ते दोघ

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
20 Oct 2014 - 11:33 am

विदयार्थी दशेत असताना 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मी एका प्री पोल सर्व्हे मध्ये भाग घेतला होता . त्यावेळेस अमरावती लोकसभा मतदार संघात पण काही चकरा कराव्या लागल्या होत्या . शिवसेनेचे अनंत गुढे आणि लोकशाही आघाडीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होती . त्यावेळेस कोणी एक बच्चु कडू अस विचित्र नाव असणारा कोणी एक पोरगेला उमेदवार पण अपक्ष म्हणून उभा होता . या दिग्गजांच्या लढतीमध्ये पोरांचं टोळक घेऊन फिरणारा आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा आर्थिक परिस्थिती यथातथाच असणारा हा पोरगा काय करणार असाच एकूण सूर होता . पण निवडणुकीच्या मतमोजणी नंतर सगळ्यांनाच तोंडात बोट घालावी लागली . त्या 'पोरांन ' लोकसभा मतदारसंघात येणारया ६ विधानसभा मतदारसंघापैकी ३ मतदारसंघात आघाडी घेतली होती . फ़क़्त ६००० मतांनी त्याचा निसटता पराभव झाला होता . हि तर फ़क़्त सुरुवात होती . लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू आमदार म्हणून अचलपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले . हे पाणी काही वेगळेच आहे हे तेंव्हाच लक्षात आले होते . एकदा माझा मलकापूर ला शिकणारा एक मित्र घरी सुट्टीत आला असताना भेटला . त्याला बच्चू कडू बद्दल विचारले असताना त्याने अजून माहिती दिली . घरची आर्थिक परिस्थिती यथा तथा असतानाच हा पोरगा सगळ्या गरजूना मदत करण्यात आघाडीवर असायचा . एकदा कबड्डी चा खेळ रंगला असताना त्याच्या मित्राला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या . अमरावती च्या डॉक्टरांनी हृदय रोगांच निदान केल . इलाजासाठी मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता . पण पैसे कुणाकडे होते ? गरिबी सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेली . शेवटी बच्चू कडू ने घरचा कापूस विकून थोडे पैसे जमा केले . पण त्या पैशांमध्ये प्रवास करणे शक्य नव्हते . मंडळी without ticket निघाली . अनेकदा अपमान सहन करावे लागले . अनेकदा टीटी ने खाली उतरवल . पण ३ दिवसांनी मंडळी कशी बशी मुंबई ला पोहोंचली . गावाकडची हि पोर पहिल्यांदाच मुंबई ला आलेली . कस बस हॉस्पिटल शोधून काढल . रस्त्यावरच्या बाकावर झोपून रात्री काढल्या . मित्राला रक्ताची गरज पडली . वजन ५० किलो पेक्षा कमी असल्याने बच्चू कडू यांना रक्तदान करता येत नव्हते तर पठ्ठ्याने खिशात दगड भरून वाढीव वजन दाखवून रक़्त दिल . वाचला . मित्र वाचला आणि जेमतेम विशीत असणारां बच्चू गावाचा हिरो बनला . मग प्रथाच पडली . कुणाला काहीही अडचण आली कि तो बच्चू च्या घराचा दरवाजा ठोठावायचा . मग बच्चू पण त्याला आपल्या बाईक वर बसवायचा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायचा किंवा गरज पडली तर त्यासाठी मुंबई ला पण जायचा . छोट्या गावातून मुंबई सारख्या ठिकाणी उपचारासाठी जाणारया रुग्णाचे आणि त्याच्या कुटुंबियांचे काय हाल होतात हे बघितल्याशिवाय कळणार नाही . बच्चू कडू आणि त्याचे मित्र इथे मदतीचा दुवा बनले . रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना आर्थिक मदतीपासून ते त्यांच्या जेवणाखाणाची व्यवस्था करेपर्यंत या मदतीची range होती . वेळप्रसंगी पैशासाठी अडवणूक करणारया हॉस्पिटल च्या व्यवस्थापना शी नडाव लागायचं . बच्चू आनंदाने नडाय चा . आतापर्यंत साधारणतः ४००० शस्त्रक्रियांना बच्चू कडू नि मदत केली आहे .

