रिकाम्या जागा अन एक अनुभव

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
9 Apr 2012 - 1:23 pm

काल दुचाकीवरून जात होते. नेहमीचा रस्ता दुरुस्तीसाठी बंद होता म्हणून थोड्या लांबच्या रस्त्याने जावे लागले. नुकताच विकसित होऊ लागलेला भाग. दोन्ही बाजूला नजर टाकली तर तुरळक बंगले अन बरेचसे रिकामे प्लॉटस. मधल्या रिकाम्या जागांमधून नजर बरीचशी लांबवर पोचत होती. नेहमी रस्त्याच्या दुतर्फा भरगच्च कॉन्क्रीटचे जंगल पहायची अन त्या मर्यादित परिघातच फिरण्याची सवय असलेली नजर अडखळली. ‘लाजते, पुढे सरते, फिरते..’ अशी तिची अवस्था झाली. हल्ली घरे, बंगले, दुकाने, अपार्टमेंटस यांनी शहरांचा, रस्त्यांच्या बाजूंचा इंच अन इंच व्यापलेला. फार दूर पाहायची डोळ्यांची सवय मोडली आहे.
कधीपासून बरं हे सगळं असं झालं आहे ? परवा परवा पर्यंत तर घरांच्या अधे मध्ये जमिनीचे पट्टे व्यापून राहिलेल्या रिकाम्या जागांच्या शॉर्टकट मधून पोरेसोरे, कुत्री, शेळ्या पलीकडच्या रस्त्यांवर जा- ये करीत होत्या. चुकार झुडुपे पावसाळ्यात डोके वर काढीत होती. वारा त्यांच्यामधून पिंगा घालत होता. निरुंद पाउलवाटा गवतफुलांच्या नक्षिदार किनारीसहित त्यातून वळणे घेत होत्या. असंख्य निरुपयोगी, फेकलेल्या वस्तूंनी मध्ये मध्ये ठाण मांडलेले. क्वचित एखादे करडू सावध नजर इकडे तिकडे टाकीत उगीच जराशा उंच वाढलेल्या बाभळीच्या झाडाशी झोंबत असलेले. मधूनच एखादे उंच वारूळ वर तोंड काढून बसलेले. रस्त्यावरून जाता जाता या रिकाम्या तुकड्यावर अंमळ नजर थबकायची. थोडी रेंगाळत विसावायची. जराशी निवांत होऊन मग पावलांबरोबर पुढे चालू लागायची.
अशा, शहरात असूनही काहीशा अलिप्त, आजूबाजूच्या धावत्या जगाची फिकीर नसलेल्या, आपल्याच मस्तीत रमलेल्या रिकाम्या जागांबद्दल मला लहानपणापासून का कोण जाणे, एक वेगळंच आकर्षण आहे. अशाच एका रिकाम्या जागेचा अनुभव मात्र लहानपणी एक वेगळाच ठसा ठेवून गेला.
आमच्या लहानपणी अशा पडीक जागा गावामध्ये बऱ्याच असत. हल्ली दिसतात तसे तिथे कचऱ्याचे ढीग लागलेले नसत. बऱ्यापैकी स्वच्छ असत. आमचे खेळाचे अड्डे तिथे सुट्टी दिवशी अन एरवी शाळा सुटल्यावर लागत असत. कचरा नसला तरी बऱ्याच निरुपयोगी वस्तू तिथे टाकलेल्या असत. त्या म्हणजे आमचे स्पोर्ट्स किट असे. त्यातूनच लगोरी, डबा ऐसपैस, काचा कवड्या अशा खेळांचा श्रीगणेशा होई. ‘कचऱ्यातून कला’ तिथेच साकार होत असे. काचेचे रंगीबेरंगी तुकडे, मणी, रंगीत रीबिनींचे तुकडे, कसल्या कसल्या झाडांच्या बिया, शेंगा, गर्द लाल मखमली गालावर काळाभोर ठिपका ल्यालेल्या गुंजा, वेगेवेगळ्या आकाराचे अन रंगांच्या छटा मिरवणारे लहान मोठे दगड यांचं केवढं तरी कलेक्शन आम्हा मुलींकडे असायचं. काही वेळा पावसाळ्याच्या सरत्या दिवसात रात्री हिरव्या प्रकाशाने चमचमणारे काजवे किडेही सापडत. ते काचेच्या बरणीत भरून रात्री त्यांच्या हिरव्या प्रकाश शलाका न्याहाळण्यात वेळ कसा जाई समजत नसे.
