मला तरी वाटते.

फरक हा की त्या अमरकोषाच्या हस्तलिखितातले सर्वच शब्द सुवाच्य आहेत, आणि श्री. ओक यांनी प्रकाशित केलेल्या चित्रात तो एकच शब्द सुवाच्य आहे.

असो. "चमत्कार" म्हणजे नेमके काय, या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी असावी. व्याख्या-परिभाषांची निश्चिती झाल्याशिवाय संवाद आणि तर्क निष्फळ असतात. म्हणून त्या चित्राच्या संदर्भात मी आजपर्यंत काहीच बोललेलो नाही.
- - - उद्धृत समाप्त - - -
http://www.misalpav.com/node/9218#comment-144842

या बाबतीत उपक्रमावर "चमत्कारा"ला तुम्ही दुजोरा दिला होता असे अंधुक आठवते. "ससिकान्त/शशिकान्त" असे त्या पट्टीवरती मीसुद्धा वाचले होते. पण त्यात चमत्कार काय तेच मला कळले नव्हते. तुमच्या मते चमत्कार आहे काय?

येथे श्री. धनंजय सरांचे लिहिणे संपते आणि ह्यावर मी माझे मत व्यक्त करणे त्यांना अपेक्षित आहे.

त्यांच्या म्हणण्यांप्रमाणे ’चमत्कार’ ह्या शब्दाची एक विशिष्ट अशी व्याख्या सर्वमान्य होईपर्यंत तर्क सर्वथा निष्फल आहे. वाचकांस माझे मत ह्यापेक्षा थोडेसे भिन्न वाटेल, परंतु ते तसे भिन्न नाही. येथे माझे मत मी एका उदाहरणाद्वारे नोंदवू इच्छितो जेणेकरून मला काय म्हणावयाचे आहे ते वाचकांस सुलभ शब्दांत कळणे शक्य होईल.

कोणत्या घटनेस अथवा वस्तुस सिद्ध होईपर्यंत 'चमत्कार' असे संबोधावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उदाहरणार्थ : रैट बंधुंनी प्रथमत: विमान उडविले असता त्यास आरंभी सामान्य जनते कडून ’चमत्कार’ (Miracle) असे संबोधण्यात आले होते. येथे ह्या उदाहरणापुरते पाहिले तर असे लक्षात येईल की वास्तविक पाहता ’विमान उडवणे’ हा सामान्यजनांसाठी जोपर्यंत ते कसे उडते हे शास्त्रीयरित्या कळत नाही केवळ तोपर्यंतच चमत्कार होऊ शकतो.

तात्पर्य काय की 'चमत्कार' आहे अथवा नाही ह्या विषयास बाजूला ठेवून एकदा का त्यामागील कारणमीमांसा अभ्यासिली गेली की त्यातील ’चमत्कृती’ संपुष्टात येते.

नाडिग्रंथ आणि नाडिज्योतिष ह्याबाबतसुद्धा ह्याप्रकारचा कारणमीमांसेचा अभ्यास होणे थोडे कठीण वाटत असले, तरी आवश्यक आहे. असा अभ्यास झाला आणि कारणमीमांसा तथा कार्यपद्धति कळली, तर पुढे चमत्काराचे अस्तित्त्व मान्य करावयाचे की अमान्य करावयाचे हे ठरविता येईल. हा अभ्यास तटस्थ चिकित्सकांकडूनच होणे शक्य आहे. 'चमत्कार' अस्तित्त्वांत नसतो असे विधान ठोकून देवून केवळ विरोधाकरिता विरोध करून त्यांस ’चिकित्सा’ केली असे म्हणणार्‍या चिकित्सकांकडून असा अभ्यास होणे कदापि शक्य नाही.

असो. मी "चमत्कारा"ला दुजोरा दिला होता असे श्री. धनंजय सर ह्यांना अंधुक आठवते त्याबद्दलः

येथे झालेल्या चर्चेमध्ये श्री. ओक सर ह्यांनी 'हा घ्या चमत्काराचा पुरावा' असा प्रतिसाद नोंदवला होता. त्यातील तमिळ अक्षरांबाबत मी माझे मत नोंदवले आहे. ह्या नोंदविलेल्या मतामध्ये मी कोणत्याही चमत्कारास दुजोरा दिला असे मला वाटत नाही. इतर कोणास वाटत असल्यास तसे मला कळवावे. श्री. ओक सरांनी जे प्रकाशचित्र चढविले आहे, त्यात त्यांनी 'चमत्काराचा पुरावा' असे म्हणून तमिळ अक्षरांस निर्देशिले आहे. एक अधिवक्ता म्हणून ती अक्षरे (चमत्कारास बाजूस ठेवून) पुरावा म्हणून विचारात घेतली जाऊ शकतांत असे माझे मत आहे.

नाडिग्रंथ आणि नाडिज्योतिष हे माझ्यामते चमत्कार आहेत काय, ह्या प्रश्नाचे उत्तर वाचकांस माझे वरील विवेचन वाचून आपसूकच उमगेल असे वाटते.

--
हैयो हैयैयो!

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
»

* संपादन
* प्रतिसाद

श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - १.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 13:26)

श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - १.

श्री. धनंजय सरांनी माझ्या एका प्रतिसादातील एका वाक्यावर आपत्ती दर्शवून मला येथे वैयक्तिकरित्या लिहिले होते. त्यावरील बरीच चर्चा आणि उत्तरे ह्या विषयास सुसंगत असल्याकारणाने त्या प्रश्नांची उत्तरे येथे खालीलप्रमाणे देणे करतो आहे.

---श्री. धनंजय सरांची खरड १.---

हा जरा कठिण प्रकार दिसतो. उत्तरे घाटपांडे देतील, पण हा थोडा वेगळा विषय आहे, म्हणून वेगळे विचारतो आहे.

>> आपले चिकित्साकार्य हे शास्त्रीय असल्याचे सिद्ध झालेच तर ...

"अमुक" चिकित्सा शास्त्रीय आहे, याची कुठली सिद्धता तुम्हाला मान्य आहे? कदाचित तसे शब्दांकन कठिण असेल, पण अधिक सार्वत्रिक असे कुठले उदाहरण देऊ शकाल का? ("सार्वत्रिक" म्हणजे वेगवेगळ्या देशांतही सहज सापडू शकेल असे कुठलेसे चिकित्साकार्य, जे तुमच्या मते शास्त्रीय आहे. आणि त्या उदाहरणाचे विवेचन करून सिद्धता समजावून सांगावी.)

तुमच्या लेखनात कुठलातरी टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.

भारतीय न्यायशास्त्रात (गौतम ऋषींच्या - ज्याला आपण आजकाल "लॉजिक" म्हणू), तसेच वेगवेगळ्या देशांतल्या लोकांनीही प्रमाणांबद्दल चर्चा केलेली आहे. प्रत्यक्ष (स्वानुभव)/अनुमान (डिडक्टिव, इंडक्टिव लॉजिक)/उपमान (इंडक्टिव लॉजिक आणि ऍनॅलॉजी)/शब्द (विटनेस) या वेगवेगळ्या प्रमाणांबद्दल चर्चा झालेली आहे.

"अनुमान" हे प्रमाण तुम्हाला मान्य नाही काय? अनुमानाचे प्रमाणत्व मान्य केले नाही तर त्याचे तोटे शंकराचार्यापासून हल्लीच्या लोकांपर्यंत कित्येकांनी विवरण करून सांगितले आहेत. मला तरी "अनुमान" या प्रमाणाचा उपयोग झालेला आहे, आणि ते नसते तर माझा रोजचा व्यवहारच कुंठित झाला असता. (म्हणजे खोलीत थोडासा उजेड दिसू लागला, म्हणजे सकाळ बरीच झाली आहे, असे अनुमान प्रमाण मानून मी ताडकन उठतो. माझ्या बिछान्यावर थेट सूर्य येत नाही - म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदर्शन कधीच होत नाही. तसे प्रत्यक्ष सूर्यदर्शन झाल्याशिवाय, "उजेड->सूर्योदय" असे अमान्य केल्यास माझे वेळेवर बिछान्यातून उठणे बिघडेल. दिवसभरात असे आडथळे पदोपदी येतील!)

प्रयोगशाळेतल्या संशोधनात तरी असे काही तत्त्व आहे : "तुल्यबल अनुमानांमध्ये विरोध असला, तर प्रत्यक्ष हेच प्रमाण त्या दोहोंपैकी योग्य अनुमानपद्धती सांगते." अहो, प्रत्येक प्रात्यक्षिक प्रयोगाचा पैशाच्या आणि मनुष्यबळाच्या दृष्टीने मोठा खर्च असतो. म्हणून अनुमाने साशंक असली तरच प्रात्यक्षिक करण्यास अनुदान मिळते. नाहीतर कुठलाही शोध पुढे सरणारच नाही. कारण एखादा प्रयोग पुन्हापुन्हा केल्यानंतरही, जगातील प्रत्येक प्रश्नकर्त्याला प्रयोगशाळेत आणून तोच तो प्रयोग पुन्हा करावा लागेल. (कारण त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय निष्कर्ष त्यांना अमान्य आहे!)

अनुमान प्रमाण म्हणून अमान्य केल्यास असे भयंकर तोटे होतात असे तुम्हाला पटत नाही का?

---खरड १ समाप्त.---

***खरड १स माझे उत्तर १.***

नमस्कार,

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास हा प्रकार अजिबात कठीण नाही.

> "अमुक" चिकित्सा शास्त्रीय आहे, याची कुठली सिद्धता तुम्हाला मान्य आहे?

