(खालील घडलेली सत्य घटना नावे बदलुन)
अनिकेत आणि निकिता दोहोंचा संसार सुरु होऊन ५-६ वर्ष झाले होते. छान पैकी चालले होते. एक मुल होते. भाड्याच्या घरातुन एक २ बी.एच. के. फ्लॅट घेतला. फ्लॅट घेतांना सोसायटी, शेजारी पाहिले. फक्त चारच घरांची दुमजली ईमारत पाहुन जास्त त्रास नाही म्हणुन फ्लॅट घेतला. सुरवातीला २-३ वर्ष सगळे व्यवस्थित चालले होते. तस पाहता घरात ज्या छोट्या छोट्या कुरबुरी शिवाय बाकी सगळे ठीक ठाक. शेजारी एक पेट्रोल पंपावर काम करणारा. अनिकेत स्वतः शासकीय नोकरीत. वरचा फ्लॅटमध्ये एक दक्षिण भारतीय कुटुंब. त्याच्या शेजारी एक अविवाहित. चार कुटुंबे मेंटेनन्स काढण्याची गरज नाही. काम निघाले की पैसे जमा करुन पुर्ण करायचे. काम करतांना अनिकेतच्या शेजारी राहणारा वसंता स्वतःच पुढाकार घ्यायचा, काम करुन आणायचा. सगळ्यांना वाटायचे की भला माणुस. पण हळुहळु लक्षात यायला लागले की, वसंता त्यात त्याचा वाटा न टाकताच ईतरांकडुन रक्कम काढावयाचा आणि फसवायचा. अनिकेतने या बाबत सगळ्यात अगोदर कामे वाटुन घ्यायचे असे जाहीर केले. सोसायटीचे लाईट बील भरणे, पाण्याची टाकी लावणे, छोटे मोठे काम करणे, बागकाम बघणे ई.
काही दिवसांनी वसंताने त्याचे पेट्रोल पंपावरचे काम सोडुन दिले. सगळ्यांना एका बाबतीत नवल वाटायचे की पेट्रोल भरणारा माणुस ६ लाखाचा फ्लॅट कसा घेतो? घरची किंवा सासरची मदत नाही. पण विचारणार कोण? पळसाला पाने तीन त्याप्रमाणे सोसायटीत कुरबुरी दिसु लागल्या. अविवाहित निखिलने नवी दुचाकी घेतल्यानंतर काही दिवसातच त्याच्या गाडीवर खिळ्याने रेषा मारलेल्या दिसुन आल्या. त्यावरुन निखिलने वसंता वर आरोप लावला की तो ईतरांच्या प्रगतीवर जळतो. मारामारी पर्यंत गोष्ट गेली. सगळ्यांनी मधे पडुन ते थांबवले. त्यादिवशी वसंताची भाषा आणि दुसरे रुप पहायला मिळाले. काही दिवसांनी वसंताने सगळ्यांशी छोट्या मोठ्या भानगडी केल्या. अनिकेतला वाटु लागले की फ्लॅट घेतांना ज्या गोष्टींचा फायदा दिसत होता त्याच आता दोषात रुपांतरीत झाल्या होत्या.
त्यातच अनिकेत ने नवी कार घेतली. कार घेतल्यानंतर सगळ्यांना पेढे वाटले. सोसायटीमधील तीन सोडता इतर शेजार वर्ग येऊन गाडी पाहुन गेला. अनिकेत आणि त्याच्या पत्नीला आता हे सरावाचे झाले. त्यांनी मनावर घेतले नाही. असेच ३ वर्ष संपले. वसंताने जिम चालवायला घेतली सोसायटीत तो आणि त्याची राहणीमान यावर चर्चा सुरु झाल्या. त्याला भेटायला येणार्या लोकांबद्द्ल वेगवेगळ्या वावड्या पसरायला लागल्या. एक दिवस वसंताने अनिकेतला गाडी पार्किंग वरुन सुचना केली. ती अनिकेतने मानली. त्यानंतर वेगवेगळ्या सुचना सुरु झाल्यावर अनिकेतने विरोध सुरु केला. भांडण सुरु झाले. अनिकेतने त्याचे म्हणणे ठाम पणे मांडुन बाजु लावुन धरली. वसंताने अश्लील भाषेत शिवीगाळ करुन सगळ्यांसमोर अनिकेत आणि त्याच्या पत्नी, आई, वडीलांचा अपमान केला. मारहाणीची धमकी दिली. त्या दिवसानंतर दोघांमधील बोलणे संपले. वसंताने अनिकेतची गाडी उन्हात कशी राहील यासाठी दगड लावुन अडसर लावले. असेच वादावादी करीत दीड वर्ष संपले. एकदा वाद अनिकेतच्या पत्नीच्या बोलण्याने वाढला. तिच्या बोलण्याचे भांडवल करीत वसंताने भागातील एका "भाऊ" ला आणले. अनिकेतने माफी मागुन प्रकरण संपविले. गाडी पुन्हा मुळच्या जागेत आली. अनिकेतच्या पत्नीलाही आता सरकारी खात्यात नोकरी लागली होती. दोघांजवळ आता पैसा यायला लागला. पण वसंता आणि त्याच्यातील वाद संपायचे नाव घेत नव्हता. काहीतरी कारण व्हायचे आणि वसंता अर्वाच्य शिवीगाळ करायचा मारहाणीची धमकी द्यायचा. अनिकेतही आपल्या बाजुवर ठाम होता. मधील काळात अनिकेतच्या गाडीचा मागील लाईट कोणीतरी फोडला. त्याने स्वखर्चाने पार्किंग व दरवाज्याजवळ कॅमेरे बसवुन घेतले.