तेव्हा मी दहाएक वर्षाची असेन. वडिलांची बदली एका खेड्यात झालेली. गाव इतका लहान की या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जायला १० मिनिटेसुद्धा लागत नसत. शेवटचे घर ओलांडल्यावर मोठे थोरले रिकामे खडकाळ मैदान किंवा माळरान अन मग नदीचा उतार सुरु होई.. मैदानाच्या मध्यभागी एक युद्ध स्मारक स्तंभ होता. म्हणजे १२ चौ. फुटांचा एक चौथरा अन त्याच्या मधोमध १५ फुट उंचीचा एक स्तंभ. दगडी की धातूचा ते आता आठवत नाही. माळरानाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी भर पावसाळ्यात सुद्धा त्यावर गवताचे पातेदेखील उगवत नसे. मैदानाचा विस्तार संपला होतं तिथून एक खडकाळ रस्ता नदीकडे गेला होता.
मैदानाची ख्याती फारशी बरी नव्हती. मोकळी जागा म्हणून आम्हाला खेळासाठी कुणी तिथे जाऊ देत नसे. अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी कधी नदीला जायचा प्रसंग आला तर तिथे गुलाल माखलेले लिंबू, भाताची टोपली असे काहीबाही पडलेले दिसायचे. सांज करून सहसा कुणी नदीवर जायचे टाळत असत.
उन्हाळ्यात नदीचे पाणी बेताचेच असे. जेमतेम ४ फुट खोल. त्यात मस्ती करायला मजा येई. पण फक्त मुले मुले नदीकडे जायला मोठ्या माणसांची सहसा परवानगी मिळत नसे. सुट्टीच्या दिवशी मात्र सकाळी आवरून मोठया कुणाची तरी पाठ धरून आम्ही मुले नदीकडे पळत असू.
एकदा आम्ही ४-५ मुली अन २-३ मुले असेच नदीवर खेळ अन मस्तीमधे गुंगलो होत. सूर्य डोक्यावर आला तरी आम्हाला भान नव्हते . मग कधीतरी पोटातल्या कावळ्यांनी साद घातल्यावर भान आले अन आमची फौज मैदानाकडची चढण चढू लागली. उन्हात हाशहुश करत चढण चढून आलो अन पाय भेंडाळले. ५ मिनिटे बसावेसे वाटू लागले. पण बसायचे म्हटले तर मैदानातच पाय पसरावे लागणार. त्यापेक्षा चौथऱ्यावर बसलो तर ? मी लगेच ही आयडीया सर्वांना सांगितली. दोघा चौघांनी आढेवेढे घेतले. पण दम तर सर्वांनाच लागलेला. अन घामही निथळत असलेला. त्यातून आता तर भर दुपार. २ मिनिटे बसल्याने काय होणारेय ? असा विचार झाला अन आम्ही पळत पळत येऊन चौथऱ्यावर टेकलो. उंच जागी असल्यामुळे की काय भर दुपारीसुद्धा वाऱ्याचा सांय सांय आवाज येत होता. २-५ म्हणता म्हणता गप्पा मारत चांगली १० मिनिटे झाली. वाऱ्याचा आवाज एकाएकी वाढू लागला. चला रे म्हणत आम्ही उठलो. चौथऱ्यावरून खाली येईतो वारा सुई S करून कानात घुसू लागला. एकाएकी वावटळ उठल्यासारखी झाली. गावाकडचा रस्ता कुठला तेच दिसेना. आम्ही एकमेकांचे हात धरून उभे राहिलो. आता वाऱ्याबरोबर इतरही काही काही आवाज कानात घुसू लागले. रडल्यासारखे, विव्हळल्यासारखे. मधेच कुणीतरी किंचाळल्यासारखे. एकमेकांचे चेहेरे पाहून खात्री झाली की आवाज सर्वांनाच ऐकू येताहेत. भयचकित नजरांनी आम्ही आजूबाजूला पाहू लागलो. रिकामे मैदान. कुणीच नाही. फक्त उन्हात जमिनीतून येत असलेल्या वाफा अन धूळ. वाऱ्यावर उडत असलेल्या धुळीच्या सावल्या माळरानावर पळत होत्या. त्याच जणू आवाज करत असलेल्या. वाऱ्याची लहर अन दिशा बदलेल तसतशी आवाजांची तीव्रताही कमीजास्त होई. एकदा तो कानाशीच आल्यासारखा वाटे तर दुसऱ्या क्षणी दूरवरून येत असल्यासारखा. पळण्याची इच्छा होती पण पायात जड बेड्या घातल्यासारखे पाय जड झालेले. चारी बाजूंनी कुणीतरी आवळून धरले आहे असा भास होत होता. एकमेकांशी बोलण्याचीही भीती वाटू लागली.
