संध्याकाळ झाली आणि काळोखाबरोबर पावसाची रिपरिप वाढली. समोरच्या समुद्र किना-यावर तरुणाईच्या हुल्लडबाजीने जोर पकडला होता. नाना हळु उठले आणि त्यांनी खिडकी लावुन घेतली. जपाची माळ घेवुन बसलेल्या माईंकडे त्यांचे लक्ष गेले. काठी च्या मदतीने ते उठले आणि थरथरत्या हातांनी त्यांनी औषधाचा बॉक्स उघडला. बारीक पांढ-या गोळ्या त्यांनी माईंच्या हातात ठेवल्या. काही न बोलता माईंनी त्या गिळल्या. घडाळ्याचा काटा जस जसा ७ च्या दिशेने सरकु लागला तसे नाना बेचैन झाले. एवढ्यात शेजारच्या काकु उगीचच वर्तमानपत्र घेण्याच्या निमित्ताने डोकावुन गेल्या. काळ इथेच थांबला तर बरे असे वाटुन नानांच्या छातीतील धडधड वाढली. जो-याच्या वा-याने खिडकी उघडली आणि समुद्र किनारी
जमलेल्या जमावाचा कल्लोळ एखाद्या वावटळी सारखा घरात शिरला. एवढ्यात घडाळाने सातचे टोले दिले. एखादा वीजेचा धक्का बसावा तश्या माई दचकल्या. नाना सावध होवुन खुर्चीत बसले. गुडघ्यावर दोन्ही हात टेकत माई उठल्या आणि त्यांनी दिवा लावला. नंतर देवाच्या तसबीरी समोर त्यांनी निरांजन लावले. त्याच निरांजनाच्या वातीवर त्यांनी एक अगरबत्ती पेटवली. खुरडत खुरडत त्या दुस-या भिंतीकडे गेल्या. नाना माईंच्या जवळ येवुन उभे राहीले. पावसाने आता प्रचंड जोर धरला होता. त्या भिंतीवर लावलेल्या तसबीरीकडे माई एकटक बघत राहील्या. अशाच एका पावसाळी संध्याकाळी
समुद्रांच्या लाटांनी गिळंकृत केलेल्या त्यांच्या एकुलत्या एक मुलाची ती तसबीर होती. तसबीरीसमोर अगरबत्ती ठेवताच माईंना अनावर उमाळा आला आणि त्या ठसठसुन रडु लागल्या. आपले अश्रु लपवत नाना केवळ माईंच्या खांद्यावर थोपटत राहिले.
प्रतिक्रिया
29 Jul 2014 - 7:42 pm | शुचि
:(
29 Jul 2014 - 7:57 pm | शैलेन्द्र
:(
लिहीतं रहा..
30 Jul 2014 - 12:03 pm | बाबा पाटील
नाना व माई म्हटल्यावर मला उगाचच मिपाकर नाना आणि माई आठवल्या.................
30 Jul 2014 - 11:45 pm | मुक्त विहारि
छान लिहीले आहे.
अजून लिहा...
31 Jul 2014 - 5:54 pm | युगन्धरा@मिसलपाव
एव्ह्ढच...............अजुन लिहा ........