एप्रिल मध्ये अनिकेतने घराचे नुतनीकरण काढले. कॅमेरे बंद झाल्याचे पाहुन वसंताने परत गाडीपुढे दगड लावुन तिला मागे धकलली. अनिकेतने सरळ पोलिसात तक्रार दिली. एक महिना तसाच गेला. दाराजवळ चप्पल काढण्यावरुन वसंताचा मुलगा व अनिकेतची पत्नी यांच्यात वाद झाला. वसंताने त्यावरुन शिवीगाळ तर केलीच पण दारावर लाथा मारणे मुले आणुन धमकावणे केले. अनिकेतने पोलिसांना बोलावले. मागील तक्रारीची दखल घेण्यात आली. पोलिसांनी जागेची पाहणी करुन अनिकेतची बाजु बरोबर असल्याचे सांगितले.
थोड्या वेळाने अनिकेतला पोलिसस्टेशन मधुन फोन आला. तो तिथे गेल्यावर त्याच्यावर वसंताच्या बाईने तक्रार नोंदविल्याचे समजले. हवालदाराने दोघांना दमात घेतल्याचे नाटक केले. वसंताचे पाठीराखे गोळा झाले. आमदारासोबत राहणारे काही सभ्य समाजसेवक त्या हवालदारासोबत बोलतांना पाहुन अनिकेतने त्याच्या एका नातेवाईकाला फोन लावुन परिस्थितीची कल्पना दिली व मदत मागितली. त्यांनी लगेच पोलिस निरीक्षकांना भेटण्यास सांगितले. अनिकेत भेटुन आला. त्यांनी मिटींगला जायचे सांगुन सायंकाळी बोलावले. पण हवालदाराने दोघांना शांतता भंग करतात या नावाखाली बसवुन ठेवले. फोन जमा करुन घेतला. थोड्या वेळाने अनिकेतला समजायला लागले की त्याला त्रास देण्यासाठी दोघांना बसवले आहे. समोरची पार्टी व हवालदार मिळुन त्याच्यावर दबाव आणित आहेत. मग थोड्या वेळाने एका दुसर्या हवालदाराने अनिकेतचे बोलणे व त्याच्यावरचा दबाव पाहुन फोन परत दिला. अनिकेतच्या पत्नीला यातील काहीच माहित नव्हते. त्याने व त्याच्या मद्तनीस नातेवाईकाने ही बाब कोणालाच सांगितली नाही. चार तासांनी पोलिस निरीक्षक आल्यावर त्यांनीच अनिकेतला बोलावले. दोन शब्द दोघांना समजावुन त्याला सोडुन द्यायचा आदेश दिला. हवालदाराला हे समजल्यावर त्याने खात्री करण्यासाठी परत पो.नि. समोर मुद्दाम उभे केले.
मग हवालदारांनी सरळ सोडण्याएवजी वसंताच्या मध्यस्थांना बोलावणे पाठवले. त्या सभ्य माणसांनी अनिकेतला पोलिस ठाण्यातच दोन तीन हवालदारांसमोर दम भरला की परत त्रास दिला तर काही बरे वाईट घडु शकते. वसंताने व त्याच्या पत्नीचे अनिकेतच्या पत्नी बद्द्ल बरीच खोटीनाटी माहिती पोलिसाच्या मदतीने पसरविली. सायंकाळी चार वाजता अनिकेत घरी आला. पत्नीने विचारले काय झाले त्याने सांगितले विचारु नको. आणि वसंता आणि त्याच्या कुटुंबाबद्द्ल या पुढे काहीच विषय काढु नको.