असा किती वेळ गेला, ५ मिनिटे की १० काही कळले नाही. एक क्षणभर वारा जरासा पडला. कोलाहल एकदम दूर गेल्यासारखे वाटले. धुळीच्या सावल्या क्षणभर नाहीशा झाल्या. दूर गावाकडे जाणारी पायवाट दिसू लागली. त्यासरशी भीतीची भावना एकदम वर उफाळून आली अन पायात सगळे बळ एकवटून एकमेकांचा हात धरून आम्ही वाटेकडे धूम पळत सुटलो. मैदानाच्या कडेवर पोचलो न पोचलो तोच पुन्हा वाऱ्याचा झोत मैदानात घुसला अन आवाजांचा धिंगाणा सुरु झाला. पण तो आमच्या कानात शिरायच्या आत आम्ही गावकुसात पाउल टाकले होते.
ऐकलेल्या आवाजांबाबत एकमेकांशी बोलून खातरजमा केल्यानंतर असे ठरले की याबाबत मोठया माणसांना न सांगितलेले बरे. नाहीतर नदीवर जायला कायमची बंदी येण्याची शक्यता होती. पण आडून चौकशा करून मैदानात काय प्रकार आहे ते समजून घ्यायचे.
दुसरे दिवशी एकत्र जमल्यावर अर्थात कालचाच विषय. चौकशा करणाऱ्या बहुतेकांच्या तोंडाला दटावणीची पाने पुसली गेलेली. पण एकदोघांना मात्र काही काही समजलेले. त्या मैदानात म्हणे पूर्वी म्हणजे तीनचारशे वर्षांपूर्वी एक लढाई झाली होती. किती एक मेले अन जखमी झाले. जखमींची वास्तपुस्त करायला कुणी शिल्लक राहिले नाही. मेलेल्या सैनिकांना कोल्ह्याकुत्र्यांनी ओढून नेले. तो स्मारक स्तंभ त्या लढाईत मरण पावलेल्यांची स्मृती म्हणून नंतर कुणीतरी उभारला. अन त्या जागेवर ‘वाईट’ असं शिक्का बसला. यापेक्षा जास्त आम्हा मुलांना काही कळू शकले नाही.
त्यानंतर दोनेक महिने आम्ही नदीकडे फिरकलोच नाही. मग शाळा सुरु व्हायच्या बेताला वडिलांच्या केव्हापासून चाललेल्या खटपटीला यश येऊन त्यांची बदली पुन्हा मोठया शहरात झाली अन तो प्रसंग विस्मरणात ढकलला गेला.
पण आता इतक्या वर्षांनी सुद्धा अशी एखादी रिकामी जागा पहिली की तो प्रसंग, तो अनुभव डोळ्यासमोर लख्खपणे उभा राहतो. नेमकं काय झालं असेल तेव्हा त्या रिकाम्या मैदानावर ? चिटपाखरुही आसपास नसताना ते आवाज कुठून ऐकू आले ? भर दुपारी समुद्राला भरती यावी तसे, कोणत्यातरी विशिष्ट पातळीवर आमच्या जाणीवा, आमचे विचार एकत्रितपणे फोकस झाले का ? अन एक वेगळी मिती आमच्या कानांना खुली झाली ? की थोडेसे श्रांत, निवांत अन गाफील असल्याने संवेदनांची पातळी खाली येऊन एरवी न जाणवलेले वाऱ्याचे घुमणे एकदम मनाच्या मोकळ्या भांड्यात पाणी भरावे तसे घुसले ? काही असो. तेव्हा लहानपणी तर, झालेल्या प्रकाराचे विश्लेषण करण्यास आमची बालमने असमर्थच होती. पण एकाचवेळी आम्हा ७-८ जणांना झालेल्या त्या एकसारख्या संवेदना म्हणजे भास असेल असे म्हणायला आता मोठेपणीही , जीभ उचलत नाही.

