नमस्कार मंडळी … आजच मिपा वर दाखल झालोय …. तशी लिहायची फार सवय नाही, एक प्रयत्न करून पाहावा म्हणतोय, बघू जमतंय का … परवाच कोणी हा प्रश्न विचारला म्हणून ….
एकनाथांच रामायण लिहून झाल, आता यावर एक छोटी नाटिका बसवायची होती, सगळ्या प्रमुख पात्रांची निवड करून झाली होती, एक महत्वाच पात्रं अजून शिल्लक होत. राजा दशरथाची सर्वात प्रिय पत्नी जिने युद्धात अप्रतिम कामगिरी करून राजाकडून एक वरदान जिंकल होत, हुशार राणीने आपण आपले वरदान योग्य वेळी मागू असे म्हणून राखून ठेवलं होत … होय … तीच नाव महाराणी कैकेयी.. एकनाथांनी कैकयीची भूमिका करणाऱ्या स्त्रीला सगळी गोष्ट समजावून सांगितली, "बघ तुझी भूमिका महत्वाची आहे, पण यामुळे तुला आयुष्यभर लोकांच्या रागाला सामोरे जावे लागेल, तुला समजावून घेणारे विवेकी लोक खूपच नगण्य असतील, कदाचित तुला वाळीत सुद्धा टाकतील, कैकयी हे नाव सुद्धा भविष्यात कोणी ठेवणार नाही, पण या कथेची खरी नायिका तूच असशील, श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शापाने दशरथाच मरण हे पुत्र वियोगाने होणार हे तर निश्चित होत आणि सर्व पुत्रामध्ये राजाचा जीव सर्वात जास्त रामावर होता, शाप खरा ठरण्यासाठी रामाला मराव लागल असत, आणि तस झाल असत तर रावणाचा वध कोणी केला असता, अहिल्येला कोणी मुक्त केल असत, हनुमानाची भेट कशी झाली असती, शबरीची भक्तीची तहान कोणी भागवली असती, या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले असते. हा अनर्थ टाळण्याची सत्सतविवेकबुद्धी तुझ्याकडे आहे, तुला युद्धात मिळालेल्या वरदानाचा यथोचित वापर करण्याची हि वेळ आहे, तुझ्या प्रिय रामाला वनवास आणि पुत्रवियोगाने राजाच मरण, तुझ मरणप्राय वैधव्यत्व, सामान्य जनतेला न कळणारी तुझी असामान्य भूमिका हे सगळंच सहन कराव लागेल, पण पांडुरंगाचा शब्द आहे … विवेकी लोकांच्या मनात तुझी जागा रामापेक्षा श्रेष्ठ राहील याची प्रचीती म्हणून प्रभू राम सुद्धा वनवासातून परत आल्या आल्या तुझ्याच चरणी नतमस्तक होतील "
प्रतिक्रिया
26 Jun 2015 - 3:15 pm | अस्वस्थामा
ह्या पांडुरंगाचा आयडी म्हणायचा का हा पाणक्या.. ;)
29 Jun 2015 - 4:02 pm | पाणक्या
हाहाहा … तेवढ आमच भाग्य कुठे ?
26 Jun 2015 - 6:41 pm | शि बि आय
कयीच्या ह्या पराक्रमावर आपल्याला माहित असल्यास प्रकाश टाकावा किंवा ह्या डीटेल्स कुठे मिळतील याचे मार्गदर्शन करावे कारण रामायणात तिची भूमिका जरी महत्वाची असली तरी त्यावर एवढा प्रकाश टाकला गेला नाहीये किंबहुना तिला व्हिलनच ठरवले गेले आहे.