गावगुंड व पोलिस यांच्या एकत्रीकरणामुळे एका सऱळ माणसाला कदाचित घर सोडुन दुसरीकडे जावे लागु शकते
प्रतिक्रिया
22 May 2015 - 1:33 am | श्रीरंग_जोशी
अवघड आहे.
माणसाने इतकेही सरळ असू नये. सरळ झाडे अगोदर कापली जातात असे चाणक्याचे वाक्य वाचले आहे.
22 May 2015 - 1:47 am | श्रीरंग_जोशी
आपण मांडलेला अनुभव नकारात्मक आहे. कदाचित दुसरं घर पहावं बांधून (पाठपुरावा) हे वाचल्यास आशावाद संपणार नाही.
22 May 2015 - 5:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पहिल्यांदा बाईकवर चरा काढला होता त्यानी तेव्हाच त्याला तुडवायला हवा होता. सरळ वागुनही त्रास वाकडं वागुनही त्रास. मग किमान त्याला त्रास झाल्याचं मानसिक समाधान तरी पाहिजे. "एखाद्याचं भलं करायचं असेल तर कष्ट घ्यावे लागतात मात्र वाईट करायचं असेल तर अजिबात कष्ट पडत नाहित" हे आमच्या एका शाळा गुरुजींचं वाक्यं आठवलं.
22 May 2015 - 2:22 pm | कपिलमुनी
मग त्याने पण पोरा आणून तुडवला असता . पुढे ? पुन्हा त्याला तुडवायचा ??
कुठवर चालणार असा ? आणि यामध्ये एकाचा जीव गेला तर ?
Blood is a big expense :The Godfather
22 May 2015 - 6:11 am | नगरीनिरंजन
पोलिसांनी बसवून ठेवले म्हणजे काय? अनिकेत अशिक्षित आहे का? माझा फोन जप्त करण्याचे वॉरंट आहे का आणि मला अटक केली आहे का असे साधे प्रश्न विचारता येत नाहीत? मला अटक केली नसेल तर मी जातो असे म्हणून जायचे. लोकांना वाटणारी पोलिसांची भीती हेच पोलिसांचे मोठे शस्त्र आहे. प्रत्यक्षात आपली 'पावर' जायची भीती त्यांनाही असते.
22 May 2015 - 7:26 am | स्पंदना
कायद्या पुढे म्हणन्या ऐवजी कायदा हातात असलेल्याणपुढे अक्कल चालत नाही नगरी.
22 May 2015 - 6:57 am | दमामि
अरेरे!
22 May 2015 - 8:21 am | द-बाहुबली
ही सत्य घटना असेल तर एक गोष्ट मनापासुन नमुद करावीशी वाटते आहे, विषेशतः पांढरपेशा लोकांसाठी ती म्हणजे पोलीस स्टेशनला चटकन घाबरु नका, तिथे जाणे म्हणजे गुन्हेगारी सिध्द होणे न्हवे, विशेषतः तुमची चुक नसताना जर असे बोलावणे आले.. झाडून सगळे नातेवाइक, मित्र, ओळखीचे असलेले वा नसलेले असा सगळा फौजफाटा सोबत घेउन तेथे पोचा/ बोलवा. जितके जास्तीजास्त लोक तुमच्या बाजुने जमा होतील तितके महत्वाचे आहे. जरुरी नाही की हे जमा झालेले लोक कोणी उच्चपदस्थ, पावरफुल वगैरे वगैरे असावेत, संखेने मात्र भरपुर असावेत.
दुर्दैवाने पांढरपेशे लोक हेच करायला कमी पडतात आणी मनस्ताप ओढवुन घेतात. बाकी जास्त काय बोलायचे... वाचुन वाइट वाटले.
22 May 2015 - 10:26 am | नाखु
पोलीस फक्त आणि फक्त पैश्याचे (आणि त्यामुळेच राजकारण्यांचे) मिंधे आहेत.
आणि त्यापायी ते कुठल्याही थराला जातात्.
(तुम्ही कुठल्याही बड्या धेंडाच्या पाठिंब्यावर नाही हे पाहिल्यावर तर) हाच आवेग आणि आवेष चौपट होतो.
