व्हाॅट्सप वर ही कविता पावली, सुरेश भटांची म्हणे.
सुरेश भट
मी असा त्या बासरीचा सूर होतो!
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो!
प्रीतही आली फुलांच्या पावलांनी
हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो!
राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता...
मी घरोब्याचे जुने काहूर होतो!
तू किती केलास भेटीचा अचंबा..
भूतकाळाचा जणू मी धूर होतो!
मी न साधी चौकशी केली घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो!
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो!
तेवते आहेस तू पूजेत कोठे?
एकदा मीही तुझा कापूर होतो!
मला असे वाटले हे कवी जन "Lateral Thinking" करतात.
म्हणजे आपण नेहमी विचार करतो तसे क्रमश: न करता,
आधी कवितेची चवथी ओळ लिहीतात
मग 3री ओळ,
मग 2री ओळ,
शेवटी पहीली ओळ लिहीत असावेत.
मी पध्दतशीर यमके जमा केली.
स्फूर्ती वगैरे किही नाही.
ठणठणीत जुळवाजुळवी.
आतुर होतो
मजबूर होतो
भरपूर
मगरूर
ढाराढूर होतो
नुपूर
मजकूर
शूर
हूरहूर
माझे जोडकाम/शालू ला ठिगळ-काम
स्पर्श तो मखमली कधी मी मागतो?
ये तुझ्या पायीचा मी नुपूर होतो
वाहुनी गेले अता नये वाचता
नजरेतल्या पत्रातला मी मजकूर होतो
बोललेले अर्थ ना मी जाणतो
शब्द तुझा या कानी तर होतो संतूर होतो
भेट ती स्वप्नातली पुन्हा कधी ना पाहतो
काळ मजसाठी किती निष्ठूर होतो
प्रीती चा ना इजहार केला,
जाणते तू मी कधी इतका शूर होतो
हासुनी तू पाहता दुसरीकडे,
जीव हा नुसता असा हुरहूर होतो
प्रतिक्रिया
17 Oct 2015 - 6:52 am | चांदणे संदीप
मालक... तुमच्या जोडकाम/शालूला ठिगळ कामात वृत्तबित्त लावले असते तर जमले असते. इथे काय चाललय नो आयडिया!
17 Oct 2015 - 7:15 am | चतुरंग
तुमच्या एकंदरित लिहिण्यावरुन गजलेबाबत तुम्ही फार विचार केलेला नसावात असे दिसते. माझे नम्र सांगणे आहे की भटसाहेबांसारख्या उच्च गजलकाराने लिहिलेले गजलेबद्दल चार शब्द वाचा विचार करा आणि मगच लिहा.
फक्त कोणतीतरी यमके इकडून तिकडून पकडून आणली आणि जुळवली की गजल होत नाही.
गजलेचे शेर हे कित्येक दिवस मनात घोळू शकतात. शेरातल्या दोन ओळींपैकी कित्येकदा फक्त पहिली किंवा दुसरी ओळच जमून येते आणि मग उरलेली ओळ जमणे ही तगमग असते. असो.
www.sureshbhat.in
या वेबसाईटवर भटसाहेबांनी गजलेची बाराखडी लिहिलेली आहे ती वाचा. शुभेच्छा! :)
-चतुरंग
17 Oct 2015 - 7:27 am | मांत्रिक
खरं तर असं लिहून तुम्ही सुरेश भटांचा नकळत अपमान करताय. नक्की काय हेतू आहे तुमचा?