ह्या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून द्यावयाचे झाल्यास, जोपर्यंत त्रुटी आढळतात तोपर्यंत चिकित्सापूर्ति झाली असे मला सामान्यतः वाटत नाही. एखाद्या शास्त्रीय सिद्धांतात आपणांस त्रुटी आढळल्या, तर आपण तो शास्त्रीय सिद्धांत मान्य कराल काय? त्या विषयाचा सर्वांगपरिपूर्ण अभ्यास केला गेल्याशिवाय तो त्रुटीपूर्ण सिद्धांत मान्य करणे कोणत्या शास्त्रीय निकषांस मान्य आहे ह्याचे उदाहरण देवून त्या उदाहरणाचे विवेचन करून सिद्धता समजावून सांगावी.

> तुमच्या लेखनात कुठलातरी टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.

येथे काही वाद आहे असे मला वाटत नाही, आणि वाद असलाच, तर तो टोकाचा नाही. आपण ज्याला 'वाद' असे म्हणतां त्याला मी 'आग्रह' असे म्हणतो. चिकित्साशास्त्र प्रत्यक्ष अनुभूतिस अमान्य करते असे आपले म्हणणे आहे काय?

येथे एक प्रश्न आपणाकरिता : लेखकाची मते वैयक्तिक असती तर आपणांस आपण म्हणतां तसे वाटले असते काय? येथे अनेक सदस्यांनी आपापली वैयक्तिक मते विविधप्रकारे मांडली आहेत, आणि मी त्यांच्या त्या वैयक्तिक मतांबद्दल एक चकार शब्ददेखील बोललेलो नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. प्रत्येक मनुष्याची सर्वच्या सर्व मते एकसारखी असणे शक्य नाही हा सिद्धांत मी जाणून आहो.

>"अनुमान" हे प्रमाण तुम्हाला मान्य नाही काय?

ह्याचे उत्तर 'मान्य आहे' असे आहे. अनुमानास प्रमाण म्हणून अमान्य केल्यास भयंकर तोटे होऊ शकतात ह्याबद्दल कोणाचे दुमत असू नये. परंतु हे प्रमाण सर्वसकट लागू करतांना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एका गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, प्रयोगशाळेतली तत्त्वे ही प्रयोगशाळेबाहेर (विशेषत: समाजशास्त्रात) सर्वसकटरित्या लागू होत नाहीत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून (आठवा : जनहितार्थ) चिकित्सा करताना समाजशास्त्रीय तत्त्वे विचारात घेणे अधिक सयुक्तिक ठरते. असो.

जोपर्यंत आपले सिद्धांत त्रुटीपूर्ण आहेत, तोपर्यंत ते सर्वमान्य होणे शक्य नाही हे लक्षात घेवून आपल्या वैयक्तिक अनुमानास 'चिकित्सा' अथवा 'सिद्धांत' असे शब्दप्रयोग करून संपूर्ण समाजावर आग्रही रीतिने लादणे हे योग्य नव्हे. आपल्या सिद्धांतातल्या त्रुटी जर कोणी दाखवून दिल्या, तर पलायनवाद स्वीकारणे हेही योग्य नव्हे. आपल्या मतांमध्ये-सिद्धांतांमध्ये कमतरता असेल, आणि जर कोणी तसे दाखवून दिले, तर लेखकाने ते प्रांजलपणे मान्य केलेच पाहिजे, कारण चिकित्सा ही आग्रही नसते. येथे तर मला केवळ दुराग्रह दिसतो आहे. आपण पाहिलेच असेल माझ्या प्रश्नांकडे कसे चक्कन् दुर्लक्ष करण्यात आले होते ते!

असो. लेखकाने 'नाडिशास्त्र थोतांड आहे' हे आपले वैयक्तिक मत आहे असे प्रतिपादन केले असते तर त्यांचे मत विचारात घेण्याचे काहीएक कारण नव्हते. परंतु 'चिकित्सा' हा शब्दप्रयोग आणि पुस्तक लिहिणे - आग्रही मते आक्रमक पद्धतीने मांडणे - नारळीकरांसारख्या मान्यवरास बोलावून परिक्षण लिहून घेणे असे कर्म(!) ह्यामुळे ह्या चिकित्सेवर चिकित्साविचार करणे भाग पडते.

मला एक विशेष आश्चर्य राहून राहून वाटते ते असे, की नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाला सुद्धा, मला पडतात तसे साधेसरळ प्रश्न पडले नसतील काय? अर्थात, आपणांस पडद्यामागच्या हालचालींचा नुसता वेधच घेता येतो!

पण प्रत्यक्षात दिसतात त्या गोष्टीही काही कमी बोलत नाहीत!!!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

हैहैयो चे विचार मुद्देसुद आहेत
प्रेषक बक्कु बिलंदर (रवि, 09/06/2009 - 13:44)

प्रतिसाद संपादित.
»

* प्रतिसाद
* बक्कु बिलंदर यांना व्यनि पाठवा

श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - २.
प्रेषक हैयो हैयैयो (रवि, 09/06/2009 - 13:39)

श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - २.

खरड १स मी दिलेल्या उत्तरावर श्री. धनंजय सरांनी खरड २ लिहून काही नवे प्रश्न उपस्थित केले, ते आणि त्यावर माझे विचार येणेप्रमाणे:

---श्री. धनंजय सरांची खरड २:---

तुम्ही स्वतःला पटलेल्या एखाद्या सिद्धांताचे उदाहरण देऊन मला समजावून सांगाल अशी इच्छा होती. माझ्या मते कुठलेही ज्ञान कधीही पूर्ण नसते, कारण जितके समजू तितके अधिक समजण्यालायक आहे, असे आपल्याला जाणवेल. त्याअर्थी त्रुटी संपल्या असे कधी होणारच नाही. त्रुटीपूर्णता ही सर्वकाळसाठी आहे, माझे जीवन मात्र मर्यादित आहे. माझ्या मते "सिद्धांत" म्हणजे काय? आता, सर्वज्ञता मिळण्यापूर्वी, कार्य करण्यास दिशा देणारे सर्वाधिक ठोस नियम. तुमच्या मते "त्रुटी नसलेला सर्वमान्य सिद्धांत" म्हणण्यालायक असे काही या जगात आहे का?

तुम्ही वर त्रुटिपूर्ण सिद्धांतांची उदाहरणे मागितली म्हणून येथे देतो :

एक ऐतिहासिक उदाहरण मी या लेखात दिले आहे :
http://mr.upakram.org/node/1347
या लेखात ज्वलनासाठी नवीन सिद्धांत उदयाला कसा आला, त्याने त्यापूर्वीच्या कुठल्या त्रुटी दूर केल्या, त्यात खुद्द कुठल्या त्रुटी राहिल्या, त्या पुढील सिद्धांताने कशा दूर केल्या.

सध्याच्या काळातले उदाहरण मी येथे दिलेले आहे:
http://mr.upakram.org/node/1341
यात न्यूटनच्या आणि सापेक्षतासिद्धांतातील त्रुटी कुठल्या त्यांचे विवेचन आहे. तरी, त्या निस्तरेपर्यंत होईपर्यंत त्या दोन सिद्धांतांना कार्यशील मानण्यात (त्यांच्या पूर्वीच्या अधिक त्रुटीपूर्ण सिद्धांतापेक्षा) फायदा कुठला? हे लेखात येते.

- - -

राहिली "वैयक्तिक मत" विरुद्ध "चिकित्सा" ही चर्चा.
जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत, वगैरे, अनुमाने मला वैयक्तिक न वाटता सामान्यगणितातली वाटतात. आर्य-द्रविड लोकांच्या मेळजोळाच्या लिपि-इतिहासाशी नाडीपट्ट्यांच्या कथा जुळत नाहीत. ब्राह्मी लिपीनंतर जे दक्षिणेकडील ग्रंथलिपीत लिहायचे, ते एकदम तमिळ लिपीत दिसते - हे अनुमानही मला वैयक्तिक वाटत नाही, तर सार्वजनिक माहितीतले वाटते. उलट नाडीकेंद्रात चांगला अनुभव आलेल्यांचे अनुभव वैयक्तिक आहेत. त्यातही ज्यांनी नाडी वाचून घेताना प्रश्न-उत्तरे ध्वनिमुद्रित केलीत त्यांचा अनुभव आता सार्वजनिक आहे. माझ्यासाठी ऐकीव (वाचलेला) असला, तरी तो कोणीतरी केलेला प्रयोग सार्वजनिक आहे. विचारलेल्याच प्रश्नांची उत्तरे त्या व्यक्तीला पट्टीतून मिळाली.
- - -

हे सर्व बघता प्रत्यक्ष अनुभवाच्या किमतीच्या योग्य मला हा प्रकार वाटत नाही. (मला प्रत्यक्ष अनुभव घ्यायला विमान तिकिटाचे धरून ५०,००० रुपये लागतील!)

काचेच्या लोलकात बघून भविष्य सांगणारी एक बाई माझ्या गल्लीत आहे. तिच्याकडे बरीच गिर्‍हाइके जातात. मी जात नाही. केवळ ५००-१००० रुपये! तरी "प्रत्यक्ष" अनुभव घेण्यालायक मला तथ्य वाटत नाही. हे "वैयक्तिक". पण माझे मित्र गेल्यास, त्यांना पैशाचा मिळालेल्या समाधानाशी चांगला हिशोब जुळवून घ्यायला सांगतो - म्हणजे वैयक्तिकपेक्षा अधिक विरोध झाला.

भविष्य सांगून पैसे मिळवण्याचे जगात शेकड्यानी प्रकार आहेत. मनोरंजनाचे साधन म्हणून हे सर्व प्रकार (किंमत योग्य असली तर) उत्तम आहेत. पण सत्यशोधनासाठी त्यांच्यात सार आहे असे मला वाटत नाही. आणि हे अनुमान वैयक्तिक नव्हे - सार्वजनिक तथ्यांमधून बनवलेले आहे. त्या शेकडो प्रकारांचे पुरस्कर्ते कितीका जाहिरात करोत.