ज्वलंत अनुभवी
नाखु
22 May 2015 - 12:35 pm | टवाळ कार्टा
+११११११११
22 May 2015 - 11:23 am | जानु
आपल्याला अपेक्षा नसेल त्या पेक्षा अधिक ठामपणे अनिकेत त्यांविरुद्ध लढतो आहे. अजुनही मागे हटण्यास तयार नाही. कारण प्रश्न आता गाडी पार्किंचा नसुन त्याच्या ताकदी पुढे किती वाकायचे याचा आहे. बाकी लोकांना गोळा करणे दबाव टाकणे यात तो नक्कीच कमी पडला. त्याला या बाबतचा अजिबात अनुभव नसल्यामुळे असेल कदाचित. पण वेळ गेल्यावर या बाबत बोलणे काही कामाचे नाही. वसंता बरोबर कॅमेरे बंद असतांना वाद घालतो. कॅमेरे चालु असेल तर अगदी सभ्य!
आणि अनिकेत त्याच्या पेक्षा त्याच्या बायकोला जास्त घाबरलेला वाटला कारण नवर्यापेक्षा बायकोच्या ओळखी त्याला जास्त चिंतादायक वाटल्या त्याच्या मताने विचार केला तर ज्या स्रीच्या अश्या "सभ्य" लोकांशी ओळखी तिच्या पासुन दुर राहिलेले उत्तम.
22 May 2015 - 11:36 am | मदनबाण
सामन्य माणसाचा भिडस्त स्वभाव आणि होत असलेल्या त्रास बद्धल मौन पाळणे हे मुख्य कारण वाटते !
आजच्या जगात कमकुवत व्यक्तीला "शांतपणे" जगण्याचा अधिकार राहिला नाही...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake It Off... ;) :- Taylor Swift
22 May 2015 - 1:06 pm | बाबा पाटील
एक लक्षात घ्या सामान्य माणुस विनाकारण यांना घाबरतो, आपली चुक नसेल तर त्यांच्या दुप्पट आवाजात बोला,जवळच्या एखाद्या मित्राला पत्रकारांशी संपर्क करायला सांगा हे नमुन ढुंगणाला पाय लावुन पळत सुटतात . जेंव्हा आपली चुक नसेल तेंव्हा कुठल्याही परिस्थीत मिडियाला मधे आणा. यांची वाईट लागते. पोलिस आणी गुंडांना कायद्याची नसेल तेव्हडी मिडियाची भिती असते आणी सामन्य माणसाचे ते शस्त्र असते.आणी महत्वाचे सगळेच पत्रकार विकावु नसतात.
22 May 2015 - 1:53 pm | मार्मिक गोडसे
माझ्या आजोबांचे व शेजार्याचे असेच एकदा जोरदार भांडन झाले होते. त्याने थेट पोलिसस्टेशनला आजोबांविरुद्ध तक्रार केली. पोलिस घरी आले व आजोबांना पोलिसस्टेशनला घेऊन गेले. आम्हीही गेलो. तिथल्या पोलिच निरिक्षकला खरी परिस्थीती काय ती आजोबांनी सागीतली. तो म्हणाला ठिक आहे तुम्ही शेजार्याविरुद्ध लेखी तक्रार द्या भो@@@ला आतच टाकतो. आजोबांना त्या अधिकार्याच्या हेतुबद्दल शंका आली. मुलाशी बोलून सांगतो असे म्हणुन आम्ही बाहेर आलो. समोर झाडाखाली कायम पो.स्टेशनला पडीक असणारा आमच्या ओळखीचा एक तरूण बसला होता, आम्हाला तेथे आलेले बघीतल्यावर त्याने येथे येण्याचे कारण विचारले. सर्व काही निट ऐकून घेतल्यावर त्याने शेजार्याविरुद्ध लेखी तक्रार करू नका असा सल्ला दिला. तुम्हा दोघांनाही शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली आत टाकतील व सुटकेसाठी तुम्हा दोघांकडून पैसे वसूल करतील. तुम्ही तुमच्या शेजार्याला येथे बोलवा मी समजावून सांगतो त्याला. आमचा शेजारीही ते ऐकून तक्रार मागे घ्यायला लगेच तयार झाला व त्याने आजोबांविरुद्धची तक्रार मागे घेतली. बर्याचदा वकिलापेक्षा अशी माणसेच योग्य व मोफत सल्ला देतात. असेच पोलिच स्टेशनचे दोन अनुभव आलेत. लिहीन कधीतरी.
बाबा पाटीलांच्या प्रत्येक मताशी १०० % सहमत. एकदा पोलिच स्टेशनला गेलो की पुढच्या वेळेस आत्मविश्वास आपोआपच वाढतो.