रेखाटनअनुभव

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

9 Apr 2012 - 1:54 pm | कवितानागेश

नक्की भुतेच असणार! :(

परिकथेतील राजकुमार's picture

9 Apr 2012 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

नक्की भुतेच असणार!

स्मिता, प्रिमो, स्नेहाराणी, अदिती, मकी, ढब्बी इ. हडळींचे मत वाचायला उत्सुक.

एक नाव अंमळ विसरल्यासारखे वाटते ;-)

तिमा's picture

9 Apr 2012 - 7:35 pm | तिमा

'चाफा' यांना चौथ्या मितीबद्दल जास्त माहिती असल्यामुळे त्यांचे मत विचारावे.

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2012 - 8:52 pm | प्रभाकर पेठकर

चांगली कथा.

त्या मैदानाबद्दल सर्वांच्याच मनात असलेला दूषित पूर्वग्रह त्या अनुभवासाठी कारणीभूत असावा. आणि वारा म्हणाल तर दुपारच्या उन्हात असा वारा (मोकळ्या मैदानातून) अनेकदा वाहतो. मोठेपणी त्या वार्‍याची भिती वाटणार नाही पण बालमनाला त्या निसर्गाच्या 'रौद्र' रुपाचे भय वाटणे साहजिक आहे.

अँग्री बर्ड's picture

10 Apr 2012 - 2:59 am | अँग्री बर्ड

तो स्तंभ म्हणजे काय ते समजून गेलो आहे. बाकी, अश्या जागांवर थोड्या बाधा असू शकतात आणि त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. काही वाईट शक्ती, सुप्त हेतू हे तिथेच रेंगाळत राहतात ज्यांना expiry date नसते. आता तुम्ही जे वादळ म्हटले आहे ते वातावरणातल्या बदलामुळे देखील घडलेले असू शकते अथवा तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे देखील असू शकते पण अश्या गोष्टी लगेच उडवून लावण्यात बऱ्याच जणांना रस असतो ज्यात मी देखील सामील होतो जोपर्यंत मला अनुभव आला नव्हता, मात्र जेव्हापासून आलाय तेव्हापासून बेलाशक हो म्हणून टाकतो , हो म्हटले म्हणून माझे चार चव्वल थोडीच खर्च होत आहे.

स्पंदना's picture

10 Apr 2012 - 4:47 am | स्पंदना

>>पण अश्या गोष्टी लगेच उडवून लावण्यात बऱ्याच जणांना रस असतो ज्यात मी देखील सामील होतो जोपर्यंत मला अनुभव आला नव्हता,>>.

होय. मी पण हेच म्हणेन.