०८:०८:०८:०८:०८:०८

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
8 Aug 2008 - 5:06 pm

तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे व सेकंद या सगळ्या जागी ०८ हाच आकडा असलेला एक क्षण नुकताच येऊन गेला. असा क्षण पुन्हा शंभर वर्षांनंतर २१०८या साली येईल. तो क्षण पहायला त्या वेळी आपल्यातले कोणी असणार नाही. या वर्षी फक्त एक सेकंद उशीराने जन्मलेल्या मुलाला सुद्धा तो क्षण पाहण्यासाठी शतायुषी व्हावे लागेल. पण ०१, ०२ वगैरे आंकडे सहा जागी असलेले अशासारखे क्षण गेल्या आठ वर्षांपासून दर वर्षी येत आहेत आणि पुढील चार वर्षे म्हणजे १२ डिसेंबर २०१२ पर्यंत येत राहतील. त्यांतही खास गंमत २०११ या वर्षी ११ नोव्हेंबरला येणार आहे, कारण त्या वेळी ११ चा आंकडा सहा वेळा येईल म्हणजेच १ हा आंकडा त्या क्षणी तब्बल बारा वेळा येणार आहे. १२-१२-२०१२ नंतर जन्मलेल्या लोकांना मात्र असे योग पाहण्यासाठी कमीत कमी ८८ वर्षे जगावे लागेल. शून्याकडे दुर्लक्ष केले तर मात्र २-२-२२, २२-२-२२ वगैरे तारखांना २ वाजून २२ मिनिटे २२ सेकंद ही वेळ अशा प्रकारे फक्त एकच आंकडा अनेक वेळा वापरून सांगता येणारे क्षण येत राहतील. या वर्षी आपण ८ हा आकडा ६ वेळा पहात आहोत. हा आंकडा सुद्धा पुन्हा ऐंशी वर्षांनी म्हणजे २०८८ साली लागेल. तेंव्हा ८ हा आंकडा ०८:०८:८८:०८:०८:०८ अशा रीतीने ७ वेळा लिहिता येईल.

या शतकाची मोठ्या उत्साहात सुरुवात करतांना मनात थोडीशी धागधुग होती. 'वाय टू के' (Y2K) च्या भीतीने संगणकविश्व वर्षभर अस्वस्थ होते. त्या काळात जगभरातल्या कॉम्प्यूटर्समधील विविध प्रोग्रॅम कसोशीने तपासले जात होते. तोपर्यंत विविध उद्योगांचे बरेच संगणकीकरण झालेले होते पण ते अजून बाल्यावस्थेत असल्याने त्यावर विश्वास बसला नव्हता. संगणकावर आधारलेली सारी व्यवस्था क्षणार्धात कोसळून पडेल अशी भीती दाखवली जात होती. जगभरातली सारी विद्युतनिर्मितीकेंद्रे बंद पडून सगळीकडे मिट्ट काळोख होईल, आगगाड्या जागच्याजागी थबकतील, विमाने उडू शकणार नाहीत आणि हवेत असलेली विमाने उतरवायला त्रास होईल, ऑफीसातले दस्तावेज कुचकामाचे होतील, बँकेतून पैसे मिळणार नाहीत वगैरै वगैरे अनेक पिल्ले सोडली जात होती. आपल्याला पुरेसे महत्व आणि संसाधने मिळावीत म्हणून कॉम्प्यूटर उद्योगानेच कदाचित असे दारुण चित्र रंगवले असावे असेही कांही लोकांना वाटत होते. भारतात त्या काळी त्या मानाने स्वयंचलित प्रणाली फारशा जागी नव्हत्या आणि बहुतेक काम मानवी कष्टानेच होत असल्यामुळे वाय टू के चा तेवढा मोठा बागुलबुवा भासत नव्हता.

पण नव्या शताब्दीच्या सुरुवातीचे स्वागत करण्याच्या जल्लोषात आणि कुठूनही कसलीच संगणकाच्या कोसळण्याची बहातमी न आल्याने त्याचाही आनंद साजरा करण्यात एक महत्वाचा क्षण हरवला गेला. नव्या शतकाची सुरुवात झाल्यानंतर बरोबर १ तास १ मिनिट १ सेकंदाने ०१०१०१०१०१०१ हा क्षण येऊन गेल्याचे लक्षातच आले नाही.

त्यानंतर २, ३, ४, ५ आंकडे असलेले क्षण मी झोपेत असतांनाच येऊन गेले. त्यामुळे ते जाणवले नाहीत. २००६ च्या वर्षी त्याची आठवण येऊ शकण्याच्या स्थितीत मी नव्हतो. गेल्या वर्षी मात्र आधीपासून ठरवून हा क्षण गांठला. त्यासाठी आधी आपले घड्याळ बरोबर लावून ठेवले होते आणि त्यातील कांटे आधी मिनिटा मिनिटाने आणि नंतर सेकंदा सेकंदाने पुढे सरकत असतांना टक लावून पहात होतो. अखेरीस तो क्षण येताच तास कांटा सात तासावर आणि मिनिट कांटा व सेकंद कांटा दोघेही एकत्रपणे सात मिनिटांवर आले. पुढच्याच क्षणी सेकंद कांटा मिनिट कांट्याला ओलांडून पुढे गेला.