पण तुम्ही आमच्या इथे येऊन, काचेच्या गोळ्यात बघून भविष्य सांगणार्‍या बाईंकडे "प्रत्यक्ष" अनुभव घ्याच राव! :-)

---खरड २ समाप्त---

***खरड २स माझे उत्तर २.***

> माझ्या मते कुठलेही ज्ञान कधीही पूर्ण नसते, कारण जितके समजू तितके अधिक समजण्यालायक आहे, असे आपल्याला जाणवेल. त्याअर्थी त्रुटी संपल्या असे कधी होणारच नाही. त्रुटीपूर्णता ही सर्वकाळसाठी आहे, माझे जीवन मात्र मर्यादित आहे. माझ्या मते "सिद्धांत" म्हणजे काय? आता, सर्वज्ञता मिळण्यापूर्वी, कार्य करण्यास दिशा देणारे सर्वाधिक ठोस नियम. तुमच्या मते "त्रुटी नसलेला सर्वमान्य सिद्धांत" म्हणण्यालायक असे काही या जगात आहे का?

- आता कसे बोललात! खरे आहे, चिकित्सकाला ह्याविषयीचे ज्ञान होणे एवढे जरी झाले तरी ते चिकित्सेसाठी महत्त्वाचे आहे. हे ज्ञान झाल्यास चिकित्सा योग्य मार्गाने चाललेली आहे असे एका अर्थाने म्हणता येते. कारण मग ही चिकित्सा दुराग्रही न होता लवचिक होते. समाजशास्त्रीय विचारांमध्ये खरा चिकित्सक ’मी म्हणतो तेच आणि तेवढेच सत्य आहे, त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना मी म्हणतो त्याशिवाय सारे असत्य आहे.’ असे विधान करूच शकत नाही. त्याचे कारण ’कुठलेही ज्ञान कधीही पूर्ण नसते, कारण जितके समजू तितके अधिक समजण्यालायक आहे’ हे ज्ञान होय. तरीही त्याने असे विधान केलेच, तर ते स्वीकारण्यापूर्वी त्या विधानाचा सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास होणे आवश्यक आहे.

येथे चिकित्सेच्या नावाखाली आपणांस वर म्हटल्याप्रमाणे अत्यंत टोकाचा ’मी म्हणतो तेच खरे’ असा विचार अत्यंत आग्रही आणि आक्रमक पद्धतिने मांडलेला प्रथमदर्शनात दिसेल. ह्या सिद्धांतात ’सर्वज्ञता मिळण्यापूर्वी कार्य करण्यास दिशा देणारे सर्वाधिक ठोस नियम’ जे काही असावेत ते मुख्यत: ठिसूळ माहितीवर आधारीत असावेत असा माझा प्राथमिक अंदाज (लेखकाचे लेख वाचून) झाला होता. माझा अंदाज चुकीचाही असू शकतो, असा विचार करून लेखकांस विचारावे असे म्हणून मी काही प्रश्न विचारले तेंव्हा लेखकाने दिलेल्या ब-याचशा उत्तरांवरून असे लक्षात आले की त्यांचा सिद्धांत हा मुख्यत: ऐकीव माहितीवर आधारलेला, ठोस स्वानुभवाचा संपूर्ण अभाव असलेला, आणि अभ्यासशून्य आणि त्यामुळे एकुणात त्रुटीपूर्ण असा आहे. आता त्रुटीमध्ये सुधारणा होऊ शकतात, आणि त्या तशा केल्या गेल्या, तर सिद्धांतास अधिक प्रखर प्रामाण्य येते असे माझे मत आहे. (आपण दिलेल्या दोन उदाहरणांवरून आपलेही तसेच मत असावे असे सामान्यत: वाटते.) पण हे ह्या लेखकांस कोण सांगणार? येथे तर शुद्ध हेकेखोरपणा दिसतो आहे.

असो. लेखकाचा श्री. ओक ह्यांच्या मतांशी व्यक्तिगत वाद होता किंवा आहे असे त्यांनी लिहिलेल्या 'बहुरंगी वग' नामक लेखावरून वाटते. चिकित्सा ही अशी व्यक्तिगत पातळीवर उतरली की मग तिचे महत्त्व फोल होऊन बसते असे मला वाटते. ह्याबाबतीत आपले मत माझ्यापेक्षा भिन्न आहे काय?

- - -

राहिली "वैयक्तिक मत" विरुद्ध "चिकित्सा" ही चर्चा.

जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत, वगैरे, अनुमाने मला वैयक्तिक न वाटता सामान्यगणितातली वाटतात. आर्य-द्रविड लोकांच्या मेळजोळाच्या लिपि-इतिहासाशी नाडीपट्ट्यांच्या कथा जुळत नाहीत. ब्राह्मी लिपीनंतर जे दक्षिणेकडील ग्रंथलिपीत लिहायचे, ते एकदम तमिळ लिपीत दिसते - हे अनुमानही मला वैयक्तिक वाटत नाही, तर सार्वजनिक माहितीतले वाटते. उलट नाडीकेंद्रात चांगला अनुभव आलेल्यांचे अनुभव वैयक्तिक आहेत. त्यातही ज्यांनी नाडी वाचून घेताना प्रश्न-उत्तरे ध्वनिमुद्रित केलीत त्यांचा अनुभव आता सार्वजनिक आहे. माझ्यासाठी ऐकीव (वाचलेला) असला, तरी तो कोणीतरी केलेला प्रयोग सार्वजनिक आहे. विचारलेल्याच प्रश्नांची उत्तरे त्या व्यक्तीला पट्टीतून मिळाली.

- - -

> जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत, वगैरे, अनुमाने मला वैयक्तिक न वाटता सामान्यगणितातली वाटतात.

प्रथमत: ह्या विषयापुरते बोलावयाचे झाले तर चिकित्सेमध्ये ’वाटणे’ चालणार नाही, ’असणे’, किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे. वरील विधान हे चिकित्सकाकडून केले गेले असल्यास, जोपर्यंत ह्या विधानास अभ्यासपूर्ण माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादींसहीत पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत ते विधान जसेच्या तसे स्वीकारणे हे चिकित्सेस योग्य नाही. सामान्यजनांनी सामान्यगणितावर आधारून हेच विधान केले, तर एकवेळ त्याबाबतीत सामान्य दृष्टिकोनातून वेगळा विचार केला जाऊ शकतो. परंतु एकदा कां चिकित्सा असे म्हटले, की त्या विषयाचे सामान्यपण संपुष्टांत येते. त्यामुळे सामान्यगणितातली सामन्य अथवा असामान्य अनुमाने ही चिकित्सेमध्ये चालत नाहीत.

> आर्य-द्रविड लोकांच्या मेळजोळाच्या लिपि-इतिहासाशी नाडीपट्ट्यांच्या कथा जुळत नाहीत. ब्राह्मी लिपीनंतर जे दक्षिणेकडील ग्रंथलिपीत लिहायचे, ते एकदम तमिळ लिपीत दिसते.

ह्या विधानांबद्दल मी काही टिप्पणी करण्यापूर्वी सदर चिकित्साकांडाचे लेखक काय म्हणतांत हे बघणे योग्य ठरेल.

>उलट नाडीकेंद्रात चांगला अनुभव आलेल्यांचे अनुभव वैयक्तिक आहेत. त्यातही ज्यांनी नाडी वाचून घेताना प्रश्न-उत्तरे ध्वनिमुद्रित केलीत त्यांचा अनुभव आता सार्वजनिक आहे. माझ्यासाठी ऐकीव (वाचलेला) असला, तरी तो कोणीतरी केलेला प्रयोग सार्वजनिक आहे. विचारलेल्याच प्रश्नांची उत्तरे त्या व्यक्तीला पट्टीतून मिळाली.

ह्यावरून आपणांस काय म्हणावयाचे आहे त्याचा बोध होत नाही. चांगले अनुभव आले म्हणजे विश्वास ठेवावयाचा कां? असे असेल तर चिकित्सेची आवश्यकता ती काय?

> हे सर्व बघता प्रत्यक्ष अनुभवाच्या किमतीच्या योग्य मला हा प्रकार वाटत नाही. (मला प्रत्यक्ष अनुभव घ्यायला विमान तिकिटाचे धरून ५०,००० रुपये लागतील!)

आपण काय किंवा मी काय, एका व्यक्तीस एकट्यास चिकित्सा करावयाची म्हटले, तर अनुभव घेण्यास द्यावे लागणारे मूल्य हे अधिक वाटणारच. परंतु पाठीमागे (पाठीशी नव्हे!) जर एखादी पुरस्कर्ती संस्था भरभक्कमपणे उभी असेल, तर त्या मूल्याची काळजी करणे आपले काम नसते! कसे म्हणतां?

>भविष्य सांगून पैसे मिळवण्याचे जगात शेकड्यानी प्रकार आहेत. मनोरंजनाचे साधन म्हणून हे सर्व प्रकार (किंमत योग्य असली तर) उत्तम आहेत. पण सत्यशोधनासाठी त्यांच्यात सार आहे असे मला वाटत नाही. आणि हे अनुमान वैयक्तिक नव्हे - सार्वजनिक तथ्यांमधून बनवलेले आहे. त्या शेकडो प्रकारांचे पुरस्कर्ते कितीका जाहिरात करोत.

भविष्य सांगण्याचे शेकडो प्रकार काय आणि ते मनोरंजनाचे साधन आहेत की नाहीत किंवा कसे हा ह्या विषयासंदर्भात चर्चिण्याचा विषय नव्हे. आपले वैयक्तिक अनुमान आणि त्याच्या सत्यासत्यतेबद्दल ह्या ठिकाणी विचार करणे व्यर्थ आहे.