29 Jun 2015 - 4:18 pm | पाणक्या
क्षमस्व, पण रामायण या मूळ काव्यात कैकयी हि फारच कपटी व नालायक स्त्री होती असा उल्लेख आढळत नाही. रामायण हे महाकाव्य आहे, यातील बारकावे कळावे म्हणून तर संतांनी आपापल्या दृष्टीकोनातून एक एक पैलू उलगडला आहे, मूळ गाभ्याला हात न लावता, कथेचे वर्म आपल्याला पचेल रुचेल असे मांडले आहे, जसे ज्ञानेश्वरांनी गीतेचे "भाषांतर" आपल्या भूमिकेतून केले, तसेच रामायण सुद्धा एकनाथ, कबीर, तुलसीदास यांनी मांडले. आपण सुद्धा मिपावर किवा इसकाळ वर एकाच गोष्टीचे कितीतरी पैलू पाहतोच ना, कदाचित तसेच... आणि हो … कैकयीच्या युद्धातल्या पराक्रमाची माहिती नक्की काढून देईन. पुढची तारीख देण्यात यावी :)
29 Jun 2015 - 6:48 pm | विशाल कुलकर्णी
पण रामायण या मूळ काव्यात कैकयी हि फारच कपटी व नालायक स्त्री होती असा उल्लेख आढळत नाही.
सहमत आहे. उलट कैकयीचा उल्लेख एक शुर, पराक्रमी राणी म्हणुनच आलेला आहे. शंबरासुराशी झालेल्या युद्ध्यात इंद्राने दशरथाचे सहाय्य मागितले होते अशी एक दंतकथा आहे. या युद्धात कैकेयीने दशरथाचे सारथ्य केले होते. युद्धा दरम्यान दशरथाच्या रथाचे चाक खराब झाले आणि शंबरासुराच्या प्रहाराने दशरथ जखमी झाला. त्यावेळी कैकयीने एकीकडे शंबरासुराचा सामना करत दशरथाचा रथ सांभाळून युद्धक्षेत्राच्या बाहेर नेला व त्याचे प्राण वाचवले. त्याबदल्यात दशरथाने तिला दोन वर दिले होते. ते तिने वेळ आल्यावर मागून घेइन असे सांगून राखून ठेवले. त्याचा वापर नंतर रामाला वनवास आणि भरताला राज्य मागण्यासाठी तीने केला असे उल्लेख आहेत. पण एवढी एक घटना सोडली तर तिच्याबद्दल कुठेच, कसलेही आरोप केले गेलेले नाहीत. उलट नंतर पंचवटीला जेव्हा भरत रामाला भेटायला गेला तेव्हा ती देखील रामाला परत आणायला म्हणून तिथे गेली होती. पण रामाने आता जर मी परत आलो तर माझ्या पित्याला मी दिलेले वचन मोडेल असे सांगून परत यायला नकार दिला असे तुलसी रामायण सांगते
29 Jun 2015 - 3:12 pm | तुडतुडी
विवेकी लोकांच्या मनात तुझी जागा रामापेक्षा श्रेष्ठ राहील >>>+1111111111111
30 Jun 2015 - 12:49 pm | सिरुसेरि
खरे आभार तर मग मंथरेचे मानले पाहिजेत .
30 Jun 2015 - 1:04 pm | तुडतुडी
खरे आभार तर मग मंथरेचे मानले पाहिजेत .>>>
मंथरे लाही कैकेयीचं मन वळवणं जमलं नाही . शेवटी सरस्वतीला तिच्या जिभेवर बसावं लागलं आणि मग देवांच्या षड्यंत्रा प्रमाणे पुढचं पार पडलं
30 Jun 2015 - 1:26 pm | सिरुसेरि
धन्यवाद . खरे आभार तर मग देवी सरस्वतीचे मानले पाहिजे .
30 Jun 2015 - 2:16 pm | पाणक्या
मला असे वाटते कि पौराणिक सगळेच संदर्भ अद्वैत अर्थाने दिले असावेत … उदाहरणार्थ
दशरथ - ५ कर्म इंद्रिये + ५ ज्ञान इंद्रियांचा आपला रथ (शरीर)
राम - आत्मा
सीता - देहबुद्धी (माया)
लक्ष्मण - मन
मारुती - दास्यभक्ती
रावण - अहंकार
कैकयी - जाणीव
कदाचित या उक्ती प्रमाणे जर आपल मन थाऱ्यावर असेल (मंथरा) तर आपण जाणीवेतून (कैकेयी) विचार करू शकतो. WILD GUESS !