ज्यावेळेस २००४ ला तो लोकसभेला उभा राहिला होता तेंव्हा इतक्या दांडग्या पुण्याई चा आधार त्यामागे होता . आणि आम्ही मुंबई पुण्याहून येणारे लोक त्याची त्याच्या दाढीवरून आणि वेगळ्या नावावरून टर उडवीत होतो . आपल्याच राज्यातल्या लोकांबद्दल आणि तिथल्या भयाण दारिद्र्याबद्दल आम्ही किती ignorant होतो याचा हा पुरावाच . बच्चू कडू सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले . आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी ते सतत चर्चेत असतात . भार नियमनाच्या विरुद्ध पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं 'शोले ' आंदोलन तर खूप गाजल . त्यांनी केलेल्या आंदोलनाची हि यादी :

उलटे लटकवून आंदोलन ः
दारूच्या दुकानासमोर दूध वाटप आंदोलन
अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन
खुर्ची जलाओ आंदोलन
मुक्कामी आंदोलन
गणपती स्थापना आंदोलन
शोले आंदोलन
विष खा आंदोलन
राहुटी आंदोलन
टेंबा आंदोलन
सामुहिक मुंडण आंदोलन
अर्धदफन आंदोलन (आदिवासींसाठी)
कार्यालयात साप सोडण्याचे आंदोलन
फिनले मील आंदोलन
मुख्यमंत्र्यांच्या गावी डेरा आंदोलन
ठिय्या आंदोलन
विहिरीत उतरून आंदोलन
(स्त्रोत - http://bacchukadu.com/Default.aspx) हि web site बच्चू कडू आणि त्याच्या कार्यालायाबद्दल अजूनही माहिती देते .

कधी गरीब कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करणारया नाफेड चे कार्यालय पेटवून दे तर कधी मतदारसंघातल्या गरीब माणसाकडे काम करून देण्यासाठी लाच मागणार्या गब्बर अधिकारयाला मंत्रालयात जाउन फटकाव हा याचा खाक्या . विधानसभा भवन परिसरात त्याचे अनेक सुरस किस्से ऐकायला मिळतात . एकदा मतदार संघात होणारया वीज प्रकल्पाला विरोध म्हणून हा विधानसभेत बंडी घालून गेला होता . विधानसभेत भाषण करताना नक्षल वाद्यांना गोळ्या घालण्या एवजी इथे बसलेल्या आमदारांनाच त्या घालायला पाहिजेत असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते . विदर्भातील ‘कलावती’ या गरीब वृद्ध महिलेची परिस्थिती पाहून हळहळलेल्या राहूल गांधींनी तिला घरकूल बांधून दिले. खरे तर अखिल भारतात अशा किती तरी ‘कलावती’ आहेत. फक्त एक घर बांधून त्या सार्‍यांचे दुःख हलके होऊ शकत नाही. राहूल गांधींचे राजकीय वजन पाहता संपूर्ण देशातील अशा पीडितांसाठी ते सक्षम योजना अंमलात आणू शकत होते. पण तसे झाले नाही. बच्चुभाऊंनी अशा प्रवृत्तीविरूद्ध आवाज उठवण्याचे ठरवले आणि त्यांनी राहूल गांधींच्याच मतदारसंघातील ‘शकुंतला’ या अपंग अपत्याच्या आईचे घर कारसेवेच्या माध्यमातून बांधून देण्याचे ठरवले. अमरावती जिल्ह्यात गावोगावी फिरून ‘झोली भरो आंदोलनाने निधी गोळा केला आणि शकुंतलेचे घर उभे राहिले.

मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकाना बच्चू कडू कदाचित रानटी आणि असंस्कृत वाटू शकतो . पण समाजातल्या शेवटच्या थरातल्या लोकांसाठी काम करताना आणि निब्बर शासकीय यंत्रणेकडे दाद मागताना ज्याच्याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठींबा नाही अशा नेत्याने अजून काय करणे अपेक्षित आहे ? बच्चू कडूच्या मागचा जनाधार पाहून अनेक पक्षांनी त्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला . दस्तुरखुद्द शरद पवारांनी त्याना भेटून पक्षात सामील होण्याची गळ घातली . पण बच्चू कडु नी कोणालाच दाद दिली नाही . नाहीतर मंत्रिपद किंवा गेलाबाजार एखाद्या मंडळाचे अध्यक्षपद मिळवणे त्याला काही अवघड नव्हते . त्यामुळे या व्यवस्थेत निव्वळ त्याचे असणेच खूप आश्वासक ठरते .