>पण तुम्ही आमच्या इथे येऊन, काचेच्या गोळ्यात बघून भविष्य सांगणार्‍या बाईंकडे "प्रत्यक्ष" अनुभव घ्याच राव! :-)

जर माझ्या पाठीशी (पाठीमागे नव्हे!) एखादी पुरस्कर्ती संस्था भरभक्कमपणे उभी असेल, तर मला आपले आमंत्रण स्वीकारण्यास स्वारस्य वाटू शकण्याची शक्यता आहे.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

चिकित्सा म्हणजे काय
प्रेषक धनंजय (मंगळ, 09/08/2009 - 21:05)

तुम्ही म्हणता :

चिकित्सेमध्ये ’वाटणे’ चालणार नाही, ’असणे’, किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे.

हा प्रकार उदाहरणासह समजावून सांगता काय?

"असणे" आणि "नसणे" या गोष्टी जवळजवळ नेहमी वैयक्तिक अनुमानितच असतात. (सामान्य भाषेत "मला वाटते" अशा प्रकारची वाक्ये.) प्रत्यक्ष नसतात. प्रत्यक्ष म्हणजे फक्त डोळ्यांपुढील रंगीबेरंगी ठिपके, कानांमध्ये गुंजन करणारे क्षणाक्षणाचे ध्वनी, जिभेवर या क्षणी भासणारी चव, घ्राणेंद्रियाला या क्षणी येणारा वास, त्वचेला या क्षणी जाणवणारी संवेदना, वगैरे. या सर्वांची स्मृतीसुद्धा अनुमानितच असते, प्रत्यक्ष नसते. म्हणजे या क्षणापूर्वी मला समोर काही प्रकाशमान निळेपांढरे दिसले होते, (संगणकाचा "उपक्रम" पडदा), ते स्मरलेले दृश्य आता या क्षणी दिसणार्‍या दृश्याशी समसमान आहे, हे पडताळून बघायचे प्रत्यक्ष नसून वैयक्तिक अनुमान आहे.

ज्ञानेंद्रियातून दिसणारे ठिपके, आवाज, चवी वास, हे आहेत-नाहीत असे प्रत्यक्ष सांगणारी ज्ञानेंद्रिये माझ्यापाशी आहेत. पण त्या सर्व संवेदनांच्या मिळून बनणार्‍या वस्तू - उदाहरणार्थ "संगणक" किंवा "कागद" किंवा "मनुष्य" माझ्यासमोर "आहे/नाही" (= "असणे" आणि "नसणे") असे सांगणारे कुठलेच ज्ञानेंद्रिय मला नाही. समोरचा विशिष्ट आकाराचा रंगीत ठिपक्यांचा समूह जो आहे, कानांना ऐकू येणारा ध्वनी त्या पिंडातूनच येत आहे (त्याच्या मागून नव्हे), आणि त्या ध्वनीचा "शब्दार्थ" माझ्या स्मरणात असलेल्या शब्दार्थासारखाच आहे, ही सगळी वैयक्तिक अनुमाने आहेत. म्हणूनच "समोर उभा असलेला मनुष्य माझ्याशी बोलत आहे" असे मी अनुमानाने म्हणतो.

वैयक्तिक अनुमान नकारणारे तुमचे ज्ञानशास्त्र मला मुळीच समजत नाही. असे ज्ञानशास्त्र मला लुळे पाडेल. अर्थातच मी ते मानण्यास तयार नाही.

कदाचित तुमचे शब्द मला समजले नसतील. म्हणून मला लुळे न पाडणार्‍या चिकित्सेचे उदाहरण द्यावे. वैयक्तिक अनुमान नसलेली चिकित्सा (म्हणजे वैयक्तिक अनुमाने नसलेली माहिती, उदाहरणे आणि पुरावे) हे काय प्रकार आहेत, हे त्या उदाहरणावरून मला समजेल.

सर्वज्ञता कधीच मिळणार नाही, तरी चिकित्सा संपवण्यासाठी निकष असतात. "फ्लोजिस्टॉन सिद्धांत" लेखामध्ये त्याचे उदाहरण मी समजावून सांगितलेले आहे. फ्लोजिस्टॉन सिद्धांताच्या नंतर आलेल्या सिद्धांतामध्ये सर्वज्ञता नव्हती. म्हणून काही फ्लोजिस्टॉन सिद्धांत सत्यासत्य शोधण्याच्या योग्य राहिलेला नाही. पण तुम्ही म्हणता :

स्वीकारण्यापूर्वी त्या विधानाचा सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास होणे आवश्यक आहे.

"सर्व", "परिपूर्ण" वगैरे प्रकार "सर्वज्ञता" याच्यातच मोडतात. आणि ही कधी येणे नाही. नेमका काय चिकित्सा अभ्यास (चिकित्सा म्हणजे असते तरी काय?) झाला की तो सर्वांगपरिपूर्ण झाला असे म्हणता येईल?

परंतु एकदा कां चिकित्सा असे म्हटले, की त्या विषयाचे सामान्यपण संपुष्टांत येते. त्यामुळे सामान्यगणितातली सामन्य अथवा असामान्य अनुमाने ही चिकित्सेमध्ये चालत नाहीत.

सामान्यगणित हे मी बर्‍यापैकी ठोस सिद्धांत मानणार आहे. आणि सामान्यगणिताची अनुमाने चिकित्सेमध्ये वापरण्यास मला काहीच चूक वाटत नाही. (मी जर असे म्हटले "सामान्यगणित वापरणे चूक नाही", तर तुम्ही म्हणाल की धनंजय म्हणतो : "’मी म्हणतो तेच आणि तेवढेच सत्य आहे, त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना मी म्हणतो त्याशिवाय सारे असत्य आहे.’". ही तर गडबड झाली. "वाटत नाही" असा शब्दप्रयोग तुम्ही व्यवहारात चालवून घेतला तरच संवाद कुठे जाऊ शकेल.)

एखाद्या भाजीवाल्याकडून सुटे पैसे घेताना आमचा वाद झाला - "अमुक सुटे देणे आहे", समजा. आता किती पैसे कोणी द्यायचे त्याबद्दल खरे-खोटे ठरवायचे आहे. म्हणजे आली चिकित्सा. तर वजाबाकी हे एक सामान्यगणितातले वैयक्तिक अनुमान ग्राह्य नाही, असे कोणी म्हटल्यास वाईट परिस्थिती येईल. सुट्या पैशांबद्दलच्या वादाची चिकित्सा करून खरेखोटे सोडवण्यासाठी म्हणजे वजाबाकीचे गणित चालणार नाही, तर कसला माहितीपूर्ण अभ्यास, उदाहरणे आणि वैयक्तिक अनुमाने नसलेले पुरावे चालणार आहेत? आणि चिकित्सा चालू ठेवायची ती कोठवर - भाजी शिजवायची केव्हा? मती आणि कार्यशक्ती कुंठित करणारी असली चिकित्सेची व्याख्या अंगीकारणे नकोच. हे विचारी माणसासाठी कार्यसाधन नसून विषप्राशन आहे.
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

फसलेल्या चिकित्साकांडाची समाप्ती आणि तेथून पुढे.
प्रेषक हैयो हैयैयो (बुध, 09/09/2009 - 16:16)

फसलेल्या चिकित्साकांडाची समाप्ती आणि तेथून पुढे.

१. चिकित्सेमध्ये माहिती-उदाहरणे-पुरावे ह्यांचे महत्त्व ते काय?

तुम्ही म्हणता : चिकित्सेमध्ये ’वाटणे’ चालणार नाही, ’असणे’, किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे. हा प्रकार उदाहरणासह समजावून सांगता काय?

सर्वप्रथमत: आपण समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करतो आहोत हे ध्यानात घ्यावे. असे केल्यास येथे लागू करावे लागणारे नियम आणि प्रयोगशालेत लागू करावे लागणारे नियम हे एकमेकांपेक्षा वेगळे असणे आवश्यक असते असे आपणास जाणवेल. असे झाल्यास विचारातील अस्ताव्यस्तता नाहीशी होऊन विषयकेंद्रित विचार होतील. असे लिहिण्याचे कारण असे, की आपण जी उदाहरणे देता, ती बहुतेकवेळा विषयास सोडून आणि बहुधा व्यक्तिकेंद्रित असतांत असे माझे मत होते आहे. असो.

’जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत’ ह्या आपल्या वाक्यावर मी "चिकित्सेमध्ये ’वाटणे’ चालणार नाही, ’असणे’, किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे." असे प्रतिपादन केले आहे. पुढे "वरील विधान हे चिकित्सकाकडून केले गेले असल्यास, जोपर्यंत ह्या विधानास अभ्यासपूर्ण माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादींसहीत पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत ते विधान जसेच्या तसे स्वीकारणे हे चिकित्सेस योग्य नाही." असेही म्हटले आहे. आता हा प्रकार आपणांस समजण्यासाठी म्हणून उदाहरणासह समजावून सांगतो.

आपल्याच वाक्यातून एक उदाहरण घेवून सांगावयाचे झाले तर, ’जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत’ ह्या वाक्यात ’नसणे’ आहे. हे वाक्य चिकित्सेत घेतले गेल्यास चिकित्सकाने ते पुढील प्रकारे मांडावे अशी माझी सर्वसाधारण अपेक्षा आहे. : ’मी अमुक दिवसापासून अमुक दिवसापर्यंत अमुक इतक्या केंद्रांना भेटी दिल्या. (दिनांक/वेळ/केंद्रांची संख्या/ह्यास पुरावा) प्रत्येक केंद्रामध्ये अमुकशे जातकांच्या बाबतीतले तथाकथित भविष्यकथन अनुभविले. (ह्यास पुरावा) त्यातील काही लोकांच्या पट्ट्या सापडू शकल्या, परंतु काहींच्या पट्ट्या सापडू शकल्या नाहीत. (ह्यास पुरावा) ज्या लोकांच्या पट्ट्या अमुक केंद्रात सापडू शकल्या नाहीत त्यांच्या पट्ट्या इतरत्र कुठेही सापडणार नाहीत ह्या गोष्टीची मी अनेक नाडिवाचकांकडून खात्री करून घेतली आहे. (ह्यास पुरावा) तात्पर्य काय, की जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत असे माझे मत झाले आहे. ह्या माझ्या मताच्या पुष्ट्यर्थ मी पूर्वी दिलेल्या पुराव्यांसह पुढील पुरावे पूरक म्हणून देतो आहे. पुरावा १, पुरावा २..... इत्यादि. म्हणून निष्कर्ष असा : (निष्कर्ष)’

ह्याहीउपर, कोणी ह्या निष्कर्षाबाबत चिकित्सकांस माहिती विचारली, तर उत्तरे देता यावीत ह्याकरिता त्याच्याकडे ही सर्व माहिती तक्तास्वरूपात उपलब्ध असणे अतिआवश्यक आहे. थोडक्यात काय, तर चिकित्सक हा काय आधारावर अमुक निष्कर्षास येतो हे विचारल्यास समाधानकारक उत्तरे देता येतील एवढा स्वानुभव त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.