22 May 2015 - 2:22 pm | सिरुसेरि
वरिल गंभीर घटनालेख वाचला व त्यावरील या सर्व पोटतिडीकेने दिलेल्या प्रतिक्रियाही वाचल्या ( अधोरेखित ).
"दुर्दैवाने पांढरपेशे लोक हेच करायला कमी पडतात आणी मनस्ताप ओढवुन घेतात" , "सामन्य माणसाचा भिडस्त स्वभाव आणि होत असलेल्या त्रास बद्धल मौन पाळणे हे मुख्य कारण वाटते ! आजच्या जगात कमकुवत व्यक्तीला "शांतपणे" जगण्याचा अधिकार राहिला नाही... ""माणसाने इतकेही सरळ असू नये. सरळ झाडे अगोदर कापली जातात" "सामान्य माणुस विनाकारण यांना घाबरत" .
समाजात असे अनेक भिडस्त , पांढरपेशे , सरळमार्गी ,शांत कमकुवत , सर्वसामान्य मध्यममार्गिय / वर्गिय लोक या गुंडगिरीचा बळी ठरत असतात . तसेच यांच्यामध्ये एकजुटही नसते . आपण बरे आपले काम बरे हाच विचार त्यांच्यावर आधीपासुनच रुजविण्यात येतो . आता धडा घेउन या त्रुटींवर मात केली पाहिजे .एकमेकांना सांभाळुन घेउन वेळेला एकमेकांच्या मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे . बहुतेक करुन या वर्गातील आधिच्या १ ,२ पिढ्या या ठराविक शिक्षण ,ठराविक नोकरि या चाकोरीमध्येच राहिल्या . अर्थात ती त्या वेळेची गरजही होती . परंतु आता सद्य स्थिती बघुन पांढरपेशा लोकांनी बदलावे . पत्रकारिता , वकिली , बॉडी बिल्डींग ,जिम फिटनेस ट्रेनर , मिडीया या व अशा नव्या उपयोगी क्षेत्रांमध्येही पांढरपेशा लोकांनी पुढे यावे . ज्यामुळे ते स्वताची व इतरांची मदत करु शकतील .
22 May 2015 - 6:53 pm | शि बि आय
एकूणच परिस्थिती मनाला उद्विग्न करणारी आहे. सामान्य माणूस सहन करतो म्हणून काहीही करायचे का ????
तरीही माझ्यामते काही काही गोष्टी आमलात आणल्या तर फायदे नक्कीच होतील जसे की,
१. सुरुवातीलाच दुचाकीला ओरखडा काढला तेव्हाच खरे कोण आणि खोड कोण ह्याचा छडा लावण्यासाठी कॅमेरे लावणे. जी गोष्ट नंतर स्वखर्चाने केली ती आधीच सर्वानुमते करावी जेणेकरून त्रासदायक व्यक्तीचा देखील त्यात त्याच्या मनाविरुद्ध का होईना सहभाग असेल आणि थोडा धाक ही ! (असली माणसे सगळे कोळून प्यायलेली असतात तरीही आपले…)
२. अनिकेतने सदर वादावादी चालू असताना वेळोवेळी झालेले संभाषण मोबाईल वर रेकॉर्ड केले असते आणि ह्या पूर्वीच पोलिसात तक्रार केली असती तर वसंतला त्याचे गावगुंड आणि त्यांची माणसे जमा करायला कमी वेळ मिळाला असता.
३. पोलिस बरोबर अनिकेतने हा प्रकार स्थानिक नगरसेवक ( जर नगरसेवकच वंसताच्या बाजूने असल्यास विरोधी पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यास) आणि पत्रकार मंडळीस कळवला असता तर त्याला मदत नक्की मिळाली असती. कारण विरोधी पक्ष कार्यकर्ते काय किवा पत्रकार काय त्यांना असतात आणि अशा वेळी कदाचित समस्त सामान्य, पांढरपेशा वर्ग देखील त्याच्या पाठीशी ऊभा राहिला असता.
४. आणि शेवटचे थोडे आउट ऑफ वे जायची हिम्मत असल्यास आणि फक्त वसंतला धडा शिकवण्यासाठी सदर पोलिस स्टेशन मधील तक्रार अनिकेतच्या पत्नीने केली असती तर बराच फायदा झाला असता.
24 May 2015 - 8:28 pm | सभ्य माणुस
तिसरा मुद्दा अगदी proper वाटतो. काट्याने काटा काढायला पाहिजे आशा वेळी.