अनोळखी वळणावर माझं आणखी एक पाउल,
तू इथं नसतानाही इथंच असल्याची चाहूल,
प्रत्येक शब्दं शब्दं मला सगळं स्पष्ट आठवतंय,
तुझ्यामाझ्यातलं अंतर मला पुन्हा मागे पाठवतंय,
तसं बरंच काही सांगायचं होतं,राहून गेलं,
मनात साठलं ते, पावसासकट वाहून गेलं,
"तू कसा आहेस?",विचारताना तु़झी घालमेल कळ्लीच,
प्रश्न होते नवीन पण आपुलकी तुझी अगदी पहिलीच,
थंड पडले होते तुझे ते काळे डोळे,
ओठांवर हसु तरी शब्द थोडे ओले,
बघ तुला काही अजुनही आठवतंय का?
आठवणींच्या गाठोड्यात माझं काही सापडतंय का?
गालांवर ओघळ्णार्या माझ्या त्या आठवणी,
ओठांवर तरळणार्या माझ्या त्या आठवणी,
थरथरत्या हातांत अडकलेल्या माझ्या त्या आठवणी,
अन तुझ्या मिठीत सापडलेल्या माझ्या त्या आठवणी,
खरंच सगळं कळ्तंय मला,
तुझं जाणं आजही छळतंय मला,
मी तुला दिलेला माझा शब्द पाळतोय,
आजही तुझ्यातच स्वतःला जाळतोय,
दिसतंय, आज उत्तरं बदलली आहेत तुझी,
पण आज, प्रश्नंच कुठं आहेत माझी?
अन अगदी लगेचंच,
नेहमीप्रमाणे तू आसवांना वाट करून दिलीस,
कदचित त्या दिवशी तुही काही आसवं पाहिली असतीस!!
खरंच त्या दिवशी तुही काही आसवं पाहिली असतीस!!
प्रतिक्रिया
15 Apr 2015 - 1:57 pm | वेल्लाभट
कविता मस्त सुरू होती. सही जमलेली वाटत होती. लय, भाव, सगळं मस्त. आणि इतक्यात....
आँय?????? माझी?
आणि या पुढे कवितेचा शेवटही फुसका वाटला. वैयक्तिक मत हं. अनुभूतीचा चढता आलेख वरील वाक्याच्या कडव्यानंतर झपकन खाली आला राव.
तरीही....छान !
जाळतोय.... इथेच संपवली तर कविता? शेवटचा पंचही अबाधित राहतोय. एक सल्ला मात्र.
15 Apr 2015 - 2:20 pm | योगेश भालेकर
धन्यवाद!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद :-) !
कदाचित मला शेवट अचुक शब्दांत पकडता आला नसावा.
पण शेवटात मला नायकाची भूतकाळाची स्थिती आणि नायिकेची सध्यस्थिती यांमधले साधर्म्य दाखवायचे होते.
15 Apr 2015 - 9:37 pm | विवेकपटाईत
कविता आवडली.