चिकित्साशास्त्रातील एका मताप्रमाणे, स्वत: चिकित्सेस एक प्रामाण्य येण्याकरिता निष्कर्षाबाबत केल्या जाणार्‍या विधानाची मांडणी शास्त्रशुद्ध रीतीने शक्यतो स्वानुभवाधारित अशी केली जावी. चिकित्सेमध्ये मांडलेल्या निष्कर्षास जोपर्यंत अभ्यासपूर्ण माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादींसह पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत तो निष्कर्ष जसाच्या तसा स्वीकारणे हे चिकित्सेसाठी सर्वथा अयोग्य होय. विचार केला असतां आपल्या असे लक्षात येईल की येथे नाडिशास्त्रापुरते पहावयाचे झाल्यास, बसलेल्या ठिकाणी बुद्धीवाद करून शक्याशक्यतेची कितीही गणिते मांडली तरी ती निरर्थक होत. कारण उदाहरणादाखल आपल्या हाती काहीही माहिती-पुरावे नाहीत. आणि त्यातूनही असा बुद्धीवाद कोणी केलाच, तर त्यास चिकित्सा असे न संबोधिता ’माझ्या बुद्धीच्या जोरावर असे प्रतिपादन करतो आहे’ असे म्हणून मोकळे व्हावे; म्हणजे निदान चिकित्सेवर प्रश्नोत्तरे तरी होणार नाहीत.

तात्पर्य: बुद्धीनिष्ठांनी कितीही बुद्धीवाद केला तरी तो जर सामान्य बुद्धीला पटेल अशा पद्धतीने मांडला, तरच सामान्यजनांच्या पचनी पडतो. म्हणून हे लक्षात घेता, चिकित्सेमध्ये ’असणे’ किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे. ते तसे नसल्यास चिकित्सेस मृतप्राय समजावे. मी येथे दिलेली उदाहरणे अभ्यासून आपणांस हे तात्पर्य मान्य आहे काय ते कळवावे.

२. आता, वैयक्तिक अनुमानाबद्दल :- प्रथमत: "असणे" आणि "नसणे" या गोष्टी नेहमी वैयक्तिक अनुमानित असतात असे आपण जे सोदाहरण सिद्ध करून दाखविले आहे त्यास माझी मान्यता आहे. मी चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमाने असणे नाकारतो असा आपला ग्रह झाला असल्याकारणे आपण हा प्रश्न ह्याप्रकारे उपस्थित करतां आहात हे मी जाणून आहो. ह्याबाबत मी आधीही सांगितले आहे, आणि आताही खुलासा करून सांगतो. कोठलेही ज्ञानशास्त्र वैयक्तिक अनुमानास नाकारित नाही, कारण तसे नाकारल्यास आपण म्हणतां तसे ते ज्ञानशास्त्र लुळे पडते. कोणीही सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा मनुष्य असे वैयक्तिक अनुमानाचे अस्तित्त्व नाकारणारे ज्ञानशास्त्र मानणारच नाही. त्यामुळे आपणही तसे मानत नसाल ह्यात काही विशेष नाही. मुळात मी आपणांस ’वैयक्तिक अनुमानास नाकारणारे ज्ञानशास्त्र अस्तित्त्वात आहे’ असे मला दाखवून द्यावे अशी विनंती करेन.

वैयक्तिक अनुमान नसलेली चिकित्सा (म्हणजे वैयक्तिक अनुमाने नसलेली माहिती, उदाहरणे आणि पुरावे) हे काय प्रकार आहेत, हे....

मी वर लिहिल्याप्रमाणे मी चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमानांचे असणे नाकारित नाही. चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमाने असू शकतात - असावीत. परंतु जेथे ती असतात, तेथे ती तशी आहेत ह्याचा खुलासादेखील स्पष्ट शब्दांत करणे आवश्यक असते. त्याचसह माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादी गोष्टी सिद्धतेसाठी दिल्या गेल्या, तर त्या चिकित्सेस प्रामाण्य येते. आपण हा लेख वाचावा आणि लेखकाने कुठे स्पष्ट शब्दांत असा खुलासा केला आहे ते मला सप्रमाण दाखवून द्यावे. आपले अनुभव हे फुटकळ आणि एकांगी असल्याचे लेखकाने कोठेही स्पष्टपणे म्हटलेले दिसत नाही. आपल्या चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमाने समाविष्ट आहेत असेदेखील कोठेही स्पष्टपणे म्हटलेले दिसत नाही. (ते माझ्या आणि लेखकाच्या प्रश्नोत्तरांतून थोडेअधिक सिद्ध होते.) तरीही आपली मते ह्याप्रकारे संपूर्ण समाजावर आक्रमक आणि आग्रही रीतिने लादणे हे योग्य आहे काय हे कृपया सांगावे. येथे एक लक्षात घ्यावे, की ज्ञानशास्त्र वैयक्तिक अनुमानास नाकारत जरी नसले, तरी जोपर्यंत वैयक्तिक अनुमानास पुष्ट्यर्थ इतर माहिती नाही, तोपर्यंत ते वैयक्तिक अनुमानांस परिपूर्णत्त्वही देत नाही.

आपण लेखकाची लेखनशैली आणि भाषाशैली बारकाव्याने अभ्यासिलीत तर आपणांस एक गोष्ट दृष्टीपथास येईल ती अशी : लेखकाने एक अशी शैली विकसीत करून उपयोजिली आहे, की लेखकाच्या तथाकथित चिकित्साविचारांचे वाचन केल्यास सामान्यजनांस असे प्रतीत व्हावे की लेखक म्हणतांत तेच सत्य आहे, किंबहुना त्याशिवाय इतर काही सत्य नाही. स्वत: लेखकास तसे म्हणण्याची आवश्यकता राहत नाही. लेखकाने स्वत:चा लेख अशा एका वळणावर आणून सोडला आहे, जेथे वाचकास असे प्रतीत व्हावे, की लेखकाने बहुधा अपार परिश्रम घेवून, अनेक जातकांचा अभ्यास करून सदर विचार मांडला असावा. आणि एकदा का असा विचार झाला की तो वाचक फसला असे समजावे. परंतु ह्या चिकित्सेत वापरल्या गेलेल्या वैयक्तिक अनुमानांना व्यक्तिगत वादाचा रंगही आहे हे चाणाक्ष वाचकास लगेचच उमगेल. कारण अशी ही रंगीत वैयक्तिक अनुमाने ही चिकित्सेमध्ये कितीही विद्वत्तापूर्ण पद्धतीने मांडली गेली असली आणि ती अक्षरश: खरी वाटत असली, तरी त्यात ठिसूळपणा आहे हे कळावयास काळ जावा लागत नाही.

येथे स्वत: चिकित्सक आपण श्री. ओक ह्यांच्या दावा वजा अनुभवाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतो आहोत असे स्पष्ट करतांत. त्यातून ते आपले निष्कर्ष केवळ मताधारितच नाहीत, तर तर्क, अभ्यास आणि अनुभवसिद्ध आहेत असेही म्हणतात. ह्यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो असा : एकदा कां मताधारिततेचा शिक्का चिकित्सेवर बसला, की तर्काचे आणि अभ्यासाचे महत्त्व संपुष्टात येते, कारण 'परपक्षखंडनाकरिता आपण केली ती चिकित्सा' असा विचार होतो. चिकित्सेचा प्रवास आधी विचार, मग अनुभव आणि मग तर्काभ्यासादि होणे चिकित्साशास्त्रास अपेक्षित आहे. केवळ मतास विरोध म्हणून विचार आणि म्हणून वेगळे मत असा प्रवास चिकित्साशास्त्रास मान्य नाही. राहता राहतो तो अनुभव. ह्या अनुभवाबद्दल विचारता आपले चिकित्सक मात्र आपणाला सोयीचे तेवढ्याच प्रश्नांना उत्तरे देतात. जेथे आपल्या सोयीचे होत नाही तेथे ते उत्तरे द्यावयाचे टाळतात. ह्या पद्धतीचे कारण मला काही अजून उमगले नाही. लेखकाची भूमिका पाहता ते स्पष्ट होणे इथून पुढे शक्यही नाही, कारण लेखकाने मुळात चिकित्सा केलेलीच नाही असे आता माझे मत निश्चित झाले आहे. अर्थात, तो येथे वेगळा विषय आहे, असो.