त्या क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेत पावसाची भुरभुर आधीपासून सुरू होती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. तेंव्हा त्यांना चिकटून बसलेले पाण्याचे थेंब खाली येत होते. रस्त्यातली कांही भटकी कुत्री अंग मुडपून आडोशाला जाऊन पडली होती, कांही केकाटत होती. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र तर अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. कुठून तरी मोजायला सुरुवात केली तर आपण सात पर्यंत पोचणार. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला. पण असा योग येऊन गेला हे तरी किती माणसांच्या लक्षात आले असेल? जो तो अजून अंथरुणात पडलेला होता नाही तर आपल्या सकाळच्या कामात गुंतलेला होता. असल्या उचापती करणारा माझ्यासारखा रिकामटेकडा मीच असेन! अगदीच कांही असे नाही बरे! युरोपमध्ये जेंव्हा सकाळचे सात वाजून सात मिनिटे सात सेकंद झाले तेंव्हा या मुहूर्तावर तिथल्या कांही उत्साही शहाण्या लोकांनी जगातील सात आश्चर्यांची नवी यादी प्रसिद्ध केली. गेली सात वर्षांहून अधिक काळ ते लोक या कामाला लागले होते म्हणे.

या वर्षी आज सकाळी ०८:०८:०८:०८:०८:०८ हा क्षण येऊन गेला. त्या वेळी मी रोजच्याप्रमाणे एका हातात चहाचा कप आणि दुस-या हातात वर्तमानपत्र धरून टीव्हीच्या समोर बसलो होतो. घड्याळाकडेही लक्ष होते. तो महत्वाचा क्षण आला आणि गेला. टीव्हीवर कोणतीही ब्रेकिंग न्यूज आली नाही, त्याअर्थी सगळीकडे आलबेल होते. आजूबाजूला बाहेर काय चालले आहे हे पहाण्यात कांही प्रयोजनच नव्हते. दूर चीनमध्ये तिथल्या घड्याळाप्रमाणे या दिवशी बेजिंग येथील ऑलिंपिक खेळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, पण ते रात्रीच्या आठ वाजता.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

8 Aug 2008 - 9:49 pm | प्रमोद देव

आनंदराव माहीती गमतीशीर आहे. वाचताना मजाही आली.
तरी देखिल हा प्रश्न उरतोच की खरंच त्याचं काय महत्व आहे बुवा?
अर्थात बर्‍याच गोष्टी मानण्यावर असतात... असे म्हणतात. त्याप्रमाणे मानणार्‍यांसाठी ही पर्वणी होती आणि नाही त्यांच्यासाठी इतर कोणत्याही क्षणांसारखाच तो एक क्षण होता. बस्स जास्त काही नाही.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

राधा's picture

9 Aug 2008 - 3:33 am | राधा

आधी का नाही लिहिलत हे..........मी पण तो क्षण अनुभवला असता ना............;(

अनिल हटेला's picture

9 Aug 2008 - 7:32 am | अनिल हटेला

मी सुद्धा अनुभवला हा क्षण !!!

मुळात चायनीज प्रमाण वेळेनुसर रात्री ८ वाजुन ०८ मिनीटीनी आणी ०८ सेकन्ड झाले असता ,

ऑलिम्पिक ची सुरुवात झाली ..

स्थानीक वेळेनुसार रात्री १२.२५ पर्यन्त उद्घाटन सोहळा चालू होता..

आणी सी सी टी व्ही वर आम्ही हा सोहळा पाहात होतो...

आगाउ माहिती: माझ्या ओळखीचे एक ग्रहस्थ मला आधीच म्हनाले होते की ,

०८ हा अन्क पाच वेळा येत असलेला हा क्षण अशुभ आहे ,

काही ना काही विचित्र ,वाईट वगैरे घडेन !!!

पण तस काहीही घडल नाही....

असो !!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आनंद घारे's picture

9 Aug 2008 - 9:49 am | आनंद घारे

बीजिंग ऑलिंपिक रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सुरू झाले ती वेळ ०८: ०८:२००८:२०:०८ अशी होती. ज्या लोकांचा ८ ऑगस्टचा मुहूर्त चुकला असेल त्यांना २० ऑगस्ट रात्री ८ वाजून ८ मिनिटे आणि ८ किंवा २० सेकंदाचे मुहूर्त साधता येतील. त्या क्षणांच्या वेळा २०:०८:२००८: २०:०८:०८ आणि २०:०८:२००८: २०:०८:२० अशा राहतील.

अर्थातच हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. निसर्गाला त्याचे कांही सोयरसुतक नसते हे मी माझ्या लेखात स्पष्ट केले आहे. मी स्वत: मुहूर्त ही संकल्पना मानत नाही. माझ्या मते कोणतीही वेळ शुभ किंवा अशुभ तर नसतेच. अमावास्येच्या मध्यरात्री किती तरी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत.

II राजे II's picture

9 Aug 2008 - 12:40 pm | II राजे II (not verified)

अमावास्येच्या मध्यरात्री किती तरी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत.

राजे ह्या धरतीवर अवतरले ;)

**

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Aug 2008 - 6:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि १९४७ साली ऑगस्ट महिन्यातल्या १४ आणि १५ तारखेच्या मधल्या मध्यरात्री, अमावस्येचा "दिवस" संपता संपता भारत स्वतंत्र झाला.

सहज's picture

10 Aug 2008 - 6:16 pm | सहज

८/८/०८ ला सकाळि ८.०८ ला ८ पाउंड ८ औंसाची कन्या

आधीक माहीती येथे

अभिज्ञ's picture

10 Aug 2008 - 6:40 pm | अभिज्ञ

तारिख ८/८/८ ,सकाळी ८ वा ८ मि. ,वजन ८ पौंड ८ औंस
म्हणजे एकुण ७ वेळा ८.
आता पोरीचे नाव "अष्टमी" ठेवायला पाहिजे म्हणजे राहिलेल्या आठाची भर पुर्ण करता येइल. :)
(ह.घ्या.)

अभिज्ञ.