आता एका माजी आमदाराविषयी . दुर्दैव हे की आमच्या परभणी जिल्ह्यातले असून पण मला त्यांच्याबद्दल खूप उशिरा कळल . ते पण सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेबु वर टाकलेल्या एका पोस्ट मुळ . ज्ञानोबा गायकवाड हे शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर गंगाखेड मतदारसंघातून सलग ३ टर्म राहिलेले आमदार . आज नगरसेवकाने पण आलिशान गाड्यातून फिरण्याचा काळ आला असताना ज्ञानोबा गायकवाड यांच वेगळेपण कशात आहे ? तर मुंबई हून आलेल्या धन दांडग्या उमेदवाराने प्रचंड धनशक्तीचा वापर करून १९९५ मध्ये त्यांचा पराभव केला . पराभव झाल्यावर दुसऱ्या दिवशी रोजगार हमी योजनेत बायको सोबत कामावर जायला लागले . त्यांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नाही . दोन्ही मुल आता मार्गाला लागली आहेत . छोट्या मोठ्या नौकर्या करून उदरनिर्वाह करत आहेत . त्याना कंत्राटदार बनवून घरात खोऱ्याने पैसा आणण ज्ञानोबा गायकवाड यांच्या मनात पण नाही आल . मुलाना पण त्याची कांही खंत नाही . ज्यांनी २००९ मध्ये गायकवाड यांचा पराभव केला ते सीताराम घनदाट यांचा गंगाखेड मतदारसंघाशी काहीही अर्थार्थी संबंध नव्हता . मुंबईत बसून ते अभ्युदय बँकेचे साम्राज्य सांभाळत होते . मऊ जमीन बघून ते इथे घुसले . आणि गंगाखेड च्या राजकारणाचे सगळे संदर्भच बदलले . आता गंगाखेड चे राजकारण फक्त पैशाभोवती फिरते . या विधानसभा निवडणुकीत तर हद्द झाली . पैसे वाटप करताना घनदाट आणि गुट्टे या दोन धनदांडग्या उमेदवाराना अटक झाली . माझ्या तिथल्या मित्राने सांगितले कि प्रत्येक मतामागे ५००० रुपये असा रेट चालू होता . विश्वंभर चौधरी म्हणतात तस ज्याला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बदलत्या स्वरुपाचा अभ्यास करायचा आहे त्याने गंगाखेड मतदार संघाचा अभ्यास करावा .

बच्चू कडू आणि ज्ञानोबा गायकवाड . एक वर्तमान काळ आणि एक भूत काळ . दोघेही मराठवाडा आणि विदर्भ अशा मागास भागातून आलेले आणि rare breed प्रकारातले . राजकारणात अजून पण प्रामाणिकपणा टिकून आहे याची हि दोन प्रतिक . सगळच काही संपल नाही याची जाणीव टोकदारपणे करून देणारी माणस . नुकत्याच झालेल्या पंचरंगी तमाशानंतर यांची value अजूनच कळली . काल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना एक नजर अचलपूर च्या निकालावर पण होती . अनेक round बच्चू कडू पिछाडीवर होता . पण जिंकला एकदाचा शेवटी . आता त्याची कारकीर्द संपवणारा कोणी सीताराम घनदाट तिथे नाही आला म्हणजे मिळवली .

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

दोन लोकांची चांगली ओळख करुन दिलीत.
गंगाखेडच राजकारण तिथल्या बेसुमार वाळुउपसा आणी त्यातुन येणार्या प्रचंड काळ्यापैशाने बदलल.
गंगाखेड मध्ये जर तुमची 10 मते असतील तर तुम्हाला HERO PASSION PRO गाडी मिळेल.