ह्यापुढे जावून लेखक ’नाडीग्रंथ ओकांमुळे विशेष लोकप्रिय झाले. अगोदर लोकांना अनुभव घ्यायला मद्रास प्रांतात जावे लागे आता महाराष्ट्रातही नाडीकेंद्र झाली आहेत.’ अशी विधाने करतांत. ह्या विधानांचा कितीही सरलतेने अर्थ घ्यावयचा म्हटले तरीही लेखकाचे लेख आणि इतर पूरक लेखन - विशेषत: 'बहुरंगी वग' वाचल्यानंतर मात्र एकूण संदर्भ पूर्णतः बदलतात. ’नाडीग्रंथ ओकांमुळे विशेष लोकप्रिय झाले’ असे म्हटल्यावर चिकित्सकामुळे ते लोकप्रिय झाले नाहीत याचा चिकित्सकांस खेद आहे असे म्हणावयाचे आहे असा काहींचा समज होण्याची शक्यता आहे. ’अगोदर लोकांना अनुभव घ्यायला मद्रास प्रांतात जावे लागे आता महाराष्ट्रातही नाडीकेंद्र झाली आहेत’ असे म्हटल्यावर श्री. ओक ह्यांस जे महत्त्व मिळते आहे, ते ह्यांना सहन होत नाही असाही एखाद्याचा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच इतर कितीही अपसमज होण्याची शक्यता असते, आणि हे सर्व चिकित्सेस स्वत:स अपायकारक आहे.

तात्पर्य : चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमानांस व्यक्तिगत वादाचा रंग पुसला गेला, की चिकित्साद्रोह होतो आणि अशी चिकित्सा ही व्यर्थ ठरते. मी येथे दिलेली उदाहरणे अभ्यासून आपणांस हे तात्पर्य मान्य आहे काय ते कळवावे.

३. सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास :- चिकित्सा संपवण्यासाठीचे असे काही निकष असतात हे आपण मान्य करता. तर अशा निकषांचे पालन करून चिकित्सा संपविण्यापूर्वी ज्या गोष्टींबद्दल विचार करणे सहजशक्य आहे, त्या गोष्टींबद्दल योग्यप्रकारे विचार केला गेला आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे हे आपणांस मान्य नाही काय? एकवेळ आपण तसे मान्य करत नसालही, परंतु तसे पाहणे आवश्यक आहे हे माझे आग्रही वैयक्तिक मत आहे. त्यास मी माझ्यापुरते ’सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास’ असे संबोधितो. उदाहरणादाखल हाच विषय घेवून माझे म्हणणे सोपे करून सांगतो ते असे : येथे नाडिग्रंथ ह्या विषयाची चिकित्सा करतांना सदर चिकित्सकाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सर्वथा दुर्लक्ष केले आहे. उदा. नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय हा मुद्दा विचारता लेखकास काहीही सबल पुराव्यासह सांगता येत नाही. त्यामुळे लेखन केले गेले असल्यास ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते, आणि त्या भाषेस काही व्याकरण आहे काय, व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा; ह्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते. असे असता, नाडिपट्टींमध्ये संबंधित जातकाचे नांव, त्याच्या जन्मदात्यांचे नांव, त्याचे जातकम (कुंडली/पत्रिका) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या दाव्यास कसे खोडून काढावे हे लेखकास कळत नाही. वास्तविक पाहता, ह्या भागावरील शोध घेणे हे त्यातील भाकितांबाबत काही मते बनविण्यापूर्वी आवश्यक आहे. आणि त्यामुळे ह्या विषयावरचा लेखकाचा चिकित्सा नामक अभ्यास हा सर्वांगपरिपूर्ण आहे असे मला मान्य करता येत नाही.

थोडक्यात काय, तर लेखकाने नाडिशास्त्राचे केवळ ’ज्योतिष’ हे एकच अंग लक्षात घेतले आहे असे येथे स्पष्ट होते. ह्याप्रकरणांत जोपर्यंत भाषा-व्याकरण-लिपी ह्या विषयांवर अभ्यास होत नाही तोपर्यंत नाडिग्रंथ प्रकरणांस चिकित्सकाकडून संपूर्ण न्याय मिळतो असे आपणांस वाटते काय? आपण एका पट्टीतील काही अक्षरे स्वत: वाचू शकला आहात, ती साक्षीस ठेवून सांगावे. लेखक स्वत: फलज्योतिषचिकित्सक आहेत म्हणून त्यांनी तेवढेच अंग लक्षात घेतले असे ह्या चिकित्साकांडातून सुटण्यासाठी कोणी म्हटले, तरी चिकित्सक म्हणून वरील विषयाची एवढी महत्त्वाची अंगे त्यांनी सर्वसकटपणे दुर्लक्षावी ह्यातच ह्या चिकित्सेचे फोलपण सामावले आहे.

४. सामान्य अनुमानांचे गणित : राहता राहीली बाब सामान्य अनुमाने वापरण्याची. आपण चिकित्सा करण्यासाठी काय अनुमाने वापरावीत अथवा काय वापरू नयेत हा सर्वथा आपला प्रश्न आहे. त्या चिकित्सेचे निष्कर्ष किती प्रमाणामध्ये स्वीकारावेत हे स्वीकारणा-याने ठरवायचे आहे. त्यामुळे एखादे अनुमान आपण वापरणार असाल, आणि ते वापरताना ते वापरणे चूक नाही असे म्हणत असाल, तर मी श्री. धनंजय ’मी म्हणतो तेच आणि तेवढेच सत्य आहे, त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना मी म्हणतो त्याशिवाय सारे असत्य आहे.’ असे म्हणतात असे कदापि म्हणणार नाही. कारण तेच की चिकित्सा करण्यासाठी काय अनुमाने वापरावीत अथवा काय वापरू नयेत हा सर्वथा आपला प्रश्न आहे. परंतु जर आपण आपली चिकित्सा संपवून आपणास जे ज्ञान झाले आहे, तेच आणि तेवढेच सत्य आहे त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना आपण म्हणतां त्याशिवाय सारे असत्य आहे असे प्रतिपादन आग्रही आणि आक्रमक पद्धतीने करावयास लागलात, तर मात्र आक्षेपाचा आवाज सर्वप्रथम माझ्याकडून उठविला जाईल ह्यात शंका बाळगू नये.

५. चिकित्सा म्हणजे असते तरी काय?: हा सर्वथा वेगळ्या अभ्यासाचा विषय होय. एका चिकित्सकाने केलेल्या चिकित्सेचा नुसता अभ्यास करू जाता आपली मती आणि कार्यशक्ती कुंठित होते म्हणून आपण बिचकत असाल, तर स्वतः चिकित्सा ही किती शास्त्रशुद्ध असणे आवश्यक असते हे मी आपणांस वेगळे सांगणे नकोच! तरीही ह्या विषयाच्या अनुषंगाने येथे काही मते मांडली आहेतच. ह्याउपरही स्पष्टीकरण हवे असल्यास कळवावे, चिकित्साशास्त्रावर एक वेगळा लेख लिहिण्याचा विचार करतां येईल.

चिकित्सा आणि सामान्यजन ह्या दोहो गोष्टींचा एकत्रितरित्या विचार करतां समाजशास्त्राचे असे म्हणणे असते की, सहसा सामान्यजन स्वत: चिकित्सा करण्याच्या भांगडीत पडत नाहीत आणि ते अशा प्रकारच्या परसिद्ध चिकित्सेस प्रमाण मानतात. येथे ह्या विषयापुरता विचार करावयाचा झाल्यास असे लक्षात येते, की आपण समजतो तितकेसे चिकित्साकर्म सोपेसुलभ नाही. कितीही तर्कशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ असली तरी स्वत: चिकित्सक मंडळींच्याही मनामध्ये विविध श्रद्धा आणि पूर्वग्रह ठाण मांडून बसलेले असतात. (आपल्या चिकित्सकाने एक व्यक्ती म्हणून स्वत:चे काही पूर्वग्रह, गुणदोष आहेतच असे प्रांजलपणे मान्यही केले आहे. ते बहुधा प्रश्नांचा मारा थांबविण्याकरिता मान्य केले असावे कारण अद्यापपावेतो त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर न देण्यातच धन्यता मानली आहे, अर्थात तो विषय येथे निराळा आहे.) तर असे हे पूर्वग्रह आणि विविध श्रद्धा ह्या चिकित्सेमध्ये, विषयाच्या मूलभूत अभ्यासाच्या आड येतात. एकतर चिकित्सा करताना संपूर्णतः परस्परविरोधी असे दृष्टीकोन स्वीकारले जाऊ शकतात. येथेही नाडिग्रंथवादी आणि नाडिग्रंथविरोधक असे दोन मुख्य दृष्टीकोन परस्परविरोधीच आहेत. म्हणजे आता काय पुराव्यांच्या आधारे चिकित्सा झाली आहे त्या पुराव्यांचे अर्थ आणि संदर्भ तटस्थपणे शोधणे आवश्यक आहे. आपल्या चिकित्सकांनीही त्यांनी केलेल्या चिकित्सेवर विश्वास न ठेवता स्वत:च चिकित्सा करावी असा अनाहुत सल्ला देवून ह्या चर्चेतून पलायन केलेले आहेच, त्यावरून स्वत:च्या चिकित्सेवरील त्यांचा आत्मविश्वास किती ठाम आहे हेही दिसते. खरे पाहता, त्यांनी 'माझ्या चिकित्सेवर विश्वास ठेवू नये आणि स्वत:च चिकित्सा करावी' असे जेंव्हा म्हटले आहे, तेंव्हाच हे सारे फसलेले चिकित्साकांड समाप्त झाले आहे. आता होणारा सारा काथेकूट (पक्षी: विषयांतर) हा केवळ चिकित्सा म्हणजे काय आणि ती कशी असावी ह्या विषयावर होतो आहे; जो ह्या विषयास न्याय देणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. खरे पाहता प्रत्येक विषयाची चिकित्सा कशी असावी ह्याची कसोटी त्या विषयावरूनच निश्चित होऊ शकते - ती विषयानुरुप बदलूही शकते. येथे आपल्या चिकित्सक लेखकांचा प्रवासही ’हळूहळू विचार बदलू शकतात’ ह्या मतापर्यंत झालेला आहेच!

तेंव्हा तुम्ही-आम्ही मिळून नाडिग्रंथांवर चिकित्सा कशी करावयाची ह्याबद्दल तटस्थ दृष्टीकोनातून मुद्दे काढूया.

