चमकून गेली वीज, भिजवून गेल्या सरी
माळरानांनी पांघरली हिरवी शाल अंगावरी
पक्षांची किलबिल कोकिळेची शीळ, निसर्गाच संगीत लई भारी
उडती पक्षी एकामागून एक, आभाळी जशी पंढरीची वारी
सारं गाव जाग करी भूपाळीन, वासुदेवाची स्वारी
मधुर स्वरांना साथ चिपळीची, घेऊन चालली दारोदारी
बुजगावण्याच्या भेटीला चालला शेतात शेतकरी
वाऱ्यासंगे झुले किती तांदूळ अन बाजरी
घंटानाद आला कानी, पोहचला देवपूजेला पुजारी
भगवा झेंडा फडकत आहे राउळाच्या कळसावरी
लाल रंग वाढला समोर पूर्वेच्या क्षितीजावरी
दिसे एका अंगणात कोणी सूर्याला अर्घ्य करी
प्रतिक्रिया
29 Oct 2015 - 8:12 am | दमामि
छान!
29 Oct 2015 - 2:59 pm | पद्मावति
सुरेख. साध्या सरळ पण चित्रदर्शी शैलीतील कविता. आवडली.
29 Oct 2015 - 9:05 pm | चांदणे संदीप
हे झेपले नाही! कुठल गाव हे?
29 Oct 2015 - 9:36 pm | एकप्रवासी
माझ्या माहिती नुसार बाजरी ही शेती नाशिक, पुणे, धुळे, जळगाव व अजून काही ठिकाणी तांदळा बरोबर केली जाते, तरी आपल्या निरिक्षणा बद्दल आभारी आहे.
29 Oct 2015 - 9:39 pm | एकप्रवासी
बाजरी आणि तांदूळ ह्या दोन्ही पिकांचा वाढीचा हंगाम हि जवळ जवळ सारखाच असतो.