मित्रहो's picture

20 Oct 2014 - 1:51 pm | मित्रहो

विषयी एकले होते पण सविस्तर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. राजकारणात सुद्धा चांगल्या हेतुने काम करनारी माणसे आहेत हे बघितले की आनंद होतो.
दुसरा आणि थोडा वेगळा मुद्दा असा की रॉबीन हुड पद्धतीने समस्या सोडवण्याची तऱ्हा काही काळानंतर फारसी प्रभावी राहत नाही. विशेषतः तुम्ही आमदार, खासदार म्हणून निवडले गेल्यानंतर लोकांना समस्यांचे समाधान हवे असते फक्त आंदोलन नाही. तुम्ही ज्या सिस्टिमधे काम करता ती समजून घेउन रचनात्मक काम करणे गरजचे असते. प्रत्येकालाच आपल्या मतदारसंघात रस्ते बांधायचे असतात पण त्यासाठी आमदार किंवा खासदार निधीतून मिळनारा पैसा पुरेसा नसतो तेंव्हा तो कुठुन मिळतो हे समजून तो पैसा आणून कामे करावी लागतात. हे जर नाही समजले तर बऱ्याचदा चांगला उद्देष असनारी माणसेही काही कालाने मागे पडतात. समाजाला बच्चू कडू किंवा ज्ञानोबा गायकवाड यासारख्या चांगला हेतु ठेवनाऱ्या माणसे राजकारणात यशस्वी व्हावे हेच वाटते.

पिंपातला उंदीर's picture

20 Oct 2014 - 3:55 pm | पिंपातला उंदीर

धन्यवाद : )

पैसा's picture

20 Oct 2014 - 4:15 pm | पैसा

बच्चू कडू हा एकदम इंटरेस्टिंग माणूस दिसतो आहे. आणि अजून अशी माणसे निवडून येऊ शकतात याचं आश्चर्यच वाटलं. दुसरे गायकवाड पण ग्रेट! मात्र लोकांना साधेपणापेक्षा हातात प्रत्यक्ष येणार्‍या नोटा जास्त महत्त्वाच्या वाटतात, हा आपल्या सिस्टीमचा दोष आहे. त्या पैसे घेऊन मतदान करणार्‍या लोकांनाही नावे ठेवता येणार नाहीत. कारण तेही बरेचदा पैशाच्या अभावी असली कामे करतात.

या दोघांची ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद!

प्रमोद देर्देकर's picture

20 Oct 2014 - 4:42 pm | प्रमोद देर्देकर

राजकरणातील खुप चांगल्या माणसांची ओळख करुन देणारा लेख.

सगळीकडे कमी वाईट उमेदवार शोधण्याची चर्चा असताना राजकारणातल्या या चांगल्या माणसांची ओळख वाचुन हायसं वाटलं.अगदीच चिखल नाही म्हणजे सर्वत्र.धन्यवाद ओळख करुन दिल्याबद्दल!

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2014 - 8:39 pm | प्रभाकर पेठकर

अगदीच चिखल नाही म्हणजे सर्वत्र.
चिखल आहे म्हणूनच 'कमळ' उगवले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2014 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

राजकारणात असूनही चांगलेपणा न सोडलेल्या दोन दुर्मिळ माणसांची ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

21 Oct 2014 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

@ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेबु वर टाकलेल्या एका पोस्ट मुळ . ज्ञानोबा गायकवाड >>> हे फेबु वर वाचलवतं.. बच्चु कडू हे फक्त ऐकलेलं नाव होतं. ते आज समजलं. लैच भारी आसामी म्हणायची ही सुद्धा! *good*

जबरदस्त लिहिलं आहे हो. असंच लिहीत रहा...

मुक्त विहारि's picture

21 Oct 2014 - 6:49 am | मुक्त विहारि

आवडली

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2014 - 7:51 am | श्रीरंग_जोशी

लेखन आवडले. या निमित्ताने एक जुनी आठवण लिहितो.

ऑगस्ट १९९९ च्या शेवटचा आठवडा - मी कॉलेजच्या प्रथमवर्षात होतो. अमरावतीपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या करजगाव येथे यूथ कँपला गेलो होतो. त्यावेळच्या लोकसभा व विधानसभेची एकत्रित निवडणुक आठवड्यावर येऊन ठेपली होती. सगळ्या वर्तमानपत्रांत एकाच प्रकारच्या बातम्या पुन्हा पुन्हा येत होत्या.

काँग्रेस / भाजप / शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अमुक अमुक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

करजगाव हे अचलपूर विधानसभा मतदारसंघात येते. त्यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री विनायकराव कोरडे अचलपुरचे आमदार होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने माजी आमदार वसुधाताई देशमुख यांना तिकिट दिले होते. बच्चू कडू तेव्हा नुकतेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून नावारूपास येऊ लागले होते. त्या निवडणुकीत अपक्ष म्हणून अचलपूर मतदारसंघातून उभे होते. तो युथकॅंप पालकमंत्र्यांच्या गावात असूनही लोकांकडून बच्चू कडू या अपक्ष उमेदवाराबद्दल कौतुकाने बोलत होते. ते निवडणुक जिंकतील असे मात्र खात्रीने कुणीच शकत नव्हते.