माझे येथून पुढील प्रश्न हे नाडिविरोधक आणि नाडिग्रंथवादी ह्या दोहोंसाठी एकत्रितरित्या असणार आहेत.

haiyohaiyaiyo@gmail.com

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

अय्यो!
प्रेषक चित्रा (गुरू, 09/10/2009 - 04:29)

वाचून दमले की हो मी. उपक्रम आणि मिसळपावावरील नाडीपट्टीचे प्रतिसाद लेख एकत्र करून कागदावर छापल्यास किती क्षेत्रफळ व्यापतील असा उद्योग कोणाला तरी लावू या का? खालील प्रतिसाद "आ बैल मुझे मार" प्रमाणे होऊ नये अशी इच्छा आहे.

असो. एक वाचले - त्यावरून वाटते ते लिहीत आहे.

>त्यातून ते आपले निष्कर्ष केवळ मताधारितच नाहीत, तर तर्क, अभ्यास आणि अनुभवसिद्ध आहेत असेही म्हणतात. ह्यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो असा : एकदा कां मताधारिततेचा शिक्का चिकित्सेवर बसला, की तर्काचे आणि अभ्यासाचे महत्त्व संपुष्टात येते, कारण 'परपक्षखंडनाकरिता आपण केली ती चिकित्सा' असा विचार होतो.

एखाद्याने अनुभव घेतले तर त्याचे मत बनतेच. ते झाले गॄहितक. असे गृहितक योग्य आहे किंवा नाही, हे पुराव्यांच्या आधारे बघता येते. आता जर पुरावे गृहितकाच्या बाजूने असले, तर गृहितक सिद्ध होणार. जर नसले, तर गृहितक चूक. म्हणजे परत अनुभव घेणे यावे. यात प्रथमदर्शनी किंवा अनुभवाधिष्ठित मत तयार होणे की क्रिया चुकीची नाही, तर अपेक्षितच आहे. ते मत बरोबर आहे का चूक हे पुराव्यांआधारे ठरते. तर्क आणि अभ्यास यांचे महत्त्व मत बनल्यामुळे संपुष्टात येत नाही, तर तर्क आणि अभ्यास (पुरावे गोळा करणे, त्यांचे संकलन करणे इ.) कसे केले जातात हे पाहणे महत्त्वाचे असे वाटते. आणि असे पुरावे गोळा करण्याची पद्धत (किंवा चिकित्सा) चूक आहे असे जरी एकवेळ धरले, तरी केवळ म्हणून असा तर्क आणि अभ्यास परपक्षखंडनासाठीच केला जात आहे हेही एक गृहितक येथे आहे. हे गृहितक बहुदा चुकीचे आहे (कारण चिकित्सा तुम्ही म्हणता तशी योग्य तर्‍हेने केलेली नसू शकते, पण म्हणून तिच्यामागचे गृहितक सिद्ध होत नाही, त्यासाठी श्री. घाटपांडे यांचे आधीचे इतर काम, लेखन आणि तत्सम अनेक पुरावे गोळा करावे लागतील.

मूलतः कुठच्याही माणसाच्या संबंधित संशोधनाचा उपयोग हा बहुसंख्य मानवांचे आयुष्य (इतरांना किंवा पृथ्वीला कमीतकमी त्रास होऊन) सुखकर, आणि आनंदी करण्यासाठी व्हावा असे वाटते. आणि नाडीपट्टी-विरोधकांचा हेतू याबाबतीत पैसे मिळवण्याचा नसावा, किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा नसावा असे एक गृहितक बांधून पहायला हरकत नाही. तेही तपासण्यालायक असावे असे वाटते. असो.

श्री. घाटपांडे यांनी त्यांच्या (तुम्ही वर दिलेल्या) प्रतिसादात म्हटले आहे तेवढे पाहून आपण (म्हणजे तुम्ही/मी किंवा कोणास हा विषय महत्त्वाचा वाटतो त्यांनी) संशोधनाची दिशा ठरवावी. खालील प्रतिसादात मी त्यांची चिकित्सा पद्धती तुम्ही स्विकारावी किंवा त्यावर आधारित निष्कर्ष स्विकारावे असे म्हटल्यासारखे दिसले नाही.

>>तेंव्हा एकुणात, आपल्या चिकित्सेवर (आणि त्यातून मांडलेल्या सिद्धांतावर) आम्ही काय म्हणून विश्वास ठेवावा?

>विश्वास ठेउच नये कारण आपणही स्वतः चिकित्सा करावी व नंतर मत बनवावे. कुणी तरी सांगतय म्हणून ते प्रमाण मानण्यापेक्षा त्याचा फक्त संदर्भ म्हणुन वापर करुन स्वतः चिकित्सा >करावी असा संशयवाद सांगतो. चमत्काराच्या मागचा कार्यकारण भाव उघड झाल्यावर चमत्कार हा चमत्कार राहत नाही.
>प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* चित्रा यांना व्यनि पाठवा

वा !
प्रेषक लिखाळ (मंगळ, 09/08/2009 - 15:07)

सर्व चर्चा तसेच हैयो हैयैयो आणि धनंजय संवाद एकदम वाचनीय आहे.

हैयो हैयैयो,
आपली लेखन शैली मला आवडली. धनंजय आणि आपल्या वाक्यांत अर्थाचा नेमकेपणा आणि व्यापकता असली तरी अनावश्यक शाब्दिक फुगवटा नसतो.

मी जाणून आहो, सर्वसकट, हे वाक् प्रयोग आवडले :)
--लिखाळ.
»

* प्रतिसाद
* लिखाळ यांना व्यनि पाठवा

कुणी चड्डीचीही चर्चा करा रे
प्रेषक धम्मकलाडू (बुध, 09/09/2009 - 16:31)

खूप झालं नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी!

कृपया कुणी अर्ध्या चड्डीचीही चर्चा करावी. आमच्या आवडीचा विषय आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
»

* प्रतिसाद
* धम्मकलाडू यांना व्यनि पाठवा

गुंडी
प्रेषक स्मिता१ (गुरू, 09/10/2009 - 06:53)

नाडी-नाडी फार झाले, आता गुंडीच्या महत्त्वावर सुद्धा चर्चा व्हावी असे वाटते ;)

अवांतरः खरं तर या नाडी-गुंदीवरून १ विनोद आठवला होता:
जर बटनाला मराठीत गुंडी म्हणतात तर झिप ला काय म्हणणार?
उत्तर- घसरगुंडी!!
»

* प्रतिसाद
* स्मिता१ यांना व्यनि पाठवा

उत्तम लेख
प्रेषक बक्कु बिलंदर (गुरू, 09/10/2009 - 16:17)

मुळ् च्चिकित्सकाचा लेखही वाचला आणि इथली त्यावरची चर्चाहि वाचली. हा लेख उत्तम झाला आहे. मला स्वतहच्या किंवा आमच्या ह्यांच्या भविष्याबद्दल् चिन्ता अज्जिबात नाहिच्चे तरिपण एकदा नुस्ता अनुभव घेण्यासाठी नाडिकेंद्राला जाणारच् आहे. आमच्या ह्यांचे मन वळवायला हा लेख अतिउत्तम् !!!!!

---सौ. बक्कुबाई बिलंदर
»

* प्रतिसाद
* बक्कु बिलंदर यांना व्यनि पाठवा

नाडी अनुभव -स्फुट
प्रेषक प्रकाश घाटपांडे (गुरू, 09/10/2009 - 16:27)

