भोवताली सर्वत्र अंधार आहे,सगळीकडे त्याचाच संचार आहे
कोण कुणाच रक्त पितोय,कुणी आपलेच खिसे भरतोय
ज्याला काही जमत नाही तो मात्र हताशपणे बघतोय
पण त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
अंदाधुंदी माजली आहे,जो तो मनाला येईल तसे वागतोय
स्वतः बरबटलेला आहे पण दुसऱ्याच्या शुद्धतेचा पुरावा मागतोय
यातून पुढे काय साध्य होणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
एकेकाळी सोन्याचा धूर होता,आज दारिद्र्याचा पूर आहे
बासष्ट वर्षे झाली तरी लक्ष्य अजून खूपच दूर आहे
ज्या दिशेला धावतोय ती बरोबर का चूक ते कसे कळणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
देशभक्तांच्या रक्ताने पेटवलेल्या ज्योतीच उब आज कमी पडते आहे
अन्याय व अत्याचाराने धम्न्यातील रक्तच गोठले आहे
"त्यांच्या" ज्योतीचा वणवा कोण पेटवणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
नेत्यांकडे सगळ्या सुखसोयी,गरीबाकडे फक्त शिव्याशाप आहेत
पुढच्या पिढीला काय देणार आपण या चिंतेत आजचे आईबाप आहेत
त्यांची चिंता कोण दूर करणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
उपासमार,बेकारी,दारिद्र्य हे परकीयांचेच आशीर्वाद आहेत
आपले दुर्दैव की आता त्यामागे स्वकीयांचेच हात आहेत
ही परिस्थिती कधी आणि कशी सुधारणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
उमटू पाहणारा विरोधाचा एखादा सूर त्याआधीच हवेत विरतो
आपण सारे सव्वाशे कोटी आहोत नेमके हेच आपण विसरतो
आपल्याच अस्तित्वाची जाणीव आपल्याला कधी होणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
प्रत्येकजण चमत्काराची वाट पाहतोय,आकाशातल्या देवावरच भार टाकतोय
तडजोडीची अपेक्षा दुसऱ्याकडून,स्वतःला सोडून इतरांनाच मोजतोय
हे गणित आता कसे सुटणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
आता जागे व्हायची वेळ आली आहे,स्वतःचे अस्तित्व दाखवून देऊया
सव्वाशे कोटी किरणांनी अंधाराचे साम्राज्याच मोडून काढूया
त्यानंतरच स्वातंत्र्याची खरी सकाळ दिसणार आहे.......
त्यानंतरच स्वातंत्र्याची खरी सकाळ दिसणार आहे...........
प्रतिक्रिया
19 Nov 2012 - 4:52 pm | निश
माम्लेदारचा पन्खा साहेब, निव्वळ लाजवाब कविता आणि
अंदाधुंदी माजली आहे,जो तो मनाला येईल तसे वागतोय
स्वतः बरबटलेला आहे पण दुसऱ्याच्या शुद्धतेचा पुरावा मागतोय
यातून पुढे काय साध्य होणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
ह्या ओळी अतिशय जहाल व तिरकस व्यंग करणार्या झाल्या आहेत. भले शाब्बास. फार उत्तम
22 Nov 2012 - 2:35 pm | ज्ञानराम
क वि ता अतिशय जहाल व तिरकस.... असेच म्हणेन ... छान....
22 Nov 2012 - 3:39 pm | प्रेमवेडा
आवडली.....:)
14 Aug 2015 - 5:02 pm | माम्लेदारचा पन्खा
पुन्हा एकदा......!!