ती निवडणुक मतपत्रिका वापरून महाराष्ट्रामधली कदाचित शेवटची निवडणुक होती. मतदानाच्या वेळी मतदाराला दोन मतपत्रिका दिल्या जात होत्या (बहुधा फरक कळण्यासाठी पिवळ्या व लाल रंगाच्या). काही आठवड्यांनी निकाल लागला. अचलपूरहून वसुधाताई देश्मुख विजयी झाल्या.

आश्चर्यकारकरित्या दुसऱ्या क्रमांकाची मते कोरडेंना न मिळता बच्चू कडू यांना मिळाली. मतांमधला फरक होता केवळ २२३१. मतदानाच्या वेळी लोकसभेसाठी अमरावती मतदारसंघातून उभ्या असणाऱ्या अपक्ष उमेदवारालाही तेच चिन्ह मिळाले होते जे बच्चू कडूंचे होते. दुर्दैवाने ग्रामीण भागातल्या अनेक मतदारांनी कडू समजून लोकसभेतल्या अपक्ष उमेदवाराला मत दिले अन थोडक्यात कडूंचा विजय हुकला. वसुधाताई त्या विधानसभेतील काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार होत्या अन विनायकराव कोरडेंची राजकीय कारकीर्द त्या निवडणुकीनंतर संपली.

२००४ पासून बच्चू कडू सलग तीन विधानसभा निवडणुका अपक्ष म्हणून जिंकले अन २००४ लोकसभेमध्ये थोडक्यात खासदार होता होता राहिले.

पिंपातला उंदीर's picture

21 Oct 2014 - 7:21 pm | पिंपातला उंदीर

@जोशी छान प्रतिसाद

खटपट्या's picture

21 Oct 2014 - 8:32 am | खटपट्या

बच्चू कडू बद्द्ल ऐकून होतो. पण आज अजुन माहीती मिळाली !!

पिंपातला उंदीर's picture

21 Oct 2014 - 10:29 am | पिंपातला उंदीर

प्रतिक्रिया देनार्या सर्वाना धन्यवाद

मराठी_माणूस's picture

21 Oct 2014 - 2:01 pm | मराठी_माणूस

आगळ्या वेगळ्या ओळखी बद्दल धन्यवाद.

खूपच छान ओळख! धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

21 Oct 2014 - 7:45 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते.

दोन व्यक्तीमत्वांची सुरेख ओळख करुन दिल्या बद्धल धन्यवाद ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

पिंपातला उंदीर's picture

22 Oct 2014 - 5:55 pm | पिंपातला उंदीर

धन्यवाद ! Smile

मी-सौरभ's picture

22 Oct 2014 - 8:00 pm | मी-सौरभ

सगळेच अपक्ष धनदांडगे असतात आसा माझा आजवर समज होता तो तुम्ही बदललात धन्यवाद!!

यशोधरा's picture

22 Oct 2014 - 8:18 pm | यशोधरा

लेख आवडला. चांगली ओळख. अशी अजून माणसं येऊदेत महाराष्ट्राच्या राजकारणात.

आरोह's picture

22 Oct 2014 - 11:55 pm | आरोह

लेखा बद्दल धन्यवाद

अर्धवटराव's picture

23 Oct 2014 - 12:05 am | अर्धवटराव

बरं झालं अशी छान ओळख करुन दिलीत ते.

असच काहि राजु शेट्टींबद्दल पण ऐकलय. धनदांडग्या शुगर लॉबी विरुद्ध ते अथक लढत होते. एकदा त्यांच्यावर मारेकरी देखील घातले गेले. खुप मारलं त्यांना. आणि मेले म्हणुन एका शेतात फेकुन दिलं. पण ते वाचले आणि परत लढले. शेवटी सामान्य भाजीविक्रेत्यांकडुन वर्गणी गोळा करुन निवडणुक लढवली व जिंकली.

पिंपातला उंदीर's picture

23 Oct 2014 - 4:47 pm | पिंपातला उंदीर

बच्चू कडू पण लोक वर्गणी वर निवडणूक लढवतात . निवडणुका कोट्यावधीची उड्डाण घेत असताना हे असे लोक विरळेच

रुस्तम's picture

8 Aug 2016 - 11:10 pm | रुस्तम

धागा उपर आने दो.