साताऱ्याचे श्री. ओंकार पाटील यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या पुस्तकातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो विविध नाडीकेंद्रांच्या अनुभवांवर आधारित लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती.
एक अध्यात्मिक साधक श्री आत्मानंद यांनी भारतातल्या विविध नाडी केन्द्रांचे स्वत: अनभव घेतले होते. १९६७ साली यशवंत प्रकाशन, कुमठेकर रोड, पुणे ३० यांनी प्रकाशित झालेल्या 'अमुत तुषार ` या पुस्तकात त्यांनी आपले हे अनुभव व साधार टीका नमूद केली आहे. ते म्हणतात,'' थोडा वेळ असे गृहीत धरु या की पूर्वीचे ऋषीमुनी द्रष्टे होते व त्यांनी लोककल्याणासाठी असे नाडीग्रंथ लिहून ठेवले आहेत.अर्थात त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीला हेही दिसले असेल की त्या नाडया पुढे कोणाच्या हातात पडणार आहेत व ते त्यांच्या स्वार्थाकरिता व जनतेला लुबाडण्याकरिता कसा उपयोग करणार आहेत? त्यांचा उद्देश लोककल्याणाचा होता. अशा स्वार्थ साधू व जनतेला अमाप लुबाडणाऱ्या लोकास मदत करण्याचा खास नव्हता.त्यांच्या दिव्य दृष्टीला हे खात्रीन दिसले असलेच पाहिजे. त्या ग्रंथाचे भवितव्य त्यांच्या नजरेस आले असते तर त्यांनी ते ग्रंथ अशा लोकांच्या हाती पडू देण्यापेक्षा त्यांच्या समोरच नष्ट करून टाकलेले त्यांना परवडले असते. ``
पुस्तकाच्या 'पुरवणी` त आत्मानंद हे आपल्या निकटच्या स्नेह्याचा पुढील अनुभव नमूद करतात:- मद्रास कडील भागात ते गेले असता तेथील एका नाडी ग्रंथात महाराष्ट्रीयन माणसाची कुंडली इंग्रजी भाषेत व लिपीत ऋषींचे नावे कोरलेली आढळली. मग त्यावेळी जर इंग्रजी भाषेचे ज्ञान होते तर मराठी भाषेचे नक्कीच असले पाहिजे. मग ते ताडपत्र मराठीत न लिहिता इंग्रजीत का लिहिले होते? याचा अर्थ एकच की ते लिहिणारास इंग्रजी येत होते पण मराठी येत नव्हते. नाडी ग्रंथ लिहिण्याचा कारखाना हा आजही चालू आहे हे सिद्ध होते.
दुसऱ्या एका अनुभवात एक प्रसिद्ध नाडीवाले त्यांच्या कडे असलेले ताडपत्र घेवून आले. स्नेह्यांनी ऐकण्याकरता दोघा तिघांना मुददाम बोलावले होते. नाडीवाले वाचन करीत असताना पुष्कळवेळा असे वाचून दाखवतात की हे वाचन चालू असताना अमुक अमुक बसलेले असतील, व असा उल्लेख आला की ऐकणारा चकित होतो. या नाडी वाल्याने सहज म्हणून कोण कोण बसले आहेत त्याची चौकशी केली व स्नेह्यांनी अनवधाने सांगून टाकले. हे लक्षात ठेवून ती नाडी वाचताना ओघात त्यानी तेच नांव वाचून दाखविले. यावरून त्यांना थोडा संशय आला व ते नांव कोठे लिहिले आहे. ते दाखविण्यास सांगितले. ते तामीळ लिपीत असल्याने त्यानी ते पान काढून ठेवण्यास सांगितले, हेतू हा की नंतर कोणाकडून तरी ते वाचून घेता येईल. त्याप्रमाणे नाडीवाल्याने कबूल केले. इतक्यात जेवणाची वेळ झाली म्हणून स्नेही जेवण्यास गेले व जेवून येईपर्यंत नाडीग्रंथधारकाने ते पान काढून ठेवले होते. ते त्यांस वाचून दाखवण्यास सांगितले. त्यावेळी असे आढळून आले की नाडीवाले प्रथम कुंडली वाचली त्यावेळी त्यांच ते नाव पहिल्या पाच सहा श्लोकात वाचले गेले होते व आता ते शेवटी शेवटी वाचले गेले. यावरून स्नेह्यांना संशय आला. तपास केला तेव्हा असे आढळून आले की नाडीवाले यानी स्नेह्र्याच्या गैरहजेरीत त्यांचे गडयाकडून थोडी कोळशाची भुकटी व खोबरेल तेल मागून घेतले होते. व टेबलावरील लोखंडी टोच्याने त्यानी काही कारागिरी केली होती. स्नेह्यांनी ते पान ठेवून घेतले व एन्लार्ज फोटो काढून तज्ञाकडून तपासून घेतले, त्यावेळी त्याना नुसते ते नावंच नाही तर मधील तीन ओळी सबंध नवीन घातलेल्या आढळल्या.
======
वरील उदाहरणे केवळ नमुन्या पुरती आहेत. मुंबईत त्याकाळात (१९६०-६५) आलिशान हॉटेल मधे राहुन केवळ एका पत्र्याच्या ट्रंकमध्ये नाडी/ भृगुसंहिता ठेउन या वर मजबुत धंदा करणारे शास्त्री होतेच. एक छायाशास्त्री तर सुर्याच्या प्रकाशात जातकाची छाया मोजुन त्यावरुन कुंडली बनवणारे होते. एकदा ढगाळ वातावरण होते तर महाशयांनी खोलीतल्या बल्ववर जातकाची छाया मोजुन कुंडली बनवली होती.
'या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' हेच जर मर्यादित पट्टया लाखो लोकांना कशा पुरतात याचे रहस्य असेल तर इथे आमची मतीच कुंठीत होते. वर्तमानपत्रातील बारा राशीच भविष्य हे काही लोकांना व्यक्तिगत भाकीत सुद्धा वाटत असत. भारतात नउ कोटी लोकांचे तेच भाकित असते.
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

अनुभव आणि...!!
प्रेषक हैयो हैयैयो (शुक्र, 09/11/2009 - 05:00)

अनुभव आणि...!!

घाटपांडे सार, आपले स्वानुभव आणि दत्तकानुभव सत्य असतीलही हो, परंतु आम्ही न्यायशास्त्राभ्यासक पडलो ना! कोणी कितीही आणि काहीही बढाया मारल्या तरी आम्ही तावूनसुलाखून तपासून घेणारच! असो. आपल्या चिकित्सेचे महत्त्व माझ्याकडून कसे स्पष्ट केले गेले ते सांगतो. मी नाडिग्रंथवाद्यांसाठी प्रश्नावली करणार असे म्हणून काही मते मागविली होती. अनेकांनी अत्यंत उत्साहवर्धक मते पाठविली, ती आपण माझ्या खरडवहीमध्ये वाचू शकता. ही मते वाचून माझा उत्साह दुणावला ह्यात शंका बाळगू नये. परंतु इथल्या एका मान्यवर सदस्याने मला माझ्या वरील प्रतिसादात दिलेल्या ईमेलवर व्यक्तिगतरित्या लिहून स्वत:चे मत कळविले. ते मत वाचून मात्र अक्षरश: निरुत्साह झाला.

ते मत थोडक्यात (माझ्या शब्दांत) असे : ते म्हणतात - तुम्ही चिकित्सेची जी चिकित्सा केलीत त्यामुळे माझ्या विचारांना चालना मिळाली. तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे अगदी व्यवस्थित आहेत. आपण स्वतः नाडिज्योतिषाचा प्रत्यक्षानुभव घेतल्याचे ते पुढे कळवतात, आणि तरीही 'आपण नाडिज्योतिषावर विश्वास ठेवत नाही असे मला publicly maintain करणे आवश्यक आहे' असे म्हणतांत, आणि असे म्हणण्याचे कारण 'मी विज्ञाननिष्ठ असून मला माझ्या भूमिकेमध्ये बदल करणे योग्य वाटत नाही कारण माझी आजपर्यंतची भूमिका तीच होती' असेही कळवतात. ह्याउपर कडी म्हणजे, 'कृपया हे बोलणे आपल्यापुरतेच ठेवा' अशी कळकळयुक्त विनंतीही करतात. आणि हे संभाषण मी उघड करेन अशी भीति बहुधा बाळगून असल्यामुळे स्वत:चे नांवही ते स्पष्ट करित नाहीत! केवढी ती भीति!! असो. आता जर एका (विज्ञाननिष्ठ) व्यक्तीचे म्हणणे असे असू शकते, तर इतरांचेही असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही ना? मला असा एकजण भेटला, तुम्हाला अनेकजण भेटले असतील! आता समाजामध्ये जोपर्यंत असे खायचे दात - दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, तोपर्यंत ह्या सर्व पारदर्शकताशून्य चिकित्सेला आणि चर्चेला काही अर्थच उरत नाही!!

हीच विज्ञाननिष्ठ मंडळी तुम्हा-आम्हाला ही अशी ठकवतात! आणि मग दुकानदारांची दुकाने बंद कां होत नाहीत म्हणून बोंबा ठोकत फिरत राहतात!!!

आणि पुढे लिहितात, 'चालू द्या तुमची चिकित्सा!'

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

हीच गोची
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शुक्र, 09/11/2009 - 05:22)

अनेक चळवळींमधे हीच गोची होती. एकदा भुमिका घेतली की त्यात बदल करणे समाजमनाला रुचत नाही. प्रतिमा तयार झाल्यावर त्याला तडा जाउ नये म्हणुन अंतर्विसंगती पचवाव्या लागतात. कधी समाजच तुम्हाला तस करु देत नाही. तुज आहे तुज पाशी मधे आचार्यांची जशी गोची होते जे काकाजी समजु शकतात तशीच . "नाही नाही आपण आचार्य आहात..."
राजकीय पक्षात पक्षनिष्ठा या तत्वाखाली होणारी घुसमट व्यक्तिमत्वाचा कोंडमारा करते. मग त्यातुन सोडवणुकीचे मार्ग शोधताना काही 'काळजी' आपल्या 'अस्तित्वासाठी' घ्यावी लागते.ज्योतिषाला विरोध करणारे लोक सुद्धा भविष्य पहातात. कधी उत्सुकते पोटी तर कधी नैराश्ये पोटी. ती पण माणसेच आहेत.
एक प्रसंग आठवतो. आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही एक 'माणूस' च आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली.
अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला
ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक."

प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

पळवाट!
प्रेषक हैयो हैयैयो (शुक्र, 09/11/2009 - 05:46)

पळवाट!

ही 'गोची' चिकित्सकासाठी 'पळवाट' मात्र होता कामा नये!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!
»

* प्रतिसाद

प्रवाह
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शुक्र, 09/11/2009 - 14:30)

माणसांचा मते ही अनुभवातुन, विचारातुन बदलतात. बदलणे म्हणजे तत्त्वचुती नव्हे. god is truth म्हणणारे गांधीजी truth is god असे आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणु लागले . आपले मत पुर्वीच्या मतापेक्षा वेगळे असल्यास ताजे मत ग्राह्य धरावे असा ही उल्लेख गांधीजी करतात. अगोदर 'तस' म्हणत होतात आता 'अस' म्हणताय म्हणजे तुम्ही लबाड आहात अस म्हणता येईल का?
एखाद्याचा प्रवास अस्तिकते कडुन नास्तिकते कडे वा उलट वा अज्ञेयवादाकडे असा होउ शकतो. मताशी ठाम असण्याचा आग्रह हा मत बदलले तरी पुर्वीच्या मताशी ठाम रहाण्याचा आग्रहात असतो त्यावेळी तो दुराग्रह होतो.
आश्चर्यकारक व अतर्क अनुभव आल्यावर अचंबित होण हा मानवी स्वभाव आहे. त्यामागची कारणमिमांसा समजल्यावर् / पटल्यावर आपण विचारपुर्वक मत तयार करतो. अर्थात हे मत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ /अंतिम सत्य अस मानणे म्हणजे एका वैचारिक नशेत असल्यासारखे असते. म्हणुन आम्ही 'अंतिम' नावाची भानगड मानत नाही
कधी कधी अज्ञानात देखील आनंद असतो.(तात्पुरता का होईना)

प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

नवा प्रतिसाद पाठवा